मराठी साहित्य – विविधा ☆ मी, पदयात्रा, फेडरेशन आणि प्रबोधन… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

☆ मी, पदयात्रा, फेडरेशन आणि प्रबोधन… ☆ श्री सुनील देशपांडे 

बाबा आमटे यांचा ‘ज्वाला आणि फुले’ हा कवितासंग्रह कॉलेजच्या वयापासून अनेक वेळा वाचला आहे. परंतु २०१६ मध्ये ज्वाला आणि फुले मधील काव्यवाचनाचा कार्यक्रम मी करीत असताना त्यातील ‘संतांचे मृत्युपत्र’ या कवितेतील खालील ओळी सादर करीत असतानाच मी अस्वस्थ झालो.

देणार आहात का मेल्यावर,

तुम्ही तुमचे डोळे, हृदय

आणि शाबूत असेल ते ते?

शंकरावर लक्ष बेलपत्रे आपण वाहतो,

तसे लक्ष डोळे आणि लक्ष हृदये,

समाजपुरुषाला वाहण्याची शपथ

घेणार आहात का तुम्ही?

जाता जाता असे एक आंदोलन

उठलेले पाहण्याची इच्छा आहे.

१९६० ते ६४ या काळात लिहिलेल्या या कविता, अवयवदान देहदान हे शब्दही माहीत नसलेला तो काळ. परंतु या द्रष्ट्या विभूतीने त्या काळात पुरस्कार करून सुद्धा त्यांच्या हयातीत हे आंदोलन उभे राहिले नाही.

आतातरी कोणीतरी असे आंदोलन उभे केले पाहिजे. असा विचार करत असताना माझ्या अंतर्मनाने प्रश्न विचारला कोणीतरी म्हणजे कोण? मग तूच का नाही?

आणि मी निर्णय घेतला होय मीच! मग ठरवलेच. समाजाला लक्षावधी अवयवांचे दान व्हावे ही बाबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कामाला लागायचं! प्रथम माझ्या पत्नीने मग माझ्या आईने व मुलांनी याला संमती दिली. ही संकल्पना मी माझ्या रोटरी क्लब पुढे मांडली. सर्वांनी एक मुखाने पाठिंबा दिला.

नाशिक ते गडचिरोली या रोटरीच्या विभागाचे प्रमुख म्हणजेच त्या वेळचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे. महेश मोकाळकर व माजी प्रमुख रोटे. दादासाहेब देशमुख यांनीही ही कल्पना उचलून धरली. क्लब प्रेसिडेंट भास्कर पवार व इतर रोटरी सदस्य तसेच नाशिक येथील अवयवदान क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व डॉ. भाऊसाहेब मोरे आणि इतर अनेक संस्थांनी आर्थिक सहकार्याचेही आश्वासन दिले आणि ‘अवयवदान वारी’ या नावाने हा समाज प्रबोधनासाठी पदयात्रा काढण्याचा पहिला प्रकल्प निश्चित करण्यात आला.

अवयवदानाचे प्रबोधन हा माझ्या अंतर्मनाचा हुंकार आहे!

गाडगे बाबा, तुकडोजी बाबा व आमटे बाबा ही माझी दैवते व त्यांचे विचार हे माझे आदर्श आहेत.

माझ्या दैवतांच्या विचारांच्या प्रेरणेतून व जनता जनार्दनाच्या पाठिंब्यावर हा संकल्प तडीस नेण्याचे ठरवले.

मी तसा साधासुधा मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला मध्यमवर्गीय माणूस. लहानपणापासून माझ्या आईने समाजसेवेचे काही संस्कार व वडिलांनी नकळत केलेले अंधश्रद्धाविरोधी संस्कार यातून मी मोठा झालो. कोयनानगर येथे जिल्हा परिषदे च्या जीवन शिक्षण विद्या मंदिर मध्ये ७वी पर्यंत प्राथमिक शिक्षण आणि तेथेच शिवाजी हायस्कूल मध्ये एसएससी पर्यंत शिक्षण घेतले. येथील शिक्षकांकडून वस्तुनिष्ठ विचारसरणीचे संस्कार माझ्यावर झाले. तसा मी फार हुशार असा नव्हतोच शिक्षणामध्येही मध्यम वर्ग सोडला नाही. जी काही बुद्धिमत्ता होती त्या बुद्धिमत्तेचा उपयोग सामाजिक विश्लेषण व स्वतःचे विचार निश्चित करण्यात झाला. त्यामुळे मी सतत विचार मग्नतेत बुडालेला असे.

पुढे कराड येथे सायन्स कॉलेज मधून बीएससी उत्तीर्ण झालो. त्यामुळे शास्त्रीय विचारसरणी व वैज्ञानिक दृष्टिकोन यांची व्यक्तिमत्त्वात भर पडली.

हे सर्व संस्कार अगदी नकळत घडत होते. आता उतारवयात विचार करीत असताना या सर्वांची जाणीव होत आहे.

सोलापूर व पुणे या ठिकाणी सुरुवातीला नोकरी केली. त्याही वेळी १९७२ च्या दुष्काळात दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी काही समविचारी विद्यार्थ्यांना एकत्र करून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या फी साठी आणि काही आर्थिक मदतीसाठी निधी उभारला. साहित्य क्षेत्रातही आमचा एक समूह जमला होता आमच्या समूहातर्फे लघु अनियतकालिकांच्या चळवळी मध्ये ही सामील झालो होतो. नोकरी करून थोडेफार समाजकार्य करत होतो.

त्यानंतर उद्योग क्षेत्रामध्ये लघुउद्योजक होण्यासाठी धडपडत होतो म्हणजे पडत पडत उभे राहण्याचा प्रयत्न करत होतो. त्या वेळेला कुणीतरी सांगितलेला एक विचार ‘भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळालेलं आहे पण भारताला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर तरुणांनी उद्योजक बनले पाहिजे’ हा विचार डोक्यात ठेवून विविध व्यवसाय करत नाशिकमध्ये येऊन स्थिरावलो. अंबड एमआयडीसी मध्ये सुरुवातीला प्रिंटिंगचा व्यवसाय आणि नंतर केटरिंग आणि रेस्टॉरंट व्यवसाय यामध्ये स्थिरावलो. व्यवसायात स्थिरावत असतानाच पुन्हा समाजकार्यासाठी रोटरी क्लब मध्ये दाखल झालो. रोटरीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून घेत असतानाच २००९ मध्ये माझी चार पुस्तके प्रकाशित झाली.

तत्पूर्वी २००७ मध्ये रीडर्स डायजेस्ट या मासिकात ‘गिफ्ट ऑफ लाइफ’ या नावाचा एक लेख वाचनात आला. त्या लेखामुळे अवयव दान या क्षेत्राची माहिती झाली. या क्षेत्रामध्ये कार्य करणारे कार्यकर्ते अगदीच तुरळक किंवा नगण्य आहेत हे लक्षात आलं. या बाबतीत मी जसजशी माहिती गोळा करायला लागलो तसतशी या माहितीची योग्य ती दारे उघडताना दिसत नव्हती. अनेक ठिकाणी ठोठावल्यानंतर थोडी थोडी माहिती, तसेच इंटरनेटच्या माध्यमातून झालेली माहिती, डोंबिवलीच्या दधीचि देहदान मंडळाकडून उपलब्ध झालेली माहिती आणि आमच्या रोटरी मध्येच नागपूर मध्ये अवयवदानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. वानखेडे यांचे कडून मिळालेली माहिती या माहितीद्वारे या विषयाचा अभ्यास आणि प्रबोधन चालू केलं. त्यातच नाशिक येथील संवाद या संस्थेचा मी सचिव झालो. त्यामुळे रोटरी आणि संवाद या दोन माध्यमातून समाजप्रबोधनाचं कार्य स्थानिक पातळीवर सुरू केलं. २०१२-१३ या वर्षामध्ये मी रोटरी क्लब चा प्रेसिडेंट झाल्यावर या अवयवदान प्रबोधनासाठी काही कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यामुळे रोटरी आणि संवाद या दोन संस्थांच्या माध्यमातून मी हे कार्यक्रम सुरू ठेवले होते. संवाद या साहित्य चळवळी मार्फत मी बाबा आमटे यांच्या :ज्वाला आणि फुले’ या संग्रहातील कवितांचे काव्य वाचन करीत असे. त्यातील एका काव्य वाचनानंतर सुरुवातीला उल्लेख केलेला विचार डोक्यात येऊन त्यातून अवयवदान वारी या अवयवदान प्रबोधनाच्या पदयात्रेचा प्रारंभ झाला.

अवयवदान वारी म्हणजे

नाशिक ते आनंदवन व्हाया नागपूर अशी पदयात्रा होती.

दिनांक २५ नोव्हेंबर २०१६ रोजी नाशिक येथील गाडगे बाबांच्या आश्रमापासून या पदयात्रेला सुरुवात झाली. मजल दर मजल करीत साधारण पणे दर दिवशी सरासरी २५ कि. मी. प्रमाणे अंतर पार करीत ही यात्रा दिनांक ५ जानेवारी २०१७ रोजी तुकडोजी बाबांच्या कर्मभूमीत मोझरी मार्गे नागपूर येथे पोहोचली.

७ व ८ जानेवारी २०१७ रोजी नागपूर येथे रोटरी प्रांत ३०३० च्या ‘प्रांत परिषदेत ‘ सहभागी होऊन ही वारी ९ जानेवारी रोजी नागपूर येथून निघून १४ जानेवारी २०१७ रोजी बाबा आमटे यांच्या आनंदवन या कर्मभूमीत पूर्ण झाली.

वाटेमध्ये प्रत्येक मुक्कामी अवयवदान व देहदान या विषयी प्रबोधनपर कार्यक्रम अनेक शाळा महाविद्यालये व ग्रामसभा तसेच रोटरी मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन झाले..

या पदयात्रेचे प्रत्येक दिवसाचे नियोजन रोटरीचे माजी प्रांतपाल दादासाहेब देशमुख यांचे सहाय्याने व द फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन मुंबई यांचे सहकार्याने करण्यात आले होते.

अवयवदान वारीत बरोबर रोटे. प्रियदर्शन बापट व श्री शरद दाऊतखानी हे संपूर्ण सहभागी झाले होते. एका दिवसात सरासरी २५ कि. मी. ची चाल झाली.
माझी पत्नी सौ. रंजना देशपांडे पायलट कार चालवत आमची सर्वांची काळजीवाहक म्हणून संपूर्ण यात्रेत सहभागी होती.

नाशिक येथील शारदा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा कै(सौ) शारदा गायकवाड व त्यांचे पती श्री जालिंदर गायकवाड हे सुद्धा २० दिवस या पदयात्रेत सामील झाले होते.
या पहिल्या नाशिक नागपूर आनंदवन पदयात्रेच्या नियोजनातून एकूण प्रत्यक्ष चाल १३४० कि. मी. झाली. (नियोजित १०८६), जनजागृती कार्यक्रम १२६, कालावधी  ५२ दिवस, गावे ४५.

या संपूर्ण पदयात्रेचा अनुभव खूपच उत्साहवर्धक ठरला अगदी छोट्यात छोट्या खेडेगावा पासून ते नागपूर सारख्या मोठ्या शहरापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या जनसमूहा समोर, शेतकरी, कामगार, शिकलेले, अशिक्षित, ग्रामीण भागातील महिला, पुरुष, आशा वर्कर्स, अनेक हॉस्पिटल मधले पेशंट अशा अनेक विविध प्रकारच्या व्यक्तींशी संपर्क आला. त्यांना समजेल अशा भाषेमध्ये अवयवदानाचे महत्त्व कसं विशद करायचं याचा अनुभव सुद्धा मिळाला. विशेषतः शाळा कॉलेजमधील विद्यार्थी म्हणजेच आजची तरुण पिढी यांना या विषयाची ओळख करून देण्याचा आणि त्यांच्या मनात या विषयासंबंधी कोण कोणते विचार आहेत हे समजून घेण्याचं भाग्य लाभलं. हा अनुभव खरोखरच अवर्णनीय आहे चालणं महत्वाचं नाही, पण चालता चालता ज्या सर्वसामान्य माणसाशी आपल्याला आपल्या विचारांनी आणि कृतीने जोडून घेता आलं तो अनुभव हाच जास्त महत्त्वाचा आहे हे उमगलं.

तशातच महाराष्ट्र शासनातर्फे २०१७ साली, जी अवयवदानाची प्रतिज्ञा राजपत्रा मध्ये मान्यताप्राप्त झाली त्याचे शब्दांकन करण्याचा मान मला मिळाला.
या अद्वितीय अनुभवातून पार झाल्यानंतर मुंबई येथील दि फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲंड बॉडी डोनेशन या संस्थेने दिलेल्या पाठिंब्यामुळे त्या संस्थेशी जोडला गेलो आणि त्यांच्यातीलच एक झालो. दुसऱ्या पदयात्रेला फेडरेशनचे अनेक कार्यकर्ते सामील झाले आणि आम्ही दुसऱ्या पदयात्रेचे नियोजन केले. मुंबई ते गोवा या पदयात्रेमध्ये आम्ही दहा कार्यकर्ते सामील झालो आणि दुसरीही पदयात्रा यशस्वीरित्या पूर्ण केली.

पदयात्रेत १० जण सामील झाले. पुरुषोत्तम पवार, सुनील देशपांडे, प्रियदर्शन बापट, शरद दाऊतखानी, चंद्रशेखर देशपांडे, शैलेश देशपांडे, अविनाश कुलकर्णी, दत्ता कुलकर्णी, म्हसकर, रणजित उंद्रे. संपूर्ण पदयात्रेचे नियोजन फेडरेशनचे सचिव श्री बागाईतकर यांनी उत्तम पद्धतीने केले व दिनांक २३ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०१८ या कालावधीत ही पदयात्रा संपन्न झाली

मुंबई (केईएम रुग्णालय ) ते गोवा (मडगाव ) पदयात्रा. एकूण चाल ८५० कि. मी. (नियोजित ८२६)

जनजागृती कार्यक्रम १४०,

कालावधी ५२ दिवस, गावे ५५

यानंतर कार्यकर्ते विचारू लागले आता यावर्षी कुठं आणि मग तिसऱ्या पदयात्रेचे नियोजन केलं पहिल्या पदयात्रे मध्ये आम्ही उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ काबीज केला दुसऱ्या पदयात्रे मध्ये कोकण आणि गोवा पिंजून काढले. आता तिसऱ्या पदयात्रेचे नियोजन करताना आमच्या टार्गेटवर मराठवाडा होता औरंगाबाद हुन सुरू करून मराठवाड्यातले सातही जिल्हे पायाखालून घालून तुळजापूर येथे या पदयात्रेची सांगता झाली.

संपूर्ण मराठवाडा (औरंगाबाद – ते – तुळजापूर) या पदयात्रेसाठी

सप्टेंबर २०१८ पासून नियोजनास सुरुवात. दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन यांच्या संपूर्ण सहकार्याने व सहभागाने आणि नियोजनातून ही सर्व पदयात्रा आयोजित करण्यात आली होती या पदयात्रेत एकूण सात पदयात्री सामील झाले होते श्री सूनील देशपांडे श्री प्रियदर्शन बापट श्री अविनाश कुलकर्णी श्री चंद्रशेखर देशपांडे श्री शैलेश देशपांडे श्री वसंत चिकोडे आणि श्री दयानंद मठपती. या पदयात्रेचे नियोजनही फेडरेशनचे संस्थापक पुरुषोत्तम पवार व सचिव सुधीर बागाईतकर यांनी उत्तम तऱ्हेने केले व दिनांक 16 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर 2018 या कालावधीत ही पदयात्रा संपन्न झाली (औरंगाबाद – जालना – बीड – परभणी – हिंगोली – नांदेड – लातूर – उस्मानाबाद – तुळजापूर)

मराठवाडा अवयवदान पदयामी, पदयात्रा, फेडरेशन आणि प्रबोधन

आता महाराष्ट्रातील फक्त पश्चिम महाराष्ट्राचा भाग शिल्लक राहिला होता. त्यामुळे चौथ्या पदयात्रेचे नियोजन करताना नाशिक ते बेळगाव असं करण्यात आलं. नाशिक, शिर्डी, नगर, पुणे, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, गडहिंग्लज आणि बेळगाव. या मार्गाने जास्तीत जास्त ग्रामीण भागातून वाटचाल करीत अंतिम दिवशी बेळगावी पाहुणचार घेऊन केएलई या प्रतिथयश शिक्षण संस्थेतील वैद्यकीय महाविद्यालयात या पदयात्रेची सांगता करण्यात आली.

या चारही पदयात्रा मिळून संपूर्ण महाराष्ट्र पायाखालून घातला.

चौथी पदयात्रा नाशिक ते बेळगाव

७५० कि. मी.

५ जानेवारी ते २२ फेब्रुवारी २०२० या एकूण चार पदयात्रा- एकूण चाल ३६४० कि. मी.

एकूण जनजागृति कार्यक्रम १२६+१४०+८५ + १५९ = ५०१

अशा ५०० कार्यक्रमां मधून एकूण ५०००० व्यक्तींपर्यन्त प्रत्यक्ष अवयवदानाचा संदेश पोहोचला. ४५+५५+४३+४२ = १८५ गावांमध्ये या विषयाच्या चर्चेची सुरुवात झाली.
येथून पुढे त्या सर्व ठिकाणी प्रबोधनाचा विस्तार होईलच. अनेक कार्यकर्तेही त्यातून तयार होत आहेत, यातून या चळवळीला मोठे बळ मिळाले. इतरही संलग्न संस्था व कार्यकर्ते यांनी गावागावातून पदयात्रा काढून व आपल्या गावापासून बाजूच्या खेडेगावात जाऊन पदयात्रेच्या माध्यमातून या विषयाचे प्रबोधन करावे अशी अपेक्षा आहे. आपल्या शहरांमध्ये विविध कार्यक्रम, व्याख्याने, पथनाट्य व इतर कोणत्याही माध्यमातून सादरीकरण करून या मार्गाने या विषयाचे प्रबोधन करून जनतेमध्ये जागृती करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न व्हावा असे वाटते.

प्रसिद्धी माध्यमांनी या विषयाचे विविध लेख लेखमाला आणि विविध घटनांविषयी विवेचन करून आपापल्या माध्यमाद्वारे प्रयत्न करावा.
संपूर्ण महाराष्ट्र पायाखालून घातल्यानंतर आलेल्या अनुभवातून आणि ज्ञानातून नवीन कार्यकर्ते तयार करण्यासाठी आता दि फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲंड बॉडी डोनेशन या संस्थेचा विस्तार जवळपासच्या राज्यातही करीत आहोत त्याच प्रमाणे या प्रबोधन कार्यक्रमासाठी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हा स्तरावर कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करतो आहोत. त्याचप्रमाणे मृत्युंजय ऑर्गन फौंडेशन या आमच्या नाशिक येथील सहयोगी संस्थेद्वारे विविध लोककलां मधून या अवयवदानाचे प्रबोधन व्हावे या दृष्टीने लोक कलाकारांची एक स्पर्धा आयोजित केली होती. सांगायला अभिमान आणि आनंद वाटतो की ग्रामीण भागातील अनेक स्पर्धकांनी भाग घेऊन पारितोषिकेही प्राप्त केली आहेत. ग्रामीण भागात या विषयाच्या जागृती बाबत होत असलेला बदल स्वागतार्ह व कार्यकर्त्यांना कार्य करण्यासाठी उत्साह व बळ देणारा ठरत आहे.

अवयवदानाच्या बाबतीत महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर आहे. परंतु आपल्याला आपला भारत देश जगामध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये येईल इतपत तरी कार्य करायचे आहे. सध्या आपला देश अवयव दान करणाऱ्या देशांमध्ये शेवटच्या पाच क्रमांका मध्ये आहे खूप मोठा रस्ता पार करायचा आहे ही चाल फक्त पायाची नसून प्रबोधनाची आहे. पुढील पिढीला या विषयात जागृत करणे ही गोष्ट नजीकच्या भविष्यकाळात साध्य करायची आहे. ती होईल असा विश्वास धरायला हरकत नाही असे वाटते.

सुनील देशपांडे

१. संचालक, मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन, नाशिक

२. उपाध्यक्ष, द फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन, मुंबई.

३. सदस्य, मानवी अवयव प्रत्यारोपण प्राधिकार समिती (महाराष्ट्र शासन).

४. रोटरी प्रांत 3030 चे अवयव दान विषयावरील माजी समिती प्रमुख.

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ असेही पुनर्मिलन… + संपादकीय निवेदन – सुश्री ज्योत्स्ना तानवडे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

💐 अ भि नं द न 💐

साहित्यरंग वाङ्मय मंडळ, वारजे आयोजित ‘कल्पनाविस्तार’ स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. ज्योत्स्ना तानवडे यांना प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन 🪻

पुरस्कार प्राप्त लेख ‘असेही पुनर्मिलन’ आज प्रकाशित होत आहे. 🪻

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? विविधा ?

☆ “असेही पुनर्मिलन” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

“चला उतरा लास्ट स्टाॕप आला “कंडक्टर मोठ्याने ओरडला. त्यासरशी मी एकदम जागी झाले, तो झोपेत माझा स्टाॕप मागेच गेला होता अन् मी एका अपरिचित ठिकाणी उतरले. काय करावे काही सुचत नव्हते. बाकी पॕसेंजर भराभरा त्यांच्या मुक्कामी निघून गेले. संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. चहा घेऊन समोरच असलेल्या देवळात शिरले आणि समोर बघते तर……

सभामंडपाच्या पायऱ्या उतरून येणाऱ्या त्या बाईचा चेहरा अगदी ओळखीचा वाटला. मी जागेवरच थांबून पाहू लागले अन् आठवले ‘अरेच्चा ही तर आपली बालमैत्रीण प्रभा आहे’. तिला पाहून मला अतिशय आनंद झाला.

अचानक तिचेही माझ्याकडे लक्ष गेले. ती पण पहातच राहिली. एकदम ” नंदिनीऽऽ.. ??? नंदू ऽऽऽ “, अशा जोराने हाका मारत ती भराभर पायऱ्या उतरली आणि माझ्याजवळ येऊन तिने घट्ट मिठी मारली. ती आता ओक्साबोक्शी रडू लागली. ” अग, तुला भेटण्यासाठी मी किती तळमळत होते. आज देवालाच दया आली. त्याच्या दारातच तू पुन्हा भेटलीस. किती आनंद झालाय म्हणून सांगू ? कुठे होतीस ग इतके दिवस ?”

तिचं रडणं आणि बोलणं एकत्रच सुरू होतं. मी तिला शांत करीत खाली बसवलं, पाणी दिलं. ती खूप सावरली. मला जवळ घेत तोंडावरून हात फिरवत म्हणाली, ” नंदू, किती काळ लोटला ग आपल्या भेटीला. आता पुन्हा भेट होणारच नाही असं वाटत होतं. पण देवानंच आपली भेट घडवली. किती जीवाभावाच्या मैत्रिणी आपण, खूप आनंदात होतो. पण मला काय दुर्बुद्धी सुचली अन त्या खोटारड्या जयडीवर विश्वास ठेवला. तुझ्याशी अबोला धरला. नंतर मग खूप वाटलं तुझी माफी मागावी, पुन्हा एकत्र यावं, पण आपली भेटच झाली नाही. “

“प्रभा अगं जाऊ दे ना. विसर ते जुनं सगळं. ” हे ऐकून चिडलीच.

“कशी विसरू ? माझ्या चुकीनंच मी तुला गमावलं होतं ना? खरंच माझं तेव्हा खूप चुकलं होतं. मला माफ करशील ना ग नंदू ?” ती पुन्हा रडू लागली.

” हे बघ प्रभा, आपण चांगल्या मैत्रिणी आहोत ना. मैत्रीत कसली माफी मागतेस ? आपली ती वेळच वाईट होती. मी तर केव्हाच सगळं विसरले आहे. तुला भेटून मात्र खूप खूप आनंद झाला. माझं उतरायचं गाव मागं गेल्यामुळं मी इथं आले हे फारच छान झालं. “

आता प्रभा पूर्ण सावरली. त्या गावातच तिचं घर होतं. आम्ही तिच्या घरी आलो. हसतखेळत रात्री जेवण झालं. मी आणि प्रभा झोपायला गेलो. झोप कुठली यायला ? इतक्या वर्षांच्या साचलेल्या गप्पा झाल्या. त्या भांडणाची उजळणी पण झाली.

आम्ही दोघी घट्ट मैत्रिणी होतो. हे न बघवणाऱ्या मुली आमच्यात भांडण लावायचा प्रयत्न करायच्या. एकदा जयश्रीनं माझ्याबद्दल काहीतरी खोटंनाटं प्रभाच्या मनात भरवलं. प्रभा खूप चिडली. आमचं जोरात भांडण झालं. माझं म्हणणं ऐकून न घेताच ती निघून गेली. कायमचा अबोला धरला. पुढं बदलीमुळं ते परगावी गेले आणि आम्ही कायमच्या दुरावलो. कसलाच संपर्क झाला नाही. लग्नानंतर तर गावही दुरावला.

पण ही गोष्ट प्रभाच्या इतकी जिव्हारी लागलेली असेल याची कल्पनाच नव्हती. आत्ता भेटल्यावर सगळं मळभ दूर झालं. खूप आनंद झाला.

गप्पांमधे इतर मैत्रिणींच्या आठवणी निघाल्या. आमची मैत्रीण विजयाच्या मुलीच्या लग्नासाठी मी आधीच्या गावात उतरणार होते. मग दुसऱ्या दिवशी माझ्याबरोबर प्रभासुध्दा लग्नाला आली. तिथे आमच्या आणखी ३-४ मैत्रिणी आलेल्या होत्या. माझ्याबरोबर प्रभाला बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. खूप आनंद झाला. आमच्या बालपणाच्या आठवणींचं कारंजं थुईथुई उडू लागलं. त्यात आम्ही चिंब झालो. पुन्हा एकदा लहान होऊन खूप हसलो खिदळलो. खूप मजा केली. भेटीचा पुरता आनंद घेतला. ही ‘पुनर्भेट’ आम्ही अतिशय मनापासून उपभोगली. आलं देवाजीच्या मना…. !

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बुद्धाना आवाहन… ☆ डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी ☆

डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ बुद्धाना आवाहन… ☆ डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी ☆

(जपान मधील “उशिकू बुद्धा”चे चित्र)

हे भगवान गौतम बुद्धा,

जपान सारख्या शांतता प्रिय देशात तुम्ही शांततेचे प्रतिक म्हणून उभे आहात. तुम्हांला सर्वजण “उशिकू बुद्धा”म्हणून ओळखतात. मनाच्या उर्जेसाठी सगळे तुमच्याजवळ येऊन बसतात जिथे जगाचा विसर पडावा असा तुमचा सहवास. भारतभूला जपान मध्ये “Homeland of Lord Goutam Budhdha” म्हणून ओळखले जाते. तुमच्यामुळे भारताबद्दल आदरयुक्त भावना त्यांच्या मनात आहे. ज्या भारतभूमी मध्ये तुम्ही वाढलात, अध्यात्मिक प्रगती केलीत, शांततेचा संदेश जगाला दिलात आणि लोप पावलात तिथं आज परिस्थिती पहा जरा. या भूमीचा गौरव सुजलाम् सुफलाम् सस्य शामलाम् असा होतो. ती भूमी आता रक्तरंजित झाली आहे. तुमची शांतता म्हणजे अन्याय पण सहन करा अशी कशी असेल? हिरोशिमा शहरावर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पुन्हा फिनिक्स पक्षासारखी भरारी मारण्याची कुवत तुम्ही जपानी लोकांना दिलीत. इलेक्ट्राॅनिक्सच्या जगात भरारी मारल्यावर जमिनीवर पाय ठेवून चालण्याची वृत्ती तुम्ही त्यांचेत रूजविलीत. भारतात मात्र अनेक वेळा रक्तरंजित इतिहास निर्माण झाला. बॉम्बस्फोट होण्यापूर्वी तो होऊ नये म्हणून करावयाच्या विचारांची कुवत तुम्ही माणसांना कधी देणार? बॉम्बस्फोटाचा विनाश न ओढवता न्याय मिळविण्यासाठी दुसरे मार्ग अवलंबायची बुद्धी, अशा बुद्धीला साथ देण्याची सामाजिक मानसिकता तुम्ही कधी देणार?सर्वेपि सुखिनः सन्तु…. हा मूलमंत्र फक्त कागदोपत्रीच रहाणार का ?असे असंख्य प्रश्न तुम्हांला पाहून मनात येतात कारण त्यांची उत्तरे तुमच्या जवळ आहेत. सत्व, रज, तमाच्या पलिकडे गेलेले तुम्ही गुणातीत आहात. स्वतःच्या मनाची प्रगती कशी करावी हे तुमचे अध्यात्म सांगते पण अप्रगत मनांशी, बुद्धीशी लढताना अधर्माने वागावे लागते त्याचं काय? भगवद्गीता सांगते”कर्मण्येवाधिकारस्ते…. ” शांत रहा. फळाची अपेक्षा करू नका. असे सर्वांनी ठरविले तर या जगात देशाच्या संसाराचे रहाटगाडगे चालणार कसे?त्याच भगवद्गीतेत सांगितले आहे, “यदा यदाहि धर्मस्य…. “धर्माला ग्लानी आली की तुम्ही येणार. आता तुमच्या नावाला देखील आलीय ग्लानी पण तुम्ही कुठे आहात?तुम्हांला शोधत आहेत सर्व. एकाजागी थांबून फक्त आशिर्वाद देत आहात, तुम्हांला किंकाळ्या ऐकू येत नाहीत का ? तुम्ही घरदार सोडून निघून गेलात. हेच सर्वांच्या वाट्याला आहे का? निदान या प्रश्नांची उत्तरे द्या म्हणजे मार्गदर्शन करायला आला आहात हे तरी कळेल. मग कोणावर बाण मारायचा हे तरी स्पष्ट होईल. सर्वजण तुमची वाट पहात आहेत. तुम्ही शांतता सोडून न्याय वाटायला या….

नको हिरोशिमा, नको नागासाकी, नको शस्त्राने जिवीत संहार

एकच नारा शांततेचा देऊ अन् टाळू मानव संहार.

© डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सन्मानाने मरणाचा हक्क…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “सन्मानाने मरणाचा हक्क…☆ श्री जगदीश काबरे ☆

कितीही कटू वाटले तरी एक सत्य आपण स्वीकारले पाहिजे की, जीवन कितीही प्रवाही आणि अमर वाटत असले तरी त्याचा एक अविष्कार म्हणजे आपण मानव पूर्णतः मर्त्य आहोत. आपल्या जगण्याच्या धडपडीचा अविष्कार पुनर्जन्म नसून प्रजनन आहे. आपण माणूस म्हणून एकसंध नसून आपले शरीर हे विविध अवयवांनी बनलेल्या पेशींचा समूह आहे, त्या पेशी ज्या समान गुणसूत्रांनी संचालित होतात, त्या गुणसूत्रांचेच मूर्त रूप आपले शरीर असते. सर्व पेशी त्या गुणसूत्रांच्या एकेक अक्षराबरहुकून वागत असतात, त्या सूक्ष्म पेशींचा एकत्रित भव्य आविष्कार म्हणजे शरीर असते. शरीराचे अवयव म्हणजे मी नाही. पण सजीव शरीर तर मी आहे! घराचे छप्पर घर नसते, घराची फरशी घर नसते, घराच्या भिंती घर नसते, पण ह्या सर्वांनी मिळून घर तयार होते. तसे शरीरसुदधा! फरक येवढाच की, बाहेरून वस्तू आणून माणूस घर बनवतो तर शरीर आतूनच बाहेर वाढत जाते. या शरीरातील हृदयाची धडधड थांबणे म्हणजेच मृत्यू होय. जीवनाची असोशी आणि मृत्यूचे भय माणसाच्या मनात सतत असल्यामुळे माणसाने मृत्यूनंतरचे जीवन कल्पीले आणि वेदनारहित अमर आत्म्याचा जन्म झाला.

असा आत्मा अस्तित्वात नसल्यामुळे वास्तवात शरीर जर्जर झाले असेल तर त्याचा त्रास माणसाला होतो. अशा वेळेस घरातील जवळच्या सुहृद नातेवाईकांनाही त्याचा त्रास होत असतोच. पण बरेचदा आपलेपणाने तर कधी कर्तव्य बुद्धीने ते सगळे सहन करत असतात. जीवनभर स्वावलंबी जगल्यानंतर शेवटच्या काळात परावलंबी होणे हे कोणत्याही स्वाभिमानी माणसाला दुःखदायकच वाटत असते. अशावेळेला त्याने जर इच्छामरणाची इच्छा व्यक्त केली तर ते चूक कसे ठरेल? पण अजूनही आपल्याकडे इच्छामरण म्हणजे आत्महत्या असे समजण्यात येते. म्हणून व्याधीग्रस्त माणसाला मरणाची वाट बघत व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. हा सहानुभूतीच्या नावाखाली रुग्णाला जिवंतपणे मरणयातना देणारा अनुभव क्रूरपणाचा नाही का?

हे लक्षात घेऊन न्यायालयाने वैद्यकीय इच्छापत्राला मान्यता दिली आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. आता जबाबदारी वाढते ती इच्छामरणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या नातेवाईकांची. जर एखाद्याने इच्छापत्रात ‘विशिष्ट उपचारानंतर मला शांतपणे मरू द्यावे’, असे म्हटले असेल तर त्याचा सन्मानाने मारण्याचा हक्क आपण मान्य करायला हवा. माणसाला सन्मानाने जगायला हवे असते तसेच सन्मानाने मरायलाही. पण या कायद्यामुळे आत्महत्याही कायदेशीर होईल आणि या कायद्याचा गैरवापर पैसाअडक्यासाठी केला जाईल, अशी भीती बाळगणे म्हणजे नदीला केव्हातरी मोठा पूर येईल आणि आपण त्यात बुडून वाहून जाऊ; म्हणून नदीकाठी घर बांधणे चुकीचे असे समजण्यासारखे आहे. कारण प्रत्येक कायदा हा दुधारी शास्त्रासारखा असतो. त्याचा वापर विधायक करावा की विघातक हे शेवटी आपल्यावर अवलंबून असते.

एवंच आजच्या धकाधकीच्या जीवनात जर एखाद्याने आयुष्य पूर्णपणे उपभोगले असेल आणि शेवटच्या काळात व्याधीग्रस्त होऊन खितपत मरण येण्यापेक्षा जर त्याने इच्छामरणाची इच्छा व्यक्त केली असेल तर त्याला सन्मानाने मरण्याचा हक्क मिळाला पाहिजे. असेही मरणाऱ्या माणसाची शेवटची इच्छा पूर्ण करणे हे धर्मसंमत आहेच. तेव्हा आता शासकीय आणि सामाजिक पातळीवर न्यायालयाच्या या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे मला वाटते. तुम्हाला?🤔

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ओळख परिचय…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “ओळख परिचय…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

एखाद्या कार्यक्रमात प्रमुख किंवा आमंत्रित व्यक्तींची ओळख करून देताना त्या ओळखीत काही चांगल्या गोष्टीच अपेक्षित असतात. अगदी तसा नियम नसला तरीही. पण अति उत्साहात काही गोष्टी घडतात.

एका फुटबॉल सामन्याच्या उद्घाटनाला एका राजकिय नेत्याला बोलवल होत. त्यांची ओळख पुढिल प्रकारे करण्यात आली.

या महाशयांची जशी ओळख आहे तसा हा माणूस नाहिच. आणि जसा हा माणूस आहे तसं यांना कोणीही ओळखत नाही. आपली खरी ओळख जाणिवपूर्वक लपवण्यात ते आजपर्यंत यशस्वी झाले आहेत. व पुढेही यशस्वी होतील.

या सामन्याच्या उद्घाटनाला जे महाशय बोलवले आहेत त्यांचा राजकिय प्रवास आणि फुटबॉल यांचा जवळचा संबंध आहे. खेळावे कसे हे त्यांना माहित नसले तरी तुडवले कसे जाते याचा त्यांना दांडगा अनुभव आहे.

कार्यकर्ता म्हणून त्यांनी सुरुवात केल्यापासून आज नावाला येईपर्यंत (खरंतर नावारुपाला असंच म्हणणार होतो. पण त्यांच्याकडे पाहून फक्त नावाला येईपर्यंत असच म्हणतो.) पक्षातीलच वेगवेगळ्या मान्यवरांनी वेळोवेळी त्यांना व्यवस्थित तुडवले आहे.

आपल्याच पक्षात आपली प्रचंड घुसमट होत आहे असं त्यांना पदोपदी वाटत असल्यानेच त्यांनी चारपाच वेळा वेगवेगळ्या पक्षात प्रवेश केला. पण हा पक्षप्रवेश सोहळा म्हणून कधीच झाला नाही. फुटबॉल मध्ये जस पास देतांना झालेल्या चुकीमुळे तो सहज प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या पायात जातो, तसेच हे पक्षातील लोकांच्या चुकीमुळेच दुसऱ्या पक्षाच्या पायावर पोहोचले. प्रतिस्पर्धी असलेल्या काही थोड्याच लोकांनी यांना पायात घेण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला असेल. थोडक्यात त्यांना तुडवतांना झालेल्या चुकीमुळे ते प्रत्येकवेळी दुसऱ्या पक्षात (पायाशी) गेले.

फुटबॉल, जस प्रत्येकाला तो आपल्या पायात असावा असं वाटत असलं तरी त्याला समोरच्याच्या जाळ्यात टाकण्यासाठीच धडपड असते तशीच धडपड यांच्या आयुष्यात आली आहे. कितीदा तरी यांना जाळ्यात ढकलण्याचा मनापासून आणि जोर लाऊन प्रयत्न झाला.

फुटबाॅलच्या मैदानात त्याला हात लागला की फाऊल असतो, त्याच पध्दतीने कोणत्याही परिस्थितीत आपला हात सगळ्यांनीच यांच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी डोक्याच्या वापर केला, पण हात लांब ठेवला. हात दाखवून अवलक्षण याच धर्तीवर हात लावून अवलक्षण कोणालाही नको होतं.

फुटबॉल मध्ये जसं काही चुका मुद्दाम केल्यातर यलो किंवा रेड कार्ड दाखवून एक प्रकारची तंबी दिली जाते, तशाच यांना वेगवेगळ्या नोटीस देऊन तंबी देण्यात आली आहे.

आज स्पर्धेच उद्घाटन करतांना तुडवण्यात काय मजा असते, याचा आनंद त्यांना घेता येईल असा विश्वास मी व्यक्त करतो आणि यांचा परिचय थांबवून त्यांना मनोगत व्यक्त करायला बोलवतो…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भय… ☆ सौ. ज्योती विलास जोशी ☆

सौ. ज्योती विलास जोशी

अल्प परिचय

शिक्षण – बी.एस.सी. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हाॅस्पिटल मॅनेजमेंट.

छंद:—

ऑइल पेंटिंग, गायन, वादन.

आकाशवाणीवरील ‘ऐसी अक्षरे रसिके’ या कार्यक्रमात ललितबंधिंचे सादरीकरण व अभिवाचन.

? विविधा ?

☆ भय… ☆ सौ. ज्योती विलास जोशी 

जगात शुभंकराकडं जसं मन आकृष्ट होतं, तसंच भयंकराचं देखील वेगळं आकर्षण आहे. लहानपणापासूनच शिस्तीचा बडगा ठेवत प्रथम बाऊची आणि नंतर बागुलबुवाची भीती दाखवली जाते. या भीतीनं मनाचा एक कप्पा व्यापला जातो. लहान मुलं रडता रडता आपण कशासाठी रडत होतो हे विसरतात. त्यांच्या डोळ्याचे रांजण कोरडे पडतात. आवाजाची तान शिथिल होते, पण मायेची माणसं जवळ असल्याने अपेक्षा मात्र पूर्ण होते हे नक्की…. वय वाढेल तसं भीती एक मानसिकता होते. मनाला जाणवणारी संवेदना असते ती. अनाठाई भीतीनं विचारांचे पंख कापले जातात. भीतीनं कापरं भरलेलं मन, ‘सिदन्ती मम गात्राणी मुखम् च परिशुष्यते’ अशी तक्रार करायला सुरुवात करतं. मन पुट पुटायला लागतं ‘भय इथले संपत नाही. ‘ भयानक हा स्थायीभाव असणारा हा रस नवरसातला एक… जणू लाव्हाच!

आयुष्याला एक शिस्त असावी म्हणून माणसाने देव, धर्म, नियमावली, जाती, समाजमान्यता या भयांना जन्माला घातलं. मुकपणे पाहणाऱ्या या निसर्गाला देखील माणूस खाऊ की गिळू असं करू लागला. म्हणूनही ही बंधने असावीत. हास्य रस हा केवळ मनुष्य प्राण्यात स्त्रवतो परंतु भयरस मात्र समस्त प्राणिमात्रात दिसून येतो. साहित्यसृष्टीही या रसाने व्यापून गेली आहे. केवळ भयकथा लिहिणारे लेखक प्रसिद्ध आहेत. चित्रपट सृष्टीतील भयपटांचा एक चाहतावर्ग आहे. मृत्यू, सूड, खून, मारामारी, रक्तरंजित कथा यांचे सिनेमे पाहणारा एक प्रेक्षक वर्ग आहे. ‘भुताचा पिक्चर सुपरहिट’ हे समीकरण बनलंय. आताशा माणसं भुतांना घाबरत नाहीत. ती स्वतःच चालती-बोलती भूतं झालीत. माणूसच माणसाला घाबरायला लागलाय. पूर्वी भुतं तरंगायची पण आता माणसंच हवेत असतात. त्यांचेच पाय जमिनीला लागत नाहीत. ती स्वतः भूतं झालीत. मारामाऱ्या, युद्ध, मृत्यु, खून, सूड यांची शस्त्र घेऊन ही भूतं पृथ्वीवर नंगा नाच करू लागलीत. त्यांच्यावर इलाज करणारा यांत्रिक बोलवायला हवा. ही भूतं निसर्गालाही डिवचतात. त्यानं निसर्गाचाही कोप होतो. निसर्गाची प्रतिक्रिया म्हणून पाझरलेला भयरस तर अति दाहक! आताशा नवरसातून निर्माण झालेले राग, द्वेष, त्वेष, मत्सर, लालसा, अहंकार यांची भूतं मनाच्या रंगमंचावर नंगानाच करू लागली. आयुर्वेदात भयज्वर भयअतिसार अशा रोगांवर भयचिकित्सा सुरू झाली आहे आहे हे आपल्या संस्कृतीचं दुर्दैव आहे..

मोठे होऊ तसं बाऊ गेला… बागुलबुवा गेला. नंतर आला करोना नावाचा गब्बर सिंग! ! जो डर गया वो मर गया असं म्हणून थैमान घालू लागला. भितीची अनेक रूपं दाखवू लागला. भीतीतून अस्वस्थता वाढू लागली आणि अनामिक विचारांना मोकाट वाव मिळाला. आणि मग उत्तराऐवजी नवीन प्रश्नच निर्माण झाले. समाजाच्या अवहेलनेची भीती, जिथे जिथे आपण जोडले गेलोय तो जोड तुटण्याची भीती. आर्थिक विपन्नतेची भिती अपयशाची, अज्ञानाची, अज्ञाताची, निर्णय चुकल्याची अशा अनेक भीतीने जीव ग्रासून गेलाय.

जीवन आव्हानांचा सागर आहे त्याकडे कसं पाहायचं लढून म्हणजेच फाईट करून की पळून जाऊन म्हणजे फ्लाईट घेऊन की फ्राईट होऊन म्हणजे थिजून हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे. तेव्हा कुठे हा भयरस आटेल.. आणि तो मनकंपनास कारणीभूत होणार नाही…

©  सौ ज्योती विलास जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५५ ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

(पूर्वसूत्र– ताईच्या साऱ्या यातनांची, तिच्या मनाच्या तळात सुरू असणाऱ्या उलघालीची केशवरावांइतकीच माझी आईसुद्धा एक महत्वपूर्ण साक्षीदार होतीच. अर्थात पुढे तिचं तिथं असणंच माझ्या मनात निर्माण झालेल्या अनेक अनुत्तरीत प्रश्नांची समाधानकारक उत्तरं शोधण्यास मला माझ्याही नकळत सहाय्यभूत ठरणार आहेत याची शक्यता मात्र त्याक्षणी मला जाणवलेली नव्हती एवढं खरं!)

अतिशय प्रेमाने, कर्तव्य भावनेने आम्ही दिलेले पैसे आमच्या भावनांचा विचार करून, आम्हाला बरं वाटावं म्हणून तरी ताईनं घ्यायला हवे होते, असेच मला वाटत असे. पण हे वाटणं किती चुकीचं, एकांगी विचार करणारं, ताईवर अन्याय करणारं होतं हे आईच्याच बोलण्यातून एकदा मला स्वच्छ जाणवलं.

असंच एक दिवस आई सांगत होती, “अरे तुम्ही सद्भावनेने दिलेले पैसे घेणंही ती नाकारते म्हणून किती वाईट वाटायचं तुला. पण तुम्हा सर्वांच्या पैशाचं कांहीच नाही. त्याही पुढचं सांगते.

‘माझ्या नवऱ्याच्या निवृत्तीनंतर आलेल्या पैशावर माझा एकटीचाच अधिकार कसा?’ असं म्हणायची ती. या विचारानेही ती सतत खंतावत असायची. मला खूप वाईट वाटायचं. मी परोपरीने तिला समजवायची. पण तिची समजूतच पटायची नाही. ‘अगं तुझे भाऊ आपण होऊन, मदत म्हणून देतायत तुला तर घेत कां नाहीस? प्रत्येकवेळी नको कां म्हणतेस?’ असं मी तिला एकदा म्हंटलं तर म्हणाली, ‘ आई, एकदा घेतले ना तर ती सुरुवात ठरेल. मग त्याला शेवट नाही. आमच्या मुलांना आम्ही कांही फार मोठी इस्टेट ठेवणार नाही आहोत, मग त्यांना कर्जंतरी का म्हणून ठेवायची?’

‘अगं, कर्ज म्हणून ते कुठं देतायत ? ते कुणीच दिलेले पैसे परत मागणार नाहीयेत ‘

‘ त्यांनी नाही मागितले तरी परत द्यायला नकोत? माझ्या भावांनी तरी ते पैसे कष्ट करूनच मिळवलेत ना? मग? मी त्यांची मोठी बहीण असून त्यांना कधीच काहीच देऊ शकले नाही, मग त्यांच्याकडून घेऊ कशी? नको आई. ते मला नाही आवडणार. परमेश्वर देईल तेच फक्त माझं. “

ताई गेल्यानंतर पुढे कितीतरी दिवस तिच्याच संदर्भातलं हे असंच सगळं आईच्या मनात रूतून बसलेलं होतं. त्या आठवणींमधलं ‘परमेश्वर देईल तेच फक्त माझं’ हे ताईचं एक वाक्य पुढे घडून गेलेल्या आक्रितामागचा कार्यकारणभाव सामावून घेणारं आणि म्हणूनच अतिशय महत्वाचं होतं हे आईच्या बोलण्यातूनच मला जाणवलं, ते ताईला लाॅटरीचं बक्षिस लागल्याचं समजल्यानंतर! कारण त्यासंदर्भात माझ्या मनात निर्माण झालेल्या सगळ्याच प्रश्नांना अतिशय समर्पक उत्तरं देणारंच ते वाक्य होतं! ! त्यातला शब्द न् शब्द पुढे माझ्या ताईच्या सात्विक कणखरपणाचं प्रतीक जसा तसाच तिने अतूट श्रध्देने प्राप्त केलेला तिचा परमेश्वरावरील अधिकार सिध्द करणाराही ठरला! !

” तू भाऊबीजेला आला होतास तो प्रसंग आठवतोय ना तुला?” एकदा बोलता बोलता आईनं विचारलं.

” हो. त्याचं काय?”

“तो प्रसंगच निमित्त झालाय पुढच्या सगळ्याला.. “

” म्हणजे?”

“भाऊबीजेदिवशी तुला रिक्षापर्यंत पोचवून केशवराव घरी परत आले ना तेव्हा त्यांना तू काय म्हणालास हे तुझी ताई खोदून खोदून विचारत राहिली. बराच वेळ त्यांनी सांगायचं टाळलं तेव्हा खनपटीलाच बसली. शेवटी त्यांना ते सांगावंच लागलं. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून मला खूप बरं वाटलं. तुम्ही सगळी भावंडं एकमेकांना धरून असल्याचं पाहून मला तुम्हा सर्वांचं खरंच खूप कौतुक वाटलं. पण तुझी ताई? ते सगळं ऐकून ती मात्र खूप अस्वस्थ झाली. केशवरावांचं बोलणं संपलं, तसं आतल्या आत घुसमटत रडत राहिली. आम्ही तिला ‘काय झालं’, असं विचारलं, समजावलं तेव्हा तिने नकारार्थी मान हलवली. डोळे पुसले. भिंतीचा आधार घेत उठायचा प्रयत्न करू लागली. मी तिला सावरायला पुढे येईपर्यंत ती भिंतीच्या आधाराने स्वतःला सावरत आत देवघरापर्यंत आली. देवापुढे निरांजन लावलंन् आणि तशीच अलगद डोळे मिटून देवापुढं बसून राहिली. मी तोवर आत येऊन तिचं अंथरूण, पांघरूण झटकून नीट केलं आणि सहज डोकावून पाहिलं तर अजूनही तल्लीन अवस्थेत ती देवापुढे बसून होती! पुढचं दृश्य पाहून मी चरकलेच. तिच्या मिटल्या डोळ्यातून अश्रूंची धार लागलेली,.. चेहरा गदगदत होता, चेहऱ्यावरची नस न् नस थरथरत होती..! .. मी लगबगीने पुढे धावले. तिला उठवायला हात लावणार, तेवढ्यात आत आलेल्या केशवरावांनी मला थांबवलं. ‘तिला थोडावेळ बसू दे… बरं वाटेल.. ‘ हलक्या आवाजात ते म्हणाले.

 थोड्या वेळाने ती शांत झाली. एकाग्रतेने नमस्कार करून शांतपणे डोळे उघडले. पदराने चेहरा खसखसून पुसला. आधारासाठी हात पुढे केला आणि उठली. आत जाऊन पडून राहिली. मग तिने केशवरावांना हाक मारून बोलावून घेतलं.

‘तुम्ही मला नेहमी तुला काय हवं, असं विचारता ना? मोकळेपणाने सांग, मी आणून देईन असं म्हणता. हो ना? आज मी सांगणाराय. जे सांगेन ते ऐकायचं. मागेन ते मला आणून द्यायचं.. ‘ ती म्हणाली.

केशवरावांनी तत्परतेने ‘सांग, काय हवंय.. ?’ असं विचारलं.

‘आज बुधवार आहे. उद्या गुरुवार. उद्यापासून दर गुरुवारी मला पाच रुपयांचं महाराष्ट्र राज्य लॉटरीचं तिकीट आणून द्यायचं’

‘लॉटरीचं तिकिट? भलतंच काय?’

‘यात भलतंसलतं काय आहे? मला हवंय. ‘

‘अगं पण कां? कशासाठी?’

‘ते योग्य वेळ आली कीं सांगेन. मी आजपर्यंत इतक्या वर्षात हट्टानं कांही मागितलंय कां तुमच्याकडं? नाही ना? आज मी सांगतेय म्हणून ऐकायचं. बाकी दुसरं मला काहीही नकोय.. ‘

ती म्हणाली होती.

तिला पाच लाखांचं बक्षीस लागलं तो तिसरा गुरुवार होता.. “

आई सांगत होती. तिचा प्रत्येक शब्द मला अधिकच बुचकळ्यांत टाकणारा होता.

“बक्षीस लागल्यानंतर ताईची प्रतिक्रिया काय होती?”

“खूप आनंद झाला होता तिला. हे सगळं कां.. कसं घडलं याचा उलगडा भारावलेल्या अवस्थेत ती स्वतःच जेव्हा बोलली तेव्हा झाला. तुझं आणि केशवरावांचं बोलणं तिला समजलं तेव्हा जणू कांही आपला केविलवाणा भविष्यकाळ तिला अस्वस्थ करू लागला होता. आपल्या या आजारपणात नवऱ्याचे फंड/ग्रॅच्युइटीचे सगळे पैसे संपून जाणार हे तिला स्पष्टपणे दिसत होतंच. ते संपले की कुणाकडून तरी पैसे मागावे लागणारच हे तिला तीव्रतेने जाणवलंही, पण तेच तिला मान्य नव्हतं. त्या अस्वस्थतेत तिने त्यादिवशी देवासमोर बसून गजानन महाराजांना साकडं घातलं होतं..!

‘माझ्या नवऱ्याने रात्रंदिवस जागून आणि कष्ट करून ४० वर्ष राबल्यानंतर त्याला जे पैसे मिळालेत त्यावर माझा एकटीचाच अधिकार कसा?’ हा तिचा प्रश्न होता! ‘ते सगळे पैसे माझ्या औषधपाण्यांत संपल्यानंतर माझ्या नवऱ्याने त्याच्या म्हातारपणात आपल्या मुलांच्या संसारात एखाद्या आश्रितासारखं कां म्हणून पडून रहायचं? मला माझ्या स्वतःसाठी तुमच्याकडं काहीही मागायचं नाहीय. नशिबाने माझ्या पदरात टाकलेले हे भोग मला मान्य आहेत. पण कृपा करून तुम्ही माझ्या या घरातली ही आर्थिक लूट थांबवा. त्या बदल्यात माझं हे यातनामय आयुष्य चार सहा महिने वाढवा हवं तर. माझे सगळे भोग, यातना, दु:ख.. तोंडातून ब्र ही न काढता मी निमूट सहन करेन. पण मी अखेरचा श्वास घेईन, तेव्हा माझ्या नवऱ्याने घाम गाळून मिळवलेले साडेतीन लाख रुपये जसेच्या तसे त्याच्याजवळ शिल्लक रहायला हवेत… ‘

ही गजानन महाराजांसमोर तिने मांडलेली तिची कैफियत होती! आणि.. आणि.. महाराजांनी तिचं गा-हाणं ऐकलं होतं…! “

आईच्या तोंडून हे ऐकताना सरसरून काटा आला होता माझ्या अंगावर! आणि त्याच क्षणी हे ‘गजानन महाराज’ कोण हे जाणून घ्यायची उत्कट इच्छाही माझ्या मनात निर्माण झाली होती! !

‘तू स्वतःच एकदा वेळ काढून ही पोथी वाच म्हणजे तुला नीट समजेल गजानन महाराज कोण ते.. ‘ असं माझी ताईच एकदा मला म्हणाली होती आणि आता ते जाणून घ्यायची प्रेरणा द्यायलाही माझी ताईच अशी निमित्त झाली होती!

पुढच्या सगळ्या शोधाचा त्या दिशेने सुरू झालेला माझा प्रवास आणि त्या प्रवासवाटेवर आलेले अनुभव माझ्या ताईच्या जाण्याच्या दुःखाचं सांत्वन करणारे होतेच आणि अलौकिक आनंदाच्या स्पर्शाने मला कृतार्थ करणारेही! ! त्या अनुभवांचा माझ्या अंतर्मनाला झालेला स्पर्श हा माझ्या आठवणींमधला अतिशय महत्त्वाचा तितकाच मोलाचा ठेवा आहे!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हनुमंत आमुची कुळवल्ली… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ हनुमंत आमुची कुळवल्ली ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

(हनुमान जयंती निमित्त एक लेख)

।श्रीराम। रामायणात हनुमंताची भूमिका फार मोलाची राहिली आहे. रामाच्या कार्यात अग्रभागी आणि अतितत्पर कोण असेल तर तो एकमेव हनुमंत किंवा हनुमान. हनुमंताच्या अंगी अनेक गुण होते आणि त्याचा उपयोग त्याने कधीही स्वतःसाठी केला नाही तर तो केला फक्त एका रामासाठी. हनुमंताच्या रामभक्तीच्या अनेक कथा प्रसिध्द आहेत. बुद्धीवंतामध्ये वरिष्ठ, अतिचपल, कार्यतत्पर, कुशल नेतृत्व, संघटन कौशल्य, संभाषण चतुर, उत्तम सेवक, सर्व शक्तिमान, (बुद्धी आणि शक्ती एकत्र असणं अतिदुर्मिळ!) असे हनुमंताचे अनेक गुण सांगितले जातात. रामायणात वर्णन केल्याप्रमाणे हनुमंताची आणि रामाची भेट तशी उशिरा म्हणजे सिताहरण झाल्या नंतरची आहे. पण पहिल्या भेटीतच हनुमंताचे वाक्चातुर्य पाहून प्रभू श्रीराम प्रसन्न झाले तसेच प्रथमच रामाचे दर्शन होऊन हनुमंत रामाचा कायमचा दास झाला. जिवाशिवाचे मिलन झाल्याचा तो अमृतक्षण होता. पण एकदा रामाची भेट झाल्यावर मात्र हनुमंतानी कधीच रामास अंतर दिले नाही. तो रामाचा एकनिष्ठ सेवक बनला. आपल्या असामान्य आणि अतुलनीय भक्तीने हनुमंताने नुसते देवत्व (रामतत्व) प्राप्त केले नाही तर जिथे जिथे रामाची पूजा केली जाते तिथे हनुमंताची पूजा व्हायला लागली. रामाचे अनंत भक्त आहेत पण राम पंचायतनात मात्र फक्त हनुमंताचा समावेश आहे. आज सुद्धा जिथे जिथे रामकथा ऐकली जाते, सांगितली जाते तिथे तिथे हनुमंतासाठी मानाचे आसन ठेवलेले असते.

पूर्वी आपल्याकडे अध्ययन आणि अध्यापन हे मौखिक पद्धतीने म्हणजे पाठांतर रूपानेही केले जात असे. लिखीत स्वरूपात अध्ययनाची पद्धती त्यामानाने अलीकडील आहे. याचा एक दुष्परिणाम असा झाला की बराचसा इतिहास आपल्याकडे लिहिला गेला नाही आणि जो लिहिला गेला तो परकीय प्रवाशांनी किंवा आक्रमकांनी. स्वाभाविकपणे तो त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिला. त्यांच्या हिताच्या गोष्टी त्यांनी लिहिल्या. यातून एक गैरसमज पसरविला गेला की रामायणात जे वानर होते ते (व्वा!) नर नसून ती फक्त ‘माकडं’ होती. ही आपल्या पराक्रमी आणि विजयी इतिहासाची जगाने केलेली क्रूर चेष्टा आहे, असेच म्हणावे लागेल. रामायणात असे वर्णन आहे की किष्किंधा राज्य हे सुग्रीवाच्या अधिपत्याखाली होते. त्या राज्याचा सेनापती होता केसरी. आणि ह्या केसरीचा पुत्र हनुमंत. सध्याची दक्षिणेकडील चार राज्यं म्हणजे त्याकाळातील किष्किंधानगरी. सात मजली सोन्याचे महाल असल्याचे वर्णन रामायणात आहे. आजच्या काळात एखाद्या राज्याच्या मंत्र्याची संपत्ती किती असते आपल्याला कल्पना आहे, मग या चार एकत्रित राज्याचा सेनापती किती श्रीमंत असेल. असा हा भावी सेनापती हनुमंत रामाचा दास होतो, नुसता कागदोपत्री दास न होता तो कायमचा रामदास होतो यातच त्याच्या भक्तीचे ‘मर्म’ सामावले आहे.

हारुद्र जे मारुती रामदास।
कलीमाजि जे जाहले रामदास।।

असे ज्याचे वर्णन करण्यात येते ते समर्थ रामदास यांना सुरुवातीपासूनच हनुमंताबद्दल तीव्र ओढ, श्रद्धा, भक्ती होती. प्रभुश्रीरामानी दृष्टांत दिल्यापासून समर्थानी ‘समर्थ’ होईपर्यंत आणि पुढे कार्यसमाप्तीपर्यंत हनुमंताची अखंडित साधना केली. त्याचे यथायोग्य परिणाम आपण शीवकाळात अनुभवले.

शक्तीने मिळती राज्ये। शक्ती नसता विपन्नता।।

यासमर्थ वचनाची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. तो काळ मोगलांच्या आक्रमणाचा होता. टोळधाड यायची, घरावर नांगर फिरवला जायचा, आपलीच माणसे क्षुल्लक ‘वतनां’साठी, जहागीरीसाठी आपल्याच माणसांना मारायची. स्वाभिमान नष्ट झाला होता, समाजाला एक प्रकारचे सामूहिक नपुंसकत्व प्राप्त झाले होते. समाज आपले शौर्य, वीर्य, धेर्य विसरला होता. कोणीतरी ह्या सर्वावर बसलेली काजळी झटकण्याची गरज होती. अशा अस्वस्थ मनाचा अभ्यास करून समर्थानी हनुमंताची मंदिरे स्थापन करून बलोपासनेस सुरुवात केली. तरुण बलवान व्हायला लागले आणि विविध मठांतून शक्ती आणि बुद्धियुक्त असे नवीन तरुण घडू लागले आणि त्याचा उपयोग छत्रपतींना स्वराज्य स्थापनेसाठी झाला.

रामदास स्वामीनी पूर्ण विचार करून आपल्या आराध्य देवतेची निवड केली. आपल्याकडे गुरुशिष्य परंपरा खुपच पुरातन आहे. शिष्य साधनेतून इतका ‘तयार’ होतो की शिष्याचे नुसते विचार बदलत नाहीत तर त्याची कुडी सुद्धा गुरुसारखी किंवा उपास्यदेवतेसारखी होते. आपला समाज हनुमंतासारखा बलवान, बुद्धिमान, सर्वगुंणसंपन्न व्हावा म्हणून हनुमंताची मंदिरे आणि मठ स्थापन करण्यात आले. उपास्य देवतेची निवड करतानाही समर्थांनी कोंदंडधारी रामाची निवड केलेली आहे. आपल्या पत्नीला रावणाने पळवून नेल्यावर रामाने आयोध्येला निरोप पाठवून सैन्य मागविले नाही, तर स्वतः उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीच्या आधारे, तेथील सामान्य मनुष्यांच्या (वानराच्या) साह्याने लंकेवर स्वारी करून आपल्या पत्नीला सोडवून आणले. ह्यासर्व कार्यात हनुमंत एकनिष्ठेने रामकार्यात कटिबद्ध होता. हनुमंताने जेंव्हा सिताशोधनासाठी लंकेत गेला, सितामाईला भेटला आणि म्हणाला की तुम्ही माझ्या सोबत चला, मी आपल्या मुलासमान आहे, आपण माझ्या माताच आहात. पण ती पतिव्रता म्हणाली की स्वतः प्रभू राम इथे येतील, ज्याने मला पळवून आणले त्याचा नाश करतील तेंव्हाच मी त्यांच्या सोबत येईन. ह्याला म्हणतात निष्ठा! 

अशा या हनुमंताची समर्थांनी उपासना केली आणि समाजाकडून कडून करवून घेतली. त्याकाळात रूढ झालेल्या क्षुद्र देवतांची पूजा, उपासना समर्थांनी बंद पाडली आणि तीही हनुमंताची उपासना सुरु करून. योग्य असा पर्याय उपलब्ध करून समर्थानी समाजाच्यातील भक्तीला आणि शक्तीला जागृत केले. ‘आधी केलं आणि मग सांगितले’ या उक्तीस जागून स्वतः समर्थ रोज एक हजार सूर्य नमस्कार घालायचे. त्या काळात आणि आज सुद्धा स्वतः व्यायाम करणारा संत पाहायला मिळणं हे दुर्मिळच! . समाजाची दुखरी नस काय आहे हे जाणून त्यानुसार उपचार करण्याचं काम समर्थानी केलं. एखाद्या मनुष्याला साधना करून मुक्ती मिळण्यापेक्षा संपूर्ण समाज एक पायरी उन्नत झाला तर ती प्रगती जास्त चांगली, हे सूत्र उरात ठेऊन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी समर्थानी अवघे जीवन खर्च केले. स्वतः लौकिक अर्थाने कधीही प्रपंच न करणारा हा रामदासी संतपुरुष लोकांनी ‘प्रपंच नेटका करावा’ असे सांगत होता. प्रपंच नेटका करण्यासाठी काय करावे लागेल हे सुद्धा त्यांनी सूत्रबद्ध रीतीने दासबोधात लिहून ठेवलेआहे.

सर्वसामान्य मनुष्य (समाजपुरुष) हा लहान मुलाप्रमाणे वागतो. तो आदर्श जीवन जगायचं प्रयत्न करेलच असे नाही पण तो लहान मूलाप्रमाणे अनुकरणशील मात्र नक्कीच असतो. एखादया लहान मुलांचे वडील सैनिक असतील तर त्या लहान मुलास आपण सैनिक व्हावेसे वाटते, एखाद्याचे वडील डॉक्टर असतील तर त्याला आपण डॉक्टर व्हावेसे वाटते. हे अगदी स्वाभाविक आहे. त्या मूलासमोर जो आदर्श प्रस्तुत केला जातो, तसे होण्याचा ते मूल प्रयत्न करतं, म्हणून समर्थांनी समाजापुढे हनुमंत हा आदर्शांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून प्रस्तुत केला. हनुमंताचा आणिक एक विशेष गुण आहे. हा हनुमंत उपजत देव म्हणून जन्माला आलेला नाही, तर आपल्या भक्तीने, नराचा नारायण व्हावा त्याप्रमाणे भगवंताची (रामाची) नित्य सेवा करून देवत्वास पोचलेला आहे. हनुमंत कर्तव्यतत्पर, प्रयत्नवादी आहे. व. पु. काळे म्हणतात त्याप्रमाणे मोटर सायकल वरून प्रभात फेरफटका (morning walk) करणाऱ्यांना हनुमंत कधीच उमगणार नाही. सर्व सैन्याला खांद्यावर बसवून लंकेत नेणं हनुमंताला अवघड नव्हतं, पण सामान्य मनुष्यात स्वाभिमान जागृत होण्यासाठी त्याला लढायला लावणं जास्त गरजेचं होतं आणि म्हणून सर्व वानरांच्या साह्याने रामसेतू बांधून लंकेत जाऊन युद्धात रावणांचा पराभव करून, त्याला मारून रामानी सितामाईला परत आणली.

आपल्या कुळातील पूर्वजांची माहिती कोणी आपल्याला विचारली तर आपण फारतर तीन किंवा चार पिढ्यांची नावे सांगू, पण त्या आधीच्या पिढ्यांची नावे सांगता येतीलच असे नाही, पण आपण हनुमंताच्या कुळातले आहोत, रामकृष्णाच्या वंशातले आहोत, छत्रपतींच्या वंशातले आहोत, असं नुसतं म्हटलं तरी आपले रक्त तापते, छाती गर्वाने फुगते आणि आपल्या अंगात आपसूक वीरश्री संचारते. ज्यांना आपला इतिहास वैभवशाली होता हे माहित असतं त्यांचा भविष्यकाळ सुद्धा उज्ज्वल असतो अशा प्रकारचे एक वचन आहे. आपल्या बाबतीत ते नितांत खरे आहे. जिजाबाईंनी शिवबाला रामायणातील, महाभारतातील विजयाचा इतिहास शिकविला, अन्याय सहन करायचा नसतो, तर त्याविरुद्ध लढून न्याय मिळवायचा असतो हे शिकविले आणि मग चार इस्लामी पातशाह्यांच्या छाताडावर उभे राहून छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले.

आज आपण आपल्या मुलांना हिंदुस्थानच्या पराजयाच्या आणि युरोपीय देशांच्या विजयाचा इतिहास शिकवीत आहोत, त्यामुळे आपली तरुण पिढी परकीय देशांच्या विकासासाठी परदेशी जात आहे, आपण सर्वच बाबतीत त्याचे अंधानुकरण करीत आहोत. आपण जन्माने हिंदू आणि आचरणाने ख्रिश्चन/मुस्लिम बनत आहोत. ह्याला एकाच कारण आहे ते म्हणजे आपण आपलो ‘कुळवल्ली’ विसरलो आहोत किंवा जाणीवपुर्वक विसरले जावी म्हणून समाजात विविध दुष्ट शक्ती कार्यरत आहेत. आपण वेळीच सावधान होण्याची गरज आहे. लौकिक अर्थाने परंपरा न पाळता जरा जागरूक राहून, ‘धर्म’ सजगतेने समजावून घेऊन आचरणात आणण्याची गरज आहे. छत्रपती जन्माला येतीलही पण त्याआधी मावळे मात्र आपल्याला आपल्या घरातच घडवावे लागतील. असे आपण करू शकलो किंवा प्रयत्न चालू केला तर हनुमंत आमुची कुळवल्ली असे म्हणून घेण्यास आपण पात्र होऊ.

।जय जय रघुवीर समर्थ।
।श्रीराम।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लग्नात आईकडून मिळणारा बाळकृष्ण… ☆ सौ. वृषाली सहस्रबुद्धे ☆

सौ. वृषाली सहस्रबुद्धे

ओळख माझी

नाव – सौ. वृषाली आनंद सहस्रबुद्धे

शिक्षण – एम्. एस्‌सी. (गणित), बी. एड्.

वाचनाव्यतिरीक्त इतर छंद – विणकाम, पर्यटन, शिकवणे, शास्त्रीय संगीत ऐकणे, नाटक व चित्रपट बघणे.

वृत्तपत्रातून कविता, लेख, प्रवासवर्णन, चित्रपट समीक्षा प्रकाशित झालेल्या आहेत.

? विविधा ?

लग्नात आईकडून मिळणारा बाळकृष्ण… ☆ सौ. वृषाली सहस्रबुद्धे 

रामजन्मभूमीचा विवाद संपुष्टात आल्यानंतर आता कृष्णजन्मभूमीचाही विवाद संपविणार अशा बातम्या येत असतानाच एक लेख वाचनात आला. त्या लेखकाला कुणीतरी “तुला राम हवा की कृष्ण?’ असा प्रश्न विचारला होता. त्याने उत्तरात त्याला राम आणि कृष्ण दोघंही हवेत असं सांगून राम हवा असण्याची आणि कृष्ण हवा असण्याची कारणे विस्तृतपणे विशद केली होती. लेख तर छानच होता. पण तो वाचून एक प्रश्न पडला की जर राम आणि कृष्ण दोघंही आमच्यासाठी आवश्यक आहेत तर घरोघरी मूर्तिस्वरूपात जसा बाळकृष्ण असतो तसा राम का नसतो? दोघंही खरं तर विष्णूचेच अवतार ना!!

मग राम राजा म्हणून आपण त्याच्यापुढे आदराने फक्त नतमस्तक होतो, पण त्याला आपला जवळचा मित्र मानत नाही आणि कृष्ण, जो कधीच राजा झाला नाही, तो त्याच्या खोडकर, हसऱ्या स्वभावामुळे आपल्याला खूप जवळचा वाटतो असं तर काही नाही ना? अचानक मग लक्षात आलं की बाळकृष्ण तर आपण माहेरहून घेऊन येतो. मुलीची सासरी पाठवणी करते वेळी सगळ्यात शेवटी आई मुलीच्या हातात चूपचाप बाळकृष्णाची गुडघ्यावर बसलेली मूर्ती देते. मला वाटतं कृष्णाचे विविध पैलू याला कारणीभूत आहेत.

लग्न झाल्यानंतर मुलगी माहेरचं सारं काही: घरदार, आईवडील, आनंदाने जगलेली नाती, जमविलेले आणि जपलेले मित्र-मैत्रिणी या सगळ्यांना; मागे सोडून जाते. सासरी गेल्यावरही या सगळ्यांची आठवण तिला येणारच असते. पण फक्त या आठवणींमध्ये रमून तिने तिच्या सासरच्या कर्तव्यात चूक करणे, त्यांना पुरेसा वेळ न देणे, त्यांना काय हवं नको ते न पाहणे हे अयोग्यच असते. आणि आपल्याला काहीही सोडून द्यावं लागलं तरी चालेल, पण कर्तव्यात कसूर होता कामा नये हे कृष्णापेक्षा जास्त चांगलं कोण सांगणार? तो जितकं काही मागे सोडत कर्तव्य करत पुढे गेला तितकं कुणीही केलं नाही. जन्म झाल्या झाल्या आईवडील सुटले, जिथे बालपण गेलं ते गोकुळ मागे राहिलं, राधेला विसरावं लागलं, पुढे मथुरा, द्वारका सगळं काही कर्तव्यासाठी सुटत गेलं, पण त्यांच्या मोहपाशात न अडकता तो त्याचं काम अगदी अचूकपणे करत गेला. हेच तर प्रत्येक आई आपल्या मुलीला शिकवत असते ना कायम! म्हणूनच माहेरच्या मोहात अडकून राहून तू तुझ्या कर्तव्यात कसूर करू नकोस असंच कदाचित आई मुलीला बाळकृष्ण देऊन समजावून सांगत असावी.

कृष्णाचा आणखी एक ठळक पैलू आहे तो म्हणजे प्रेमाचा – अशरीरी आणि शरीरी दोन्ही. तो चांगला पुत्र, भ्राता तर आहेच, पण महत्त्वाचं म्हणजे तो एक अत्यंत चांगला सखा आहे. स्त्री-पुरुष मैत्रीचा उद्गाता आहे. त्याखातर सखीच्या केवळ धावा करण्याने तो वस्त्रहरणाच्या प्रसंगी तिच्या मदतीला धावून आला. राधाकृष्णाचं प्रेम तर अतिशय मनोहारी. त्याचा जनमानसावर इतका पगडा आहे की अजूनही कृष्णाचं नाव हे त्याच्या कुठल्याही पत्नी बरोबर न घेता ‘राधाकृष्ण’ असंच घेतलं जातं. या सर्वच नात्यांना त्याने नेहमीच योग्य न्याय दिला आहे. लग्नानंतर मुलीलाही सून, पत्नी, वहिनी, काकू, मामी, आई अशा अनेक प्रकारच्या भूमिका पार पाडायच्या असतात. त्यातील कुठल्याही नात्यावर अन्याय न करता तिला त्या सर्व भूमिका व्यवस्थित पार पाडता याव्या, ही जाण तिला असावी, तिनं प्रत्येक नातं प्रामाणिकपणे निभवावं, सगळ्यांना बरोबर घेऊन संसार करावा म्हणून हा बाळकृष्ण आई मुलीला देत असणार.

हा खोडकर, प्रेमळ, हसरा, सगळं सोसणारा कृष्ण प्रसंगानुरूप कठोरही होतो. तो युक्ती-प्रयुक्ती वापरून पूतना, कंस, जरासंध यांचा वध करतो, पण महाभारतातील युद्धाच्या वेळी मदत मागायला आलेल्या आपल्या मित्राला “न धरी शस्त्र करी, मी सांगेन गोष्टी युक्तीच्या चार” असं म्हणून आपलं सारं सैन्य दुर्योधनाला देऊन टाकतो. कारण तो जी मदत करतो ती अप्रत्यक्षपणे. स्वतः हातात शस्त्र घेऊन तो त्याच्या प्रिय मित्रालाही वाचवत नाही, उलट त्याला गीतेचा उपदेश करून स्वतःचा लढा स्वतःच करायला प्रवृत्त करतो. हेच तर मुलीला सासरी करायचं असतं ना! शक्यतो न बोलता सहन करायचं असतं, पण जिथे चूक होत असेल तिथे खंबीरपणे लढायचंही असतं. कुटुंब सुखात, आनंदात रहावं म्हणून आनंदी खोडकरपणा बाळगावा लागतो तर कठीण प्रसंगात कृष्ण होऊन गीतेचं रहस्यही उलगडावं लागतं, जीवनाचा प्रत्येक टप्पा समर्थपणे ओलांडावा लागतो.

संसार जसजसा फुलायला लागतो तसतसा त्यात पदोपदी कृष्ण भेटायला लागतो. घरातल्या लहान मुलांना त्यांच्या एवढंच होऊन सांभाळणं म्हणजे गोकुळातील यशोदेचा खोडकर कृष्ण. मनावर दगड ठेवून मुलांना शिक्षणासाठी बाहेर गावी किंवा परदेशात पाठविणे म्हणजे सांदीपनींच्या आश्रमात शिकायला गेलेला देवकीचा कृष्ण. कुणाच्याही गरीब वा श्रीमंत असण्याचा विचार न करता सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहणे म्हणजे सुदाम्याचा कृष्ण. लग्नात शृंगार असावा पण वासना किंवा असूया नसावी म्हणजे रुक्मिणीचा कृष्ण. सगळ्यांची जेवणं झाल्यावर उरलेलं अन्न खाऊन तृप्त होणे आणि घरादाराला समाधानी ठेवणे म्हणजे द्रौपदीच्या सूर्यथाळीत उरलेले एकच पान खाऊन स्वतःबरोबर जगाला तृप्त करणारा कृष्ण. आपल्या माणसाला वळणावर आणण्यासाठी त्याला योग्य सल्ला देत खंबीर निर्णय घेऊन कठीण प्रसंगाचा समर्थपणे सामना करण्यास शिकविणे म्हणजे अर्जुनाला गीता सांगणारा कृष्ण.

असा विविध रूपातील कृष्ण उलगडायला लागला की मुलीला तिच्या आई मधील देवकी-यशोदा तर कळतातच, शिवाय रुक्मिणी-सत्यभामेच्या प्रेमाबरोबरच राधा व मीरेची कृष्णाबद्दलची ओढही कळते, तिला द्रौपदीचे सखाप्रेमही कळते. असा सखाच सासरी जाताना तिच्या आईने तिला दिलेला असतो. तो जेव्हा सगळ्यांपासून लपवून आई देते तेव्हा त्या युगपुरूषाच्या दर्शनाबरोबरच आईचा मायेचा स्पर्शही मुलीच्या हाताला होतो. त्या मायेच्या शिदोरीबरोबर तिने दिलेल्या विश्वासू सख्याच्या आधारानेच तिला तिचा संसार तल्लीन होऊन करायचा असतो. पण वेळ आल्यावर विरक्त होऊन आपण उभा केलेला संसार पुढच्या पिढीच्या हाती सोपवायचा असतो.

निर्लेप मनाने, कुणाचाही दुस्वास न करता, स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन, कर्तव्यात न चुकता संसार कर, वेळप्रसंगी खंबीर राहून निर्णय घे आणि त्यांच्यावर ठाम रहा, पण शेवटी सगळं सोडून मुक्त हो हा गुरुमंत्रच आई पाठवणीच्या वेळी गुपचूप बाळकृष्ण देऊन मुलीला देत असते. आणि गुरुमंत्र तर कानातच देतात ना; तोही हळूच. हेच सगळ्यांपासून लपवून आईने मुलीला बाळकृष्ण द्यायचं प्रयोजन असणार, नाही का?

©  सौ. वृषाली सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी आधुनिक श्रद्धाळू… ☆ सुश्री वैशाली पंडित ☆

सुश्री वैशाली पंडित

परिचय 

शैक्षणिक अर्हता – बी. ए. बी. एड्. मराठी/ समाजशास्त्र

माझं लेखन – तरूण भारत, पुढारी, लोकमत, मिळून सा-याजणी यांत सदरलेखनसकाळ स्मार्ट सोबती या पुरवणीत सलग सहाव्या वर्षी सदर सुरू आहे. अंतर्नाद, आरती मासिकातून कथालेखन. कोकण मराठी साहित्यपरिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष म्हणून सहा वर्ष काम सांभाळले. अनेक साहित्यिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी चालवले. झपूर्झा या मासिकातून कथा लेखन.

पुस्तके –

  1. दीपमाळेची फुले (ललित लेख संग्रह) – आरती प्रकाशन, डोंबिवली. कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार.
  2. आगीनझाड (कथासंग्रह) पंडित पब्लीकेशन, कणकवली. कोमसाप पुरस्कार.
  3. असा घडला सेनानी (चरित्र कादंबरी,) पंडित पब्लिकेशन कणकवली
  4. आधण आणि विसावण (ललितबंध) अभिनंदन प्रकाशन कोल्हापूर, कोमसाप पुरस्कार.
  5. पाच दशक नऊ सुटे (ललितबंध)- अभिनंदन प्रकाशन. कोल्हापूर
  6. कल्याणकटोरा (संतचरित्रात्मक कादंबरी) विघ्नेश प्रकाशन, कणकवली. कोमसाप पुरस्कार.
  7. श्री गजानन विजयग्रंथ साहित्यिक पारायण – संतकवी दासगणू यांच्या अध्यायांवर रसग्रहणात्मक लेख. — अल्टीमेट प्रकाशन, नाशिक
  8. मंत्रभूल, -(ललित लेखबंध-)- सकाळ प्रकाशन पुणे
  • अन्य –
  • ‘कानगोष्टी’ ही शिशुवर्गासाठींची गोष्टींची श्रवणफीत. मात्र आता सीडीप्लेअर कालबाह्य झाल्याने त्या गोष्टी माझ्या यु ट्युब चॕनेलवर ऐकता येतील. मुलांचा श्रवण विकास व्हावा यासाठीच या गोष्टी आहेत.
  • पाच दशक नऊ सुटे या पुस्तकाचा वाचकार्पण सोहळा तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख हिच्या हस्ते केला. दिशामुळे तो आणि ती या बरोबर ते या समाजाशीही मैत्रबंध निर्माण झाला.
  • ऐलमा पैलमा अक्षरदेवा, सिंधुदुर्ग महिला साहित्य समूहाची स्थापना २०१४ मध्ये झाली.
  • अनेक साहित्यिक, सामाजिक उपक्रम त्यात सुरू असतात. पुढच्या वर्षी दशकपूर्ती आहे. सिंधुदुर्गातल्या ३० नव्या जुन्या लेखिका एकत्र येतात. दृढ साहित्यबंध निर्माण झालेला आहे.
  • मी फेसबुकवर सक्रिय असते. स्पर्शतृष्णा हा माझा सर्वाधिक व्हायरल झालेला लेख होता.
  • गोमंतकातील चौदाव्या शेकोटी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • मिळून सा-याजणीची गेली २० वर्षे प्रतिनिधी.
  • मॕन इन थ्री पीस ही कथा गोव्यातील एका दिग्दर्शकाने सिनेमासाठी निवडली.
  • आकाशवाणीवरून अनेक कथा कविता प्रसिद्ध

? विविधा ?

☆ मी आधुनिक श्रद्धाळू… ☆ सुश्री वैशाली पंडित 

हो बाई ! मी अगदी आधुनिक आहे. जुन्याजीर्ण श्रद्धा कालबाह्य झाल्यात. आपण काळाबरोबर बदलायला हवं नाहीतर रद्दीतसुधा घ्यायचं नाही कोणी. हे मला पक्कंच कळलेलं आहे. तर सांगत काय होते, हं मी आधुनिक…

म्हणून तर मी स्मार्टफोन वापरायला शिकले. अगदी ह्याच्यात्याच्या हातापाया पडून, मिनत्या करून मोबायलातलं एकेक तंत्र माहीत करून घेतलं. फेसबुक म्हणू नका, व्हाटसप म्हणू नका सगळीकडे मुसंडी मारली. माहेर, सासर, शाळेतले, कॉलेजातले, इथले-तिथले पन्नासग्रुप फोनवर आले. प्रत्यक्षात कधी बोलायला मिळत नव्हतं ते इथे अगदी धो धो बोलून घ्यायला लागले. जळ्ळं प्रत्येकवेळी बोलायलाच हवं असं तरी कुठे ? इकडून आलेला मेसेज तिकडे ढकलला तरी चालतोच की ! ओटीतला ब्लाऊजपीस कसा हिचा तिला, तिचा हिला परत आपल्याच ओटीत येतो, तस्से मेले हेही मेसेज परत आपल्याच व्हाटसप्यात येतात ते सोडा.

आणखी एक बरं झालं बाई ! रोजच्या जेवणाचं ताटही फेसबुकाला, वॉटसपाला नैवेद्य दाखवायचं व्रत नेमाने करता आलं. एरव्हीच्या शिळ्याफोडणी भातालाही सव्वाशे लाईक्स आले की ऊर कसा भरून येतो नै ? नाहीतर त्याला घरात माझ्याशिवाय विचारत कोण होतं ?

भरलं वांगं, दहीबुंदी, काजुकुर्मा, असल्या पदार्थांचे फोटो मी टाकले तेव्हा उभ्या गुगलने मला सुगरण, यम्मी, माऊथवाॕटरींग असाल्या कमेंटी टाकल्या. ही बाई बघावं तेव्हा आॕनलाईनवर असते, करते तरी कधी ? सगळ्यांनाच आश्चर्य. पण म्हटलं ना, मी आधुनिक… करायला कशाला हवंय काही ? नेट लावलं की हव्वा तो पदार्थ पुढ्यात. तेच ब्लाऊजपीस पुढच्या ओटीत टाकत रहायचे. माझा आजचा मेन्यू म्हणून. फक्त ज्या ग्रूपवर घरातली मुलं सुना, नातवंडं नाहीत तिथेच ते टाकायचं. नाहीतर ” कधी गं हा मेन्यू होता आपल्याकडे ? मुगाची खिचडीच तर केलीस उशीर झाला म्हणून. ” असं बिनदिक्कत विचारायला कमी नाही करायचे हे लोक.

आता खर्च म्हणाल तर… वाढला थोडासा. खोटं कशाला बोला ? नेटपॕकचा तर राजरोसच वाढला पण दुधाचा खर्च वाढला. गॕसचे सिलिंडर महिन्याला एकाच्या जागी दोन लागायला लागले. काय ? नाही कळलं काही ? अहो, आख्खं गुगल बोटाखाली रगडताना होते दुधाची अंमळशी सांडलवंड. जातं महिन्यातून फक्त वीसपंचवीसदा दूध उतू. पण एवढी बिझी असल्यावर घसा-याचा खर्च नाही का गृहित धरत ? मग ?

तर… असं सगळं सुरळीत चाललेलं. तर या मोबाईलबाळालाच दृष्ट लागावी ? कसंतरीच करायला लागलं की. डोळाच उघडीना. नेहमीचा त्याचा चार्जरचा अंगठा तोंडात दिला, तास झाला तरी हाल नाही की चाल नाही. शेवटी चांगला दुसरा लांबशेपटीवाला चार्जर लावला तरी तेच. जीव धास्तावला अगदी. म्हटलं दृष्ट तरी काढावी. सिमकार्ड मुठीत धरून तीनदा उतरवलं, पुटपुटलेही. ” डीपीची, सेल्फीची, जॉईनची, क्वीटची, अपलोडाची, डाऊनलोडाची, नोकीयाची, सॕमसंगची, आयबाॕलची कोणाची नजर लागली असेल तर फुटो त्याचा कॕमेरा !” पण… छे ः !

मग काय न्या डाॕक्टरकडे. घसघशीत बिल घेऊन त्याने केले उपचार. आणला घरी. तर त्यात वॉटसप काही केल्या उगवेना. आता करू तरी काय ? माझे कित्ती कॉंन्टॕक्टस ताटकळले असतील माझ्याशिवाय, कोणी नवी साडी घेतली, कोणी जुनी गाडी विकली, कोणाच्या सासूने कोणाला कसे टोमणे मारले, कोणाच्या सुनेने आगाऊपणा केला काही समजणार नाही मला ?

तेवढ्यात यांच्या मित्राचा मुलगा बायको मुलासह आमच्या घरी आला. तिघांच्याही हातात त्यांचे मोबाईल. आमच्याशी बोलताना दोन शब्द आम्हाला आणि बाकीचं मोबाईलमधे तोंड घातलेलं. माझा उतरलेला चेहरा बघून त्यांनी कारण विचारलं मी सांगितलं. म्हणे हात्तेरेकी. आमचा बबलू इइइझ्झीली देईल दुरूस्त करून. बबलू. इयत्ता सातवी क ने इकडे तिकडे खाटखुट केलं आणि उगवलं की व्हाॕटसप. सगळी ओळखीची तोंडं दिसली डीप्यांमधली आणि हायसं झालं. आनंदाच्या भरात बबलूचे कित्ती फोटो काढू न् किती नको झालं मला. खुषीत एक आख्खं पार्लेजी बिस्कीट जास्तच घातलं त्याच्या प्लेटमध्ये.

ते गेले आणि कौतुकाने मोबुल्याला मांडीवर घेतलं. काय सांगू ? त्याचं एक दुखणं बरं झालं आणि अनेक बारीकसारीक कुरबुरी सुरू झालेल्या दिसल्या. एकतर व्हाॕटसपवरची काहींची नावं गुल. नुसतेच नंबर. लोकही असले खत्रूड ना, डीपी दर तासाला बदलतात. कोणाचा नंबर ते कळतच नव्हतं. आणि सगळ्यात वाईट म्हणजे…. आई आई ग्ग्ग ! फेसबुक गायब… काय ढवळलं त्या कार्ट्याने तो गुगल जाणे. कासावीस झाला जीव. शेवटी सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम् त्यजति पंडितः म्हणतातच ना ! मी म्हटलं मेलं वाॕटसप तर वाॕटसप.

पण नावं नव्हती त्यांचे मेसेज आले तर कोणाला काय रिप्लाय द्यावा कळतच नव्हतं. अंदाज पंचे काहीही ठोकत होते. एकाला मी तो बायकोला फिरायला नेत नाही म्हणून झापलं तर ते सासरच्या ग्रूपवरचे मामेसासरे निघाले. त्यांचं लग्नच नाहीये झालेलं. माझी जीवाची मैत्रीण समजून आमच्या नवराबायकोतल्या उखाळ्या पाखाळ्या लिहिल्या तर तो मेसेज नेमका दादाला पोचला. त्याने दात दाखवत तो माझ्या नव-याला फाॕरवर्ड केल्याचा रिप्लाय टाकला. काय बघा स्वभाव ! याचं त्याला त्याचं याला करावं का असं ?

शेवटी विनंती केली पर्सनली, बाबांनो, कृपया नावं कळवा. तर काहीनी निरागसपणे कळवलं काहींनी ओळखा बघू असं मलाच कोड्यात टाकलं. नतद्रष्ट मेले.

आपली मेसेज फाॕरवड करायची लिस्टही बिनसलेली. एकाला दाबावं तर सुळ्ळकन भलतीकडेच तो मेसेज पसार. आमचा अगदी चौघींचाच एक भन्नाट ग्रुप आहे. तिथे कसलाही विधिनिषेध नाही. जिभेची हाडं तिथे चुकून मिळायची नाहीत. असाच एक ठ्यां हसायला लावणारा मेसेज मी तिथे पाठवायला म्हणून दाबला तर तो थेट एका सोवळ्या ग्रुपवर जाऊन आदळला. एकच हाहाकार उडाला तिथे. अगदी ब्राह्मणांच्या स्वयंपाकघरात चिंचगुळाच्या आमटीत मांजराने तळलेला बांगडा टाकल्यावर जे होईल ते झालं. पुढची दहा मिन्टं मी तिथे साॕरी… चुकले. परत नाही असं होणार अशा नाकदु-या टाईप करीत होते.

घरात कोणी आजारी असेल तर प्राण कसे कंठाशी येतात ते मी सांगायला नको. मी किती मोबाईल तज्ज्ञ गाठले, किती पैसे त्यांच्या खिशात घातले त्याचा हिशेबच नाही. एखादा तज्ज्ञ मोबाईल चिमटीत धरतो, उगाच इथे तिथे बोटं आपटतो आणि जाहीर करतो, “प्च काय नाय उपयोग याचा. शाप डबा झालाय. ” काहींनी माझा इमेल आयडी स्वःच्या आवडीने बदलला. माझी जन्मतारीख तर इतकी वेगवेगळी पडली की शिवरायांनाही खंत वाटावी. बरं तारीख वेगळी टाकली एकवेळ मान्य. पण साल ? माझ्या पोरांचा टवाळ्या करणारा मेसेज. एकविसाव्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ! एक शुभेच्छा अठराव्या वाढदिवसाची आली. असं करता करता बहुतेक माझ्या आईलाच कन्यारत्न प्राप्त झाल्याच्या शुभेच्छा माझ्या नातवांकडून गेल्या तर नवल नको वाटायला. थोरल्या नि धाकट्याने तर फेसबुकचे किती अकाउंट उघडलेस गं म्हणत मला काही कळत नसल्याची ग्वाही दिली. सुनेने एकदा बघू काय झालंय म्हणत मोबाईल हातात घेतला आणि इस्स्स.. म्हणत ओढणी तोंडावर घेतली. “अहो ममी, असले फोटो कशाला डाऊनलोड केलेत ?” म्हणत घाईघाईने तो डिलीट केला. मी काहीही न करता मला हे भोगावं लागत होतं.

इथे नाही काही होणार. हा प्राॕब्लेम मुंबईलाच बघावा लागेल. असा घरातून मला सल्ला मिळाला. पण…. आशा चिवट. परत कोणी मोबाईलतज्ज्ञ वाटला की त्याच्या पायावर मोबाईलला घालते. तो सांगेल ते गंडेदोरे करायची तयारी असते माझी. मग ? शेवटी मी आधुनिक ना ? माझ्या श्रद्धाही आधुनिक. ना ?

©   सुश्री वैशाली पंडित

मालवण, जि. सिंधुदुर्ग, मो. ९४२२०४३०२५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares