हात एक अवयव आहे. शरीराचा महत्वाचा भाग आहे.हाताशिवाय काम करू शकत नाही. तरी कामात हात असणे म्हणजे ‘कामात’ हात ••• का कामात ‘हात’ •••हा प्रश्न पडल्याने हातातले काम तसेच राहू शकते.
असो पण आज मी तुम्हाला हाताची गोष्ट सांगणार आहे.
एका गावात एक कष्टाळू माणूस रहात होता. त्याचा हात चांगलाच चालायचा. त्यामुळे त्याच्या कामाच्या गतीसाठी कोणीच त्याचा हात धरू शकत नव्हते. यामुळेच तो आपली कामे तर आटोपायचाच पण सगळ्या गावकर्यांना हात द्यायचा. त्याच्या याच स्वभावा मुळे तो ग्रामप्रमुखाचा उजवा हात बनला. त्याने असा हातात हात दिल्यामुळे ग्रामप्रमुखालाही कोणापुढे हात पसरायची किंवा हात जोडायची वेळच यायची नाही.
परंतु या कष्टाळू माणसाच्या मुलीचा हात एका धनाढ्य माणसाच्या मुलाने मागितला. तेव्हा ग्राम प्रमुखाच्या हातावर तुरी देऊन त्याला हातोहात फसवून स्वत: मुलीचे दोनाचे चार हात करण्यासाठी हातावर पाणी सोडून तिचे कन्यादानही केले.
त्यामुळे त्या ग्राम प्रमुखाचा हात अचानक सोडल्यामुळे हातच मोडला गेला. पण याला धडा शिकवण्यासाठी त्याने तयारी केली. तो म्हटला मी काही हातात बांगड्या भरल्यानाहीत. मी असा हातावर हात धरूनही बसणार नाही. मी तुझ्याशी चार हात करायला तयार आहे.
या गरीब कष्टाळू माणसाला हात उचलणे शक्य नव्हते. त्याने पुन्हा त्याच्याशी हस्तांदोलन करणेही अशक्य होते. त्याच्या हातात काहीच राहिले नव्हते. यांच्यात फूट पाडण्याच्या कामात धनाढ्य माणसाचा हात असल्याचे उशीरा कळले.
जणू काही आयुष्याचे पत्ते खेळताना त्या धनाढ्याने याचा हात ओढला होता.
काय नशीबात आहे हे जाणण्यासाठी ज्योतिष्याला हात दाखवला. त्याचा हात बघून ज्योतिष्याने मात्र हात साफ केला.त्याच्या भावनांवर हात मारला.
हात उंचावून म्हणाला सारं काही त्याच्या हातात आहे. असे म्हणून हात हलवून तो गेला सुद्धा.
निराश अंत:करणाने तो हात हलवत रिकाम्या हाताने परत आला.
पण म्हणतात ना••• हातच्या कंकणाला आरसा कशाला? तसे ग्राम प्रमुखाला चांगल्या कामाच्या प्रचितीने कष्टाळू माणसाचा हातगुण चांगला असल्याचे लक्षात आले आणि रातोरात या हाताचे त्या हातालाही कळू न देता त्याच्याशी हात मिळवणी केली. गावाच्या भल्यासाठी असे करणे त्याच्या हातचा मळच होता. त्यानंतर मात्र यांचे हात कधी सुटले नाहीत.
आपण जसे आहोत तसा स्वीकार करणे.रंग,रूप,उंची,तब्येत,एकूणच व्यक्तिमत्व यांचा स्वीकार करणे.आपण जरा समाजात बघितले तर बरीच माणसे अशी दिसतात की, आकर्षक अशा बाह्य गोष्टी काहीच नसतात.पण तरीही ती यशस्वी असतात.अगदी बरेच दिव्यांग सुद्धा असे असतात की ते इतरांसाठी काम करतात.मग आपणाच आपल्याला का कमी लेखायचे? या साठी एक उपयुक्त वस्तू आहे. ती प्रत्येक घरात अगदी प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असते.ती म्हणजे आरसा.याचा उपयोग कसा करायचा ते बघू.
मिरर थेरपी
सकाळी उठल्यावर प्रथम स्वतःला आरशात बघावे.आणि सुंदर हसून म्हणावे मी स्वतःचा स्वीकार करत आहे.व स्वतःचे आभार मानवेत.ही कृती दिवसातून शक्य असेल तेवढ्या वेळा करावी.या मुळे काय होते? आपले मन स्वतःचा स्वीकार करते.व तसे मनाचे प्रोग्रॅमिंग होते.आणि तशाच सूचना मिळतात. आपण सगळ्या गोष्टी स्वीकारू लागतो.स्वतःला नावे ठेवणे बंद करतो.आपण बरेचदा दोन चेहरे घेऊन जगत असतो.इतरांसाठी आपला वेगळा चेहरा असतो.आणि स्वतः साठी वेगळा चेहरा असतो.त्या मुळे आपल्यावर ताण येतो. हे कमी करणे आपल्याच हातात असते.स्वतः वर प्रेम करणे व स्वाभिमान,अभिमान वाटणे यात फरक आहे.ज्यावेळी स्वतः वर प्रेम करतो त्यावेळी स्वाभिमान वाटतो.स्वाभिमान वाढला तर त्याचे रूपांतर अभिमान म्हणजे गर्व यात होते.यात खूप पुसट रेघ असते.आपल्याला अभिमान व स्वाभिमान सोडून स्वभान आणायचे आहे. त्या साठी स्वतःचा स्वीकार करून स्वतःवर प्रेम करावे.
स्वतःवर प्रेम केले की आपण आनंदी होतो.खोटा मुखवटा धारण करत नाही.स्वतः कडे साक्षी भावाने बघायला शिकतो.त्या मुळे स्वतः मधील गुण व दोष लक्षात येतात.एकदा हे लक्षात आले की आपण दोष कमी करू शकतो आणि गुणांची वाढ कशी होईल या कडे लक्ष देऊ लागतो.आणि अशी गुणी आनंदी असणारी व दुसऱ्यांना आनंदी करणारी व्यक्ती सर्वांनाच हवीशी वाटते.इथे आपल्या बाह्य रूपाचा काहीही संबंध उरत नाही.
हे सगळे फक्त एका साध्या गोष्टीमुळे घडते.आणि ती गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करणे.
हा आपल्याला नवीन नाही. आपण सगळेच तो घरात वापरतो. फक्त त्यासाठी आपला टि.व्ही. त्याच्या रेंज मध्ये किंवा तो टी.व्हि.च्या रेंज मध्ये असावा लागतो. आपण हा टि.व्ही. समोर धरुनच उपयोगात आणतो. टी.व्ही. च्या मागच्या बाजूस धरुन याचा वापर करतो का?……. तर नाही.
पण एक असा रिमोट कंट्रोल आहे, जो मला समोरुन, बाजूने कंट्रोल तर करतोच, पण घरातील कोणत्याही खोलीच्या कोणत्याही कोपऱ्यातून तो मला कंट्रोल करतो. भिंतीचा अडथळा याला येत नाही. थोडक्यात रेंज म्हणजे सीमा याबाबत याची परिसीमा असते. तो मला कंट्रोल करतो तसेच माझ्या वागण्याबाबत मला ट्रोल देखील करतो. (ड्युअल फंक्शन)
हा चालता, बोलता, फिरता आहे. याचा सेल बदलायची गरज नसते. त्याच्या मनासारखे काही झाले तर तो आपोआपच चार्ज होतो………. आणि झाले नाही तरीही होतो…….. (फक्त फंक्शन मध्ये फरक जाणवतो.) रिमोट कंट्रोल ने आपण टि.व्ही. म्यूट करु शकतो. पण मनासारखे झाले नाही तर हा आपोआप चार्ज होतो तसाच कधी कधी म्यूट देखील होतो. हा एकमेव रिमोट कंट्रोल आहे, जो आपल्याला म्यूट करतोच, पण कधीकधी (म्हणजे बऱ्याचदा) तोच म्यूट होतो. (कारण सांगत नाही, उगाचच त्यावरून का….. रण पेटवायचे?……)
टि.व्ही. च्या रिमोट कंट्रोलवर तुम्हाला कोणतेही हावभाव दिसणार नाहीत. पण माझ्या या रिमोट कंट्रोलच्या चेहऱ्यावर हावभाव दिसतात. (आणि आपल्याला दिसेपर्यंत ते तसेच असतात……. जमतंबुवा काही जणांना.) त्यामुळेच आपल्या बद्दल याच्या मनात सध्या काय भाव आहे? हे काहीवेळा समजते. काहीवेळा आपली ही भाव समजून घेण्याची हाव महागात पडते. (हाव भाव)
टि.व्ही. चा रिमोट कंट्रोल काही वेळा व्यवस्थित काम करत नसेल तर आपण त्यावर हलक्या हाताने किंवा जोरात चापट मारायचा प्रयत्न करतो. पण असा प्रयोग या माझ्या रिमोट कंट्रोलवर सफल होईलच हे सांगता येत नाही. (कारण तो सफल होण्यापेक्षा विफल होण्याची शक्यता जास्त असते. आणि फसणारे प्रयोग करण्यात काय मजा?)
त्याच्या आवाजावरून माझा (घरातला) आवाज कसा असावा हे आता मला आपोआप समजायला लागले आहे. त्याच्या आवाजाच्या चढ उतारावर माझ्या आवाजाची उतार चढ अवलंबून असते.
काय सांगता……… तुमच्या जवळ देखील या प्रकारचा आहे?………. मग जास्त काही सांगावे लागणार नाही. कंपनी वेगळी असली तरी फंक्शन साधारण सारखीच असतात.
आता तो समोरून, बाजूने आपल्याला कसा कंट्रोल करतो हे तुम्हालाही परिचित असेल. हा माझा रिमोट कंट्रोल मागे बसून सुध्दा मला कंट्रोल करतो.
कसा ते सांगतो. आम्ही दुचाकीवर जातांना हा मागे बसलेला असतो. आणि याचा एक हात असतो माझ्या खांद्यावर. मी कुठे बघतोय याचा (अचूक) अंदाज तो मागे बसून देखील घेत असतोच, पण मान डावी उजवीकडे झाली की काहीवेळा यांच्या खांद्यावरील हाताच्या बोटांची हालचाल सुरू होते. आणि त्या बोटांच्या दाबातील फरक जाणवतो. आणि अशा नुसत्या बोटांच्या हालचालींनी तो मागे बसून सुध्दा माझे फंक्शन कंट्रोल करतो. माझे इकडेतिकडे बघण्याने मागे बसून सुध्दा कधी कधी या रिमोट कंट्रोल मधून आवाज देखील येतो. तो आवाज अं, अहं, हं, असा थोडावेळ चालणारा पण मला ऐकू जाईलच इतका मोठा असतो. मग काय…….. नाईलाजाने मी काही वेळ समोर बघतो. बघावच लागतं.
अगोदर तो खांद्यावरचा हात प्रेमळ आधारासाठी असेल असाच माझा (गैर) समज होता. पण आता लक्षात आले तो मला कंट्रोल करण्यासाठी असतो.
एक मात्र खरं, कसाही असला तरी तो जवळ आणि सोबत असावा असे वाटते.
काल येतांना एक दृश्य बघितले. काही मुलांचे दोन गट आपापसात जोरजोराने वादविवाद करीत होते. नेहमीप्रमाणेच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी,परस्परांवर शाब्दिक चिखलफेक दणक्यात सुरू होती. अर्थातच दोन परस्परांविरोधी गट म्हंटल्यावर आचारविचारांत फरक हा असणारच ,हे आपण नक्कीच समजू शकू,परंतु फक्त मीच योग्य, माझेच बरोबर ही भुमिका कुठेतरी विचारात पाडू लागली.
त्यांचे आरोपप्रत्यारोप बघून,ऐकून एक मात्र नक्कीच लक्षात आलं,संत ,महात्मे,गुरू हे वाणी,वाचा हे दुधारी शस्त्र आहे असं सांगतात, ते। किती अचूक असतं ह्याचा प्रत्यय ते भांडण, वादविवाद ऐकतांना आला. खरंच शब्द हे खूप जपून वापरावेत. एकवेळ मारलेला मार विसरता येतो म्हणतात परंतु शाब्दिक जखमा ह्या कायमचे व्रण ठेऊन जातात.
जर वाणीवर वा वाचेवर आपली स्वतःची कमांड ठेवायची असेल तर त्याची सुरवात आपल्या मेंदूपासून करावी लागते. जर डोकं हे कायम शांत,स्थिर ठेवायची वा मेंदू कधीही बिथरु न देण्याची किमया साधल्या गेली तर आपोआप आपल्या वाचेवर,मनावर,ह्याचा पगडा बसतो आणि मग आपल्या मुखातून बाहेर पडलेला शब्द हा खूप तोलूनमापून, विचारपूर्वक बाहेर पडतो.ही सगळी शक्ती संयमामध्ये एकवटलेली असते. स्वतःचे लगाम स्वतःच्या पूर्ण कंट्रोल मध्ये असले की अर्धी लढाई आपण तेथेच जिंकलेलो असतो.
ह्या सगळ्यामुळे खरंच जाणवतं की माझ्या वर त्या शांत शिवशंभुचीच कृपा मला शक्यतोवर कधीच,कुणाचाच, कशाचाच राग येत नाही आणि त्यामुळेच मेंदू कायम शांत राहून आपल्याकडून काही उणेदुणे दुखविणारे शब्द बाहेर पडतील ही भिती मला नसतेच. माझ्या एका मैत्रीणीने मला छान प्रश्न विचारला, आपला काही दोष नसतांना कुणी तुझ्या वर दोषारोप केले,तुझ्यावर ताशेरे ओढले तर तुला खरंच राग नाही येणार. मी उत्तरले, राग नाही येणार, वाईट मात्र वाटेल पण लगेच माझ्या लक्षात येईल आपली पात्रता,योग्यता आपणच ठरवायची,आपलं मनं हे आपल्याशी कायम खरं बोलत असतं.एकदा हे नीट समजून घेतलं तर पुढील सगळं सोप्पं होत जातं. वामनराव पै म्हणतात तसं “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”.
ह्या आरोपप्रत्यारोपांच्या फैरी राजकारणातील व्यक्तींकडून झाडल्या की तो कळस गाठतो. त्यांची घटके घटकेला बदलणारी मैत्री वा वैर,त्यांची ह्या बोटावरुन ह्या बोटावर बदलणा-या थुंकीसारखे विचार,मतं ह्याने तर आश्चर्यचकीतच व्हायला होतं.सरड्याहूनही फास्ट घडोघडी रंग बदलण्याची क्षमता ही खास राजकारणाच्या आखाड्यात बघायला मिळते.असो
काल बघितलेले भांडण हे मित्रांचे पेल्यातच जिरणारं भांडण असतं हे ही खरच त्यामुळे आपल्या क्षणिक रागामुळे आणि त्यानंतर सुटलेल्या वाचेमुळे मैत्र गमावल्या जायला नको.
आपल्या मनातील भावभावना व्यक्त करणारे नवरस म्हणजे एक “अनमोल देणगी” रूपांत आपणास देवाने देऊ केलेला खजिनाच आहे. त्यातील कोणता रस कोठे आहे, व तो कसा जाणावा हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार, आवडीनुसार, जो तो आपले कर्म आनंद मिळवण्यासाठी करीत असतो. मनात ज्या प्रकारचे विचार निर्माण होतात, त्याप्रमाणेच भावभावनांमध्ये हे विविध रस दिसून येतात.”भूप रूप गंभीर शांत रस” हे भूप रागाची ओळख सांगणारे गीत शिकताना शांत रस याचा अर्थ बालवयात नीटसा कळलाच नव्हता. पण जसजसे आयुष्य पुढे पुढे सरकू लागले, तेव्हा मिळणाऱ्या एकांतात शांत रस समजू लागला. मला वाटते शांत रस व एकांत यांचे एकमेकांशी एक घट्ट नाते आहे. एकांतात नेहमीच तुम्ही हा शांत रसाचे अनुभूती घेऊ शकता. मग कुठेही मिळणारा एकांत असो, अगदी आनंदाच्या प्रसंगी व दुःखाच्या प्रसंगी दोन्ही वेळेत शांत रसाची भेट होतेच होते. विशेषतः निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही गेलात, तर कुठेही एकांतात मिळणारी शांत रसातील शक्ती तुम्हाला खूप काही देऊन जाते. अगदी जंगल भटकंती करत असाल, तर एखाद्या ठिकाणी थोडे शांत व स्तब्ध उभे रहा. जंगलातील ती निरव शांतता तुम्हाला विश्वरूप दर्शनासाठी नक्की सहाय्य करेल. नदीकिनारी शांत बसून नुसते पाण्यावर उठणारे तरंग पाहताना देखील, शांत रस अनुभवता येईल. किंवा एखाद्या डोंगर माथ्यावर थोडा विसावा घेताना, एकांतात शांत रसाचे अनुभूती आल्या वाचून राहणार नाही. देवाच्या गाभाऱ्यात समईतील ज्योत शांत रसाची जाणीव करून देते. उत्कट प्रेमळ क्षणांत ही, शांत रस अनुभवता येतो. मनातील व्याकुळता, विरह, दुःख हे सुद्धा कित्येकदा शांत रसामुळे निभावता येते. तन्मयतेने चैतन्य अनुभवता येते. तेथेही शांत रस उपयोगी ठरतो. शांत रसामुळे एकरूपता साधता येते. अहंकार गळून पडतो. व पुढे जाण्याचा मार्ग सुकर होतो. निर्मळता आवडू लागते. शांत रसात सर्व संकटे, दुःख, नष्ट करण्याची ताकद मिळवता येते. परमेश्वराशी अनुसंधान साधता येते. म्हणूनच ध्यान धारणेचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. ती अंगिकारता आली तर, आपली सद्सत विवेक बुद्धी नेहमीच जागृत राहते. आणि नकळत होणाऱ्या चुका टाळता येणं शक्य होते. म्हणूनच हे जीवन समृद्ध होताना, शांत रसाची अनुभूती घेणे गरजेचे होईल.
आप्पाजी गेले तेव्हा मी आठ नऊ वर्षांचा असेल ..त्यांच्या जाण्याच्या स्मृती अजूनही कायम आहेत. त्यांनी मातीच्या मोठ्या भांड्यात लावलेला पिंपळ त्यांच्याशिवाय पोरका उभा होता. दर दिवशी मध्यान्ही ते त्याची तांब्याच्या छोट्या गडूतून बुडाशी पाणी ओतून पूजा करायचे.आप्पाजी गेल्यानंतर त्याला पोरकेपणाचे चटके बसायला लागले. त्याचा पुरुष भरा पेक्षाही उंच असलेला देह मलूलपणे उभा होता. मातीच्या भांड्यातील माती सुकत चालली होती. शेवटी वडिलांनी त्याला घराबाहेर लावायचे ठरवले. घराच्या मागच्या भागात असलेल्या मारुतीच्या देवळा समोर लावावे असे मी सुचवले. देवळाच्या बाजूला विहीर होती विहिरीच्या खालच्या बाजूला थोड्या अंतरावर दोन तीन हात खोल खड्डा खणला. मातीच्या भांड्यासह पिंपळाचे झाड उचलून त्या खड्ड्याजवळ आणले. भोवतालचे मातीचे भांडे फोडताच मातीत एकजीव झालेली एकमेकांना घट्ट धरून गुंतून असणारी त्याची मुळे मोकळी झाली. त्याला तसेच त्या खड्ड्यात सोडले आणि स्थानांतर होऊन एका जागी तो स्थिर झाला .
खड्ड्यात अजून थोडी माती ढकलली. त्याच्या खोडाभोवती वर्तुळाकृती छोटी नाली खोदली. विहिरीवर बाया सकाळ-संध्याकाळ पाणी भरायच्या. विहिरी भोवती पाणी सांडायचे .
विहिरीच्या उतारावरून एक छोटी नाली काढून पिंपळाच्या आळाशी जोडली. विहिरीच्या काठावर सांडलं उबडलं पाणी नालीतून थेट पिंपळाच्या आळ्यात पोहोचायचं. पिंपळाचे खोड हाताच्या मुठीत मावेल एवढे होते. त्याला गाय-बैल या कोणत्याही प्राण्याने अंग घासले तर मोडून जाईल या चिंतेनं त्याच्याभोवती बोराटीच्या काट्यांचे कुंपण केले. आता जोमाने वाढेल. आपल्यासोबत त्याची वाढही अनुभवता येईल…
त्याची वाढ अनुभवताना आपल्या बालवयाची किती वर्षे उलटून गेली कळलंच नाही.
आता त्याचे खोड दोन्ही हातांच्या पंजात मावण्यापेक्षाही मोठे झाले होते .त्याने आपली जागा कोणत्याही संरक्षणाशिवाय पक्की केली होती. काट्यांच्या बाह्य कुंपणाची गरजच नव्हती .
या आठ वर्षात विहिरही खोल गेली होती. आटत चालली होती .तिथे पाणी भरणाऱ्या बाया हातपंपा कडे वळल्या होत्या …त्याची मुळे खोलखोल गेली होती. आता त्याला बाहेरून मिळणाऱ्या पाण्याची गरज नव्हती. तो खऱ्या अर्थाने स्वावलंबी झाला होता. त्यामुळे मीही निश्चिंत झालो होतो. तो सर्वांगानं फुलत होता .त्याच्या या फुलत्या वयात आपलेही फुलते वय मिसळत होते. त्याच्या उमलत्या तांबूस कोवळ्या पानांची लव वात्सल्य जाणीव फुलवत होती. कालांतराने पाने पोपटी होत गडद हिरवी होऊन सळसळत होती .त्या सळसळण्यातून आपण कितीदा मावळणारा चंद्र अनुभवला,कितीदा सूर्यास्त अनुभवला..त्याच्यापाठीमागे उमटलेले
सूर्यास्ताची फिके केशरी रंग गडद होई पर्यंत त्याचे सळसळणे अनुभवलेले.. बाल रंगात रंगविलेल्या चित्रांच्या जीर्ण कागदी स्मृतींच्या रंगछटा अजूनही जपून ठेवल्या आहेत.. आपण त्याच्यासोबत एकांत घालवलेले कितीतरी क्षण अंतर्मनाच्या तळ कप्प्यात साठवून ठेवले आहेत…..
…शेती माती जगवण्यास असमर्थ ठरली.. त्यामुळे पोटापाण्यासाठी गाव सोडावे लागले ..
दररोजची त्याची भेट दोन तीन महिन्यांवर गेली. गावाला आलो की त्याला भेटल्याशिवाय आपली भेटच पूर्ण व्हायची नाही. घरासमोरच बाभूळबन, वाहणारी रायघोळ माय आणि आपला पिंपळ हेच खऱ्या अर्थाने आपलं जैव कुटुंब होतं बालपणात .त्यांची उराउरी भेट झाल्याशिवाय समाधान होत नव्हतं .त्यांच्या भेटीचा गंध उरात भरून पुढचे दोन-तीन महिने काढता यायचे .
पुढे पुढे बाभूळबन ,नदी यांच्या भेटीत त्रयस्थता जाणवायला लागली ..
त्यांच्या देहबोलीत एक प्रकारची उदासीनता दिसायला लागली ..
ते पहिल्यासारखं मन उघडे करून वागत नव्हते. घर ही आपले खांदे पाडून बसलं होतं. त्याला कितीही डागडुजी केली तरी पहिल्यासारखं खुलत नव्हतं. पिंपळाचे मात्र तसे नव्हते, तो नव्या झळाळीने सळाळत होता. त्याची सळसळती भेट आपलं बालवय जागवून तीच सळसळ निर्माण करीत होती. आता त्याच्या खोडाने हाताच्या मिठी इतका आकार धारण केला होता. एका हाताच्या मुठीत मावणारा त्याचा आकार आणि आताचा ही त्याची वाढ स्तिमित करणारी होती .आपण त्याला घट्ट मिठी मारून कितीतरी वेळ बिलगलेलो.. त्याच्या खोडावर डोकं टेकवून त्याची सळसळ अनुभवलेली. पश्चिमेचे क्षितीज तेच आणि मावळणारा चंद्रही तोच .बाकी सर्व बदलत गेले. पिंपळ ,क्षितिज आणि चंद्र मात्र आपल्या अवस्थेत कायम असलेले .काहीही न बोलता त्याचा माझा संवाद सुरू व्हायचा …
……..गावावरून कोणी आलं की,आपली पिंपळाची चौकशी ठरलेली…
नेहमीप्रमाणे भावाकडे पिंपळा बद्दल बोलायला लागलो.. तेव्हा तो काही वेळ स्तब्ध राहिला. तो काहीच बोलत नाही हे पाहून त्याला पुन्हा विचारलं, त्यांनं जे सांगितलं ते ऐकून खूपच हादरलो ..शक्तिपात झाल्यासारखं वाटायला लागलं. पिंपळा शेजारी राहणाऱ्याने पिंपळाला मुळापासून तोडले होते. बालपणापासूनचा माझा जीवसखा एका मूर्ख माणसाच्या क्रूर कुर्हाडीचे घाव झेलून उन्मळला होता …..
आता गावात कसे जावे.. असे किती दिवस सुन्न गेले आपले ..
मोठा धीर धरून आपण गावात गेलेलो… घरा मागचे दार उघडून पिंपळाच्या जागेकडे पाहिले .बुडापाशी बुंध्याची निर्जीव खूण शिल्लक फक्त.. दार बंद केले डोळे डबडबले ..
त्याने पिंपळावर नाही घाव घातला.. आपल्या बालपणावर घातला….
ही तीव्र भळभळती जाणीव ओघळायला लागली..
आता गावात काय उरले..
बाभुळबनाची अनोळखी तिसरी पिढी म्हातारपण भोगत उभी आहे ,ती आपल्याला ओळखत नाही. वाहणार्या रायघोळ नदीमायचे रूप स्मृतिभ्रंश झालेल्या म्हातारी सारखे झालेले आहे ..
भावकीत घर ही हरवलं . गावात आता आपल्यासाठी उरलंच काय ही जाणीव देह मनाला कुरतडत राहते.
तुका म्हणे पाहा, शब्दचि हा देव। शब्दाची गौरव पूजा।।
किंवा एके ठिकाणी ते असेही म्हणतात•••
घासावा शब्द | तासावा शब्द |
तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी ||
☆
शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा
बेतावेत शब्द | शास्त्राधारे ||
☆
शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान, कर्म, भक्ती |
स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द ||
☆
शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |
शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||
☆
– संत तुकाराम महाराज
तशी शब्दांची महती ही शब्दातीत आहे. पण मला याठिकाणी शब्दाची एक व्याख्या सांगावीशी वाटते, दोन किंवा अधिक अक्षरे जोडल्याने त्या अक्षरांना मिळालेला अर्थ म्हणजे शब्द.
मग शब्दाचा हा अर्थ असला तरी या शब्दाचा अर्थ त्याला क्रियापद जोडल्याने बदलतो. यासाठी एक प्रसंग वर्णन करते.
कॉलेजातील ते दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे आणि केव्हा पडले हे त्यांनाच कळले नाही . लग्नाचा विषय येताच तो म्हणाला मी तुला शब्द देतो की मी माझ्या पायावर व्यवस्थित उभा राहिलो की तुझ्याशीच लग्न करेन. ती म्हटली मी हा शब्द घेते पण तू तुझा शब्द नक्की पाळशील ना?
तो म्हणाला मी आमच्या अण्णांचा शब्द मानतो. त्यांच्या शब्दाला फार किंमत असते. गावातही त्याच्या शब्दाचे वजन पडते त्यामुळे त्यांनी हो म्हटले की लगेच मी शब्द प्रमाण मानून तुझ्याकडे येणारच .
ती म्हणाली ए तू उगाच शब्दात अडकवू नकोस हां !! नंतर म्हणशील मी शब्द टाकला पण त्यांनी नाही माझा शब्द झेलला त्यामुळे माझा शब्द चालला नाही. असा तुझा शब्दाघात मी सहन नाही करू शकणार. तुला तुझ्या शब्दांची किमया तुझ्या अण्णांवर करावीच लागेल. तुला तुझा शब्द फिरवता येणार नाही. तू म्हणशील मी शब्द मागे घेतो पण शब्दांचा असा महाल बांधून माझा शब्द तुला तुडवता येणार नाही.
तो म्हणाला अगं वेडे तुझ्यावर उधळलेला शब्द म्हणजे शब्दांची पेरणी करून शब्दांचे फळ मिळेपर्यंतच्या प्रक्रीयेचा आनंदोत्सव आहे. मग उगीच शब्दाने शब्द कशाला वाढवायचा ? त्यापेक्षा शब्द तोलूया. तू आणि मी शब्दजोडून आपण होऊया. या शब्दाची कधीच फोड नाही होणार ही खात्री बाळगूया. आणि नि:संदेह होऊन म्हणू•••
खिडकीतून बाहेर आकाशाकडे पाहताना दुपारच्या उन्हाच्या झळा अंगाला जाणवत होत्या. मार्च, एप्रिल महिना म्हणजे उन्हाळ्याची तीव्रता जास्त! आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर ढगांचे पांढरे शुभ्र पुंजके विखुरलेले दिसत होते आणि माझं मनही असंच विचारांच्या आवर्तात भरकटत होते!
लहानपण डोळ्यासमोर आले! परीक्षा संपण्याच्या आनंदा बरोबरच मोठ्या उन्हाळी सुट्टीची चाहूल लागलेली असे. ही सुट्टी कशी घालवायची याची स्वप्नं रंगवत दिवस जायचे. आता सारखे टीव्ही, मोबाईल, मोबाईल गेम, सिनेमा हे विश्व आमच्या समोर नव्हतं! फार तर परीक्षा झाल्यावर एखादा सिनेमा बघायला मिळायचा! कोकणात तर सुट्टीत दुपारी पत्ते खेळणे, संध्याकाळी समुद्रावर फिरायला जाणे, डबा ऐसपैस सारखे खेळ खेळणे,घरी आले की परवचा म्हणणे, गाण्याच्या भेंड्या लावणे हीच करमणूक होती. सकाळी आठवण भाताचा नाश्ता झाला की दुपारच्या जेवणापर्यंत आम्ही घरात फिरकत नसू. आंबे बाजारात सुरू झाले की रोज आमरसावर ताव मारणे, फणस, काजूचा आस्वाद घेणे यात दुपार कधी सरायची कळत नसे. घामाच्या धारा वाहत असायच्या पण संध्याकाळी ऊन उतरले की समुद्रावरचा वारा ‘शीतल विंझण वाऱ्यासारखा वाटायचा!
बालपण कोकणचा मेवा खात कधी संपलं कळलं नाही आणि कॉलेज साठी देशावर आले. देशावरचे उन्हाळी वातावरण खूपच वेगळे! ऊन खूप असे पण घामाच्या धारा कमी! संध्याकाळी चार-पाच नंतर हवा एकदम बदलत असे या दिवसात! अभ्यासाच्या वाऱ्याबरोबरच बाहेरची हवा ही बदलती असे! दुपारचे कडक ऊन संध्याकाळी वाऱ्या वावटळीत कमी तीव्र वाटायचे. हॉस्टेलवर राहत असताना जानेवारीनंतर हवेतला गारवा कमी होऊन वातावरण तापत असे. आमच्या कॉलेजच्या परिसरातील झाडांची पाने पिवळी, करड्या रंगाची दिसू लागत. अधून मधून वावटळ सुटे आणि दूरवर फुफाटा उधळत असे. वसंत ऋतुच्या चाहुलीने निसर्गात सूजनाची निर्मिती दिसायला सुरुवात होई. झाडावर पालवी फुटलेली दिसे. कोकिळेचे कूजन ऐकायला येई तर कुठेतरी निष्पर्ण पांढऱ्या, गुलाबी रंगाचे वस्त्र पांघरून दिसे तर कुठे पिवळ्या जांभळ्या फुलांची शाल पांघरलेला कॅशिया असे! आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर गुलमोहराचे केशरी तुरे खुलून दिसत! मोगरा, मदनबाणाची छोटी छोटी झुडपे पांढऱ्या कळ्यांनी भरून गेलेली दिसत. संध्याकाळी त्यांचा सुगंध सगळा परिसर गंधमयी करत असे!
अशा या वातावरणात आकाशात ढगांची बदलाबदली कधी सुरू होई कळत नसे. पांढरे शुभ्र ढग हळूहळू 9करडे बनत, बघता बघता आकाश काळ्या ढगांनी भरून जाई. ढगांचा कडकडाट आणि विजेच्या गडगडाटासह हवा आपलं रुपच पालटून टाकत असे. जोराचा वारा सुटला की पाखरे लगबगीने आपल्या घराकडे परतू लागत. आणि मग जी वळवाची सर येई ती मृदगंध उधळीत जीवाला शांत करत येई! तो पाऊस अंगावर झेलू की टप टप पडलेल्या गारा वेचू असे होऊन जाई! छपरावर, रस्त्यावर सगळीकडे गारांचा सडा पसरलेला दिसे! डोळ्यासमोर तो वळीव असा उभा राहिला की मनमोराचा पिसारा किती फुलून जाई ते वर्णनच करता येत नाही!
पावसाची पहिली सर अंगावर घेतली की तो वळीव प्राशन करून घ्यावासा वाटतो! पावसाची सर थांबता थांबता आकाशात इंद्रधनुष्याची कमान बघायचं सुख अनुभवायला मिळते! पांढऱ्या शुभ्र ढगातून बदलत जाणारा तो काळा ढग असा ओथंबून येतो की त्याची होणारी बरसात मनाचे शांतवन करते! कधी कधी मनाला प्रश्न पडतो की ते पांढरे ढग पांढरे ढग काळयामध्ये परावर्तित झाले तरी कधी? विजेच्या संगतीने कडकडाट करीत हे भाव व्याकुळ ढग पृथ्वीवर रिते कसे बरं होत असतील? पांढरे ढग श्रेष्ठ की काळे ढग? अशा आशयाचा वि.स. खांडेकरांचा धडा आठवून गेला! दोन्हीही ढग तितकेच महत्त्वाचे! करड्या ढगांचे अस्तित्वच मुळे पांढऱ्या ढगांवर अवलंबून असते.विचारांच्या आवर्तात ही ढगाळलेली अवस्था येते. कधीकधी विचारांचे पांढरे ढग जेव्हा परिपक्व होतात तेव्हा ते हळूहळू करडे बनतात. पुढे मनाचे आभाळ दाटून येते आणि योग्य वेळ आली की डोळ्यातून सरीवर सरी बरसत राहतात. मनावरचे अभ्राचे पटल नष्ट करून स्वच्छ मनाने पुन्हा नाविन्याचा आस्वाद घेतात! अशा नवनिर्मिती करणाऱ्या त्या बरसणाऱ्या ढगांची माझे मन आतुरतेने वाट पाहत राहते!
अगोदर ‘क’ बद्दल देखील मी काही लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. पण ‘ळ’ बद्दल लिहिण्यासारखे काही वाटले ते “जोगळेकर” या आडनावाच्या एका व्यक्तींमुळे.
यांनी एक ऑडीओ व्हिडिओ क्लिप केली आहे. आणि त्यात “जो ग ळे क र” असा उच्चार करतांना “ळ” वर खास जोर दिला आहे. कारण त्यांचे काही मित्र त्यांना “जोगलेकर” अशी हाक मारत असत. ल आणि ळ यातला फरक आणि ळ चे महत्व सांगण्यासाठी त्यांची क्लिप.
ही क्लिप ऐकल्यावर मी पण या ळ च्या प्रेमळ विळख्यात अडकलो. विळखा घातल्यावर ळ समजतो.
ळ आणि ळ ची बाराखडी चा संबंध माझ्या जन्मापासून आहे, आणि शेवटपर्यंत तो राहणार आहे. अगदी जन्माला आल्यावर पहिला संबंध असतो तो नाळ शी. आणि मग सांगितले जाते ते असते बाळ.
माझ्या बालपणी छान, सुंदर, गुटगुटीत अशी विशेषणे मला नसली तरी मी काटकुळा देखील नव्हतो. घरच्यांना माझा लळा लागला होता.
बाळाच्या रंगावीषयी देखील बोलले जाते. मी गोरा नाही. त्यामुळे काळा, किंवा सावळा असाच आहे, किंवा उजळ नाही असेच म्हणतात. तिथेही ळ शी संबंध ठेवलाच.
नंतर टाळू भरणे, जाऊळ, पायात वाळा, खेळायला खुळखुळा, पांगुळ गाडा, असा ळ शी संबंध वाढवला. गोंधळ घातला तो आंघोळीचा. मी एकदा मीचकावला तो डोळा. याचेही कौतुक झाले. (डोळा मीचकवण्याचे कौतुक लहानपणीच असते हे लक्षात घ्या.)
पुढे संबंध आला तो शाळा आणि फळा यांच्याशी. फळा सुध्दा काळा. शाळेत मी अगदीच ढ गोळा नव्हतो हे नशीब. पण त्यामुळे एक (गो)ळा मात्र कमी झाला. शिकतांना सुध्दा कावळा, बगळा, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, चाफेकळी, करंगळी, तळ हात, मळ हात, न नळाचा, क कमळाचा, घ घड्याळाचा असेच शिकलो. यात ळ कशाचा हेच शिकायचे राहिले, पण ळ नकळत लक्षात आला. (तळहात, कमळ, घड्याळ यांचा आणि माझा संबंध किती काळापासून पासून आहे हे कळले.)
शाळा, महाविद्यालय असे करत धरली ती नोकरी. पण यातही कपाळावर कर्तृत्वाचा खास असा टिळा काही लागला नाही. पण कामात घोळ घातला नाही.
इतर कामात देखील मी नामानिराळा असतो. कामाचा कळवळा दाखवत नाही. किंवा काम करायला उतावळा देखील नसतो. म्हणूनच माझा उल्लेख कोणी(च) साधा भोळा असा करत नाही. पण मी आवळा देऊन कोहळा काढणारा नाही. किंवा खाण्यापिण्याच्या बाबतीत देखील मी सोवळा नाही. तसाच मी आगळा वेगळा देखील नाही.
मी देवळात जातो, तसेच सोहळ्यात देखील जातो. सकाळ आणि संध्याकाळ नजरेत साठवतो. काही काळ मित्रांसोबत घालवतो, तर काही वेळ घरासाठी.
येतांना नाळ तोडून आलो, आणि जातांना गोतावळा सोडून जाणार आहे. म्हणून वर म्हटले ळ माझ्या जन्मापासून आहे आणि शेवटपर्यंत राहील.
मला आठवते, स्व आई मॉरिस कॉलेज नागपूरला मराठीत एम ए करीत होती. रोज आई घरी आली की, वैचारिक मेजवानी बाबांसह आम्हाला मिळत असे. ती बाबांचे संस्कृत श्लोक प्रसंगोचीत असत. त्यामुळे आई बाबांचे संवाद हे सुसंस्कारित उच्च दर्जाचे असत. कधी कधी बाबांचे वैदर्भीयन उच्चार, शब्द आईचे पुणेरी उच्चार अन् शब्द यांची जुगलबंदी होत असे. तो अनुभव देखील आम्हा भावंडांसाठी एक संस्कारच होता. बाबांचे लिखाण मी फारसे कधी वाचले नाही. अर्थात गणित, विज्ञान या चौकटीत त्यांच्या साहित्य विषयक जाणिवा किंचित बोथट झाल्या असाव्यात. पण आणीबाणीच्या तुरूंगवासात, गजाआड गणित विज्ञानाच्या चौकटी शिथील झाल्या.
आईला मॉरिस कॉलेज नागपुर येथे द. भि. कुलकर्णी, माणिक गोडघाटे शिकवित असत. कामठी येथून बस प्रवास करून नागपूरला येऊन शिक्षण घेणाऱ्या एका विवाहितेला विद्यार्थिनी म्हणून आपण शिकवतो, याचे ह्या दोघांना खूप अप्रूप होते. अर्थातच आईचे साहित्य विषयक आकलन, उत्तम होते तेंव्हापासून ग्रेस आणि दभि या नावांचे गारूड माझ्या मनावर आरूढ झाले. ग्रेस आईला म्हणत की, तुमचे माझे नाव एकसारखेच आहे.. हो! माझ्या आईचे नाव माणिकच होते. लग्नापूर्वीचे आईचे नाव हिरा होते, बाबांनी ते प्रथेपणे बदलून माणिक केले.. ( परंतु अमूल्य रत्न, हा अर्थ कायम राखूनच)
प्राध्यापक ग्रेस आणि दभी यांची आई आवडती विद्यार्थिनी होती.
तसे माझे शालेय वयच होते ते!
ट ला ट, री ला री जोडून, ओढून ताणून कविता (?) मी करत असे.. एकदा कां कविता लिहिण्याचा निर्णय झाला मी डाव्या बाजूला एकसारखे शब्द (शेखर, ढेकर, येणे, जाणे, गाणे, नाणे, बुध्द वृध्द, सिध्द, बद्ध इत्यादी ) लिहून ते कवितेचे धृपद म्हणून एक लांबलचक कविता (?) लिहित असे.
आईने त्याला बडबड गीता पेक्षा अधिक मानण्यास नकार दिला. कविता तर नाहीच नाही. “अरे, ही काय कविता आहे? ” तेंव्हापासून, काव्य प्रकार हा माझा प्रांत नाही, या निष्कर्षाप्रत मी आलो. माझे शब्द भांडार हे किती अपुरे आहे, हे मला जाणवले. कल्पनेची देखील मर्यादा मला जाणवली. एकदा असाच सॉनेट (सूनित) लिहिण्याचा मी घाट घातला. पण आशय ना विषय, ते आरंभ शौर्य मनातल्या मनातच विरले. प्राध्यापक कविवर्य माणिक गोडघाटे यांचे विषयी, आई भरभरून बोलत असे. तेंव्हा एक अगम्य, गूढ, दुर्बोध, शब्द बंबाळ, अनाकलनीय लिहिणारे ( आईच्या शब्दात, ग्रेसफुल लिहिणारे ग्रेस ) कवी ग्रेस !. ही प्रतिमा माझ्या मनात रुजली. त्यांच्या प्रतिमांची उकल माझ्या क्षमतेच्या परीघा बाहेरची आहे. अनेक समीक्षकांनी त्यांच्या त्यांच्या प्रतिभेने ग्रेस यांच्या प्रतिमांची उकल केली.. ती देखील माझ्या आकलनाच्या पल्याड आहे.
पण त्यामुळे मी अधिकच या कवीच्या, व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडलो. आज ग्रेस यांचा स्मृतिदिन, शब्दांची उणीव रेषांनी भरून श्रध्दांजली अर्पण करण्याचा हा प्रयत्न !