मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पसंत आहे मुलगा… – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे ☆

प्रा. विजय काकडे

परिचय

नाव : प्रा. विजय काकडे (कथाकार,लेखक,वक्ते)

शिक्षण : एम एस्सी (SET),संगीत विशारद

नोकरी : विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती. जि. पुणे

पद : विभाग प्रमुख, इलेक्ट्रॉनिक्स विभाग

विशेष कार्य :

१) कथाकथनाचे दोन हजार पेक्षा जास्त प्रयोग व विविध विषयावर पाचशे पेक्षा जास्त व्याख्याने

२)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहि:शाल वक्ते म्हणून २००७ पासून कार्यरत आहे.

३) ९४ व्या अ.भा. साहित्य संमेलनासाठी निमंत्रित कवी तसेच अंमळनेर येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात गझल कट्ट्यासाठी निमंत्रित गझलकार म्हणून निवड झाली आहे.

४) ” के विजय ” या नावाने कविता व गझल लेखन तसेच ” विजलहरी ” या नावाने चारोळी लेखन

५) विजलहरी या गझल वृत्ताचे स्वतंत्रपणे संशोधन केले आहे.

६) नुकतेच सूलक म्हणजेच सूक्ष्म लघू कथा या कथा प्रकाराचे स्वतंत्र संशोधन केले आहे.

प्रकाशित साहित्य : सहा कथासंग्रह प्रकाशित.

पुरस्कार :

  • राष्ट्रीय पुरस्कार : (१) कोविड योद्धा, विशाखा फाउंडेशन, नवी दिल्ली (२) कोविड- १९ फायटर सन्मान, महावीर इंटरनॅशनल मेडीकल सर्विसेस, मुंबई (३) Dr. Babasaheb AmbedkarNational Exllence award 2022
  • राज्य पुरस्कार : (१) छ. शाहू महाराज आदर्श शिक्षक पुरस्कार, लोकरंजन कला मंडळ, नाशिक (2010) (२) वपु काळे स्मुर्ती प्रतिष्ठानच्यावतीने वपु कथन गौरव पुरस्कार (2013) (३) आदर्श शिक्षक पुरस्कार, गंगाधर लोकवार्ता, कोल्हापूर(2020) (४) उत्कृष्ट स्थंभलेखक पुरस्कार, जाई फाउंडेशन, मुंबई ( २०२१ ) (५) साहित्य भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, बाल संस्कार संस्था, ठाणे

साहित्य सन्मान : माझा शाळा प्रवेश दिन या ग्रंथास ५ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

आगामी प्रकाशने : एक कथासंग्रह, दोन कवितासंग्रह,

चारोळी संग्रह : १) नातीगोती 2) विजलहरी

  • लेखसंग्रह व काव्य संग्रहांसाठी प्रस्तावनालेखन.
  • विविध दिवाळी अंक व वृत्तपत्र यातून सातत्याने कथालेखन चालू असते.

मराठी ॲपच्या माध्यमातून डिजिटल खालील माध्यमावर विपुल प्रमाणात लेखन केले आहे-

१) प्रतिलिपी २) स्टोरी मिरर ३) पॉकेट नॉव्हेल

स्वतःचा युट्युब चॅनेल आहे ज्यावर अनेक कथा, मिमिक्री, भाषणे उपलोड आहेत.

? जीवनरंग ❤️

☆ पसंत आहे मुलगा…  भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे

महिनाभरानंतर मी महेशच्या घरी जात होतो तो आठ ते दहा दिवसांपासून कॉलेजला आला नव्हता. त्याची तब्येत बरी नाही की काय अशी शंका सहज माझ्या मनात आली.शिवाय माझे एक पुस्तक आणि दोन टॉपिकच्या नोट्स त्याच्याकडेच होत्या त्या मला त्याच्याकडून घ्यायच्या होत्या. मी गेलो त्यावेळी महेश घरीच होता आपली जुनी एम 80 गाडी पुसत होता. मला पाहताच त्याचा चेहरा खुलला. “का रे कसा आलास? “

“सहजच, आठवडाभर झाले कॉलेजला आला नाहीस,म्हटलं गेला की काय ते बघावं…”

” असा कसा जाईन रे? तुला बरोबर घेतल्याशिवाय! ” त्याच्या या वाक्यावर आम्ही दोघेही खळखळून हसलो आणि हासतहासतच एकमेकांना अलिंगन दिले.

” मग?काय झालं? कॉलेजमध्ये, काही विशेष? “

” विशेष काही नाही रे पण वहिनी जरा जास्तच कावऱ्याबावऱ्या झाल्यात… मला पण काही सांगता येईना. म्हणून थेट तुझ्याकडं आलो. “

” आत्ता गप्प बसं नाहीतर उगाच मार खाशील, अन हळू बोल आई घरात हाय,चल घरात, ” तो म्हणाला तसे बोलत बोलत आम्ही घरात गेलो. घरात जाऊन खाटेवर बसलो.

“आई, पाणी दे विजू आलाय,” महेशने आईला आवाज दिला त्याबरोबर पाण्याचा तांब्या घेऊन महेशच्या आई बाहेर आल्या. मी त्यांना मावशी म्हणत असे.

“बरेच दिवसांनी आलास रे ?”

” हो मावशी हल्ली अभ्यास फार वाढलाय ना, परीक्षा पण जवळ आल्यात ना? महेश आ…चार दिवस झालं कॉलेजला आला नाही (खरेतर मी आठ दिवसच म्हणत होतो परंतू महेशच्या वटारलेलंय डोळ्याकडे पाहून मी लागलीच आठ वरून चारवर आलो)म्हटलं चला त्याला भेटून तर यावं. “

अरे त्याला बरं नव्हतं अन रानात कामं पण चालल्यात ना म्हणून म्हटलं रहा घरी चार दिवस, काय व्हत न्हाय. बरं झालं बाबाआलास. बसा जेवायला दोघं.”

” नको, नको मावशी,मी डबा खाऊन आलोय आत्ताच.”

” ये विज्या लय नाटक करू नकोस,वाढ गं आई आम्हाला,मला पण खूप भूक लागलीय, ” महेश पुढे म्हणाला.

” अरे, पण मी खरंच जेवलोय म…महेश… ” पण माझ्या तशा म्हणण्याचा काही उपयोग झाला नाही कारण खरं सांगायचं तर मी जेव्हा जेव्हा महेशच्या घरी जायचो तेव्हा तेव्हा जेवण केल्याशिवाय तिथून माझीच काय पण सोबत असलेल्या कोणाही मित्राची कधीच सुटका व्हायची नाही आणि तिथे नाही म्हणायची तर आमची बिषाद नसायची. त्याच्या आईचा स्वभावच तितका प्रेमळ होता. असे मित्र आणि अशी आई मिळायला खरंच खूप भाग्य लागतं! शिवाय आमच्या दोघांची मैत्री तर फारच दृढ होती. एकमेकांना आम्ही खूप समजावून घ्यायचो.

महेश एक चांगला स्पोर्टमन होता पण अभ्यासात मात्र सोसोच होता. लेक्चर पेक्षा मॅचेस, पिक्चर आणि स्टाईल हेच त्याचं जीवन होतं.मी लेक्चरला रेग्युलर असायचो त्यामुळे महेशला नोट्स पुरवण्याचे माझे काम असायचे. महेशचा स्वभाव खूप मनमोकळा होता. त्याचा मित्रपरिवार सुद्धा खूपच मोठा होता. त्याची पर्सनॅलिटी पण छान होती. सडसडीत बांधा,उंचपुरा, स्टायलिश केस, दिसायला सावळा असला तरी तो नाकीडोळी छान होता. त्याचा चेहरा नेहमी हसतमुख असायचा. सगळ्यांशी छान बोलायचा. कोणाशी भांडणतंटा वगैरे असली काही भानगड नव्हती. सगळ्यांच्यात मिळून मिसळून वागायचा. त्या उलट मी मात्र शांत संयमी आणि अभ्यासू असल्याने थोडा हुशारात मोडत होतो. आमच्या दोघांच्या मैत्रीचं खरं कारण म्हणजे एसटी. आम्ही दोघे एकाच एसटीने प्रवास करायचो.माझ्या गावातून सकाळी एसटी निघायची आणि दोन गावे ओलांडून महेशच्या गावात प्रवेश करायची. तोपर्यंत गाडीत शाळेच्या मुलांची गर्दी व्हायची. पण मी बहुतेकवेळा माझ्या शेजारची जागा महेशसाठी राखून ठेवायचो. वर्गात सुद्धा बहुतेकवेळा आम्ही दोघे एका बाकावरच बसायचो कारण त्याचं लिहिण्याचं स्पीड कमी असल्यामुळे तो माझं पाहून त्याच्या वहीत लिहायचा. लेक्चर संपल्यावर प्रॅक्टिकलला लॅबमध्ये जाण्याअगोदर मधल्या ब्रेकमध्ये आम्ही झाडाखाली डबे खायचो. एकमेकांच्या भाज्याच नव्हेतर थेट डबेच एकमेकांना शेअर करायचो. डबा नसलेले मित्रही आमच्यात मिसळायचे आणि मग अवघा रंग एकच व्हायचा. मौज- मजा -मस्ती खूप व्हायची.

खरेच,आयुष्यातले ते खरे सोनेरी दिवस होते!

हे सगळं मी आठवत असतानाच अचानक महेशने आवाज दिला.

“बस खाली.” तेव्हा कुठे मी भानावर आलो!

मावशींनी लगेच दोन ताटे वाढून आमच्यापुढे आणून वाढून ठेवली. आम्ही जेवायला बसलो. जेमतेम दोन घास खाल्ले आणि माझ्या पटकन काहीतरी लक्षात आल्याने मी म्हणालो, “मावशी, परवाच्या स्थळाचं काय झालं?”

” गप्प बस ! जेव गपचिप!,” विषय टाळण्यासाठी महेश म्हणाला.

तेवढ्यात आईचा आवाज आला, ” अरे पसंत आहे मुलगा त्यांना…! लगेच फोन येऊन गेला त्यांचा. “

” अरे वा! अभिनंदन महेशराव!मावशी आता होऊन जाऊ द्या! लवकर बार उडवा भावड्याचा !”

” अरे बाबा, बार उडवायचा पण महेशचा नाही.”

” मग? “

” तुझा… “

” माझा? म्हणजे मला नाही कळलं?, ” मी हातातला घास परत ताटात ठेवत आश्चर्याने म्हटले.

” अरे त्यांनी महेशला नाही तुला पसंत केलंय. “

” काय?,” मावशींच्या तोंडचे ते शब्द ऐकून मी उडालोच!”

” अरे, ते लोक म्हणाले, आम्हाला नवरदेवासोबत आलेला तो दुसरा मुलगा पसंत आहे. त्याला आम्ही आमची मुलगी देऊ, “मावशी माहिती देत म्हणाल्या.

” काहीतरीच काय मावशी, तुम्ही माझी मस्करी करताय… हो ना? महेश तू तरी… “

” अरे बरोबर बोलतेय आई, काही मस्करी वगैरे नाही. ” महेश म्हणाला.

” अरे पण माझा काय संबंध? माझा प्रश्न येतोच कुठे? आणि हे काय माझ्या लग्नाला अजून पाच ते सहा वर्षे लागतील. मला एम एस्सी करायचंय, त्यापुढे नोकरी आणि… “

” ते खरंय, पण त्यांनी तुलाच पसंत केलय आणि मुलगी छान आहे असं तूच तर म्हणत होतास?”

” हो पण ते सगळं महेशसाठी होतं…शिवाय त्याला पण मुलगीही पसंत आहे.”

” अरे पण तिला तू पसंत आहेस ना? हाच तर मोठा घोळ आहे. “

” मावशी प्लिज तुम्ही माझी चेष्टा करू नका.”

” अरे मी खरं बोलतेय बाळा. महेश? तूच सांग बाबा काय म्हणत होते ते लोक त्यादिवशी फोनवर?,” त्या महेश कडे बोट दाखवत म्हणाल्या.

मी महेशकडे पाहिले पण त्याला काय बोलावे ते सुचत नव्हते तो जाम टेन्शनमध्ये दिसत होता.

बोलण्यापेक्षा तोंडातला घास भराभर चावण्याचे नाटक तो करू लागला.

– क्रमशः भाग पहिला 

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सूर्य नवा दिवस नवा- भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

सूर्य नवा दिवस नवा- भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(महिन्याअखेरीस तू जमेल तेवढे पैसे माझ्या हातात टिकवले तरी चालतील. एवढंच वाटतं की माझ्या हातांची दानत शेवटपर्यंत टिकायला हवीय. आणि हे गुपित आपल्या दोघांतच असायला हवं.’) – इथून पुढे — 

वास्तविक सुमित्राकाकूंचा मुलगा मोठ्या कंपनीत आहे आणि काकूंची ही अगतिकता? मी लगेच म्हटलं, ‘ठीक आहे काकू, उद्यापासून या. मी तुम्हाला महिन्याला एक हजार रूपये देईन, चालेल?’

‘छे, अगं एखाद्या महिन्यात जास्तीत जास्त पाचशे रूपये लागतील. तेही मला लागले तरच घेईन नाही तर काहीच घेणार नाही. माझ्या लेकीसाठी काही करतेय या भावनेने मी स्वयंपाक करीन. मोबदला मिळतो म्हणून नाही. मला कधीही जेवायचा आग्रह करायचा नाही. बघ, तुला पटतंय कां, तर हो म्हण.’

शुभदा म्हणाली, ‘काकू मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. फक्त ही गोष्ट मला माझ्या नवर्‍यापासून लपवून ठेवता येणार नाही. त्यांना सांगावं लागेल, चालेल ना?’

‘बरं बाई, चालेल. आता मला शंभर रूपये देशील, सकाळी येताना काही भाज्या घेऊन येईन.’ असं म्हणत शंभर रूपये घेऊन काकू बाहेर पडल्या. किचनमध्ये गेल्यावर लक्षात आलं की काकूंनी पोह्यांची चव सुद्धा घेतली नव्हती.

एकीकडे सुमित्राकाकूंना मदत करतेय हा आनंद होता तर दुसरीकडे बॅंकेतून आल्यावर आता वेळ कसा घालवायचा हा मोठा प्रश्न शुभदासमोर होता. बॅंकेची शाखा जवळच असल्याने ती सव्वा पाचलाच घरी पोहोचायची.

थोड्या वेळाने सखूबाई आली. झाडलोट करून, कपडे धुऊन पदराला हात पुसत बाहेर येत म्हणाली, ‘ताईसाहेब, आमच्या बाळूला आठवीचं गणित आणि इंग्लिश जरा अवघड जातंय म्हणे. शिकवणी लावायची म्हणत हुता. अवं आता आम्ही गरीबांनी शिकवणी फी कुठनं आणायची? कमी पैशात शिकविणारा कुणी हाय का तुमच्या ओळखीत? असंल तर सांगा.’

मुलांचं हवं नको ते पाहण्यात शुभदा कधी प्रमोशनच्या भानगडीत पडली नव्हती. मुलं दहावीला जाईपर्यंत त्यांच्या सगळ्या विषयांचा तिने स्वत: जातीने अभ्यास घेतला होता. त्यामुळे आठवीच्या मुलांची दोन विषयांची शिकवणी घेणे ही शुभदाच्या दृष्टीने अवघड गोष्ट नव्हती. शुभदाने संधी साधली आणि बोलून गेली. ‘सखू आणखी पांच दहा मुलं भेटतात का बघ. संध्याकाळी साडेपांच ते साडेसहा या वेळेत मी विनामूल्य शिकवणी घेईन.’

दुसर्‍या दिवशी सकाळी शुभदा पहिल्यांदाच फिरायला म्हणून बाहेर पडली. अजून उजाडायला बराच अवधी होता. त्यामुळे थोडे अंधुकसे दिसत होते. चालत चालत ती जवळच्या टेकडीवर पोहोचली. गार वार्‍याची झुळुक येताच तिचे मन मोहरून उठले.

फिरून येताना नुकतेच फटफटू लागले होते. पूर्व क्षितिजावर केशरी सोनेरी रंग दाटून येत होते. त्या गडद रंगांतून तेजोनिधी लोहगोल तो सूर्य हळूहळू वर येत होता. सोनेरी किरणांनी टेकडीवरील झाडे उजळून निघाली होती. जाग आलेल्या पक्ष्यांचा किलबिलाट चैतन्य पसरवत होता. ते विलोभनीय दृश्य अनुभवताना शुभदा हरखून गेली. निसर्गाच्या या अलौकिक सौंदर्याकडे आपण कधीच कसं पाहिलं नाही? सूर्य जसा नित्य नवा असतो तसं आपणही मनांत कसलंही किल्मिष न बाळगता प्रत्येक दिवस नवा अन संधी नवी असं मानायला काय हरकत आहे, असा विचार करीत शुभदा घरी आली.

सकाळचे फिरून झाल्यावर सुमित्राकाकू सात वाजता हजर झाल्या. समोरच्याच सुपरशॉपमधून भाज्या, लिंबू, मिरची, कोथिंबिर घेऊन आल्या. खरेदीच्या रिसीट सोबत उरलेले पैसे परत देत त्यांनी शुभदाला आठवड्याचा मेनूही दिला. ‘काही बदलायचं असेल तर सांग,’ असं म्हणत किचनमध्ये शिरल्या. त्यात बदलण्यासारखे काहीच नव्हते. अगदी अर्ध्या तासात स्वयंपाक संपवून त्या बाहेर पडल्या.

साडेआठला सखूबाई आल्या. ‘ताईसाहेब, पंधरा मुलं तयार हायती. शिकवणीसाठी कम्युनिटी हॉल मिळतोय. दोन दिस थांबावं लागंल.’

शुभदाने होकार भरला आणि त्याच संध्याकाळी तिने आठवीचे गणित आणि इंग्रजी विषयाचे पुस्तक विकत घेतले.

संध्याकाळी साडेपाच वाजता बॅंकेतले काम आटोपून शुभदा डायरेक्ट कम्युनिटी हॉलवर पोहोचली. आधी या मुलांचं व्याकरण पक्कं करणं आणि गणिताचा विषय सोपा करून शिकवणे आवश्यक आहे हे तिच्या लक्षात आलं. मुलं शुभदाच्या शिकवणीत रमून गेली.

दिवसामागून दिवस सरत होते. सर्वच मुलांनी पुढच्या सहामाहीत चांगले यश मिळविले. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी सर्वच पालक झटत असतात पण निरपेक्षपणे इतरांच्यासाठी काही करण्यात किती आनंद असतो हे शुभदा पहिल्यांदाच अनुभवत होती.

घरी परत जाताना शुभदानं आकाशाकडे पाहिलं. उगवतीच्या सूर्यासारखे उमलत जाणार्‍या आपल्या मुलांच्याकडे पाहून किती प्रसन्न वाटायचं. आता आपलं वय ढळत चाललंय अगदी तसं दिवस मावळतीकडे झुकत चालला होता. आकाशात एक अनोखं चित्र साकारत होतं. क्षितिजावर निळसर प्रकाश रेंगाळत होता आणि क्षणार्धातच त्यात लाल, पिवळसर, सोनेरी रंग मिसळत चालले. ‌‌अख्खे सूर्यबिंब केशरी दिसू लागले. सर्वत्र संधिप्रकाश पसरत चालला. सूर्यास्ताचं देखणं दृश्य शुभदाच्या मन:पटलावर बिंबलं गेलं. सूर्योदयाच्या इतकीच संध्याकाळसुद्धा तितकीच मनोहारी वाटत होती.

सूर्योदय असो वा सूर्यास्त, निसर्ग मात्र तेवढ्याच सुंदरतेने प्रकट होतो. मग आपणच ‘संध्याछाया भिवविती हृदया’ असं कां म्हणावं? आयुष्याच्या संध्यासमयी आपणही निसर्गाप्रमाणे तेवढ्याच ग्रेसफुली प्रकट व्हावं. पावलापावलावर सुख आपल्याला साद घालीत असतं. त्या गोष्टीत लपलेले सुख मात्र आपल्यालाच शोधता आले पाहिजे. हळूहळू तिच्या मनावरचे मळभ दूर होत गेले.

घरी आल्यावर तिने रेडियो ऑन केला. जितेंद्र अभिषेकी समरसून गात होते. व्यथा असो आनंद असू दे / प्रकाश किंवा तिमिर असू दे / वाट दिसो अथवा ना दिसू दे / गात पुढे मज जाणे… माझे जीवनगाणे… जणू मंगेश पाडगावकरांचे शब्द पंडितजींच्या सुरांच्या हिंदोळ्यावर झुलत होते.

शुभदाच्या मुखातून ‘वा!’ शब्द उत्स्फूर्तपणे बाहेर पडला. एखादे गाणे ऐकणे हा देखील इतका अलौकिक अनुभव असू शकतो हे शुभदाला पहिल्यांदाच जाणवलं. सुख, समाधान हे आपल्याच मनोव्यापारांवर अवलंबून असतात हे तिला पटलं.

पंडितजी गातच होते. ‘गा विहंगांनो माझ्या संगे / सुरावरी हा जीव तरंगे…… माझे जीवनगाणे !’

– समाप्त – 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सूर्य नवा दिवस नवा- भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

सूर्य नवा दिवस नवा- भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

सकाळी जाग येताच शुभदाने भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं. साडेसहा वाजायला आले होते. बेडवरून उठून तिची पावले किचनकडे वळली. चहाचं आधण ठेवलं. बेसिनवर जाऊन ब्रश करून तिने तोंडावर पाणी मारलं. फक्कड वाफाळत्या चहाचे घुटके घेत ती बाल्कनीतल्या खुर्चीत बसली. गार वार्‍याची झुळुक तिला सुखावून गेला.

अजून सगळं आवरून स्वत:साठी जेवण बनवायचं होतं. आज जेवायला काय करायचं, हा मोठा प्रश्न असायचा. एकटीसाठी म्हणून कसली आवडनिवड असते? नवरोबा रविवारी येतो तेंव्हा त्याची कसलीच फर्माईश नसते. आपली लेक मात्र उद्याच्या ब्रेकफास्टचा, लंचचा, डिनरचा मेनू एक दिवस अगोदर सांगायची. कधी सुशांतला विचारलं तर, ‘आई तुझ्या हातचं काहीही चालेल, पण मेदूवडे करशील तर मज्जा येईल.’ असं म्हणायचा. आता सगळंच बदललं आहे.  

‘शुभदा’ या हाकेने तिचं लक्ष खाली वॉकिंग ट्रॅककडे गेले. वॉकिंगला चाललेल्या सुमित्राकाकूंनी हाय म्हणण्यासाठी आवाज दिला होता. शुभदाने त्यांना वरती येण्यासाठी खूण केली. थोड्याच वेळात सुमित्राकाकू लिफ्टने वरती आल्या. 

सुमित्राकाकू म्हणजे मध्यम बांधा, गोरा रंग, स्वच्छ सुती साडी, पिकलेल्या केसांवर मेंदी लावून सोनेरी झालेले केस, लुकलुकणारे निरागस टपोरे डोळे आणि सुरकुतलेल्या चेहर्‍यावर मधाळ हसू  ल्यालेली सुंदर मूर्ती.  

‘काकू, बसा तुमच्यासाठी चहा करते.’

‘नको ग, हे गेल्यापासून मी सकाळचा चहा सोडला आहे. बरं तुझी लेक काय म्हणतेय? सुशांतचं मेडिकल कसं चाललंय?’

‘खरं सांगू, काकू लेकीच्या लग्नानंतर माझ्या शरीराचाच एक भाग विलग झाल्यासारखं मला वाटलं होतं. माझ्या अवतीभवती मांजरीसारखी सदैव घुटमळणारी माझी लेक सासरी गेल्यानंतर मला पार विसरली आहे. गावात असून देखील तिला इकडे यायला वेळ नसतो. कधी अचानक वादळासारखी येते अन झपाट्याने निघून जाते. अधूनमधून केवळ रेसिपी विचारून झालं की ‘चल ठेवते, परत बोलू’ असं म्हणत लगेच फोन ठेवते. 

सुशांतला मेडिकलची अ‍ॅडमिशन मिळाल्यावर त्यानं घर सोडलं अन त्याच्या माघारी मी खूप रडले. तो सदैव कुठल्या ना कुठल्या सेमिनारमध्ये व्यग्र असतो. त्याच्याकडेही वेळ नसतो. माझ्याशी फोनवर चाललेलं संभाषण कधी एकदा संपेल याची त्याला घाई असते. 

पतिदेव मात्र रोज रात्री न चुकता फोन करतात. ‘जेवलीस काय? आजचा दिवस कसा गेला?’ हे आवर्जून प्रेमाने विचारतात. मुंबईलाच बदली झाल्यानं ते रविवारी किंवा मध्ये सुट्या पडल्या की येऊन जातात. एरव्ही मी एकटीच असते. दिवसभर बॅंकेत असते म्हणून बरं आहे. संध्याकाळी मात्र मला एकटीला घर खायला उठतं. 

काकू, मला आता कसलंच टेन्शन नाही. पण अलीकडेच उच्च रक्तदाब असल्याचं निदान झालं. आता एक कायमची गोळी नियमितपणे घ्यावी लागतेय. एक वेळ गोळी चुकली तरी चालेल पण फिरायला मात्र न चुकता जायला हवे असा डॉक्टरांनी आवर्जून सांगितलं आहे. पण अजूनपर्यंत तरी फिरायला जात नाहीये.

‘अगं, तुझी मुलं आता आईबाबांचे बोट सोडून स्वतंत्रपणे चालायला शिकली आहेत. त्यांना त्यांचं म्हणून एक स्वतंत्र विश्व निर्माण करायचं आहे. स्वत:चे निर्णय घ्यायला ते सक्षम आहेत, यातच तुला आनंद मानायला हवा.

आपण नागपूरहून इतक्या लांब आलो म्हणून काय आपलं आपल्या आईबाबांच्यावरचं, भावाबहिणीवरचं प्रेम ओसरलं आहे काय? आपल्या पंखाखाली पिलांना ऊब देणं हा मायेचा धर्म असला तरी त्यांना पंख फुटल्यावर आकाशात स्वच्छंद उडू देणं हे देखील पालकांचं कर्तव्यच असतं. जीवनातला हा बदल अपरिहार्य असतो तो स्वीकारायला हवा. मुलं आपल्यापासून कायमची विलग झाली म्हणून उगाच चिंता करू नकोस. त्या चिंतेचाच परिणाम आहे, तुझा रक्तदाब. सकाळी फिरायला जात जा, किती प्रसन्न वाटेल पाहा.

या विश्वात प्रत्यक्ष दिसणारा एकमेव देव सूर्यनारायण किरणांच्या रथावर आरूढ होऊन आपल्या भेटीला नित्य नव्या स्वरूपात येत असतो. कधी अनुभवून पाहा. जमलंच तर संध्याकाळच्या वेळी वंचित मुलांच्यासाठी काही करता आलं तर बघ.’ 

‘काकू, बसा मी पोहे करते. तुमच्यासाठीच म्हणून नाही, मलाही खायचे आहेत.’ 

‘शुभदा, तुझी हरकत नसेल तर पोहे मी बनवू काय?’ काकूंच्या लाघवी बोलण्यात आर्जव होतं.

शुभदा रिलॅक्स होत म्हणाली, ‘ठीक आहे काकू, बनवा. मी आंघोळ आटोपून येते.’               

शुभदा तयार होऊन येताच काकूंनी पोह्यांची प्लेट तिच्या हातात दिली. ‘पोहे अगदी मस्त झाले आहेत. काकू तुमच्या हाताला केवढी चव आहे!.’

‘अग हो, कुणाला तरी खाऊ घालणं आणि कुणाच्या हातात काही ठेवणं याचंच या हातांना अप्रूप वाटत आलंय. आता ती दोन्ही कामं थांबली आहेत. माझी सून मला किचनमध्ये फिरकू देत नाही. त्यांचं ते सामिष चमचमीत जेवण बनवणं मला जमत नाही. 

तुझे काका असताना घरखर्चासाठी म्हणून मुद्दामहून जास्ती पैसे द्यायचे. हिशेब पाहायचेच नाहीत. आतापर्यंत त्याच पैश्यातून पुरवून पुरवून मी मुलां-नातवंडाना काही तरी देत होते. आता तेहि संपत आलेत. कुणाकडे मागायची लाज वाटते. तुझी हरकत नसेल तर मी तुझा सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक करू काय?. महिन्याअखेरीस तू जमेल तेवढे पैसे माझ्या हातात टिकवले तरी चालतील. एवढंच वाटतं की माझ्या हातांची दानत शेवटपर्यंत टिकायला हवीय. आणि हे गुपित आपल्या दोघांतच असायला हवं.’ 

– क्रमशः भाग पहिला

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चार अनुवादित लघुकथा : भाग्यवान // वेळेचा अभाव // संशोधन // ममत्व ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ चार अनुवादित लघुकथा : भाग्यवान // वेळेचा अभाव // संशोधन // ममत्व ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

१.  भाग्यवान

दादा आणि भाऊ बालमित्र. दोघेही एका शाळेत, एका वर्गात शिकले. पुढे दादासाहेब शाळेत मास्तर झाले आणि नंतर हेडमास्तर. भाऊसाहेब एका कचेरीत कारकून म्हणून लागले. पुढे हेड क्लार्क झाले.

दोघांची लग्ने जवळपास एकदमच काही महिन्यांच्या अंतराने झाली. दादांचा मुलगा आदित्य आणि भाऊंचा मुलगा गौरव हेही समवयस्क. दादांना पुढे अमेय झाला. भाऊंना मुलगी झाली गौरी. ही सारी मुलेही एकाच शाळेत शिकली.

दादांची मुले आदित्य आणि अमेय अतिशय हुशार आणि प्रखर बुद्धीची. सतत नंबरात असलेली. स्कॉलरशिप मिळवणारी. दादांना त्यांचा अभिमानच नव्हे, तर गर्व होता. भाऊंच्या पुढे ते आपल्या मुलांचं वारेमाप कौतुक करत. आपण किती नशीबवान आहोत, हे वारंवार बोलून दाखवत. त्यांना थोडसं हिणवतसुद्धा. भाऊंची मुलेही हुशार होती, पण दादांच्या मुलांप्रमाणे चमकत्या करिअरची नव्हती.

आदित्य पवईहून एम. टेक. झाला. त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागली. सुंदर, सुविद्य पत्नी मिळाली. पुढे परदेशात मोठे पॅकेज मिळाले. तो अमेरिकेला निघून गेला. अमेयही त्याच्या पाठोपाठ अमेरिकेला गेला. तिथेच स्थिरावला. तिथेच लग्न केले. संसार मांडला.

गौरव डिप्लोमा झाला. नंतर एम. बी. ए . केले. टू व्हीलर दुरुस्तीचा वर्कशॉप सुरू केला. गोड बोलणं, कष्ट करण्याची तयारी यामुळे गौरवचा धंद्यात चांगलाच जम बसला. पुढे त्याने टू व्हीलर गाड्यांची एजन्सी घेतली. त्याचाही संसार मार्गी लागला.

दादा आणि भाऊ आता निवृत्त झाले होते. ते रोज संध्याकाळी भेटत. एकत्र फिरायला जात. वाढत्या वयानुसार रोजची भेट अधून मधून झाली. नंतर नंतर दुर्मिळ होऊ लागली. दोघांच्या तब्बेतीच्या तक्रारी सुरू झाल्या. गौरव आपल्या वडलांची काळजी घेत होता. अधून मधून आपल्या दादा काकांकडे येऊन त्यांचीही विचारपूस करत होता. त्यांना काय हवं- नको ते बघत होता. गरजेच्या गोष्टी आणून देत होता.

दादांची मुले अमेरिकेत गेल्यानंतर सुरूवातीला एक-दोनदा येऊन गेली. नंतर नंतर मात्र त्यांना यायला वेळ मिळेनासा झाला. दादांना पेन्शन होती. ते काही आर्थिकदृष्ट्या आपल्या मुलांवर अवलांबून नव्हते.

दादांचे प्रोस्टेटचे ऑपरेशन करायचे ठरले. गौरवने दादांच्या मुलांना कळवले. मुले म्हणाली, ‘पैसे पाठवू का?  यायला वेळ नाही.’ दादांच्या रक्तप्रवाहात ब्लॉकेजेस निघाली. अ‍ॅंजिओप्लास्टी करायचे ठरले. गौरवने दादांच्या मुलांना कळवले. मुले म्हणाली, ‘पैसे पाठवू का?  यायला वेळ नाही.’ दादांना माईल्ड हार्ट अ‍ॅटॅक आला. गौरवने दादांच्या मुलांना कळवले. मुले म्हणाली, ‘पैसे पाठवू का?  यायला वेळ नाही.’ गौरवने दादांचे सारे मुलाच्या मायेने केले.

दादांना आताशी वाटू लागलय, आपली मुलं थोडी कमी हुशार असती तर बरं झालं असतं. भाग्यवान आपण नाही. भाऊ आहे.

लेखिका – सौ. उज्ज्वला केळकर    

२.  वेळेचा अभाव

फेसबुकवर जशी काही स्पर्धा चालू होती. क्षणांशात  एक नवीन पोस्ट त्याने टाकली.  त्यात अनेक फोटो सामील होते. रंग बदलणारे ढग, चित्रकार सूर्य, झाडांचे, पर्वतराज हिमालयाचे, मोहवणार्‍या आकर्षक धारणीचे, हसणार्‍या खिदळणार्‍या रत्नाकराचे, सर्पिणीसारख्या नागमोडी वळणाने जाणार्‍या सरितांचे, याचे… त्याचे… आणखी किती तरी… 

यावेळी दु:खी-कष्टी झालेल्या सुनीलने आपल्या मृत झालेल्या वडलांचा देह आणि हार घातलेला त्यांचा फोटो अपलोड केला. आसपासच्या आगरबत्यातून, वर वर चढत जाणार्‍या धूम्ररेखा नुकतंच त्यांचं निधन झाल्याची ग्वाही देत होत्या.

सगळ्यात जास्त लाईक्स या फोटोला मिळाले.

एका बहिणीने आपल्या भावाला फोन केला,

‘तू त्यांच्याकडे जाऊन का आला नाहीस? निदान पोस्टवर त्यांच्याविषयी श्रद्धांजलीचे दोन शब्द तरी लिहायचे. सुनीलला सांत्वना मिळाली असती.’

‘ताई तेवढा वेळ नव्हता. लाईक तर केलं ना?’ आणि तो पुन्हा विविध सुंदर दृश्यांचे फोटो आपलोड करू लागला.

मूळ कथा – समयाभाव   

मूळ लेखिका – अनिता रश्मि  

भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

3. संशोधन   

‘मुलांनो, मला असं वाटतं, यावेळी शेतकर्‍यांवर संशोधन प्रबंध हाती घ्यावा.’

‘फारच छान!’

‘मग सगळ्यात आधी नामवंत लेखकांकडून या विषयावरच्या कथा मागवून घ्याव्या.’

‘ठीक आहे सर, पण याबाबतीत एक गोष्ट मनात येतेय.’

‘अरे, नि:संकोचपणे सांग.’

‘सर, शेतकर्‍यांवर संशोधन प्रबंध हाती घेत आहोत, तर त्यावरील कथांची गरज आहे का?’

‘म्हणजे काय? संशोधनासाठी कथेत शेतकरी हे पात्र असायलाच हवं.’

‘मला म्हणायचय, प्रत्यक्षात शेतकरी काय करतोय, कसा जगतोय, याचं वर्णन यायला नको का?’

‘अजबच आहे तुझं बोलणं! वास्तवातल्या पात्रांवर कधी संशोधन झालय?’

‘पण सर, संशोधनात नवीन गोष्टी यायला हव्यात नं?’

‘ओ! समजलं तुला काय म्हणायचय!’

‘मग काय त्याबद्दल माहिती गोळा करूयात?’

अरे बाबा, आपल्याला, लेखकाच्या लेखणीच्या टोकाच्या परिघात असलेल्या कथांमधील शेतकरी पात्रांवर संशोधन करायचय. त्यांच्याबद्दल वाचल्यानंतर अश्रूंसह दयाभव जागृत व्हायला हवा. शेत सोडून रस्त्यावरून ट्रॅक्टर फिरवणार्‍यांवर आपल्याला संशोधन करायचं नाहीये.’

‘पण असं तर ते आंदोलन करण्यासाठीच करताहेत नं!’

‘हे बघ, ज्या शेतकर्‍यांबद्दल तू बोलतोयस, त्यातील एक तरी अर्धा उघडा, अस्थिपंजर शरीर असलेला आहे का?’

‘पण सर, आता काळ बदललाय. प्रत्येक जण प्रगती करतोय.’

‘बाबा, एक गोष्ट लक्षात ठेव, संशोधनासाठी शोषित असलेलीच पात्र योग्य ठरतात. अशा पात्रांच्या कथाच काळावर विजय मिळवणार्‍या ठरतात.

मूळ कथा – शोध   

मूळ लेखिका – अर्चना तिवारी  

भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

४. ममत्व

सावित्रीच्या मुलीच्या सासरहून फोन आला की पारोला मुलगा झालाय. आजी झाल्याच्या आनंदात तिने आसपास, परिचित नातेवाईक यांच्यामध्ये मिठाई वाटली. काही वेळाने मुलीचा फोन आला, ‘माझ्याकडे यायचं, तर आपला चांगला आब राखून ये. आपली इज्जत आणि प्रतिष्ठा वाढेल, अशी ये.’

पारोचं जेव्हा लग्नं ठरलं, तेव्हा मागणी तिच्या सासरच्यांकडून होती. त्यावेळी तिने आपले दागिने विकून आणि जी काही जमा-शिल्लक होती, ती काढून, मोठ्या थाटा-माटात तिचं लग्नं लावून दिलं होतं.

यावेळी मागणी तिच्या स्वत:च्या मुलीची होती. खरं तर पारोला आपल्या आईच्या परिस्थितीची चांगली जाणीव होती. सावित्रीने आपल्या दोन्ही मुलांना पारोच्या फोनबद्दल सांगितलं. पण दोघांनीही आपण स्वत:च पैशाच्या तंगीत आहोत, असं म्हणत हात झटकले. सावित्रीने मग आपल्या राहिलेल्या दोन सोन्याच्या बांगड्या विकल्या. आपल्या नातवाला सोन्याची चेन केली. मुलीच्या सगळ्या परिवारासाठी कापड-चोपड घेतलं. फळांच्या आणि, मिठाईच्या टोपल्या घेतल्या आणि ती पारोकडे आली. पारोच्या सासरी तिची इज्जत वाचली पण ती जेव्हा घरी आली, तेव्हा तिच्यावर दु:खाचा पहाड कोसळला.

सावित्रीने आपल्या बांगड्या विकल्याचे ऐकून तिची मुलं आणि सुना अशा संतापल्या की वाद-विवाद, भांडणात ती दोन घास अन्नालाही महाग झाली. आता सावित्री मंदिरात सेवा करून आपला जेवणाचा आणि औषधापाण्याचा खर्च चालवते आणि तिथल्या धर्मशाळेच्या तुटक्या-फुटक्या खोलीत खंत करत आपलं म्हातारपणाचं ओझं वहाते.

इकडे मुलं आणि सुना सांगत फिरतात की आईला देवाची इतकी ओढ लागली आहे, आता ती घराच्या बंधनात बांधून राहू इच्छित नाही. ती आता संन्यासिनी झालीय. आता ती घरीदेखील येत नाही.

मूळ कथा – ममत्व 

मूळ लेखक – अशोक दर्द   

भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ क्लेप्टोमॅनिया — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ क्लेप्टोमॅनिया — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(किती हो गुणी मुलगी आहे सुरुची.  देवाने हा असला दुर्मिळ आजार या सोन्या सारख्या मुलीला का द्यावा?” माहीच्या डोळ्यात पाणी आलं..).. इथून पुढे —

दोघी मैत्रिणी खुशीत मावशीच्या फार्म हाऊसवर गेल्या..  खूप मजा केली त्यांनी.. मावशीने खूप लाड केले त्यांचे. दोघी खूप हिंडल्या, दंगामस्ती केली,धबधब्याखाली मनसोक्तभिजल्या. रोज जेवल्यावर  माहीला हळूच आपली पर्स दाखवायची सुरुची.. त्यात कधी चमचे कधी टिशू पेपर असल्या फुटकळ वस्तू असत तर कधी काहीही नसे.. माही गुपचूप सगळ्या वस्तू जागेवर ठेवून देई.. सुरुचीला अत्यंत गिल्टी वाटे .ती माहीला म्हणायची,”माही,कोण होतीस तू माझी मागच्या जन्मी?किती मला संभाळून घेतलंस ग आजपर्यंत? पण कायम अशी तुझ्यावर अवलंबून कशी रहाणार मी?काय आहे माझ्याभविष्यात देव जाणे.” खिन्न होऊन सुरुची म्हणायची..

“होईल ग सगळं ठीक!आत्तापर्यंत नाही का झालं तसंच होईल”  माही म्हणाली..

दोघींचे रिझल्ट्स लागलेआणि दोघींनाही पहिल्याच लिस्ट मध्ये मेडिकलला ऍडमिशन मिळाली.

दोघींचा आनंद गगनात मावेना..  छोट्या डबक्यातले मासे आता नदीत पोहायला जाणार होते,क्षितिजे विस्तारणार होती..

नवीन कॉलेज सुरू झाले.. दोघींच्या टर्म्स नशिबाने एकत्रच लागल्या.. अभ्यास प्रॅक्टिकल्स करताना दिवस कसे कुठे जात ते दोघींनाही समजत नसे..  माहीची परिस्थिती जरा बेताची होती..माही परीक्षेच्या दिवसात सुरुचीकडे रहायलाच यायची.. सुरुचीच्या बेडरूम मध्ये कॉट वर पडून दोघी आपली स्वप्नं रंगवत..”माही, मी नोकरी करणार नाही. स्वतःचेच क्लिनिक सुरू करीन.उगीच दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये जाऊन माझा हा आजार लक्षात आला तर किती बदनामी होईल माझी..”  शहाणी सुरुची म्हणायची. .माहीला या गुणी मैत्रिणीबद्दल फार वाईट वाटायचे..

दिवस भरभर उलटत होते.. बघताबघता दोघीही  चांगले मार्क्स मिळवून पास झाल्यासुद्धा.. माहीने पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन ला प्रवेश घेतला. कितीही आग्रह करूनही सुरूचीने ठाम निर्णय घेतला, मी पुढे काहीही करणार नाही.. मला स्पेशलायझेशन करायचं नाही.मी सरळ आता दवाखाना उघडणार. बाबांच्या बंगल्यातला खालचा मजला घेईन छान रिनोव्हेट करून..”कितीही सांगून माही ,सुरुचीचे बाबा दमले तरी सुरूचीने ऐकलं नाहीच..  “बाबा, इतके दिवस माझ्या मागे  माही ढाली सारखी उभी राहिली म्हणून निभावलं. तिला तिचं आयुष्य नाहीये का? तिलाही पुढे शिकू दे,दुसरे मित्र मैत्रिणी जमवू दे.. आता मात्र नको बाबा..चोरटी  डॉक्टर म्हणून मला मोठ्या हॉस्पिटल मध्ये जाऊन बदनामी नाही करून घ्यायची..हे कधीतरी लोकांना  समजणार हो बाबा..त्यापेक्षा माझे स्वतःचे क्लिनिकच बरे… झाकली मूठ राहू दे झाकलेलीच राहील तितकी..” सुरुचीच्या डोळ्यात पाणी आलं..

बाबा,अजून आठवतं हो मला,लहानशी सुरुची कोपऱ्यात उभी असलेली आणि बस मधली मुलं तिच्याकडे संशयाने बघत असलेली!  पण त्याचा गाजावाजा झाला नाही.. मला चांगलं काही दिसलं की ते उचलायची अनावर उर्मी यायचीच.. आणि नंतर ती नाहीशीही व्हायची..  तेव्हा तुम्ही ,माही,शाळेतले सहृदय फादर माझ्यासाठी उभे राहिलात..म्हणून तर आजचे हे दिवस मला दिसत आहेत..

नशिबाची फार परीक्षा बघू नये असं तुम्हीच म्हणता ना? मी इथेही छान यशस्वी होऊन दाखवीन बाबा.  “सुरुची म्हणाली.  ठीक आहे म्हणून बाबा मागे फिरले.  त्यांनी सुरुचीला खालचा मजला सुंदर रिनोव्हेट करून दिला.. सुरूचीने दवाखाना सुरूकेला..कॉलनीत  दुसरा डॉक्टर नव्हताच..सुरुचीच्या गोड बोलण्याने,उत्तम रोगनिदानाने बघता बघता तिचा उत्तम जम बसला. सुरूचीने माया म्हणून हुशार रिसेप्शनिस्ट नेमली होती..कोणत्याही  पेशंटने आपली कोणतीही वस्तू पर्स काहीही आत आणायचे नाही..

तपासण्याच्या रूममध्ये रिकामे जायचे हा कडक नियम होता सुरुचीच्या दवाखान्यात..  त्याचे कारण फक्त सुरुचीलाच माहीत होते..त्या दिवशी माही सुरुचीला भेटायला आली.  वॉव सुरुची..केवढी गर्दी ग दवाखान्यात.

मिंटिंग मनी हं? ग्रेट.  अगदी अचूक ठरला तुझा निर्णय ग. .शाबास!!”माही मनापासून म्हणाली..

बरं हे पेढे घ्या..झाली तुझी मैत्रीण एम डी.. अजूनही कष्ट संपत  नाहीत”..हसत हसत माही म्हणाली..” हो ग माही,सोपी आहे का तुझी ही वाट?पण मग  सोन्याची फळंही मिळतील बरं.”सुरुची हसून म्हणाली..  सुरुचीच्या आईबाबांना तिच्या लग्नाचे वेध लागले..आपली ही गुणी मुलगी चांगल्या मुलाच्या हातात पडावी असं मनापासून वाटायचं त्यांना..इतकी गुणी, हुशार भरपूर पैसे मिळवणारी मुलगी  कदर असणाऱ्या मुलाला मिळावी या अपेक्षेत  गैर काय होते? सुरुचीची अट होती. मला कोणालाही फसवून लग्न करायचे नाही.मला क्लेप्टोमॅनिया आहे हे सांगूनच मी लग्न करणार. मग भले मी तशीच राहिले तरी चालेल. सुरुची आपल्या म्हणण्यावर ठाम होती..  नंतर ते लग्न मोडण्यापेक्षा आधीच सत्य माहीत असलेले केव्हाही चांगले असे सुरुचीचे मत…दरम्यान माही लग्न होऊन परदेशात गेली..  सुरुचीची प्रॅक्टिस आणखीच जोरात चालायला लागली.  एक दिवस तिच्या दवाखान्या समोर एक  कार येऊन उभी राहिली..  सुरुची खाली मान घालून काहीतरी काम करत होती.. वर बघितलं तर हे कोण आहे?असं तिने प्रश्नार्थक नजरेने बघितलं..बसा ना, मी ओळखलं नाही तुम्हाला.  सुरुची म्हणाली.. 

आठवतो का मी? शिरीष? तुझ्या वर्गात होतो शाळेत.. तुझं कसं लक्ष जाणार म्हणा? बॅक बेंचर आम्ही आणि तू स्कॉलर!  पटतेय का ओळख?”त्याने हसून विचारलं..

अरे हो!  शिरीष तू? बस ना..इथे कसा आलास?” सांगतो. माही भेटली होती मला अमेरिकेत.. मी गेलो होतो तिकडे कॉन्फरन्स साठी..अर्थात तुझी चौकशी केलीच मी..  माही मस्त आहे तिकडे. तुम्ही आहात ना रोज  टेक्स्ट वर?  मस्त चाललंय तिचं. तर मला माहीने तुझ्याबद्दल सगळं सांगितलंय.मी डॉक्टर झालो पण इथून नाही,, गुजरात मधून.. .म्हणून मला इथली तुमची काहीच माहिती नव्हती. आता पुण्यात आलोय आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला जॉब करतोय. सुरुची, मला लग्न करायचं आहे तुझ्याशी..ते क्लेप्टोमॅनिया बद्दल मला सगळं सांगितलंय माहीने.मी त्याला महत्व देत नाही.उगीच त्याचा बाऊ करू नकोस. तुझ्या सगळ्या गुण दोषांसकट तू मला हवी आहेस..” बोल काय ते. आधीच उशीर झालाय. आता नाही म्हणू नकोस.”  सुरुचीच्या डोळ्यात पाणी आलं. उठून उभं रहात तिने घट्ट मिठीच मारली  शिरीषला.. शिरीष हसायला लागला .सुरुची लाजून दूर झाली.  दोनच महिन्यात सुरुची आणि शिरीषचं शुभमंगल झालं .. सुरुचीच्या आईवडिलांना स्वप्नात कल्पना केली नव्हती असा जावई मिळाला..आज सुरुचीला दोन मुलगे आहेत आणि तिचा संसार मस्त चाललाय.  याचं श्रेय शिरीष आणि सुरुची अर्थात माहीला देतात. बालवर्गापासून ते आपल्या लग्नापर्यंत सतत आपल्या मागे सावली सारख्या उभ्या असलेल्या माही सारख्या आधारवडाला विसरणे, सुरुचीला  शक्य  तरी होते का?

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ क्लेप्टोमॅनिया — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ क्लेप्टोमॅनिया — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

सुरुचीला आई  रागावत होती ,अग सुरुची,हे काय आणलं आहेस खिशातून घरी? कोणाची बाहुली आहे ही? सुरुची गप्प  उभी होती.  “ ममा, रागावू नकोस ना ग..  मला ही खूप आवडली.. शेजारच्या माहीची आहे ही.  मला खूप खूप आवडली ग पण  मी चोरी नाही केली.”   हे बघ  सुरुची,तू चोरी नाही ना केलीस? मग आता माहीच्या घरी जा आणि तिला म्हण,सॉरी माही!   ही तुझी बाहुली  .मी चोरली नाहीये पण मला खूप घ्यावीशी वाटली.  घे ही परत.  मला माफ कर..  सुरुची,हे तू तिच्या घरी जाऊन तिला म्हणालीस तरच मी तुला माफ करीन.”  सुरुची तशीच उभी राहिली. आपली आई आपल्याला घरात घेणार नाही हे तिला चांगलंच माहीत होतं.. 

हळूहळू चालत सुरुची माहीच्या घरी गेली.  “माही,ही घे तुझी बाहुली..मला खूप आवडली म्हणून मी खेळायला घरी नेली ग, पण मी चोरली नाही.”   माहीने सुरुचीचे भरून आलेले डोळे पुसले. “सुरुची, मला माहीत आहे ग,तुला ही बाहुली खूप आवडली होती,पण अशी न विचारता न्यायची नाही हं.  मी दिली असती तुला खेळायला. आपण सख्ख्या मैत्रिणी ना? असं कोणालाही न विचारता वस्तू  नेणं बरोबर नाही सुरुची.”   गंभीरपणे माही सांगत होती.   सगळं विसरून दोघी पुन्हा खेळायला लागल्या.. तो प्रसंग  सुरुची , तिची आई विसरून गेल्या.

सुरुची खूप हुशार, गुणी मुलगी. आईवडिलांची एकुलती  एक मुलगी. खूप  प्रयत्न करूनही सुरुचीच्या आईला सुरुचीनंतर दुसरं मूल झालंच नाही. सुरुची त्यांची अत्यंत लाडकी.

सुरुचीला अत्यंत विख्यात शाळेत प्रवेश मिळाला आणि माही आणि सुरुची एकाच स्कूल बसने शाळेत जाऊ लागल्या. हळूहळू बस मधून मुलांच्या तक्रारी येऊ लागल्या.  आज मिहिरची कंपास बॉक्स गेली  उद्या शिरीषचे पेन सापडत नाही..  ह्या तक्रारी शाळेत प्रिंसिपल कडे गेल्या.  माहीने सुरुचीला विचारलं,”सुरुची,या मुलांच्या अशा तक्रारी आल्या आहेत.  मला खरं सांग,हे सगळं तू तर नाही ना घेतलंस?” सुरूचीने आपलं दप्तर माही समोर पालथं केलं.  या सर्व वस्तू इकडे तिकडे विखुरल्या. शिरीषचं पेन,मिहिरची कंपास बॉक्स  सगळं दिसलं  माहीला.  सुरुची स्तंभित होऊन उभी होती.हे आपणच केलं आणि कसं आणि कधी,हे तिला समजेचना. ”माही,मी मुद्दाम नाही ग हे करत.  पण मला एखादी गोष्ट हवीशी वाटली की ती घेण्याची तीव्र इच्छा मला होते.  मग ती घेतल्याशिवाय मला चैनच पडत नाही.. मी ती घेते आणि मग दुसऱ्याच क्षणी मला ती नकोशीही होते. मग मला आठवत पण नाही,की मी हे कधी केलं आणि का केलं”.

सुरुची हुंदके देऊन रडायला लागली. माही आणि तिची आई सुरुचीच्या घरी गेल्या..  सुरुचीचे आईवडील हे ऐकून स्तंभित झाले आणि ही गोष्ट वाटते इतकी साधी नाही हेही त्यांच्या लक्षात आले.  दुसऱ्या दिवशीच सुरुचीला बाबांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे नेले. डॉक्टर म्हणाले,हा क्लेप्टोमॅनिया  नावाचा मानसिक आजार आहे.  हा का होतो,याचे उत्तर नाही.. ही मुलं किंवा माणसं चोरी करण्याच्या हेतूने हे करतच नाहीत.  ज्या क्षणी ते हे करतात त्याच क्षणी ते हे विसरून जातात आणि ती उर्मी  नाहीशी होते.  बरं हे लोक रोजही असं करत नाहीत. मला वाटतं, सुरुचीला क्लेप्टोमॅनिया असावा. मी माझ्या चांगल्या मित्राकडे ,जो सायकीएट्रिस्ट आहे त्याच्याकडे हिला न्यायचा सल्ला देईन.  “ दरम्यान तुम्ही  प्रिंसिपलनाही भेटा.  त्यांना सत्य परिस्थिती सांगा. या लहान मुलीवर याचा विपरीत परिणाम होता कामा नये. एरवी किती हुशार मुलगी आहे ही!   तुम्हीच सांगितलंत ना,शाळेत ही सतत पहिली असते म्हणून?”   डॉक्टरांनाही या निरागस मुलीबद्दल वाईट वाटले.   बाबा प्रिंसिपलना भेटले .  त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि सांगितलं, “मिस्टर मोघे, काळजी करू नका. ही गोष्ट तुमच्या माझ्यातच राहील. वस्तू गेलेल्या माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही आणून देत जा आणि आम्ही त्या ज्याच्या त्याला परत करू.  यात कुठेही सुरुचीचे नाव येणार नाही याची काळजी आपण घेऊ.”.  बाबांकडचे मनोविकार तज्ञांचे रिपोर्ट्स बघत प्रिंसिपल बाबांशी बोलत होते. त्यांनाही या मुलीबद्दल वाईट वाटलं.  कधीतरी मुलांच्या तक्रारी येत . कधी किरकोळ गोष्टी नाहीशा होत पण त्या सापडत देखील दुसऱ्याच दिवशी.. ही गोष्ट फक्त माहीलाच माहीत होती.  माही आणि सुरुचीची मैत्री इतकी घट्ट हाती की शाळा संपेपर्यंत ही गुप्त गोष्ट कोणाला समजली नाही आणि सुरुचीचे शाळेतले स्टार स्टुडन्ट हे स्थानही अबाधित राहिलं.

मुली मोठ्या झाल्या.. कॉलेज मध्ये जाऊ लागल्या.  सुरुचीच्या ग्रेडस् अत्यंत उत्तम होत्या.  माहीसुद्धा अतिशय जिनिअस होती. दोघींची मेडिकलला जाण्याची तीव्र इच्छा होती. सुरुची माही ला म्हणाली,”माही, मी नियमाने सगळी औषधे घेते, पण मला माझ्या वस्तू घेण्याच्या जबर उर्मीवर मात करता येत नाही ग.  मी चांगली  डॉक्टर कशी होऊ शकेन ग माही?”

सुरुचीच्या आणि माहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ”का नाही होणार तू चांगली डॉक्टर सुरुची? मी कायम तुझ्याबरोबर आहे आणि असेन.  हा आजार हा तुझा दोष नाहीये ..तरी हे बरंच कंट्रोल मध्ये तू आणलं आहेसच. ध्यान,  प्राणायाम साधना योग करून.. होईल सगळं मस्त ग.” त्या वर्षी दोघीनी जीव तोडून अभ्यास केला. . परीक्षा संपल्या आणि दोघीनी जरा चार दिवस कुठेतरी  विश्रांतीला जायचं ठरवलं.

माहीच्या मावशीचं पानशेत जवळ मस्त फार्म हाऊस होतं तिकडे ती आग्रहाने बोलावत होती.. सुरुचीच्या आईनं माहीला सांगितलं,”माही,तू आहेस म्हणूनच मी सुची ला पाठवते आहे ग. नाहीतर काय होईल ?” काकू नका काळजी करू.  मी सतत आहे सुरुची जवळ लक्ष ठेवून.. हसत हसत म्हणाली,” ही माझी लिपस्टिक तेवढी नेते हं.  कालच सुरूचीने नेली होती..तिनेच सांगितलं मला..” पण हल्ली हे खूप खूप कमी झालंय काकू सुरुचीचे ..खूप महिन्यांनी हे होतं कधीतरी आणि ते सुरुचीच्या लक्षात  आलं की ती माझ्याजवळ आणून देते. किती हो गुणी मुलगी आहे सुरुची.  देवाने हा असला दुर्मिळ आजार या सोन्या सारख्या मुलीला का द्यावा?” माहीच्या डोळ्यात पाणी आलं.. 

— क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाचलेली आणि वेचलेली माणसे… ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ वाचलेली आणि वेचलेली माणसे… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

मी अनेक गावं फिरलो. माणसं वाचली आणि मनात वेचलीत सुद्धा. कधी डोक्याला ताप झाला तर कधी गुरुही भेटले.

भीमाशंकर जवळ असल्याने तिथल्या निसर्ग सौंदर्यात मी आकंठ बुडालो आणि जास्तीत जास्त दिवसांकरता चाकणला बुड टेकवलं. तिथेच डॉक्टर सोनवणेंशी माझी ओळख झाली. आमची इतकी मैत्री वाढली की माझा संध्याकाळी कायम मुक्काम त्यांच्या दवाखान्यातच असायचा.

चाकणचे शेतकरी, व्यापारी, भाजी विक्रेते वृत्तीने धार्मिक आणि भाविक होते. डॉ. सोनवणे म्हणजे त्यांच्यासाठी दैवतच होतं म्हणा नां ! नाही तरी डॉक्टर म्हणजे प्रति परमेश्वरच असतात नाही का?

त्या दिवशी दवाखान्यात खूप गर्दी होती. रिसेप्शनिस्ट रुग्णांना नंबर वारी आत सोडताना मेटाकुटीला आली  होती. कारण नुकतंच तिचं एका तिरपांगड्या, रांगड्या पैलवानाशी भांडण झालं होतं.

मी तिला मदत करीत असतांना तो पैलवान गुरगुरत आम्हाला म्हणाला, “माझा नंबर लवकर का नाही लावत ?” गरम डोक्याच्या त्या महाशयांनी शिव्यांचा भडीमार पण सुरू केला.

गडबड ऐकून डॉक्टर बाहेर आले. त्यांनी खूप समजावलं   त्याला, पण हा बाबा आपला इरेलाच पेटलेला.! शेवटी “बघून घेईन मी डॉक्टर तुम्हाला.! “असं म्हणून तो जमदग्नी तणतणतच बाहेर पडला. मुर्खपणाचा कळस म्हणजे रस्त्यावर जाऊन त्याचं शिव्या देणं चालूच होतं. डॉक्टरांना वाईट वाटलं.

‘अशी माणसं आपल्या आयुष्यात येऊ शकतात का ?’  ह्या विचाराने मीच अस्वस्थ झालो होतो. मात्र प्रसंग सावरत हसत डॉ. म्हणाले, “चला हा ही एक अनुभव.! पाऊस पडताना बघतो आपण. पण असेही अनुभवाचे पावसाळे आपल्या आयुष्यात येतातच. हं, पुढचे पेशंट आत पाठवा”असे म्हणून डॉक्टर आत मध्ये गेले. जरा वेळानी ते पैलवानी वादळ पाय आपटीत निघून गेलं .

इतर पेशंटकडे माझं लक्ष गेलं. वार्धक्यानी वाकलेलं एक जोडपं केव्हापासून कोपऱ्यात अवघडून बसलं होतं‌. त्यांचे उठता बसतांनाचे हाल बघून मी दोनदा त्यांना म्हणालो होतो, “आधी नंबर लावून आत सोडू का तुम्हाला? बसवत नाहीये का तुम्हाला? काही त्रास होतोय का?”

तेव्हा सरकुतलेल्या चेहऱ्यावर हास्य उमललं आणि ते म्हणाले, “नाही रे बाळा, तरास काय बी नाय. आता नंबरावरी जाऊदे बाबा, इतर आजारी पेशंटना.नाय तर मगा सारका  एकादा आग्या वेताळ त्या देव माणसाच्या डोक्याला ताप द्यायचा. आमची तब्येत मस्  चांगली झालीया. पर एक डाव डागदरला भेटायचयं आमाला.”

मला नवलचं वाटलं त्यांच्या बोलण्याचं. ‘त्रास काही नाही, पण डॉक्टरांना नुसतं भेटायचंय’ म्हणजे काय?

इतक्यात डॉक्टरच बाहेर आले आणि त्या जोडीला बघून आश्चर्याने म्हणाले, “हे काय माऊली! एवढ्या उन्हाचं आलात? अजून बरं वाटत नाही का तुम्हाला?”

कापऱ्या आवाजात कमरेत वाकलेली ती माऊली म्हणाली, “डागदरा, तुझ्या गोळीने ठणठणीत बरी झाले म्या. आता काय बी तरास नाही बघ. तुला एकदा डोळं भरून बघायचं हेच काम होतं. ‘बरे झालो’ ह्येचं सांगाया आलोय आमी. आता फकस्त देवाच्या पाया पडाया आलोया.”

हसत डॉ. म्हणाले, “अहो मग विठोबा मंदिर शेजारी आहे. इकडे कसे काय वळलात?”

यावर दोघजण डॉक्टरांच्या पायाशी वाकले आणि म्हणाले, “डागदरा, अरे तूच आमचा ईठोबा हाईस. मला मरणाच्या दारातून ओढून काढलंस आणि आता फकस्त हे सांगाया आलोया, की तुझ्या गोळीनं उतारा झाला आणि लई बरं वाटतंय आता आमाला. देव तुला सुखात ठेवो.”

आता मात्र चकित होण्याची पाळी आमची होती. डॉक्टर हात जोडून म्हणाले, “गुरुमाऊली माझाच तुम्हाला कोपरापासून शिरसाष्ठांग नमस्कार. गुरुपौर्णिमेलाच गुरु पूजा करावी असं थोडंच आहे ? आज मला साक्षात गुरुदेव दत्त भेटले.”

एव्हाना बाहेरच्या हॉलमधली लोकं आत आली होती. त्यांच्याकडे वळून डॉक्टर म्हणाले, “शाळेच्या प्रांगणात भेटलेले गुरु, हे गुरुच असतात. पण अनुभवाच्या शाळेत हे असेही गुरु भेटतात..आणि आपल्याला नवीन धडा शिकवून जातात. माझ्याकडे अनेक व्याधीग्रस्त पेशंट येतात, पण बरं वाटल्यावर पुन्हा या दवाखान्याची पायरी ‘चढणं नको रे बाबा’ असं म्हणत, दवाखान्याकडे आणि माझ्याकडेही पाठ फिरवून जातात. पण आता आम्हाला बरं वाटतंय हे सांगायला येणारी ही पहिलीच जोडी आहे.”

हा सगळा प्रकार बघून मी भारावलो, खरंच ‘बरं वाटत नाही’ हे सांगायला पेशंट येतात. पण ‘आम्हाला आता बरं वाटतंय’ हे एवढं एकच वाक्य उन्हातून चालत येऊन सांगणारी ही वृद्ध जोडी खरंच महान आहे, गुरुस्थानी आहे. डिग्री वाल्यांनाही हे सुचलं नसतं.

डॉक्टर आपला रोग मानपाठ एक करून, मानसिक क्लेश सहन करून बरा करतात. मग त्यांची परतफेड म्हणून शब्दांची फुंकर घालून आयुष्याचं गणित सोडवणारं हे जोडपं खरंच खूप खूप श्रेष्ठ आहे.

पेशंट मध्ये काही वारकरीही होते. तेही पुढे धावले आणि “विठू माऊली! विठू माऊली!” म्हणून या विठोबा रखुमाईच्या पाया पडले. जणू काही शेजारच्या मंदिरातले विठ्ठल रखुमाई त्यांच्यापुढे उभे होते.

डॉक्टर म्हणजे साक्षात ‘देव असतो’ असं सगळे म्हणतात, पण या दैवत्वालाही शिकवण देणारा गुरु कुठेतरी कधीतरी  भेटतोच.

या प्रसंगावरून मला एक किस्सा आठवला. त्याचं असं झालं, गुलबर्ग्याचे डॉक्टर श्रीनाथ औरादकर यांचेशी व्हाट्सॲप द्वारे माझी ओळख झाली. त्यांनी मला त्यांच्या लहानपणीचा एक मजेशीर, मनोरंजक किस्सा सांगितला.

ते बेळगाव हुबळी प्रवास करीत होते. प्रवासात घाटातून गाडी जात असताना मध्येच एक गृहस्थ उठले, ड्रायव्हरशी आणि कंडक्टर शी काहीतरी बोलले. त्या तिघात काय खलबत् झाली कोण जाणे! ड्रायव्हरने हसून गाडीचा वेग कमी केला. कंडक्टरनी ‘नामी शक्कल’ असं म्हणून दिलखुलास दाद दिली.

शबनम वाल्या गृहस्थांनी मुठभरून खजिना बाहेर काढला. प्रत्येकाला तो खजिना मुठी मुठी ने देताना ते सांगत होते “या पेरू, जांभूळ, करवंद, सिताफळ, चिक्कु इत्यादीच्या बिया आहेत. आपण प्रत्येकाने या बिया घाटात टाकायच्यात.”

डॉ श्रीनाथ त्यावेळी वयाने लहान होते. त्यांच्या डोळ्यात कुतूहल मावत नव्हतं. हा काय प्रकार आहे? सगळे संभ्रमावस्थेत होते.

ते कुतूहल न्याहाळताना हसतच शबनम वाले म्हणाले, “आता पाऊस पडेल. या बिया जमिनीत रुजतील, कोंबं फुटतील, रोपं तरारून डोलतील आणि खट्याळ वाऱ्याशी खेळत जोमाने वाढतील. त्यांची काही वर्षांनी वृक्षं होतील. निसर्गाचं दान आपण त्याचं त्यालाच परत करतोय, हो ना? ही धरणी त्यांना उत्तम प्रकारे जोपासेल. आणि मग फळा फुलांना काय तोटा हो !

आपल्याला नाही त्या फळांचा आस्वाद घेता येणार! पण म्हणून काय झालं! वाटेचा वाटसरू येईल विसाव्यासाठी, झाडाखाली विसावेल आणि फळांचा रसास्वाद घेऊन अगदी प्रसन्न तृप्त होउन पुढे जाईल, खरंय कीं नाही? त्याबरोबर पक्षी, खारुताई, वानर सेना येऊन  पोटोबा शांत करतील ते वेगळंच. काय मग, पटतंय ना तुम्हाला माझं म्हणणं?”

आणि मग काय! सगळे प्रवासी पुढे सरसावले. दऱ्या खोऱ्यातल्या कानाकोपऱ्यापर्यंत शंभर मुठीतल्या, लाखो, करोडो बिया धरणीच्या कुशीत विसावल्या. आणि मग साध्या सामान्य वेशातले ते शब्नम वाले, सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय झाले.’

डॉक्टरांनी मला हा साधा पण मोठ्या आशयाचा किस्सा सांगितला. तेव्हा माझ्या मनात आलं, काही वर्षानी मोठे झाल्यावर डॉक्टर त्या घाटातून जाताना ती वाढलेली निसर्ग दत्त देणगी बघून मनात म्हणाले असतील, “किती साधा माणूस, पण केवढा मोठा आशय तो देऊन गेला आपल्या सगळ्यांना, ‘वेष असावा बावळा, परी अंतरी असाव्या नाना कळा’ ही उक्ती आठवली असेल त्यांना. पण काही म्हणा, तो सामान्य माणूस सगळ्यांचाच गुरु झाला होता. आयुष्याच्या शाळेत मार्ग दाखवून, योग्य दिशेने नेणाऱ्या त्या परोपकारी सेवाभावी पर्यावरण प्रेमी सज्जनाला गुरुचीच उपमा योग्य आहे असं मला वाटतंय.अशा सामान्य पण असामान्यत्व प्राप्त झालेल्या गुरूंकडे बघून म्हणावसं वाटतंय..  ‘तस्मै श्री गुरवे नमः’

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोलायचे राहून गेले – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ बोलायचे राहून गेले – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

(वंदना घरी आली तरी सरांच्या बोलण्याचा विचार करत राहिली. मिताला कुठे बिझी ठेवावे? तिला कसली आवड नाही पण अश्विनपासून तिला लांब ठेवावेच लागेल.) इथून पुढे — 

पुन्हा सर तिच्या मदतीला धावून आले. चार दिवसानंतर ते तिला म्हणाले “वंदना, तुझी बहीण B. Sc आहे ना?”

“हो सर “.

“मग माझ्या डिपार्टमेंटमधील गोगटे मॅडम प्रेग्नन्सी लीव्हवर जात आहेत एक तारीखपासून.त्या जागेवर डेमॉन्स्ट्रेटर म्हणून मिता जर काम करायला तयार असेल तर प्रोफेसर शास्त्रींना मी सांगतो,”.

“पण सर मिताला अनुभव नाही हो, तिला जमेल प्रॅक्टिकल घयायला ? “

“का नाही जमणार? आणि मी असतो ना तेथे. सुरवातीला तिला थोडं अवघड वाटेल, पण पंधरा दिवसात ती तयार होईल “

“ बरं सर.. मी विचारते.. आणि कळविते “ असं म्हणत वंदना क्लासवर गेली.

वंदनाने रात्री आईसमोर मिताला कॉलेजमधील जॉबबद्दल विचारले. हल्ली मिता ताईबरोबर बोलत नव्हती, त्यामुळे तिने तिला उडवून लावले पण जेव्हा तिला कळले की जोगळेकरसरांच्या हाताखाली काम करायचे आहे, तेव्हा ती तयार झाली.

मग वंदनाने मिताच्या नावाचा अर्ज तयार केला आणि प्रोफेसर शास्त्रींकडे नेऊन दिला. शास्त्रीसरांनी एक तारखेपासून प्रोफेसर जोगळेकरना मदत करायला सांगितले आणि अशा रीतीने मिताला तात्पुरता का असेना पहिला जॉब मिळाला.

एक तारखेला वंदना आपल्या गाडीवरून मिताला घेऊन गेली आणि तिची जोगळेकर सरांशी गाठ घालून दिली. सर समोर येताच तिने “थँक्स “ म्हंटले. सरांनी पण हसून मिताचे स्वागत केले.

“आता मिताला थोडे दिवस दाखवावे लागेल पण थोडया दिवसांनी ती स्वतः मुलांचे प्रॅक्टिकल घेईल “

“हो ना सर, तुम्ही असताना तिची काळजी नाही, तुम्ही तिला तयार कराल “.

मिताला नवीन वर्गावर सोडून सर आणि ती कॅन्टीन मध्ये गेली. वंदनाला वाटत होतं, सरांशी काही तरी बोलाव, पण सर समोर असले की तिची बोलती बंद होई.

“सर, जरा सांभाळून घ्या मिताला. मागचं सर्व विसरायला हवं तीने “

“त्याची काळजी करू नकोस वंदना, एकदा काम सुरु झालं की सर्व विसरेल, हें वय वेड असतं. ‘”

वंदनाच्या मनात आले, ‘ किती समजूतदार आहेत सर, आता आपल्यापुढे आहेत तर सांगावे का मनातले? किती दिवस मनातच राहिल्या आहेत भावना.’ 

सरांना मिटिंग होती त्यामुळे ते चहा पिऊन गेले. वंदनाला परत कविता आठवली 

“रोज तुला मी येथे भेटते, बोलायाचे राहून जाते…. “

मिता पहिल्या दिवसापासून खूष होती. आता रोज ती आईला कॉलेजमधील मुलांच्या गमती आणि जोगळेकरसरांचे कौतुक सांगत राहिली. वंदनाचे बारीक लक्ष होतं, मिता आता व्यवस्थित प्रॅक्टिकल घेत होती, एकंदरीत ती कॉलेजमध्ये रमली होती. हेच तर वंदनाला हवं होतं. वडील गेल्यानंतर मिताची जबाबदारी तिने घेतली होती, पण मिता अवखळ होती, म्हणून तिची नाव व्यवस्थित पैलतीराला लावायला हवी  होती .

तिने कॉलेज मध्ये पाहिलं, जोगळेकर सर आणि मिता कॅन्टीनमध्ये थट्टामस्करी करत असत. तिला स्वतः ला सरांची थट्टा कधीच जमली नव्हती.

एकदा ती उशिरा घरी आली तर तिची आई म्हणाली “आज तुमचे जोगळेकरसर येऊन गेले.”

वंदनाला आश्यर्य वाटलं, “सर कसे काय घरी?” तिने आईला विचारले.  तर ती म्हणाली “अग मिता दोन दिवस कॉलेजमध्ये गेली नव्हती ना, म्हणून पहायला आले.”  तिला कमाल वाटली सरांची. तसे सर कॉलेज मध्ये माझ्याकडे चौकशी करू शकले असते ना?

वर्ष संपत आले, कॉलेजमध्ये परीक्षा सुरु होत्या. आता एप्रिलअखेर मिताचा जॉब संपणार होता. मिता पण नर्व्हस झाली होती, आता दुसरीकडे कुठे जॉब असेल तर.. वंदनाने तिच्या नोकरीसाठी कुठे कुठे सांगून ठेवलं होतं. एका गोष्टीचं वंदनाला समाधान होतं, मिताने अश्विनचा नाद पूर्ण सोडला होता,कारण अश्विन नवीन मुलीबरोबर दिसत होता.

एप्रिल अखेर एक दिवस सरांचा फोन आला “वंदना, महत्वाचे बोलायचं होतं, उद्या सायंकाळी त्या हॉटेलमध्ये भेटशील का?” 

वंदनाच्या शरीरावर मोरपीस फिरवल्यासारखे झालं. तिने ओळखले सर काय बोलणार आहेत ते? खरं तर तिलाच सरांना विचारायचं होतं पण,”बोलायचे राहून जाते ‘असे तिचे होत होते. ‘काही हरकत नाही, आपल्या संस्कृतीत पुरुषच पुढाकार घेतो,’ तिच्या मनात येत होतं, आपलं लग्न होण्याआधी मिताला जॉब मिळायला हवा, मग ती आणि आई राहतील, मग मिताचे लग्न.. मग आई एक महिना माझ्याकडे एक महिना मिताकडे .’ ..

पुरी रात्र वंदनाला झोप आली नाही, या कुशीवरून त्या कुशीवर ती तळमळत राहिली. सर काय बोलतील.. मग आपण लाजायचं.. मग हळूच हो म्हणायचं.. तिचं स्वप्नरंजन  रात्रभर सुरु होतं.

तिला शोभणारे कपडे नेसून, हलकासा मेकअप करून हसरा चेहेरा ठेऊन ती सायंकाळी हॉटेलमध्ये गेली. सर वेळेवर आलेच. त्यानी दोन कप कॉफीची ऑर्डर दिलीं आणि ते बोलू लागले….. 

“वंदना, माझे आईवडील आले आहेत. या वर्षी कोणत्याही परिस्थितीत माझे दोनाचे चार हात होताना त्यांना पहायचे आहे ‘

वंदनाच्या मनात आले केवढी ही सरांची प्रस्तावना, त्याची काही गरज आहे का? सरळ सांगायचे, तू मला आवडतेस म्हणून.

सर बोलत होते,” माझे वय एकतीस वर्षे आहे, त्यामुळे आता लग्न करणे आवश्यकच आहे. तू मागे म्हणाली होतीस, सर माझ्यामागे घट्ट उभे राहा, मी तुला जमेल तसे सल्ले दिले, तुला ते पटले असतील.

मिताला तिच्या प्रेमातून आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आपण यशस्वी झालो.  पण मी तिच्या आठ महिन्याच्या सहवासाने तिच्यात अडकलो. वंदना, मला आणि मिताला लग्न करायचे आहे, पण तुझी आणि आईची परवानगी हवी.” … वंदनाला वाटले, जग आपल्याभोवती फिरत आहे. तिच्या कानात सरांचे उदगार घुमत राहिले “मला आणि मिताला लग्न करायचे आहे.. मला आणि मिताला लग्न करायचे आहे… मला आणि मिताला लग्न करायचे आहे….. “

वंदना सटपटली. तिच्या घशाला कोरड पडली. आपल्या डोक्यात कुणी लोखंडाचे घण मारीत आहे, असे तिला वाटले. तिचा विचित्र चेहेरा पाहून सर म्हणाले “काही होतंय का वंदना.. तुला मितासाठी मी पसंत नसेल तर तसे सांग..”

वंदना सावरली,”तसे नाही सर, तुम्हाला पसंत न करणारे म्हणजे…. “

तिला पुढे बोलवेना, डोळयांतून अश्रूचा पूर धडका मारत होता, तिने स्वतः ला सावरले आणि ती म्हणाली 

“माझी पसंती आहेच सर पण आईला विचारते “ असं म्हणून ती बाहेर पडली.

वंदना कशी घरी आली, गाडी कशी चालवली.. तिच्या काही लक्षात नव्हते. तिने घरात प्रवेश केला मात्र, आई हसतहसत बाहेर आली “अग, तुला मिताची काळजी वाटायची ना, बघ तिने व्यवस्थित स्थळ पटकवले, अग जोगळेकरसरांनी तिला मागणी घातली, आहेस कुठे?”

वंदनाने पण काही माहित नसल्यासारखे सोंग केले “आई, तुला कुणी सांगितलं?”

“ अग मिता सांगते आहे, शनिवारी त्याचे आईबाबा भेटायला यायचे आहेत.”

“होय काय? अभिनंदन मिता. चांगला नवरा पटकवलास. आई, शनिवारच्या कार्यक्रमांची तयारी करायला हवी “

वंदनाने अश्रूना बांध घातला आणि ती मिताच्या लग्नाच्या तयारीत जुम्पलीं. त्याच वेळी ती आपल्यासाठी लांबच्या कॉलेजमध्ये नोकरीसाठी अर्ज करू लागली.

मे अखेरीस मिता आणि जोगळेकरसर विवाहबंधनात अडकले.

दुसऱ्या दिवशी वंदना लातूरच्या कॉलेजमध्ये हजर होण्यासाठी आईसह एस.टी त  बसली.

…… पण काही केल्या तिच्या मैत्रिणीची कविता तिचा पिच्छा सोडत नव्हती ….  

” रोज तुला मी येथे भेटते, बोलायचे राहून जाते..” 

– समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोलायचे राहून गेले – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ बोलायचे राहून गेले – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

(या मूर्ख मुली, डोळयांवर पट्ट्या बांधतात की काय कोण जाणे. स्टेजवरचा हिरो स्वतःच्या आयुष्यात झीरो असतो, हें यांना कळतच नाही.) – इथून पुढे — 

“अश्विन, तुला तुझ्या आईसमोर सांगते, माझ्या बहिणीचा नाद सोड, तिला फोन जरी केलास तर असशील तेथे येऊन तुझे पाय मोडून ठेवीन “

पर्स घेऊन वंदना बाहेर पडली, आता तिची स्कुटी कॉलेज रस्त्याला लागली. गेल्या वर्षीपासून ती फिजिक्स डिपार्टमेंटला लेक्चरर म्हणून लागली होती. आज तिला पहिला तास नव्हता. ती आपल्या खुर्चीवर येऊन बसली. आज तिचे डोके गरम झाले होते. वडील गेल्यानंतर तिने आईला आणि छोटया बहिणीला सांभाळले होते. वडिलांची अर्धी पेन्शन आईला मिळत होती, त्यात दोघींची शिक्षणे पार पडली. लहानपणापासून तिच्यावर जास्त जबाबदारी. तिने मिताला जास्त त्रास होऊ दिला नव्हता. सगळे आर्थिक व्यवहार, घरात काय हवं काय नको, तीच पहात होती. मग तिने M. SC केले आणि गावातील कॉलेजमध्ये लागली. बहिण मिता Bsc झाली, पण पुढे शिकेना किंवा नोकरीसाठी प्रयत्न करेना, म्हणून तिची चिडचिड व्हायची, त्यात आज मिता-अश्विन यांचं  प्रकरण? 

लहानपणापासून जबाबदाऱ्या पडल्याने ती रोखठोक झाली होती. कुणाच्या जास्त जवळ जात नव्हती. नाटकाचा ग्रुप होता पण तो पण नाटकापुरता. एकप्रकारचा कोरडेपणा तिच्या आयुष्यात आला होता. ती खुर्चीत शांत बसलेली पाहून त्याचवेळी आत आलेले जोगळेकरसर  तिच्याकडे पहात म्हणाले “वंदना, आज एकदम गप्प?” 

वंदना याच कॉलेजची विद्यार्थिनी.. ती फायनल इयरला असताना जोगळेकर नवीनच या कॉलेजला आले होते. अतिशय हुशार, देखणे – जोगळेकर सरांबद्दल तिच्या मनात सॉफ्ट कॉर्नर होता. या 

कॉलेजमध्ये फक्त जोगळेकर सरांसोबत तिला बोलायला आवडायचे. त्यांचे बोलणे तिला ऐकत रहावेसे वाटायचे.

“हो सर, थोडी विचारात होते. तुम्ही केव्हा आलात सर?”

“आत्ताच, पहिला तास मला नव्हता म्हणून जरा उशिरा आलो, घरी पण सर्व आवरून यावं लागत ना?”

“सर, मला पण पहिला तास नव्हता आज, म्हणून उशिरा आले. सर, तुम्हाला सायंकाळी थोडा वेळ आहे? थोडा बोलायचं होतं “

“हो, पाचला प्रॅक्टिकल संपतील मग समोरच्या रेस्टॉरंटमध्ये बोलू “

“हो सर, मी वाट पहाते “. 

सर आपल्या वर्गावर गेले. वंदनाने पण वर्गावर जायची तयारी केली. आज सर सायंकाळी भेटणार याने तिला आत्तापासून आनंदी  वाटत होते. सरांना सकाळचा घरचा विषय सांगायचा आणि त्त्यांचा सल्ला घ्यायचा. सर योग्य तेच सांगतील याबद्दल तिला खात्री होती आणि सरांबरोबर कॉफ़ी प्यायला मिळणार होती, मुख्य म्हणजे सर एक फुटावर असणार होते, त्यांच्या डोळ्यात पाहून बोलता येणार होतं..

वंदनाची लेक्चर्स पाचपर्यंत संपली. संपूर्ण दिवस काम केल्याने ती दमली होती, मग ती वॉशरूममध्ये गेली आणि तिने चेहेरा स्वच्छ धुतला. आता थोडया वेळाने सर भेटणार होते म्हणून ती जास्तीत जास्त बरी दिसण्याचा प्रयत्न करत होती. तिने आरशात पाहिले – तशा आपण सावळ्या , आई सारख्या. मिता गोरी, सुरेख बाबासारखी.. तिने परत परत आरशात वळून वळून पाहिले. आपण सावळ्या  असलो तरी चेहेरा तरतरीत आहे, बांधा पण चांगलाच. उंची चांगली. मिता थोडी घारी, उंची थोडी कमी तिची. पण ती गोरी असल्याने आकर्षक दिसते.

सर उंच, कोकणस्थ असल्याने गोरे. आपण सरांना शोभून दिसू का?

पण हे मनातील मांडे. खरंतर सर दिसले की आपली ततपप होते, घाम सुटतो, अंगाला कंप सुटतो. असं  का होतं? इतर पुरुष समोर आले तर आपण बिनधास्त असतो, कुणी जादा धिटाइ केली तर दोन कानाखाली द्यायला कमी करत नाही. मग सर समोर आले की…

सहा वाजता ती रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसली. पाच मिनिटांनी सर आले. सकाळपासून ते पण कामात होते तरी सर तरतरीत दिसत होते. सरांनी तिला पाहिले, ते हसले आणि तिच्यासमोर येऊन बसले.

“थोडा उशीर झाला, कॉफी घेऊया काय?”

“हो सर “

सरांनी कॉफ़ी मागवली आणि ते म्हणाले 

“बोल, काय बोलायचं होतं?”

वंदना मनात म्हणाली, ‘ खूप बोलायचंय सर, पण शब्द बाहेर पडत नाहीत.

मग ती म्हणाली “सर काही मनात शंका असली की मी तुमच्याशी बोलते, तुमच्याशी बोलले की बरं वाटतं.”

“हो कल्पना आहे, बोल.”

“सर, माझ्या बहिणीबद्दल मी काळजीत आहे, तिने स्वतः चे लग्न जमवलेय. जो मुलगा तिने निवडलाय तो माझा मित्र, नाटकातल्या ग्रुपमधील. पण तो स्वतः काही कमवत नाही, बरं त्याची या आधी दोन प्रेमप्रकरणे मला माहित, म्हणून मी विरोध केला, कोणत्याही परिस्थितीत लग्न होऊ देणार नाही असे तिला सांगितले. त्यामुळे मी डिस्टर्ब आहे सर..मी काय करावं अशा परिस्थितीत?”

“तुझी बहीण म्हणजे मिता ना? ओळखतो मी तिला. ती पण माझीच विद्यार्थिनी. काय असतं  वंदना, हे वय वेडे असते. या वयात आंधळेपणाने प्रेम होते, म्हणून सांभाळले पाहिजे. मला वाटते सध्याच्या काळात स्त्री ने पण स्वावलंबी असायला हवं, आर्थिक आणि विचाराने सुद्धा. तुझी बहीण सध्या काही काम करत नाही, पैसे मिळवत नाही, त्यामुळे तिच्या डोक्याला आराम मिळतो, म्हणून हे असे उद्योग सुचतात. तू या लग्नाला विरोध केलास हें योग्यच, कारण पुरुष जर स्वतः साठी दोन पैसे कमवत नसेल तर उद्याच्या संसाराची जबाबदारी कशी निभावेल ? अर्थात तूझ्या बहिणीला यातून बाहेर काढणे, हें तुझे कौशल्य असेल. तिला कोणत्या तरी कामात अडकवून ठेवायचं किंवा तिचे लक्ष दुसरीकडे वळवायचं म्हणजे ती हें सारं विसरेल.” 

“हो सर, तुम्ही योग्य बोललात, तिचे लक्ष दुसरीकडे वाळवायला हवे, म्हणजे कसे?”

“तिला कोणता तरी जॉब मिळत असेल तर पहा म्हणजे तिचे लक्ष तिकडे जाईल “

“हो सर, मी बघते, काहीतरी प्रयत्न करते “

“आणि माझी काही मदत हवी असल्यास सांग, मी तुझी काळजी दूर करण्यासाठी नेहेमीच असेन, बरं  निघूया..” 

सर उठले पाठोपाठ वंदना उठली. सरांनी कॉफ़ीचे बिल दिले आणि स्कुटर सुरु करून सर गेले. सर गेले त्या दिशेकडे वंदना पहात राहिली, लांब दूर जाईपर्यत..

वंदनाला कविता आठवली 

“रोज इथे मी तुला भेटते, बोलायचे राहून जाते…. “ 

आजही सरांना मनातील.. अगदी आतल्या मनातील बोलायचे.. सांगायचे राहूनच गेले..

वंदना घरी आली तरी सरांच्या बोलण्याचा विचार करत राहिली. मिताला कुठे बिझी ठेवावे? तिला कसलीच  आवड नाही, पण अश्विनपासून तिला लांब ठेवावेच लागेल.

  

– क्रमशः भाग दुसरा 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोलायचे राहून गेले – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ बोलायचे राहून गेले – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

वंदना बाहेर पडण्याची तयारी करत होती.  एव्हड्यात तिची मैत्रीण सीमा चा फोन आला. सीमाचा खुप दिवसांनी फोन, म्हणून वंदना आंनदीत झाली.

वंदना –” काय सीमे? आज एवढ्या लवकर उठलीस वाटतं?”

सीमा –” म्हणजे काय वंदे? मी लवकर उठत नाही अस म्हणायचंय तुला?”

वंदना –”उठतेस ग, पण कामाशिवाय तू फोन करणाऱ्यातील नाही, म्हणून आश्यर्य वाटलं.”

सीमा –” ते बरोबर ओळखलस, बर वंदे, मी फोन केला म्हणजे तुमची मिता आणि अश्विन यांचा प्रेमप्रकरण जोरात सुरु आहे, तुला माहित आहे ना?”

वंदना –” काय? मिता आणि अश्विन? नाही ग, मला आत्ताच समजतंय, आता खडसवून विचारते मिताला, नोकरीं वगैरे बघायची सोडून प्रेम करते? आणि ते पण अश्विन, तो उनाड पोरगा?”

सीमा –”अग पण अश्विन तुझा मित्र ना?”

वंदना –” हो ना, एका नाटकाच्या ग्रुपमध्ये आहोत आम्ही चार वर्षांपासून. पण मैत्री फक्त ग्रुप मध्ये आणि नाटकात, वैयक्तिक आयुष्यात नाही. तो कसा आहे फुलपाखरासारखा हें मला माहित आहे. आज पर्यत तीन चार मुलीबरोबर दिसायचा. पण आता माझ्या बहिणीबरोबर? थांब विचारते दोघांनाही.”

सीमा –” ए बाई, माझं नाव घेऊ नकोस हा?”

वंदना –”नाही घेणार पण दोघांनाही सरळ करते की नाही बघ.” 

सीमाने फोन खाली ठेवला.

वंदनाचा संताप संताप झाला. जेमतेम वीस वर्षाची ही आपली बहिण, गेल्या वर्षी B. Sc झालेली, पुढे काही शिक म्हटलं तर टाळाटाळ करणारी, आईच्या पेन्शनवर जगणारी प्रेमाचे इष्क उडवू लागली आहे आणि कुणाबरोबर? तर त्या खुशालचेंडू अश्विनबरोबर?

वंदना कडाडली ” मिता, आत्ता माझ्यासमोर ये, ताबडतोब “

तिचे ओरडणे ऐकून त्या दोघींची आई घरातून बाहेर आली 

” काय झालं ग, कशाला ओरडू लागलीस?

“अग आई, ही आपली मिता त्या अश्विनबरोबर प्रेमाचे चाळे करते आहे म्हणे जोरात “

“अग पण तुला कोणी सांगितलं?”

“मला कोणी सांगितले हें महत्वाचे नाही, तिला विचार खरे का खोटे?”

“ती बाथरूममध्ये गेली आहे ‘

आईने हें वाक्य म्हणता म्हणता मिता आंघोळ करून बाहेर आली 

“काय कशाला आवाज वाढवलास वंदनाताई?

“तुझाच विषय, मी तुला म्हंटल पुढे शिक किंवा चांगला कोर्स कर, स्वतःच्या पायावर उभी राहा. आईच्या अर्ध्या पेन्शनवर राहू नकोस,तर तुला जमत नाही आणि त्या अश्विनबरोबर फिरते आहेस म्हणे गावभर “

“कुणी सांगितलं तुला?”

“खोटे आहे का सांग. अश्विनला जाऊन विचारू? बाबा रे, तू कमवतोस किती? दोन वर्षांपूर्वी त्या नयना बरोबर तुझे प्रेमाचे चाळे चालले होते, त्या आधी मामेबहिणीबरोबर, आता तुला माझी बहिण मिळाली का,? विचारू त्याला?”

“आमचं एकमेकांवर प्रेम आहे, आम्ही लग्न करणार आहोत.”

“होय काय?”

“मग तीन वर्षांपूर्वी तो त्याच्या मामेबाहिणी लग्न करणार होता, आता ती कुठे गेली कोण जाणे, मग नयना बरोबर करणार होता, नयना मागे पडली, आता तू मिळालीस?”

“ते सगळे जुने विषय झाले ताई “

“आई बघितलंस, तुझं लाडकं कोकरू कस तुरुतुरु बोलतंय ते? तोंड फोडीन मिते, पहिलं काही कमवायला शिक, मग प्रेम कर, मग लग्न कर, लग्न करून खाणार काय? की परत आईकडे भीक मागणार?”

“ताई, आई आम्ही लग्न करणार आहोत.

“कशी लग्न करतेस तेच पहाते. जिथे असशील तेथे येऊन बडवीन, त्या अश्विनला पण पहाते “

“पण अश्विन तुझा मित्र ना ताई?”

“मित्र नाटकाच्या ग्रुपमध्ये, वैयक्तिक आयुष्यात नाही, तो स्टेजवर कलाकार म्हणून चांगला आहे, तो शाळा कॉलेजमध्ये जाऊन नाटकें बसवतो म्हणून तुम्ही मुली त्याच्या प्रेमात पडता, पण वैयक्तिक आयुष्यात अश्विन कसा आहे तो माझ्याएवढा कुणाला माहित नाही. म्हणून परत परत सांगते मिता, तू अश्विनचा नाद सोड. आई तिला सांग, एवढे मी बोलून सुद्धा तिचे प्रेमाचे चाळे सुरु राहिले, तर माझ्याएवढी वाईट कुणी नाही “

मिता रागारागाने आपल्या खोलीत गेली आणि कॉटवर झोपून रडू लागली.

डोकं गरम झालेलीं वंदना बाहेर पडली, तिने आपली स्कुटी चालू केली आणि कॉलेजला जायच्याऐवजी ती अश्विनच्या घरी पोहोचली. अश्विनची आई स्वयंपाक घरात भाजी चिरत होती. तिला पहाताच ती म्हणाली,

“वंदे, किती दिवसांनी वाट मिळाली? नवीन नाटकाच्या तालमी सुरु होणार की काय?”

“नाही हो काकू, सहज आलेले. अश्विन कुठे गेला?”

“झोपलाय.?”

“झोपलाय? “ वंदनाने घड्याळात पाहिले. साडेनऊ वाजले होते.

“अजून झोपलाय?”

“काय सांगायचं वंदे, रात्री उशिरा येतो बाराला आणि दहापर्यत झोपून असतो, त्याच्यासाठी नोकरी बघ कुठेतरी, घरखर्च कसा चालवायचा? थोडं  भाडं  येत त्याचावर संसार “.

“मग प्रेम करायला कस जमत? नोकरी नाही, दोन पैसे कमवत नाही, पण वर्षाला एक पोरगी पटवायला जमते कशी?”

“आता बाई नवीन कोण? माझ्या भावाची मुलगी रेश्मा तिच्याबरोबर लग्न करायचं म्हणत होता, मग काय झालं कोण जाणे, आता तीच नाव काढत नाही “

“आता माझ्या धाकट्या बहिणीबरोबर मिताबरोबर प्रेमाचे चाळे सुरु आहेत म्हणे, पण त्याला सांग, गाठ माझ्याशी आहे, हातपाय मोडून ठेवीन “

तेवढ्यात खोलीतून झोपलेला अश्विन बाहेर आला. तिला पहाताच चपापला, मग म्हणाला “वंदे, सकाळी सकाळी?”

वंदना एक शब्द पण बोलली नाही. पण अश्विनची आई त्याला म्हणाली,”वंदी चिडली आहे, तू म्हणे तिच्या बहिणीबरोबर सध्या फिरतो आहेस?”

“हो हो.. म्हणजे हो.. प्रेम करायला आणि संसार करायला कुणाची बंदी आहे की काय..”

“प्रेम नंतर कर रे, आधी दोन पैसे कमव, तुझ्या आईला दोन पैसे आणून दे, नुसत्या सिगरेटी ओढून आणि बिअर पिऊन संसार होतं नाही “

“आमच्यात तू पडू नकोस वंदे, मिताची ताई असलीस म्हणून काय झाल.?”.

“मिताची ताई असलीस तर काय झाल? मोडून ठेवीन अश्विन. तो नारायण माहित असेल तुला आपल्या ग्रुपमधला, माझ्यावर लाईन मारू पहात होता, मला जाता येता धक्के मारू लागला, त्याचा हात आणि पाय मोडून ठेवला सर्वासमोर. माझ्यासमोर हुशारी करू नकोस, दरवर्षी नवीन नवीन मुली फिरवतोस चांगल्या घरातल्या. या मूर्ख मुली, डोळयांवर पट्ट्या बांधतात की काय कोण जाणे. स्टेजवरचा हिरो स्वतःच्या आयुष्यात झीरो असतो, हे यांना कळतच नाही.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares