मराठी साहित्य – विविधा ☆ भय ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

परिचय

नँशनल असोसिएशन फाँर दि ब्लाईंड या संस्थेच्या सभासद. अंधांचे बचतगट  १० वर्षांपासून चालवितात. महाराष्ट्रातील पहिला प्रयोग म्हणून याला मान्यता मिळाली आहे. स्वतः अंशतः अंध. अपंग सेवा केंद्र, सांगली व सांगली महापालिका या दोन्ही चे ‘प्रेरणा पुरस्कार’ मिळाले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा सांगली यामध्ये सक्रिय कार्यकर्ती म्हणून काम.

चमत्कारामागील विज्ञान यासाठी ‘हसत खेळत विज्ञान’ या नाटयप्रयोगात अभिनय, तसेच चळवळीची गाणी म्हणणे, इतरही अनेक कामे या समितीतर्फे केली जातात. जटानिर्मुलन, सत्यशोधक विवाह, भोंदूबाबा पकडणे याकामात  सहभाग असतो.

कविता, लेख लिहून सादर करतात. काही अंधांसाठीचे व्हाँटस अँप ग्रुपवर असे कविता लेख रेकॉर्डिंग करून पाठविते.

काही एकट्या रहाणाऱ्या जेष्ठांची बँकेची कामे करते.

लग्नसमारंभात मंगलाष्टके रचून म्हणते तसेच काहीइतरही खास समारंभासाठी गाणी लिहून सादर करतात.

नँब शाखा सांगलीवरही  मागणीवरून गीत लेखन केले आहे.

?  विविधा ?

☆ भय ☆ सुश्री त्रिशला शहा 

जीवन खूप सुंदर आहे. जगताना प्रत्येक गोष्टीचा पुरेपुर आनंद घेत गेलो तर दुःखाचा लवलेशही उरणार नाही, दुर्दैवाने ज्या वाईट घटना घडतात, त्यांना मागे टाकून जीवनाची पुढील वाटचाल करीत राहिलो तर आयुष्य खूप सुंदर होईल हे नक्की, परंतु या वाटचालीत काही वेळा मात्र भयदायी असतात. अगदी लहान असताना बालपणात एक भय आपली पाठ सोडत नाही, ते म्हणजे बागुलबुवा. थोडा जरी हट्ट केला, रडून निषेध नोंदवला तर घरातील आई, आजी, बाबा हे सगळे एकच भिती घालतात, “तो बघ बागुलबुवा आला “मग आम्ही आपल घाबरून गप्प!शिकत असताना शाळेतील शिक्षकांची भिती, परिक्षेची भिती, अभ्यास कितीही चांगला झाला तरी निकालाची भिती. यशस्वीपणे पास झालो तर नोकरीची भिती, नोकरी चांगली लागली तर बाँसची भिती. लग्न झाल्यावर तर विचारुच नका. पैसे पुरवायची भिती, मुलांच्या शिक्षण, पालनपोषणाची जबाबदारी युक्त भिती कायमच असते. सगळं सुरळीत झालं, आयुष्यातील बऱ्यापैकी जबाबदाऱ्या पार पाडल्यावर एक मोठी भिती आपल्या मनात ठाण मांडून बसते ती म्हणजे असलेल्या किंवा होणाऱ्या आजाराची भिती. त्यातून परत जोडीदाराची काळजीयुक्त भिती असतेच. हे सगळं निभावताना वार्धक्यात मुलं आपल्याला बघतील कि नाही हि भिती तर मरेपर्यंत सुटतचं नाही. एकूण काय भय आपली पाठ सोडत नाही. जीवन आहे तिथे आनंद, उत्साह, सुख असतेच, आनंदाने जीवन जगावे हेही खरेच पण त्याच्या जोडीला दुःख, भय हे सुध्दा आहे.  याच वाटचालीत जगत असताना हे सुध्दा लक्षात ठेवावे वाटते, ‘भय इथले संपत नाही.’

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग १२-  संगीत -१ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग १२-  संगीत -१  डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

महाविद्यालयात शिकत असताना गंभीर विषयावरील ग्रंथ वाचनाच्या खालोखाल नरेंद्रच्या आयुष्यात स्थान होतं ते संगीताला. तो स्वत: संगीताचा आनंद घेत असे आणि इतरांनाही तो तेव्हढ्याच मुक्तपणे देत असे. अनेक वेळा मित्र जेंव्हा आग्रह करत असत तेंव्हा, नरेंद्र लगेच प्रतिसाद देत असे. त्याचा सूर लागला की सगळीकडे निस्तब्ध शांतता पसरून त्या स्वरमाधुर्यात सगळेजण डुंबून जात.

विश्वनाथबाबूंनी नरेंद्रचा शास्त्रीय संगीताचा अभ्यास रायपूरच्या वास्तव्यातच सुरू केला होता. त्याला अनेक भाषेतली गीतं शिकवली होती. त्यांनी नरेंद्रला, ध्रुपद, धमार, ख्याल, टप्पा, ठुमरी, बंगाली कीर्तन शामसंगीत व बाउल संगीत हे लोकसंगीताचे प्रकार पण शिकविले. नरेंद्रची ही तयारी करून घेतल्यावर त्यांनी कलकत्त्याला परतल्यावर, पुढे योग्य गुरूंकडे रियाझ आणि धडे घेण्यासाठी व्यवस्था केली होती. आई भुवनेश्वरीदेवीं चा आवाज पण चांगला होता. आई वडिलांच्या सान्निध्यात तसे संगीताचे संस्कार नरेंन्द्रवर लहानपणापासूनच होत होते. लहानपणी आपली आज्जी रायमणीच्या घरात त्याचा कधी कधी रियाझ चालत असे. दत्त घराण्याला संगीताचं वरदान लाभल होतं. सन्यासी झालेले नरेंद्रचे आजोबा दुर्गाप्रसाद उत्तम गायक होते. त्यांचा वारसा विश्वनाथबाबू चालवत होतेच. ते दर आठवड्याला गुणीजनांना बोलवून त्यांच्या बैठका भरवायचे, सर्वदूर प्रवासात संगीतातले नवनवीन प्रकार ऐकून व पाहून आल्यावर तसे संगीत, गायकांना ऐकवायचे. असे म्हणतात की, ‘ठुमरी’ प्रकार बंगाल मध्ये विश्वनाथ बाबूंनीच परिचित करून दिला.  

तीव्र बुद्धिमत्तेबरोबर रसिकता आणि अभिजात अभिरुची हे गुण असल्यानेच युवावस्थेत येता येताच नरेंद्रने गायन वादन कौशल्य आत्मसात केले होते आणि कुटुंबातही याची ख्याती पसरु लागली. त्याच्या धीरगंभीर आणि सुरेल आवाजाने लोक आकर्षित होत. “स्वरांच्या माध्यमातून त्यातील सौंदर्याच्या आविष्कारा बरोबरच रसिक श्रोत्यांच्या मनात विशिष्ट भाव निर्माण झाला पाहिजे. श्रोत्यांची आणि स्वत: गायकाची अशी भावसमाधी लागणे, गायनाचे सूर थांबल्यावरही तिचा परिणाम श्रोत्यांच्या मनात रेंगाळत राहणे आणि त्यांचे मन एका उदात्त वातावरणात पोहोचणे हे संगीताचे खरे उद्दीष्ट आहे” असे नरेंद्रचे मत होते. त्यांचा हा व्यासंग केवळ मैफिली पुरताच मर्यादित नव्हता.

श्री रामकृष्ण परमहंस आणि नरेंद्र ची पहिली भेट झाली त्याचं कारण, नरेंद्रचं गाणं हेच होतं. नरेंद्रचं  संगीत हेच या दोघांच्या मधल्या अतूट संबंधांचा सेतू होता.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चैत्रगौर – उत्सवाचं लेणं… ☆ प्रा. डॉ.  श्रुतीश्री वडगबाळकर ☆

? विविधा ?

☆ चैत्रगौर – उत्सवाचं लेणं… ☆ प्रा. डॉ.  श्रुतीश्री वडगबाळकर ☆ 

वसंत ऋतु आला. आंब्याचा मोहोर गळाला .फाल्गुनातील रंग अधिक गहिरे झाले. चहुकडे आनंद पसरला आणि या आनंदात अधिक भर पडते चैत्रपालवीने. झाडे हिरव्यागार पानांनी, फुलांनी ग्रीष्माचे स्वागत करायला तयार होतात. आपली दाट सावली वाटसरूसाठी अधिक दाट करतात. अशावेळी नव्या वर्षाचा नवा दिवस घरोघरी गुढ्या उभारून साजरा केला जातो .नवीन वर्षाच्या तिसऱ्याच दिवशी घरोघरी चैत्र गौरीचे आगमन होते.

हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक तिथीचे महत्त्व आहे. पौर्णिमा तर साजरी होते पण अमावसेला ही महत्त्व आहे. प्रकाशाला  प्राधान्‍य आहेच,  पण अंधाराकडेही दुर्लक्ष नाही. प्रकाश- अंधार या चक्राच्या गतीत तर जीवनाचे सार आहे . प्रतिपदा द्वितीया,  तृतीया  अगदी चतुर्दशीपर्यंत प्रत्येक तिथी कधीतरी महत्वाची असते. चैत्र महिन्यात तृतीयेचे महत्त्व आहे. ही गौरी येते ती चैत्र शुद्ध तृतीयेला. येते तो हवामान बदल करतच. क्षणात गडगडाटासह गारांचा पाऊस तर क्षणात स्वच्छ ऊन. आंब्याच्या झाडावर कैऱ्या लटकू लागल्या, की चैत्रगौर जवळ आली असे समजावे. देवा इतकेच देवीला ही आमच्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. आणि ही चैत्रगौर साधीसुधी नाही तर माहेरवाशीण आहे. आमच्याकडे एरवी मुलीचे कौतुक होणार नाही पण लग्न झाल्यानंतर ती सासरहून माहेरी आली की सगळे घर तिच्यापुढे नाचत असते. आई तर वेडीपिशी होते. लेकीला काय खाऊ घालू काय नको असे तिला होते. तिच्या आवडीचे आठवून आठवून केले जाते. चार-सहा दिवसा करता आलेली असते ,मग कौतुक करायला नको ?  तसं या लेकी चे कौतुक होत असते. परत ही लेक वर्षातून एकदाच येत असते,  मग काय विचारावे.! ती झोपाळ्याचा हलतच नाही नव्हे ती झोपाळ्यावर बसूनच येते. हा झोपाळा पितळी असतो किंवा लाकडी असतो. लहान-मोठा कसाही चालतो. पण झोपायला हवाच . कारण दिवस तिचे हे फुलायचे, झोपाळ्या सकट झुलायचे असे असतात.

आल्या दिवशी तिला तेल लावून न्हाहू  माखू  घालतात. खण नेसवतात. कैरी,  लिंबू , मिरच्या वगैरे घालून भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीच्या चटणीचा नैवेद्य दाखवतात. आंब्याचे पन्हे करतात. तिचा थाट काही निराळाच. जवळ जवळ महिनाभर ती  मुक्कामाला असते. चैत्र शुक्ल तृतीयेला येते व वैशाख शुक्ल तृतीयेला तिला पोहोचती करावे लागते. या महिनाभरात तिला नवनवीन पदार्थ खाऊ घालावे लागतात. चैत्री पौर्णिमा नंतरच्या तृतीयेला मधली किंवा दुसरी तीज  म्हणतात. या दिवशी पण डाळ पन्हे देवीसमोर ठेवतात. आणि मग करावा लागतो तिचा थाटमाट. तिचे खास हळदीकुंकू. जे कित्येक  वर्षापासून आमच्या परंपरेत चालत आलेले आहे.

पूर्वी हळदीकुंकू म्हणजे बायकांना एक पर्वणीच असायची. एकमेकींना भेटण्याची आणि दागदागिन्यांनी नटण्याची. बायकांची चार दिवसापासून धांदल उडते.लाडू , करंज्या, अनारसे, चकल्या ,शेव सगळे तिखट, गोड पदार्थ करावे लागतात. ज्या दिवशी हळदीकुंकू असेल ,त्यादिवशी परत गरम पाण्याने स्नान जरीचा खण घालून तिला बसवावे लागते. मोठी आरास करावी लागते .ही आरास कोण किती कौशल्याने करतो, यातही चढाओढ असते. कोणी पानाफुलांचा झोपाळा करून त्यावर तिला बसवतात.  कोणी एकावर एक पेट्या करून त्यावर कपडा घालून पायऱ्यांचा आभास करतात. आजूबाजूला पडदे लावतात. काही कल्पक कपड्यांचे जहाज , चंद्र असं काहीतरी करून नेहमीपेक्षा वेगळे कौशल्य दाखवतात. समोर डिशमध्ये फराळाचे पदार्थ भरून ठेवतात. खेळणी मांडतात. सुंदर रांगोळी काढतात. तिला जितके नटवता येईल तितके नटवतात. आहो बायकांचं काय सृष्टी देखील तिचं कौतुक करते. नाहीतर पावसाळा नसताना पावसाळी वातावरण थोडा वेळ तरी का निर्माण व्हावे ? गडगडाटासकट पाऊस का पडावा? तर चैत्र गौरीचे डोहाळे म्हणजे इच्छा पुरवण्यासाठी म्हणे. मोगरा सुद्धा बहरतो याच दिवसात. सगळे वातावरण ती सुगंधी व प्रफुल्लित करते. म्हणूनच बायका एरवी कोणाकडे जायच्या नाहीत पण चैत्रगौरीच्या हळदी कुंकवाला नाही म्हणणार नाहीत.

येणाऱ्या बायकांना चहा नसतो हो द्यायचा. आलेल्या बाईला आधी हळद कुंकू लावायचे. आत्तर लावायचे. गुलाब पाणी शिंपडायचे . कैरीचे पन्हे , खिरापत द्यायची. काही ठिकाणी खिरे म्हणजे पांढऱ्या काकड्या देतात. तर काही ठिकाणी चंदनाची उटी बायकांच्या हाताला लावतात व त्यावरून शिंपल्याने रेषा  ओढतात . या उटीने हाताला एक वेगळेच सौंदर्य येते व परत कुंकवाचे वरती ठिपके द्यायचे.  रंग संगती व थंडावा या दोन्ही गोष्टी किती सोप्या पद्धतीने साध्या जातात नाही का? शेवटी भिजवलेल्या ओल्या हरभऱ्याचे ओटी भरायची.

ऋतुमानाप्रमाणे सण साजरी करणारी आपली संस्कृती आहे .नाहीतर एरवी खा खा म्हटले तरी भिजवलेले पौष्टिक हरभरे कोणी खाणार नाही.  पण या दिवसात दोन-तीनदा तरी अशी ओल्या हरभऱ्याची उसळ होते.  असे हे शितल, प्रसन्न , उत्साही हळदीकुंकू बाहेरच्या गर्मीची , उष्णतेची जाणीवही होऊ देत नाही. चैत्रगौर अशी दिमाखात राहते आणि अक्षयतृतीयेला त्याच दिमाखात तिची बोळवण करावी लागते , एखाद्या माहेरवाशिणीसारखी.. जर अक्षय तृतीयेला बुधवार असेल तर ही माहेरवाशीण दुसऱ्या दिवशी जाते.

हे हळदीकुंकू कैरीच्या पन्हाचे, ओल्या हरभऱ्याचे,  पांढऱ्या काकडीचं , चंदनाच्या सुवासीक अत्तराचे , चांदीच्या गुलाबदाणीतून येणाऱ्या गुलाब पाण्याचं . सुगंधी,  प्रफुल्ल , पवित्र, शितल असंच असतं. यांनीच येणाऱ्यांचे स्वागत करावं… कारण चैत्रगौर म्हणजे तरी कोण?  तुमच्याआमच्यातलीच माहेरपणाच्या कौतुकाला आसावलेली एक मनगौरच आहे. एक उत्सवाचं लेणं घेऊन आलेली… खरं ना…..

 

© प्रा. डॉ.  श्रुतीश्री वडगबाळकर

सोलापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रेकी… ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? विविधा ?

☆ रेकी… ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

काल सांताक्रुझला शाळेची एक बस काही तासांसाठी हरवली. ती सापडल्यावर एक उल्लेख केला गेला की गाडी चालक नवीन होता, त्याने मार्गाची ‘रेकी’ केली नव्हती म्हणून तो गोंधळला आणि नियोजित ठिकाणांवर पोचायला बराच उशीर झाला.

इतके दिवस केवळ गुन्हेगाराने / अतिरेक्यांनी अमुक तमुक ठिकाणांची , इतक्यांदा-तितक्यांदा ‘रेकी’ केली असे ऐकायला मिळायचे. त्यामुळे तुमच्या आमच्या सारख्या एका सामान्य वाहन चालकाबद्दल वापरलेला हा शब्दप्रयोग एक वेगळाच संदर्भ  देऊन गेला.

मग लक्षात आले की हा प्रकार नकळत ( म्हणजे याला रेकी बिकी असं काही म्हणतात हे माहिती नसताना) आपण अनेक वेळा आचरणात आणलाय. अगदी लहानपणी आपल्याला शाळेत घातल्यानंतर पालकांकडून त्या मार्गाची रेकी केली जाणे ( म्हणजेच घरापासून लागणारा वेळ, बसच्या वेळा,सायकल/ चालत जात असेल तर रहदारी,वस्ती, जवळचा मार्ग इ इ ) ते आपण नवीन ठिकाणी कामावर रूजू होण्यापूर्वी केलेली मार्गाची रेकी.

अशी प्रत्येकाची विविध उदाहरणे असतील. मला आठवतयं लहानपणी नाटकात काम करताना नाटकाच्या तालमी इतरत्र कुठेही होत असल्या तरी मुळ प्रयोग जिथे व्हायचा तिथेच काही दिवस आधी ‘फायनल रिहर्सल’ व्हायची. एकप्रकारे ही सादर होणाऱ्या प्रयोगाची ‘रेकीच’ म्हणता येईल.

भारताचा परदेशात सामने खेळायला गेलेला संघ किंवा भारतात आलेले संघ ( क्रिकेट का इतरही? ) मुख्य मालिके आधी काही सराव सामने खेळायचा. हा ही एक ‘रेकी’ चा प्रकार असावा का?

दहावी/बारावी बोर्ड परीक्षा आधी आमचे हुsष्षार मित्र सराव पेपरांची ‘रेकी’ करायचे. या भानगडीत आम्ही मात्र फारसे पडलो नाही ☺️

रेकी ची ही मला आठवलेली काही उदाहरणे.

माझ्या मते या सगळ्याचा प्रमुख उद्देश प्रत्यक्ष तशी परिस्थिती येईल तेंव्हा आपल्याला त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा   विश्वास ( काँन्फीडन्स) यावा, फिल गूड वाटावे,  आणि सहजतेने अतिरिक्त ताण वगैरे न घेता परिस्थिती स्वीकारणे वगैरे वगैरे असावा अशी प्रत्यक्ष जागेवरून जाऊन ‘रेकी’ करण्यात ज्यांची इतिहासाने नोंद करून ठेवली असे उदाहरण म्हणजे छत्रपतींचे विश्वासू ‘बहिर्जी नाईक’. त्यांचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊ शकत नाही.

प्रत्यक्ष उपस्थिती ( physical ) बरोबरच आपल्या कडे  ‘मन’ या अत्यंत उपयुक्त  आयुधाचा  रेकी करण्यासाठी कसा विविध प्रकारे ( Meditation, Dream,Motivation, visualization इ इ प्रकारे)  उपयोग होऊ शकतो याबद्दल विस्तृत माहिती अनेकांना आहेच.

तुर्त इतकेच

 

अमोल 📝

विनायकी चतुर्थी ( अंकातील योग)

५/४/२२

(अवांतर : आपल्या समुहात लिहिलेले लेखन हे माझ्या ‘लेखी’ आपलं माझ्यासाठी ‘रेकी’ चाच प्रकार म्हणा ना !.. 😷)

© श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! घाम आणि अक्कल ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 घाम आणि अक्कल !😅  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“नमस्कार पंत, हा तुमचा पेपर ! आज पेपरात वाचण्यासारखं काही नाही, म्हणून लवकरच आणला !”

“मोऱ्या, उद्यापासून एक कामं कर !”

“कोणतं पंत ?”

“आमचा पेपर वाचायला न्यायचा नाही, कळलं ?”

“असं करू नका पंत, गेली कित्येक वर्ष मी तुमचा पेपर तुमच्याआधी वाचतोय आणि परत आणून पण देतोय ना आठवणीने ?”

“गाढवा, आमचाच पेपर आम्हांला परत आणून देतोयस म्हणजे काय मेहेरबानी करतोयस की काय माझ्यावर ?”

“असं रागावू नका पंत, पण पेपरात आज खरंच वाचण्यासारखं काही नाही. रोजच्याच रटाळ बातम्या वाचून वाचून कंटाळा आलाय नुसता !”

“मग असं का करत नाहीस मोऱ्या, आपल्या एक ते आठ अहमद सेलरचा, चाळकमिटीचा अध्यक्ष या नात्याने, ‘अहमदी सफर’ नावाचा एक पेपर चालू कर ना तूच, म्हणजे तुला हव्या तशा बातम्या त्यात देता येतील संपादक या नात्याने आणि तुझा पेपर कसा वाचणेबल करायचा हे तुला ठरवता ही येईल, काय ?”

“ही मस्त कल्पना आहे पंत तुमची ! आपल्या आठ चाळीत काही ना काही रोज घडतंच असतं, त्यामुळे बातम्यांना पण तोटा नाही !”

“खरं आहे मोऱ्या, आठ चाळीतली नळावरची रोजची भांडण, प्रत्येक चाळीतली किंवा दोन चाळीत मिळून चालू असलेली प्रेम प्रकरणं, शाब्दिक हमरी तुमरी, मारामाऱ्या, नवरा बायकोची भांडण, असा बराच मसाला वापरून तुला तुझा पेपर रंजक आणि वाचनीय बनवता येईल बघ !”

“पंत समस्त आठ चाळीतील चाळकऱ्यांना सुद्धा कुठल्या चाळीत काय चालू आहे ते कळेल. लगेच ‘अहमदी सफरच्या’ कामाला लागतो आता, येतो पंत !”

“मोऱ्या तुझ्या ‘अहमदी सफर’ मध्ये इतर पेपरात जसा लोकांच्या पत्र व्यवहारासाठी, त्यांच्या समस्या किंवा विचार मांडण्यासाठी एक कोपरा राखीव असतो, तसा ठेव बरं का !”

“जरूर पंत, लोकांच्या समस्या मला चाळकमिटीचा अध्यक्ष या नात्याने लोकांच्या पत्रांनी कळल्या तर बरंच होईल, म्हणजे त्यावर लगेच काहीतरी तोडगा काढता येईल !”

“हॊ मोऱ्या !”

“पंत, जसं तुम्ही चाळीच्या पेपरला नांव सुचवलत तसं त्या पेपरमधील पत्र व्यवहाराच्या कोपऱ्याला पण नांव सुचवा ना तुम्हीच ?”

” ‘तुमच्या मनांत, सांगा जनांत’ हे नांव कसं वाटतंय तुला त्या पत्र व्यवहाराच्या कोपऱ्याला ?”

“अगदी योग्य आहे पंत ! तुमच्या मनांत काही असेल तर पत्र रूपाने ते आम्हाला कळवा, आम्ही ते आमच्या पेपरच्या पानावर छापून त्याला जनात सांगून प्रसिद्धी देवू, मस्त !”

“मोऱ्या एक लक्षात ठेव तुझ्या पेपरात माझंच पाहिलं पत्र प्रसिद्ध व्हायला हवं !”

“नक्कीच पंत, पण तुमच्या पत्राचा विषय काय असेल तेच माझ्या ध्यानात येत नाहीये, तो जर आधी कळला तर…..”

“मोऱ्या, आपल्या आठ चाळीत रोज कुणाकडे ना कुणाकडे कसलं तरी मंगल कार्य असतंच असतं आणि…”

“पंत, आता आठ चाळी मिळून ४८० बिऱ्हाड म्हटली की असं होणारच ना !”

“त्याला माझी हरकत नाहीच मुळी, आपापल्या घरच मंगल कार्य नक्कीच साजरं करावं सगळ्यांनी पण ते कशा प्रकारे साजरं करावं याला काही पद्धत असते ना रे !”

“हॊ पंत, आपण म्हणता ते बरोबर, पण हौसेला मोल नसतं असं आपणच म्हणतो ना ?”

“अरे म्हणून काय उठल्या सुटल्या कुठल्याही कार्यक्रमात मोठं मोठ्याने DJ लावून नाचायलाच हवं का ?”

“पंत असते एकेकाला हौस त्याला…..”

“म्हणून बारशाला सुद्धा त्या लहान बाळाचा विचार न करता कर्ण कर्कश्य DJ लावून अचकट विचकट नाच करायचे ?”

“तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पंत, हल्ली सगळ्याच चाळीतून कुणी ना कुणी पेशंट असतो, बऱ्याच सिनियर सिटीझनना मोठ्या आवाजाचा त्रास होतो, हे कुणी लक्षातच घेत नाही ! पंत तुम्ही लिहाच या विषयावर पत्र, चांगल्या ठळक चौकटीत तुमचं पत्र छापतो की नाही बघा !”

“अरे मोऱ्या या अशा लोकांना सांगायला हवं, की उठल्या सुटल्या त्या DJ च्या तालावर नाचून नाचून तुम्हांला फक्त घाम येईल, पण अक्कल नाही येणार !”

“बरोबर पंत !”

“त्या DJ वर खर्च होणारे हजारो रुपये दुसऱ्या कुठल्या तरी सामाजिक कार्याला द्या, हुशार गरजू गरीब विद्यार्थ्यांना मदत करा यातच तुमचं आणि समाजाच भलं आहे.”

“अतिशय उत्तम विचार दिलात तुम्ही पंत ! आजच नवीन पेपरच्या कामाला सुरवात करतो, शुभस्य शीघ्रम !”

“मोऱ्या, पण एक लक्षात ठेव, तू तुझा पेपर काढलास तरी आमचा पेपर कसाही असला, तरी रोज आमच्या आधी नेवून वाचायचा आणि न विसरता परत आणून द्यायचा, काय ?”

“हॊ पंत, धन्यवाद, येतो !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

ठाणे.

०८-०४-२०२२

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शब्देवीण संवादू… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ शब्देवीण संवादू… 🤔 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

काही  दिवसांपूर्वी मेघालयातल्या whistling village विषयी ऐकलं. या  Kongthong village मध्ये एकमेकांना बोलवायला शिट्ट्यांचा वापर करतात. इथं संवाद साधायला शब्द वापरले जात नाहीत. शिट्टी घालून संवाद साधला जातो. किती छान! बोलण्यासाठी जवळपास असणं गरजेचं नाही. काही अंतरावरुन देखील; आधुनिक तंत्रज्ञान न वापरता संपर्क साधता येतो….. पण हो याकरिता शिट्टी घालता यायला हवी हं.

माणसाला बोलायला आवडतं. वेगवेगळ्या विषयांवर बोलता येणं ही एक कला आहे. ही कला तुम्हाला बहुश्रृत बनवते. समाजप्रिय बनवते. गप्पा मारणारी माणसं साळढाळ असतात. सहजपणानं कोणत्याही प्रकारच्या लोकांमध्ये मिसळून जातात. मनातलं सगळं सांगून टाकलं की कसं मोकळं मोकळं वाटतं. आपल्याला भावना, विचार व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात.मनातलं सगळं बकबक करुन सांगितल्या शिवाय चैनही पडत नाही आपल्याला. नुसत्या शिट्टीतून या माणसांना राग, लोभ, प्रेम कसं बरं व्यक्त करता येत असेल.शब्दाविना एकमेकांना समजून घेणं ही कला मात्र या लोकांना साधली असेल.  योग्य शब्द शोधून बोलायचा प्रयत्न केला तरी गैरसमज होऊ शकतात. Whistling village मध्ये अशा गैरसमजांना थाराच मिळत नसेल. दुधारी हत्यारासारखे शब्दच न वापरल्यानं हे व्हिलेज खऱ्या अर्थानं स्वर्ग तर ठरत नसावं?

आजकाल आपण न बोलता ही खूप बोलतो. मोबाईलवर येणाऱ्या मेसेजेस ना उत्तर देताना शब्द वापरायचे टाळतो. इमोजी. . . स्मायलीज पाठवून रिस्पाॅन्स देतो. या स्मायलीज आहेतही खूप गोडुल्या. सर्व भाव भावना व्यक्त करण्यास समर्थ आहेत. राग, द्वेष, आनंद अशा मनतरंगा बरोबर त्या थंडी, उष्णता, पाऊस असे हवेतील बदलही त्या दाखवतात. न शिंकता सर्दी – खोकल्याची वर्दी देतात. शाब्बासकी, सहमती, नाराजी,इ. सांगतात. केक, बूके, फूलं पाठवून स्पेशल डेज देखील आपण लांबूनच साजरे करु शकतो. स्टीकर्स पाठवून जास्त आपुलकी दाखवू शकतो. GIF द्वारा गंमतीदार, हलके-फुलके संदेश पाठवू शकतो. नुसते हसरे ईमोजी सुध्दा किती प्रकारचे आहेत. फक्त हसरा चेहरा पाठवून खुषी व्यक्त करता येते. हसरा चेहरा, हसरे डोळे आणि गुलाबी गाल आनंदाबरोबर किंचित लाजरा भाव

व्यक्त करतात. डोक्यावर गोलाकार मुकुट मिरवणारा इमोजी एखाद्या विषयी असलेला अभिमान सांगतो.

हे सगळे चेहरे न बोलता खूप काही बोलतात. कमी वेळात योग्य भावना सांगणारं हे अनोखं तंत्रज्ञान आज जास्तीत जास्त वापरलं जातं. आपल्याजवळ सांगण्यासारखं खूप असतं. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आकलनक्षमतेनुसार आलेल्या अनुभवांची अभिव्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे करता येते. भोवताली घडणाऱ्या घटनांचा अर्थही स्वतः च्या क्षमतेनुसार, संवेदनशीलतेनुसार लावता येतो. त्यासाठी कथा, कविता, कादंबरी असे साहित्य प्रकार हाताळले जातात. काळ बदलला. भावविश्व उलगडून दाखवणारी नवीन साधनं आली. नवीन पिढीची व्यक्त होण्याची साधनं बदलली. भाषा बदलली. सुपरफास्ट जमान्यात सुपरफास्ट पध्दतीनं व्यक्त होता आलं पाहिजे. त्यासाठी भाषेची गरज राहिली नाही. इमोजी हे काम अधिक सुलभ आणि सुपरडुपर फास्ट करतात. शब्दातून सांगितल्या जाणाऱ्या अर्थापेक्षा ही चित्रलिपी वेगवेगळे अर्थ प्रतीत करु शकते. जो हवा तो अर्थ घ्यावा. भाषेची अडचण नाही. भाषा येत नसल्याचा न्युनगंड नाही. कमी वेळात जास्त तसंच योग्य विचार मांडता येतो. पाल्हाळ न लावता मुद्दा सांगता येतो. लिहिणाऱ्याचा आणि वाचणाऱ्याचा दोघांचाही वेळ वाचतो. आता हे शब्दाविना व्यक्त होणाऱ्या पिढीचं जग झालंय.

म्हणजे आपण पुन्हा भाषा नव्हती त्या काळात चाललो आहोत की काय? . . आपण पुन्हा इमोजीतून. . . चित्रलिपीतून . . . भाषेचा शोध लागण्याच्या आधीच्या काळात जाऊन पोहोचणार आहोत की काय?

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मधुमास ☆ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

 ? विविधा ?

☘️ मधुमास ☘️ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆ 

दारातली मंजि-यांनी डवरलेली तुळस, कळ्यांनी पानोपानी लगडलेली सायली ,मोगरा ,एकाआड एक कळ्यांचा गुच्छ फुलवणारा निशिगंध, सगळी झाड वेली उन्हाची तगमग कमी होताच त्यांना पाणी देताना तरारून आली . त्यांचा मंद सुगंध वाऱ्यावर तरंगत आला अन्, मन प्रसन्न झाले.

वसंताच्या आगमनाने खरं तर सृजनाचा सोहळा सुरू झालाय. दारातला कडूनिंब आपली नवी नवेली पालवी हलवत वाऱ्यावर मस्त झुलतोय. त्याच्या पिवळसर पांढऱ्या इटुकल्या फुलांनी क्षणातच सगळीकडे थोडीफार पखरण केली त्याचा सुवासही आगळाच…! अंगणातली छोटीशी हिरवाई निरखताना वाटतं अरे ही तर चैत्रपालवी..! नव्या वर्षाच्या नव्या ऋतूची म्हणजे बहरा तल्या वसंताची गुढी आपण उभारतो. त्याच्या स्वागतासाठी आंबाही मोहराची मस्त सुगंधाची लयलूट करत असतो. चैत्रपालवी ने अवघा आसमंत नव उन्मेषाने झळाळून वाऱ्यावर डोलतो. पर्णहीन उघडा बोडका गुलमोहर, पळस लाल भडक केशरी फुलांनी अंगोपांगी बहरून उन्हाचं छत्र डोक्यावर घेऊन उभा राहतो. शिशिराची फुलं पाना आडून सुंदर पिसारा फुलवत सुगंध चौफेर पसरवतात. होरपळून टाकणाऱ्या उन्हाळ्याच्या सुरुवातीची अशी विविध रंगांची, गंधाची अन् रसाचीही उधळण करून ग्रीष्माचा दाह मनमोहक करण्याची निसर्गाची किमया मनाला स्पर्शून जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव वर्षाची गुढी उभारताना आपण नव्या नवलाईने, नव्या उमेदीने अन नव्या चैतन्याने नववर्षाला सामोर जातो ते यामुळेच!.

चैत्र महिन्यात फुलातून, फळातून मधुरस नुसता पाझरत असतो. कदाचित यामुळेच चैत्राला मधुमास असही म्हणतात. वर्षाचा हा प्रथम मास म्हणजे सर्वांना आनंद देणारा उत्सवप्रिय लोकांना सण,उत्सव साजरे करण्यासाठी कारणे देणारा, प्रोत्साहन देणारा असा आहे. या महिन्यातील एक पूजा उत्सव म्हणजे गौरी. शंकराचा दोलोत्सव. काही ठिकाणी यावेळी गौरी शंकराचा विवाह सोहळा ही करतात. माझ्या माहेरी हा उत्सव पूजा आहे .नंतरच लग्नाच्या तिथी, मुहूर्त असतात. चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरीची तीज .अक्षय तृतीय पर्यंत हा दोलोत्सव असतो. गौरी म्हणजे साक्षात वनदेवी! तिला वसंत गौर ही म्हणतात. हळूहळू उन्हाळा वाढू लागतो आणि पाना आड दडलेल्या बाळ कैऱ्या बाळसं धरू लागतात. वाऱ्याबरोबर फांद्यांच्या झोक्यावर झोके घेऊ लागतात. त्याच बरोबर आंबट गोड पन्हं उन्हाची तगमग कमी करत, कैरीची वाटली डाळ पन्ह गौरीच्या दोलोत्सवाची, हळदी कुंकवाची लज्जत वाढवतात . त्याबरोबरच कलिंगडाची, काकडीची रसदार फोड हवीच असते. सुवासिनींची ओल्या हरभऱ्याची ओटी, त्यांची खमंग उसळ आणि थंडगार उसाचा रस याचा आस्वाद आगळाच..

श्रीराम दोलोत्सव, श्री हनुमान जयंती ही याच महिन्यात येतात. फाल्गुन ,चैत्र, वैशाख हे तीन महिने वसंत ऋतु असतो. पण चैत्र महिन्यात त्याचा सन्मान अधिक होतो असं वाटतं. कारण मनाला उल्हसित करणारे सण उत्सव सोहळे याचा आनंद या महिन्यात आपण जास्त घेतो.

रसदार फळं ,गंधमय फुलं, हिरवीगार चैत्रपालवी अशा बेसुमार रंगांनी नटलेला प्रखर उन्हाने अंग भाजेल असा, पण तरीही अत्यंत शितल सुखकारक अशा वाऱ्याने तनामनाला सुखविणारा, दृष्टीला भ्रांत करणारा चैत्रमास — मधुमास मनाला नेहमीच भुरळ घालतो एवढं खरं…!

© सुश्री शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड- पुणे.

मोबा. ९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वाळवणाचा सोहळा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

?  विविधा ?

☆ वाळवणाचा सोहळा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी

आमच्या पिढीनं पुरेपूर अनुभवला हा आनंदाचा सोहळा.

उन्हाळ्यात घरोघरी रंगायचा हा सोहळा.

कडकडीत उन्हात वाळवून ठेवलेले पदार्थ म्हणजे वाळवण.  हे वर्षभराचं तोंडीलावणं असायचं.

“बबर्जी फाजील झाले की स्वयंपाक बिघडतो” ह्या म्हणीला गुंडाळून ठेवून चार पिढ्यांनी एकत्र येऊन केलेले हे पदार्थ अवीट गोडीचे असत. पूर्वी अचानक पाहुणे येत अशावेळी” पान संजगतं ” असं आई म्हणायची. पूर्वी ठराविक मोसमात ठरावीक भाज्या मिळायच्या. त्यावेळी वाळवणाचे पदार्थ जेवणाची लज्जत वाढवायचे. सणावाराला हे तळण असल्याशिवाय नैवेद्य पुराच होऊ शकत नसे.

शकुनाच्या सांडग्यांनी सुरुवात व्हायची. उद्या कोणाकडे हे त्याच दिवशी ठरायचे. गव्हाच्या शेवया, कुरडया, बाजरीचे सांडगे, खारवड्या, पापड्या, तांदळाच्या सालपापड्या, खीच्चे, पापड, उडीद डाळीचे पापड, बटाटा चिप्स , वेफर्स कच्चा किंवा उकडून केलेला कीस, चकल्या, साबुदाण्याचे चीप्स, सांडगे, पापड्या, मूग डाळीचे सांडगे, वड्या, शिन्नी चे सांडगे, मिश्र डाळींचे सांडगे , कोहळा भेंडी कलिंगड यांचे सांडगे ” मिळून साऱ्याजणी” करत असत. वाळवण म्हणजे एक प्रकारचे गेट-टुगेदर असायचे. घरातील कर्त्या  बाई चे नियोजन, आजीचे सुपरव्हिजन असे. लग्नाळू किंवा नवी नवरी शिकाऊ उमेदवार असत. बच्चे कंपनी “हे दे  ते दे,” अशी हरहुन्नरी कामे करत. पुरुष मंडळी परीक्षक असत.

लग्न, मुंज असे मंगल कार्य ठरले की वाळवणाला वेगळे मांगल्य  यायचे. सवाष्णींना बोलावून सुरुवात व्हायची. आई वडील व सासू-सासरे असलेली मुलगी मानाने बोलावून तिला रवा मैद्याचा” गणपती” बनवायला सांगत. त्याला सगळ्यांनी हळद-कुंकू अक्षता घालत.मगच इतर कामांना सुरुवात व्हायची. गव्हले, मालत्या, बोटवे, नखुले, काकडीच्या बिया असे शकुना चे पदार्थ तयार करायचे. हातावरच्या शेवया निगुतीने केल्या जायच्या. रुखवतासाठी शेवयांच्या तिपेडी वेण्या, रंगीत गव्हले, कुरडईच्या पिठाचे द्राक्षाचे घोस, गुलाब फुले वगैरे सुगरणीचे पदार्थ तयार होत.

हे सारं करताना गप्पाटप्पा, गाणी, कोडी यातून  हास्य विनोद निर्माण होत. एकमेकींच्या सुखदुःखाचे वाटप होई. नवीन काही शिकायला मिळे.

आता सगळे विकत मिळते पण घरी केल्याचा आनंद व पुरवठा वेगळाच असतो.

उगारच्या चाळीतील अंगणात खाट टाकून त्यावर स्वच्छ पांढरे धोतर अंथरून घातलेले सांडगे, पापड , सांगलीला वेलणकर वाड्यात महिनाभर रंगलेला शेवयांचा सोहळा, सातारला तळवलकर वाड्यात अंगणात खेळीमेळीने केलेले वाळवण सारे सारे आठवले की मन भरून येते.

वाळवण वाळवण

वर्षभराची साठवण

उरली फक्त आठवण

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग – ११ वाचन – २ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग – ११ वाचन – २ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

एखाद्याच्या चरित्राच्या अभ्यासपूर्ण वाचनाने ती व्यक्ती खूप ओळखीची होऊन जाते, कळते.  जवळचीच वाटायला लागते, तसंच, अनेक रुपांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करणार्‍या आणि मृत्युच्या क्षणापर्यंत आपली प्रतिष्ठा जपणार्‍या, नेपोलियन बद्दल विवेकानंदांना वाटत होते. विवेकानंदांच्या दृष्टीने नेपोलियन हा गगनाला भिडणारे उत्तुंग शिखर होते. तरुण वयात केलेल्या या वाचनामुळे नरेन्द्रला नेपोलियन ची भुरळ पडली होती.

तत्वज्ञान आणि ललित वाड:मय यांचा अभ्यास तर नरेंन्द्रने महाविद्यालयात शिकत असताना केला होताच. विद्यार्थी दशेत असताना तर त्याने हर्बर्ट स्पेन्सरचे ग्रंथ वाचून त्यावर आपल्या शंका व्यक्त करणारं एक पत्रच, या जगतविख्यात तत्वज्ञाला पाठवलं, त्यांचं नरेंद्रला उत्तर पण आलं आणि त्याच्या बुद्धी सामर्थ्याबद्दल कौतुक मिश्रित आश्चर्य पण वाटलं त्यांना. एव्हढंच काय कॉलेजला शिकत असताना नरेन्द्रने स्पेन्सर यांच्या ‘शिक्षण: बौद्धिक,नैतिक आणि शारीरिक’ या पुस्तकाचा ‘शिक्षा’ हा बंगाली भाषेत स्वैर अनुवाद केला होता.

नरेंद्रला साहित्याची मुळातच आवड होती. त्याच्याकडे प्रखर प्रज्ञा आणि उज्ज्वल प्रतिभा होती. त्यामुळे वैचारिक ग्रंथांप्रमाणेच त्याला अभिजात साहित्यही आवडत असे. संस्कृत, इंग्रजी आणि बंगाली भाषेतले उत्तम ग्रंथ आणि साहित्यकृती त्याने वाचल्या होत्या.’रामायण’ आणि ‘महाभारत’ यांची बंगाली भाषांतरे वाचली होती. शेक्सपियरची नाटकं, वाचली होती. रोमियो आणि ज्युलिएट, मिडसमर नाईट ड्रीम यांचे संदर्भ त्यांच्या व्याख्यानात येत असत.

अमेरिकेतल्या एका व्याख्यानात त्यांनी मिल्टन चे ‘पॅराडाइज लॉस्ट’वाचले असल्याचा उल्लेख केला होता. त्यातली सॅटानची व्यक्तिरेखा खूप आवडायची कारण ते व्यक्तिमत्व सामर्थ्यशाली दाखवले होते म्हणून. दुर्बलता त्यांना आवडत नसे. साहित्यकृतीत सुद्धा. इंग्रजी कविंमध्ये कवी बायरन आणि वर्डस्वर्थ त्यांचे जास्त आवडते होते.

बंगाली मधले बंकीमचंद्र चटर्जी, दीनबंधु मित्र, यांच्या कादंबर्‍या, ईश्वरचंद्र गुप्त यांच्या कविता, मायकेल मधुसूदन दत्त यांच्या कविता यांचा समग्र अभ्यास केला होता. स्वामी विवेकानंद जेंव्हा जेंव्हा भारतीय अध्यात्मावर भाषणे देत असत, तेंव्हा त्याची तर्कशुद्ध मांडणी आणि लालित्य त्यात दिसत असे. एखाद्या विषयाचा वरवर अभ्यास किंवा वाचन न करता त्याच्या मुळाशी जायचं हा त्यांचा उद्देश असायचा. त्यामुळेच मित्र मंडळींमध्ये जेंव्हा जेंव्हा निरनिराळ्या विषयांवर चर्चा घडून येत असत, तेंव्हा तेंव्हा नरेंद्र युक्तिवाद करताना त्याच्यात ठामपणा आणि आत्मविश्वास असायचा. अशा चर्चेत त्यांच्या पुढे कुणी टिकत नसायचे. प्रतिपक्षाला तो नामोहरमच करून टाके. जेंव्हा तुमच्याकडे त्या विषयाचे समृद्ध ज्ञान असते तेंव्हाच तुमच्याकडे हा आत्मविश्वास येतो. आणि असे ज्ञान वाचनाने, मननाने, योग्य दिशेने विचार केल्याने मिळते. सार्‍या जगाला संदेश देणारे स्वामी विवेकानंद वाचनाने आणि अनुभवाने अतिशय समृद्ध होते. रविंद्रनाथ टागोर यांनी म्हटलंच होतं की, “तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल तर विवेकानंदांकडे वळा” तेंव्हा सर्व वाचक आणि युवा पिढीने पण वाचनाने समृद्ध व्हावे, स्वामी विवेकानंद आणि भारतीय विचार समजून घ्यावेत आणि आयुष्याला दिशा द्यावी.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कचरा फाईली ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

 

? विविधा ?

☆ कचरा फाईली ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

मंडळी, अगदी काही दिवसापूर्वी आमच्या कार्यालयाच्या नुतनीकरणासाठी म्हणून काही कालावधीसाठी आम्हाला दुसरीकडे बसायला सांगितले. आजकाल बरीच कामे संगणकावर जरी होत असली तरी त्याच्या कित्येक आधीपासूनच्या अनेक फाइली या ठेवलेल्या होत्या. शिफ्टींग होताना एवढ्या प्रचंड प्रमाणात असणाऱ्या फाईलींचे काय करायचे हा मोठ्ठा प्रश्ण होता. ज्या अतिशय आवश्यक फाईली आहेत त्या घेऊन नवीन जागी जायचे, ज्या फाईली कदाचित पुढच्या काळात संदर्भासाठी लागतील त्यांना कार्यालयीन वास्तूचे नूतनीकरण होईपर्यंत ‘काँमन स्टोरेज’ मधे ठेवायचे असा निर्णय झाला. हे सोडून उरलेल्या जवळजवळ ८०% फाईली या तिथेच सोडण्याशिवाय गत्यंतर नव्हते. थोडक्यात त्या सगळ्या फाईली कचरा ठरवल्या जाऊन आता रद्दीच्या भावात जाणार हे पक्के झाले होते.

नुतनीकरणानंतर जेंव्हा आम्ही मुळ जागी परत येऊ तेंव्हा येताना ज्या अती आवश्यक / दैनंदिन लागणाऱ्या फाईली ज्या सोबत घेऊन गेलेलो त्या परत आणू.  पण इथे संदर्भासाठी लागतील म्हणून काँमन स्टोरेज मधे ठेवलेल्या किती फाईलीं वरची धुळ परत झटकली जाईल याबाबत मला तरी शंका वाटतीय. कारण जेंव्हा सगळं सुस्थितीत होतं तेंव्हाही फारशा त्या फाईलींना कुणी हात लावला नव्हता.

घर आवरताना हा नेहमीचा अनुभव.  आज आवश्यक म्हणून ठेवलेली वस्तू पुढल्यावेळी घर आवरताना मात्र हमखास कच-यात जाते. पण पहिल्यांदाच त्या कच-यात घालायला मन तयार होत नाही वरती जो संगणकाचा उल्लेख केला त्यातील कच-या कडे ही आपले फारसे लक्ष जात नाही. नकळत पणे अगणित फाईल्स तयार होत असतात. अनेक फोल्डर+ फाईल्स आपण तयार करत असतो. यातील असंख्य फोल्डर्स/ फाईल्स , इमेल्स काम झाल्यावर सहज उडवले जाऊ शकतात आणि अनावश्यक कच-याची विल्हेवाट लावली जाऊ शकते. पण जेंव्हा हार्ड डिस्क भरून डेटा वहायला लागतो, नवीन इमेल येणे बंद व्हायला लागतात तेंव्हा जाग येते.

आजकाल हीच गोष्ट ‘मोबाईल ‘उपकरणा बाबतीतही आढळते थोडक्यात वेळोवेळी कचरा साफ होणे आवश्यक. वर उल्लेख केलेल्या ठिकाणचा तर आवश्यकच पण अशी एक जागा आहे प्रत्येकाची वय्यक्तिक, जिथे अशा नको असलेल्या भरमसाठ फाईली अगदी कळायला लागल्यापासून विनाकारण पडून आहेत, ती जागा म्हणजे आपला ‘मेंदू’। 

तिथेही एकदा साफ-सफाई करायची का?

निसर्ग सुद्धा स्वतःत बदल दरवर्षी करतो. तो निसर्गचक्राला अनुसरून असला तरी आपल्याला दरवेळेला वेगळी अनुभूती देऊन जातो. झाडांची पानगळी होऊन नवनिर्मिती होत असताना आपण आपल्या मनाला हीच गोष्ट सांगितली तर?

जुने जाऊ द्या मरणालागुनी

जाळुनी किंवा पुरुनी टाका

सडत न एक्या ठायी ठाका

सावध!ऐका पुढल्या हाका

खांद्यास चला खांदा भिडवूनी

विक्रम संवत २०७८-२९७९ 🚩

शालिवाहन शक १९४४ 🚩

शुभकृत् नाम संवत्सर 🚩

 

तसेच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 💐

 

अमोल 📝

poetrymazi.blogspot.com

© श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print