मराठी साहित्य – विविधा ☆ ऐसे हळुवारपणे…अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? विविधा ?

☆ ऐसे हळुवारपणे…अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

ऐसे हळूवारपण…

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. मी आणि माझी एक लग्न झालेली मैत्रीण सुमती, तिच्या घरी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत होतो. नागपूरचे उन्हाळ्याचे दिवस. कडक उन्हाळा पण कुलरमध्ये आम्हाला दोघीनाही घुस्मटल्यासारखं व्हायचं, म्हणून चक्क खिडक्या उघड्या ठेऊन आम्ही पंखे लावून बसायचो.

ज्ञानेश्वर महाराज पहिल्याच अध्यायात  सांगतात,’ अध्यात्म शिकायला पाहिजे ते ‘चकोर तलग्यासारखं’ – चकोराच्या पिल्लासारखं!  त्याप्रमाणे हळूवार मन करून ही कथा ऐका. चांदणं पिऊन जगणारा हळूवार चाकोर, त्याची पिल्लं – म्हणजे किती नाजूक कल्पना.  हळूवारपणाच्या या व्याख्येनेच वाचतावाचत्ता आम्ही मुग्ध झालो. क्षणभर स्तब्ध होऊन बाहेर पहात होतो. रस्त्यावर शुकशुकाट होता. काम्पौडच्या बाहेर एक बाई होती. नऊवारी पातळाचा पदर डोक्यावरून घेतलेला. डोक्यावर पाटयाचा दगड, हातात अवजारांची पिशवी, पायात टायरच्या रबराच्या केलेल्या चपला. उन्हाने दमलेली होती. घामाघूम झाली होती. बाहेरच्या झाडाखाली ती थांबली. डोक्यावरचा पाटा खाली ठेवला. पदराने घाम पुसत व त्यानेच वारा घेत ती उभी होती. रस्त्यावरच्या त्या झाडाजवळ बसायला जागा नव्हती. ती तशीच उभी राहिली.

सुमती पटकन उठली, बाहेर जाऊन त्या बाईला घरात बोलावून आणलं.

बाई व्हरांड्यात आली. उन्हातून आल्यावर नुसतं पाणी पिऊ नये म्हणून सुमतीने तिला गुळ आणि पाणी दिलं. बाई खुश झाली. ‘बाई, केव्हढ उन्ह आहे बाहेर…’ बाईच्या रापलेल्या चेहऱ्याकडे आणि घट्टे पडलेल्या हातांकडे पहात सुमती म्हणाली. बाईचं जळून गेलेले नाजूकपण ती न्याहळत होती. छिन्नी हतोडा घेऊन दिवसभर काम करणारी ही बाई ,वयाने फार नसावी, पण उन्हाने का परीस्थीतीने वाळली होती. पाटा फार घासला की त्याला पुन्हा ठोके पाडून घेतात ते  ‘पाटे टाकवण्याच’ काम ती करीत होती.

‘किती घेता पाटयाचे?’

‘दोन रुपये?’

‘अशी किती कामं मिळतात दिवसाची तुम्हाला?‘

‘दहा मिळाले तर डोक्याहून पानी’ ती

‘नवरा आहे?’

‘नाही, सोडचिट्ठी दिली त्याने, दुसरा पाट बी मांडला.’ किती सहज ती ‘डिव्होर्स’ बद्दल बोलत होती? उन्हात रापता रापता हिच्या संवेदनाही रापल्या असतील का?

‘मुलं आहेत?’ सुमती

‘दोन हायेत.’ ती

‘शाळेत जातात?’

‘कधी मधी! पाऊस झाला अन् शेण गोळा कराया न्हाई गेले तर सालेत जातात. कारप-रेशनच्या’

२० रुपये रोजात दोन मुलं आणि ही बाई रहातात. त्यासाठी ही बाई दिवसभर उन्हात हिंडते. मुलं जमलं तर जातात शाळेत. नवरा नाही. किती अवघड आयुष्य!

सुमतीच्या डोळ्यात पाणी आलं. ‘ऐसे हळूवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल…’ चा मला साक्षात्कार होत होता. सुमतीची सहृदयता मला माहीत होती. घरची मोलकरीण, पोळयावाली, धोबी हे सगळे जणूकाय तिचे ‘कुटुंबिय’च होते. पण ही कोण कुठली बाई, तिच्या कष्टांचाही सुमतीला ताप होत होता. ‘केळीचे सुकले बाग असुनिया पाणी’ तशी इतरांच्या दु:खात ही कोमेजते.

‘पन्ह घ्याल?’ सुमतीने तिला विचारलं.

‘नाही बाई, काम शोधाया पाहिजे. ‘येर’(वेळ) घालवून कसं व्हईल?’

‘एक मिनिट थांबा, माझा पाटा टाकवून द्या’ सुमतीने आतून पाटा आणला. तिच्यासाठी काम काढलं. त्याचे २ रुपये झाले. सुमतीने तिला पाच रुपये दिले

‘नको बाई, कामाचे पैशे द्या फक्त.’ ती म्हणाली. बाईच्या स्वाभिमानाचं कौतुक वाटलं.

‘बर, थांबा एक मिनिट’ आणखी काम द्यायचं, म्हणून सुमतीने आतून वरवंटा आणला.

‘याला टाकवा.’ तिने वरवंटा पुढे केला.

बाईने तो वरवंटा चटकन जवळ घेतला. छातिशी घट्ट धरला. आणि म्हणाली, ‘’लेकरू आहे ते! त्याला टाकवत नाही.’’ जणू काय एखाद्या बाळाला गोंजारावं तशी ती त्याला गोंजारत होती. बारशाच्या वेळी गोप्या म्हणून वरवंटा ठेवतात, तो संदर्भ! अशा ‘लेकराला’ छिन्नी हातोड्याचे घाव घालायचे या कल्पनेनेच तिच्या अंगावर शहारे आले होते. अक्षरशः दगड फोडण्याचे काम करणारी ही बाई- हळूवारपणे गोप्याला गोंजारत होती. त्या दगडाकडे मायेनं पहात होती. जसं काही झाल्या प्रकाराबद्दल त्याची माफी मागत होती. नमस्कार करावा तसा तो वरवंटा तिने डोक्याला लावला व नंतर परत दिला.

‘ऐसे हळूवारपण जरी येईल’ … चकोरतलग्याचं हळूवारपण त्या दोघींच्या रुपाने माझ्यापुढे जिवंत उभं होतं.

– अग्रेषित.

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्यदिनानिमित्त लेख – वृत्तपत्र स्वातंत्र्य … ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

? विविधा ? 

☆ जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्यदिनानिमित्त लेख – वृत्तपत्र स्वातंत्र्य … ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆ 

भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. भारतीय संविधान हे एक श्रेष्ठ संविधान आहे. या संविधानानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला आचार, विचार, संचार यांचे स्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य,भाषा स्वातंत्र्य वगैरे वेगवेगळ्या प्रकारची स्वातंत्र्ये मिळाली आहेत. तो आता प्रत्येकाचा हक्क झाला आहे.

त्यात लेखन स्वातंत्र्यामध्ये वृत्तपत्रातील लेखन हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. कारण देशातील सर्वच भागात वृत्तसेवा सुरू आहे. सगळीकडे वृत्तपत्रे प्रकाशित होतात. ती देशात तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे त्या त्या वृत्तपत्रातील विचारही तिथे पोहोचतात. वृत्तपत्रे हा भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. त्यासाठी वृत्तपत्रात लेखन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आवश्यक आहे.

पण हे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे!  हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यावरही कायद्याची काही बंधने आहेत. तसे वृत्तपत्र स्वातंत्र्याचे रक्षण आणि नियंत्रण करणारे कायदे संविधानात अस्तित्वात आहेत. शिवाय बंधने घालणारे कायदेही आहेत. प्रत्येक व्यक्तीला ते लागू आहेत.

वृत्तपत्रे छापणे व वितरित करणे हा केवळ धंदा नाही तर ते लोकांपर्यंत व्यवस्थितपणे विचार पोहोचविणे ,त्यांचे विचार जाणून घेणे यांचे एक उत्तम माध्यम आहे.त्यासाठीही कायद्याने संरक्षण आहे पण त्याचा अनिर्बंध वापर गेल्या काही वर्षांपासून होत आहे.

छापलेली वृत्तपत्रे लोकांपर्यंत वितरित करण्याचा ही वृत्तपत्र काढणाऱ्या लोकांना हक्क आहे. तरीही न्यायालयाचा अवमान होईल,कुणाची अब्रूनुकसानी होईल,असे काहीही करण्यास पुरता मज्जाव आहे.अश्लीलता विरोध,गोपनीयता हे सरकारचे तसेच लोकांचे अधिकार आहेत.त्याविरूद्ध आक्षेपार्ह मजकूर छापणे हा कायद्याने गुन्हा ठरू शकतो.

आणीबाणी जाहीर झाली होती तेव्हा एकदा सारी बंधने झुगारून देऊन वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आली होती. आता सुद्धा काही राजकारण्याचा हस्तक्षेप म्हणा किंवा वरदहस्त म्हणा या काही वृत्तपत्रांना मिळालेला आहे.  त्या काही वृत्तपत्रांमधून अगदीच एकतर्फी बातम्या छापल्या जातात. हे अत्यंत चुकीचे आहे. असे न करता वृत्तपत्रांनी सर्वच प्रकारच्या विचारांना प्राधान्य दिले पाहिजे.

लोकशाहीचा चौथा महत्वाचा हा स्तंभ या दृष्टीने त्यांनी हक्कांबरोबर कर्तव्याचेही पालन करायला हवे. कायदेशीर बंधने पाळलीच पाहिजेत.

बाकी वृत्तपत्रांचा खप वाढविण्यासाठी समाजाचा कल पाहून ती छापली गेली पाहिजेत.  तिथे निरपेक्षपणा अपेक्षित आहे.

त्यानुसार वृत्तपत्रे छापणे, वितरण करणे, आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवणे हे भारतीय लोकशाही मध्ये कायद्याने दिलेले स्वातंत्र्य आहे. ते गैर मार्गाने वापरले जाऊ नये आणि विपरीत गोष्टी पसरविण्यासाठी उपयोगात येऊ नये.हीच इच्छा !!

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 15 – पारतंत्र्य आणि धर्म ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 15 – पारतंत्र्य आणि धर्म ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

नरेंद्रनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले तो काळ १८८० ते १८८४ च होता. त्यावेळी भारत वेगळ्याच परिस्थितीतून जात होता. सभोवताली अनेक घटना घडत होत्या. चळवळी चालू होत्या. बंगाल मद्रास आणि महाराष्ट्रात राजकीय जागृती होत होती. इंग्रजांनी याचा फायदा घेत आपली राजकीय पकड आपल्या देशावर घट्ट बसवली .त्यांना राजसत्ता मिळाली आणि आपल्याला गुलामगिरी वाट्याला आली होती. या सर्व घडामोडी नरेंद्र च्या संवेदनशील मनाने पाहिल्या होत्या. पण आपल्यावर राज्य करणारे परकीय आहेत याची खंत फक्त मोजक्या सुशिक्षित वर्गालाच होती. हे लोक बुद्धिजीवी होते. लढवय्ये नव्हते. जे खरे देशभक्त होते त्यांना या गुलामगिरीची जाणीव झाली आणि विचार पुढे आला की, आपल्या समाजातली दुर्बलता नष्ट झाली पाहिजे, ते करायचे असेल तर, नव्या पिढीला बलोपासना करून शरीर सुदृढ करायला प्रवृत्त केले पाहिजे. तो मार्ग होता व्यायामाचा .त्यामुळे यासाठी ठिकठिकाणी आखाडे आणि व्यायामशाळा निर्माण झाल्या होत्या. व्यायाम करून शरीर कमावणे हा एक देशभक्तीचा मार्ग आहे असे पुढारी लोकांना वाटत होते.

ते तरुणांना सामर्थ्यसंपन्न होण्याचा संदेश देत होते. याचा परिणाम नरेंद्रवरही झाला. तो पण आखाड्यात जाऊ लागला होता. याच सुमारास हिंदुत्ववादी दृष्टीकोण बाळसे धरत होता. आपण आपल्या धर्माची जाण ठेवली पाहिजे अशा विचाराने नरेंद्र प्रेरित झाला होता. तो वेगवेगळ्या व्यायाम शाळेत, हिंदू महामेळ्यात, आणि व्यक्तींकडे जात असे. या देशाच्या आजवरच्या संस्कृतीचा शिल्पकार असलेला, आणि भविष्याला आकार देऊ पाहणारा समाज केवळ हिंदूंचाच होता. त्यांच्या कार्यक्रमालाही नरेंद्र जाऊ लागला. पण या सुमारास भारतात धर्माची अवस्था अत्यंत शोचनीय, काळजी करण्यासारखी झाली होती. धर्माच्या नावाखाली कितीतरी गोष्टी उघडपणे चालत असत. कशाचेही ज्ञान नाही. संत- सत्पुरुषांच्या शिकवणुकीचा संबंध नाही. बंगालची तर अवस्था इतर  प्रांतांपेक्षा अजूनच वाईट होती. याचे मुख्य कारण होते की दुर्गा आणि काली देवतांच्या उपासने मध्ये पशुहिंसा व्हायची. महत्वाच्या उत्सवांच्या वेळी शेकडो पशुचा बळी दिला जायचा. त्यात सर्व लोक सामील व्हायचे. आनंद साजरा करायचे. आपण खूप पुण्ण्याचे काम करत आहोत असे त्यांना वाटायचे.

याचा सार्वजनिक सामाजिक आविष्कार होता तो म्हणजे, सणाच्या वेळी गटागटाने किंवा मिरवणूक काढून रस्त्यावरून जाताना अत्यंत ओंगळवाणं, बीभत्स, अश्लील अशी गाणी म्हणणे, त्यात प्रतिष्ठित थोरा मोठ्यांनी सहभागी होणे व्हायचे. आपल्या वागण्याचा लहान कोवळ्या वयाच्या मुलांवर काय परिणाम होईल याचा विचार पण त्यांच्या मनात यायचा नाही. धर्माच्या क्षेत्रात अज्ञान आणि ही विकृती नरेन्द्रने स्वतच्या डोळ्याने पाहिली. या सर्व पार्श्वभूमीचा परिणाम त्याच्या तरुण मनावर होणारच होता. या वेळी राज्यकर्ते महाविद्यालयात बायबल ची शिकवण देऊ लागले. मिशनरी ख्रिस्ती धर्माचा प्रसार करू लागले. आणि रस्त्यारस्त्यात हिंदू धर्माची नालस्ती आणि देवदेवतांची टिंगल करत फिरू लागले. त्याउलट हिंदू चे उज्ज्वल असे तत्वज्ञान सांगणारे ग्रंथ तरुणांच्या डोळ्यासमोर सुद्धा पडत नसत. त्यांना आपल्या ग्रंथांचा साधा परिचयही नव्हता होत.नरेंद्रला मात्र लहानपणीच धार्मिक कथा, धार्मिक ग्रंथांचा, कथांचा आई आणि वडिलाकडून परिचय झाला होता.    

आपल्याकडेही आज अशी विकृती आपल्या सण-उत्सवात पाहायला मिळते, आपलंच राज्य असूनसुद्धा. नुसतं गणेश विसर्जन मिरवणूक डोळ्यासमोर आणा. आठवा काय काय पाहायला मिळतं त्यात? आज तर आपण पारतंत्र्यात नाही, कुणाचं आपल्यावर राज्य नाही, आपला धर्म आपल्या हातात आहे. आपल्याला योग्य दिशा दाखवणारे आपणच आहोत. त्या काळात आपला धर्म टाकाऊ आहे आणि पाश्चात्य संस्कृती चांगली आहे असेच लोकांना वाटू लागले होते. नरेन्द्रने या बिघडलेल्या परिस्थितीचा विचार करतच पुढील मार्गक्रमण आखले होते. सामाजिक सुधारणा करण्यासाठीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते.

आताही आजच्या पिढीला आपले वेद, उपनिषदे, धार्मिक ग्रंथ आणि शिकवणूक याची कल्पना नाहीच. वाचन नाही. संस्कार नाहीत. विचारांना दिशा नाही. योग्य अयोग्य काय याचं योग्य दिशादर्शन नाही त्यामुळे मन भरकटतय . पाश्चात्य संस्कृती बरोबर वाटते. आजच्या तरुणांनी आपली संस्कृती कशी आहे याचा अभ्यास नक्कीच केला पाहिजे.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जागतिक हास्य दिन – विनोद आणि आपण ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा 😅

🤣 जागतिक हास्य दिन 🤡 विनोद आणि आपण !🤡 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

‘टवाळा आवडे विनोद’ हे विनोदाच्या बाबतीत खुद्द रामदास स्वामींनी साधारण सतराव्या शतकातच म्हणून ठेवले आहे, हे आपल्याला ज्ञात असेलच ! आणि जर ते तसं ज्ञात नसेल, तर आपला विनोदाचा पाया अजून कच्चा आहे, असं मी छातीठोकपणे म्हणू शकतो ! अर्थात जेव्हा त्यांच्या लेखणीतून हे वचन उतरले तो काळ, सामाजिक परिस्थिती आणि तेंव्हाची त्यांनी केलेली टवाळाची व्याख्या ही त्याच काळाला लागू होती, ह्या माझ्या वेगळ्याच संशोधनाशी आपण नक्कीच सहमत व्हाल !

मी असे म्हणतो आहे त्याचे कारण हे आहे, की टवाळ हा शब्द आजकाल कोणी वापरताना दिसतच नाही ! किंबहुना हा शब्द आताच्या काळी अस्तंगत झाल्यातच जमा आहे ! आत्ताचे जे काही विनोद आपण ऐकतो, बघतो अथवा एकमेकांस सांगतो, त्यांची जर पातळी बघीतली तर, टवाळ हा शब्द त्याच्या पुढे फार म्हणजे फारच मवाळ ठरावा !

विनोदाला एक पातळी असावी, तो कुठे, कधी, कोणा समोर आणि कसा सादर करावा हे एक शास्त्र आहे !  हे माझ्या प्रमाणे अनेकांचे मत असले, तरी या मता बद्दल दुमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.  तर अशा त्या हट्टी लोकांचा असा दावा असतो, की विनोद हा विनोद असतो, त्याला कसली आलीयं पातळी ? विनोदाला पातळीचे परिमाण लावून कसे चालेल ? मग त्यात गंमत ती काय ? वगैरे वगैरे. असो. ज्याला त्याला त्याची पातळी लखलाभ ! आपण उगाच कशाला आपली पातळी सोडून त्यांच्या सारखे खालच्या पातळीवर जा ?

फार पूर्वी कुठे तरी पुसटसे वाचल्याचे आठवतंय, की अलम दुनियेत कित्येक शतकांपूर्वी, म्हणजे मानवाला लिहिता वाचता यायला लागल्यावर, फक्त सतरा विनोद त्यांच्या मूळ स्वरूपात अस्तित्वात होते, एकमेकास सांगितले जात होते !  त्या नंतर जस जशी मानवाची विनोदबुद्धी बहरत गेली, फुलत गेली तसं तशी प्रत्येकाने आपापल्या परिने त्यात भर घातली अँड रेस्ट इज द हिस्टरी ! माझ्या विनोदाचा प्रकाश फार दूरवर पोहोचत नसल्यामुळे, या माझ्या वाचिक माहितीवर विनोदाचे जाणकारच जास्त प्रकाश टाकू शकतील !

टीव्हीवर सध्या ‘ईनोदी’ म्हणून ज्याचा गाजावाजा केला जातो अशा अनेक कार्यक्रमांनी, मालिकांनी नुसतं धुमशान घातले आहे ! डॉक्टरकी चालत नसल्याने, आपल्या एकट्याच्याच जीवावर एखादे चॅनल चालते, अशी ‘हवा’ ज्याच्या डोक्यात गेली आहे, त्याचा प्रोग्रॅम जरी चालू असला, तरी मी चॅनेल बदलतो आणि चक्क बातम्या बघणे पसंत करतो ! त्यात बातम्या देणाऱ्याची बातमी सांगण्याची पद्धत, बोलतांना कानावर पडणारे त्यांचे किंवा तिचे शुद्ध उच्चार किंवा स्क्रीनवरच शुद्ध मराठी वाचून माझी जास्त चांगली निखळ करमणूक होते ! हॊ, उगाच खोटं कशाला बोला !

विनोद आणि माणूस यांचे एक अतूट नातं आहे !

आपल्याला वरचं वाक्य थोडं खटकलं का ? तुमचं बरोबर आहे, नेहमी आपल्याला विनोद आणि मराठी माणूस यांचे एक अतूट नाते आहे, असे वाचण्याची सवय झाली आहे ! त्यात मी थोडा बदल केला इतकच !  कारण सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा विनोदबुद्धी असतेच असते, फक्त एखादा विनोद आकलन करायची कुवत कमी जास्त असल्यामुळे, त्याला एखादा विनोद कळण्यास वेळ लागतो, त्यामुळे त्याची हसण्याची प्रतिक्रीया त्याच्या आकलनशक्ती प्रमाणे उशिरा किंवा अजिबातच येत नाही ! याचा अनुभव आपण कधीतरी घेतला असेलच, बघा आठवून !

आपल्या मराठीत अनेकानेक दिग्गज विनोदी लेखक होऊन गेले, पण विनोद आणि पु.ल. आणि पु.ल. म्हणजेच विनोद, हे समीकरण माझ्या पिढीच्या एव्हढे डोक्यात गेले आहे, की ती जागा माझ्या मते, दुसऱ्या कोणास घेण्यासाठी किती काळ जावा लागेल, हे सांगणे कठीणच आहे ! पु.लंचे विनोदी लिखाण हे खरोखरच अजरामर आहे आणि हल्लीची काही तरुण मंडळीसुद्धा त्यांच्या लिखाणाच्या प्रेमात पडली आहेत, पडत आहेत हे पाहून पु.लं. बद्दलचे आमच्या पिढीचे प्रेम सार्थकी लागले असंच म्हणावंसं वाटतं !

कुठल्याही मानसिक दुःखावर एखादी विनोदी कथा, कविता वाचणे, ऐकणे या सारखा रामबाण ऊपाय नाही, अस हल्लीच वैद्यक शास्त्र सुद्धा सांगत ! इतका विनोदाचा सकारात्मक परिणाम माणसाच्या मनावर होतो ही निखळ विनोदाची जादूच म्हणायची !

आज काल प्रत्येकालाच रोज कुठल्या ना कुठल्या विवंचना भेडसावत असतात, त्यामुळे सकारत्मक विचार करणारी माणसे रोजच्या जीवनात  वावरतांना, घडणाऱ्या प्रत्येक घटनेत विनोद शोधात असतात !  अशा लोकांच्या बाबतीत इतर सामान्य लोक त्याला, “याला कुठल्याच गोष्टीचे गांभिर्य नाही, हा सगळ्या गोष्टी हसण्यावारीच नेतो” असे म्हणून नावं ठेवत असतात ! पण माझ्या मते अशा तऱ्हेने जगणारे लोकच, वरकरणी तरी इतरांना  कायम आनंदी अथवा सुखी वाटतात, हीच तर खरी अशा लोकांच्या स्वभावातली मेख आहे !

आपणा सर्वांना सुद्धा असाच विनोदाचा सुंदर नजरिया, आपल्या रोजच्या जीवनात लाभो आणि आपले उर्वरीत आयुष्य सुद्धा हसत खेळत व्यतीत होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो !

© प्रमोद वामन वर्तक

०१-०५-२०२२

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिनाअखेरचे पान – 4 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिनाअखेरचे पान – 4 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

बघता बघता नवीन वर्षाचा एक महिना संपत आला. हो, एप्रिल महिना संपत आला. आता म्हणाल, “मग नवीन वर्ष कसं?”

एप्रिल महिना हा काही इंग्रजी वर्षाचा पहिला महिना नाही. भारतीय कालगणनेनुसार चैत्र महिना हा वर्षाचा पहिला महिना असतो. चैत्र महिना हा एप्रिल च्या बरोबरीनेच सुरू होतो. दोन वेगळ्या कालगणना पद्धतीमुळे  थोडाफार फरक पडतो. पण चैत्र शुद्ध प्रतिपदेला हिंदु वर्षं सुरू होते ते याच महिन्यात. म्हणून नववर्षाचा एक महिना संपत आला असे म्हणणे फारसे चूक ठरत नाही. या पारंपारिकते बरोबर आधुनिक विचारानेही  हा नववर्षाचा पहिला महिना ठरतो. एप्रिल महिन्यापासून आपले नवे आर्थिक वर्ष सुरू होते. त्याचा हा पहिला महिनाच ना ? या आर्थिक नववर्षालाही विसरून चालणार नाही.

तसा हा एप्रिल महिना, वातावरण हळूहळू तापवत नेणारा असला तरी या महिन्यात येणार्या विविध कार्यक्रमांमुळे तो सुसह्य होतो. याच महिन्याची सुरवात विजयाचे प्रतीक असणार्या गुढीपाडव्याने होते. रामनवमी, दासनवमी, हनुमान जयंती, तुकडोजीमहाराज जयंती, महावीर जयंती हे सर्व या चैत्र महिन्यात येणारे दिवस. म. फुले जयंती आणि डाॅ. आंबेडकर जयंतीचा ही हा महिना. तर शिवछत्रपतींची पुण्यतिथीही याच चैत्र महिन्यात असते. गुडफ्रायडे हा प्रभू येशूच्या स्मरणाचा दिवस येतो तो याच एप्रिल महिन्यात.

राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही या महिन्याचे महत्व  आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारी भारताची मध्यवर्ती बॅंक म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक(RBI) 1935 साली एक एप्रिलला स्थापन झाली. शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 05/04/1919 ला एस्. एस्. लाॅयल्टी हे वाफेवर चालणारे भारताचे स्वतःचे जहाज मुंबईहून इंग्लंडला रवाना झाले. त्या स्मृतीप्रित्यर्थ 5एप्रिल हा दिवस राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा केला जातो. 07 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य समस्या व विचार करण्यासाठी 07/04/1948ला जागतिक आरोग्य संमेलन भरवण्यात आले. तेव्हाच जागतिक आरोग्य संघटनेची(WHO)स्थापना झाली व 1950 पासून हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. 15 एप्रिल हा जागतिक कला दिवस, सर्व कलांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा होतो. 21एप्रिल हा भारतीय नागरी सेवा दिन आहे. याच दिवशी 1947 साली त्यावेळचे गृहमंत्री सरदार पटेल यांनी नागरी सेवकांना संबोधित केले होते. पर्यावरण विषयक कार्यक्रमांना पाठबळ देण्यासाठी

1970 पासून 22 एप्रिल हा दिवस जागतिक  वसुंधरा दिन म्हणून पाळला जातो. 23 एप्रिल हा विल्यम शेक्सपियरचा स्मृतीदिन   आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. 24एप्रिलला भारतीय पंचायत राज दिन 2010पासून साजरा होतो. मलेरिया आजाराविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने

25एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो. बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन-जाॅर्जेस नोव्हेर यांचा जन्मदिवस 29 एप्रिल. नृत्यकलेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी हा दिवस जागतिक नृत्य दिन या नावाने ओळखला जातो.

म्हणजे या एप्रिल महिन्याचे धार्मिक, पारंपारिक, सामाजिक, वैज्ञानिकदृष्ट्या व साहित्यदृष्ट्या महत्व आहे, वेगळेपणआहे. परंपरा, पर्यावरण, पुस्तक, कला अशा विविध प्रवाहांना एकत्र आणणारा हा एप्रिल महिना!

शिवाय वर उल्लेख केल्याप्रमाणे एप्रिल हा आर्थिक वर्षाचा पहिला महिना हे ही विसरून चालणार नाही. याच महिन्यात एका वर्षाचे आर्थिक नियोजन करावे लागते. हे एका वर्षाचे आर्थिक नियोजन आपले जीवन समृद्ध करू शकते. कारण एकदा संचय करण्याची सवय लागली की ती आयुष्यभर उपयुक्त ठरते. पूर्वजांनी म्हटलेच आहे, ‘संचयात् समृद्ध जीवनम्’. अर्थात धनसंचयाच्या वृत्तीमुळे जीवन समृद्ध होते. त्यामुळे ही सवय जितक्या कमी वयात लावून घेता येईल तितके चांगले. आपली मिळकत कितीही असो, आर्थिक नियोजन प्रत्येकाने केलेच पाहिजे. या वर्षी मी काय काय खरेदी करणार या बरोबरच मी किती बचत आणि गुंतवणूक करणार हे ठरवून त्याप्रमाणे वागले पाहिजे. बचत आणि गुंतवणूक यातील फरक समजून घेतला पाहिजे. आर्थिक नियोजन हे आपल्या कुटुंबासाठी व पर्यायाने समाजासाठी हितकारकच आहे. आर्थिक संकट पेलण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे रहाण्याची तयारी सतत केली पाहिजे. हा एक नवा संस्कारच आहे असे समजून अशी सवय लावून घ्यायला काय हरकत आहे?तरच खर्या अर्थाने आनंदाची भक्कम गुढी उभारता येईल.

आणि हे सगळं अगदी खरं खरं आहे बर का ! एप्रिल फूल आजिबात नाही .

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – विविधा ☆ शब्द शब्द जपून बोल ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा  ?

☆ शब्द शब्द जपून बोल ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

आम्ही आठ-दहा मैत्रिणी महिन्यातून एकदा एकी-एकीकडे जमतो. गप्पा-गोष्टी, काही नवीन पाहिलेलं-ऐकलेलं एकमेकींना सांगतो. अधूनमधून सामाजकारण, राजकारण, साहित्य. संस्कृती, पर्यावरण आदी क्षेत्रांचाही फेरफटका होतो. दोन-तीन तास मजेत जातात.

आम्ही आशा तर्हेैने एकत्र येऊन गप्पाटप्पा करतो, त्याला आमची`मीटिंग’ म्हणतो. आमचे नवरे आमचं `इटिंग’ म्हणतात. `तुमचा इटिंग डे’ कधी आहे?’ अशी घरात विचारणा होते. त्यांचंही खोटं नसतं. आमची मीटिंग, म्हणजे  आमचं एकत्र येणं, कुठल्याही कामाबाबत गंभीर चर्चा, नियोजन, निर्णय घेणं, या गोष्टी काही त्यात नसतात. `इटिंग’ मात्र नक्कीच असतं. त्या निमित्ताने एकेकीला आपण किती सुगरण आहोत, हे दाखवण्याची संधी मिळते. बाकीच्यांनी केलेल्या कौतुकाने ती खूशअसते. छान छान पदार्थ आयते खायला मिळाल्याने बाकीच्याही खूश असतात. मुख्य म्हणजे नंतरची आवरा-आवरी, भांड्यांची विसळा-विसळी हे काही नसतं. त्यामुळे निवांतपणे आणि मन:पूर्वक आस्वाद घेतला जातो पदार्थांचा. तेव्हा नावार्यांकचं `इटिंग डे’ म्हणणं अगदीच काही चुकीचं नसतं.

सख्यांनो, आपण सगळ्याच जणी कुठल्या ना कुठल्या व्यापात सतत गुंतलेल्या असतो. महिन्यातून असा एखादा दिवस आनंदात, मजेत घालवला की रोजच्या चाकोरीतून चालायला नवा जोम येतो. पाडगावकरांनी एका कवितेत लिहिलय, `कसंजगायचं? हसत खेळत की रडत कुढत… ते ज्याचं त्यानं ठरवायचं.’ आम्ही ठरवलय, हसत खेळत, मजेत- आनंदात जगायचं.

सख्यांनो, कधी कधी मात्र असं होतं, या आनंदाच्या डोहात, एखाद दुसरा मातीचा खडा पडतो आणि आनंद तरंग डहुळतात. पाणी गढूळ होतं. कुणाचं वागणं-बोलणं, त्या मजेला  खार लावून जातं. हे सारं मुद्दाम कुणी करतं, असंही नाही. अभावितपणे ते घडतं. कुणाला दु:ख द्यावं, हिरमुसलं करावं,  असा हेतू नसतो. अजाणतेपणे केलेल्या टीका-टिप्पणीने दुसरा दुखावून जातो.

मागच्याच आठवड्यातील गोष्ट. आमची मीटिंग होती सुजाताकडे. तिथे येताना रेखा एक नवी पर्स घेऊन आली. `ऐय्या… कित्ती छान!’ झालं आणि बोलणं किमतीवर घसरलं.` दोनशे रुपये’ रेखा म्हणाली. `मस्तचाय ग! आणि अगदी रिझनेबल! कुठे सांगलीत घेतलीस?’

`नाही ग! गेल्या महिन्यात बंगलोरला गेले होते ना, तिथे घेतली.’

`तरीचइतकी स्वस्थ आणि मस्त… सांगलीत काही तीनशेच्या खाली मिळाली नसती.’

नीलाला आता अगदी रहावलं नाही. `अशा पर्सेस दिल्लीला शंभर शंभर रुपयाला मिळतात. गेल्या वर्षी आम्ही गेलो होतो, तर चार-पाच पर्सेस आणल्या. दोनशेलाच म्हणत होता आधी. खूप बारगॅनिंग करावं लागलं, तेव्हा कबूल झाला. शंभर रुपयाला द्यायला. शिवाय रेक्झीनही इतकं चांगलंआहे. नीला आपला मुद्दा सोडायला तयार नव्हती. नाही म्हंटलं तरी रेखाचा मूड गेलाच. तशी अर्चना म्हणाली, `लंकेत सोन्याच्या विटा … उपयोग काय? आपल्याकडे असेल ते खरं!’

सुनीता जरा जास्तच फटकळ. म्हणाली, `एवढ्या स्वस्त होत्या पर्सेस, तर आमच्या सगळ्यांसाठी नाही का आणायच्यास? आम्ही दिले असते शंभर शंभर रुपये.’ नीलानं नाक उडवलं, पण रेखाला थोडं बरं वाटलं.

सुनीताला हे चांगलंजमतं. केव्हा, कुठे, काय कसं बोलावं, वातावरणातला ताण कमी कसा करावा, हे तिच्याकडून शिकावं.

कुणीम्हणालं, अडीचशेला साडी घेतली’, तर ती म्हणेल, `तुला बरी बाई अशी खरेदी जमते. मला साडे तीनशेला पडली अशी साडी. यापुढे खरेदीला जाताना तुलाच घेऊन जाईन.’ सांगणारी खूश आपल्या व्यवहार चातुर्यावर.  सुनीता हे सांगताना पुष्कळदा खरेदीच्या किंमतीबद्दल खोटंही बोलते. मला ते माहीत असतं, पण त्या छोट्या छोट्या खोट्यातून काही आनंदाचे क्षण ती दुसर्याआच्या ओंजळीत टाकते. दैनंदिन जीवनात अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी, आपल्याला छोटी-मोठीसुखं… आनंद मिळवून देत असतात, किंवा मग दु:ख देतात, उदासीन करतात. वैषम्य वाढवतात. म्हणूनच आपण आपल्याकडून, आपल्या वागण्या –बोलण्यातून दुसर्यां ना आनंद देता येईल ना हे पाहिले पाहिजे. त्यासाठी अट्टाहासाने वेगळं काही करायची गरज नाही. दुसर्यां च्या आनंदात सहभागी होता आलं, चार-दोन शब्दांनी तो व्यक्त करता आला, तरी पुरे, पण मुकाट न बसता तो व्यक्त मात्र करायला हवा. व्यक्ती-व्यक्तीच्या माध्यमातून तो द्विगुणित, त्रिगुणित, शतगुणित व्हायला हवा.

एकदा सांगलीतील शांतिनिकेतनच्या मैदानावर आम्ही काही मैत्रिणी फिरायला गेलो होतो. मैदानाच्याकडेला असलेली गुलमोहराची दहा-बारा झाडे लाल-केशरी फुलांनी ओसंडून गेली होती. मी उत्स्फूर्तपणेम्हंटल`बघा, ‘गुलमोहराची झाडे कशी मशाली पेटवल्यासारखी दिसताहेत. ‘

निशा म्हणाली, ‘हे कायबघतेस? मधुबनी पार्कमध्ये गेटपासून कारंजापर्यंत दुतर्फा असे गुलमोहर उभे आहेत. आपण त्यांच्या कमानीतूनच चालतो, असं वाटतं!’ आता मधुबनी पार्कमधल्या गुलमोहराच्या फांद्यांनी केलेल्या फूलवंती कमानीतूनही जाता आलं नाही, तर काय समोर फुललेल्या या गुलमोहराचा आनंद घेऊ नये? पण आमच्या निशाला अशी सवयच आहे, काही दाखवा, ऐकवा, सांगा, तिची त्यावर प्रतिक्रिया अशी, `अग, हे काय पाहतेस, किंवा ऐकतेस, किंवा हे काय वाचतेस….’ तिने कधी तरी, कुठे तरी, पाहिलेलं दृश्य अगदी खास असं असतं, ऐकलेलं गाणं किंवा व्याख्यान अलौकिक असतं. वाचलेलं पुस्तक…. ‘आहाहा… काय सांगू त्याच्याबद्दल?’ असंअसतं. एखाद्या गोष्टीचा आनंद त्या त्या क्षणी तिला आपल्या चर्मचक्षूंनी घेताच येत नाही. त्या प्रत्येक वेळी, ती आपल्या मन:चक्षूंनी आपल्या स्मृतिकोशातला आनंदच कुरवाळत असते.

एखादं दृश्य पाहताना, एखादा अनुभव घेताना, पूर्वी तशा प्रकारचा घेतलेला अनुभव आठवणं स्वाभाविक असतं. त्यामुळे फारसं कही बिघडत नाही, पण आपणच काय त्या व्यवहार चतूर… अचूक निर्णय घेणार्या,, आपण पाहिलं, ते अद्वितीय, आपणवाचलं ते अलौकिक… आपली अभिरुची खास अशी.,. वेगळी… इतर पाहतात, ऐकतात, वाचतात, ते सामान्य, असे अहंतेचे पदर उलगडू  लागले, की त्यांचं बोलणं, वातावरणात कटुतेचं धुकं निर्माण करतं. आनंदाचा डोह ढवळून टाकतं.

या दुखर्यां जागा लक्षात ठेऊन, आपल्या शब्दांनी कुणाला दुखापत होणार नाही ना, याची आपल्याला काळजी घेता येईल ना?

© श्रीमती उज्ज्वला केळकर

मो. 9403310170,   e-id – [email protected]  

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! माझी भविष्यवाणी तुमच्या राशीला ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 माझी भविष्यवाणी तुमच्या राशीला ! 😅  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

मेष (मेंढा)

सध्या घरात जास्त काम कोण करत यावरून, एकाची जरी ही रास असेल, तरी दोघात टकरी संभवतात ! आणि दोघांची हीच रास असेल तर, त्या टकरीने दोघेही रक्त बंबाळ होई पर्यंत टोक गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही !

वृषभ (बैल)

एकाने दुसऱ्याच्या शिंगा पासून या आठवड्यात बचाव करायचा आहे ! उगाच आपापली शिंग एकात एक अडकवून, खडाखडीचा सामना टाळणे दोघांच्या हिताचे आहे एवढं लक्षात ठेवा !

मिथुन (जोडी)

एकमेकांच्या सहकार्यामुळे, घरातली काम हलकी होतं आहेत, असा तुमचा गैरसमज होण्याची शक्यता आहे !  पण जोडीदारापैकी ज्याची ही रास असेल तो अथवा ती, आपण केलेल्या कामांची कुठे तरी नोंद करून ठेवत असेल आणि योग्य वेळ येताच ती डायरी आपल्या जोडीदारासमोर धरेल याची खात्री बाळगा !

कर्क (खेकडा)

पंखा पुसायच्या निमित्ताने आपण स्टुलावर चढला असाल, तर काळजी घ्या ! जोडीदारापैकी ही ज्याची रास असेल तो अथवा ती, काहीतरी निमित्त करून “पाय” ओढून आपणास स्टुलावरून खाली पाडण्याची शक्यता नाकारता येत नाही !

सिंह (सिंह)

जंगलात, (म्हातारा नसेल तर)  सिहं राजा असतो, एव्हढेच फक्त ध्यनात ठेवा ! त्यामुळे, स्वतःचा बचाव कसा करता येईल याकडे लक्ष देवून या आठवड्यात वागावे लागेल !

कन्या (मुलगी)

ज्या नवऱ्याची ही रास असेल,  त्याला या आठवड्यात, काय मुलीं सारखी हळू हळू काम चालली आहेत, असे बोल बायको कडून ऐकायला येण्याची शक्यता नाकारता येत नाही !

तूळ (तराजू)

नवरा बायकोने एकमेकांशी बोलतांना, तोलून मापून बोलण्यात शहाणपणा आहे हे ध्यनात ठेवावे ! नाहीतर त्याचे पर्यवसान, हातात तराजू आणि डोळयांवर पट्टी बांधलेल्या न्यायदेवतेच्या साक्षीने, दोघातील भांडणं सोडवण्या पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी काळजी घ्या !

वृश्चिक (विंचु)

आपल्याला नांगीरुपी जिभेवर या आठवड्यात ताबा ठेवून दुसऱ्याशी बोलायचे आहे हे ध्यानात ठेवा ! तरच निभाव लागेल !

धनू (धनुर्धारी)

आपल्या मुखाच्या भात्यातून सुटणाऱ्या वाग्बाणामुळे जोडीदार घायाळ झाल्यावर, चुकून बाण सुटला, अशी सारवासारव या आठवड्यात आपल्यावर करण्याची वेळ

येवू शकते !

मकर (मगर)

कामाच्या बोजामुळे म्हणा, अथवा अन्य काही कारणामुळे म्हणा, आपल्या डोळ्यातून येणारे अश्रू हे खरोखरचे आहेत आणि ते नक्राश्रू नाहीत, याची खात्री जोडीदारास करून द्यावी लागेल !

कुंभ (घडा)

सध्या आपली मानसिक स्थिती आपल्यावर आलेल्या एखाद्या प्रसंगामुळे विचलित होऊ शकते ! तसेच छोटया छोटया कारणावरून, दुसऱ्याचा पाणउतारा करून, त्याचा अहंकाररुपी घडा आपल्या हातून फुटणार नाही याची काळजी घेतलेली बरी !

मीन (मासा)

संसाररुपी सागरात दोघांनी एकत्र रहायचं असल्यामुळे, दोघांनी एकमेकांना पाण्यात पहायचे या आठवड्यात सोडून द्यावे लागेल !

© प्रमोद वामन वर्तक

२९-०४-२०२२

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ओंजळ… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ ओंजळ… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

दोन तळहात जोडून झालेला हा खोलगट भाग म्हणजे ओंजळ, एक हाताने जेव्हा काही स्वीकारता – घेता येत नाही तेंव्हा आपण ओंजळ वापरतो, लहानपणी इवल्याश्या हातात गोळ्या, चिंचोके, गोट्या, फुलं मावत नाही तेव्हा ओंजळ पुढे येते, न चुरगळता, न गळता अलवार ओंजळीत धरलेली फुले हात सुगंधी करून जातात. खरे प्रेम असेल तरच ओंजळीत प्राजक्त ताजा रहातो म्हणे !

तहानेने व्याकुळ झालेला जीव जेव्हा रानावनात भटकतो, तेव्हा झर्यातले, ओढ्यातले, विहिरीचे, नदीचे पाणी पिण्यासाठी ओंजळ पुढे येते थंडगार पाण्याने मन तृप्त होते.

शालेय जीवनात गोट्या घेण्यासाठी, शेंगा घेण्यासाठी ओंजळच उपयोगी पडते.ओंजळीत  बोरे, चिंचा  मावत नसतात.लपाछपी खेळताना ओंजळीत चेहरा लपवला जातो.लहानपणी गजगे बिट्ट्याचा डाव खेळताना ओंजळीचाच उपयोग होत असे.चिंचा झेलायला, फुले वेचायला, देवाला फुले वहायला ओंजळच उपयोगी पडते आणि हो! त्याची न तिची नजरानजर होताना…इश्श!…नकळत ओंजळीत चेहरा झाकला जातो.

कोणतीही वस्तू  दान देताना ओंजळीचा उपयोग होतो.

जी वस्तू आपण ओंजळीत धरतो तिच्या अस्तित्वाचा गन्ध ओंजळीला लागतो.पाण्याचे अर्ध्य दिलं तर ओंजळ ओली होते.फुले असली तर गन्ध लागतो,फुलपाखरांचे रंग अन वाळू असेल तर रेती !

दान देणाऱ्याची  ओंजळ तर ईश्वर कधीच रिकामी ठेवत नाही.भरलेली दानाची ओंजळ मनाची समृद्धी दाखवते अन ओंजळीत दुवा साठतो.आपल्या ओंजळीत आपण काय भरायचे हे आपली सद्सद्विवेक बुद्धीच ठरवते नाही का ??

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆  आनंददायी संप्रेरके – भाग – 2… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

 

?  विविधा ?

⭐ आनंददायी संप्रेरके – भाग – 2 … अनामिक ⭐  प्रस्तुती –  सौ.अस्मिता इनामदार ⭐

सेरोटोनिन

जेव्हा पण इतरांच्या आनंदासाठी किंवा फायद्यासाठी काही करतो तेव्हा सेरोटोनिन तयार होते.

जेव्हा आपण स्वार्था पलीकडे जाऊन निसर्गासाठी, समाजासाठी, इतर लोकांसाठी किंवा आप्तेष्टांसाठी काही कृती करतो तेव्हा सिरोटोनिन तयार होते. एवढेच नव्हे तर इंटरनेटवर अथवा सामाजिक जीवनात इतरांना उपयुक्त अशी माहिती पुरवणे किंवा अशा प्रकारचे लिखाण करणे यामुळे सुद्धा सिरोटोनिन तयार होते.

हे अशासाठी कारण आपण आपला बहुमूल्य वेळ इतरांना मदत करण्यासाठी खर्च करत असतो.

ऑक्सिटोसिन

हे तेव्हा तयार होते जेव्हा आपण कोणाशीही जवळीक साधतो, आपलेपणाने वागतो.

जेव्हा आपण आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला अलिंगन देतो तेव्हा ऑक्सिटोसिन तयार होते.

मुन्नाभाई सिनेमा मध्ये दाखवलेली जादू की झप्पी खरंच काम करते.

तसेच मैत्रीच्या भावनेने हात मिळवणे किंवा खांद्यावर हात ठेवणे यामुळे सुद्धा ऑक्सिटोसिन रिलीज होते.

तर मित्रांनो, खूपच सोपे आहे.

दररोज व्यायाम करून इंडॉर्फिंस मिळवा, छोट्या-मोठ्या पण अर्थपूर्ण अशा गोष्टी साध्य करून डोपामाइन मिळवा, इतरांना मदत करून सर्वांशी चांगले वागून बोलून सेरोटोनिन मिळवा आणि आप्तेष्टांना बिलगून ऑक्सिटोसिन मिळवा!

अशाप्रकारे तुम्ही आनंदी राहायला शिकलात, की तुम्हाला येणाऱ्या अडचणी किंवा आव्हानांना तुम्ही आत्मविश्‍वासाने सामोरे जाल.

आता आपल्याला समजले की उदास दिसणाऱ्या एखाद्या छोटुकल्याला किंवा चिमुरडीला आपण मिठीत घेण्याची गरज असते.

आपला आनंद दिवसागणिक वाढवत नेण्यासाठी…

१. कोणता तरी खेळ खेळण्याची सवय लावून घ्या आणि खेळाचा आनंद लुटा. – इंडॉर्फिन

२. आपल्या आजूबाजूच्या लोकांचे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कौतुक करा. कौतुक करण्याची संधी कधीच दवडू नका. – डोपामाइन

३. जे काही चांगले आपल्याकडे आहे ते इतरांनाही मिळावे यासाठी जमेल तितके प्रयत्न करा.- सेरोटोनिन

४. जवळच्या माणसांना विना संकोच आलिंगन द्यायला शिका. यातून मिळणारा आनंद हा वाटणाऱ्या संकोचापेक्षा किती तरी पटींनी अधिक असतो.- ऑक्सिटोसिन

आनंदी राहा, मस्त जगा!

– अनामिक

संग्राहिका : – अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆  आनंददायी संप्रेरके – भाग – 1… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

 

?  विविधा ?

⭐ आनंददायी संप्रेरके – भाग – 1 … अनामिक ⭐  प्रस्तुती –  सौ.अस्मिता इनामदार ⭐

आनंददायी संप्रेरके – चार संप्रेरके जी माणसाला आनंदी ठेवतात….

बागेत रोजच्याप्रमाणे सकाळी फिरायला गेलेले मी आणि माझी बायको एका बाकावर बसलेलो होतो. थोडावेळ निवांत गप्पा मारल्यानंतर ती म्हणाली की ती आयुष्यात आनंदी नाही आहे. माझा विश्वास बसेना कारण लौकिक दृष्ट्या तिच्याकडे सर्व काही उत्तम आहे. मी विचारले, “असे का वाटते तुला?”

“मला माहित नाही. सगळेजण म्हणतात की माझ्याकडे सर्व काही आहे पण मला आतून आनंदी वाटत नाही आहे.”

आता मी स्वतःला विचारू लागलो की खरच मी स्वतः आनंदी आहे का?

काही वेळानंतर मला माझा आतला आवाज सांगू लागला – नाही! मला सुद्धा आनंदी वाटत नव्हते.

माझ्यासाठी हा एक धक्का होता. मी त्या दिशेने विचार करण्यास सुरुवात केली, असे का वाटत आहे?

आता मी या गोष्टीचा शोध घेण्याचे ठरवले. काही लेख वाचले, तज्ञ व्यक्तींशी बोललो, पण काहीच मेळ बसत नव्हता. शेवटी माझ्या एका डॉक्टर मित्राने मला एक उत्तर दिले ज्यामुळे माझे समाधान झाले.

त्याने जे सांगितले ते मी अमलात आणले आणि आता मी म्हणू शकतो की मी पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक आनंदी मनुष्य आहे.

तो म्हणाला, आपल्या शरीरात चार संप्रेरके असतात यांच्यामुळे आपल्याला आनंदी, प्रसन्न वाटत राहते-

१. एंडॉर्फिंस

२. डोपामाईन

३. सेरोटोनिन

४. ऑक्सिटोसिन

आपण ही संप्रेरके समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण आपल्याला आनंदी राहण्यासाठी या चारही संप्रेरकांची गरज आहे.

इंडॉर्फिंस

आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा हे संप्रेरक तयार होते.

हे संप्रेरक शरीराला वेदना सहन करण्यास आणि दुःखावर मात करण्यास मदत करते.

मग आपण व्यायामाचा आनंद घेऊ लागतो कारण इंडॉर्फिंस आपल्याला आनंदी वाटण्यास मदत करतात.

हसणे हा इंडॉर्फिंस निर्मिती साठी आणखी एक चांगला मार्ग आहे.

आपल्याला दररोज तीस मिनिटे व्यायाम करणे किंवा काही तरी विनोदी वाचणे ऐकणे किंवा पाहणे हे पुरेसे इंडॉर्फिंस निर्मितीसाठी मदत करू शकते.

डोपामाइन

आपल्या जीवन यात्रेत आपण अनेक लहान मोठी कामे पार पाडत असतो आणि त्यामुळे कमी जास्त प्रमाणात डोपामाइन तयार होत असते.

जेव्हा आपण केलेल्या कामाचे कौतुक कोणीतरी घरी किंवा कामाच्या ठिकाणी करते तेव्हा आपल्याला सार्थक आणि आनंदी वाटते कारण तेव्हा शरीरात डोपामाइन तयार होत असते.

तून आपल्याला समजते की घरातील अनेक कामे करणाऱ्या आणि करतच राहणाऱ्या गृहिणींना अनेकदा निराश का वाटते.. कारण त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक फार क्वचित केले जाते.  आपण जेव्हा काम करतो, पैसे मिळवतो, नवीन वस्तू खरेदी करतो तेव्हा सुद्धा डोपामाइन तयार होते. आता आपल्याला समजले का, खरेदी केल्यानंतर आपल्याला इतके उत्साही का वाटते?

क्रमशः…

– अनामिक

संग्राहिका : – अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares