☆ प्राधान्य…. (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
मम्मी – बच्चू, बसची वेळ झाली, लवकर तयार हो बरं!
बच्चू – मम्मी, माझा स्वेटर सापडत नाहीये. तू कुठे ठेवलायस?
मम्मी – मी नाही ठेवला. तुला सांगितलं होतं नं, आपले कपडे नीट जाग्यावर ठेव. एक तर दीड खोलीची जागा. त्यावर आणि घरात जगभरचं सामान.
मम्मी बडबडत कपड्यांच्या ढीगातून बच्चूचा स्वेटर शोधू लागली.
बच्चू – मम्मी आपलं घर मोठं का नाही?
मम्मी – आपण मोठ्या घराचं भाडं देऊ शकत नाही म्हणून.
या दरम्यान मम्मीनं बच्चूचा स्वेटर शोधून काढला होता. तो बच्चूला देत ती म्हणाली,
’हे घे. घाल लवकर आणि बूट घालून पटकन तयार हो.’ तोवर मी दूध आणते.
बच्चूने आईचा पदर धरत म्हंटलं,
’मम्मी निखिल म्हणत होता, ‘तुझ्या आजोबांचं घर खूप मोठं आहे. तिकडे राहायला का नाही जात?
मम्मी – आपण तिथे जाऊ शकत नाही.
बच्चू- का मम्मी?
मम्मी – आजोबा आपल्यावर नाराज आहेत.
बच्चू – मग काय आपण त्या मोठ्या घरात कधीच जाऊ शकणार नाही.
मम्मी- जाऊ शकू.
बच्चू – कधी.?
मम्मी – आजोबा गेल्यानंतर.
मम्मी चिडून म्हणाली.
बच्चू – आजोबा कधी मरतील?
मम्मी – ईश्वराची इच्छा असेल तेव्हा…
बच्चू – मम्मी, ईश्वर आपली प्रार्थना ऐकतो? … खूप वेळ विचार करून बच्चूने मम्मीला प्रश्न विचारला.
मम्मी – होय. आता आपली बडबड बंद कर आणि झटकन दूध पिऊन टाक. मी बोर्न्विटा घालून ठेवलय.
पण बच्चू काही दूध प्यायला गेला नाही. मम्मीच्या लक्षात येताच ती त्याला शोधू लागली.
‘अरे, कुठे गेलास तू? बसची वेळ झालीय आणि हा मुलगा कुठे गायब झाला कुणास ठाऊक?’
त्याला शोधत शोधत त्याची मम्मी समोरच्या खोलीत ठेवलेल्या आरशाच्या कपाटाकडे गेली. तिने पाहिलं तर, बच्चू देवाच्या तसबीरीसमोर हात जोडून उभा होता. त्याने डोळे बंद केले होते आणि हात जोडून तो उभा होतं. मम्मी चकित झाली आणि म्हणाली, ‘अरे, तू काय करतोयस?’
बच्चू म्हणाला, ‘मम्मी, मी देवाला सांगितलं, ‘आम्हाला आजोबांचं घर नको. आमचा घर खूप मोठं आहे.’
मूळ हिंदी कथा – ‘तरजीह’ मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(रेडिओवर गाणे लागले आहे, नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई…गाणे बंद करते )
अगदी खरं आहे बाई तुझे.. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई.. अगदी असंच वाटतं बघ..
काय म्हणालात ‘ असं का गं ?’ काय सांगायचं तुम्हांला ? अहो, आमच्या ह्यांशी संसार करणे म्हणजे सोपी का गोष्ट आहे..
“अहो, एक काम धड करतील तर शपथ..साधे कपडे धुवायला टाकताना कपडे सरळ सुद्धा करणार नाहीत.. जीव अगदी मेटाकुटीला येतो हो !…हा संसाराचा गाडा ओढायचा ओढायचा म्हणजे किती ओढायचा एकटीने.. (कपडे उचलण्याचा,सरळ करण्याचा अभिनय )
दोन दिवस वाण सामान आणण्यासाठी यांच्या कानी-कपाळी ओरडतेय.. पण ऐकू जाईल तर शप्पत ! आले आपले हात हालवत.. विचारलं तर म्हणतात कसं ?. अगं ऑफिसमध्ये काम जास्त होतं .. गडबडीत विसरलो… बरं झालं बाई, आज ऑफिसला जातानाच वाणसामानासाठी हातात पिशव्या दिल्या यांच्या ते… पिशव्या पाहून तरी आठवणीनं आणतील सामान..
अहो, वाणसामानाचं दुकान का जवळ आहे ? आणि घरातलं सारं आवरून परत इतक्या लांब जायचं म्हणजे खूप वेळ जातो हो.. दुपारची झोप सुद्धा मिळत नाही.. तशी मी दुपारी झोपत नाहीच म्हणा.. ? अहो ,वेळच कुठं मिळतो ? सारं आवरेपर्यंत बारा तरी वाजतातच.. ती ही धुण्याभांड्याची सखू वेळेवर आली तरच हं … पण स्वैपाकाच्या काकू मात्र अगदी वक्तशीर हो .. सकाळी सात म्हणजे सात.. अगदी घड्याळ लावून घ्यावं त्या आल्या की.. काय करणार हो ? एवढ्या सकाळी स्वैपाक आवरवाच लागतो.. ऑफिसला जाताना यांना डबा द्यायचा असतो ना .. हे अगदी नऊच्या ठोक्याला जातात ऑफिसला.. ते ऑफिसला गेले की सखूची वाट बघत बसायचं.. नुसता वैताग येतो हो.. बाईसाहेब कधी दहाला उगवणार तर कधी अकराला.. वेळेचं काही भानच नाही तिला ..वर तिला काही बोलायची पंचाईत.. म्हणतात ना ‘फट म्हणता ब्रह्महत्या..’ तशातली गत व्हायची. अहो, काम सोडून गेली तर दुसरी कुठून बघू..? मोकळा वेळ असा मिळतोच कितीसा मला ? त्यात पुन्हा दुसरी कामवाली शोधत बसायचं म्हणजे.. ? माझा काही जीव आहे की नाही.. सखू आली की झाडलोट करणार, मग कपडे धुणार.. भांडी घासून झाली की निघाल्या राणीसाहेब तरातरा.. एखादं जादाचं काम सांगावं तर म्हणते कशी..
‘ केलं असतं हो पण वाडकरांकडे उशीर होतो कामाला.. आणि वाडकर वहिनी किती कजाग आहेत ते तुम्हांला माहितीच आहे..
जरा उशीर झाला की लगेच बडबडायला सुरवात करतात … ‘
सगळे खोटे.. मी काही वाडकर वहिनींना ओळखत नाही होय ? हीच मेली कामचुकार.. हिलाच काम करायचं नसतं ..मला काही कळत नाही होय..? पण बोलणार कसं ?
सखू गेली की जरा आडवं व्हावं म्हणून आडवे व्हायला जावं तर.. डोळे मिटतायत, न मिटतायत तोवर घड्याळात चार वाजतात.
तुम्हाला सांगते, ही घड्याळे पण एवढी आगाऊ असतात.. आपण जरा विसावा घ्यावा म्हणलं की पळतात पुढं पुढं.. अगदी वाघ मागे लागल्यासारखी ! स्त्री द्वेष्टी मेली. जाऊद्या.. आता उठलं तर पाहिजेच.
पण आता काय करावं बरं ? हं ! रंजनाला कॉल च करते , रंजना म्हणजे माझी मैत्रीण हो !
(मोबाईल वर कॉल लावते)
अं ss उचलत कसा नाही.. झोपली असेल . दुसरे काय ? पुन्हा लावून बघते ? (परत कॉल लावते )
“हॅलो ss!”
काय म्हणालीस , कामात आहेस? नंतर करतेस?
कामात आहे म्हणून कट केला हो तिने ..
अहो, कामात कसली ? घरात इकडची काडी तिकडे करत नाही. धुणे भांडी, स्वैपाक , झाडलोट सगळ्याला बायका आहेत कामाला , उरले सुरले सासूबाई करतात अजून… नटमोगरी मेली.. परवा परेरांची लेक गेली कुणाचा तरी हात धरून पळून … तेंव्हा दहादा फोन करीत होती.. चौकशी करायला.. तिला कुणाच्या उखाळ्या पाखाळ्या काढायच्या असल्या की बरा वेळ असतो.. आणि आत्ता…? जाऊद्या …
आले वाटतं, चहा टाकते .. आमच्या ह्यांना की नाही, आल्या आल्या हातात चहाचा कप लागतो.. आयता ..स्वतःहून कधी करून घेतील.. मला देतील .. पण नाव नाही. अहो घरात कशाला हात लावतील तर शपथ..! नुसता वैताग येतो हो.. एखाद्यानं करायचे करायचे म्हणजे किती करायचे.. पण यांना त्याचं काही आहे का?
“अहो, आणलंत का सामान..? काय म्हणताय? विसरलात ? अहो पिशव्या दिल्या होत्या ना आठवणीसाठी.. त्या कशासाठी दिल्या ते ही विसरलात की काय ? बरे झाले बाई, नोकरीवर जायचे, घरी यायचे विसरत नाही ते.. आपल्याला घर आहे बायको आहे हे विसरत नाही ते काही कमी आहे का. ?
“काय म्हणालात ? काम जास्त होते..निघेपर्यंत दुकाने बंद झाली ? “
तुम्हांला सांगत्ये नुसती कारणं हो एखादं काम सांगितली की..काम कुठलं हो.. बसायचं मित्रांसोबत चकाट्या पिटत.. मला का कळत नाही होय? आणि नेमकं काम सांगितलं की बरं यांच्या ऑफिसातील काम वाढतं ? कामचुकार मेले.. नुसता वैताग येतो हो .. पण करणार काय ? पदरी पडले आणि..
.. बघा बघा, दुसऱ्यांचे नवरे घरात कित्ती कामं कर असतात ते आणि आमचे हे ध्यान..
कधी कधी वाटतं बिन लग्नाची राहिले असते तरी बरं झाले असतं.. पण असला नवरा.. नको नको ग बाई !
काय म्हणालात? अगं बाई ,ऐकू गेलं वाटतं… बोलणं…” हो हो अहो मी आहे म्हणून.. दुसरी तिसरी कुणी असती तर कधीच सोडून गेली असती हो…पण काय करणार ? लग्न केलयं ना तुमच्याशी…
ऐकू येतंय म्हणलं मला..
हो हो .. पण तुमचे कसले भोग हो ..? भोग तर माझे आहेत…
पण ती जगतच राहिली. प्रत्येकवेळी तिच्या जगण्याला कारणच मिळायचं जणु.
आजारपणात ती देवाला विनवायची,
“बाबारे! या निशाचं एव्हढं बाळंतपण होऊ दे!पहिल्या खेपेस तिचं आॅपरेशन झालं.. आतां काय होतंय् कोण जाणे! सारं सुखरुप होऊदे रे बाबा! तिला धडधाकट पाहू दे मग ने मला…
पपांना पहिला हार्ट अॅटॅक आला तेव्हांही ती अशीच आजारी होती..गादीत पडल्या पडल्याच पुटपुटायची,
” माझा जना असा गादीवर..माझं काही झालं तर हा उठेल..खांदा देईल..मग नंतर याला काही झालं तर..?नको आधी माझ्या जनाला बरं कर..मग मला ने.
जीजीच्या आयुष्याची दोरी अशी वाढतच गेली.ती इतकी लांबली की तिच्या आयुष्यातली एक शोकांतिका टळली नाही.
पपा गेले.ती राह्यली.
देवळातला घंटानाद,आणि तळ्यातल्या कमळांना साक्षी ठेवून तिनं तिच्या बाळाला वाढवायचं व्रत घेतलं होतं .ते व्रत तिने आयुष्यभर पाळलं.
ती आम्हाला अनेक गोष्टी वारंवार सांगायची..त्यातलीच एक गोष्ट ही होती.
“जना लहान असताना त्याला नेहमी एक स्वप्न पडायचं.आपली आई सोडून गेली.
मग तो स्वप्नातून जागा व्हायचा.माझ्या कुशीत शिरायचा. म्हणायचा,”आई तू मला सोडून कधीही जाऊ नकोस. “मग ती म्हणायची”नाही रे बाबा!मी तुला अगदी जन्मभर पुरेन! घाबरू नकोस.”
जणु जीजीचे शब्द खरे ठरले की पपांना दिलेलं वचन तिने पाळलं.?
पण आमचे पपा गेले आणि आम्ही दु:खात बुडालो.पपा आमचे सर्वकाही होते.वडील. मार्गदर्शक. मित्र.
आम्हां सगळ्यांना शोकाकुल बघून ती कळवळली.तिनं आम्हां सार्यांना जवळ घेतलं.
“बाबांनो! वडीलांच्या मृत्युचे दु:ख नका करु. पिकलं पान गळणार. मुलांच्या आधी बापानं जावं… हाच जगाचा नियम. माझा बाबा गेला. मी मागे उरले. उलट झालं. माझ्या मरणाचं दु:ख बाबाला सहन झालं असतं का.. माझ्यात दु:ख सोसण्याची ताकद आहे.. त्याला नसतं सोसलं… म्हणून मी राहिले..”
९७वर्षाची होती ती! पण हिंडती फिरती होती.. मी माहेरी येणार असले की तिची फार धावपळ असायची.. माझ्यासाठी माझ्या आवडीचे खाद्यपदार्थ करण्याचा तिचा केव्हढा आटापिटा असायचा..
पहाटे दारात रिक्षा थांबली तर लगबगीने दार उघडायला तीच यायची.. दारातच विळखा घालायची.. पापे घ्यायची.. इतकी कृश झाली होती.. नजरही अंधुकली होती.
पण आम्हाला ती डोळ्यांच्या पलीकडे बघू शकत होती…
जातांना निरोप घेताना तिला म्हणावं,
“येते हं जीजी..”
“नीट जा हं!परत कधी येशील..?”
मनात यायचं परत येईन तेव्हां ही असेल का?
ती म्हणायची, “आता देवानं मला न्यावं ग!! कधी मरेन मी?”
आपला मुलगा आपल्याला बोलतो याचं तिला खूप दु:खं होत असलं पाहिजे, आणि आम्हीही तिची बाजू उचलून धरायचे नाही. मग ती पिळवटून म्हणायची,
“जाते रे बाबा, मी आता देवळात. . बसते तिथे जाऊन. आता या घरात माझी गरज नाही ऊरली. “
आणि ती खरंच जायची कुठेतरी. भांडण संपायचं. पण घरातलं वातावरण गढुळ व्हायचं. जीजीला आमच्याशिवाय कुणीच नव्हतं. ती जाणार तरी कुठे होती. . ?
त्यादिवशी दिवसभर शाळेत उदास वाटायचं. . मन हळहळायचं. . उगीच बोलतात पपा तिला. . पपांची तत्वं कठोर. . न पटणारं काहीही ते कधीच करायचे नाहीत. . .
जीजीनं तरी कशाला अट्टाहास करावा. . जाऊ द्यावं ना. . काय करायचं आता आपण. . . ?
पण शाळेतून घरी आल्यावर , मधल्या खोलीत जीजी पांघरुण घेऊन झोपलेली असायची. .
रात्री सगळे झोपले की मी हळुच तिच्या जवळ जायची. ती जागीच असायची. मग डोळ्यात पाणी आणून मला जवळ घेत म्हणायची,
“मला एखादी तरी मुलगी हवी होती. . . मुलीची माया वेगळी असते!!”
खरं सांगू तेव्हां तिच्या जखमा आम्हाला दिसल्याच नाहीत. . .
त्याही वेळी तिने मला लपेटून घेत म्हटलं होतं. .
“तू जेवलीस ना? फडताळ्यात तुझ्यासाठी तळलेली सुरमई ठेवली होती. . आईनं तुला वाढली कां. ?”
किती विलक्षण प्रेमाचं नातं हे!याची जात कुठली?याचा रंग कुठला?या ओबडधोबडपणातही गुलाबपाण्याचा स्पर्श होता. जीवनातली ती शीतलता होती. . .
ती आजारी पडायची. इतकी आजारी पडायची की आम्हाला वाटायचं आता ती यातून वाचणार नाही. पपा तिचे हात पाय दाबायचे. आणि त्यांच्या टपोर्या डोळ्यांतून अश्रु गळायचे.
एका मे महिन्यात आमची काश्मीरची सहल ठरली होती. आणि नेमकी जीजी आजारी पडली. खूपच आजारी होती ती. . आता सहल कॅन्सलच. . . पण ती डाॅक्टरना सांगत
होती,
“डाॅक्टर , या वेळेस कसंही करुन मला बरं करा. . नाहीतर माझ्या नातींचा हिरमोड होईल. . . त्यांची काश्मीर सहल सुखरुप पार पडू देत. . मग माझं काही होऊ देत. . . “
डाॅक्टर हसायचे. त्यांना जीजीची चमत्कारिक प्रकृती माहीत होती. . ते म्हणायचे,
“आजी तुम्ही आज आजारी आहात. . . पण उद्या ओकांच्या घरी जाऊन जास्वंदीची फुलं आणाल. . . . “
जीजी मला म्हणाली होती. . “हे बघ!माझं काही बरं वाईट झालं तरी तुम्ही सहलीला जाच बरं!माझं काय मेलं महत्व?मी म्हातारी. . कधीतरी मरणारच. . पण तुम्ही जा. . इतके पैसे भरलेत. . हौस केलीय् . . जाच बरं!
मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही महिनाभर ग्रँटरोडला आजोबांकडे रहायला जायचो. जीजी आणि पपा फक्त घरी. पपा तर दिवसभर बाहेरच असायचे. म्हणजे जीजी एकटी घरात. कधीकधी पपाही आमच्याबरोबर असायचे. म्हणजे जीजी अगदी एकटीच. रात्री आमच्या नात्यातला एक काका तिच्या सोबत असायचा.
पण ती आम्ही परत घरी यायची वाट बघायची. ती आमच्यासाठी माळ्यावर आंब्याच्या अढ्या घालून ठेवायची. त्यावेळी ठाण्याजवळ जंगलात रहाणार्या कातकरी आदीवासी बायका आमच्या घरी आंबे घेऊन यायच्या. प्रत्येक आंबेवालीशी हुज्जत घालून’ निवडून ती आंबे विकत घ्यायची. त्यांनाही सांगायची,
“आता माझ्या नाती येतील. त्यांना आंबे लागतील. त्या येईपर्यंत पिकलेल्या आंब्यांची अढी तयार होईल. . . “
तिचं सारं विश्वच आमच्यात सामावलेलं होतं. . .
आम्ही परत आलो की, माळ्यावर ढीगभर पसरलेले आंबे पाहून आनंदून जायचो. .
तसे आजोबांकडेही आम्ही आंबे खात असू. पण आजोबांकडे सगळं शिस्तीत , नियमात, वेळेत. . . जीजीच्या सहवासात आंबे खाण्याचा आनंद मुक्त असायचा. . भरपूर , केव्हांही. . कधीही. . .
आणि आमच्या डोळयात माखलेला आनंद पाहणे हा तिचा आनंद होता. . .
आता वाटतं, आम्ही तिला एकटीला टाकून जायचो. . . कशी राहत असेल ती एकटी. .
आमच्याशिवाय किती सुनी सुनी झाली असेल ती. . . .
कधी सांगायची, “अग!त्या दिवशी वेणु आली होती. . . या एवढ्या मोठ्या करपाल्या कोलंब्या घेऊन. . पाठीसच पडली. “घेच गं म्हातारे!तुला द्यायच्या म्हणून कुणालाच दिल्या नाहीत. . . “
“पण कुणासाठी घेऊ बाई?माझी नात नाही खायला. ती आली की आण पुन्हा नक्की. . आता दे त्या चित्रेबाईला. . . “
पण बिंबाला किती आवडतात या तळलेल्या कोलंब्या. . म्हणून तिचा जीव हळहळायचा. .
रविवार असला की, पाट्यावर नारळ वाटून ती त्याचं दूध काढायची. आणि नहाण्यापूर्वी ती केसांना छान लावून द्यायची. त्यावेळी मिक्सर नव्हते. केसांना शांपू लावणे अथवा बाजारात मिळणारे केसांचे साबण लावणे तिला अजिबात मान्य नसायचे. . .
सगळ्या नातींचे केस दाट आणि काळेभोर.
आता या सगळ्याची पावती जीजीलाच देते. पण त्यावेळी तिचा रागच यायचा. तिची ही साग्रसंगीत औषधं लावण्याचा आम्हाला कंटाळा यायचा. म्हणून आम्ही तिच्याशी वाद घालायचो. . भांडायचेही. . पण ती ऐकून घ्यायची आणि तिला जे करायचे तेच करायची. .
कधी चिडून दांतओठ खायचीही, .
म्हणायची, “कार्टीला अक्कल नाही. . चांगलं कळत नाही. . दळभद्री कुठली. , . . “
तिची गंमत वाटायची. एव्हढं आयुष्य तिनं उन्हात काढलं. सोळाव्या वर्षी विधवा झाली . पदरात चार महिन्याचं मुल. त्यावेळचा सामाजिक काळही चांगला नव्हता. विधवा बाईला खूप पीडा. तिला तिच्या सासरच्या माणसांनीही खूप त्रास दिला. कधी ती सांगायची. . .
“मला जीवनाचा कंटाळा आला होता. मी जनाला घरीच पाळण्यात ठेवले आणि तळं गांठलं. आता जीवच द्यायचा . . . तळ्या जवळच्या शंकराच्या देवळात घंटा वाजत होत्या. पाण्यात खूप कमळं फुलली होती. का कोण जाणे!मला एकदम वाटलं, पाळण्याच्या दांड्यात माझ्या बाळाचा पाय अडकलाय. माझं बाळ रडतंय् . . त्याच्याजवळ कुणीच नाही. आणि मी झपाट्याने घरी धावत आले बाळ पाळण्यात शांत झोपला होता.
गुटगुटीत. गोरागोमटा. भव्य कपाळ. काळंभोर जावळ. मी त्याला छातीशी कवटाळलं. आणि ठरवलं . . याला मी वाढवेन मोठा करेन. चणे दाणे खाईन. . खूप कष्ट करेन…”
कष्टच केले तिने आयुष्यभर. . . . तेव्हांही. . नंतरही. . या ना त्या कारणाने. . अथक. कंटाळा न करता.
पप्पा एव्हढाले कोहळे आणायचे ते किसायचे त्याचा रस काढायचा. पातेल्यात साखरेच्या पाकात शिजवून वड्या करायच्या. टोपलीभर कमळाचे देठ आणायचे. ते गोल पायचे.
तिखट मीठ, जीरपूड लावून वाळवायचे. आणि तळून खायचे. त्याला कमळाची भिशी म्हणत. ही भिशी करणं अपार कटकटीचं होतं. गवारीच्या शेंगा ताकात भिजवून नंतर वाळवायच्या.
बरण्या भरुन लोणची मुरंबे करायचे. दिवाळीच्या दिवसात, सुगंधी उटणे ती घरी बनवायची. . . अनारशाचे ओले तांदुळ जात्यावर दळायची. आम्हाला म्हणायची, “येग! जात्याला हात लाव…माझे हात दुखतात..तुझ्या आईलाही भरपूर कामं असतात…”पण आम्ही तिला कधीतरीच मदत करायचो…खरं म्हणजे हे ती सर्व आमच्यासाठीच करत होती…
आता तिच्या हातचे जाळीदार कुरकुरीत सोनेरी अनारसे आठवले की वाटतं…ती गोडी अवीट होती…आणि आता कायमची दुरावली….
ती जशी प्रेमळ ,तशी त्रासदायकही होती.तिचं कुणी ऐकलं नाही की ती त्या गोष्टीचा इतका पिच्छा पुरवायची की शेवटी कंटाळून तिचं ऐकावच लागायचं.
एकदा आठवतंय् दिवस पावसाळ्याचे होते.
पण म्हणावा तसा पाऊस अजुन कोसळत नव्हता.त्या दिवशी तर चक्क उन पडलं होतं.
आभाळ अगदी मोकळं,निरभ्र होतं..तरीही घरातून निघताना जीजी म्हणाली,
“छत्री घे….”
काय तरी काय? इतक्या कडक उन्हात मी छत्री घेतली तर माझ्या मैत्रीणी मला हंसतील..आणि मी छत्री कुठेतरी विसरेनही..
पण गंमत झाली. संध्याकाळी वातावरण एकदम बदललं.. आकाश काळंकुट्ट झालं.
ढगांचा गडगडाट .विजांचा लखलखाट. वादळी वारा आणि मुसळधार पाऊस. ओली झालेली मी कशीबशी बसमधून टेंभी नाक्यावर उतरले. तर बस स्टाॅपवर जीजी डोक्यावर एक आणि हातात एक छत्री घेऊन उभी..!!
ते चित्र कायम माझ्या डोळ्यासमोर आहे.
त्या दिवसाची तिची ती काळजीभरली प्रेममय नजर मनात कोरली गेली आहे.
“अग!!तू कशाला आलीस इतक्या पावसात?”
“कार्टे तुला सकाळी छत्री घेउन जायला सांगितलं तर ऐकलं नाहीस. हट्टी द्वाड..
किती भिजली आहेस…न्युमोनिया झाला तर? परीक्षा जवळ आली आहे…””
रस्ताभर ती बोलत होती.
घरात शिरल्याबरोबर, स्वत:च्या पदरानेच तिनं माझं डोकं खसाखसा पुसलं.. गरम पाण्यात चमचाभर ब्रांडीही पाजली..
कितीतरी वेळ नुसती अस्वस्थ होती…
लहानपणी मला वरचेवर सर्दी, खोकला ताप यायचा.. डांग्या खोकल्याने मी दोन महिने आजारी होते. कितीतरी औषधे.. इंजेक्शने झाली.पण खोकला काही थांबायचा नाही. एक दिवस कंटाळून मी जीजीला म्हटलं,
“जीजी आता तूच मला बरं कर..तू दिलेलं
कितीही कडु औषध मी पीईन! पण हा खोकला थांबव.. नाहीतर मी मरुन जाईन..”
तिच्या अंत:करणातला मायेचा झरा, तिच्या डोळ्यातून ठिबकला. एरवी मला सतत ‘कार्टी भामटी’म्हणणारी.. तिनं मला पदरात वेढून घेतलं…
“असं बोलू नकोरे बाबा… संध्याकाळच्या वेळी कसलं हे अभद्र बोलणं..मी कशी मरु देईन तुला?”
अन् तिने माझे मटामट मुके घेतले…
मग ती सकाळीच घराबाहेर पडली.. कुठे गेली कोण जाणे! पण परत आली तेव्हां तिच्या हातात हिरवीगार अढुळशाची पानं होती..
तिनं ती स्वच्छ धुवून पाट्यावर वाटली. आणि त्याचा रस काढला.
आणि तो कडु रस, अच्च्युताय नम:, गोविंदाय नम: असं म्हणत माझ्या घशात उतरवला… लागोपाठ सात दिवस या धन्वंतरीची ट्रीटमेंट याच पद्धतीने घेतली..
आणि खरोखरच माझा तो जीवघेणा खोकला बरा झाला…
तिची श्रद्धा,तिची मेहनत आणि तिच्या ममतेपुढे तो रोग नमला. तिला इतकी आयुर्वेद उपचारपद्धती कशी माहित होती, ते गुपीतच होतं.. पण तिने केलेले लेप, गुट्या चाटणे, काढे यांच्यामुळे आमच्या व्याधी झटकन् बर्या व्हायच्या..
जीजी सार्यांसाठी झटायची. तिला आमच्यापैकी कुणाचंही काही करताना कधीही कंटाळा आला नाही.तिच्या मनात आमच्याबद्दल अत्यंत माया होती… ओलावा होता..
जीजीची तिसरी नात छुंदा..आमच्या सर्वांपेक्षा ती हुशार. अत्यंत अभ्यासु. जीजीला तिचा फार अभिमान.
“हा माझा अर्जुन हो!..” असं सगळ्यांना सांगायची.
पण जीजीची ही नात फार रडकी आणि खेंगट.. शाळेत जाताना रडायची.म्युनिसीपालिटीची बारा नंबरची शाळा तिला आवडायची नाही. पण घराजवळची शाळा म्हणून आमचे सर्वांचेच प्राथमिक शिक्षण तिथेच झालं. आम्ही कुणीच शाळेत जाताना त्रास दिला नाही. पण छुंदाने खूप त्रास दिला. जीजी रोज तिच्याबरोबर शाळेत जायची. शाळा सुटेपर्यंत पायरीवर बसून रहायची. ना भूक ना तहान… छुंदा वर्गातून बाहेर येउन खात्री करुन घ्यायची, जीजी पायरीवर असल्याची… छुंदा पाचवीत जाईपर्यंत ही जोडगोळी शाळेत जायची. छुंदा वर्गात अन् जीजी पायरीवर.
पुढेपुढे छुंदाच्या वर्गबाईंनाही जीजीची सवय झाली.ही एवढी म्हातारी बाई नातीसाठी ५—६ तास पायरीवर बसून राहते याचं त्यांनाही प्रचंड कुतुहल वाटायचं.. कधी कधी तर बाईंना काही काम असलं तर त्या जीजीलाच वर्ग सांभाळायला सांगायच्या..
वर्गातल्या सार्यांचीच ती आजी झाली होती…
पुढे छुंदा ऊच्च श्रेणीत केमीकल इंजीनीअर झाली. आजही ती म्हणते… “जीजी नसती तर मी शिकले असते का…??”
इंजीनीअरींगचं सर्टीफिकेट जीजीच्या हातात देत ती म्हणाली होती..
“खरं म्हणजे हे सर्टीफिकेट तुलाच दिलं पाहिजे….”
त्याक्षणी तिच्या चेहर्यावरचा आनंद, डोळ्यातलं पाणी अवर्णनीय होतं…
“तुमची आई गरोदर असायची तेव्हां,मी घरात नाही असे पाहून गल्लीतल्या कोपर्यावरची ती आजी तुमच्या आईकडे
गुळ आणि बिब्बा मागायला यायची.म्हणूनच तुमच्या आईला प्रत्येक वेळी मुलगीच झाली.मुलगा झालाच नाही. हे सांगताना जीजीचा काळसर ओघळलेला चेहरा, काहीसा उदास..कसातरीच व्हायचा.
तिचा गालावरचा चामखीळही त्यावेळी अधिक लोंबल्यासारखा वाटायचा.मग मी हळुहळु जीजीच्या मांडीवर जायची आणि तिला विचारायची,
“तुला आम्ही नको होतो का?आम्ही सार्या मुलीच झालो म्हणून तुला वाईट वाटतं कां?
उगीच जन्माला आलो आम्ही…”
मग मात्र ती चिडायची.
“चल!!अभद्र कार्टी कुठली?तू तर माझ्या जनाचा मुलगाच आहेस हो!”
जीजी आणि आम्ही तिच्या पाच नाती.
तिच्याशी आमचं विलक्षण जमायचं.जन्म आईने दिला पण संगोपन जीजीनेच केलं.
तिच्याच खांद्यावर आम्ही वाढलो.आपल्या एकुलत्या एक मुलाला मुलगा झाला नाही,त्याचा वंश बुडाला,भविष्यात त्याचं नाव लावायला कुणी नाही म्हणून तिला सदा दु:ख वाटायचं.पण आम्ही अभ्यास करावा,खूप मार्क्स मिळवावेत,मोठं व्हावं,आणि अशा रितीने तिच्या विद्वान मुलाचं नाव ठेवावं असंही तिला वाटायचं..
परिक्षेचा निकाल असला की आम्ही शाळेतून परत येईपर्यंत ती पायरीवर बसलेली असायची.वरचा नंबर आलेला असला की तिला तिच्या वयाचंही भान रहायचं नाही. ती उड्याच मारायची.
आणि जर का आमचा नंबर घसरलेला असला की लगेच म्हणायची,
“जाऊदे!त्या बाई जरा पक्षपातीच आहेत.तुला मुद्दामच कमी मार्क्स दिले असतील.त्यांची मुलगी आहे ना तुझ्या वर्गात?तिला पुढे आणण्यासाठी तुला ढकलली असेल मागे..तू काही वाईट वाटून घेऊ नकोस..”
अशी जीजी!ती बोलायची ते सारं बरोबरच असायचं असं नव्हे!पण या सर्वामागे असायचं ते तिचं निरागस निष्काम प्रेम..!!
आईनं आम्हाला शिस्त लावली. चांगले संस्कार केले. पपांनी आम्हाला जीवनाकडे पाहण्याची अभ्यासात्मक दृष्टी दिली. पण जीजीनं आम्हाला आधार दिला. त्या कोमल
बालपणी कुठल्याही भसावह क्षणी आम्हाला शिरावसं वाटलं ते जीजीच्या सुरकुतलेल्या कुशीत.तिच्या लुगड्याचा वासआणि तिच्या हाताचं थोपटणंयांनी आमची उदासीनता त्यात्यावेळी दूर झाली.
तसं आमचं स्वतंत्र कुटुंब. फारसे नातेवाईक नाहीत. आई, पपा, जीजी आणि आम्ही पाच बहिणी. हेच आमचं निकटचं विश्व आणि आमच्या कुटुंबावर जीजीचा तसा पहिल्यापासून प्रभावच.
कळत नकळत ती सगळ्यांना तिचं ऐकायला लावायची. पपांचं व्यक्तीमत्व इतकं जबरदस्त, हट्टी पण अनेक वेळा त्यांनाही तिच्यापुढे नमावं लागायचं.
तशी देवधर्म करणारी ती नव्हती. उलट तिनं वयाच्या सोळाव्या वर्षापासून, इतकं जग पाहिलं ,आणि इतके कटु अनुभव घेतले की देवाविषयी ती फार भोळी नव्हती.
पण घरातून बाहेर जाताना मात्र देवाला नमस्कार केल्याशिवाय जायचं नाही हा तिचा शिरस्ता होता.त्यासाठी ती आम्हाला पायरीवरुन परतायला लावायची..
“नमस्कार केलास? आधी कर. आणि मग जा..”
पपांनी मात्र तिचा हा नियम कधी पाळला नाही.फण पपा बाहेर पडले की तीच बापूडवाणी होऊन दिवाणखान्यातल्या खिडकी जवळच्या शंकराच्या फोटोजवळ पाच मिनीटं हात जोडून काहीतरी पुटपुटत उभी रहायची…..
रामरावआण्णांनी चार गोष्टी तात्याला समजावून सांगितल्या. त्याचा परिणाम असा झाला की तात्या त्या दिवशी जेवला. नेहमी परमानं तात्या गोट्यात जात हूता. पण रूप्या सोडून गोटा हे गणितचं तात्याच्या डोक्यात बसत नव्हतं.
आज तात्यानं सारं आवरलं. तो न जेवताच रामोसवाडीवर गेला. त्याला हे माहित होतं कि कापायला न्यायची बैलं जगू रामोशी खरेदी करायचा. आठ-दहा बैलं झालीं की तो ट्रकातनं बाहेर पाटवायचा. तात्या रामोसवाडीत शिरला. थोडं आत जाताच त्येला बैलांची दावण दिसली.
तात्याला पहाताच रूप्या ऊटून हंबराय लागला. तात्या रूप्याजवळ गेला. त्याला रडू आवरेना. त्यानं पाहिलं,रूप्यानं टाकलेल्या गवताच्या काडीला हात लावला नव्हता. तात्यानं रूप्याच्या तोंडावरंन हात फिरवला. तात्यानं शेजारी ठेवलेल्या ब्यरलमधलं पाणी पाजलं. तीन चार कळशा तो पाणी प्याला.
तोवर घेणारा मालक जगू तिथं आला. त्यानं ओळखलं. त्यानं लांबूनच रामराम केला. तात्यानं रामराम केला.
“काय राव आणल्यापस्न बैलानं वैरणीला तोंड लावलं नाय की त्यो पाणीसुध्दा प्याला नाय”
“आवं त्याची मायाचं हाय माझ्यावर तशी”
“ह्ये बघा आता बैलांच् वय झालंय. तुंम्ही सांभाळून तरी काय करणार?”
“हे तुमचं झालं. भावाला मी सांगितलवतं बैल दावणीला मरू दे. पण ईकू नका. आवं त्यो मी टाकल्याशिवाय वैरण खाणार नाय की पाणी पिणार नाय हे मला माहीती हूतं”
अशीच कांहीशी बोलाचाली झाली. शेवटी जातानां तात्यानं रूप्याला पाणी पाजलं. थोडी वैरण टाकली. तो भरल्या डोळ्यानीं वाडीत आला.
दोन दिवस कसंतरीं गेलं. तात्याला रूप्याशिवाय करमत नव्हतं. परत तिस-या दिवशी रूप्याला बघायला तात्या रामोशी वाडीवर गेला. दावण तशीच होती. तात्याला पाहताच रूप्यानं हंबरायला चालू केलं. कान टवकारलं. तात्यानं मायेनं तोंडावर अन अंगावर रूप्याच्या हात फिरवला. तात्यानं पाणी पाजलं. वैरण टाकली. रूप्या वैरण खायला लागला. तात्या तिथं थोडावेळ थांबला. मग शेजारच्या रानांतील आंब्याच्या झाडाखाली जावून बसला. असाच थोडावेळ गेला. कांहीवेळात जगू दावणीकडं आला. त्याला रूप्या वैरण खातूय म्हणल्यावर आश्चर्य वाटलं. गेले तीन चार दिवस तो वैरण टाकत हूता. पण रूप्यानं तोंड लावलं नव्हतं. उलट रागानं तो त्याच्याकडं पहायचा.
त्यानं पाहिलं. तात्या आंब्याखाली तंबाखू मळत बसलावता. तो तडक झाडाखाली आला. त्यानं तात्याच्या डोळ्यांतलं पाणी पाहिलं. आज त्याच्याही काळजात कालवाकालव झाली. त्यानं ह्यो पहिलाच मालक पाहीलावता जो आपला बैल ईकल्यावर बैलांकडं येत हूता,वैरण टाकत हूता,पाणी पाजत हूता.
सांजचा वकूत झाला तरी तात्या झाडाखालनं हालला नव्हता. ते पाहून शेवटी जगू म्हणाला,
“तात्या तूझी माया अजब हाय बाबा!असा मालक अन असा बैल मी माझ्या धंद्यात कवा बघितला नाय बघ. “
जगू ऊटला. त्यो दावणीकडं गेला. त्यानं रूप्याचं दावं सोडलं. रूप्या तात्याकडं जावून थांबला. तात्यानं परत रूप्याच्या तोंडावर अन अंगावर हात फिरवला.
जगूनं खाली पडल्यालं दांवं तात्याच्या हातात दिलं अन तो म्हणाला,
“तात्या घेवून जा त्येला”
“दादा ईकल्याला बैल मी परत कसा नेवू. बरं नेला असता त्यात आमचा कारभारी बसलाय पैका घेवून. मला काय पैसं लवकर माघारी देता येणार नायत”
त्यावर जगू म्हणाला,
“तात्या तूझा बैल घेवून जा बाबा! ऊगा शाप नको माझ्या ऊरावर. अन हे बघ, तूला जमलं तसं पैसं दे. अन नायचं जमलं तर दिवू नक. पण तूझा बैल तेवढा घेवून जा”
हे ऐकताच तात्यानं जगूच्या गळ्याला मिठी मारली. तो हमसाहमसी रडू लागला. त्यानं तात्याचं डोळं पुसलं. बैलाचं दोन्ही दावं परत त्याच्या हातात दिलं.
“जा बिनघोरी जा! कारभारी काय बोललां तर सांग,बैल तूझ्या मायेपोटी परत पाटवलाय म्हणांव”
तात्यानं जगूला हात जोडून रामराम केला. अन तो निघाला. रूप्या तात्याच्या पुढं चालत हूता. ही अजब माया जगू डोळ्यात साठवत हूता. तात्या नजरंआड होईपातूर तो त्यांच्याकडं एकटक पहात उभा हूता……बराचवेळ…..!
समाप्त
– मेहबूब जमादार
मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा
जि-सांगली.मो-९९७०९००२४३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
“अगं! जीवापल्याड जपलंय मी रूप्याला. आता तो म्हातारा झालाय म्हणून त्येला ईकायचा. मरू दे की दावणीला त्याला. ईकायचं म्हणजे कसायाला द्याचा. हे बरं वाटतय का तुला?”
“हे सारं खर हाय. पण बापूसाबानां कोण सांगणार? आपलं सारं घरच ते चालवित्यात. कारभारी हायत घरांच. “
एरव्ही चवीनं जेवणारा तात्या पण आज त्याचा जेवणाचा मूडच गेलावता. तरीभी मालकिनीच्या आर्जवांवर त्यानं निम्मं जेवण केलंवत.
त्या दिवशी दुपारी झोपणा-या तात्याची झोप उडाली होती. तो सारखा रूप्याकडे बघत होता.
सायंकाळचा वकूत. तात्याचा थोरला भाऊ बापू एका गि-हाईकाला घेवून गोट्यात आलावता.
“आर्ं शामू!जरा रूप्याला ऊठव. एक गि-हाईक आलय”
हे बोलणं ऐकल्यावर तात्याच्या डोळ्यांत चटकण पाणी आलं.
“बापू माझ्या रूप्याला तेवढं ईकू नका. मी त्येला दावणीवर मरू देणार हाय. त्याचं सारं मी करणार हाय”
“आरं शामू खूळा हायस का काय?हे बघ आता त्येला कामांचं काय जमणार हाय का? आज चालतूय तोवर विकू या. चार-पांचशे रू. तरी येतील. जरा शहाण्यासारखा वाग. “
तात्याला काय बोलावं ते कळंनासं. तात्याचं वडील काटी टेकत आलं. ते भी काय बोललं नाय. त्यात तात्या धाकटा. जनावराचा कारभारी. चोवीस तास घरगड्यासारखा वागणारा. पण त्याच्या हातात कारभार नव्हता.
पाच सहा दिवस असेच निघून गेले. तात्याला वाटलं बहूधा रूप्याला ईकायचा बेत रद्द झालाय. त्याला बरं वाटलं.
आज तात्या दुपारी वैरण आणायला माळाच्या पट्टीकडं गेलावता. जरा ऊन्ह असल्यानं तसा त्याला आज वकूतच झालावता. वैरण आणेपर्यंत दिवस मावळावता. का कुणास ठावं मात्र तात्याला कधी नव्हं तो उशीर झालावता.
तात्या गोट्याकडं आला त्यावेळी सांज झालीवती. त्यानं गोट्यापुढं वैरण टाकली. पण नेहमीप्रमाणं गोटा जागा झाला नाही. म्हसरं ऊटली पण सोन्या काय उटला नाय. तात्यानं पाहिलं रूप्याची दावण रिकामी दिसत होती. हे पाहील्यावर तात्या मटकन खाली बसला. त्याच्या डोळ्यातनं पाणी वाहू लागलं. शेवटी बापूनीं त्याचा शब्द खरा केला होता. बरं त्याला आडवणारं कोण होतं?. घरातली बापूचीच बाजू घेत.
तात्यानं बिंडा सोडला नाय. त्याला तो सोडावा असंही वाटलं नाय. तात्याचं काळीज फाटलं होतं. काळजात रूप्याची सय दाटून आली. तात्याशिवाय तो टाकलेली वैरण खात नव्हता कि पाणी पित नव्हता. तात्याला सारं आठवलं. डोळ्यांत ढग दाटलं.
तात्या वैरण न टाकताच घराकडं आला. बापू सोप्यात बसला होता.
“बापू ईकायचा होता तर माझ्या समोर ईकायचा. मी माझ्या हातानं त्याला भाकरी भरवणार होतो. तू बाकी डाव साधलास बघ!”
तात्या सोप्यात रडू लागला. बापू गप्प होता. एक खरं होतं की तात्या असता तर तात्यानं रूप्याला जाऊच दिलं नसतं . रूप्याही सजागती गेला नसता. त्यामूळं नेमकं बापूला हेच नको होतं. तात्याच्या डोळ्यांत पाणी बघून बापू पण हेलावला.
पण हे बेगडी प्रेम होतं हे तात्याच्या कवाच लक्षात आलं होतं. तसं असतं तर त्यानीं माझ्या रूप्याला केंव्हाच विकला नसता.
तात्या ऊटला. सरळ गोट्याकडं आला. बरचं अंधारलवतं. तात्यानं डोळं पुसलं. वैरणीचा बिंडा सोडला. थोडी थोडी वैरण त्यानं सोन्याला अन म्हसरानां टाकली. माझ्या रूप्याची वैरण म्हणत त्याला उचंबळून आलं. तो ढसाढसा रडू लागला. त्या दिवशी तात्या ना जेवला ना झोपला. मालकिनीनं ,पोरानं मस्त मिनत्या केल्या पण काय उपेग झाला नाय.
तात्या दोन दिवस न जेवल्याचं कळताच वाडीतले रामरावआण्णा तात्याकडं आले. त्यानां पाहताच तात्याला जोरात हुंदका फुटला.
“आरं शामू हे रं काय? असा खुळ्यासारखा का रडतूयस. हे बघ!ही जगरहाटी हाय. आजचा तरणा बैल उद्या म्हातारा होणार. चार महिन्यांनतर का हूईनां शेवटी तो बसणारच हूता. पुन्हा त्येला कोण ऊटवणार? पहिलं दिवस न्यारं हूतं. माणसाला माणूस उभा रहात हूता. असं करू नगस. चार घास खा बघू. “
क्रमश: …..
– मेहबूब जमादार
मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा
जि-सांगली.मो-९९७०९००२४३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
शामूतात्यानं सकाळी अकरा वाजता जसा गवताचा भारा गोट्याम्होरं टाकला तसा सारा गोटा जागा झाला. दोन म्हसरं टूणदिशी उभी राहीली. सोन्या रूप्यातला एक बैल चटदिशी उभा राहीला. पण रूप्याला काय लवकर ऊटता आलं नाय. त्यांचं वय झालवतं. बरीच वर्ष त्यानं तात्याबरोबर काढलीवती. शेतात घालीवलीवती. पेरायला तर ही जोडी एका लायनीत पेरायची. जाणारा येणारा नुस्ता बघतच रहायचा. एखादा तात्याला सजागती म्हणायचा,
“आरं तात्या पेरतानां रानांत दोरी- बीरी मारलीवती का रं?”
“का बरं आबा?”
“एका लायनीत कुरी दिसत्या.कुठं इकडं नाय की तिकडं नाय”
“खरं सांगू ही सारी सोन्या रूप्याची किरामत,मी काय नुस्ती दावं धरतो अन बापू आमचा पेरतो.”
रूप्याचं वय झालंवतं. तात्यानं त्याच्या तोंडावरून हात फिरवला तसा तो चटदिशी ऊटला.
तात्यानं जनांवरामागचं शेणाचं पू उचलून उकिरड्यात टाकलं.खराट्यानं गोटा झाडला.गोटा साफ झाल्यावर त्यानं आडावरनं दोन चार घागरी पाणी आणलं.पहिल्यांदा बैलानां पाजलं. पुन्हा म्हसरानां पाजलं. बैलानां कोवळं लुसलुशीत गवत टाकलं. म्हसरानां गवत टाकलं. तात्याचं एक गणित होतं ‘मला काय कमी पडलं तर चालंल पण माझ्या बैलानां काय कमी पडू नये’.
बैलं औत ओढायची. गाडी ओढायची. प्रसंगी मोटपण ओढायची. तात्याला बैलाला चाबकाने मारलेलं खपायचं नाय. तो निस्ता बैलाच्या अंगावर मायेने हात फिरवायचा, बैलं आपोआप चालू लागायची़. एवढी माया तात्याची बैलावर होती.बैलांचीपण माया तात्या वर होती. अगदी मुलांसारख़ं त्यानं बैलानां सांभाळ होतं. एकवेळ तो म्हसरानां हिडीसफिडीस करायचा, बैलापुढची शिल्लक वैरण म्हसरानां टाकायचा.
तात्या चा दिवस जेवणापुरताच घरी जायचा. नायतर सारा वेळ तो एकतर सका़ळी वैरण का़ढायचा. उरलेल्या वेळांत तो गोटा साफ करायचा,पाणी पाजायचा. जनांवर खातील तशी वैरण टाकायचा. कवा काम असलं तरच बैलं शेतात असायची.तात्या ची मशागत बैलानां हात न लावता चालू असायची. एवढं बैलानांही तात्या ला काय हवं, काय नको ते कळत होतं.तात्याच्या शेतात औत चालू हाय का नाही ते शेजारच्या शेतमालकाला ही कळून येत नसे.
शेजारचा राघूआबा तर तात्याला नेहमी म्हणायचा,
“आर!तात्या घरात कवा जातूस का नाय,पाहील तवा गोट्यातच दिसतूस?”
“आर!घरांत बसून काय करायचं,जनावरांची सेवा केली तर तेवढंच पुण्य लागलं”
“तूझं बेस हाय बाबा,तूझी बैलं तू जाशील तिथं मागणं येत्यात.तू दावं नाही धरलस तरी चालतंय.आमचा चित्र्या बघितलास का?घरातल्या सगळ्यांच्या अंगावर येतोय.काय करावं ते कळतच नाही बघ.”
“हे बघ त्येला मारू तेवढा नगस.बघ आपोआप त्येचा राग थंड होतोय का नाय ते”
“तात्या तुझ्याकडं काय तरी जादू हाय बघ.तुला कुठलंही जनावर लई लबूद”
असं बरचं बोलण व्हायचं.पण तात्या नं कुठल्याच जनांवरावर केंव्हा चाबूक उगारला नाय.उलट एखादा बैलाला मारत असेल तर तो सोडवायला जायचा.
त्यामूळं गोटा अन तात्यातं एक प्रेमाचा धागा तयार झालावता.हे सारं पाहून त्याचा मोठा भाऊ बापू म्हणायचा,
“तूला भूक तरी लागते का नाय?का रोज घरातनं माणूस पाटवून द्यायचा तुला जेवायला बोलवायला?”
तात्याची गोट्याशी मैत्रीच होती तशी. तात्या भूक लागली तरच जेवायला घरी जायचा नायतर त्या मचाणावर पडून असायचा.
सकाळी वैरण आणायची. विहीरीवर आंघोळ करायची की परत गोट्यात. भूक लागली की तात्या घरांकडं जायचा. एखादवेळी तेभी विसरायचा. मग तात्याची बायकू धडप्यातनं जेवाण घेवून याची. तात्याचं घर अन गोटा फार लांब नव्हता. सारं काम झालं तरी तात्या उगाच गोट्यात बसून असायचा हे बायकोला ठावं होतं.
आज नेहमीप्रमाणेच तात्याची बायको जेवाण घेवून आली.
“न्हवं!”
“काय गं?”
“आता तूमाला काय बोलायची सोय राहीली नाय.लगीन माझ्याबरं लावलयं का त्या गोट्याबरं?”
ह्या प्रश्नानं तात्या खरंच हसला.
“अगं!मी आलो नाय म्हणून रूसलीस व्हय! बरं झालं आल्यास ते.ये दोघं भी जेवू”
“जेवा तुमी,पण एक सांगाया आलेवते?”
तात्यानं कान टवकारले.
“बोल की?”
“आवं बापूसाब म्हणत्यात त्यो रूप्या आता म्हातारा झालाय.त्येला विकून टाकूया.”
हे ऐकल्यावर तात्याच्या डोळ्यांत पाणी आलं.त्यानं पुढली भाकरी बाजूला सारली.
क्रमश: …..
– मेहबूब जमादार
मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा
जि-सांगली.मो-९९७०९००२४३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈