मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ दिले निमंत्रण अवकाशाला… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ दिले निमंत्रण अवकाशाला… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

‘ऐलपैल’ हा माझा पहिलावहिला कवितासंग्रह. त्याचा प्रकाशन सोहळा दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी पुण्याच्या एस्. एम्. जोशी सभागृहात संपन्न झाला. अध्यक्ष होते नामवंत साहित्यिक, समीक्षक, संपादक डॉ. प्रा. रमेश वरखेडे आणि प्रमुख पाहुणे होते प्रख्यात निवेदक, वक्ते, संपादक व ‘शब्दमल्हार’चे प्रकाशक मा. स्वानंद बेदरकर. सूत्रसंचालक होते ‘मधुश्री’प्रकाशनाचे मा. पराग लोणकर. मा. वरखेडे सरांनी माझ्या कवितांचे केलेले साक्षेपी समीक्षण सह्रदय समीक्षेचा वस्तुपाठ ठरावा. स्वानंदाने आपले मनोगत व्यक्त करतांना माझ्या काही कवितांचे वाचनही केले. मन आणि कान धन्य करणारा तो एक अनन्यसाधारण अनुभव होता. रसिक, मित्र, आप्तांची उपस्थिती आणि प्रतिसाद यांनी मन भरून आले. त्याचा संदर्भ असलेली ही कविता :

दिले निमंत्रण अवकाशाला

 *

दिले निमंत्रण अवकाशाला, क्षितिजतटावर बाहू पसरुन

उरी घ्यावया धरेस एका, किति आभाळे आली दाटुन

 *

अंध गुहेचे दार बंद हे, कुणी उघडले किती दिसांनी

मोरपीस किरणांचे फिरले, काळोखावर जणु युगांनी

 *

पत्ता शोधित आले दारी, दूर दिशांतुन काही पक्षी

वठल्या रानी पानोपानी, वसंत फुलवित रेखित नक्षी

 *

रसज्ञ आले आप्त मित्रही, घ्याया श्रवणी कवनकहाणी

स्मरून अपुला जुना जिव्हाळा, दाखल झाले जिवलग कोणी

 *

विदग्ध वक्ते मंचावरती, (त्यात जरासा एक कवीही)

ह्रदयीचे ह्रदयाशी घेण्या, झाले उत्सुक श्रवणभक्तही

 *

प्रगल्भ रिमझिम रसवंतीची, बरसु लागली मंचावरुनी

सचैल भिजली अवघी मैफल, कृतार्थ झाली माझी गाणी

 *

जुने भेटता पुन्हा नव्याने, पुन्हा नव्याने जन्मा आलो

रिंगण तुमचे पडता भवती, उचंबळाचा सागर झालो

 *

अनन्य उत्कट अमृतक्षण हा, तुमची किमया तुमचे देणे

अवचित यावे जसे फळाला, कधीकाळचे पुण्य पुराणे

 *

जन्ममृत्युच्या वेशीवरती, अंधुक धूसर होता सारे

आप्त मित्र अन् रसिकजनांनो!करतिल सोबत तुमचे तारे !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ कथा : पांघरूण… ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ कथा : पांघरूण सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

मी डी. एड. कॉलेजला होते, तेव्हाची गोष्ट. मला बर्‍याचदा ‘समाजसेवा’ हा विषय शिकवायला असे. या विषयांतर्गत एक उपक्रम होता, समाजसेवी संस्थांना भेटी. यात अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रिमांड होम, मूक-बधीर मुलांची शाळा, गतिमंद मुलांची शाळा अशा अनेक संस्था असत.

एका वर्षी मला कळलं, कॉलेजपासून पायी वीस मिनिटांच्या अंतरावर एक चर्च आहे. त्या चर्चने एक क्रेश चालवलं आहे. क्रेश म्हणजे संगोपन गृह. या क्रेशची माहिती घेण्यासाठी मी माझ्या विद्यार्थिनींना घेऊन तिथे गेले. क्रेशला आर्थिक मदत जर्मन मिशनची होती. इथे आस-पासच्या वस्तीतली आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍यांची मुले येत. सकाळी ८ वाजता मुले येत. तिथे त्यांना दूध, नाश्ता दिला जाई. शिक्षण, दुपारचे जेवण, पुन्हा शिक्षण, खेळ, गाणी, चित्रे काढणे, सगळं तिथे करायला मिळे. दुपारी बिस्किटे, फळे वगैरे दिली जात. संध्याकाळी ६ वाजता मुले आपआपल्या घरी जात.

तिथल्या मदतनीस क्रेशबद्दलची माहिती सांगत होत्या. ‘ इथल्या मुलांना जर्मनीतील काही लोकांनी दत्तक घेतले आहे. त्यांचा खर्च ते करतात. तिथल्या मुलांना खेळणी पाठवतात. चित्रे पाठवतात. ग्रीटिंग्ज पाठवतात. आम्ही ते सगळं मुलांना देतो.. पण इथे खेळायला. बघायला. त्यांना खेळणी वगैरे घरी नेऊ देत नाही. आपल्या घराचे फोटोही मुलांचे दत्तक पालक पाठवतात. पत्रे पाठवतात. आम्ही या मुलांच्या आयांना नेहमी

सांगतो, ‘तुम्ही पण त्यांना पत्र लिहा. काय लिहायचे, ते सांगा. आम्ही इंग्रजीत लिहून त्यांना पाठवू. ’ पण आम्हाला फारसा प्रतिसाद मिळत नाही. ’

त्यांनी मग आम्हाला अशी काही पत्रे, खेळणी, ग्रीटिंग्ज दाखवली. कुठली कोण माहीत नसलेली मुले.. पण चर्चच्या सांगण्यावरून ते परदेशी, या मुलांचा खर्च करत होते. सामाजिक बांधिलकीचा केवढा व्यापक विचार. चर्चचा आदेश म्हणजे त्यांच्यासाठी जणू प्रभू येशूचा आदेश होता.

त्या दिवशी त्या क्रेशमध्ये आणखी एक कार्यक्रम होता. थंडीचे दिवस होते. त्यामुळे तिथे मुलांसाठी त्या दिवशी चादरी वाटण्यात येणार होत्या. प्रमुख व्यवस्थापिका रेमंड मॅडमनी त्या दिवशी मुलांच्या आयांना बोलावून घेतले होते. हॉलमध्ये सगळे जमले. दोघे शिपाई सोलापुरी चादरींचे गठ्ठे घेऊन आले.

प्रार्थना, सर्व उपस्थितांचे स्वागत झाले. प्रभू येशूची शिकवण, तो सगळ्यांकडे कसा कनवाळू दृष्टीने बघतो, असं सगळं बोलून झालं. मुलांच्या परदेशातील पालकांनी चादरीचे पैसे दिल्याचे सांगितले गेले. ‘ त्यांचे आभार मानणारे पत्र आमच्याकडे लिहून द्या. आम्ही तिकडे ते पाठवू, ’ असंही तिथे सांगण्यात आलं.

तिथे चादरी वाटप सुरू झाले आणि माझ्या मनात एक कथा साकारू लागली. तिथल्याच शाळेतील एक मुलगा. — त्याचं नाव मी ठेवलं सर्जा आणि त्या क्रेशचं बारसं केलं ‘करूणानिकेतन क्रेश. ’

हिंडेनबुर्गमधील एका मोठ्या नामांकित चर्चची इथल्या चर्चला आणि क्रेशला मदत होती, ही तिथे मिळालेली माहिती. त्या चर्चने त्यांच्या देशातील सुखवस्तू सज्जनांना, इथल्या एकेका मुलाला दत्तक घ्यायला सांगितले होते. क्रेशमध्ये सध्या अशी ५० मुले होती. त्यांचे ५० दत्तक पालक, त्यांचा रोजचा खर्च करणारे. क्रेशच्या माध्यमातून त्यांना ती मिळत होती. हे अर्थातच तिथे कळलेले वास्तव.

कथेतल्या सर्जालाही तिथल्या एका कुटुंबाने दत्तक घेतलय. ते कुटुंब मात्र माझ्या कल्पनेतलं.

ज्यो पप्पा, मेरी मम्मी, अग्नेस, मार्था, डेव्हीड हे त्याचं दत्तक कुटुंब. त्यापैकी डेव्हीड त्याच्या साधारण बरोबरीचा. पप्पांचं, डेव्हीडचं त्याला पत्र येत असे. पण त्याला ते वाचता येत नसे. मॅडम पत्र वाचून दाखवत. मराठी भाषांतर करून सांगत. पत्र वाचता आलं नाही, तरी सर्जा किती तरी वेळ त्या गुळगुळीत कागदावरून हात फिरवत राही. पत्र नाकाजवळ नेऊन त्याचा सुगंध घेत राही. अशा अनेक कल्पित

प्रसंगांची मालिका मी कथेत गुंफली आहे. त्यातून सर्जाचं साधं, भोळं, निरागस व्यक्तिमत्व आणि त्याच्या बालमनातले विचार, भावना कल्पना प्रगट करण्याचा मी प्रयत्न केला आहे.

डेव्हीड एकदा सर्जाला पत्र पाठवतो. त्याबरोबरच तो आपल्या लाडक्या कुत्र्याचा- जिमीचा फोटो पाठवतो. पत्रात तो लिहितो, ‘तुझा म्हणून मी रोज जिमीचा स्वतंत्र कीस घेतो. ’ मग सर्जा फोटोतल्या जिमीच्या अंगावरून हात फरवतो आणि फोटोतल्या जिमीची पप्पी घेतो.

डेव्हीड सर्जाला, ’ तू तुझ्या घराचे फोटो पाठव, ’ असं पत्रातून लिहीत असे. सर्जाला वाटे, कसलं आपलं घर… घाणेरडं, कळकट. आपली भावंडे, शेंबडी, केस पिंजारलेली. फाटक्या लुगड्यातली आई, खोकून खोकून बेजार झालेली आजी… यांचे कसले फोटो काढून पाठवायचे आणि काढणार तरी कोण? सर्जाच्या मनात तुलना सुरू व्हायची. — फोटोत बघितलेलं ज्यो बाबांचं घर कसं – मॅडम गोष्टी सांगत, त्यातल्या राजाच्या

महालासारखं. घरातली सगळी माणसं कशी छान दिसणारी. झकपक कपड्यातली. आणि सर्जाचं घर–

सर्जाचं घर, मी, तळागाळातलं कुठलंही प्रातिनिधिक घर असेल, तसं रंगवलं. त्याची आई विड्या वळून संसार चालवणारी. म्हातारी, दमेकरी सासू, दोन भावंड–दिवसभर उनाडणारी, बाप रिक्षा चालवायचा पण सगळा पैसा बाई-बाटलीत उडवायचा. मनात येईल, तेव्हा बायकोच्या तोंडावर काही नोटा फेकायचा. तेवढंच त्याचं आपल्या संसाराबाबतचे कर्तव्य. ‘साल्या, भडव्या, रांडेचा ’ शिवाय बोलणं नाही. आई देखील सदा कारवादलेली.

सर्जावर झालेले स्वछतेचे संस्कार तो आपल्या भावंडांवर करू शकत नाही, याचे त्याला दु:ख आहे. नुकताच तो शाळेत येऊ लागला होता, त्यावेळचा प्रसंग… एकदा त्याने नाश्त्याच्या वेळी प्लेटमधले पोहे आपल्या भावंडांना देण्यासाठी शर्टाच्या खिशात भरले. खिशाला तेलकट, पिवळट डाग पडले. मॅडमनी चोरी पकडली. सर्जाला वाटले, आता आपल्याला मार बसणार. मॅडमनी त्याला मारलं नाही पण त्या रागावल्या. ‘चोरी करणं पाप आहे’ म्हणाल्या. त्यांनी त्याला येशूच्या फोटोपुढे गुडघे टेकून बसायला सांगितलं. प्रार्थना करायला सांगितली. क्षमा मागायला सांगितली. मग त्या म्हणाल्या, ‘लेकराच्या

हातून चूक झाली. तू त्याला माफ कर. तुझं अंत:करण विशाल आहे. तू आमचा वाटाड्या आहेस. आम्हाला क्षमा कर. ’

– – हा प्रसंग लिहिताना, म्हणजे मॅडमबद्दल लिहिताना, कुठे इकडे तिकडे काही पाहिलेलं, ऐकलेलं, मनात रुजून गेलेलं आठवलं. त्याचा उपयोग मी त्या प्रसंगात केला. त्यानंतर सर्जाने असं पाप पुन्हा केलं नाही. त्याच्या धाकट्या भावंडांना उचलेगिरीची सवय होती. सर्जा त्यांना म्हणे, ‘प्रभू येशू म्हणतो, असं करणं पाप आहे. ’ त्यावर आई म्हणे, ‘तुला रं मुडदया रोज चांगलं चुंगलं गिळाया मिळतय, तवा हे पाप हाय, सुचतं.

कधी भावा-बहिणीसाठी येवढं- तेवढं काय-बाय आणलंस का?’ आणावसं वाटे, पण तो आणू शकत नव्हता. त्याची तगमग होई.

त्याला या शाळेत त्याच्या मामानं आणलं होतं. त्याने ठरवलं होतं, खूप अभ्यास करायचा. खूप शिकायचं आणि नंतर पुढच्या शिक्षणासाठी जर्मनीला ज्यो पप्पांकडे जायचं. ज्यो पप्पा त्याला पत्रातून नेहमी असंच लिहीत.

त्या दिवशी क्रेशमध्ये चादरी वाटपांचा कार्यक्रम झाला. चादरी वाटायला व्यवस्थापिका रेमंड बाई स्वत: आल्या होत्या. चर्चचे प्रमुख फादर फिलीप यांच्या हस्ते चादरींचे वाटप होणार होते. सुरूवातीला डोळे मिटून प्रभू येशूची प्रार्थना झाली.

– – मी माझ्या कथेत प्रार्थना घेतली – – 

‘ मेंढपाळ हा प्रभू कधी ने हिरव्या कुरणी मला

कधी मनोहर जलाशयावर घेऊनी मज चालला. ’

– – ही प्रार्थना, मी डी. एड. कॉलेजमध्ये लागल्यानंतर आमच्या विद्यार्थिनींनी म्हणताना

ऐकली होती. तिचा उपयोग या कथेसाठी मी केला.

त्यानंतर मॅडम रेमंडनी सर्वांचं स्वागत केलं. येशूच्या उपदेशाबद्दल सांगितलं आणि

चादरी वाटप सुरू झालं. माझ्या कल्पनेने मात्र त्या चादरींची ब्लॅंकेट्स् केली. निळ्या, हिरव्या, लाल,

गुलाबी, सोनेरी रंगांची ब्लॅंकेट्स् मोहक. आकर्षक डिझाईन असलेली ब्लॅंकेट्स्.

आपल्याला कोणतं ब्लॅंकेट मिळेल, याचा सर्जा विचार करतोय. कधी त्याला वाटतं आपल्याला निळं, निळं, आभाळासारखं ब्लॅंकेट मिळावं, कधी सोनेरी, कधी हिरवं. त्याला लाल ब्लॅंकेट मिळतं. मग त्याला आठवतं डेव्हीडच्या खोलीतल्या बेडवर याच रंगाचं ब्लॅंकेट आहे. ज्यो बाबांनी डेव्हीडसारखंच ब्लॅंकेट आपल्यालाही पाठवलं, म्हणून तो खूश होऊन जातो.

कार्यक्रम संपला. बायका आपआपल्या चादरी घेऊन आपआपल्या घरी निघाल्या. माझं मन कथेतल्या सर्जाच्या आई पाठोपाठ त्याच्या घरी निघालं. काय घडलं पुढे?

– – सर्जा भयंकर उत्तेजित झाला होता. त्याला आज जेवण-खाण काही सुचत नव्हतं. तो घरी आल्या आल्या आपल्या भावंडांना बोलावतो आणि सगळे ते ऊबदार ब्लॅंकेट पांघरून झोपून टाकतात.

सर्जाचा बाप दारू पिऊन घरी येतो आज त्याच्या खिशात दमड्या नसल्यामुळे त्याला बाईकडे जाता आलेलं नाहीये. तो अस्वस्थ आहे. घरी येताच त्याचा पाय त्या नव्या ब्लॅंकेटमध्ये अडकतो. तो खाली पडतो. उठता उठता त्याचे लक्ष एकदम त्या आकर्षक ब्लॅंकेटकडे जाते. त्याच्या डोक्यात वीज चमकते… ‘ हे ब्लॅंकेटच आज तिला द्यावं. ती एकदम खूश होऊन जाईल… अशी चिकटेल, लई मजा येईल. ’

तो सर्जाच्या अंगावरचे ब्लॅंकेट ओढू लागतो. ब्लॅंकेट दे म्हणतो. सर्जा म्हणतो, ‘ माझ्या जर्मनीतल्या

बापाने माझ्यासाठी पाठवले आहे. मी देणार नाही. ’

‘ तुझ्या जर्मनीतल्या बापाकडेच निघून जा, ‘ असं म्हणत सर्जाचा बाप ते ब्लॅंकेट हिसकावून निघून जातो. पाठीमागच्या सीटवर ब्लॅंकेट ठेवून तो रिक्षा सुरू करतो.

सर्जा रडत राहतो. त्याच्या अश्रूभरल्या डोळ्यासमोर येते, ते फोटोतल्या ज्यो बाबांचे उबदार घर. त्याला अधिकच उघड्यावर पडल्यासारखं वाटतं. रडत रडत तो आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवतो. आई आपल्या फाटक्या धडुत्याचा पदर त्याच्या अंगावर सरकवते.

‘पांघरूण’ या माझ्या कथेची ही जन्मकथा. साधारण १९८२- ८४ च्या दरम्यान ही कथा मी लिहीली. त्या काळात दर्जेदार समजल्या जाणार्‍या किर्लोस्करमध्ये ती प्रकाशित झाली. अनेक वाचकांची कथा आवडल्याची खुषीपत्रे मला आली. पुढे या कथेचा हिंदीमध्येही अनुवाद झाला. तो ‘प्राची’सारख्या प्रतिष्ठित मासिकात प्रकाशित झाला.

“ पांघरूण “ ही कथा वास्तवाच्या पायावर उभी राहिलेली आहे. कथेमधले अनेक तुकडेही वास्तव आहेत. त्याच्या विविध प्रसंगांच्या भिंती, त्याला मिळालेलं भाव-भावनांचं रंगकाम, पात्रांच्या मनातील विचारांचं नक्षीकाम आणि एकंदर घराच्या अंतर्भागातील सजावट कल्पनेने सजवली आहे.

– – मला नेहमीच वाटतं, त्या दिवशी त्या क्रेशला आम्ही भेट दिली नसती, वा त्याच दिवशी तिथे चादरी वाटपाचा कार्यक्रम झाला नसता, तर इतकी चांगली कथा मला सुचली नसती.

© सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे  ☆ शकुनी,एक धगधगता सुडाग्नी ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? क्षण सृजनाचे ?

शकुनी, एक धगधगता सूडाग्नी ! ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

 

काळ्या कभिन्न सावल्यात तारूण्याचा मळा

अन् तुटलेल्या काळजात अजरामर कळा

देहच काय, सगळंच होऊन पडलं गलितगात्र

अन् जरा बनलं एक विदुषकाचं पात्र

काय चुकलं माझं? नसानसात घृणा पेटलेली

जळणाऱ्या डोळ्यांनी, युगायुगाची आग ओकलेली

निधड्या छातीनं भर सभेत लाज ओरबाडली

षंढांच्या बाजारात गोळा केली आसवं गाळलेली

माझा विडा कुणी उचलावा? सावलीत खुडलेलं कर्तृत्व

निवडुंगाच्या उलट्या काट्यांनी पोखरलेलं स्वत्व

गंजलेली शस्त्रं अन् झाकोळलेलं आयुष्य, भितीनं!

कुणाच्या बाहुच्या, कुणाच्या बाणाच्या तर कुणाच्या  नितीनं!

बापानं आपलाच भेजा भरवला बाळवाटीनं!

भूत अन् भविष्य ढकलत राहिला जळत्या काडीनं

 कुरवाळायचं कुठल्या आगीला अन् ठेचायचं कुठल्या आगीला

हे ठरवणार कोण? यांच्या कुलस्त्रिया अन् लंपट बासरीवाला!

मी कधीच हरलो नाही अन् हरणार ही नाही

मी कधीच चुकलो नाही अन् चुकलेल्यांना माफही करणार नाही

माझ्या या अवस्थेस कारणीभूत, ही मूर्ख कौरव प्रजा

हा सूड घेण्यात झालो यशस्वी, नष्ट झाला अंध राजा

अजूनही कित्येक सूड आहेत शिल्लक धगधगते

सत् शील, सत् कर्म, सत् वचन यांच्या बुरख्यात होते

युगानुयुगे मी जन्म घेत राहीन, हा सुडाग्नी पेटता राहील

खरे सत्य युग येईल, तेंव्हाच हा आत्मा शांत होईल!

 

कवितेचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी शकूनीची कथा, त्याच्याच शब्दात! –

काळ कोठडीतला तो एक एक दिवस अजून पोखरतोय. आई, वडील – सुबल ( गांधार देशाचा राजा),सगळी भावंडं यांना भुकेनं तडफडून मरताना पाहिलंय मी! काय गुन्हा होता आमचा? केवळ गांधारीच्या पत्रिकेतील दोष घालवण्यासाठी केलेला तो एक उपाय होता. तो ही राजा ध्रुतराष्ट्राच्या दीर्घायुष्यासाठी!आणि उगाच विधवेशी लग्न लावून दिलं, असा कांगावा केला. त्यात आमचा काही स्वार्थ होता का? अशी ती कोणती कौतुकास्पद, अभिमानास्पद गोष्ट होती की ती सर्वांना आवर्जून सांगावी. असेलही ती आमची चूक, तुम्हाला न सांगण्याची! पण ती तुमच्या चुकीपेक्षा तर मोठी नव्हती.चूक कसली, फसवणूक होती ती आमची, सत्तेच्या बळावर, स्वार्थासाठी केलेली!

भीष्म पितामह गांधारीचा हात मागण्यासाठी आले होते. त्यांना माहीत होतं, आम्हाला नाही म्हणता येणार नाही, इतकं त्या सोयरिकेला राजकीय महत्त्व होतं. आणि होय म्हणणं पण अवघड होतं. शंकर आराध्य असणाऱ्या त्याचा आशीर्वाद असणाऱ्या एका  सुंदर राजकुमारी ने एका अंध राजाशी लग्न का करावं? शेवटपर्यंत राजा गांधारीला विचारत होता, नाही म्हणू या का ? वडिलांची द्विधा मनस्थिती लक्षात घेऊन गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधली व प्रतिज्ञा केली की ही पट्टी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत अशीच राहील. आणि म्हणाली आता तुमच्या मुलीला योग्य वर मिळाला आहे नं! लग्न झालं, नंतर आम्हा सर्वांना काळ कोठडीत टाकून गांधार राज्य काबीज केलं.

एक बरं केलं, आम्हाला पोटभर अन्न दिलं नाही. त्यामुळे सगळे लवकर गेले, यातनातून मुक्त झाले. पण त्यांनी मला जगवलं. नुसतं जगवलं नाही तर माझ्या मनात सुडाग्नी धगधगत ठेवला. मी षडयंत्र रचण्यात पटाईत होतो. वडिलांनी मला द्युत खेळण्यास शिकविले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे मनावर दगड ठेवून मी त्यांच्या हाडांचे फासे केले, जे माझ्या आज्ञेत राहणार होते. किती क्रोध, किती मत्सर, किती जळफळाट माझ्या मनात कोंडला असेल याची कोणी कल्पनाच करू शकणार नाही. माझं नशीब बलवत्तर म्हणून मी एकटा उरल्यावर माझी सुटका केली व चक्क राजमहालात प्रवेश दिला. खोटा अहंकार, फाजील आत्मविश्वास, सत्तेचा माज यामुळे त्यांना वाटलं असेल की हा आपलं काय वाकडं करू शकणार! ही गुर्मी माझ्या पथ्यावर पडली आणि मी या संधीचं सोनं करायचं ठरवलं. मी शांत राहून प्रेमाचं नाटक केलं, सगळ्यांचा विश्वास संपादन केला. नको इतकं त्यांना पांडवांच्या विरूध्द भडकवित राहिलो. द्यूत हा माझा हुकुमाचा एक्का वापरला. पांडवांची मानहानी करून कौरवांच्या मनात आणि महालात स्थान पक्कं केलं.

युधिष्ठिर सद्गुणी, सत्यप्रिय  इत्यादी गुणांचा पुतळा असल्यामुळे  त्याच्यावर कुरघोड्या करणं सोपं होतं.इतर पांडव कसेही असले तरी मोठ्या भावाच्या आज्ञेत होते.

कुंती माता तिच्या तीनही मुलांना घेऊन वनातून हस्तिनापूरला आली, त्यांना युध्दाचं शिक्षण देण्यासाठी!तिकडे माद्रीला अश्विनी कुमार यांच्या पासून दोन मुलगे झाले.ते दोघेही वैद्यक शास्त्रात निपुण झाले. जसं मोठ्या झाडाच्या छायेत लहान झाडं खुरटतात, तसं थोडं त्यांचं झालं. सहदेवला त्रिकाल ज्ञानी होण्यासाठी पंडू राजाने अंत्य समयी आपल्या मेंदूचा काही भाग खाण्यास सांगितले. त्याला भविष्याचे ज्ञान झाले, त्यामुळेच द्युत खेळण्यासाठी सगळे निघाले तेंव्हा त्यांना अडविण्याचा आटोकाट प्रयत्न सहदेव ने केला, निदान द्रौपदीला नेऊ नका म्हणाला, त्याच्या म्हणण्याला महत्त्व कोण देणार? विधिलिखित कुणालाच पुसता येत नाही, ते सहदेवला कसं येणार! दैव माझ्या बाजूने होते कारण माझीही बाजू सत्याचीच होती.

कौरवांनी पांडवांना मारण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केला. पण मी निर्धास्त होतो कारण मला माहित होतं की द्रौपदीला वस्त्र पुरविणारा कृष्ण काहीही करू शकतो. पांडव मेले असते तर कौरव मदोन्मत्त झाले असते, मग माझ्या सुडाचं काय? अखेरीस सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडत गेल्या आणि कौरव – पांडव यांच्यात निर्णायक महाभारत सुरू झालं. अर्थात माझ्याबाबतीत सुध्दा विश्वासघात झालाच.दोघांच्या जवळचे बाण संपल्यावर रथावरून उतरून सहदेव बोलणी करण्यासाठी आला म्हणून मी ही रथावरून उतरून आलो तेंव्हा त्याने मला बेसावध पाहून तलवारीने घाव घातला. मृत्यूचं दुःख नव्हतंच. कारण तो युध्दाचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे एकन् एक कौरव मारला गेला हे माझ्या डोळ्यांनी पाहून मी तृप्त झालो होतो. माझा जगण्याचा उद्देश्य सफल झाला होता. या युद्धात पांडव, यादव सगळेच भरडले गेले. त्यामुळे माझ्या आनंदात भर पडली होती. पांडव, कृष्ण यापैकी कोणाबद्दल ही मनात ओला कोपरा नव्हताच. कारण शक्य असूनही यांच्यापैकी कोणीही आम्हाला सोडवण्यास  आले नव्हते.  तो भीष्म आणि त्याचा हा सगळा पसारा उध्वस्त झालेला पहायचा होता. भले युद्धानंतर कुणी काय गमावलं, कुणी काय कमावलं यावर चर्चा होत राहतील, पण निष्कर्ष एवढाच असेल की फक्त मी हे युद्ध पूर्णपणे जिंकलो! फक्त मी जिंकलो!!!

गुगल वरील महाभारताच्या ‘न ऐकलेल्या गोष्टी ‘  यांच्यावर आधारित

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ ☆ पाणवठा…! ☆ श्री सुजीत कदम  ☆

श्री सुजीत कदम

? क्षण सृजनाचे ?

💦 पाणवठा…! 💦 ☆ श्री सुजीत कदम 

कसं असतं ना आपल्या लेखकांचं..?

काही वेळा खूप लिहायचं असतं.. पण विषय सुचत नाही.एखादा विषय सुचलाचं तर, काय लिहायचं हेच कळत नाही. कथा लिहायची, कविता लिहायची, की ललित लेख..? का आजकाल सर्वांनाच आवडणारी गझल लिहायची..? नक्की काय लिहायचं हेच कळत नाही. हे सारं ठरवत असताना सुचलेला विषय हळूहळू पुसट होत जातो आणि मग आपण पुन्हा नव्याने एखाद्या विषयाच्या शोधत हरवून जातो.. हे सगळं करत असताना सहज हसू येतं ते लहान पणीच्या एका कवितेने

“घड्याळात वाजला एक,

आईने आणला केक

केक खाण्यात एक तास गेला

मी नाही अभ्यास केला”

हे असंच काहीसं.. अजूनही होतंय की काय असं वाटतं राहत… दिवस भर विचार करून जेव्हा काहीचं लिहलं जात नाही तेव्हा आपल्यातला लेखक कुठे हरवलाय की काय..? असं वाटू लागतं. हे करता करता, दिवसा मागून दिवस जातात आणि एखाद्या दिवशी काहीच ठरवलं नसताना अगदी सहज भरं भर कागदावर काहीतरी उतरतं.. आणि मग… इतके दिवस ह्या विषयावरुन त्या विषयावर फिरणारं मन, एक वेगळाच विषय घेऊन कागदावर स्थिरावतं. तेव्हा कागदावर उतरलेले शब्द पाहिले ना की मनात येतं.. “

कित्येक दिवस दूर दूर चा प्रवास करून कुठल्याशा गावचे हे पक्षी..

ह्या पांढ-या शुभ्र कागदाच्या पाणवठ्यावर उतरले असावेत..

ह्या पाणवठ्याचा एकांत दूर करण्यासाठी…!

हे पक्षी काही क्षण थांबतील किलबिलाट करतील आणि पुन्हा उडून जातील..

एका नव्या प्रवासाच्या दिशेने…!

एका नव्या पाढं-या शुभ्र पाणवठ्यावर…

मी मात्र पुन्हा एका नव्या विषयाच्या शोधत फिरत राहीन पुढचे कित्येक दिवस वहिचा पांढरा शुभ्र पाणवठा घेऊन… पुन्हा काही नवे पक्षी , पांढ-या शुभ्र पाणवठ्यावर येतील ह्या एकाच आशेवर…!

© श्री सुजित कदम

पुणे

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ पावसाचे स्वरविश्व ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? क्षण सृजनाचे ?

💦 भाऊबीज 💦 ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

    कुठे गेला अवचित

   भाऊ राया दूरवर…

    राहिली ना भाऊबीज

   असे मनी हुरहुर…|

 

     कसे आता सांगू कुणा

  दुःख मनातले माझ्या…

    विस्कटल्या वाटा साऱ्या

   माहेरच्या तुझ्याविना…|

 

    परतीच्या तुझ्या वाटा

     अशा – कशा हरवल्या….

     आशेच्या साऱ्याच लाटा

      विरुनिया आता गेल्या…|

 

     नको जाऊ विसरून

     बहिण -भावाचे नाते….

      तुझे – माझे बालपण

       अजूनही खुणावते…|

– शुभदा भास्कर कुलकर्णी

माझा पाठचा भाऊ शशिधर माझ्यापेक्षा आठवर्षाने लहान असल्याने त्याला लहानपणी सांभाळून घेणं ही मला माझी जबाबदारी वाटायची. आम्ही मोठे होत गेलो तसा तो माझा मित्र, खेळातला सवंगडी होत गेला. आम्हा दोघांच नात दृढ, घट्ट होत गेलं. माझ्या लग्नानंतर, त्याच्याही लग्नानंतर आमच नातं थोडही सैल झालं नाही. आमची सुख-दु:ख आम्ही वाटून घेतली. आधार दिला. मी त्यावेळी भाऊबीजेला इथे नव्हते. दुसरे दिवशी येणार,असल्याने  सर्व भावंडानी माझ्याकडे नंतर भाऊबीज करायची ठरले. पण… शशीच्या अचानक जाण्याने मनं सुन्न, बधिरस झालं. भाऊबीज राहून गेल्याची हुरहूर आजही आहे. ते माझं दु:ख मी त्यावेळी नकळत कागदावर मोकळ करायचा प्रयत्न केला. अन् थोडं हलकं वाटलं. आज भाऊबीज, माझ्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचल्या असतील का?.. 😢

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ जीवनपट… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? क्षण सृजनाचे ?

☆ जीवनपट… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

माझे वडील संस्कृत चे माध्यमिक शिक्षक व गाढे अभ्यासक होते. जुन्या अकरावीचे संस्कृत व पी.टी. घेत. करवीर पीठात त्यांनी उत्तम अध्ययन केले. त्यांना पीठाचे शंकराचार्य पद स्वीकारा म्हणत होते पण घरच्या जबाबदाऱ्या मुळे त्यांनी ते स्वीकारले नाही. वृद्धत्वात ते थोडे विकलांग झाले नि ते पाहून मला ही कविता स्फुरली‌.

 – दीप्ती कुलकर्णी

☆ जीवनपट… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

जीवनाच्या या पटावरी

कितीतरी प्यादी येती जाती

माझे,माझे म्हणती सारे

फोलता हि नच ,कुणा ही ठावे

क्षणभंगुरता कळेल का परी

उरते अंती मृत्तिका जरी

यात्रिक सारे सममार्गावरी

नियतीचीही मिरासदारी

नियतीचीही सर्व खेळणी

कुणा छत्र,कुणी अनवाणी

श्वासासंगे श्वास येई रे

दुजा न कोणी सांगाती

जीवनाच्या या पटावरी

कितीतरी प्यादी येती जाती ||

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

हैदराबाद

मो.नं. ९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ घड्याळ गणित… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? क्षण सृजनाचे ?

☆ घड्याळ गणित… ☆ श्रीशैल चौगुले ☆  

भगवद्गिता  ज्ञानेश्वरीतील “सांख्ययोग” या अध्यायात  हेच तर ज्ञानसूत्र फक्त अंकशास्त्राऐवजी तत्वसिध्दांताद्वारे सांगीतले गेले आहे.

आपण सगळे वेळेच्या बंधनात हे कर्म करीत असतो.प्रत्येक घडणार्या क्रिया ठरलेल्या वेळेनुसार एक जीवनाचे गणितीय सिध्दांतानुसार फिरत असते. पंचमहाभूते आणि हे त्रिगुणातीत सजीव घड्याळ भगवंताचे एक सांख्यीकिय कालगतीचे चक्र आहे. जिथे मृत्यू हा नाहीच. फक्त आत्मा एक देह सोडून दुसर्या देहात प्रवेश करतो. जसे घड्याळातील वजाबाकीचे उणे होत जाणारे काटे परत बेरजेतून तासात मोजतो तसे.🙏

☆ घड्याळ गणित… ☆ श्रीशैल चौगुले ☆

यालाच म्हणतात वेळ

यालाच म्हणावे गणित.

यातच आयुष्य नि वय

सरते सुख-दुःखी नित.

बेरजेचे ऊत्तर एक

वजाबाकी उणे प्रत.

आडवे समान उत्तर

वेळ  समांतर गत.

सेकंद मिनीट तास

अंकांचे गुपीत द्युत.

घडती फेर्यांचे चक्र

प्रभात-संध्येचे रथ.

ड्याळ बुध्दि प्रमाण

जीवन तैसेची पथ.

कर्म फळ नि भोगांचे

अंतर जन्मांचे नत.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ माझी फुलराणी ☆ श्री सोमनाथ साखरे ☆

?  क्षण सृजनचा ?

☆ माझी फुलराणी ☆ श्री सोमनाथ साखरे ☆  

काही दिवसांपूर्वी माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा विवाह सोहळा संपन्न झाला. आईची सखी बनून राहिलेल्या लाडक्या लेकीच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या आईने (लेकीसाठी) मला तिच्या मनातील भावना कवितेत शब्दबद्ध करण्याचा आग्रहवजा विनंती केली आणि

“माझी फुलराणी” ही कविता अवतरली…..

☆ माझी फुलराणी ☆

तुज लाडाची लेक म्हणू की

प्रिय सखी तू माझी गं…

विरह तुझा साहण्या अजुनी

मन माझे ना राजी गं…

 

अजून आठवे विवाह वेदी

सनई, चौघडे गाणी गं…

क्षणाक्षणाला तुझी आठवण

डोळ्यामध्ये पाणी गं…

 

नको करू तू इथली चिंता

कुशल मंगल सारे गं…

संसार तुझा कर सुंदर आता

हो राजाची राणी गं…

 

नवं नात्यांची मांदियाळी

मधुर ठेव तू वाणी गं…

दोन कुळांचे तूच भूषण

ठेव सदा तू ध्यानी गं…

 

आनंद,सुखाची बाग फुलू दे

हास्य निरागस वदनी गं…

आशीर्वाद मम नित्य तुझ्यावर

तू माझी “फुलराणी” गं…

 

©  सोमनाथ साखरे,

नाशिक.

९८९०७९०९३३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ सप्तपर्णी…. ☆ श्री विजय गावडे

श्री विजय गावडे

? क्षण सृजनाचे ?

☆ सप्तपर्णी…. ☆ श्री विजय गावडे ☆  

दोनेक महिन्यापूर्वी मोहोराने भारलेले सातिवनाचे (सप्तपर्णीचे) डेरेदार वृक्ष आता मुंडावळ्यागत लोम्बणाऱ्या शेंगानी लगडलेत.  फळेच्छुक इतरही वृक्षवल्ली आपापल्या तान्हूल्या फळांचे लाड करतांना दिसताहेत.  वने आणि मने दोन्ही प्रफूल्लीत करणारी हि निसर्ग किमया आपसूकच कवितेत उतरते ती अशी

 

सप्तपर्णी

 

शेंगाळले सातिवन

वने झाली आबादान

रायवनातून घुमे

काक – कोकीळ कुंजन

 

कानी घुमतो पारवा

अंगी झोंबतो गारवा

गार गार वाऱ्यातून

मंद सुगंध वहावा

 

फुले कोमेजून आता

फळे सानुली रांगती

जंगलाच्या राऊळात

गोड अंगाई झडती

 

कोण फळानी बहरे

कोणी  लगडे शेंगानी

निसर्गाचं जसं देणं

घेई धरती भरुनी

 

भारावून वेडे पक्षी

गाती सुरात कवने

रानी वनि जणू भरे

गितस्पर्धा आवर्तने

 

मात करुनी असंख्य

निसर्गाच्या कोपांवर

दिसा मासी सावरे

धरणीमायेचा पदर

 

उठा आतातरी गेली

गत वरसाची खंत

घेऊ भरारी नव्याने

आसमंत ये कवेत.

 

© श्री विजय गावडे

कांदिवली, मुंबई

मो 9755096301 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ आठवणीतला हळदुल्या ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

सुश्री तृप्ती कुलकर्णी

अल्प परिचय
ग्राफिक डिझायनर आणि साहित्यिक सल्लागार, पुणे

☆ क्षण सृजनाचा ☆ आठवणीतला हळदुल्या ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

काही दिवसांपूर्वी एक हळदुल्या रंगाचा पक्षी आमच्या बाल्कनीत येऊन छानपैकी गोडगोड शिळ वाजवत बसायचा. अगदी नेमानं ठरल्यावेळी यायचा, गाणं गायचा आणि जायचा. बऱ्याचदा मी तेव्हा वाचत बसलेली असायचे. पण त्याचं गाणं सुरु झालं की माझं वाचन थांबायचं आणि नकळत त्याच्याबद्दल विचार चालू व्हायचे…  तो इथंच का येतो…  कुणासाठी येतो…  बरं आला तर त्याच्यासाठी  टाकलेले दाणेही खायचा नाही. नुसताच फाद्यांवर झोके घेत बसायचा आणि गाऊन निघून जायचा. 

माझ्या चाहूलीने त्याची गानसमाधी भंग पावू नये म्हणून मी तिथं जाऊन त्याचा फोटो काढण्याचा आणि  व्हिडिओ करण्याचा मोह टाळला. फक्त एकदाच हळूच दाराच्या फटीतून त्याची ओझरती झलक पाहिली. अतिशय सुंदर तेजस्वी असा पिवळा रंग पटकन नजरेत भरला. पक्षी चिमुकला खरा पण सौंदर्य केवढं! अजून जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्या चाहुलीने तो उडाला आणि दूर लपून बसला. जेव्हा मी दार बंद करून माझ्या जागेवर येऊन बसले तेव्हा तो परत फांदीवर येऊन बसून गाऊ लागला. 

मग मी काही मिनिटांचं त्यांचं असणं फक्त अनुभवायचं ठरवलं. त्याची गाण्यामागची आंतरिक उर्मी काय असेल याचा विचारही मी सोडून दिला. डोळे बंद करून फक्त ऐकत राहिले. त्या सुरांचा कानोसा घेत राहिले. 

हळूहळू मनातच त्या गाण्यात कुठले शब्द बसतील, ते सूर विरहाचे की आनंदाचे, तो पक्षी पूर्णपणे कसा दिसत असेल अशी कल्पना चित्रं रंगवायला लागले. रोज पंधरा-वीस मिनिटं मी मनातल्या मनात रानावनात जाऊन वेगवेगळ्या पिवळ्या रंगाच्या पक्षांचा शोध घ्यायला लागले‌. उगाचच, काही कारण नसताना‌… ती पंधरा मिनिटं मला हिरव्या-पिवळ्या रंगाची वेगळीच दुनिया दाखवणारी ठरली. कधी प्रत्यक्षात बघितलेले झाडांच्या दाटीवाटीत बसलेले पक्षी, कधी चित्रपटातले, तर कधी इंटरनेटवर बघितलेले व्हिडिओ त्यातले सगळे फक्त पिवळ्या रंगाचे पक्षी आठवण्याचा प्रयत्न करू लागले. आणि काय गंमत, हे आठवताना फक्त पक्षीच नव्हे तर कितीतरी वेळा नदीचा काठ, निळं आकाश, रंगीत फुलं, हिरव्यागार फांद्या असंही काहीबाही दिसू लागलं. अर्थातच खूप छान निवांत असं वाटत होतं. मग मी माझ्या या अवस्थेला एक नाव देऊन टाकलं… ‘हळदुली समाधी’.   

आणि मग काही दिवसांनी तो यायचा अचानकच बंद झाला. सुरुवातीला दोन-तीन दिवस थोडी हूरहूर वाटली पण मग ठरवलं याला आठवणीत बंदिस्त करावा आणि म्हणूनच त्या पक्षाने मला काय काय दाखवलं ते मी या कवितेत मांडलं——-

हळदुल्या…

एय, हळदुल्या रंगाच्या पक्ष्या 

आमच्या अंगणात येऊन 

तू नेहमी नेहमी गातोस काय

खरं सांग, हळदुल्या तुझं आमचं नातं काय

 

शेवंतीच्या फांदीवर बसून मस्त झोके घेतोस 

हिरव्या हिरव्या पानांशी दंगामस्ती करतोस

खरं सांग कशासाठी, कोणासाठी तू इथं येतोस 

आणि इतकं गोड गाणं पुन्हा पुन्हा गातोस

खरं सांग हळदुल्या…

 

दवं भरलेल्या झाडांना आताशी जाग येते आहे

इवल्या इवल्या फुला-पानांवर ऊन कसं डुलतं आहे 

इतका उंच उडतोस तरी तुला दिसत नाही काय

चमचमत्या चांदण्याचाही अजून निघेना इथून पाय 

खरं सांग हळदुल्या… 

 

असा कसा तू आगंतुकपणे उडत उडत येतोस 

इथल्या पानाफुलांशी आपलं नातं जोडतोस 

इथल्या मऊ मातीशी कसलं हितगूज करतोस

तुझ्या गोड गाण्यासाठी सूर तिचे घेतोस काय 

खरं सांग हळदुल्या… 

 

जाईजुईचा वेल कसा वर वर चढतो आहे

चाफ्याच्या फुलाशी खूप गप्पा मारतो आहे

गुलाबाच्या कळीला खोल खळी पडली आहे

एक भुंगा कसा बघ तिच्याभोवती फिरतो आहे

खरं सांग हळदुल्या… 

 

उंच उंच फिरण्याची तुला कित्ती कित्ती हौस 

पण मातीत खेळणाऱ्या पानांची करतोस भारी मौज 

त्यांचा पिवळा रंग पिऊन तु पिवळा होतोस काय 

खरं सांग हळदुल्या– तुझं आमचं नातं काय

आमच्या अंगणात येऊन तू नेहमी नेहमी गातोस काय——-

 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares