मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गुरुपौर्णिमा… लेखिका :डॉ. युगंधरा रणदिवे ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆  गुरुपौर्णिमा… लेखिका :डॉ. युगंधरा रणदिवे ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

आज सोसायटीच्या हॉलमध्ये “गुरुपौर्णिमा”साजरी करायला लेडीज स्पेशल जमल्या होत्या.

साहजिकच देवांचे फोटो, समई, बॅनर—-सगळं तयार होतं.”गुरुब्रम्हां गुरू विष्णू”म्हणत सुरवात झाली.थोडीफार टिपिकल भाषणं झाली.

आज सगळ्यात जेष्ठ अशा गोखले काकू प्रमुख पाहुण्या म्हणून बोलणार होत्या.सगळ्या सो कॉल्ड मॉडर्न मुली,बायका जरा चुळबुळतच होत्या.

काकू उठल्या, म्हणाल्या, मी आज तुम्हाला माझ्या गुरुबद्दल सांगणार आहे.

माझं लग्न अगदी कांदेपोहे पद्धतीने झालं. कोकणातून इथे मुंबईत आले.माहेरी सर्व कामांची सवय होती,पण इथे चाळीत दोन खोल्यात आठ माणसं ,हे गणित काही पचनी पडत नव्हतं. टॉयलेट घरातच होतं ही जमेची बाजू.पहिल्या दिवसापासून सासूबाई कमी बोलून पण मला निरखून काही सूचना करायच्या.कोकणातला अघळपघळपणा इथे का चालणार नाही हे त्यांनी समजावून सांगितलं. नारळ घालून रसभाज्या करणारी मी,डब्यासाठी कोरडी भाजी करायला शिकले.कोणतेही व्रत वैकल्य त्यांनी लादले नाही.जे पटते,जे झेपते आणि खिशाला परवडते ते करावं असं त्यांचं स्पष्ट मत होतं.त्यांनीच बीएड करायला लावलं, शाळेत नोकरी घ्यायला लावली.बाईने स्वतःच्या पायावर उभे राहिलेच पाहिजे.

माझ्या मिस्टरांना त्या स्वतःच मागे लागून नाटक-सिनेमाची तिकिटं काढायला लावायच्या.त्या काळात पण आम्हाला क्वालिटी टाइम मिळावा हे त्या बघायच्या.

माझे दीर वेगळे झाले,आम्ही दोघे, आमची दोन मुले आणि सासूबाई असेच राहिलो.

चाळीची रिडेवलपमेंट होणार म्हंटल्यावर मीच धाय मोकलून रडले.पण त्या म्हणाल्या,”बदल हे होणारच,कशात गुंतून पडायचं नाही”

नऊवारीतून पाचवारीत आणि पुढे चक्क गाऊन मध्ये माझ्या सासूबाईंचं स्थित्यंतर झालं.केस सुध्दा स्वतःहून छोटे केले,मला त्रास नको म्हणून!

जातानाही प्रसन्नपणे गेल्या.नातसुनेला म्हणाल्या,”ही चांगली सासू होते की नाही,ती परीक्षा तू घे हो.”

परिस्थितीचं भान ठेवा,काटकसर करा पण सतत सर्वांची मनं मारून नाही,पैसे कमवा पण पाय जमिनीवर ठेवा, काळानुसार बदला, जे बदल पचणार नाहीत, त्याबद्दल मोकळेपणी बोला,transparancy महत्वाची.लोकांना हक्क दाखवत,धाक दाखवत बांधून ठेवू नका.प्रेमाने दुसऱ्यापर्यंत पूल बांधा, त्याने त्याच पुलावरून तुमच्याकडे यायचं का नाही हे त्याला ठरवू द्या.एकावेळी तुम्ही सर्वांना खुश नाही ठेवू शकत;पण म्हणून स्वतः खूश होणं विसरू नका.नियमांवर जास्त बोट ठेवलं की वर्मावर लागतं. आपल्या वागणुकीतून दुसऱ्याला आदर्श घालून द्या.पतंगाचा मांजा ढील दिल्यावरच पतंगाला उंच नेऊ शकतो.

नवीन पिढीला टोचून दूषणं देण्यापेक्षा नवीन शिकून घ्यावं. घरात भांडणं होणारच,पण”रात गई बात गई”. एक वेळचे जेवण तरी सर्वांनी एकत्र केले पाहिजे. बाहेरचं frustration, चिडचिड घरात बोलून शांत झाली पाहिजे.प्रत्येकाने आपला दिवस कसा गेला सांगितलं तरी खूप संवाद घडेल.

विश्वास,प्रेम घरात मिळालं तर बाहेरच्या चुकीच्या व्यक्तीकडून फसवणूक होणार नाही.

जेमतेम अक्षरओळख असणाऱ्या माझ्या सासूबाई टॉप कॉलेजातल्या MBA लाही लाजवतील अशा काटेकोर होत्या.त्या माझ्या गुरू,माझी मैत्रीण होत्या.

आज मुद्दाम हे सांगण्याचं कारण की गुरू म्हणजे कोणी फेमस व्यक्ती असायची गरज नसते.तिने सतत बरोबर राहून हात धरून चालवायचीही गरज नसते.ती आपल्या आजूबाजूच्या माणसांमधीलच एक असते.तिला सन्मान, फोटो, गिफ्ट याची अपेक्षा नसते.तिच्यातल्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण झाले,पुढे नेले गेले की बास!

माझ्यातले चांगले माझ्या सुनेपर्यंत पोचवू शकले की माझ्या सासूबाईंना गुरुदक्षिणा मिळेल.

तुम्ही काही यातून घेतलं तर काही प्रमाणात आनंदाची शिंपडणी तुमच्याही घरात होईल

धन्यवाद!

एकमेकांच्या कागाळ्या करणाऱ्या, गॉसिप करत पराचा कावळा करणाऱ्या आणि खोटे फॉरवर्ड असल्याचे मुखवटे घालणाऱ्या आणि कुरघोडी करत राहणाऱ्या ,आम्हा सर्वांसाठी हे अंतर्मुख करणारं होतं, हे नक्की!

लेखिका :डॉ युगंधरा रणदिवे

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ थोडं जगलं पाहिजे… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

☆  थोडं जगलं पाहिजे…  ☆ प्रस्तुती – सुश्री प्रफुल्ला शेणॉय ☆

आयुष्याच्या अल्बममध्ये

आठवणींचे फोटो असतात,

आणखी एक कॉपी काढायला

निगेटिव्हज् मात्र शिल्लक नसतात.

 

गजर तर रोजचाच आहे

आळसाने झोपले पाहिजे,

गोडसर चहाचा घोट घेत

Tom & Jerry पाहिलं पाहिजे.

 

आंघोळ फक्त दहा मिनिटे?

एखाद्या दिवशी तास घ्या,

आरशासमोर स्वतःला

सुंदर म्हणता आलं पाहिजे.

 

भसाडा का असेना

आपल्याच सुरात रमलं पाहिजे,

वेडेवाकडे अंग हलवत

नाचण सुध्दा जमलं पाहिजे.

 

गीतेचा रस्ता योग्यच आहे

पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,

रामायण मालिका नैतिक थोर

“बेवॉच” सुध्दा एन्जॉय करता आली पाहिजे.

 

कधी तरी एकटे

उगाचच फिरले पाहिजे,

तलावाच्या काठावर

उताणे पडले पाहिजे.

 

संध्याकाळी मंदिराबरोबरच

बागेत सुध्दा फिरलं पाहिजे,

“फुलपाखराच्या” सौंदर्याला

कधीतरी भुललं पाहिजे.

 

द्यायला कोणी नसलं

म्हणून काय झालं?

एक गजरा विकत घ्या

ओंजळ भरुन फुलांचा नुसता श्वास घ्या.

 

रात्री झोपताना मात्र

दोन मिनिटे देवाला द्या,

एवढया सुंदर जगण्यासाठी

नुसतं थँक्स तरी म्हणा..!!

प्रस्तुती : सुश्री प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समाधान… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆  समाधान…  ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

बसायला आरामखुर्ची आहे,

हातामध्ये पुस्तक आहे….

डोळ्यावर चष्मा आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

निसर्गामध्ये सौंदर्य आहे,

निळे आकाश, हिरवी झाडी आहे….

सूर्योदय, पाऊस, इंद्रधनुष्य आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

जगामध्ये संगीत आहे,

स्वरांचे कलाकार आहेत…

कानाला सुरांची जाण आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

बागांमध्ये फुले आहेत,

फुलांना सुवास आहे….

तो घ्यायला श्वास आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

साधे चवदार जेवण आहे,

सुमधुर फळे आहेत….

ती चाखायला रसना आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

जवळचे नातेवाईक, मित्र आहेत,

मोबाईल वर संपर्कात आहेत…

कधीतरी भेटत आहेत,

इतके मला पुरेसे आहे !

 

डोक्यावरती छत आहे,

कष्टाचे दोन पैसे आहेत….

दोन वेळा, दोन घास आहेत,

इतके मला पुरेसे आहे !

 

दोन गोड लेकी आहेत,

त्यांच्या क्षेत्रात व्यग्र आहेत,

नित्य आमच्या मनात आहेत,

इतके मला पुरेसे आहे…!!

 

देहामध्ये प्राण आहे,

चालायला त्राण आहे…

शांत झोप लागत आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

याहून आपल्याला काय हवे ?

जगातील चांगले घेण्याचा….

आनंदी, आशावादी राहण्याचा विवेक आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

विधात्याचे स्मरण आहे,

प्रार्थनेत मनःशांती आहे…

परमेश्वराची कृपा आहे,

इतके मला पुरेसे आहे !        

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चंद्रयान प्रक्षेपणानिमित्त… ☆ श्री प्रमोद जोशी ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ चंद्रयान प्रक्षेपणानिमित्त… ☆ श्री प्रमोद जोशी ☆

चंद्र आणखी भारत यांचे,

गुण जुळले छत्तीस!

देव काढतो मुहूर्त त्याचा,

आज दोन पस्तीस!

 

अग्नीपिसारा फुलवित घेईल,

झेप अंतराळात!

आणिक त्याचा धूर खुशीचा,

भरे अंतरंगात!

 

त्रिदेव आता आतुरलेले,

करावया रक्षा!

भेदतील ते सहजपणाने,

पृथ्वीची कक्षा!

 

भारतभूच्या शास्त्रज्ञांची,

मनिषा दुर्दम्य!

दोन वाजूनी पस्तीस होता,

दृश्य दिसे रम्य!

 

रामही म्हणती,”पुष्पकाहुनी,

यान मला हे हवे!

प्राणच होती जिथे शुभेच्छा,

शब्द कशाला नवे!

 

अभिमान वा गर्व वगैरे,

मिळमिळीत वाटे!

आणि उरातून राष्ट्र प्रितीचा,

माज फार दाटे!

 

प्रेयसीचीही वाट मुळी ना,

अशी पाहिली कधी!

उसळी घेतो उरात माझ्या,

फेसाळुन जलधी!

 

काऊंटडाऊन सहन होईना,

जीव होई कापूर!

उत्सुकता तर स्वतःच झाली,

मरणाची आतूर!

 

चंद्र पहातो वाट कधीची,

वेशीवर येऊन!

आणि चांदणे मऊ मखमली,

ओंजळीत घेऊन!

 

© श्री प्रमोद जोशी

देवगड.

9423513604

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “म्हातारपणचा आधार कोण ? ” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “म्हातारपणचा आधार कोण ? ” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

म्हातारपणाचा आधार कोण??? —- मुलगा की मुलगी??

आम्ही सर्वजण मुख्य सभागृहात बसून चर्चा करत होतो, तेव्हा माझ्या बहिणीने मला प्रश्न विचारला, “भाऊ! मला सांगा, माणसाची मुलगी आहे की त्याचा मुलगा त्याच्या म्हातारपणाचा आधार आहे?”

मी म्हणालो- “बहिणी ! हा प्रश्न न विचारलेलेच बरे. कारण काही सुखी होतील, तर काही दुःखी.

म्हणून इतर सर्व लोक आग्रह करू लागले की नाही, ही गोष्ट सविस्तर सांगावी लागेल…

मी म्हणालो तर ऐका… म्हातारपणाचा आधार मुलगा किंवा मुलगी नसून “सून” असते.

मुलगा किंवा मुलगी ही म्हातारपणाची काठी असते असे आपण अनेकदा लोकांकडून ऐकले आहे, म्हणूनच लोक आपल्या आयुष्यात “मुलगा आणि मुलगी” हवेत, जेणेकरून म्हातारपण चांगले पार पडावे.

ही गोष्ट सुद्धा खरी आहे कारण घरात फक्त मुलगाच सून आणतो. सून आल्यानंतर मुलगा आपल्या पत्नीच्या खांद्यावर जवळजवळ सर्व जबाबदारी टाकतो.

आणि मग सून ही सासरच्या म्हातारपणाची काठी बनते.

होय! माझा विश्वास आहे की ती सून आहे जिच्या पाठिंब्याने वृद्ध सासू आणि सासरे आपले आयुष्य चांगले घालवतात.

सुनेला तिच्या सासू आणि सासऱ्यांची संपूर्ण दिनचर्या माहीत असते.

कोण कधी आणि कोणता चहा प्यायचा, काय शिजवायचा, संध्याकाळी नाश्त्याला काय द्यायचे, कोणत्याही परिस्थितीत जेवण रात्री नऊच्या आधी शिजवावे लागते.

सासू-सासरे आजारी पडले, तर सून मनापासून किंवा अनिच्छेने त्यांची काळजी घेते.

सून एक दिवस आजारी पडली किंवा निघून गेली तर सगळं घर हादरून जातं. पण मुलगा पंधरा दिवसांच्या प्रवासाला गेला तरी सुनेच्या भरवशावर घर सुरळीत चालते.

सून नसताना सासू-सासरे यांना कोणीतरी आपली काठी हिसकावून घेतल्यासारखे वाटते. त्याला दुसरे कोणी विचारायचे नव्हते.

कारण मुलाकडे वेळ नाही आणि मुलाला वेळ मिळाला तरी तो काहीच करू शकणार नाही कारण त्याला सकाळपासून रात्रीपर्यंत आई बाबांना काय द्यावे हेच कळत नाही? कारण मुलाचे काही प्रश्न आहेत आणि त्याची जबाबदारी  संपली.

जसे “आई बाबांनी जेवण केले आहे का?” “चहा प्यायला?” “नाश्ता केला?” पण ते काय खातात? कोणता चहा पितात हे शोधण्याचा प्रयत्न कधीच केला नाही? ही जवळपास सगळ्या घरांची गोष्ट आहे.

सासूची मनापासून सेवा करणाऱ्या अशा सून मी बहुतेक पाहिल्या आहेत.. म्हणूनच सून हीच म्हातारपणाची खरी काठी आहे असे मी मानतो.

पण अजून एक गोष्ट खरी आहे की तुम्हाला सुद्धा बुद्धी असायला हवी की सदैव “माझ्या राजा बेटा!” “माझी राणी मुलगी!”  चा जप सोडा. “माझी चांगली सून!” सुद्धा अंतर्भूत केले पाहिजे.

म्हणून, आपल्या सुनेमध्ये फक्त दोष शोधू नका, तिच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करा.

“दिवसाचा संदेश”

सुनेचा त्याग आणि सेवा ओळखा

मुलगा आणि मुलीच्या आधी सुनेला स्वतःचे समजा

आणि “माझी मुलगी – माझा अभिमान” “माझा मुलगा – माझा अभिमान” म्हणणे थांबवा…

अभिमानाने म्हणा माझी सून, माझा अभिमान…… 

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी आहे आनंदी कावळा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ मी आहे आनंदी कावळा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

एका राज्यात एक कावळा असतो. नेहमी आनंदी , हसत ! कुठल्याच प्रकारचे दु:ख, कष्ट त्याच्या चेह-यावरचा आनंद हिरावून घेवू शकत नसतात. एकदा त्या राज्याच्या राजाला ही बातमी कळते .त्याला खूप आश्चर्य वाटते, हे अशक्य आहे, त्याचे मन खात्री देते. मग तो आपल्या शिपायांना त्या कावळ्याला पकडून आणण्याची आज्ञा देतो . कैदेत ठेवल्यावर कसा आनंदी राहील पठ्ठ्या ! राजा मनोमन आपल्या विचारावर खूश होतो …..  कावळ्याला कैद करून महीना लोटतो तरी तो हसतच ! 

राजा बेचैन होतो. ” प्रधानजी, त्या कावळ्याला दु:खी करण्यासाठी काय करता येईल?” 

” महाराज, आपण त्याला काट्यात टाकू या” प्रधान तत्परतेने उपाय सुचवतो.

लगेच राजाच्या आदेशाप्रमाणे शिपाई त्याला काट्यात टाकतात . तिथेही हा आपला आनंदाने शीळ घालतोय….. 

“महाराज, आपण त्याला तापलेल्या तव्यावर टाकू या” राणी दुसरा मार्ग  सुचवते.

दुस-या दिवशी त्याला तापलेल्या तव्यावर टाकले जाते ,पण कितीही चटके बसले तरी त्याच्या चेह-यावरचे हसू काही मावळत नाही….. 

“ते काही नाही महाराज, आपण त्याला उकळत्या तेलात टाकू ” सेनापती पुढची शिक्षा सुचवतात. . 

दुस-या दिवशी भल्यामोठ्या कढईत तेल उकळवून त्यात त्याला टाकले जाते. तरीही कावळा हसतोच आहे.

राजाला भयंकरच राग येतो. मग तो शेवटचा जालीम उपाय करायचे ठरवतो आणि त्या कावळ्याचे पंखच छाटून टाकतो. पंख छाटलेला कावळा क्षीण हसतो आणि कायमचे डोळे मिटतो …

— लहानपणी ही गोष्ट वाचताना खूप गंमत वाटायची. पण आता तिच्यातले मर्म काय ते कळते. आपण आनंदी आहोत , सुखी आहोत, हसत आहोत ही बाबच् नापसंत असणारे किती ‘राजे’ आपल्या अवतीभोवती असतात ना ! कधी आपले जवळचे आप्त, स्वकीय, तर कधी परकीय. तुम्हाला कोणत्या गोष्टीनी त्रास होईल, कशाने यातना होतील, दु:ख होईल ? या गोष्टींचा विचार करण्यात आपली स्वत:ची शक्ती अकारण खर्ची पाडणारे आणि त्यासाठी  विविध युक्त्या योजून त्या अमलात आणणारे  ‘ प्रधान’, ‘सेनापती’ यांची कमतरता नाही. गंमत म्हणजे या अशा योजना अंमलात आणण्यासाठी आवश्यक शिपायांची भाऊगर्दीही कमी नाही आणि अशाही सगळ्या परिस्थितीतही आपल्या चेह-यावरचे हसू टवटवीत ठेवणारे ‘आनंदी कावळे’ ही आहेतच !

वास्तविक या जगात प्रत्येकचजण सुखाच्या, आनंदाच्या मागे धावत असतो. जगण्याची ही सगळी धडपड तो एक ‘सुखी माणसाचा’ सदरा मिळवण्यासाठीच चालू असते. तरीही दुस-याचा आनंद का सहन होत नाही आपल्याला ? आनंदाची इतकी संकुचित संकल्पना घेवून जगत असतो आपण की, फक्त मला स्वत:ला मिळाला तरच तो ‘आनंद’; नाही तर नाही. त्या दुस-या व्यक्तीनेही तो क्षणिक आनंद, ते यश मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतलेले असतात, अनेक त्रास सहन केलेले असतात, दु:ख भोगलेलं असतं; तेव्हा कुठे त्याच्या वाट्याला तो आनंदाचा छोटासा ‘कवडसा’ आलेला असतो, हा विचारच आपल्या मनाला शिवत नाही. 

इतरांच्या आयुष्यातील असे अनेक छोटे छोटे कवडसे आपणही तितक्याच आनंदाने उपभोगू शकलो तर आपल्या मनाच्या अंगणभर सुखाचे ऊन सदा हसत राहील, तिथे दु:खाच्या सावलीला जागाच राहणार नाही. सगळ्या जगाचं सोडा हो, आपल्या जवळच्या माणसांच्या बाबतीत तरी हे करून बघायला काय हरकत आहे ?

कोणाचा आनंद कसा हिरावून घेता येईल याचा विचार करत बसण्यापेक्षा त्याच्यासोबत आपल्यालाही आनंदी होता येतंय का, हसता येतंय का ते पहायला काय हरकत आहे ?

सुदैवाने भेटलाच एखादा ‘आनंदी कावळा’ तर त्याच्यासोबत चार मुक्त गिरक्या घेऊन बघूया आकाशात.. 

त्याचे पंख छाटून त्याला संपवण्यापेक्षा आपल्या हृदयाच्या खोल खोल कप्प्यात त्याला कायमचा जपून ठेवू या !

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पक्ष्यांपासून शिकण्यासारखे… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

📖 वाचताना वेचलेले 📖

🦜 पक्ष्यांपासून शिकण्यासारखे…🦜 ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

(पक्षी आणि मानव यांच्यातील महत्वाचे विषय आणि फरक ???) 

  १. पक्षी रात्री काही खात नाहीत.

  २. रात्री फिरत नाहीत

  ३. आपल्या पिलांना स्वतः  ट्रेनिंग देतात, 

             दुसऱ्या ठिकाणी पाठवत नाहीत. 

 ४. हावरटासारखे  ठोसून कधी खात नाहीत.

             तुम्ही त्यांच्यापुढे मूठभर दाणे टाका,

             ते थोडे खाऊन उडून जातात 

             बरोबर घेऊन जात नाहीत …

 ५. अंधार पडल्यावर झोपून जातात,

             आणि पहाटेच उठून, गाणी  गात उठतात.

  ६. ते आपला आहार कधीही बदलत नाहीत.

  ७.आपल्या प्रजातीतच सोबती निवडतात ( एकत्र राहतात )

              बदक आणि हंसाची जोडी कधी होत नाही. 

  ८.आपल्या शरीराकडून सतत काम करवून घेतात, 

             स्वतःला ऍक्टिव्ह ठेवतात,

             रात्रीशिवाय विश्रांती करत नाहीत.

  ९.आजारी पडले तर काही खात नाहीत, 

             बरे झाल्यावरच खातात.

   १०. आपल्या मुलांवर प्रचंड प्रेम करतात व काळजी घेतात.

   ११. आपापसात मिळून मिसळून राहतात.

              अन्नावरून भांडणे झाली, तरी परत एकत्र येतात.

   १२. निसर्ग नियमांचे न कुरकुरता शांतपणे पालन करतात.

   १३. आपलं घर इको फ्रेंडलीच बनवतात.

   १४. मुलं स्वतःच्या कष्टाने पोटभरण्याइतके झाले की 

               त्यांच्या जीवनात हस्तक्षेप करीत नाहीत.

…… खरोखर त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे की नाही..??!! 

       त्यांच्या या सवयी अंगिकरून आपल्याला आपलं जीवन पण सुखी व निरोगी ठेवता येईल…

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वाचणाऱ्याने… कवी : सौमित्र ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ वाचणाऱ्याने… कवी : सौमित्र ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

वाचणाऱ्याने

एक तरी वाचक घडवावा .. पुस्तकांच्या घरात

नाही तर त्याच्या जाण्यानंतर

पुस्तकांना वाटत राहतं बरंच काही

 

वाचणारा निघून जातो ज्या घरातून

त्या घरातली सारी पुस्तकं

अनाथ होतात ..  एकाकी होतात

कित्येक आठवणींचे बुकमार्क्स

त्यांच्या पानापानात उगवून येतात

 

कधी कसं कुठून बोट धरून

शोधून आणलं त्यांना

कशी दिली हक्काची जागा

कसा किती वेळा फिरवला

हात मायेचा मुखपृष्ठांवरून

पानापानांवरून कसे सरकले डोळे

मायाळू शब्दांवरून

आपलंस करीत ओळीओळींना

 

कारण नसतांना

कशी काढली गेली हाताळली गेली

पुस्तकं पुन्हा पुन्हा

प्रेमळपणे उघडून मधूनच

कशी वाचली गेली पानं परिच्छेद

कितीतरी वेळा वाचलेले तरी

कसं सापडत गेलं वेगळंच काही

त्याच पुस्तकांतून

तेच पुस्तक पुन्हा पुन्हा वाचताना

कसं कसं वाचलं गेलं नव्याने

 

करमत नसल्यावर सहज

मारून यावी चक्कर तशा

कशा मारल्या गेल्या चकरा

उगाच पुस्तकांच्या गल्ल्यांतून

सकाळ दुपार संध्याकाळी कधीही

कशी फिरली नजर सहज

रांगेत उभ्या पुस्तकांच्या नावांवरून

 

किंवा एकटक पाहात रहावं

आईकडे गिल्टी होऊन

पाहिलं गेलं तसंच

पुस्तकांकडे डोळे भरून

 

निघून जातो वाचणारा

पुस्तकांच्या घरातून तेव्हा

 

पुस्तक घरी आलेल्या

पहिल्या दिवशी

पहिल्या पानावर

लिहून ठेवलेल्या सर्व तारखा

वर्षांसकट पुस्तकांबाहेर येऊन

स्तब्ध उभ्या राहातात

भविष्याची अनिश्चितता

भोवंडून येते त्यांच्या भोवताली

 

निघून गेल्यावर वाचणारा

पुस्तकांच्या घरातून

 

प्रत्येक पुस्तकाच्या

प्रत्येक लेखकाला

त्याने लिहिलेल्या

प्रत्येक व्यक्तिरेखेला

वाटत राहतं दिशाहीन

कळून चुकतं त्यांना

 

आपण शोभेसाठी

स्टेटस सिम्बल म्हणून

किंवा उरलो आहोत फक्त

एक अडगळ म्हणून आता

 

आता हळूहळू साचत जाईल धूळ

लागत जाईल वाळवी

झुरळं होतील पाली येतील

नुस्तं असणं नकोसं होईल

जगणं पिवळं पडत जाईल

 

ज्या घरात

दुसरं कुणीच नसतं वाचणारं

तिथल्या पुस्तकांना पडतात प्रश्न

काय उरलं आपलं या घरात

आता का रहावं इथं आपण

कारण कित्येकदा

त्यांनी ऐकलेलं असतं

 

काय मिळतं पुस्तकं वाचून एवढी

उपयोग काय या पुस्तकांचा

जिवंत माणूस कळत नसेल तर

चार पैसे देतात का पुस्तकं पोटासाठी

 

ज्या घरात

दुसरं कुणीच नसतं वाचणारं

पुस्तकांची साधी विचारपूस करणारं

त्या घरातून वाचणारा निघून जातो तेव्हा

कानकोंडी होत जातात पुस्तकं

मग त्यांना वाटू लागतं

 

आता आपल्याला

उत्सुकतेने पाहणारे डोळे असलेला

कानामात्रावेलांट्यांचे श्वास घेतलेला

सहज येता जाता नजर फिरवणारा

स्पर्शातूनही नुस्त्या वाचू पाहणारा

घराबाहेर असला तरी आपल्यात राहणारा

निघून गेला आहे कायमचा

 

तेव्हा आता आम्हालाही

रचून त्याच्यासोबत लाकडांवर

एकत्रच भडाग्नी देऊन

मिसळून जाऊ द्यावं दोघांना

वर जातांना एकमेकांत धूर होऊन

 

तसाही त्या माणसाने आयुष्यभर

तोच तर घेतला होता ध्यास

आमच्याशी एकरूप होण्याचा……                      

 

कवी : सौमित्र

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भक्ती म्हणजे —… ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ भक्ती म्हणजे… ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

भक्ती म्हणजे…

१) किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे पहा भक्ती जेंव्हा अन्नात शिरते तेंव्हा तिला प्रसाद म्हणतात… 

२) भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास असे म्हणतात

३) भक्ती जेंव्हा पाण्यात शिरते तेंव्हा तिला तीर्थ म्हणतात 

४) भक्ती जेंव्हा प्रवासाला निघते तेंव्हा तिला यात्रा असे म्हणतात

५) भक्ती जर का संगीतात शिरली तर तिला भजन कीर्तन म्हणतात

६) भक्ती जर का लोकसंगीतात शिरली तर तिला भारूड असे म्हणतात

७) भक्ती जेंव्हा माणसात प्रकटते तेव्हा माणुसकी निर्माण होते

८) भक्ती जर घरात शिरली तर त्या घराचे मंदिर होते 

९) भक्ती जर का शांतपणे मनाच्या गाभाऱ्यात शिरली तर त्याला ध्यान म्हणतात 

१०) भक्ती जर का कृतीत उतरली तर तिला सेवा असे म्हणतात…

श्री गुरुदेव दत्त

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ :: वारी… :: ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

वाचतांना वेचलेले

 ☆ :: वारी… :: ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

 पंढरपूरचा विठु काल

 अचानक आला घरी 

आणि म्हणाला, आवर लवकर बयो

निघालेत वारकरी ।।

 

मी म्हणाले निघते हं विठु घरचं एकदा बघते।

शाळा सुटेल मुलांची त्यांना घेऊन येते।।

 

लगबग माझी सुरू झाली 

नवऱ्याचे कपडे बघू की

मुलांसाठी खाऊ करु

एवढया कमी अवधीत

सगळं कसं आवरू ?

 

शेवटी एकदाची तयार झाले

आणि उंबऱ्यापाशीच थबकले ।

काळजातली गलबल लपवु पाहत होते।

डोळ्यांमधले अश्रु थोपवू पाहत होते ।।

 

नीट राहतील सगळे तुझ्याशिवायही घरी।

मीच मला समजावत होते परोपरी ।

 

घालमेल बघून तो हलकेच हसून म्हणाला,

यंदा असु दे,बघु पुढे केंव्हातरी ।।

 

माझा एक पाय आत,एक पाय बाहेर।

वाट अडवत होतं सासर, खुणवत होतं माहेर ।।

 

आता डोळ्यांमधलं पाणी काही केल्या थांबेना।

मला सोडून मग त्याचाही पाय निघेना।।

 

मी म्हणाले, सोपं नसतं रे विठु हे दुहेरी जगणं।

संसाराचे पाश तोडून तुझ्या मागे लागणं ।।

 

उपाय खूप सांगितलेत रे, मीच पडते कमी।

तूच आता काहीतरी दे बाबा हमी।।

 

कुणी म्हणतं ममत्व सोड ।

कुणी म्हणतं चाललंय ते मानून घे गोड ।

 

गोड मानता मानता ममत्व येणारच ना रे ।

गुंतलेला जीव प्रवाहात दूरवर जाणारच ना रे।।

 

एकच भीती वाटते विठु,

प्रवाहात पोहताना एक दिवस अचानक

तुटून जाईल ही श्वासाची दोरी ।

आणि कधीच घडणार नाही रे,

तुझ्या पंढरपूरची वारी ।।

 

माझ्या डोळ्यातले अश्रु त्याने अलगद पुसले ।

त्याच्याही डोळयांत कुठेतरी मला ते दिसले।।

 

माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला,

संसार सोडू नकोस,एक फक्त कर

 

श्वासाच्या दोरीवर नाव माझं झुलत ठेव।

चित्ताच्या पटलावर रूप माझं फुलत ठेव ।।

 

इंद्रियांना करू देत त्यांचं काम ।

मनावर मात्र घाल चांगला लगाम ।।

 

मग विषयांच्या गर्तेत मन तुला नेणार नाही।

प्रवाहात पोहताना दमछाक तुझी होणार नाही।।

 

तुझ्या हृदयातला माझा अंश ,त्याला ठेव साक्षी

 त्याचीच असू दे तुझ्यावर सत्ता ।

 

मग बघ …… 

 

मन,बुद्धी ,चित्त,अहंकार..

हळूहळू सुटेल आपोआप सगळा गुंता ।।

 

हळूहळू मग अहंकाराचं बंधन तुटेल।

हळूहळू संसाराची भ्रांत फिटेल ।।

 

अहंकार गेला की ममत्वही सुटेल ।

रज-तमाचं कवाड एक एक करून मिटेल ।।

 

 हळूहळू गळून पडेल मग एक एक पाश ।

हळूहळू निरभ्र होईल मनाचं आकाश ।।

 

 निर्विकल्प मनाला मग पैलतीर दिसेल।

आणि विश्वास ठेव पोरी !

 

पैलतीरावर हात देण्यासाठी, चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल ।।

पैलतीरावर हात देण्यासाठी, चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल ।।

  जय हरि  

 

कवी : अज्ञात 

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares