मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोगराच तो शेवटी… लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? जीवनरंग ?

☆ मोगराच तो शेवटी… लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆

“काय गं …!!! कालच तुला खडसावून सांगितले, की बंगल्याच्या भिंतीला पण स्पर्श करायचा नाही… तरी तू आज परत आलीस फुलं मागण्यासाठी…???”

ती कळकट मळकट फ्रॉक घातलेली ८-९ वर्षांची मुलगी अत्यंत  केविलवाणा चेहरा करून करुणेच्या स्वरात आवाजात कापरं भरत बोलली  “….. ताय वंजळभरच पायजेती, द्या की व. तुमच्या झाडाला हायती बी फुलं म्हणून मागत्या. इथं कुठंच येवढी फूलं नायत, फकस्त तुमच्याच बंगल्यात हायत.” …. ती आठ नऊ वर्षांची मुलगी काकुळतीला येऊन अनघाला तिच्या बंगल्यातील मोगऱ्याची फुले मागत होती.

“नाही म्हणून सांगितले ना. निघ इथून…” असं म्हणून अनघा बंगल्यात गेली. ‘कुठून कुठून येतात फुलं मागायला. काय फुकट येतात का.’ असं एकटीच बडबडत होती

तेवढ्यात तिचा नवरा राघव आला. “काय झालं, कोणाला बडबडतेस ? इथे तर कोणीच दिसत नाही ?”

“अहो गेले आठ दिवस झाले, एक मुलगी मोगऱ्याची फुलं मागायला येतेय. देवाला पाहिजेत म्हणे. एवढीच हौस आहे तर घ्यायची ना विकत.”

राघव – “अनघा !!! अगं ती फुलं तर मागतेय. द्यायचीस ना. तसंही मोगरा किती लगडलाय फुलांनी.”

अनघा अभिमानाने म्हणाली – “हो, फुलं खूप लागली आहेत, पण त्याच्या मागे माझे किती कष्ट आहेत. अख्ख्या गल्लीत कुणाच्याच बंगल्यात झाडाला एवढी फुलं नाहीत, फक्त माझ्या दारात. आणि खूप निगा राखावी लागते झाडांची, फुकट नाहीत येत. खत, वेळेत कटिंग, पाणी, आणि तुम्हाला माहिती आहे ना मी रोज पूजा करताना देवाला भरपूर फुलं वाहते. सगळ्या देवांच्या फोटोंना ताजे हार घातल्याशिवाय पूजा केल्याचं समाधान नाही मिळत मला.”

राघव – “अगं एक फूल वाहिलं तरी देवाला पुरेसं असतं. दिलीस चार फुलं त्या मुलीला तर जाणार आहेत देवाच्याच पायाशी. तू वाहिली काय अन् त्या छोट्या मुलीने. देव तर एकच आहे.”

अनघा – “ओ तुमचं लॉजिक तुमच्या जवळ ठेवा. माझे कष्ट आहेत त्यामागे.”

“अनघा – एक सांगू !!!! असं दारातून रिकाम्या हाताने पाठवू नये कुणाला आणि काय फुलं तर मागतेय ना .. तिने कुठे तुला जेवण किंवा पैसे मागितले. आपल्याकडे आहे त्यातलं थोडं द्यायला मनही तेवढं मोठं असावं लागतं. अनघा !!!! तुला समजवायचं काम केलंय, ऐकायचं का नाही ते तूच ठरव.”

अनघा – “बरं !!! उद्या आली मागायला तर देईन चार फुलं, तेही तुम्ही सांगता म्हणून..”

राघव – “बरं.  पण जरा प्रेमाने दे. रागे नको भरू त्या छोट्या मुलीला.”

अनघा – “हं !”

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दारात ती मुलगी उभीच. राग आलेला, पण राघवसाठी देते. ” ये मुली, थांब तिथंच, देते फुलं.” छोट्या पिशवीत पंधरा वीस फुलं तोडून टाकली. तिच्याजवळ जात म्हटलं ..

” उद्यापासून यायचं नाही फुलं मागायला !!!!!”

ती मुलगी — अडखळत अडखळत–  ” ताय, ते आठ दिस फुलं पायजेती. देशीला का ? “

अनघा – “आठ दिवस रोज !! कशाला ??”

” ते कोपऱ्यावर महादेवाचं देऊळ हाय बघा, तिथं द्याला मायला पायजे व्हती.” तिची नजर खाली पायाकडं, चेहऱ्यावर निर्विकार भाव. ती बोलली. आवाज खूप लाघवी, हळू. ” माय देवाला बोलली हाय ‘आठ दिस ताजी फुलं पायाशी घालीन’.”

अनघा – (मनात )- ‘म्हणजे नवस’. तिला जोरात ओरडत…  ” देवाला अर्पण करायला मागून फुलं… घे जा ना विकत, देवळाच्या बाहेर मिळतात पाच दहा रुपयांत.”

मुलीचा चेहरा खाडकन उतरला, “ताय ….ते… पैसं रोज…… एवढं..”

अनघा – ” कळलं !! नाहीयेत ना पैसे. बोलताच कशाला गं मग असं देवाला. आपल्या कुवतीनुसार बोलावं.”

ती काहीच न बोलता फुलांची पिशवी घेऊन खाली मान घालून निघून गेली.

अनघाला मात्र आपण जरा जास्तच बोललो ह्याची सल मनाला लागली. उद्या येईल का ? नाही येणार बहुतेक. किती बोललो, ते ही फुलांसाठी. आज ताजी असणारी फुलं नाही तोडली तर उद्या सुकून कोमेजून तर जाणार आहेत. तिनं खिडकीतून बाहेर पाहिलं, मोगराही थोडा नाराजच दिसला. ‘जावू दे, उद्याचं उद्या पाहू’ असं म्हणत ती कामाला लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी दारात ही बया उभीच. अनघाला मनात हुश्श वाटलं, ‘आली बाई आज परत….’

“ताय…….” तिने हाक मारली.

अनघा – “हो आले, देते फुलं. कुठं राहतेस गं ?”

ती – “गावाच्या बाहेर पडकी साळा हाय, तिथ.”

अनघा- “घरात कोण कोण आहे ??

ती – ” माय, बा, मोठी बहण, दोन भाव. आज्जी बी हाय पण ती लाम गावी असत्या.”

अनघा – “बरं बरं. घे फुलं आणि निघ.”

ती – “जी ताय.”

आठ दिवस न चुकता ती मुलगी फुलं न्यायला येत होती. आपण खूप मोठं काम करतोय, दानधर्म वगैरे… अनघाच्या चेहऱ्यावर किंचितशी अभिमानाची लकेर उमटली. स्वतःशी हसत अनघा म्हणत होती – 

‘रोज फुकट फुलं दिली, देवही नकळत आपल्यावर खूष असणारच. मी फुलं दिली म्हणून तिच्या आईचा नवस पूर्ण झालाय, नाहीतर तिला विकत फुलं घेणं शक्यच नव्हतं ‘ —

एकटीच बोलत होती इतक्यात राघव तिथे आला. “काय एकट्याच गालात हसताय .”

अनघा – ” काही नाही रे राघव, ती मुलगी फुलं न्यायला आठ दिवस न चुकता येतं होती, पण आता ह्या दहा बारा दिवसात कुठे आलीच नाही.”

राघव – “अगं आता कशाला येईल, तिला आठच दिवस फुलं हवी होती ना ! तसंही तुला तिचं फुलं मागणं आवडतं नव्हतं.”

अनघा – “अरे पण एकदा परत येवून आभार तरी मानायचे तिने माझे. लोकं केलेले उपकार असे विसरतात, म्हणून कुणाला काही देवू नये. तू सांगितलेलं ना म्हणून न चिडचिड करता फुलं दिली आठ दिवस. रोज ….”

राघव हसला. 

अनघा – “काय झालं ??”

राघव – “काही नाही.”

तेवढ्यात बाहेरून हाक आली–  “….ताय व ताय….!”

हा तर त्या मुलीचा आवाज. दोघंही बाहेर आली तर दारात ती मुलगी उभी.

अनघा – ” काय आज पण फुलं पाहिजेत का ? आधीच सांगते, नाही देणार. आज फुलं थोडी कमीच लागली आहेत. मला देवपूजेला पाहिजेत.”

ती – “…फुलं नको ताय ……ते…. हे….. हे….”  हातात मळकट फडकं होतं, आणि  त्यात काहीतरी गुंडाळलेले.

अनघा – “काय…. .ते….. हे……”

ती – ” ताय !!!! ते मोठी बहण बाळतपणाला आल्या. ‘ यवस्थित  बाळ हु दे ‘ म्हणून माय नवस बोलल्याली माहदेवाला. तुम्ही फुलं दिली, आयचा नवस पुरा झाला. परवा दिशी मुलगा झाला बहयणीला. यवस्थित हाय सगळं. माझा बा दगड फोडतो आणि मुरत्या बनीवतो. ताय, बा नं हे बनीवलं हाय तुमच्यासाठी. ‘तुमचं उपकार जन्मभर नाय इसरणार’ –बा बोललाय आसं… अन् माय म्हणली ‘ कुणाचबी काय फुकट घेव नी. आपल्या परीनं परत द्याव.’ म्हणून हे…. घ्या……”

अनघाने ते मळकट फडकं हातात घेतलं. उघडून पाहिलं. अतिशय सुरेख, सुंदर, रेखीव अशी, दगडापासून घडवलेली विठ्ठल रखुमाईची मूर्ती. किती तेजस्वी, आनंदी, सात्विक आहेत दोन्हीही मूर्ती. अनघा आनंदून गेली.

अनघा – त्या मुलीला म्हणाली,  “अगं ऐक !!!”

पण ती मुलगी नव्हती तिथं. पटकन मूर्ती देवून निघूनही गेली. अनघाचे आभाराचे दोन शब्द ऐकायलाही नाही थांबली ती. 

अनघाचे डोळे पाण्याने डबडबले आपण किती खुजे, संकुचित… एका क्षणात खूप लहान ठरलो हिच्यापुढे. सारा गर्व, अभिमान एका झटक्यात गळून पडला…… एखाद्याची कुवत ठरवणारे आपण कोण, का हिने न बोलता आपल्याला आपली कुवत दाखवली……  

मोगऱ्याचा सुगंध साऱ्या अंगणात दरवळला. आज तो रोजच्यापेक्षा जास्त टवटवीत बहरलेला वाटला……

आपण पण अहंकाराला गंगेत अर्पण करावं … मग बघा संसाराचा मोगरा पण कसा बहरतो ते….. !!!

लेखक – अनामिक

प्रस्तुती : मेघ:शाम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बायकोतली आई… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ बायकोतली आई… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“गप्प बैस गं, काय कटकट लावली आहेस सकाळपासून, इथे आधीच टेन्शन कमी आहे का..? तुला जी भाजी वाटते ती कर, मी काही म्हणणार नाही…” तो खेकसला तिच्यावर.

तशी आवंढा गिळून बळचं हसु चेहऱ्यावर आणत ती स्वयंपाक घरात आली. “चालेल त्यांना भोपळ्याची भाजी,” असं कापऱ्या आवाजात म्हणाली…

सासुबाईला बाहेरचा त्याचा कडाडणारा आवाज ऐकू आलाच होता, त्याचा चहा घेऊन त्याच बाहेर गेल्या. त्याच्याजवळ बसत म्हणाल्या, “सध्याच्या परिस्थितीमुळे आर्थिक ताण आहेत ह्याची तिलाही जाणीव आहे, म्हणून तर गेल्या दोन महिन्यात तुला रुपया न मागता स्वतःच्या भिशीचे पैसे ती घरात वापरतीये. पैठणी भिशीतून तरी घेऊ म्हणत अगदी रंग देखील ठरवला होता तिने, पण तुझ्यावरचं आर्थिक संकट बघुन माघार घेतली, तो पैसा घरात वापरला. तिची छोटीशी सन्मानाची नोकरी ह्या कोरोनाने गेली, नाहितर हातभार लावतच होती ना ती संसाराला, आणि अगदी रस्त्यावर, उघड्यावर येण्यासारखी परिस्थिती नाही झालीय आपली.. हा, सगळे शानशोक बंद झाले, पण ते तसे अन्न, वस्त्र, निवारा ह्या तीन गरजांव्यतिरिक्त होते, मग आहे त्यात समाधान मानायचं सोडून चिडचिड करून जगण्यातली मजा का घालवतोस रे?’ म्हणत आई जरा रागावली त्याला…

तितक्यात त्याचा फोन वाजला, कामावरच्या राजूचा होता. तो उठून बाल्कनीत गेला. मिस कॉलच होता तो, आता त्याला कॉलबॅक करणं आवश्यक होतं. कारण बांधकामाच्या साईटवरचा तो अगदी खास माणूस होता, पण गेल्या दोन महिन्यापूर्वी एका साईटवर काम करताना हॅण्डग्रँडर हातातुन निसटून पूर्ण गुढघ्याला वळसा घालून गेलं होतं, रक्ताची कारंजी उडाली होती आणि राजू त्या दिवसापासून कामावर नव्हता.….

राजूच्या बायकोने फतवाच काढला होता, लंगडत, धडपडत कामावर जायचं नाही, तर पूर्ण बरं वाटेल तेंव्हाच जायचं. त्यामुळे ह्या दोन महिन्यांत भेट नव्हती त्याची. खरंतर फार गरज होती त्याची कामावर. खूप विश्वासू होता तो.

‘बहुतेक हा कामावर येईल आता म्हणूनच फोन असेल…’ असा विचार करत त्याला कॉलबॅक केला,.. “हॅलो बोल राजू,.. येतोस कामावर आज??”

तिकडून आवाज आला.. “सर, कामावर दोन दिवसात येईन पण आज मला थोडे पैसे पाहिजे होते, उद्या मदर्स डे आहे. पोरगा त्याच्या आईसाठी भेटकार्ड बनवत होता तेंव्हा मला कळलं. मला आईला साडी घ्यायची आहे. थोडे पैसे देता का,..?

त्याचं वाक्य पुर्ण होण्याच्या आत हा हसायला लागला.. “अरे राजा, तूझं डोकं आहे ना ठिकाण्यावर, अरे तुझी आई दोन वर्षांपूर्वी वारली ना, मग कोणाला गिफ्ट देतोस तू,..?”

राजू तिकडून म्हणाला, “हसू नका साहेब, ह्या दोन महिन्यात माझी बायको माझी आई झाली होती. लहान लेकरासारखं तिनं माझं सगळं केलं. अगदी खाऊ सुद्धा घातलं, तिनं पाच पाच घरं जास्त भांडी घासायची कामं घेतली. माझ्या कमाईची तिनं भरपाई केली, मला कुठलाही ताण घेऊ दिला नाही.

आता मी पूर्ण बरा झालोय सर.. आपल्या त्या साईटच काम मीच पूर्ण करीन.  पण मला थोडे पैसे द्या.. बायकोला सेमी पैठणी घेऊन देतो.. पैठणी नाही पण सेमिपैठणी तरी घालायची आहे तिला, आणि खूप फोटो काढायचं स्वप्न आहे तिचं….

माझ्या मित्राचं साड्यांचं घरगुती दुकान आहे, तो म्हणाला, ‘तू ये, देतो तुला..’ मला तीन हजार द्या सध्या,.. आपलं काम पन्नासच ठरलेलं आहे ना, मी नक्की करीन ते पूर्ण, आणि आईला नाही कधी साडी घेऊ शकलो पण आता ह्या बाईत गावलेल्या आईला तरी घेऊ द्या.. साईटवर येऊ का पैसे घ्यायला..?”

गडबडत हा म्हणाला, “हो, तासाभरात ये..” म्हणत याने फोन ठेवला आणि सहज बाल्कनीत नजर फिरवली.. छोट्या छोट्या कुंड्यात, वाफ्यात बराच भाजीपाला लावलेला होता.. वेलाला दोडकी, कारली लटकत होती.. कडीपत्ता हवेवर डोलत होता.. आपण एक दिवस ओरडलो होतो.. ‘किती खर्च करता त्या भाजीपाल्यावर,..?’ त्याचं हे उत्तर होतं, त्याकडे आपलं लक्ष पण नाही.

राजूसारखा माणुस त्याच्या बायकोची किती किंमत करतो आणि आपण हिला किती गृहीत धरतो.. आई म्हणते तसं इतकीही आपली परिस्थिती बिकट नाही, फक्त मन बाहेरच्या परिस्थितीने गडबडलं आहे.. आपण उगाच ह्या घरच्यांना धारेवर धरतोय..

तो विचार करत होता तेवढ्यात आईने हाक मारली, “डबा तयार आहे रे….”

निघताना तो हळूच आईला म्हणाला, “हिने भिशी कोणत्या रंगाच्या पैठणीसाठी लावली होती गं, आणि तुझ्याकडे होती ना एक पैठणी.”

आई म्हणाली, “अरे मला मेलीला आता ह्या कॉटन शिवाय काही सहनही होत नाही… म्हणून तुझ्या ताईने पळवली ती तुझ्या लग्नाआधीच, नाहीतर हिला दिलीच असती की मी. आणि माझी जांभळी होती रे, तिला हिरवीगार पैठणी घ्यायची आहे. आता कधी योग येतो की बिचारीला,….?”

साईटवर राजू वाटच बघत होता.. ह्याने त्याला पैसे दिले आणि म्हणाला, “राजा मलाही घेऊन चल ना त्या दुकानात.. मलाही बघू दे साडी, आईला आणि बायकोला घेतो.”

सेमीपैठणीतून राजाने लाल रंग निवडला. ह्याने पण हिरवा रंग घेतला व आईला कॉटनची साडी घेतली.. दुकानाबाहेर पडताना त्याने पाणावलेल्या डोळ्यांनी राजाचे आभार मानले.. “आई तर आहेच माझी, पण बायकोतली आई शोधून दिलीस तू,..”

दुसऱ्या दिवशी दोघींना सोफ्यावर बसवल्ं, औक्षण करून त्यांच्या डोक्यावर फुलं टाकत म्हणाला.. “हॅप्पी मदर्स डे, मला माहित आहे आई तुला ही पाश्चिमात्य पद्धत आवडत नाही. मनात प्रेम तर असतंच, पण मला वाटतं प्रेम व्यक्त करायला ठरवला एखादा दिवस तर काय हरकत आहे ना, आणि तो ही आईसाठी आहे.. सेलिब्रेशन घरात तर करतोय..” म्हणत त्याने साड्या दोघींसमोर धरल्या… तिला खूपच आवडला तो हिरवागार रंग.. आईचे तर डोळेच पाणावले, “अरे मला कशाला आणत बसलास ॰..?”

त्याने आईला जवळ घेतलं, “आई सुनेसाठी मला समजवणारी ग्रेट आई आहेस तू.. तुला तर पाहिजेच, आणि राणीसरकारची भिशी सगळा घराचा खर्च पेलतीय तर त्यासमोर ही तर छोटीशी भेट आहे.. पण पुढच्या वेळी अगदी ओरिजनल पैठणी घेईन मी तिला.. आणि तेही मदर्स डे ला.. कारण बघ ना, ती बायको असली तरी.. मला मुलासारखं समजून तर पटकन सावरून धरलंय तिने. आपले अहंकार बाजूला सारून जी बाई नवऱ्यावर प्रेम करू शकते ना आई, ती त्याच्या बायकोतली आई असते…”

आईने त्याच्या डोक्यावर हात फिरवला…. “अरे प्रत्येक स्त्री मध्येच हे आईपण असतं रे….”

तितक्यात राजूने व्हिडीओ कॉल केला “साहेब तुमचे आभार, आमची आई एकदम खूश आहे बघा..” ती कष्टाने रापलेली त्याची बायको त्या साडीत आनंदी दिसत होती, आईने तिचं फोनवर कौतुक केलं.. नवऱ्याने आपला समाजात वाढवलेला सन्मान बघून ती आणखीनच खुलली.

फोन ठेवला तर समोर.. ही पैठणी नेसुन आली. त्याला ती आताही आपल्या आईसारखी दिसली, अगदी शांत, समाधानी, आनंदी.. गॅलरीत बहरलेल्या हिरव्यागार बागेसारखी..!

 © सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

मो +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खिचडी – भाग – २  ☆ प्रा. बी. एन. चौधरी ☆

प्रा. बी. एन. चौधरी

(प्रा. बी. एन. चौधरी (लेखक / कवी / गझलकार / समिक्षक / व्यंगचित्रकार / पत्रकार) यांचे ई – अभिव्यक्ती समूहातर्फे स्वागत आणि या पुरस्काराबद्दल हार्दिक अभिनंदन.)

? जीवनरंग ?

☆ खिचडी – भाग – २  ☆ प्रा. बी. एन. चौधरी

(साहित्य संस्कृती मंडळ, बऱ्हाणपूर, म. प्र. आयोजित अ.भा. कमलबेन गुजराती मराठी कथा लेखन स्पर्धेतील प्रथम पुरस्कार प्राप्त कथा)—-  

(तोच त्यांचं लक्ष आतल्या दाराकडे गेलं. तिथं सुभाष होता. तो आत काय करतोय हे पाहण्यासाठी त्यांनी  हळूच आत डोकावलं.) इथून पुढे —- 

सुभाषनं हातातली पिशवी जवळच्या लाकडी कपाटावर ठेवली. दोन खांबांना बांधलेल्या झोळी जवळ तो गेला. झोळीत लहान बाळ होतं. ते पडू नये म्हणून त्यास साडीच्या फडक्याने बांधलेलं होतं. त्याने फडक्याची गाठ सोडली. झोळीतून चार पाच वर्षाच्या लहान मुलीला बाहेर कढलं. ती रडून रडून थकली असावी. तिचे केस अस्ताव्यस्त होते. त्याने हातानेच तिचे केस व्यवस्थित केले. हातातलं फडकं जवळ पडलेल्या तांब्यातील पाण्यात बुडवून ते त्याने त्या लहान मुलीच्या चेह-यावर फिरवलं. आता तिला हुशारी आली होती. ती भावाकडे बघून खुदकन हसली. त्याला प्रेमानं बिलगली. त्यानंही तिला ” छकूली माझी ! ” म्हणत पोटाशी लावली. मग तो तिला म्हणाला…..

“छकुली बघ मी तुला काय आणलं, ओळख ? “

लहान छकुली आश्चर्याने त्याच्याकडे पहात म्हणाली…..

” दादा, ताय आणलं तू माझ्यासाठी ? “

” छकुली, अगं तू रात्री खिचडी मागत होती नं आई जवळ ? ….. रात्री आईला खिचडी देता आली नाही नं 

तुला ! ……. म्हणून तूला खिचडी आणली बघ शाळेतून ! ….. गलम गलम खिचडी आहे.”

असं म्हणत सुभाषनं कापडी पिशवीतून डबा काढला. डबा उघडला. त्यात खिचडी होती. त्याला शाळेत मिळालेली. त्याने तिथं स्वतः न खाल्लेली. डब्यातून त्याने खिचडीचा एक घास हातात घेतला. आणि तो त्याच्या बहिणीच्या तोंडात भरवू लागला. तिनेही आनंदाने तो घास तोंडात घेतला. तो भरवत होता. ती खात होती. आनंदत होती. खाता खाता तिनं तिचा हात डब्यात घातला. डब्यातून तिनं चिमूटभर खिचडी घेतली. तो घास तिनं तिच्या भावाच्या तोंडाजवळ नेला.

” दादा, तू पण घे ना ले खिची ….. तू पन जेवला नाही ना राती.” 

सुभाषनं बहिणीच्या हातातला घास मोठ्या  आपुलकीनं तोंडात घेतला. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. आणि तोही तिच्याबरोबर खिचडी खाऊ लागला.

” एक घास चिऊला, एक घास काऊला, एक घास माझ्या छकुलीला ! ” असं म्हणत तो तिला भरवू लागला. डब्यातली गरम खिचडी ओठाजवळ नेत, त्यावर फुंकर मारत तो तिला निववत होता. छकुलीला भरवत होता. गरम घासाचा चटका तिला लागू नये याची काळजी घेत होता. छकुलीही त्याच्याकडून आपले लाड पुरवून घेत होती. तो जणू तिची आईच झाला होता. तीही त्याच्याकडे आर्द्र नजरेने पहात त्याला मायेने बिलगत होती. त्याला बिलगतांना तिचे खिचडीने उष्टे भरलेले हात, तोंड  त्याच्या कपड्यांना  लागत होते. मात्र, तो त्याकडे दुर्लक्ष करत होता. रात्री घरात खायला काहीच नसल्याने आईसह तो, त्याची बहिण उपाशीच झोपले होते. त्याला रात्रभर झोप लागली नव्हती. आपल्या पोटात ओरडणा-या कावळ्यांमुळे नव्हे, तर…. बहिणीच्या पोटात अन्नाचा कण गेला नाही म्हणून तो दु:खी होता. रात्रीच त्याच्या डोक्यात विचारांचे चक्र फिरत होते. सकाळी शाळेत खिचडी मिळेल. तीच आपण घरी आणून बहिणीला खावू घालू या विचारात त्याला रात्रभर झोपच आली नव्हती. याचसाठी सकाळ केव्हा होते याची वाट पहात त्याने भल्या पहाटे शाळा  गाठली होती. मधली सुटी झाल्यावर त्याला मिळालेली खिचडी घेवून त्याने घराकडे धूम ठोकून बहिणीला जेवू घातले होते. त्याच्या चेह-यावर समाधान पसरले होते. अचानक तो मोठा झाला होता. कर्ता झाला होता.

बहिणीला पोटभर खिचडी भरवून त्याने तिचे तोंड, हात, पाय कापडाने स्वच्छ पुसले. तिला पुन्हा झोळीत टाकून त्याने तिला कापड गुंडाळले. त्याची गाठ मारली. तिचा एक छानसा मुका घेत तो म्हणाला…..

” छकुली, झोप हं आता. मी  शाळेत जावून येतो. तोवर आई येईल हं कामावरुन. मग आपण पुन्हा जेवण करु.”

ती पुन्हा हसली निराससपणे. आताचं तिचं हसणं तृप्ततेचं होतं.

झोळीतूनच तिनं हात हलवत टाटा केलं. जणू ती आपल्या लाडक्या भावाला निरोप देत होती.

दाराआडून हे दृष्य पाहणा-या पाटील सरांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. शाळेत होणा-या किरकोळ चो-या करणारा चोर सापडल्याच्या त्यांच्या आनंदावर असं अनपेक्षित विरजण पडलं होतं. चोर म्हणून ज्यावर अविश्वास दाखविला, ज्याचा पाठलाग केला तोच सुभाष नात्यांच्या व कर्तव्याच्या कसोटीवर खरा उतरला होता. परिस्थिती माणसाला खोटं बोलायला, चोरी करायला लावते हे सरांना वाटणारं मत सुभाषनं खोटं ठरवलं होतं. उलट त्याच्या आताच्या वागण्यानं  त्याने आदर्शाचं सर्वोच्च शिखर गाठलं होतं.  दिसतं, वाटतं ते सारं खरंच नसतं या गोष्टीवर पाटील सरांचा आता विश्वास दृढ झाला होता. गरीबी, कठीण परीस्थितीतही काही माणसं आपलं इमान विसरत नाहीत. आपल्या कर्तव्याला भुलत नाहीत याचं विहंगम उदाहरण त्यांना सुभाषच्या रुपानं संजयनगरच्या झोपडपट्टीत बघायला मिळालं होतं. सुभाष घरातून बाहेर पडायच्या आत त्यांनी स्वतःला लपवत बाहेरची वाट धरली. आणि ते माणसांच्या गर्दीत मिसळून गेले. थोड्याच वेळात सुभाष दार बंद करून खोपटाच्या बाहेर पडला. त्याने दुडकी घेत शाळेची वाट धरली. मधल्या सुटीनंतरची शाळा सापडावी म्हणून. त्याच्या पाठमो-या देहाकडे पहात पाटील सर स्वतःशीच पुटपुटले ” दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं ! ” आणि तेही शाळेची वाट चालू लागले. आता त्यांच्या वागण्यात ती लगबग नव्हती. ती ओढ नव्हती. होती ती एक बोच. एका प्रामाणिक मुलावर आपण उगाच अविश्वास दाखविल्याची. गरीबीची उगाच चेष्टा केल्याची. एका पराभूत मानसिकतेत ते शाळेत पोहचले. तत्पूर्वी सुभाष शाळेत पोहचला होता. त्याच्याच वर्गातून पू. साने गुरुजींची प्रार्थना ऐकू येत होती…….

खरा तो एकची धर्म,

जगाला प्रेम अर्पावे.

जगी जे दीन पददलित,

तया जाऊन उठवावे !

— समाप्त —

©  प्रा.बी.एन.चौधरी

संपर्क – देवरुप, नेताजी रोड, धरणगाव जि. जळगाव. ४२५१०५. (९४२३४९२५९३ /९८३४६१४००४)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खिचडी – भाग – १  ☆ प्रा. बी. एन. चौधरी ☆

प्रा. बी. एन. चौधरी

(प्रा. बी. एन. चौधरी (लेखक / कवी / गझलकार / समिक्षक / व्यंगचित्रकार / पत्रकार) यांचे ई – अभिव्यक्ती समूहातर्फे स्वागत आणि या पुरस्काराबद्दल हार्दिक अभिनंदन.)

? जीवनरंग ?

☆ खिचडी – भाग – १  ☆ प्रा. बी. एन. चौधरी

(साहित्य संस्कृती मंडळ, बऱ्हाणपूर, म. प्र. आयोजित अ.भा. कमलबेन गुजराती मराठी कथा लेखन स्पर्धेतील प्रथम पुरस्कार प्राप्त कथा)—- 

प्रगती विद्यामंदिर विद्यार्थ्यांनी फुलून गेले होते. वर्गा वर्गात विद्यर्थ्यांचा चिवचिवाट सुरु होता. सकाळची शाळा भरुन बराच वेळ झाला होता. घड्याळात ९ वा ४० मिनिटं झाली. मधल्यासुटीची वेळ झाली, तशी शिपायाने दिर्घ बेल दिली. धरणाची दारं उघडावी आणि पाण्याची लाट बाहेर पडावी तसं मुलांनी क्रिडांगणाकडे धाव घेतली. शाळेत एकच गलका झाला.  

क्रिडांगणावर एका कोप-यात शालेय खिचडी वाटप सुरु होती. विद्यार्थ्यांनी रांगा लावून आपापल्या डब्यात, ताटलीत खिचडी घेतली. सारे खिचडी खायला रांगा करुन बसले. काहींनी घरुन जेवणाचा डबा आणला होता. ते एकमेकांशी वाटावाटी करुन जेवण करु लागले. खोड्या, मस्करी करत मुलांची अंगत पंगत रंगात आली होती. त्याच गर्दीत सातवीचा सुभाष कावरा बावरा होत चिमणीने दाणे टिपावे तसा खिचडीचे बारीक, बारीक घास तोंडात टाकत होता. मित्रांची नजर चुकवत त्याने कसंतरी जेवण उरकलं. डबा बंद केला. आणि तो हात धुवायला पाण्याच्या टाकीवर गेला. हात धुवन ते त्याने आपल्या चड्डीलाच पुसले. गुपचूप,  गुपचूप तो त्याच्या वर्गाकडे गेला. मुलांवर लक्ष ठेवून असलेल्या क्रिडाशिक्षक पाटील सरांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. सारी मुलं आता कुठं जेवायला बसली असतांना सुभाषचं असं लवकर उठणं त्यांना संशयास्पद वाटलं. ते त्याच्या मागोमाग गेले.  सुभाष घाबरा घुबरा होत त्याच्या वर्गातून बाहेर पडत होता. पाटील सरांच्या मनात शंका आली. काही दिवसांपासून वर्गा वर्गातून मधल्या सुटीत मुलांच्या दप्तरातून पैसे, पेन, वस्तू चोरीला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. शाऴेतीलच कुणी विद्यार्थी हे काम करत असेल असा सर्व शिक्षकांचा कयास होता. ही गोष्ट पाटील सरांच्या लक्षात आली. ते सावध झाले. त्यांना असल्या भुरट्या चो-या कोण करत असावा याचा आता अंदाज आला होता. ते सुभाषवर बारकाईने लक्ष ठेवून एका कोप-यात थांबले.

सुभाष वर्गातून बाहेर पडला तेव्हा त्याच्या हातात एक कापडी पिशवी होती. तिच्यात त्याने काही लपवले होते. आपल्याला कुणी पहात नाही नं हे बघत तो शाळेच्या मेन गेट जवळ गेला. ते बंद होते. त्याने छोट्या गेटचं दार हळूच उघडलं आणि तो शाळेबाहेर पडला. पाटील सर त्याला न दिसता त्याचा पाठलाग करत होते. सुभाष शाळेबाहेर पडला तसा त्याने सुटकेचा निश्वास टाकला. पिशिवीकडे आनंदाने बघत, तिला छातीशी लावत त्याने धुम ठोकली.

पाटील सरांना त्याच्या सा-या हालचालींवरुन तोच ह्या छोट्या छट्या चो-या करत असावा याची खात्री पटली. त्याच्या पिशवित मुलांच्या चोरलेल्या वस्तू असतील असे त्यांना वाटले. सुभाषला रंगेहाथ पकडावं असा मनाशी निश्चय करुनच ते ही त्याच्या मागोमाग जावू लागले. सुभाषने आता वेग घेतला होता. त्याला जणू घबाडच हाती लागलं होतं. त्यात त्याला कुणीही बाहेर पडतांना पाहिलं नाही याचाही आनंद दडला होता. झपझप चालता चालता तो आता पळायला लागला. शाळेपासून निघून तो शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पोहचला. मुख्य रस्ता ओलांडत त्याने नगरपालीकेकडे मार्चा वळविला. आणि आता तो नव्याने वसलेल्या संजय नगरच्या झोपडपट्टीकडे जावू लागला. त्याच्या पायांना गती आली होती. तो याच झोपडपट्टीत रहात होता.

पाटील सर मनातल्या मनात खुष होते. ते शाळेत चो-या करणारा चोर सापडल्याच्या आनंदात होते. सुभाषच्या पिशवित इतर मुलांच्या वस्तू, पैशे असतील अशी त्यांची खात्री झाली होती. त्याला रंगे हात पकडून त्याच्या पालकांकडे तक्रार करावी असा मानाशी विचार करत ते चालण्याचा वेग वाढवून चालत होते. त्यांना सुभाषची पार्वभूमी आठवली.

सुभाष हा संजयनगरच्या झोपडपट्टीत राहणा-या झेंडू हमालाचा मुलगा. झेंडूला दारु, गांजा, सट्ट्याचं व्यसन होतं. दिवसभर पोती वाहणं. गाडी लोटणं हे त्याचं कष्टाचं काम. कष्ट विसरण्यासाठी दारु आली. त्यात इतर व्यसनं व्यसनं लागली. त्याचा शेवट क्षय रोग होवून मृत्यूत झाला. त्याच्या  मागे त्याची बायको कमला गावात भंगार, रद्दी, प्लॅस्टिक गोळा करायची. नव-यामागे तिच्यावर संसाराचा भार आला होता. अशिक्षित, निराधार कमलाला संजयनगरवाले जुजबी मदत करत होते. आपल्या मुलानं शिकावं अशी तिची खूप इच्छा. म्हणून ती मुलाला नियमित शाळेत पाठवत होती. त्याला वह्या, पुस्तकं, इतर साहित्याची तजविज करत होती. वेळोवेळी शिक्षकांना भेटत होती. तोच हा सुभाष आज पाटील सरांच्या नजरेत चोर ठरला होता. सुभाष असे उपद्व्याप करेल याची त्यांना पुसटशीही अपेक्षा नव्हती. मात्र, गरीबी माणसाला काहीही करायला लावू शकते याची त्यांना कल्पना होती. या विचारात तेही संजयनगर पर्यंत पोहचले.

सुभाष आता त्याच्या खोपटा जवळ पोहचला होता. खोपटाचं दार बंद होतं. त्याची आई घरी नव्हती. ती  पहाटेच भंगार गोळा करायला निघून गेली असावी. त्याने बाहेर लावलेलं पत्र्याचं दार लोटलं….. आपल्या मागे कुणी नाही हे पहात तो घराचं दार उघडून आत गेला. पाटील सरही पत्र्याचं दार लोटून आत आले. तेथले वातावरण पाहून त्यांना सुभाषच्या गरीबीची खात्री पटली. तेथे पडलेल्या भंगार, प्लॅस्टीक, रद्दीच्या ढिगा-याची त्यांना किळस आली. त्यांनी खिश्यातून रुमाल काढत तो नाकाला लावला. त्यांची भिरभिरती नजर सुभाषला शोधत होती. तोच त्यांचं लक्ष आतल्या दाराकडे गेलं. तिथं सुभाष होता. तो आत काय करतोय हे पाहण्यासाठी त्यांनी  हळूच आत डोकावलं.

– क्रमशः भाग पहिला 

©  प्रा.बी.एन.चौधरी

संपर्क – देवरुप, नेताजी रोड, धरणगाव जि. जळगाव. ४२५१०५. (९४२३४९२५९३ /९८३४६१४००४)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ महिला दिन म्हणजे ? ☆ सुश्री शैलजा करोडे ☆

? जीवनरंग ?

☆ महिला दिन म्हणजे ? ☆ सुश्री शैलजा करोडे ☆

“ए पोरी, ऊठ ना. ऊठ गं, किती जीव खाशील माझा. बाप फुटकी कवडीही देत नाही घरात. मीच कमवायचं, तुम्हां भावंडांना आणि त्यालाही खाऊ घालायचं. वरून त्याच्या दारूलाही पैसा पुरवायचा. काय जन्म आहे माझा ? नवरा म्हणून कपाळावर लाल कुंकू आणि गळ्यात काळेमणी मिरवायचे एवढाच काय तो त्याचा सहभाग. त्यानं फक्त पोरं जन्माला घालायची. त्यांचं संगोपन नको कि जवाबदारी नको, हिच काय समाजाची रूढी परंपरा ?

मायबापाचंही हेच म्हणणं ‘बाई तुला कुंकवाचा धनी करून दिलाय, आता तू तुझं बघ.’ नवरा नावाचं लायसन माझ्या गळ्यात, तेच माझं सुरक्षा कवच म्हणे ?

ए, ऊठतेस का बर्‍या बोलानं कि घालू लाथ तुला. मी एकटी कुठे कुठे पुरे पडू. जा कचरा गोळा करायला. त्यातून काय मिळतं का बघ. थोडं उशीरा गेलीस तर तुझ्या हाती काही लागायचं नाही. आधीच सगळे घेऊन गेलेले असतील. ऊठ पोरी ऊठ, माझ्या आजच्या चुलीला हातभार लाव गं बाई. काय करू गं, मी हतबल आहे. तुमचं पालन पोषण माझी जिम्मेदारी, पण दिवसरात्र कष्ट करुनही मी नाही पूरी करू शकत गं” म्हणत माय ढसढसा रडू लागली .

“नको रडू माय, मी उठलीय,” मी चूळ भरली, पेला भरुन पाणी प्यायली, आणि कचर्‍यासाठी थैली उचलली.

“लक्ष्मी, थांब बेटा, थोडी चहा पिऊन जा आणि टोपलीत पोळी आहे, चहासोबत खाऊन घे बेटा.”

“ए संतोषी, चल ना.”

“हो ग लक्ष्मी, आलेच मी” म्हणत संतोषी बाहेर आली. दोघीजणी उकीरड्यावर कचरा शोधू लागल्या, काही मिळतं का पाहू लागल्या. जुने सेल, बॅटरी, बिसलेरीच्या बाटल्या, फटाफट त्यांच्या थैलीत टाकत होत्या. लक्ष्मीच्या हाती जुना ट्रान्झिस्टर व जुने दिवार घड्याळ लागले. जणू आज लाॅटरीच लागली. ती आनंदली, मनोमन खुलली.

या आनंदातच घरी येतांना ती शाळेजवळ थबकली. रोजच ती शाळेजवळ थबकायची. युनिफाॅर्म घातलेल्या, दोन वेण्या, पाठीवर दफ्तर घेतलेल्या मुलींचा लक्ष्मीला हेवा वाटायचा. आपल्याला का नाही शाळा शिकवत आपली आई.

“सुलोचना, तुझ्या लक्ष्मीला पाठवत जा गं शाळेत. शिक्षणा प्रगती होईल, ज्ञान वाढेल आणि जे आयुष्य तुझ्या वाटेला आलं ना ते नाही येणार तिच्या वाटेला, कारण ती शिकलेली राहील, स्वतःच्या पायावर उभी राहील, आत्मनिर्भर बनेल.” शाळेच्या शिक्षिका तिला समजावित होत्या.

“खरंय बाई तुमचं, पण आमची पण मजबुरी समजून घ्या ना. लक्ष्मी सकाळी कचरा गोळा करते ४०- ५० रूपयं सुटतात. दुपारी आपल्या धाकट्या भावाला सांभाळते. ती त्याला सांभाळते म्हणूनच मी काम करू शकते बाई, आणि मी काम करते म्हणूनच घर चालतं माझं.”

लक्ष्मीला शाळेचं दर्शन काही झालं नाही. ती रोज अशी आशाळभूतपणे शाळेकडे बघायची. आज शाळेत वेगळंच वातावरण होतं. शाळेतील मुले महिला शिक्षिकांना कर्मचार्‍यांना गुलाबपुष्प व ग्रिटींग देत होती.  “Happy women’s day . महिलादिनाच्या खूप खूप शुभेच्छा” देत होते.

“ए संतोषी, महिला म्हणजे काय गं?”

“काय माहीत, पण ती मुलं बाईंना गुलाब फुलं देत आहेत, म्हणजे बाई म्हणजे महिला असेल बहुतेक,’

‘आणि महिलादिन म्हणजे ? ‘

‘ते नाही बाई मला माहित.”

दोघी घराच्या वाटेला लागल्या. लक्ष्मी ने आपल्या झोपडीचे दार उघडले. छोटा चेतन झोळीत झोपलेला होता. माय कामावर गेलेली होती. जाण्यापूर्वी तिनं वांग्या बटाट्याची भाजी करून झाकून ठेवली होती.

इतक्यात चेतन रडायला लागला. “अरे, झाली का झोप ? जागा झालास दादा. आली हं मी, म्हणत लक्ष्मीने त्याला अलगद झोळीतून बाहेर काढले आणि त्याला आपल्या छोट्याशा बाथरूमकडे (घरात केलेला छोटासा आडोसा) घेऊन गेली.      चेतनची शी शू झाली तशी तिने त्याला स्वच्छ केले, आंघोळ घातली आणि टॉवेलमध्ये गुंडाळून बाजेवर आणले. त्याला कपडे घातले. पावडर टिकली केली. बाळ खूपचं साजिरं दिसायला लागलं. ” माझा गोड गोडुला भाऊ…” म्हणत तिने त्याचा गालगुच्चा घेतला. मायनं सकाळी दूध आणून गरम करुन ठेवलं होतं. लक्ष्मीने दूध वाटीत घेऊन भावाला भरवलं. तो ही भराभर दूध पीत होता.      दूध पिऊन झाले तशी तिने भावाला खाली उतरविले, ” खेळ हं राजा आता, ताईला काम करू दे.” लक्ष्मीने घर स्वच्छ केलं, झाडून, पूसून काढलं, कपडे धुतले, वाळत टाकले, स्वतःची वेणी घातली, तोपर्यंत जेवणाची वेळ झाली. तिने भावाला वरणात पोळी चुरून बारीक बारीक घास त्याला भरविले, स्वतःचेही जेवण उरकले. 

आज कचर्‍यात तिला मूळाक्षरांचं पुस्तकंही मिळालं होतं, अन ते पाहून ती मनोमन आनंदली होती. अ अननसाचा अ सोबत अननसचं चित्र, लक्ष्मी मन लावून, भान हरपून ते पुस्तक पाहात होती. एवढ्यात आळीत शेवंता मावशी सगळ्यांना सांगत होती,

“आज आपल्या वार्डच्या नगरसेविकेने सगळ्यांना महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी बोलावलंय, चला सगळ्यांनी.”

महिला दिन ?’ लक्ष्मीला पुन्हा प्रश्न पडला. चला आपणही पाहूया महिला दिन म्हणजे काय आहे ते ? तिने चेतनला कडेवर घेतले व ती ही निघाली आळीतल्या महिलांसोबत.

सभामंडपात अनेक स्त्रिया जमल्या होत्या. व्यासपीठावरही आज समाजातील उच्चपदस्थ महिला विराजमान होत्या. आयोजिका नगर सेविकेने प्रास्ताविकात म्हटले, “स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कामाचे समान तास, समान वेतन, महिलांना मतदानाचा हक्क, अशा विविध मागण्यांसाठी हा लढा सुरू झाला आणि १९१० सालापासून ८ मार्च महिला दिन साजरा होऊ लागला व १९७७ या वर्षी युनो ने ८ मार्च जागतिक महिलादिन म्हणून घोषित केला.”

आता प्रमुख पाहुण्यांचं भाषण सुरु झालं. आपण महिला घर व नोकरी व्यवसाय अशी दुहेरी कसरत करतो. घरातील मुलांचं संगोपन, वृद्धांची सेवा, सण वार, व्रत वैकल्य, येणारा जाणारा, पाहुणा रावळा, सगळंच पाहातो. पुरूषाच्या खांद्याला खांदा लावत स्त्रियांनी आज सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. पण तरीही तिचं आज विविध पातळीवर शोषण सुरू आहेच, मग हे शोषण आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक, राजकीय, सर्वच स्तरावर होत आहे, ते थांबलं पाहिजे, स्त्रियांना न्यायहक्क मिळालाच पाहिजे, ही जनजागृती व्हावी म्हणून हा महिला दिन. आज रोजच्या कामकाजातून उसंत मिळून तुम्ही क्षणभर विसावा घ्यावा म्हणून हा प्रपंच. आज महिलांसाठी विविध खेळ, विजेत्यांना बक्षिसे, पैठणीची सोडत व शेवटी स्नेह भोजन आपण करणार आहोत.”

लक्ष्मी कान देऊन ऐकत होती, समजण्याचा प्रयत्न करीत होती. माझा बाप दारू पिवून धिंगाणा घालतो, मायनं दिवसभर केलेल्या कष्टांची कमाई काढून घेतो, वरुन तिला मारहाण व शिवीगाळ, ही कसली समानता.

लक्ष्मी घरी आली. “कोठे गेली होतीस गं”

“माय महिलादिनाच्या कार्यक्रमाला आळीतल्या सगळ्या बायांसोबत गेले होते पण महिलादिन म्हणजे काय ते मला समजलं माय.”

“मोठी आली हुशार, मला सगळं समजलंय म्हणणारी….” सुलोचनाच्या डोळ्यात लेकीविषयी कौतुक होतं.

रात्री लक्ष्मीचा बाप सदा झिंगतच घरी आला. “ए, जेवाय वाढ.” त्यानं गुर्मीतच सुलोचनाला सुनावलं. सुलोचनानं कांदा घालून केलेला झुणका, लोणचं, हिरव्या मिरचीचा खर्डा वाढला.

“हे काय जेवाण आहे ?” म्हणत त्यानं अन्नाचं ताट भिरकावलं. चेतन भितीने रडायला लागला, लक्ष्मी दचकून कोपर्‍यात उभी राहिली. सदा आता सुलोचनाला मारहाण करू लागला तशी लक्ष्मी चिडली वॉर्डातील नगरसेविकेकडे गेली, “मॅडम, लवकर चला, माझा बाप मायला खूप मारतोय.”

मॅडमनी लगेच पोलीस स्टेशनला फोन केला व स्वतः लक्ष्मीच्या घरी जाण्यासाठी निघाल्या. नगरसेविकेला पहाताच सदा मारायचा थांबला, वरमला व माफी मागू लागला.     

“आता माफी मागतोय, रोज बायकोला मारहाण करायची, दारूत पैसा उडवायचा, संसाराची राखरांगोळी करायची, लाज नाही वाटत काय रे तुला. माफी कसली, तुला तर जेलची हवाच पाहिजे, तेव्हा कोठे तुझी अक्कल ठिकाणावर येईल.”

इतक्यात पोलीस आले, “घेऊन जा याला. सुलोचनाला घेऊन येते मी पोलीस स्टेशनला, कौटुंबिक हिंसाचाराखाली करा याला जेरबंद.” नगरसेविका मीनाक्षीताई बोलत होत्या.

“सुलोचना, लक्ष्मीला शिकू दे. गुणी मुलगी आहे तुझी. शाळेत तिला वह्या, पुस्तके, गणवेष, मध्यान्ह भोजनही मिळेल. चेतनसाठी पाळणाघर आहेच की. कष्टकरी, कामकरी महिलांच्या मुलांसाठी शासनाने पाळणाघराचीही योजना आणली आहे.”

“मग तर प्रश्नच मिटला ताई. पण यांना पोलिसांनी बंद केलंय.”

“राहू दे चार आठ दिवस तिथेच, येईल अक्कल ठिकाणावर, नंतर घरी येंणारच आहे तो. काही काळजी करू नकोस. येते मी.”

आज लक्ष्मीला महिला, महिलादिन, महिलांचे हक्क समजले होते. तिची शिक्षणाची वाटही मोकळी झाली होती. खर्‍या अर्थाने आज महिलादिन साजरा झाला होता.

©  सुश्री शैलजा करोडे 

संपर्क – नेरूळ, नवी मुंबई. मो.9764808391

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ धाकलं काळीज काढून देताना…! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

धाकलं काळीज काढून देताना…! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

बापाचं काळीज! पाषाणासारखं कठीण असतं असं लोक म्हणतात. आणि तसं दिसतंही लांबून पाहणाऱ्याला. या पाषाणाच्या अंतरंगात झुळझुळु वाहणारा झरा जर स्पर्शायचा असेल तर या काळजाच्या आत हात घालावा लागतो.

देवानं माणसाला एकच काळीज दिलेलं असलं तरी आई-बापांना जितकी मुलं,  तितकी काळजं दिलेली असतात. आणि ह्या काळजांना काळजीची काजळी सतत काळवंडत असते! मुलांच्या हृदयाची स्पंदनं जितकी आनंदाची तितकी ही काळजं सुपाएवढी होतात. यांना थोडा जरी धक्का लागला ना, इजा झाली ना, तर आई-बापाच्या काळजात कळा उठतात!       

आपण गोकुळचे नंदराजा नसू, नसू आपण यशोदा… पण आपलं घर म्हणजे गोकूळ आणि या गोकुळातले तान्हे आपले कृष्ण-बलराम! ही जोडी आयुष्यातल्या संकटाच्या कंसावर एक न एक दिवस चालून जाईल, हे माहीत असतं जीवाला! त्यांच्या सामर्थ्याचा अदमास असतोच…. पण मनात भीतीचा एक अनामिक काटाही रुतत असतो…. जगात कंस एकटा नाही आणि कंस जगात एकच नाही!

कुणी सांगितलं नव्हतं बाळकृष्णाला की तुला कंसाचा नि:पात करायचा आहे, त्यासाठीच तुझा अवतार! पण गोकुळातल्या गोपांसवे गाई चारायला घेऊन जाऊ लागल्यावर कान्हाला जग समजू लागलं.

मथुरेला दूध घालायला निघालेल्या गोपिकांच्या खोड्या काढण्याचा आगाऊपणा हा केवळ दूध-दही-लोणी चोरण्यासाठी नव्हता…कन्हैयाला गोकुळातलं दूध राक्षसांसाठी देणं नको होतं!

माझा कृष्ण असाच आपल्या देश नावाच्या गोकुळाच्या शत्रूविरुद्ध, मथुरेच्या सीमेवर दंड थोपटून नुकताच उभा राहिला होता. जायचंच म्हणाला तेंव्हा त्याला मी ‘नाही’ म्हणू शकलो नाही. सिंहांचा बछडा थोडाच कुणाला विचारून झेप घेतो सावजावर?

माझा बछडा असाच निर्धास्त होता. आज आहोत तर उद्या नसूही शकतो याचा विचार पक्का असलेला. पण जोवर असू तोवर आपल्या असण्याला अर्थ प्राप्त करून देण्याचा निश्चय तर होताच त्याचा.

सैनिकाच्या काळजात गोळी सुसाट वेगाने घुसते ना… तेंव्हा त्या गोळीच्या व्यासाएवढंच छिद्र दिसतं बाहेरून… पण आतमध्ये जगणं विदीर्ण झालेलं असतं…. जीवनाला भगदाड पाडून ती गोळी जणू काहीही झालं नाही असं भासवत आरपार निघून जाते. तर कधी हट्टानं त्या काळजातच रुतून बसते. तसं होतं सैनिकाच्या बापाचं काळीज. आईचा आक्रोश सवयीचा झालाय आपल्या. पण बापाचं मूक रूदन कानांवर रेघोट्या नाही मारत कुणाच्या.

आमचा लेक, आमचा यश म्हणायचा फौजेत जायचंय, रुबाबात आणि शिस्तीत जगायचंय बिनधास्तपणे… देशाच्या दुश्मनाच्या छाताडात रायफल मधली मॅगझीन रिकामी करायचीये! दुश्मनाच्याही हाती रायफल असते,तिच्यातूनही गोळ्या सुटतात याचा विचारही त्याच्या मनात नसायचा!

तरूण रक्त असंच तर असतं… सळसळतं… स्वत:च्या प्रवाहात सारं काही वाहवून घेऊन जाण्याच्या ताकदीचं… एखाद्या त्सुनामीसारखं.

या रक्ताला थांबवणारा मी कोण? माझ्याही जवानीत माझेही हात सळसळत होतेच की. पण तो योग नव्हता. पोरगा माझ्याच डोळ्यांनी सीमेचे रक्षण करणार होता तर मग मी कशाला मध्ये येऊ. “जा,पण जपून रहा” एवढंच तर म्हणू शकतो बाप! आई “जा” असं नाही म्हणू शकत कधी. “लवकर ये… नीट ये” असं मात्र म्हणत राहते आसवांतून…. त्याला निरोप देताना.

रडण्याची परवानगी नाही बापांच्या डोळ्यांना. या डोळ्यांनी फक्त बघत राहायचं आणि जागत राहायचं… बंद पापण्यांच्या आडोशानं!

रात्री-अपरात्री फोन येऊ शकतो म्हणून सावध झोपायची सवयच होऊन जाते सैनिकांच्या घरच्यांना. हा अनुभव घेऊ लागायला आम्हाला एकच तर वर्ष झालं होतं. थोड्याशा शेतीवर गुजराण करत होतो आम्ही. दोन मुलं आणि दोन मुली.

यश जवान झाला आणि आणखी जवान व्हायचं स्वप्न पाहू लागला. गावातले दोन जण होते फौजेत. त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकीन म्हणायचा. देशाला सैनिक शेतांतूनच तर मिळतात… मातीत राबणारी शरीरं प्रसंगी मातीत मिसळून जायलाही मागे-पुढे पहात नाहीत. यश शेतात काम करता करता लष्करात भरती होण्यासाठीची धूळपाटी गिरवायचा.

अठरा वर्षांचं कोवळं पोर ते…. पण खानदेशच्या भलत्या उन्हात घाम गाळायचं. झाला भरती. गेला ट्रेनिंगला. त्याला गाडीत बसवून देताना हिला तर काही सुचत नव्हतं. गावात अर्धा भाकरतुकडा मिळत होताच की. पोरगं नजरेसमोर राहिलं असतं… पण त्याच्या नजरेसमोर शौर्य उभं होतं… नोकरी नव्हती फक्त.

ट्रेनिंगवरून आला तो यश आमचा नव्हताच… देशाचा झाला होता. बारीक कुडी.. पण डोळ्यांत आणखी चमक. ताठ चालणं आणि थेट बोलणं. आमच्या घराण्यातला पहिला शिपाईगडी म्हणायचा यश! त्याच्या बोलण्यातूनच सैन्यातले शब्द आमच्या कानांवर पडले…. युनिट, बटालियन, पोस्ट, ऑपरेशन… आणि बरंच काही.

त्याची आई त्याला म्हणायची… “सांभाळून रहा…” तो म्हणायचा “देश सांभाळायला मिळालाय…. देशच आता मला सांभाळेल.”

 कश्मिरात लागली ड्यूटी पहिल्याच वर्षी. तीन महिन्यांपूर्वीच सुट्टीवर आला होता. म्हणाला एखादे दिवशी तुम्हांला फिरवून आणेन भारताचा स्वर्ग… कश्मिर!

सा-या गावाचा निरोप घेऊन गेला…. ”जातो आई!”  म्हणाला… आई म्हणाली “अरे, येतो म्हणावं.” म्हणाला, “ते काय सैनिकाच्या हातात असतं?”  गेला..!

भ्याड हल्ल्याला वाघही बळी पडतात कधी कधी. अन्यथा यश एकटा नसता गेला. समोरासमोर शत्रूशी गाठ पडली असती तर…. दोघं-तिघं अतिरेकी तर त्यानं नक्कीच सोबत नेले असते…. त्यांना नरकापर्यंत पोहोचवायला, आणि मगच ताठ मानेनं प्रवेश केला असता त्यानं स्वर्गातल्या हुतात्म्यांच्या जगात!

२६ नोव्हेंबर २०२०. दुपारी बातमी आली. गावकऱ्यांना आधी समजलं होतं काय झालं ते… आमच्या म्हाताऱ्या काळजांच्या काळजीनं लोकांनी लवकर नाही येऊ दिले ते शब्द आमच्या कानांवर. आमचं यश नावाचं काळीज जळून गेलं होतं… पण त्या ज्वाळा चंदनाच्या होत्या…. त्यातून शौर्याचा, देशभक्तीचा सुगंध पसरला होता आमच्या रानोमाळी!

“शहीद यश देशमुख अमर रहे” च्या घोषणा अजून तशा ताज्याच होत्या गावातल्या वाऱ्यात…. सारा देश उभा होता पाठीशी… यशने आमच्यासाठी खूप काही करून ठेवले होते…

दु:खाचे कढ काळाच्या फुंकरीने थोडे थंड होऊ लागले होते… तेवढ्यात दुसरं काळीज जागेवरून हललं. म्हणालं…. “दादाचं स्वप्न पुरं करायचंय… मी ही जातो!”

ही मनातून म्हणाली असेल.. “तू जाशील तर आम्ही कुणाकडं पहायचं?” आणि मग तिला आठवलं असेल की यश गेल्यानंतर देश आपल्या पाठीशी कसा उभा राहिला ते! देशसेवा, आणि ती ही सैनिक बनून करायला मिळणे हे फक्त निवडक रक्ताचं भाग्य. इतर जीव विविध कारणांनी मृत्यूमुखी पडतात पण सैनिकाच्या मुखावर मृत्यूच्या भयाचं नामोनिशान नसतं… हा तर स्वर्गाचा राजमार्ग!

धाकटा पंकज म्हणाला, “दादाचं स्वप्न पुरं करायचंय! गेलं तर पाहिजेच! कृष्ण गेला तरी बलराम आहे की अजून!”

सारं बळ एकवटलं वाणीत… म्हणालो.. .”जा…की! तुला कोण अ‍डवणार. दादाचं राहिलेलं काम भावानं नाही हाती घ्यायचं तर कुणी? कृष्णाचा नांगर बलरामच हाती घेणार ना!

“सांभाळून रहा!” आम्ही दोघंही पंकजला म्हणालो… यशला म्हणालो होतो तसं. तसबीरीतला यश बघत असावा आमच्याकडे! आता आमचं धाकलं काळीज सीमेवर उभं आहे!

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव मधील सामान्य शेतकरी दिगंबर देशमुख आणि सुरेखाताई देशमुख यांचा थोरला लेक यश श्रीनगर मध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्याच्या टेरोटोरीयल आर्मीच्या ‘क्विक रिस्पॉन्स टीम’चा सदस्य होता. २६ नोव्हेंबर,२०२० रोजी श्रीनगर मधील खुशीपोरा भागात ही टीम बंदोबस्तासाठी नुकतीच तैनात होत असताना अतिरेक्यांनी त्यांच्यावर लपून छपून गोळीबार केल्याने शिपाई रतनसिंग आणि शिपाई यश देशमुख धारातीर्थी पडले.

यशचे वडील दिगंबरदादा आणि मातोश्री सुरेखाताईंनी हा आघात झालेला असतानाही केवळ तिसऱ्याच वर्षी आपला धाकटा लेक पंकज यास सैन्यात धाडले… केव्हढे हे धाडस!

एकुलता एक मुलगा सैन्यात धाडलेले अनेक आई-बाप आहेत. त्यांना त्रिवार वंदन. एकुलता एक लेक गमावलेले, आपले दोन्ही लेक गमावलेले किती तरी माता-पिता आहेत देशाच्या कानाकोपऱ्यात. त्यांचे दु:ख इतरांना समजू शकेलच असं नाही. त्यांच्या त्यागाचे मूल्य आपण कशानेही करू शकणार नाही.

हुतात्म्यांसाठी प्रार्थना करणे आणि त्यांच्या मागे राहिलेल्या त्यांच्या जीवलगांप्रती कृतज्ञताभाव ठेवणे ही एक नागरीक म्हणून आपली जबाबदारीच आहे… किमान नोंद तर आपण घेऊच शकतो!

(सदर लेखन श्री. दिगंबरदादा देशमुख यांच्या भूमिकेत जाऊन केलेले लेखन आहे. सैनिक आणि त्यांचे आई-बाप शब्दांतून सहसा व्यक्त होत नाहीत. यातील घटना, नावे मात्र खरी आहेत.)  

 © श्री संभाजी बबन गायके

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित कथा – “देवकी अजून जीवंत आहे” – सुश्री अनघा जोगळेकर ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ अनुवादित कथा – “देवकी अजून जीवंत आहे” – सुश्री अनघा जोगळेकर ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर 

(मूळ हिंदी कथा  –  “देवकी अभी मरी नही”)

रात्रीचा पहिला प्रहर सरलाय. अंधार गडद होत चाललाय. टेबलावर ठेवलेल्या कादंबरीची पाने हवेतील पंखांप्रमाणे फडफडत आहेत. या आवाजात माझ्या मनाचा आवाजदेखील मिसळत चाललाय. झोप डोळ्यांपासून कित्येक योजने दूर आहे. तुटलेल्या मनाचे तुकडे जुन्या जखमांना चिरताहेत. गेल्या तीन-चार वर्षातली ती हृदयद्रावक घटना माझ्या डोळ्यांपुढे फिरते आहे. या दु:खद आठवणी विसरण्यासाठीच मी ती कादंबरी हातात घेतली आणि एवढ्यात माझ्या खोलीत आवाज आला, ‘ शिवाला नीलकंठ का म्हणतात, माहीत आहे? 

त्या आवाजाने मी थबकले. खोलीत इकडे तिकडे पाहिले. खोलीत कुणीच नव्हते.

‘इकडे-तिकडे काय बघतेस? मी तुझ्यासमोरच तर आहे. मी आहे देवकी.’

‘देवकी.’

‘होय. देवकी. तुला माहीत आहे शिवाला नीलकंठ का म्हणतात, माहीत आहे?’

‘नीलकंठ. होय. माहीत आहे. … कारण त्यांनी वीष प्यालं होतं॰’

‘एकदा की पुन्हा पुन्हा?’

‘…..’

‘सांग ना! एकदा की पुन्हा पुन्हा?’

 ‘ए….एकदा ….’ मी चाचरत म्हंटलं॰

 ‘आणी मी?’ देवकीचा कंठ अवरुद्ध होत चालला.

 ‘…..’

(सुश्री अनघा जोगळेकर)

 ‘तू मलाच वाचत होतीस ना! ती बघ. टेबलावारच्या कादंबरीची पाने अजूनही फडफडताहेत.

 मी पुतळा बनून देवकीकडे बघत राहिले. तिची वेदना अनुभवू लागले.

 ‘आपल्याच प्राणनाथाद्वारे आपल्याच पुत्रांना आपल्याच भावाकडे , त्यांच्या मृत्यूसाठी सोपवणं…’ देवकीला वेदना असह्य झाली. ती विव्हळली.

 ‘मला माहीत आहे.’ मी धीर करून म्हंटलं.

 ‘नाही. तुला काही माहीत नाही. माझा एक नव्हे… सहा सहा मुलं….’

 ‘ मी तुझी वेदना समजू शकते.’ तिचं बोलणं मधेच तोडत मी म्हंटलं.

 ‘काय, खरोखरच तू माझी वेदना समजू शकतेस?’ तिचा आवाज करुणार्द्र झाला होता. ती हळू हळू हुंदके देऊ लागली. ‘माझ्यासमोर माझ्या मुलांना शिळेवर आपटलं गेलं… ओह!’ यापुढे ती काहीच बोलू शकाली नाही. तिचे अश्रू खोलीतील हवा आर्द्र बनवू लागले होते. खूप वेळ अश्रू ढळल्यानतर ती काहीशी संतुलित झाली. म्हणाली,

 ‘तू खरंच बोलली होतीस. तू माझी व्यथा समजू शकतेस. एक स्त्रीच दुसर्‍या स्त्रीची पीडा समजू शकते.’

 ‘ हं! खरच एक स्त्री दुसर्‍या स्त्रीची पीडा समजू शकली असती तर …. ‘ मी उदास होऊन  म्हंटलं. 

 “म्हणजे …” देवकी चमकून म्हणाली.

 मी उगीचच तिच्यावर संतापले. ‘तुला काय वाटतं, तू इतिहासातील एक मात्र स्त्री आहेस, की जिच्या मुलांना मारून टाकलं गेलय.’

मी क्षणभर थांबले आणि दीर्घ श्वास घेतला. माझ्या मनातील व्यथा माझ्या डोळ्यात उतरली.

 ‘तू आजसुद्धा जीवंत आहेस. तू मेली नाहीस देवकी. तू कधीच मेली नाहीस. देवकी कधी मरत नाही. ती प्रत्येक युगात जीवंत असते. हां! तुझ्या मुलांच्या मृत्यूमुळे त्या घृणीत कामाला सुरुवात झाली आणि वर्तमान काळात त्याचं स्वरूप बदललं. एवढंच!’

  ‘तुझं बोलणं कळलं नाही मला!’ देवकीच्या स्वरात आश्चर्य होतं आणि वेदनाही.          ‘देवकी’, मी माझे अश्रू पुसत म्हंटलं, ‘ तुझ्या मुलांना जन्म घेतल्यानंतर मारलं गेलं आणि माझ्या…’ खोलीत माझे हुंदके घुमू लागले. त्यातच देवकीची पीडाही मिसळली. खूप वेळपर्यंत आम्ही दोघींनी गुपचुपपणे आपआपल्या दु:खाला वाट मोकाळी करून दिली.

हे मौन देवकीनेच प्रथम तोडलं. नऊ महीने गर्भात रक्ताचं तीळ तीळ सिंचन करून झाल्यावर ते रक्त आपल्यासमोर शिळाखंडावर वाहाताना बघणं… ओह! केवढी असह्य वेदना होती ती… आपल्याच पुत्राचा सुकोमल देह छिन्न भिन्न होताना बघणं… मी माझ्याच मृत्यूची कामना करत होते तेव्हा…’ देवकीची पीडा मुखरीत झाली होती.

देवकीच्या या बोलण्याने माझ्या न जन्मलेल्या दोन भ्रूणांची आठवण झाली.

देवकी तू निदान नऊ महीने त्यांना आपल्या गर्भाशयात ठेवलंस. वाढवलंस. त्यांना आनुभवलंस. त्यांच्या जन्माच्या प्रसववेदना सहन केल्यास. त्यांचा सुंदर चेहरा बघितलास. एक क्षणभर का होईना, पण त्यांना आपल्या उराशी कवटाळलंस… पण मी… मला तर हेही सुख अनुभवायला मिळालं नाही.

‘…..’ देवकी आता काही न बोलता माझ्या व्यथा ऐकून घेत होती.

‘मला तर मुलगाच पाहिजे, असं काही नव्हतं. मी गर्भवती झाले, यातच मी खूश होते. ‘पण….’

‘पण…. काय?’ देवकीच्या अधीर स्वरात करूणा मिसळली होती.

‘देवकी तुझ्या पतीने तुझ्या मुलांचा बळी मान्य केला, कारण त्याला तुझे प्राण वाचवायचे होते. कारण तुझा आठवा पुत्र जन्माला येईल आणि विश्वाचे कल्याण होईल. आपले प्राण वाचवण्यासाठी तुझ्याच भावाने तुझ्या मुलांना मारलं. ते सारं अतीव दु:खदायक होतं, खूप दु:खदायक,  पण…. ‘ माझ्या आसवांनी माझा सारा चेहरा भिजून गेला होता. भावनेच्या प्रवाहात मी वहात चालले होते. ‘पण माझा गर्भ तर तीन महिन्याचाही झाला नव्हता. त्याची हत्या करणारा दुसरा कुणी नव्हता. माझाच नवरा होता. त्याला मी जीवंत रहाण्याची वा मरण्याची पर्वा नव्हती आणि मारणारा पौरुषहीन होता. या घृणीत कामात स्त्रीसुद्धा सामील होती.’

‘काय? ‘ देवकीचा स्वर कारूणामिश्रित झाला. त्यात अविश्वास होता.

‘होय देवकी! आता तुझ्याबाबतीत घडलेल्या अपराधाचं स्वरूप बदललय. आता जन्म घेण्यापूर्वीच भ्रूणाला मारून टाकलं जातं. भ्रूणाचं मुलगा होणं अपराध नाही. मुलगी होणं हा अपराध आहे. आज पती, पत्नीला वाचवण्यासाठी नाही, आपला वंश वाचवण्यासाठी पत्नीला जिवंतपणीच मारून टाकतो आणि त्याला अन्य कुणी पुरुष नाही, घरच्या स्त्रियाच साथ देतात.’

देवकी स्तब्ध उभी राहिली मग म्हणाली, ‘म्हणजे …’

‘म्हणजे… देवकीची पीडा सरलेली नाही. उलट बदलत्या स्वरुपात अनेक पटींनी वाढलेली आहे. मग माझ्याकडे बघत म्हणाली, ‘मला वाटलं होतं, माझ्या पश्चात दुसरी देवकी होणार नाही. व्हायला नको. … ओह!’

मी माझ्याच दु:खात गुरफटून राहिले. तुझं दु:ख समजूनच घेतलं नाही.’

मी आसवांनी भरलेल्या डोळ्यांनी देवकीकडे बघत राहिले. आज देवकी माझ्यापुढे स्वत:ची पीडा कमी लेखू लागली होती. पण खरोखरच आईची पीडा समजून घेणं इतकं का सोपं आहे? जिचं एक अंग कापलं गेलय, तिचं दु:ख, दुसर्‍या कुणाचं दुसरं अंग कापलं गेलय, त्यापेक्षा कमी का असणार आहे? वेदनेला परिभाषित करणं इतकं का सोपं आहे? वेदना ही वेदनाच असते. तिची कुठलीच परिभाषा नसते.

मी आणि देवकी आपल्या आपल्या दु:खात बुडून गेलो आणि एक दुसरीचे सांत्वन करत राहिलो. मला वाटलं, देवकीचं दु:ख माझ्यापेक्षा मोठं आहे. देवकीला वाटलं, माझं दु:ख तिच्यापेक्षा मोठं आहे. 

एवढ्यात टेबलावर ठेवलेल्या कादंबरीची पाने फडफडू लागली. त्यातून आणखी एक स्त्री बाहेर पडून आमच्या दोघींमध्ये उभी राहिली.

‘रोहिणी तू?’ त्या स्त्रीकडे बघ देवकी आश्चर्याने म्हणाली.

‘हो. मीच! तुम्ही दोघींनी आपापलं दु:ख वाटून घेतलंत, पण माझं दु:ख…’

‘तुझं दु:ख?’ तू तर गोकुळात मजेत, सुखाने राहिलीस. बळिरामासारखा पुत्र तुला होता. तुला कसलं दु:ख?’

माझं बोलणं ऐकून क्षणभरासाठी रोहिणी हसली, पण त्याचबरोबर तिचे डोळेही डबडबून आले.

‘जिला हेही माहीत नसेल की कधी, कुणाचा भ्रूण तिच्या गर्भात रोपित केला गेलाय, ते गोपनीय ठेवणेही अनिवार्य आहे आणि माहीत झाल्यावरही ती त्याबद्दल कुणालाच काहीच सांगू शकत नाही, तिचं दु:ख…’

‘ओह!’ माझ्या तोंडून आपोआपच बाहेर पडलं. रोहिणीचं बोलणं अर्धवटच राहिलं. माझा सुस्कारा ऐकून देवकीने पुढे होऊन रोहिणीला सांभाळलं.

‘ती वेळच अशी होती रोहिणीची गोपनीयता आवश्यक होती आणि बळिरामाचा जन्मही।‘

‘माहीत आहे. मी आपल्याला दोष देत नाही, पण पतीच्या दीर्घकालीन अनुपस्थितीत पत्नीचं गर्भवती होणं आणि दुसर्‍याला खरंही सांगता न येणं…. माझं दु:ख कुणाला कळेल?

मी त्या दोघींकडे बघत राहिले. एक आपल्याच मुलांच्या हत्येन तडफडत होती, तर दुसरीने किती कलंक माथ्यावर झेलले होते. सहन केले होते. पण माझी खात्री आहे, शेवटी दोघीही जणी संतुष्ट झाल्या असणार. कारण…. कारण कृष्णाचा जन्म नेहमीच शुभ करून जातो. पण…. पण कृष्ण काय माझ्या उदरातून जन्म घेऊन मला माझ्या दु:खातून वर काढेल? हा प्रश्न माझ्या मानात यक्षप्रश्नाप्रमाणे विक्राळ रूप धारण करून उभा आहे.

देवकी आणि रोहिणी कादंबरीच्या आपापल्या पानात गुप्त झाल्या आहेत आणि …     मी आणखी एक देवकी बनण्याच्या दिशेनेपुढे निघाली आहे आणि कदाचित रोहिणी बनण्याच्या दिशेनेही….

मूळ कथा – ‘देवकी अभी मरी नही’ – मूळ  लेखिका – अनघा जोगळेकर मो.- 9654517813 

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन अनुवादित लघुकथा ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆

☆ तीन अनुवादित लघुकथा ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

(1) अतिसामान्य तडफड – श्री संतोष सुपेकर (2) सन्मानास कारण की — सुश्री मीरा जैन (3) पुन्हा कधीतरी — श्री भगवान वैद्य ‘प्रखर’

☆ अतिसामान्य तडफड – श्री संतोष सुपेकर ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

नुकतंच त्याचं कॉलेज शिक्षण पूर्ण झालं होतं, आणि एक नवा ‘ सामान्य ‘ माणूस म्हणून तो या जगात प्रत्यक्ष पाय टाकू पहात होता. 

एक दिवस तो एका जगप्रसिद्ध मंदिरात गेला.. ‘ नवं आयुष्य सुरु करण्यापूर्वी देवाच्या पाया पडावं आणि त्याचे आशिर्वाद घ्यावेत  ‘ असं त्याला मनापासून वाटलं होतं. पण आत जाताच तिथे लागलेली लांबलचक रांग पाहून तो चक्रावूनच गेला – “ बाप रे … इतकी मोठी रांग ? “ तो नकळत म्हणाला. 

“ हो रे भावा.. अशी खूप मोठी रांग लागणं हे रोजचंच आहे इथे.. “ शेजारी उभे असलेले एक गृहस्थ आपणहून त्याला म्हणाले. 

“ अशाने तर देवाचं दर्शन होईपर्यंत संध्याकाळ होईल इथेच .. “ घड्याळ बघत तो वैतागून म्हणाला. 

“ अरे बाबा, संध्याकाळ कसली.. रात्र जरी झाली तरी त्यात विशेष काही नाही. “ 

“ आणि ती रांग? तिथे काय आहे ? “….. या रांगेला समांतर, पण जराशी अंतरावर असलेली तशीच एक रांग पाहून त्याला आश्चर्य वाटलं .. “ त्या रांगेतले लोक जरा जास्त शिकले-सवरलेले आणि श्रीमंत असावेत असं वाटतंय मला . “

 .. ‘ आता या मुलाला वास्तव कळायलाच हवे ‘ या हेतूने, त्याच्याहून वयस्क असणारे ते गृहस्थ शांतपणे त्याला म्हणाले … “ असतीलही त्या रांगेतली माणसं थोडी श्रीमंत… पण बाळा, ही रांग नावाची गोष्ट आहे ना ती प्रत्येक माणसाला त्याचे स्थान … किंवा योग्यता म्हणू या … दाखवून देतेच . तीही एक रांगच आहे

— फक्त  “paid line “…. 

“paid line ? – पण ती रांगही या रांगेइतकीच लांब आहे की.. मग तरी अशी वेगळी का ? “

“ ते … ते काय आहे ना बाळा… या सामान्य.. म्हणजे general रांगेत उभं रहावं लागू नये ना, एवढ्याचसाठी लावलेली आहे ती वेगळी ‘स्पेशल’ रांग…. फक्त तेवढ्याचसाठी ही धडपड …पैसे देऊन …. बाकी काही नाही . पण शेवटी उभं रहावं लागतं आहे रांगेतच “ …… 

मूळ हिंदी कथा – ‘आम छटपटाहट’ – कथाकार – श्री संतोष सुपेकर

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ सन्मानास कारण की (अनुवादित लघुकथा) — सुश्री मीरा जैन ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

“ वृद्धाश्रमाचे सर्वश्रेष्ठ संचालक “ हा एक मानाचा समजला जाणारा सामाजिक सन्मान यावर्षी कुणाला मिळणार हे त्या कार्यक्रमात घोषित करण्यात येणार होते. त्यासाठी उत्सुक असणाऱ्यांची आणि अर्थातच त्यांच्या आप्तांची बरीच गर्दी तिथे जमलेली होती. 

अखेर एकदाचा तो क्षण आला. निर्णायक मंडळाने या सन्मानाचे मानकरी म्हणून श्री. गौतम यांच्या नावाची घोषणा केली —– आणि —- आणि तिथे उपस्थित असलेल्या इतर संचालकांमध्ये अस्वस्थ कुजबुज सुरु झाली. ज्या एका संचालकांना स्वतःलाच हा सन्मान मिळणार याची पुरेपूर खात्री वाटत होती, त्यांचा राग तर अनावर व्हायला लागला होता….. “ काय ? त्या गौतमला हा सन्मान मिळतो आहे ? – हे कसं शक्य आहे ? – माझा वृध्दाश्रम तर इतका स्वच्छ असतो कायम, आणि इतरही खूप सोयी-सुविधा आहेत तिथे. एवढंच नाही, तर मी जेव्हापासून त्या आश्रमाचा कारभार सांभाळायला लागलो आहे तेव्हापासून तिथल्या व्यवस्थेत सातत्याने काही ना काही सुधारणा होताहेत. म्हणूनच आधी जिथे फक्त दहा वृद्ध होते, तिथे आता पन्नास वृद्ध रहाताहेत. आणि या गौतमचा आश्रम — तिथे एकूण व्यवस्था कशी काय आहे कोण जाणे , कारण मी कधीच तिथे गेलेलो नाही. पण आकडे मात्र असं सांगताहेत की गौतम जेव्हापासून तिथला कारभार पाहतोय, तेव्हापासून वृद्धांची संख्या सतत रोडावत चालली आहे. आता तर फक्त वीस वृद्ध उरलेत म्हणे तिथे….. नक्कीच काहीतरी गडबड असणार तिथे, ज्यामुळे ही संख्या सारखी कमीच व्हायला लागली आहे. तरी त्याचा सन्मान ???? नक्कीच काहीतरी चमचेगिरी केलेली असणार …. नाहीतर त्या गौतमने निर्णायक मंडळाचे खिसे गरम केलेले असणार …. दुसरं काय ? “ 

तेवढ्यात ट्रॉफी घेण्यासाठी श्री. गौतम मंचावर आले. निर्णायक मंडळाच्या अध्यक्षांनी त्यांचे अगदी मनापासून भरभरून कौतुक करतांना सांगितले की — “ आम्ही तुम्हा सर्वांच्या संस्थांचे निरीक्षण केले. प्रत्येक ठिकाणी वृद्धांची व्यवस्था अगदी उत्तम ठेवली जाते हे आम्ही पाहिले. पण या सन्मानासाठी गौतमजी यांचं नाव  निवडलं जाण्याचं कारण हे आहे की,, आज त्यांच्या संस्थेत फक्त निपुत्रिक वृद्ध तेवढे रहात आहेत. बाकीच्यांना त्यांच्या मुलाबाळांबरोबर राहता यावे म्हणून त्यांनी स्वतः अथक प्रयत्न केले आहेत – करत आहेत, आणि त्यांना परत स्वतःच्या घरी पाठवण्यात त्यांनी अभूतपूर्व असे यशही मिळवलेले आहे. आणि हे त्यांचं काम मुळातच खूप मोठं आणि अद्वितीय, अद्भुत म्हणावं असंच आहे. “ —

मूळ हिंदी कथा – ‘सन्मानकी वजह’ – कथाकार – सुश्री मीरा जैन

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ पुन्हा कधीतरी (अनुवादित लघुकथा) — श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

‘‘साधारण किती पैसे मिळतील?” अयोध्या प्रसाद, ऊर्फ ए.पी.च्या बायकोने विचारलं. पगार वाढ होणार अशी घोषणा झाली होती, आपल्याला किती ॲरिअर्स मिळतील याचा ते दोघे हिशोब करत बसले होते. 

‘‘मिळतील बहुतेक चोवीस-पंचवीस हजार…”

‘‘फक्त एवढेच?” त्याच्या हातात चहाचा कप देत तिने विचारलं. 

‘‘हो, टॅक्सही कापला जाईल ना गं.”

‘‘हो तर, तुम्हा लोकांचा एक पैसाही लपून रहात नाही. सगळ्यात आधी, आणि तुम्हाला न विचारताच टॅक्स कापून घेतात.”

शेजारीच अभ्यास करत बसलेल्या पम्मीचं लक्ष बहुतेक त्या दोघांच्या बोलण्याकडेच होतं… ‘‘बाबा, आता तरी मला सायकल आणता येईल ना?” तिने मध्येच विचारलं. 

‘‘हो बाळा, नक्की आणता येईल.”

‘‘पण मी गिअरवाली सायकलच घेणार हं!”

‘‘नको, आत्ता साधीच घे बाळा. गियरवाल्या सायकलची किंमत किती जास्त सांगताहेत, ऐकलंस ना? फार महाग आहे ती. दहा हजारांपेक्षाही जास्त किंमतीची.”

‘‘आई, घ्यायची असली तर गियरवालीच घ्यायची. मला साधी सायकल नकोय. माझ्या सगळ्या मैत्रिणींकडे गिअरवाली सायकल आहे, मग फक्त माझ्याकडेच का नाही?”

‘‘ठीक आहे. गियरवालीच घेऊ या. पण या वर्षीही तुला ‘ए’ ग्रेडच मिळाली पाहिजे… तरच…” ए.पीं.नी तिला अट घातली. 

‘‘तुम्ही गियरवाली सायकल घेऊन दिलीत ना, तर नक्कीच मिळेल यावर्षीही ‘ए’ ग्रेड.’’

‘‘तुम्ही तर काय हो? विनाकारण डोक्यावर बसवताय तिला…”

‘‘अगं एकतर मुलगी आहे आपली. आणि सायकलने जायला लागली, तर बसचे पैसेही वाचतील ना,” ए.पीं.नी हळूच बायकोला म्हटलं. 

‘‘बरं, मी काय म्हणत होते… यावेळी आईंना ‘गुजरात दर्शन’ सहलीला पाठवायचं का? गेल्या तीन वर्षांपासून म्हणताहेत त्या. पण दरवेळी काही ना काही सबब सांगून मी त्यांचं म्हणणं टाळते आहे.”

‘‘एकूण किती खर्च सांगताहेत?”

‘‘आठ हजारात होईल सगळं धरून, आणि मुख्य म्हणजे यावेळी त्यांच्या दोन मैत्रिणी चालल्यात या ट्रीपला. दोघी येऊन सांगून गेल्या तसं. आई म्हणत होत्या की त्या दोघींची सोबत असली, तर काळजी करण्याचं काही कारणच असणार नाही.”

‘‘कधीपर्यंत करावं लागेल बुकींग?”

‘‘अजून दोन आठवड्यांची मुदत आहे. तोपर्यंत ॲरिअर्स मिळतीलच ना? आणि समजा नाही मिळाले, तरी ते गजानन-ट्रॅव्हल्सवाले आपल्या ओळखीचे आहेत. थोडा जास्त वेळ देतील ते आपल्याला.” 

‘‘ठीक आहे. तूच त्यांच्याशी बोल, आणि बुकींग करून टाक.”

‘‘आणि हो… शक्य असेल तर आणखी एक छोटंसं काम करून घ्यायचं आहे.” 

‘‘कोणतं काम?”

‘‘माझं मंगळसूत्र तुटलंय्. गेल्या दिवाळीत दुरूस्त केलं होतं, पण आता परत तुटलंय्. खरं तर त्याची चेन बरीच झिजून गेली आहे. सोनार म्हणत होता की आणखी एक-दोन ग्रॅम सोनं घातलं, तर ती पक्की होईल.” 

‘‘म्हणजे ६-७ हजार तर नक्कीच लागतील.”

‘‘हो, हल्ली सोन्याचा भाव किती वाढलाय. मी नुसती काळी पोत वापरते आहे आता. पण कुठे बाहेर जायचं असेल, तर ते बरं नाही वाटत.”

‘‘घे मग करून तसं,” ए.पी. म्हणाले, आणि त्यांनी हिशोबाचा कागद बाजूला ठेवून दिला.

चहाचे कप उचलून बायको आत निघून गेली. पम्मी पुन्हा अभ्यास करायला लागली. ए.पी. गुपचुप आतल्या खोलीत गेले… ‘आता हे कपडे वापरायचे नाहीत’ असं ठरवून, कपड्यांचं जे एक गाठोडं त्यांनी बांधून बाजूला काढून ठेवलं होतं, ते उचलून घेऊन त्यांनी उघडलं. एवढ्यातच त्यात टाकलेल्या दोन पॅंटस् काढून, त्या उजेडात नेऊन त्यांनी नीट पाहिल्या… चांगल्या दोन-चारदा झटकल्या… आणि ‘आता तुमचा नंबर पुन्हा केव्हातरी’, असं मनातच म्हणत, इस्त्रीला द्यायच्या कपड्यांच्या बॅगेत त्या नेऊन ठेवल्या. 

मूळ हिंदी कथा – ‘फिर कभी’ – कथाकार – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ 

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आयेचा फोटु… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

?जीवनरंग ?

☆ आयेचा फोटु… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी

सकाळी झाडू मारायला गेली, तेव्हा 705 मधल्या मॅडमनी इडल्या दिल्या होत्या.

रखमानी त्या तेलावर परतून त्यावर तिखट-मीठ भुरभुरून सदाला दिल्या. सदा खूष झाला.

नाष्ट्याचं काम झालं.

दोन-तीन दिवसांपासून त्याचं सारखं चालू होतं ‘मोबाईल पायजे’. माजा समदा अभ्यास त्याच्यावरच असतुया.’ रखमाला काही कळंना. पैसे कुठून आणावं त्या मोबाईलसाठी. पर अभ्यास त्यावर असतो म्हणतुया. रखमानं परोपरीनं त्याला समजावलं. दिवाळीपत्तुर दम धर. दिवाळी मिळंल त्यातनं बघते.

पण त्याला काही पटत नव्हतं. त्याची आदळ-आपट अन् अबोला, यामुळं रखमा मनातून कष्टी होती. रोज कुणी काही शिळं पाकं द्यायचं त्यावरच दोघांचं भागायचं. आज दुपारी त्याला ताजी भाकर करून द्यावी, लेकराला जरा बरं वाटंल असं ठरवून रखमा पुढच्या कामाला गेली. सारी सोसायटी झाडायची म्हणजे तिला बराच वेळ व्हायचा. पण आज रविवार.

शाळेची सुट्टी. त्यामुळे आज तिनं भाजी-भाकरीचा बेत ठरवला होता.

कामावरून येतांना भाजीला पाच रुपयांचा पाला घेऊन आली. भराभरा पाला फोडणीला घातला. भाकरी थापली न् सदाला हाक मारली. ‘‘ये रं पोरा. ज्यवायला ये. ताजी भाकर केलिया तुझ्यासाठी. माझ्या सोताच्या हातानं. आपल्या घरात. ये माझ्या राजा.’’

सदानं हू, की चू केलं नाही. जेवायलाही आला नाही. रखमानं उठून पाहिलं, तर फुरगंटून बसला होता. तिच्याकडं बघायलाही तयार नव्हता. रखमानं लाख मिनतवार्‍या केल्या, पण तो काही बधला नाही. शेवटी तणतणत पाय आपटत खोपटातनं निघून गेला.

रखमाच्या काळजाचं पाणी-पाणी झालं. कधी नव्हं ते घरला ताजी भाकरी केली.

लेकरासाठी. पण त्यानं ती शिळीच केली. शिळी करून बी खायचं नाव नाही. रखमानं डोळ्याला पदर लावला. तिच्या तरी घशाखाली घास कसा उतरणार? त्या दिवशी दोघंही उपाशीच झोपले.

रखमाला त्या भाकरीकडं पाहून राहून राहून दुःखाचे कढ येत होते. पोरासाठी जीव तुटत होता. त्याचा बाप गेल्यापासून रखमानं तळहाताच्या फोडासारखा जपला होता पण पैश्याची सोंगं ती कुठून आणणार? पोरगं हट्टापायी जिवाला त्रास करून घेतंय म्हणून तिला वाईट वाटायचं.

आज तर अबोलाच धरून बसला होता.

दुसर्‍या दिवशी शाळेत गेला तोही उपाशीच. आला तो ओरडतच. ‘‘आये, मपले शाळेचे कपडे धून ठीव. उद्याच्याला कारेक्रम हाय शाळत.’’

‘‘कसला रं?’’

‘‘मला न्हाय म्हाइत. पर गांधीबाबाचं काय तरी हाय!’’ पर कापडं चमकून ठीव झाक.

दोन ऑक्टोबरचं स्वच्छता अभियान होतं शाळेत. बरं बरं म्हणून रखमा उठलीच.     कालचा राग सोडून पोरगं दोन शब्द बोललं म्हणून रखमा हुरळून गेली. तिनं डाळ-भात शिजवला. त्यानंही मुकाट्यानं खाल्ला. रखमाचा जीव भांड्यात पडला.

दुसर्‍या दिवशी दुपारी चार वाजता रखमा समोरची सोसायटी झाडून आली तर सदा धावत आला. ‘‘चल शाळेत चल. लौकर चल’’ असं म्हणून ओढतच तिला शाळेत घेऊन गेला.

अंगावरच्या मळक्या पातळातच तिला ओढून शाळेत घेऊन गेला.

शाळेत सगळी पोरं पटांगण साफ करत होते. मास्तर लोकही पोरांना सांगून साफसफाई करून घेत होते. पाहुणे, पुढारी आलेले होते.

सदानी आईला मास्तरांसमोर उभं केलं. रखमाचा जीव लाजेनं कांडकोंडा झाला. मास्तरांनाही कळंना. कोण आहे ही? कशाला आली आहे? त्यांनी सदाला विचारलं, ‘‘काय रे सदा, कोण आहेत ह्या? कशाला आणलंस त्यांना?’’

‘‘मास्तर, मपली आय हाय ती.’’

‘‘कशाला आणलंस शाळेत आईला? आज पालकांना नाही बोलावलेलं.’’

‘‘मास्तर का न्हाय बोलावलं मपल्या आयेला आज? आज तिचा खरा मान हाये. म्हून म्या आणलंय तिला फोटू काढाया.’’

‘‘काय? कसला मान? कसला फोटू?’’

‘‘आज शाळेत स्वच्छता… (अभियान) चालू हाय ना?  त्यासाठी आणलंय आयला. त्या फोटुग्राफरला सांगा आयेचा फोटो काढाया लावा त्येंना.’’

लाज-शरमेनं रखमाचा जीव पाणी पाणी झाला. ‘‘हत् येड्या. मपला कसला फोटु?  येडा का खुळा? सोड मला. जाऊं दे घरला. अजून सारी सोसायची झाडायची हाय मागली.’’

‘न्हाय-न्हाय, मी तुला जाऊन देणार न्हाय. रोज सारा जनमभर झाडत असतीया. मंग तुझाच फोटु काढाय पायजे. हे सगळे काय रोज झाडतात का कधी? तुझ्यावाणी? नुसता हातात झाडू घेऊन फोटु काढत्याती अन् पेपरात देतात.

सूज्ञ प्रेस फोटोग्राफरला इथं काही तरी बातमी दिसली. त्यानी लगेच रखमाच्या हातात झाडू दिला अन् तिचा फोटो काढला.

दुसर्‍याच दिवशी झाडझूड करताना आमदार साहेबांच्या फोटोशेजारी रखमाचाही फोटो छापला होता. ‘विशेष’ मधे. खाली लिहिलं होतं- ‘‘सत्कार्यासाठी फोटो – अन् फोटो हेच सत्कार्य’’

शाळेतही नोटीस बोर्डवर तो पेपर लावला होता. सदानं धारिष्ट्यानं सरांना तो पेपर मागितला. सरांनी शाळा सुटल्यावर सदाला तो पेपर दिला. सार्‍या वस्तीत तो पेपर दाखवत

सदा धावत सुटला.

‘‘मपल्या आयेचा फोटु पेपरात. बघा-बघा आयेचा फोटु. मपल्या आयेचा फोटु.’’

हसता-हसता डोळे पुसून रखमाचा पदर ओला झाला.

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पार्टी – भाग ३ – लेखक : श्री शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

?जीवनरंग ?

☆ पार्टी – भाग ३ – लेखक : श्री शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

(मागील भागात आपण पाहिले – जवळचा रस्ता म्हणत 3 तास ह्या असल्याच एका रोडवर फिरालोय आपला… एक गाव दिसणा की घर…..मग कंटाळून इथं थांबलो…पाणी संपलं म्हणून देवाचं तीर्थ पीत हुतो तवर तुमची गाडी भेटली बघा.” आता इथून पुढे) 

पाणी पोटात गेल्यावर आणि दोन दोन प्रसादाचे लाडू खाऊन अनुप आणि प्रकाशला बर वाटत होतं….त्यांचा श्वास आता सामान्य झाला होता…..दोघेही उठून उभे राहिले होते तरीही त्यांच्या मनात अजून भीती होतीच…..तो तरुण त्या दोघांना त्यांच्या ह्या अवस्थेबद्दल सतत विचारत होता पण हे सगळं सांगण्यापेक्षा इथून आधी निघालं पाहिजे ह्या विचाराने अनुप त्याच्या सॅककडे बघत बोलला….कारण कदाचित ह्यामुळे ते जे काही अमानवी होत ते वाटेतच थांबलं होत.

“भाऊ….एवढी मदत केली अजून एक मदत कराल का??”

तो तरुण ती बाटली सॅक मध्ये ठेवत बोलला.

“आव बोला की बिनधास्त”

सॅककडे बोट करत अनुप बोलला,

“तो तुमच्या सॅक मध्ये गणपतीचा फोटो आहे ना….तो घरच्या रस्त्यापर्यंत माझ्याजवळ द्याल का??”

तो तरुण आपल्याच हातावर टाळी मारत म्हणाला,

“हातीच्या मारी…..काय राव….लाजवताय व्हय आम्हाला….आव साहेब गणपती बाप्पा सर्वांचा हाय….हे घ्या”

बाईकला किक मारून त्या दोन गाड्या त्या रस्त्यावरून चालू लागल्या…..अनुप आणि प्रकाशने आपल्यावर घडलेला प्रसंग त्या तरुणाला सांगितला नाही…..अनुप तो गणपतीचा फोटो छातीला कवटाळून मागे बसला होता…..देवाचे आभार मानत देवाचे नाव घेत ते तिघे आता यमाई पठाराच्या मुख्य कमानीजवळ पोहोचले…..ती कमान बघून प्रकाश जोरात ओरडलाच,

‘आर अन्या…आलो रे आलो….कमानीजवळ आलो आपण” 

प्रकाशचे अश्रूंनी डबडबले डोळे बघून तो तरुण आश्चर्यचकित झाला होता….पण अनुप आणि प्रकाश बरोबर जे घडलं ते त्यांचं त्यांनाच माहीत होतं…..कमानीतून बाहेर पडताच तिघांना एकदम मोकळा श्वास घेतल्यासारख वाटत होतं….जणू कित्येक दिवसांची धावती शिक्षा आता पूर्ण झाल्याचं समाधान….कमानीतून बाहेर निघाल्यावर प्रकाश त्या तरुणाला त्यांच्यासोबत जे घडलं ते सांगायला सुरुवात केली….अनुपने मागे बघितले तर कमानीच्या आत अंधारात आठ चमकदार डोळे आणि त्या फूटभर पसरलेल्या जबड्यातले चमकदार स्पष्ट दिसत होते…..हा पाठलाग इथपर्यंतच होता…

 – समाप्त – 

लेखक : श्री शशांक सुर्वे

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print