मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कोण गोंदवलेकर? … – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

कोण गोंदवलेकर? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

माझा एक वाहनचालक मित्र एकदा मोटार बिघडल्याने ती दुरुस्त करण्यासाठी एका गॅरेजमध्ये गेला. ती वस्ती तशी टपऱ्याटपऱ्यांचीच होती.

गाडी दुरुस्त व्हायला वेळ होता म्हणून तो दुकानासमोरच्या चहाच्या टपरीत गेला. कळकट लाकडी बाकं, तीच रया गेलेली टेबलं. चहा पिता-पिता त्याचं लक्ष गल्ल्यावर बसलेल्या मालकाकडे गेलं. काळासावळा असा तो तिशीतला तरुण होता.

मग सहज गल्ल्यामागे भिंतीवर लक्ष गेलं आणि माझ्या मित्राला सुखद आश्चर्याचा धक्काच बसला.

भिंतीवर श्रीगोंदवलेकर महाराजांची तसबीर होती.

 

चहा पिऊन झाल्यावर तो गल्ल्याशी आला आणि पैसे देता देता त्यानं विचारलं,

‘‘तुम्ही गोंदवल्याला जाता काय?’’

त्या मालकानं रूक्षपणे विचारलं, ‘‘ये गोंदवले क्या है?’’

 

आता माझ्या मित्राला अधिकच आश्चर्य वाटलं.

त्यानं तसबिरीकडे बोट दाखवत विचारलं,

‘‘यांचं नाव तुम्हाला माहीत नाही?’’

तो म्हणाला,

‘‘नाही.’’

 

मित्राला वाटलं, आधीच्या मालकानं ही तसबीर ठेवली असावी आणि ती यानं काढली नसावी.

म्हणून त्यानं विचारलं, ‘‘मग ही तसबीर इथं कोणी लावली?’’

तो मालक थोडं हळूवारपणे म्हणाला,

‘‘मीच!’’

 

‘ज्या माणसाला गोंदवले माहीत नाही,

गोंदवलेकर महाराज माहीत नाहीत,

त्यानं त्यांची तसबीर आपल्या दुकानात गल्ल्याच्या मागे पूजास्थानी का लावावी?’

हा प्रश्न माझ्या मित्राला पडला आणि त्यानं आश्चर्यभरल्या स्वरात विचारलं,

‘‘मग ही तसबीर तुम्ही इथे का लावलीत?’’

 

त्याचं जे उत्तर आहे ते सर्वच साधकांनी हृदयात साठवून ठेवावं, असं आहे!

 

त्यानं आपली जीवनकहाणीच माझ्या मित्राला सांगितली. जन्मापासून त्याला आपल्या आईबापाचा पत्ता माहीत नव्हता.

कळू लागलं तेव्हापासून तो रस्त्यावरच वाढत होता. खरंच त्या बालपणाची आपण कल्पनाही करू शकत नाही. कुणी दिले तर कपडे होते, कुणी दिलं तर खाणं होतं.. राहणं, झोपणं सारं रस्त्यावरच.

लहान पोराची दया येते, वय वाढू लागलं तसा तो अवचित दयेचा ओघही आटला.

मग चोऱ्यामाऱ्या सुरू झाल्या.

वाढत्या वयानं व्यसनंही शिकवली. त्या व्यसनांच्या धुंदीचीच काय ती जवळीक होती. चोरी करावी, मारामाऱ्या कराव्यात, व्यसनं करावीत, असं आयुष्य सरत होतं. आयुष्य दिशाहीन होतं आणि आयुष्याला काही दिशा असावी, याची जाणीव परिस्थितीही होऊ देत नव्हती.

 

एकदा रात्री दारूच्या नशेत तो रस्त्याच्या कडेला कोसळला होता. सकाळी वाहनांच्या आणि पादचाऱ्यांच्या पावलांच्या आवाजानं जाग आली.

 

सहज त्याचं लक्ष पदपथावरच्या झाडाच्या तळाशी गेलं. तिथं कोणीतरी श्रीगोंदवलेकर महाराजांची त्याच्या शब्दांत सांगायचं तर ‘या बाबाची’ ही तसबीर ठेवली होती.

 

डोळे चोळत त्यानं काहीशा कुतूहलानं ती तसबीर हाती घेतली आणि तसबिरीतल्या ‘बाबा’ कडे नजर टाकली.

 

त्याच्याच शब्दांत पुढची कहाणी सांगण्यासारखी आहे.

तो म्हणाला, ‘‘मी तसबीर उचलली आणि या बाबाकडे पाहिलं.

या बाबानं माझ्याकडे इतक्या करुणेनं आणि दयामय दृष्टीनं पाहिलं की तसं कोणीही कधी पाहिलं नव्हतं.

 

या जगात माझं कोणीतरी आहे, या जाणिवेनं मी हेलावलो.

ती तसबीर छातीशी धरून खूप रडलो.

माझं कुणीतरी या जगात मला भेटलं होतं!

 

मग मी पदपथावर जिथं पथारी टाकत असे तिथं ही तसबीर लावली.

 

त्यानंतर दिवसागणिक आश्चर्यच घडू लागलं.

 

रात्री निजण्याआधी तसबिरीकडे पाहिलं की मला वाटे, आज मी चोरी केलेली या बाबाला आवडलेली नाही.

 

मी फार अस्वस्थ होई. मग हळूहळू मी चोऱ्या करणं सोडलं. मग कधी तसबिरीकडे पाही, तेव्हा जाणवे, मी दारू पितो हे या बाबाला आवडत नाही.. मग दारू सुटली.

असं करता करता सारी व्यसनं सुटली. मारामाऱ्या थांबल्या. शिवीगाळ थांबली.

मग मी छोटीमोठी कामं करू लागलो. कष्टाचे पैसे जमवू लागलो.

या बाबाच्या चेहऱ्यावर रोज वाढता आनंद दिसत होता. असं करत करत या टपरीपर्यंत मी आलोय.”

 

माझ्या मित्राचाही ऊर भरून आला.

तो म्हणाला, ‘‘अरे हे सारं खरं, पण ही यांची जागा नाही. त्यांना अधिक चांगल्या जागी ठेव.’’

 

तो पटकन म्हणाला, ‘‘ते मला माहीत नाही. जिथं मी आहे, तिथं हे असणारच आणि जिथं ते आहेत, तिथं मी असणारच!’’

 

मला सांगा. आपल्याला गोंदवलेकर महाराज कोण, श्री स्वामी समर्थ कोण, साईबाबा कोण, गजानन महाराज कोण हे माहीत आहे.

त्यांचे चमत्कार, त्यांचा बोध सारं माहीत आहे.

तरी आपल्यात पालट होत नाही.

 

आणि त्यांचं नाव-गाव काही माहीत नसताना केवळ त्यांच्यावरच्या निस्सीम प्रेमामुळेही अंतरंगातून बोध होत जातो,

आणि त्यानं जीवनाला कलाटणी मिळते, ते पूर्ण पालटू शकतं!

याचं याइतकं दुसरं उदाहरण माझ्या तरी पाहण्यात नाही.

 

त्या टपरीला भेट दिली तेव्हा त्या टपरीत आणि त्या चहावाल्याच्या डोळ्यांत मला गोंदवल्याच्या दर्शनाचंच समाधान मिळालं.

 

तेव्हा सद्गुरू सगुण देहात नसले तरी ते बोध करतात.

 

आणि त्या बोधाचं पालन हीच खरी नीती.

 

कारण जीवनातली सर्व अनीतीच ती थोपवते!

लेखिका : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फांदीवरची पिवळी पाने – कवी : श्री.  के. यशवंत ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ फांदीवरची पिवळी पाने – कवी : श्री.  के. यशवंत ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

फांदीवरच्या पिवळ्या पानांना तोडू नका,

एक दिवस ती आपोआप गळून पडतील.

 

बसत जा घरातील वडीलधारी मंडळींबरोबर, बोलत राहा,

एक दिवस ती आपोआप शांत होतील.

 

होऊ द्या त्यांना बेहिशेबी, खर्चू द्या, मनासारखं वागू द्या,

एक दिवस ती आपोआप तुमच्या साठी इथेच सर्व सोडून जातील.

 

नका टोकू त्यांना सारखं सारखं, तेच तेच बोलत राहतात म्हणून,

एक दिवस तुम्ही तरसून जाल, त्यांचा आवाज ऐकायला, जेव्हा ती अबोल होतील.

 

जमेल तेवढा आशिर्वाद घ्या त्यांचा, वाकून, पाया पडून,

एक दिवस ती आपोआप जातील वर तसबीर बनून,

अर्थ नाही मग तुमच्या माफीला, नतमस्तक होऊन, कान धरून.

 

नका बोलू चार चौघात त्यांना,

खाऊ दे थोडं मनासारखं,

मग बघा येणार पण नाहीत जेवायला,

भले करा श्राद्ध, सारखं  सारखं.

कवी: श्री.  के.यशवंत

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आम्ही दोघे…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “आम्ही दोघे…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

मुलगी आमची युरोपात असते

आणि मुलगा यूएसमध्ये असतो

इथे मात्र आम्ही दोघेच असतो

 

मुलगा,जावई आॅफिसात राब राब राबतो

मुली,सुनेचाही कामाने पिट्टया पडतो

मदतीला या मदतीला या

दोघींचाही आग्रह असतो

चतुराईने आम्ही टाळतो कारण

इथे मात्र आम्ही एन्जॉय करत असतो !

 

हिच्या खूप हॉबीज आहेत

दुपारचा वेळ तिचा तिकडे जातो

मला कसलीच आवड नाही

मी राहिलेल्या झोपा पूर्ण करून घेतो

कारण आम्ही दोघेच

असतो !

 

कधी संध्याकाळी आम्ही सिनेमाला जातो

येताना बाहेरच जेवून येतो

रोज रात्री मनसोक्त टीव्ही बघत

चवीचवीने जेवण करतो

कारण आम्ही दोघेच असतो !

 

एकदा मुलाचा फोन येतो

एकदा मुलीचा फोन येतो

वेळ नाही अशी तक्रार करतात

आमचाही उर भरून येतो

तुम्हीही नंतर एन्जॉय कराल

असा त्यांना धीर देतो

कारण आम्ही दोघेच असतो !

 

नव्या नवलाईने सगळीकडे जाऊनही आलो

स्वच्छ सुंदर सगळं पाहूनही आलो

इकडचं – तिकडचं

दोन्ही जगं एन्जॉय करतो

कारण आम्ही  दोघेच असतो !

 

नाही जबाबदारी  कसलीच इथे

आणि नाही कसली तक्रार तिथे

नाही कसली अडचण सुखाची

मस्त लाईफ एन्जॉय करतो

कारण आम्ही दोघेच असतो !

 

भांडण तंटे आमचेही खूप होतात

नसते तिला स्मरण नि मला आठवण

खरे तर काहीच नसते वादाचे कारण

वाद विसरून गट्टी करतो

कारण आम्ही दोघेच असतो !

 

तिला मंचुरीयन आवडते

तेही ठराविकच हॉटेलात मिळते

नेहमीच ते मिळते असे नाही

पण ते असले की मी नक्की आणतो

घरच्या स्वैपाकाची कटकट नाही

कारण आम्ही दोघेच असतो !

 

मरणाच्या गोष्टी आम्ही करत नाही

पार्ट्या करतो ट्रिपा काढतो

हाताशी आता पैसे आहेत

वेळ अन मित्रही भरपूर आहेत

मुलांच्यामुळे अडकायचे दिवस संपले

हे जाणून मनोमनी खूश होतो

कारण आम्ही दोघेच असतो !

 

मुलांना हेवा वाटायला नको

त्यांच्यापासून ही मौजमस्ती लपवून ठेवतो

 

संगनमताने तीही हसते .. साथ देऊन मीही हसतो

कारण आम्ही दोघेच असतो ! 

कारण आम्ही दोघेच असतो !

कवी :अज्ञात

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आनंद लांबणीवर टाकणारी माणसं… लेखक :श्री एकनाथ वाघ ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आनंद लांबणीवर टाकणारी माणसं… लेखक :श्री एकनाथ वाघ ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला.

दारात शिवराम.

शिवराम आमच्या सोसायटीतल्या लोकांच्या गाड्या-बाईक्स धुवायचं काम करतो.

‘साहेब, जरा काम होतं.’

‘पगार द्यायचा राहिलाय का माझ्याकडून ?’

‘नाय साहेब, तो केवाच भेटला. पेढे द्यायचे होते. पोरगा धाव्वी झाला.’

‘अरे व्वा ! या. आत या.’

आमच्या दाराचा उंबरठा शिवराम प्रथमच ओलांडत होता.

मी शिवरामला बसायला सांगितलं. तो आधी ‘नको नको’ म्हणाला. आग्रह केला, तेव्हा बसला. पण अवघडून.

मीही त्याच्या समोर बसताच त्याने माझ्या हातात पेढ्यांची पुडी ठेवली.

 

‘किती मार्क मिळाले मुलाला ?’

‘बासट टक्के.’

‘अरे वा !’ त्याला बरं वाटावं म्हणून मी म्हटलं.

हल्ली ऐंशी-नव्वद टक्के ऐकायची इतकी सवय झाल्ये की तेवढे मार्क न मिळालेला माणूस नापास झाल्यासारखाच वाटतो. पण शिवराम खूश दिसत होता.

 

‘साहेब, मी जाम खूश आहे. माझ्या अख्ख्या खानदानात इतका शिकलेला पहिला माणूस म्हणजे माझा पोरगा !’

‘अच्छा, म्हणून पेढे वगैरे !’

शिवरामला माझं बोलणं कदाचित आवडलं नसावं. तो हलकेच हसला आणि म्हणाला,

‘साहेब, परवडलं असतं ना, तर दरवर्षी वाटले असते पेढे. साहेब, माझा मुलगा फार हुशार नाही, ते माहित्ये मला. पन एकही वर्ष नापास न होता दर वर्षी त्याचे दोन दोन, तीन तीन टक्के वाढले – यात खुशी नाय का ? साहेब, माझा पोरगा आहे म्हणून नाही सांगत, पन तो जाम खराब कंडीशनमधे अभ्यास करायचा. तुमचं काय ते – शांत वातावरन ! – आमच्यासाठी ही चैन आहे साहेब ! तो सादा पास झाला असता ना, तरी मी पेढे वाटले असते.’

 

मी गप्प बसल्याचं पाहून शिवराम म्हणाला, ‘साहेब सॉरी हां, काय चुकीचं बोललो असेन तर.

माझ्या बापाची शिकवन. म्हनायचा,

‘आनंद एकट्याने खाऊ

नको सगल्य्यांना वाट !’

हे नुसते पेढे नाय साहेब

हा माझा आनंद आहे !’

 

मला भरून आलं. मी आतल्या खोलीत गेलो. एका नक्षीदार पाकिटात बक्षिसाची रक्कम भरली.

आतून मोठ्यांदा विचारलं, ‘शिवराम, मुलाचं नाव काय ?’

‘विशाल.’ बाहेरून आवाज आला.

मी पाकिटावर लिहिलं – ‘प्रिय विशाल, हार्दिक अभिनंदन ! नेहमी आनंदात राहा – तुझ्या बाबांसारखा !’

‘शिवराम हे घ्या.’

‘साहेब हे कशाला ? तुम्ही माझ्याशी दोन मिन्टं बोल्लात, यात आलं सगलं.’

‘हे विशालसाठी आहे ! त्याला त्याच्या आवडीची पुस्तकं घेऊ देत यातून.’

शिवराम काहीच न बोलता पाकिटाकडे बघत राहिला.

‘चहा वगैरे घेणार का ?’

‘नको साहेब, आणखी लाजवू नका. फक्त या पाकिटावर काय लिहिलंय ते जरा सांगाल ? मला वाचता येत नाही. म्हनून…’

‘घरी जा आणि पाकीट विशालकडे द्या. तो वाचून दाखवेल तुम्हाला !’ मी हसत म्हटलं.

माझे आभार मानत शिवराम निघून गेला खरा, पण त्याचा आनंदी चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता.

खूप दिवसांनी एका आनंदी आणि समाधानी माणसाला भेटलो होतो.

हल्ली अशी माणसं दुर्मिळ झाली आहेत. कोणाशी जरा बोलायला जा, तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा.

नव्वद, पंच्याण्णव टक्के मिळवूनसुद्धा लांब चेहरे करून बसलेले मुलांचे पालक आठवले.

आपल्या मुलाला / मुलीला हव्या त्या कॉलेजात प्रवेश मिळेपर्यंत त्यांनी आपला आनंद लांबणीवर टाकलाय, म्हणे.

 

आपण त्यांना नको हसूया. कारण आपण सगळेच असे झालोय- आनंद ‘लांबणीवर’ टाकणारे !

माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, स्पर्धेत टिकाव कसा लागेल, आज पाऊस पडतोय, माझा मूड नाही !’ – आनंद ‘लांबणीवर’ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत आहेत हे आधी मान्य करू या.

काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार आहे – पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय ! Isn’t it strange ?

 

मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा वेळ लागतो ?

सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात ?

आंघोळ करताना गाणं म्हणताय, कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा करायला ?

पाऊस पडतोय ? सोप्पं आहे. मस्त चिंब भिजायला जा !

अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला ‘मूड’ लागतो ?

माणूस जन्म घेतो, त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात.

खरं तर एका हाताच्या बंद मुठीत ‘आनंद’ आणि दुस-या हाताच्या बंद मुठीत ‘समाधान’ सामावलेलं असतं.

माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर ‘आनंद’ आणि ‘समाधान’ कुठे कुठे सांडत जातं.

आता ‘आनंदी’ होण्यासाठी ‘कोणावर’ तरी, ‘कशावर’ तरी अवलंबून राहावं लागतं.

कुणाच्या येण्यावर-कुणाच्या जाण्यावर. कुणाच्या असण्यावर-कुणाच्या नसण्यावर.

काहीतरी मिळाल्यावर-कोणीतरी गमावल्यावर. कुणाच्या बोलण्यावर- कुणाच्या न बोलण्यावर.

खरं तर, ‘आत’ आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय. कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावं.

इतकं असून… आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे आहोत – पाण्याच्या टँकरची वाट बघत !

जोवर हे वाट बघणं आहे तोवर ही तहान भागणं अशक्य !

इतरांशी तुलना करत आणखीपैसे, आणखी कपडे, आणखी मोठं घर, आणखी वरची ‘पोजिशन’, आणखी टक्के…!

या ‘आणखी’ च्या मागे धावता धावता त्या आनंदाच्या झऱ्यापासून किती लांब आलो आपण !

लेखक – श्री एकनाथ वाघ

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ किती देखणी असतात ना नाती ! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ किती देखणी असतात ना नाती ! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

‘लक्ष द्या जरा चिरंजिवाकडे

शिंगं फुटलीयेत त्यांना,’

अशा टोमण्याकडे दुर्लक्ष करणारी

आई

आणि

आपल्या बछड्यानं पहिल्यांदाच ‘आत्या’ म्हटलेलं

ताईला फोनवर ऐकवणारा

भाई

 

गळ्यात हात टाकून

‘मावशी, मी मदत करू तुला?’ विचारणारी

ढमी

आणि

‘मुलीला मांडवात घेऊन या’ चा पुकारा झाल्यावर

डोळे भरून येणारी

मामी

 

कसे लोभस असतात ना?

 

मला मामीच्याच हातचे लाडू आवडतात

असं आईदेखत सांगणारी बिनधास्त

सखू

आणि

माहेरवाशिणीच्या गालावरून हात फिरवत

भरल्या आवाजात ‘येत जा गं घरी’ म्हणणारी

काकू

 

सगळी गुपितं विश्वासानं शेयर करणारी

मैत्रीण

आणि

‘बाकी काही तक्रार नाही हो

पण फार कमी जेवते तुमची मुलगी ‘

असं फोनवर सांगणारी

विहीण

 

किती प्रेमळ असतात ना?

 

वटपौर्णिमेला न चुकता शहाळं आणणारा

नवरा

आणि

‘आमटी फक्कड झालीय गं!

माझ्या आईची आठवण करून दिलीस,’ म्हणणारा

सासरा

 

ऑफिसातून परतल्यावर ‘बस घटकाभर’ म्हणत

वाफाळता चहा पाजणारी

शेजारीण

आणि

चेहरा पाहून नवरोजींचा मूड ओळखणारी

सोबतीण

 

कसे गोड वाटतात ना?

 

मुलांत मूल होऊन क्रिकेट खेळणारे

बाबा

आणि

सुनेच्या सकाळच्या गडबडीच्या वेळी

नातीला फिरवून आणणारे

आबा

 

‘काय मग फेसबुक?’ विचारून चिडवणारा

पण चांगल्या पोस्टला लाईक देणारा

मेहुणा

आणि

घरच्यासारखे राहून

सुखदुःखात सोबत करणारा

पाहुणा

 

इकडे तिकडे पळत हैराण करणाऱ्या नातवाला

गरमागरम वरण भात मायेने भरवणारी

आजी

आणि

मंत्रोच्चार करत करत सुरेख रांगोळी रेखाटणारे

गुरूजी

 

किती स्मार्ट दिसतात ना?

पांढराशुभ्र युनिफाॅर्म घालून

हाॅस्पिटलमध्ये धावपळ करणारी

सिस्टर

आणि आश्वासक हसत

आपल्या पेशंटचा शब्द न शब्द ऐकणारा

डाॅक्टर

 

ऑफिसात उशिरापर्यंत काम करताना

अचानक घड्याळाकडे लक्ष जाताच,

‘इसे कल निपटाते है, its too late! you want vehicle?’ विचारणारा बॉस…

 

आणि

किती सुखाचा, आनंदाचा असतो ना या सगळ्यांबरोबर होणारा आपला प्रवास…!!!

        

मित्रांनो हसत  जगा व नाती जपा आयुष्य खूप सुंदर आहे.

 

कवी :अज्ञात

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तिला विचारलं नाही… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

तिला विचारलं नाही… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

ज्या क्षणी पाहिले तिला

होकार गृहीतच धरला

मी तुला आवडलो का?

तिला विचारलंच नाही

 

सप्तपदी चालताना

घुटमळली पाऊले तिची

हुरहुर कसली होती?

तिला विचारलंच नाही

 

माप ओलांडताना उंबरठ्याचं

मी आलो सहज आत

तुलाही यावंसं वाटतंय का?

तिला विचारलंच नाही

 

झाली पहिली भेट

किती आतुर होतो मी

ओढ तुलाही आहे का?

तिला विचारलंच नाही

 

वंशाला दिवाच हवा

सांगून मोकळा झालो

पण आई व्हायचंय का?

तिला विचारलंच नाही

 

संगोपन करतांना मुलांचं

कसरत होत होती तिची

गरज माझीही लागेल का?

तिला विचारलंच नाही

 

आयुष्यभर दिली साथ

झाली सुख दु:खाची सोबती

कधी मन तिचं दुखलं का?

तिला विचारलंच नाही

 

न मागताच तिच्याकडून

घेतलं मी सारं काही

तुलाही काही हवं का?

तिला विचारलंच नाही

 

खरंच किती स्वार्थी झालो

गृहीतच धरलं मत तिचं

तिचं मन काय म्हणतं?

तिला विचारलंच नाही

 

आत्ता विचारलं तिला

सांग काय हवंय तुला?

वय तिचं केव्हा झालं?

समजलेच नाही समजलेच नाही

 

कवी :अज्ञात

संग्राहक  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘इमोशनल इंडिपेंडन्स…’ – लेखिका :श्रीमती मृदुल मृदू ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘इमोशनल इंडिपेंडन्स…’ – लेखिका :श्रीमती मृदुल मृदू ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

वयाच्या पंचेचाळीशीनंतर एक स्किल प्रत्येकाने आत्मसात करायला शिकलं पाहिजे ते म्हणजे…. emotional independance… म्हणजेच भावनिक दृष्ट्या समोरच्यावर अवलंबून राहणं हळूहळू सोडलं पाहिजे…

प्रेम द्यावं, care घ्यावी… पण मला कुणी प्रेम द्या, तर मी खूश, मला कुणी काही बोलाल तर मी रडणार, मला कुणी अपमानास्पद बोलाल तर मी ताबा सोडून रागात बोलणार, मला कुणी टाळलं की मी एकटं feel करणार, कुणी नीट बोललं नाही, की माझं मन वरखाली होणार आणि मी विचार करत बसणार की काय झालं असेल?… हे सगळं म्हणजे भावनिक दृष्ट्या आपण इतरांच्या प्रतिक्रियेवर आपलं मन अवलंबून ठेवणं आहे…हे थांबवायला हवं…

आपल्या खूश राहण्याचा आणि इतरांनी काही वागण्याचा अर्थाअर्थी संबंध नसतो … तो आपण लावतो.. बेसिकली, जग इकडचं तिकडे होवो, मी मेंटली स्टेबल राहणार, आनंदी राहणार, स्वतःला manange करत राहणार… हा एक निश्चय असतो, तो करायला शिकलं पाहिजे….

याने काय होईल?

1)लोकांमध्ये लक्ष लावून बसणं कमी होतं.

2) गॉसिप पासून आपण लांब राहतो.

3) आपल्याला खूश करण्यासाठी wrong कंपनी निवडण्यापासून आपण वाचतो.

4) कुणी कसंही वागलं तरी आपली मानसिक स्थिती ठीक राहते.

5) मन ठीक आणि शांत राहिल्याने तब्येत पण ठीक राहते.

6) आपण स्वच्छ चष्म्याने सगळ्यांकडे पाहू शकतो कारण मला कुणाकडून काही नकोय, हे आपण मनातून ठरवतो.

7) यामुळे लबाड नाती आपोआप दूर राहतात, स्वार्थ नसताना जुळलेली नातीच खरी टिकतात.

8) कुणी कसही वागो, ती जबाबदारी त्यांची असते. त्यापायी आपण स्वतःला त्रास करून घेणं थांबवतो.

9)मनाची स्थिरता वाढल्याने आपण जास्त active आणि creative होतो, आनंदी राहून काम करतो.

10)एकटे आलो, एकटेच जाणार आहोत, या अंतिम सत्याला आपलंसं करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे जातो…        

कुठेतरी आपण आणि दुसरे यात जी सीमा असते ती जाणून घ्यावीच लागते, या वयात ही detachment  जमू शकते कारण संसार निम्मा झालेला असतो(mostly).मुलं मोठी असतात, त्यांना आपापलं एक आयुष्य असतं. त्या पण दृष्टीने आपण त्यांच्यात ढवळाढवळ कमी करावी….

सगळ्यात महत्त्वाचं या वयाला आपली सेकंड इनिंग समजून काही चांगलं करण्यात मन रमवावं.

यासाठी emotionally independent असणं हे फायद्याचं ठरतं…. देवाघरी जाण्याआधी मन साफ करत जावं. ती process या वयात सुरू करावी… आपण स्वतःला माफ करावं, इतरांना माफ करावं आणि स्वतःला उत्तम कामामध्ये गुंतवून घ्यावं…. मदतीला तयार राहावं मात्र आपल्याला शक्यतो मदत घ्यायची नाही असं समजून स्वतःला सदृढ बनवावं मन आणि शरीराने…

याचा फायदा हा की चाळीशीपर्यंत भावनांमुळे आपल्याकडून झालेल्या चुका… किमान त्या नंतर आपण करणार नाही आणि एक stable शांत आणि समाधानी life जगण्यात एक पाऊल पुढे जाईल.

लेखिका :श्रीमती मृदुल मृदू

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हे साले मित्र सगळे असेच असतात… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

हे साले मित्र सगळे असेच असतात… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

हे साले मित्र सगळे असेच असतात,

चिडवून

सतावून

जीव 

नकोसा करतात,

तरीही नेहमी

हवेसेच

वाटतात….

 

लग्नापूर्वी प्रेयसीला पाहून

‘आयटम सही है’

म्हणून

चिडवतात,

लग्नानंतर

तिलाच

आदराने

‘वहिनी’

अशी हाक मारतात.

हे साले मित्र सगळे असेच असतात….

 

जेवताना एकमेकांच्या डब्यांवर

सगळ्यांचीच

नजर असते,

खास पदार्थ

सर्वांना पुरेल ,

याची मात्र

खात्री नसते.

पण…

एखाद्या दिवशी डबा नाही आणला,

तरी आपलंच ताट

इतरांपेक्षा जास्त भरतं .

हे साले मित्र सगळे असेच असतात…

 

नाक्यावरती गप्पा मारताना..

तीन में पाँच –

बिस्किट & चहाची अशी ऑर्डर सुटते,

बिल भरण्याची वेळ

आली की सर्वांचीच

पांगापांग

होते.

 

मात्र

अचानक

कधी बाबांना admit करावे

लागते,

“आहोत आम्ही पाठीशी,” म्हणत

advance

नकळत भरला जातो.

हे साले मित्र सगळे असेच असतात…

 

अवचित

एखादा प्रसंग ओढवला तर,

सख्खे

नातेवाईकही

पाठ

फिरवतात,

अशावेळी,

छळणारे हेच

मित्र

पाठीशी भक्कमपणे उभे राहतात,

रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचे नाते

श्रेष्ठ ठरवितात.

हे साले मित्र सगळे असेच असतात!

चिडवून

सतावून जीव

नकोसा करतात.

तरीही नेहमी हवेसेच

वाटतात…..

 

जी गोष्ट

आई वडिलांना

माहीत नसते,

ती मित्राला

माहीत असते..

 

जी गोष्ट

शिक्षकांना

माहीत नसते

ती मित्राला

 माहीत असते..

 

जी गोष्ट

 गर्ल फ्रेंडला

माहीत नसते

ती मित्राला

माहीत असते..

 

जी गोष्ट

बायकोला

माहीत नसते,

ती मित्राला

माहीत असते..

 

आई-वडिलांचं,

 एवढंच काय पण बायकोचंसुद्धा

 उष्टं खाताना

कधी कधी मन संकोच करतं

पण मित्राचं उष्टं मात्र बिनधास्त चालतं …

 

मित्रांवर जळलो असेल मनातून.

खरं आहे,

पण …

 

माझ्या पिंडीला

 कावळा कसा शिवेल,

 हे फक्त

मित्रालाच

 माहीत असतं.

 

 

शेवटी कोणी रडलं नाही तरी मित्र मात्र जिथे असेल तिथे

डोळ्यात पाणी काढेल,

 हे नक्की.

कवी :अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ श्रीमंत म्हणून जगा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

श्रीमंत म्हणून जगा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

बरेच ज्येष्ठ नागरिक, श्रीमंत म्हणून मरतात, पण श्रीमंत म्हणून जगत नाहीत!

स्थावर मालमत्तेमध्ये वरिष्ठ नागरिक मनाने गुंतलेले असतात, तसे हल्लीची पिढी करीत नाही. आधुनिक पिढी ही त्या बाबतीत भावनाहीन म्हणजे प्रॅक्टिकल आहे. पूर्वीच्या पिढीने मोठमोठी घरे बांधली, ती मुलांसाठी आणि नातवंडांसाठी देखील! कमावलेला सारा पैसा  बहुतेकांनी आपल्या पुढच्या पिढीचा विचार करतच खर्च केला. ना हे वरिष्ठ कुठे लांब सहलीला गेले, ना त्यांनी कधी परदेशात जाऊन लाखो रुपये खर्च केले. ना आठवड्यातून एकदा पिझ्झा मागवला, ना बर्गर! नाटक- सिनेमा सुद्धा वर्षातून दोन- तीन वेळा! पैसे फक्त मुलांसाठी राखून ठेवायचे, झालेच तर एक दुसरा फ्लॅट घेऊन ठेवायचा, जो स्वतःसाठी काही उपयोगाचा नाही. शहरात राहात असतील तर गावी घर बांधायचे, जमीन विकत घ्यायची, असे उद्योग केले.

परिणाम काय झाले?  तर मुलांना आधुनिक शिक्षण दिले, जे फक्त आणि फक्त नोकरीभिमुख आहे.  कुठलीही शाळा, किमान भारतातील तरी, व्यवसाय वा धंदा किंवा उत्पादनाभिमुख उद्योग कसा करावा हे शिकवित नाही. डॉक्टर होण्यासाठी साधारण एक कोटी रुपये लहानपणापासून खर्च येतो. मग तो वसूल करण्यासाठी, सर्व नसतील तरी बहुतेक सारे नवीन डॉक्टर, डॉक्टरी म्हणजे सेवा व व्यवसाय नसून धंदा या दृष्टीने पाहायला लागलेत. त्यामुळे औषधे व उपचार या दोन्हींमध्ये भ्रष्टाचार व स्कॅम सुरु आहेत. इंजिनियर होऊन दहा हजारातील एक मुलगा  उत्पादनप्रणित उद्योगांकडे वळतो. बाकीचे ९९९९ इंजिनिअर फक्त इतर शहरात किंवा परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीच्या मागे असतात. स्थिर होईपर्यंत पाच सात कंपन्या सोडलेल्या असतात. आपल्या मूळ गावी न राहिल्यामुळे, इतर ठिकाणी, दुसऱ्या शहरात वा परदेशात कायम वास्तव्य करायचे ठरवल्याने इथल्या मालमत्तेमध्ये नवीन पिढीला अजिबात रस नसतो! पुढील पिढीला हे घर, जमीनजुमला याकडे पाहायला, त्याची निगा राखायला वेळ नाही. आणि त्यांना त्यात रस नाही, निष्ठा नाही. मग आईवडिलांचे निधन झाल्यावर काही मुले ती जमीन, घर विकून पैसे घेऊन निघून जातात. परदेशात राहाणारी कित्येक मुले मुली, आईवडील जिवंत असताना येत नाहीत, वेळ नाही या सबबीवर! पण ते वर गेल्यावर मात्र त्यांना इथे सारे आर्थिक हिशोब निपटायला एक- दीड महिन्याची रजा मिळते.  हे मी अनुभवले आहे. बँकेत अशा काही मुलांचा, जेष्ठ नागरिकांचा अनुभव आलेला आहे. आश्चर्य म्हणजे मागील पिढीचा मोह, मुलांविषयीच्या अपेक्षा काही कमी होत नाहीत. सगळ्या स्थावर व बँकेतील पैशांना वारस म्हणून आपल्या मुलाला वा मुलीलाच ठेवतात, जे दूर राहून, परदेशी राहून, कधी आईबापाच्या आजारपणातदेखील भेटायला न येणाऱ्या ह्या मुलांना, ते गेल्यावर एक छोटी मोठी लॉटरीच लागते ! हे मी अनुभवांती बोलतोय. कारण मी वीस- पंचवीस वर्षे पब्लिक रिलेशनमध्ये काम केले आहे.

हे वरिष्ठ नागरिक, पूर्वीची पिढी सोन्या चांदीचे दागिनेही आपल्या मुलाबाळांसाठी करून ठेवतात. हल्लीच्या पिढीला जुन्या नक्षीकामाचे दागिने पसंत नाहीत, तर पाश्चात्य लोकांप्रमाणे नव्या डिझाईनचे / खोटे म्हणजे इमिटेशन ज्वेलरी पसंत आहे. म्हणजे त्याचाही हल्ली काही उपयोग नाही.

नवी पिढी पैसे कमावणे आणि पैसे खर्च करणे एवढेच जाणते! पण त्यांना पैसे कमावण्यायोग्य ज्या पिढीने केले, त्यांचे अनुभव, त्यांची आस्था, प्रेम, निष्ठा याच्याशी नवीन पिढीला काहीही कर्तव्य नाही. पूर्वीच्या पिढीने आपल्या कर्तव्यापुढे आपली मौजमजा बाजूला ठेवली. गरजेनुसारच खर्च केला. पण मुलांना अगदी कुठल्याही अडचणींशिवाय, त्रासापासून मुक्त असे वाढविले. जे आपल्याला मिळाले नाही, त्याची वानवा नव्या पिढीला पडू नये, याची काळजी घेऊन उच्च शिक्षण त्यांच्या क्षमतेनुसार दिले. पण बरेच वरिष्ठ आपल्या पुढच्या पिढीला हवे तसे चांगले संस्कार देण्यात कमी पडले , कमी पडत आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे.

आपले आईवडील आपल्याला परिस्थितीची जाणीव देत असत. आपण गरीब आहोत, की मध्यमवर्गीय, हे मुलांना ठाऊक असे. पैसेवाले देखील आपल्या मुलांचे पाय जमिनीवर राहावेत याची काळजी घेत. पूर्वी अगदी क्वचित कोणी बाईक वा कारने शाळेत येत असे. अन्यथा श्रीमंत मुले फार तर सायकलवर येत. पूर्वीच्या पिढीने खाऊ वाटताना आपला- परका असा मुलांमध्ये भेदभाव केला नाही. हुशार विद्यार्थ्यांना काही श्रीमंतांनी मदत केली पुढे जायला.आता मात्र चित्र बदलले आहे. नवी पिढी बऱ्यापैकी स्वार्थी झाली आहे, अन ह्याला कारण पूर्वीचीच पिढी आहे. नवी पिढी स्वतःच्या सुखाकडे म्हणजे ऐहिक सुखाकडे जास्त लक्ष देत आहे. टी व्ही, फ्रिज, कार, लॅपटॉप, नवनवे मोबाईल, बाईक, स्कुटी आणि घरातील इतर सुखसोयी त्यांना नाते वा संस्कार यापेक्षा जास्त महत्वाच्या वाटतात!

वरिष्ठ आता आपला भार मुलांवर पडू नये, असे शक्यतो पाहातात. पण हल्ली नातवंडांची जबाबदारी देखील, जर एकत्र राहात असतील तर घेतात.

ही जी जबाबदारीची आणि कर्तव्याची जाणीव मागील पिढीला होती व आहे,तीच जाणीव आताच्या पिढीमध्ये कमी होत चालली आहे.

आधीच्या पिढीने आता हे ध्यानात ठेवावे, q की आयुष्यमान वाढते आहे, राहणीमान महाग होते आहे, अशा वेळी तुम्ही स्वतःकडे केव्हा पाहाणार आहात? आपली संपत्ती आपल्या मृत्यूनंतर इथेच राहाणार आहे. पुढील पिढीला ती आयती संपत्ती मिळाल्यावर त्यांना त्या संपत्तीचे मोल असणार नाही. कारण रुपयाचे अवमूल्यन कमी होत आहे. कालचे तुमचे हजार रुपये आज एक रुपया समान आहे. आता तरी पुढील पिढीच्या सुखासाठी आपले सुख बाजूला सारु नका. तुम्ही त्यांना कमावण्यायोग्य बनवले आहे. ते त्यांचे जीवन जगत आहेत. तुम्हीही तुमचे जीवन जगा.

जीवनाचा आनंद घ्यायला आता तरी शिका. बरेच भारतीय आपले जीवन कंजुषपणाने जगतात, काटकसरीने खर्च करतात ते केवळ पुढील पिढीने श्रीमंत व्हावे, त्यांना काही कमी पडू नये म्हणून.पण आता हे बंद करा. स्वतःसाठी जगायला शिका. स्वतःचे छंद, इच्छा यावर खर्च करा. राहिलेल्या इच्छांची एक यादी करा. त्या यादीतील एक एक इच्छा पुरी करण्यासाठी जगा. जुन्या मित्रमैत्रिणींना भेटा!

साठ- पासष्ठ म्हणजे काही मरण्याचे वय नव्हे! आता अजून किती दिवस जगणार आहोत, हा विचार सोडा. समजा, तुम्हाला परमेश्वराने नव्वद ते शंभर वर्षांचे आयुष्य दिले असेल तर अजून तुमच्याकडे वीस- पंचवीस किंवा तीस वर्षे शिल्लक आहेत, जी तुम्ही पूर्णपणे स्वतःसाठी जगू शकाल.पुरे झाले आता इतरांसाठी जगणे. “आता आपले काय राहिलेय..?” हा विचार करीत राहाल तर शेवटची काही वर्षे आजारपणात, इतरांच्या वर अवलंबूनराहत काढावी लागतील, हे लक्षात ठेवा.

दीर्घायुषी व्हा, निरोगी राहा. गरीबीत भले जन्माला आला असाल, श्रीमंत म्हणून फक्त मरू नका, तर श्रीमंतीत जगा! मस्तीत राहा, लहान लहान गोष्टीत आनंद मिळवा!

लेखक :अज्ञात

प्रस्तुती :सौ.शशी नाडकर्णी – नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वंगण…” – लेखिका: श्रीमती मनस्वी समीक्षा ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “वंगण…” – लेखिका: श्रीमती मनस्वी समीक्षा ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆

सकाळच्या गडबडीत नेमकी ट्राँली बाहेर ओढताना अडकली.

धड ना आत धड ना बाहेर.

वैतागच!

नेमके चहा साखरेचे डबे आत अडकले!

आतल्याआत चडफड नुसती. आता सुतार बोलवावा लागणार.

एवढ्याशा कामाकरता तो आढेवेढे घेणार. नाहीतर बजेट वाढवून

या कशा मोडीत काढायला झाल्यात याची गाथा वाचणार. ‘आजकाल मॉड्यूलर किचन कसं जोरात चाललंय. माझी इकडे कामं आणि तिकडं कामं… ‘ सगळं क्षणात मनात आणि डोळ्यांसमोरुन तरळूनच गेलं.

जोर देऊन जरा ओढून बघितलं तर कड्कट् आवाज काढलाच तिने.

लादी पुसायला आलेल्या मावशी म्हणाल्या, खोबरेल तेलाचं बोट फिरवा ताई.. कडेच्या पट्टीवर. सरकेल. तात्पुरते तरी निभावेल.

चांगली आयडिया! मी पटकन तेलाचं बोट फिरवलं.

दोन मिनिटांनी ट्रॉली मऊसरपणे आतबाहेर डोकावली. कसलं भारी काम झालं एकदम!

मी एकदम आनंदाने तिला धन्यवाद देत म्हटलं, ” बरं झालं बाई वेळेत आलीस. नाहीतर

चहा पावडर विकत आणावी लागली असती. “

ती हसली, “वंगण लागतंय, ताई. थेंबभर पुरतं. पण लागतं कधीमधी. ते मिळालं की सगळं सुरळीत होऊन जातं बघा क्षणात!”

खरंच. वंगण लागतं!

फक्त मशीन, वस्तूंनाच नाही, तर माणसालाही.

 त्याच्या देहाइतकंच मनालाही. अगदी नात्यांनाही वंगण अवश्यक आहे.

चार चांगल्या शब्दांचं, आश्वासक स्पर्शाचं, सदिच्छांचं, विचार वाचनाचं, सूरमैफिलींचं, श्रद्धा-भक्तीचं, नजरेतल्या भावाचं, योगनिद्रेचं, कलाकल्पनेचं!

की जे मनाला मोडकळीस येण्यापासून वाचवतं. मरगळ येउन कोरड्या ठक्क पडलेल्या वृत्तीवर हे वंगण पुर्ववत जगण्याकडे अलगद घेऊन जातं.

लहानपणी आजी सगळ्या नातवंडांना ओळीत बसवून चहाबरोबर एरंडेल पाजायची.

प्यायचं म्हणजे प्यायचं.

कितीही आदळाआपट केली तरी ती तिचा हेका सोडायची नाही. पोट- आतड्याचं ते वंगणच आहे. महिना दोन महिन्याने एकदा घेतलं की पोटाचं काम निर्धोक चालू राहतं. आणि तुम्ही मग आबरचबर हादडायला मोकळे.

कानात तेल, नाकात दोन थेंब तूप, डोक्यावर बुधलीभर कोमट तेल शनिवारी रात्रीचा हमखास वंगणाचा कार्यक्रम कित्येक वर्षे आमच्या पिढीने खरं तर अनुभवला.

रात्री झोपल्यावर कधीतरी काशाच्या वाटीने तळपाय घासून द्यायची. शरीरातल्या उष्णतेवरचं तिचं ते वंगण होतं.

खरं तर जन्मापासून हे वंगण वेगवेगळ्या रुपात आपली सोबत करत राहतं.

आपले शारीरिक, आर्थिक, मानसिक मार्ग निर्धोक करत राहतं, कारण स्निग्धता हा भाव ओतप्रोत या वंगणात भरलेला आहे.

जाईल तेथे मऊपण पेरणं, कोरडेपण, गंज मिटवणं आणि पूर्वस्थितीत आणून सोडणं.

हा (स्व)भावच आहे वंगणाचा!

क्षमा, सोडून देणं, माघार घेणं, प्रसंगानुरूप मदतीला जाणं, हळुवार फुंकर घालणं, स्वच्छ शुद्ध अंतःकरणाने समोरच्याच्याशी शांतपणे बोलणं, हेही नाती जपण्यासाठी लागणारं एक प्रकारचे वंगणच आहे.

वंगण नसतं तर जगात फक्त खडखडाटच ऐकू आला असता, असं मला नेहमी वाटतं.

जीवनातले स्निग्धांश संपले तर फक्त कोरडेपण उरेल.

आणि कोरडेपण क्षणात भस्मसात होउन जातं!त्यामुळे जगण्यात येणारे हरएक प्रकारचे वंगण जपणे आणि प्रसंगी ते वापरणे फार आवश्यक आहे.

निर्जीव मशीनसामुग्रीला जिथं त्याचं महत्त्व समजतं तिथं तुमच्याआमच्यासारख्या जिवांनी ते जाणलंच पाहिजे. त्याचं जतन केलंच पाहिजे.

तरच जगणं लयीत, सुसह्य होत राहील! हो ना?

लेखिका : श्रीमती मनस्वी समीक्षा

प्रस्तुती :श्रीमती राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares