मराठी साहित्य – विविधा ☆ अंतर दृष्टिकोनातलं ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

अंतर दृष्टिकोनातलं ☆ श्री विश्वास देशपांडे

हिंदीमध्ये ‘ दृष्टिकोन ‘ या मराठी शब्दासाठी ‘ नजरिया ‘ असा एक छान शब्द आहे. नजर आणि नजरिया यात फरक आहे. नजर म्हणजे दृष्टी आणि नजरिया म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन किंवा विचार करण्याची दिशा. त्यावरून एक सुंदर आणि प्रेरणादायी वाक्य आहे. ‘ नजर बदलो, नजारे बदल जायेंगे, सोच बदलो सितारे बदल जायेंगे, कश्तियाँ बदलने की जरुरत नहीं, दिशा बदलो, किनारे खुद-ब-खुद बदल जायेंगे. ‘

या वाक्याची आठवण येण्याचं कारण म्हणजे दोन वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन करत असताना, त्यातील काही प्रसंग वाचून मनात उठलेली विचारांची वादळं. त्या दोन गोष्टींनी मनाला अगदी हलवून सोडलं. व पु काळेंचं ‘ माझं माझ्यापाशी ‘ या नावाचं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. ते वेळ मिळाला की मी अधूनमधून वाचत असतो. या पुस्तकात ‘ अमर चित्रपट ‘ या नावाचा एक लेख आहे. त्यात ‘ प्रभात ‘ चित्रपट निर्मित १९३७ सालच्या ‘ कुंकू ‘ चित्रपटाबद्दल अतिशय मूलभूत विचार वपुंनी मांडले आहेत. दुसरं पुस्तक मी सध्या वाचतो आहे त्याचं नाव आहे ‘ आश्रम नावाचं घर : कहाणी श्रद्धानंद महिलाश्रमाची ‘. अचला जोशी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. आधी या दोन घटना कोणत्या ते जाणून घेऊ या.

आजच्या काळात बालाजरठ विवाह होत नाही पण काही वर्षांपूर्वी असे विवाह सर्रास होत असत. बालाजरठ विवाह म्हणजे एखाद्या अगदी कोवळ्या लहान मुलीचे लग्न साठ सत्तर वर्षाच्या वृद्धाशी लावणे. नाटककार गो ब देवल यांचं ‘ संगीत शारदा ‘ हे नाटक याच विषयावर आधारित आहे. ‘ कुंकू ‘ या व्ही शांताराम दिग्दर्शित चित्रपटात हाच विषय हाताळला आहे पण जरा वेगळ्या पद्धतीने. ‘ कुंकू ‘ चित्रपटाची सुरुवातच लहान मुले नाटकाचा खेळ खेळतात आणि त्यात एक सात आठ वर्षांची मुलगी संगीत शारदा मधील शारदा बनते. एक दहा बारा वर्षांचा मुलगा दाढी मिशा लावून वृद्ध बनतो. शारदेचा विवाह या वृद्धाशी लावून देण्याचा प्रसंग येतो, तेव्हा ही चिमुरडी मुलगी मी म्हाताऱ्याशी लग्न करणार नाही असं ठणकावून सांगते. तिला मग इतर मुलं सांगतात की अगं, हे नाटक आहे. नाटकापुरती भूमिका करायची. पण नाटक म्हणून सुद्धा ती वृद्धाशी लग्न करायला सुद्धा नकार देते. मग पुढे चित्रपटातील कथा सुरु होते. चित्रपटातील नीरा नावाच्या नायिकेचा विवाह तिचा दारिद्र्याने गांजलेला आणि पैशाचा लोभी असलेला मामा वकील असलेल्या आणि ज्यांना सगळे काकासाहेब असे संबोधतात अशा एका वृद्धाशी लावून देतो.

नीरासुद्धा आपल्या मनाविरुद्ध झालेल्या या लग्नाबद्दल जणू बंड करून उठते. ती ग्रुप फोटो काढायच्या वेळी सुद्धा येत नाही. त्यावेळी तिचा मामा तिला म्हणतो, ‘ फोटोला सुद्धा आली नाहीस. तुला जराही लाज वाटली नाही का ? ‘ तेव्हा ती त्या मामांना, मामीला आणि ज्यांच्याशी लग्न झाले त्यांना खडे बोल सुनावते. ती म्हणते, ‘ एका लहान तरुण मुलीचा वृद्धाशी विवाह करताना, गरीब गायीला कसायाच्या गळ्यात बांधताना तुम्हाला लाज नाही वाटली ? ‘ ती आपल्या नवऱ्याला, काकासाहेबांना म्हणते, ‘ तुमच्या मुलीच्या\नातीच्या वयाच्या मुलीशी लग्न करताना तुम्हाला लाज नाही वाटली ? लाज तर तुम्हाला वाटायला हवी. ‘

ती आपल्या पतीच्या खोलीत त्याच्याबरोबर झोपायला जात नाही. घरातील मोठ्या बायकांचं सांगणं ऐकत नाही. तिचा तिच्या मनाशी आणि या सगळ्यांशी उघड संघर्ष सुरु आहे. त्या घरात पूर्वीच्या काळातील षट्कोनी आकाराचे एक टोल देणारे लंबकाचे घड्याळ दाखवले आहे. ते घड्याळ एकदा बंद पडलेले असते. तेव्हा काकासाहेब आपल्या वृद्ध नोकराला घड्याळाला चाबी दिली नाहीस का असे विचारतात. तो नोकर म्हणतो, ‘ मालक, ते घड्याळ बी आता माझ्यासारखंच म्हातारं झालं आहे. कितीबी चाबी द्या, कव्हा बंद पडंल त्याचा नेम न्हायी. ‘ हे वाक्य तो बोलतो स्वतःसाठी पण ते झोंबतात मात्र काकासाहेबांना. हे घड्याळ म्हणजे जणू काकासाहेबांच्या वृद्धत्वाचे प्रतीक.

चित्रपटात एक क्षण असा येतो की काकासाहेबांना आपल्या वागण्याचा पश्चाताप होतो. ते नीरेचं कुंकू आपल्या हातानं पुसतात. त्यावेळी नीरा देखील वाघिणीसारखी चवताळून उठते. आता कुंकू लावीन तर काकासाहेबांच्या हातूनच असा निश्चय ती करते. एखाद्याचं हृदयपरिवर्तन, विचारपरिवर्तन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तीच या चित्रपटात दाखवली आहे आणि तेच या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. शेवटी काकासाहेब नीरेच्या कपाळी कुंकू लावतात पण ते पित्याच्या मायेनं. मनातली वासना नष्ट झालेली असते. यावेळी समाज काय म्हणेल असा विचार करत असलेल्या नीरेला ते म्हणतात, ‘ कसला विचार करतेस या जगाचा ? ज्या जगाला एका तरुणीचा एका म्हाताऱ्याशी विवाह लावून देताना काही वाटलं नाही अशा जगाचा काय विचार करायचा ! पित्याच्या जागी असलेल्या वृद्धानं आपल्या तरुण बायकोला मुलगी समजून शुद्ध भावनेनं कुंकू लावलं हे जर चालणार नसेल तर अशा समाजाची काय पर्वा करायची ?

चित्रपटात शेवटी काकासाहेबांना आत्महत्या करताना दाखवलं आहे. मृत्यूपूर्वी ते आपल्या तरुण पत्नीला लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘ बाळ, माझ्या मृत्यूशिवाय तुझी सुटका होणं शक्य नाही हे मी जाणून आहे. माझ्या मृत्यूनंतर तो पुनर्विवाह करावास, तुला भरपूर संसारसुख मिळावं अशी माझी इच्छा आहे. त्याशिवाय माझ्या आत्म्याला शांतता मिळणार नाही. तुझा प्रेमळ पिता. ‘ इथे खरं तर चित्रपट संपतो पण खरा चित्रपट सुरु होतो तो आपल्या मनात. मनाला आतून हलवून टाकण्याची ताकद या चित्रपटातील घटनात आहे. व्ही शांताराम यांचं दिग्दर्शन तर अप्रतिम. वपुंनी या चित्रपटाबद्दल फार सुंदर आणि सविस्तर लिहिलं आहे. ते मुळातूनच वाचावं. ते वाचून मी हा चित्रपट आवर्जून पाहिला. 

दुसरी घटना आहे ‘ आश्रम नावाचं घर ‘ या पुस्तकातली. श्रद्धानंद महिलाश्रमाची ही कहाणी आहे. या आश्रमाने अनेक निराधार स्त्रिया, विधवा, अन्याय, अत्याचाराने होरपळलेल्या स्त्रियांना आधार दिला आहे. अशा अनेक स्त्रियांच्या कहाण्या या पुस्तकात वाचायला मिळतात. त्यातीलच एक कृष्णाबाई. तिची कहाणी वाचून मी अस्वस्थ झालो आणि वाईटही वाटले. न कळत्या वयात म्हणजे वयाच्या केवळ नवव्या वर्षी कृष्णीचं लग्न एका मोठ्या एकत्र कुटुंबातील मुलाशी झालं. कृष्णेला न्हाण येण्यापूर्वीच मुदतीच्या तापानं तिचा नवरा वारला. माहेरची वाट बंदच होती. सासरच्यांनी तिच्यावर अनेक बंधनं लादली. तिला बाहेर जायलाच काय पण बाहेरच्या घरातही यायला बंदी केली. पण कृष्णी जसजशी वयात येऊ लागली,तशी घरातल्या कर्त्या पुरुषांनी तिच्यावर वाईट नजरेनं पाहायला सुरुवात केली. कधी सासूबाई चार दिवस बाहेरच्याला बसल्या तर सासरे तिला पाय चेपायला बोलावू लागले. एके दिवशी पाय चेपता चेपता त्यांनी दार बंद करून घेतलं. नंतर चुलत सासऱ्यांनी हाच कित्ता गिरवला. कृष्णीला सुरुवातीला जरा वेगळं वाटलं. अर्थात बरं वाईट कळण्याचं तिचं फारसं वय नव्हतं आणि जे काही घडत होतं त्यात तिचा दोषही नव्हता. पण तिने आपल्या सासूबाईंच्या कानावर ही गोष्ट घातली. पण घरातील कर्त्या पुरुषांसमोर बोलण्याची त्यांची प्राज्ञा नव्हती. पुरुष जे काही आपल्याला देतात ते मुकाट्यानं घ्यायचं असं त्यांनी कृष्णीला सांगितलं. तीस माणसांच्या एकत्र कुटुंबात ही गोष्ट कर्णोपकर्णी व्हायला कितीसा वेळ लागणार ? दिरांनीही तिचा फायदा घायला सुरुवात केली. लवकरच ती घरातल्या सर्वांची हक्काची मत्ता झाली. अशातच तिला दिवस राहिले. मग तिच्या सासऱ्यांनी तिला आश्रमात आणून सोडले. तेव्हा तिला नववा महिना लागला होता. बाळंत झाल्यावर मुलाला आश्रमातच सोडून सासरी परत यायला तिला सासऱ्यांनी बजावले होते.

आश्रमातील बाईंना तिची ही अवस्था पाहून वाईट वाटले. त्यांनी तिला समजावून सांगितले की बाळ तू इथेच निर्धास्तपणे राहा. इथे कोणीही तुला त्रास द्यायला येणार नाही. पण कृष्णीचा मनात परत जायचे होते. तिला त्या जीवनाची चटक लागली होती. बाईंनी तिला सांगितलं की तुझं रूप, वय साथ देतं आहे, तोपर्यंतच तुला सासरी विचारतील. एकदा का वय सरलं की मग तुझे हाल कुत्राही खाणार नाही. एके दिवशी कृष्णी प्रसूत झाली. तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. एका सकाळी कोणाला नकळत त्या बाळाला तिथेच टाकून कृष्णी पुन्हा आपल्या सासरी निघून गेली.

तसं पाहिलं तर या दोन घटनांचा परस्पर संबंध काही नाही. ‘ कुंकू ‘ चित्रपटातील नीरा आणि या महिलाश्रमात आलेली कृष्णी या दोघीही परिस्थितीच्या बळी ठरल्या. पण दोघींच्या आयुष्याला नंतर जे वळण मिळालं त्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. निराला बऱ्यावाईटाची जाण आहे. ती परिस्थितीचा बळी ठरली तरी आहे त्या परिस्थितीत जगण्याचे ती नाकारते. परिस्थितीविरुद्ध बंड करून उठते. तिच्या वागण्याने काकासाहेबांना सुद्धा आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. तिने पुन्हा लग्न करून तिचा संसार भविष्यात फुलावा यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचे समर्पण केलं. याउलट गोष्ट कृष्णीची आहे. ती जरी परिस्थितीची बळी ठरली आणि जे काही घडले त्यात तिचा दोष नसला, तरी मुळातच त्या नरकात आपले आयुष्य वाया घालवण्यापेक्षा काही वेगळा विचार ती करू शकली असती. तिला उर्वरित आयुष्य महिलाश्रमात घालवून स्वतःची प्रगती साधता आली असती. पुढे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहता आले असते. पण अशा प्रकारची उर्मीच तिच्या मनात उठत नाही. हा दृष्टिकोनातला फरक नीरा आणि कृष्णी यांच्यात आपल्याला दिसतो.

आहे त्या परिस्थितीत तसेच जगणे किंवा कसेबसे दिवस काढणे याला जगणं म्हणता येणार नाही. परिस्थितीशी संघर्ष तर सगळ्यांच्या नशिबी असतो. पण मी आहे त्याच परिस्थितीत राहणार नाही. स्वकष्टाने, प्रयत्नाने, बुद्धीने, जिद्दीने मी पुढे जायचा प्रयत्न करीन यातच मानवी जीवनाचे साफल्य आहे. मी जे कोणते काम करतो, ज्या कोणत्या पदावर आहे, त्यापेक्षा आणखी काही वर्षांनी मी नक्कीच पुढे गेलेलो असेन, मी काहीतरी नवीन शिकेन. ज्या परिस्थितीत मी जन्मलो, जगलो त्याच परिस्थितीत नक्कीच निवृत्त होणार नाही, त्याच परिस्थितीत नक्कीच मरणार नाही अशा प्रकारची दुर्दम्य आशा आणि जिद्द जो मनात बाळगतो, त्याच्या आयुष्याचे सोने होते. यातील आहे त्याच परिस्थितीत खितपत राहून आनंद मानणाऱ्या व्यक्तींची प्रतिनिधी कृष्णी  आहे तर प्राप्त परिस्थितीशी संघर्ष करून पुढचं प्रगतीचं पाऊल टाकू पाहणाऱ्या व्यक्तींची प्रतिनिधी नीरा आहे. हा दृष्टिकोनातला फरक आहे. म्हणून त्या प्रसिद्ध हिंदी ओळी पुन्हा आठवतात. ‘ नजर बदलो, नजारे बदल जायेंगे, सोच बदलो सितारे बदल जायेंगे, कश्तीया बदलने की जरुरत नहीं, दिशा बदलो, किनारे खुद-ब-खुद बदल जायेंगे.’

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

☆ प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

प्र सा द !

“प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही !’

आपण एखाद्या पूजेला कोणाकडे गेलो असता, तिथल्या यजमानांनी हसत हसत दिलेली ही प्रेमळ तंबी आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. आणि जर ती पूजा “सत्य नारायणाची” असेल तर मग काय बोलायलाच नको ! कारण त्या पूजेचा जो प्रसाद असतो तो करण्याची एक विशिष्ठ पद्धत असते, हे आपल्याला ठाऊक आहेच. त्यामुळे त्या प्रसादाला एक वेगळीच चव प्राप्त झालेली असते.  गोडाचा शिरा  करतांना जे पदार्थ लागतात तेच पदार्थ हा सत्य नारायणाचा प्रसाद करतांना लागतात, पण त्यांचं प्रमाण थोडं वेगळ असतं.  त्यामुळंच की काय तो सारखा खातच रहावा असं मला वाटतं, पण प्रसाद हा प्रसाद असल्यामुळे तो निगुतीने पाडलेल्या छोट्या मुदीच्या रूपात, कागदाच्या द्रोणात आपल्या समोर येतो.  अशावेळी मग मी धीर करून आणि सत्य नारायणाची क्षमा मागून, यजमानांकडे आणखी एक प्रसादाचा द्रोण मागून घेतो. पण जर पूजेचे यजमान आणि यजमाणिन बाई माझ्या जास्तच परिचयातल्या असतील तर मग माझी प्रसादाची चंगळ झालीच म्हणून समजा ! “वाहिनी काय तुमच्या हाताला चव आहे हो ! असा प्रसाद गेली कित्येक वर्ष या मुखात पडला नाही. निव्वळ अप्रतिम !” असं नुसतं बोलायची खोटी, की लगेच वाहिनीसाहेबांचा चेहरा, प्रसाद करतांना जसा रवा फुलतो तसा फुलतो आणि “भाऊजी एक मिनिट थांबा हं, मी आलेच !” असं म्हणून ती माऊली किचन मध्ये जाते आणि दोन मिनिटात माझ्या समोर प्रसादाचा डोंगर केलेली एक छान डिश माझ्या हातात देते. अशावेळी मग मी सुद्धा मानभाविपणे “अहो काय हे वहिनी, घरी जाऊन मला जेवायचे आहे, एवढा प्रसाद खाल्ला तर…..” “काय भाऊजी एवढ्याश्या प्रसादाने तुमची भूक थोडीच भागणार आहे? काही होतं नाही, आज थोडं उशिराने जेवा.”  असं म्हणून दुसऱ्या पाहुण्यांच्या सरबराईला जाते. मग मी सुद्धा फारसे आढे वेढे न घेता त्या डोंगरूपी चविष्ट प्रसादाची चव, जिभेवर घोळवत घोळवत, माझ्या पोकलेनरुपी रसनेने त्याला आडवा करून मनोमन वहिनींना धन्यवाद देतो!

“भक्तांनो गडबड करू नका, रांगेत या! कितीही वेळ लागला तरी महाराज सगळ्यांना प्रसाद देऊन उपकृत करणार आहेत !”

लाऊड स्पीकरवरून महाराजांचा शिष्य सतत घोषणा करत होता. प्रचंड अशा उघड्या मैदानावर सामान्य भक्तगण रणरणत्या उन्हाची पर्वा न करता, आलिशान अशा वातानुकुलीत तंबूमध्ये मखमली गाद्या गिरद्यावर बसलेल्या महाराजांचे दर्शन घेण्यासाठी ताटकळत उभा होता.  कित्येक मैलाची पायपीट करून अनेक भक्तगण दुरून दुरून महाराजांची कीर्ती ऐकून आले होते. महाराजांची ख्यातीच तशी होती. कुठल्याही संकटातून महाराज त्यांच्या प्रसादाने भक्तांना मुक्त करत. अगदी ज्यांना मुलबाळ नाही त्यांना सुद्धा महाराजांच्या प्रसादाने मूलं झाल्याच्या बातम्या शहरभर पसरल्या होत्या. अनेक असाध्य रोग महाराजांच्या प्रसादाने बरे झाल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. अशा प्रभावी महाराजांचे दर्शन आणि त्यांचा प्रसाद घेण्यासाठी इतकी झुंबड मैदानावर उडणं साहजिकच होतं.

VIP लोकांची रांग वेगळी. त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासाठी मैदानाचा एक कोपरा राखून ठेवला होता. महाराजांचे अनेक शिष्य आणि शिष्या VIP लोकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज होत्या. मैदानाला जणू जत्रेच रूप आलं होतं. महाराजांच खटलंच तसं मोठं होतं !

कुणाचा बसलेला धंदा महाराजांच्या प्रसादाने पुन्हा उभा राहून नावारूपाला आला होता. एखाद्या बड्या सरकारी अधिकाऱ्याची बढती, बदली अडली असेल तर महाराजांच्या प्रसादाने ती मार्गी लागत असे. एवढंच कशाला मंत्री मंडळात खाते वाटप करतांना खात्या पित्या खात्यात वर्णी लागण्यासाठी सुद्धा अनके मंत्री महाराजांच्या प्रसादासाठी त्यांच्या पायावर लोटांगण घालीत ! महाराज म्हणजे जणू परमेश्वराचा अवतार आणि त्यांनी दिलेला प्रसाद म्हणजे जणू कुठल्याही संकटावरचा रामबाण उपाय असं समीकरणच झालं होतं !

मुलांनो, पुरे झाला तुमचा खेळ. मुकाट्यानं घरात या नाहीतर माझ्या हातचा धम्मक लाडूचा प्रसाद मिळेल बरं कां !

उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला गेल्यावर मुलांना किती खेळू आणि किती नको असं होऊन जात. अगदी दिवेलगणीची वेळ झाली तरी खेळ म्हणून संपत नाही त्यांचा. मग आईचा धम्मक लाडूचा प्रसाद चुकवण्यासाठी मुलं नाईलाजाने घराकडे वळत.  कारण आईचा प्रसाद एक वेळ परवडला, पण तिने जर बाबांना सांगितलं तर मग आपलं काही खरं नाही हे तेंव्हाची मुलं चांगलंच जाणून असायची. त्यामुळे आईने बोलावल्यावर “पाचच मिनिटं” असं सांगून मुलं पुन्हा खेळायला लागायची.

आई बाबांच्या हातचा प्रसाद त्यावेळेस एक वेळ ठीक होता, पण शाळेतला गुरुजींच्या हातचा, हातावरचा छडीचा प्रसाद हाताला थोडे दिवस तरी जायबंदी करून जात असे, डोळ्यातून पाणी काढत असे. आणि गुरुजींच्या छडीच्या प्रसादाची जागा हाता ऐवजी पार्श्वभागावर आली तर उठता बसता त्या प्रसादाची आठवण होई. तेंव्हाचे गुरुजी पण हुशार. पार्श्वभागावर प्रसाद देतांना शाळेच्या गणवेशाची अर्धी विजार, त्या मुलालाच पुढून घट्ट ओढून धरायला सांगत आणि मगच छडीच्या प्रसादाचे वाटप करीत. एवढा प्रसाद खाऊन वर पुन्हा वर्गातल्या मुलींसमोर रडायची चोरी! कारण मुली काय म्हणतील याची मनांत भीती. आणि हे प्रकरण घरी कळलं तर, चेरी ऑन द केक प्रमाणे वडिलांच्या हातचा प्रसाद मिळायचा तो वेगळाच !

इति प्रसाद पुराणं समाप्तमं !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मुबंईचा डबेवाला…” ☆ श्री रत्नाकर दिगंबर येनजी ☆

? विविधा ?

“मुबंईचा डबेवाला…” ☆ श्री रत्नाकर दिगंबर येनजी

काही दिवसांपुरी एका  व्हाट्सअप ग्रुपवर माझ्या एका जीवलग मित्राने एक पोस्ट शेअर केली होती.त्यात TED वर एक व्यक्ती डबेवाले या विषयावर प्रेझेंटेशन करुन त्यावर Motivation speech देत होती. आता तुम्ही म्हणाल हे TED काय प्रकरण आहे? TEDम्हणजे  (Technology, Entertainment, Design) ही एक Conference असते. जगभर वेगवेगळ्या किंवा युनिव्हर्सिटी कँम्पस किंवा आयोजित केलेल्या चर्चा सत्रात मोठ मोठ्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्तीना आपण यशस्वी कसे झालात या विषयावर कमीत कमी पंधरा ते अठरा मिनिटे बोलायला देतात. त्यात आपण श्रोत्यांपुढे सुंदर परिणामकारक भाषण करुन त्यांची मने जिंकावी लागतात. ह्या भाषणाचे छायाचित्रण करुन ते TED च्या संकेतस्थळावर टाकतात व तिकडुन युट्युब वर सुध्दा प्रसरण होते.यामुळे आपण बोललले पंधरा ते अठरा मिनिटाचे भाषण जगातील करोडो लोकांकडे.  पोहचते.

मी नेहमी युट्युब वर असे TED Motivation speech बघतो छान असतात. यात मी आपला मराठ मोळा सिध्दार्थ जाधव याचे एकदा भाषण पाहीले. आपले जाधव साहेब मस्तच बोलले .छाती गौरवाने फुलुन आली. अशाच एका TED च्या सत्रात आंतरराष्ट्रीय प्रेरणा व्याख्याते (International Motivational Speaker) डाँक्टर पवन अगरवाल यांनी स्वतः A study of Logistics and Supply Chain Management of Dabbawala in Mumbai’. या विषयात प्रबंध लिहुन डाँक्टर ही पदवी ग्रहण केली असल्याने त्यांनी मुंबईच्या डबेवाला या विषयावर रंगमंचावर स्वतः बनविलेले Power point presentation सादर केले.महत्वाचे म्हणजे त्यांनी  सर्वांसमोर डबेवालाचा वेश परिधान करुन उत्तम ईग्रजी भाषेत प्रेझेंटेशन दिले. त्यांचे ते थोडक्यात सादरीकरण खरोखरच प्रेरणादायी व परिणामकारक (Effective) होते.

त्यांच्या सादरीकरणात त्यांनी जी माहिती दिली ती मी आपणास थोडक्यात सांगतो.

मुंबईत १८९० साली ही डबे कामाच्या ठिकाणी नेऊन पोहचवण्याची पध्दत सुरु झाली.आज मुबंईत त ५००० ( पाच हजार) डबेवाले जवळजवळ २००००० ( दोन लाख ) डबे डिलीव्हरी करतात. म्हणजे प्रत्येक डबेवाला दररोज चाळीस डबे प्रत्येक घरातुन पिकअप करतो व जवळच्या स्टेशनवर ड्राँप करुन पुन्हा संध्याकाळी त्याच संध्याकाळी पुन्हा रिकामी आलेला डबा सकाळी जिकडुन डबा घेतला तिकडे पुन्हा रिटर्न करतो. असे हे बारा महीने करावे लागते. आपण हे वाचताना आपले हिशोबी मन विचार करत असेल की याचे चार्जेस किती. याचे चार्ज फक्त साडे तिनशे ते चारशे रुपये.म्हणजे दिवसाला जास्तीत जास्त फक्त पंधरा ते वीस . पंचवीस घेतले तरी डोक्यावरुन पाणी.मला सांगा जी मंडळी स्वतःच्या कार्यालयाच्या दरवाज्या पर्यंत डबा डिलीव्हरी घेतो तो माणूस किंवा व्यक्ती महीना कमीतकमी लाखभर पगार घेत असेल त्याच्या साठी दिवसा (पिकअप व ड्राँप डिलीव्हरी)पंचवीस काहीच नाही. आता त्यांची तुमच्या भाषेत H.R. system कशी ती समजवतो. दहा डबेवाले एका मुकादम च्या हाताखाली काम करतात. मुकादम हे पद त्याच्या अनुभवाने व चांगले काम केल्याने मिळते. पण पण…थांबा या मुकादमाला ईतर डबेवाल्यापेक्षा जास्त पगार असेल अस समजु नका कारण मुकादमाचा पगार पुर्वी डबे डिलीव्हरी करत असताना मिळत होता तेव्हढाच आणि महत्वाचे म्हणजे कोणी डबेवाला आजारी किंवा पुर्व सुचनेनुसार गैरहजर असेल तर या मुकादमाला त्या डबेवाल्याचे काम करावे लागते. लोकांची अडचण किंवा त्याला डबा न मिळाल्याने उपास घडु नये हे उद्दिष्ठ.

१८९० पासून जेव्हा ही डबेवाल्यांची मुंबई भर यंत्रणा राबवायला सुरवात झाली तेव्हापासून त्यांनी प्रत्येक डब्यावर त्यांना समजेल अशा कोडींग व चिन्हांचा वापर करायला सुरुवात केली त्यामुळे कुठलाही डबा हरवला असा प्रश्नच आला नाही.१८९० साला पासुन या मंडळींनी एकदाही संप केला नाही व यांच्यापैकी एकाच्याही नावावर पोलिस केस किंवा तक्रार नाही.

एखादा कस्टमरने फक्त दहा महीने यांच्याकडुन सेवा घेतली तर फक्त दहा महिन्याचे डिलीव्हरी चार्जेस देतो व दोन महिने सुट्टी घेतल्याने त्या दोन महिन्याचे पैसे देत नाही. आपण आपल्या शाळेतल्या स्कुल बससाठी पुर्ण बारा महीन्याचे पैसे देतो हे लक्षात घ्या.

आपण म्हणाल हे सगळे कसे परवडते. कारण यांचे या मागे असते समर्पण (Dedication). ही मंडळी जे ह्या प्रकारचे कार्य करतात ते अस समजुन काम करतात की कस्टमर माझा परमेश्वर ( विठ्ठल) आहे. त्याला दररोजचे जेवण पोचवण्याचं काम म्हणजे एक प्रकारची विठ्ठल सेवा. ही सगळी मंडळी विठ्ठलभक्त वारकरी असतात .याची दखल ब्रिटिश राजपुत्र प्रिन्स चार्ल्स ने जेव्हा घेतली तेव्हा “मुबंईचा डबेवाला” हा धडा जगातल्या मोठमोठ्या मँनेजमेंटच्या इन्स्टिट्यूट मधे शिकविण्यास सुरवात झाली. ब्रिटिश राज घराण्यात जेव्हा कधी लग्न कार्य असते तेव्हा मुबंईचे तीन चार डबेवाले त्या कार्यक्रमात यजमानासाठी आवर्जून मराठ मोळी पैठणीचा आहेर घेऊन हजर असतात.आता महत्वाचा प्रश्न आपल्या डोक्यात मस्त लेझीम खेळत असेल तो म्हणजे यांचे मासिक वेतन किती. एवढे सगळ कौतुक केल्या वर मला सागांयला लाज वाटते. कारण त्यांचे वेतन रुपये पाच हजार फक्त

©  श्री रत्नाकर दिगंबर येनजी

बांगुर नगर, गोरेगाव, मुबंई.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – ओढ गावाची, ओढ निसर्गाची ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

उगवतीचे रंग – ओढ गावाची, ओढ निसर्गाची ☆ श्री विश्वास देशपांडे

(माझ्या रंगसोहळा या पुस्तकातील लेख)

निसर्ग जेवढा आपल्या डोळ्यांनी आपल्याला बाहेर दिसतो, तेवढाच तो मनामनात खोलवर रुजलेला असतो. आपलं बालपण  गेलं, त्या ठिकाणच्या आठवणी या बहुतांशी निसर्गाशी निगडित असतात. कोणाला आपल्या गावातली नदी आठवते, कोणाला आपली शेत, त्या शेतातली झाडं , त्या झाडांशी निगडित असलेल्या अनेक आठवणी असं हे निसर्गचित्र तुमच्या आमच्या मनात पक्कं रुजलेलं असतं . ती  झाडं , ते पशुपक्षी तुमच्या आमच्या मनाच्या आठवणींचा एक कप्पा व्यापून असतात. आपल्याकडे निरनिराळ्या समारंभाचे फोटो काढलेले असतात. त्याचे विविध अल्बम आपण आठवणी म्हणून जपून ठेवतो. पण कधी कधी या फोटोंमधले रंग फिके होऊ लागतात. चित्र धूसर होतात. पण मनामधला निसर्ग मात्र पक्का असतो. त्याचे रंग कधीही फिके होत नाहीत. उलट जसजसे वय वाढत जाते,  तसतसे ते रंग गडद, अधिक गहिरे होत जातात. त्याचा हिरवा रंग मनाला मोहवीत असतो.

तुम्ही कामानिमित्त शहरात राहायला गेलेले असा, लॉकडाऊन मुळे घरात अडकलेले असा, तुमचा फ्लॅट, तुमचं घर छोटं असो की मोठं, तुमच्या मनात बालपणाचा तो निसर्ग ठाण मांडून बसलेला असतो. कोकणातून मुंबईत कामानिमित्त येणारे चाकरमानी, खेड्यापाड्यातून कामानिमित्त मुंबई पुण्याला स्थायिक झालेली माणसं ही सगळी वर्षातून एकदा तरी आपल्या गावी जायला मिळावं म्हणून केवढी आसुसलेली असतात. त्यांचं गाव, त्या गावातला निसर्ग त्यांना बोलावत असतो. त्याची ओढ असते. आणि तिथे गेल्यावर काय होतं  ? जणू जादू होते. शहरामध्ये दररोजच्या कामाने त्रासलेला तो जीव, तिथे गेल्यानंतर ताजातवाना होतो. जणू जादूची कांडी फिरते. काय विशेष असते त्या गावात असे ? पण ते विशेष त्यालाच माहिती असते, ज्याने तिथे आपले बालपण घालवलेले असते.   कवी अनिल भारती यांची ‘ खेड्यामधले घर कौलारू ..’ ही रचना पहा. किती साधे आणि सोपे शब्द.. ! पण त्यातला गोडवा किती कमालीचा…! मालती पांडे यांनी गायीलेलं हे गीत आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलंही असेल.

आज अचानक एकाएकी

मानस तेथे लागे विहरू

खेड्यामधले घर कौलारू.

पूर्व दिशेला नदी वाहते

त्यात बालपण वाहत येते

उंबरठ्याशी येऊन मिळते

यौवन लागे उगा बावरू

माहेरची प्रेमळ माती

त्या मातीतून पिकते प्रीती

कणसावरची माणिक मोती

तिथे भिरभिरे स्मृती पाखरू

आयुष्याच्या पाऊलवाटा

किती तुडविल्या येता-जाता

परि आईची आठवण येता

मनी वादळे होती सुरु.

अगदी साधे सोपे शब्द. पण त्या शब्दात ताकद केवढी ! जणू तुम्हाला त्या वातावरणात घेऊन जातात ते शब्द. शब्द आपल्याला वाटतात तेवढे साधे नसतात. त्यांना आठवणींचा गंध असतो. पहिल्या पावसाने माती ओली होते. एक अनामिक पण हवाहवासा वाटणारा गंध आपल्यापर्यंत पोहचवते. जसं आपण म्हणतो, फुलाला सुगंध मातीचा, तसाच मातीलाही स्वतःचा एक सुगंध असतो. तो सुगंध आणतात त्या पावसाच्या धारा. जसा मातीला गंध असतो, तसाच शब्दांनाही गंध असतो. आणि तो गंध अनेक आठवणी आपल्यासोबत घेऊन येतो.

वरच्या कवितेतलं दुसरं कडवं नदीशी संबंधित आहे. कुणीतरी असं म्हटलंय की ज्याच्या गावात नदी असते, त्याचं बालपण समृद्ध असतं . आणि ते खरंच आहे. नद्यांना केवढं मोठं स्थान आपल्या जीवनात आहे ! प्रत्येकाच्या गावातली नदी छोटी असेल किंवा मोठी, पण तिच्याशी त्याच्या अनेक आठवणी निगडित असतात. गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांची नुसती नावं घेतली तरी त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी आपल्याला आठवतात. कुठेतरी लग्नात गुरुजींनी म्हटलेले मंगलाष्टक आठवते. कुठे अलाहाबादचा त्रिवेणी संगम आठवतो. तसंही ज्याच्या त्याच्या गावातली नदी ही त्याच्यासाठी गंगेसारखीच पवित्र असते. जेव्हा लोक नासिकला जातात आणि गोदावरीत स्नान करतात, किंवा तिथे जाऊन येतात, तेव्हा मी गोदावरीवर गेलो होतो असं म्हणत नाहीत. मी गंगेवर गेलो होतो असंच म्हटलं जातं . ( उगवतीचे रंग – विश्वास देशपांडे )

या कवितेचं तिसरं कडवं बघा. गावाकडची ओढ का असते लोकांना ? तर ‘ माहेरची प्रेमळ माती..’ ही माती केवळ अन्नधान्य पिकवीत नाही. त्या मातीतून प्रीती म्हणजेच प्रेमही पिकतं. शेतातल्या कणसांना जे दाणे लागतात, ते माणिक मोत्यांसारखे मौल्यवान आहेत. आणि त्याच्याशी कवीच्या स्मृती निगडित आहेत. स्मृतींचं पाखरू जणू तिथं घिरट्या घालत असतं . आणि शेवटचं कडवं तर अप्रतिमच. आयुष्यात आपण सुख दुःखाच्या, संकटांच्या अनेक पाऊलवाटा तुडवतो. पण त्याचं फार काही वाटत नाही आपल्याला. पण जेव्हा आईची आठवण होते, मग ती आपली आई असो वा काळी आई म्हणजे शेती, तिची आठवण आली की मनात वादळे सुरु होतात. मन तिच्या आठवणीने आणि ओढीने बेचैन होते.

असा हा निसर्ग आपल्याला समृद्ध करीत असतो. त्याच्यात आणि आपल्यात एक अतूट नातं असतं . खरं म्हणजे आपणही निसर्गाचाच एक भाग असतो. पण आपलं अलीकडंच जीवनच असं काही झालं आहे, की ते नातं तुटायची वेळ जणू काही येते. आणि माणसाच्या जीवनातून निसर्ग वजा केला तर, काहीच शिल्लक राहणार नाही.

मला कधी कधी भीती वाटते ती पुढच्या पिढीची. जी शहरातून राहते आहे. आणि निसर्गाच्या या सुंदर वातावरणाला आणि अनुभवाला पारखी होते आहे. याचा बराचसा दोष आमच्याकडेही जातो. आम्ही लहानपणी जी नदी पाहिली , अनुभवली ती आता आम्ही आमच्या मुलांना, भावी पिढीला अनुभवायला देऊ शकू का ? आम्हाला जसा निसर्गाचा लळा लागला, तसा त्यांना लावता येईल का ? त्यांच्या चार भिंतीच्या पुस्तकी शिक्षणात निसर्ग शिक्षणाला स्थान असेल का ? पुस्तकातल्या माहितीवर जशी आम्ही त्यांची परीक्षा घेतो, तशी त्यांना निसर्गज्ञान, निसर्ग अनुभव देऊन घेता येईल का ? त्यांना जंगलं , प्राणी, पक्षी हे अनुभवायला देता येतील का ?  मोबाईल, टीव्ही, सिनेमे, पुस्तके यांच्यापलीकडेही एक वेगळे जग अस्तित्वात आहे याची जाणीव आम्हाला त्यांना करून देता येईल का ? सध्या तरी या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. त्यासाठी वेगळे स्वतंत्र प्रयत्न करावे लागतील. अन्यथा पर्यावरण दिवस, वसुंधरा दिन इ साजरे करून आपण आपल्या मनाचे समाधान फक्त करून घेऊ.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र- निघताना बाबांनी त्यांचे आशिर्वाद म्हणून दिलेला तो छोटासा कागदी फोटो म्हणजे पिवळ्या धमक रंगाचं जरी काठी सोवळं नेसलेलं, हसतमुख, प्रसन्न मुद्रा असलेलं दत्तरूप होतं. आज इतक्यावर्षांनंतरही तो फोटो मी माझ्याजवळ जपून ठेवलाय. आजही त्याचं दर्शन घेतो तेव्हा ‘तो’ माझ्याजवळ असतोच आणि त्याच दत्तरुपाशी निगडित असणारी माझ्या बाबांची त्या क्षणीची ही आठवणसुद्धा!)

आईबाबांचा निरोप घेऊन मी निघण्यासाठी वळलो. बाहेर पडलो. आई मला निरोप द्यायला दारापर्यंत आली…

“जपून जा. गेल्यावर पोचल्याचं पत्र टाक लगेच. सांभाळ स्वत:ला…” तिचा आवाज भरून आला तशी ती बोलायची थांबली. मी कसंबसं ‘हो’ म्हंटलं.. आणि चालू लागलो. आता क्षणभर जरी रेंगाळलो तरी हे मायेचे पाश तोडून जाणं कठीण जाईल याची मला कल्पना होती.

माझा लहान भाऊ शाळेत गेलेला होता. मोठा भाऊ बँकेत मॅनेजरना सांगून मला बसमधे बसवून द्यायला आला होता.

“कांही अडचण आली, तर माझ्या ब्रँचच्या नंबरवर मला लगेच फोन कर” तो मनापासून म्हणाला. एरवी अतिशय मोजकंच बोलणारा तो. पण त्याचं  प्रेम आणि आधार मला त्याच्या कृतीतून जाणवायचा. आम्हा दोघात सव्वा दोन वर्षांचं अंतर. त्यामुळे माझ्या अजाण वयात माझ्याशी माझ्या कलानं खेळणारा माझा हक्काचा जोडीदार तोच. तो पहिलीत गेला तेव्हा हट्ट करून मीही त्याच्या मागे जाऊन वर्गात बसलो होतो.आई रोज त्याचा अभ्यास घ्यायची, तेव्हा त्याच्याबरोबर मीही अभ्यासाला बसायचो. पहिली आणि दुसरी अशी दोन वर्ष मी त्याच्याजवळ रोज वर्गात जाऊन बसत दोन इयत्ता एकदम करुन त्याच्याबरोबर थेट तिसरीतच प्रवेश घेतला होता. पूर्वी हे सगळे अधिकार मुख्याध्यापकांकडे असल्याने माझी वेगळी परीक्षा घेऊन मला थेट तिसरीत प्रवेश मिळाला होता. पुढे पूर्वीच्या एसएससी म्हणजे ११ वी पर्यंत आम्ही दोघेही एकाच वर्गात एकाच बाकावर बसून शिकलो. त्यामुळे आम्ही दोघे सख्खे भाऊ वर्गमित्रही. परिस्थितीवशात हेच त्याच्यावर खूप मोठा अन्याय करणारं ठरलं होतं. तो माझ्यापेक्षा खूप हुशार असूनही माझे नोकरीचे वय नसल्याने मी पुढे शिकू शकलो आणि तो मात्र आम्हा सर्वांसाठी शिक्षण तिथंच थांबवून मिळेल ती नोकरी करीत भटकंती करत राहिला. त्याची सुरुवातीची अशी कांही वर्षें संघर्ष आणि तडजोडीत गेल्यानंतर एस् एस् सी मधल्या चांगल्या मार्कांमुळे त्याला नुकताच स्टेट बँकेत जॉब मिळाला होता. तरीही आम्हा सर्वांच्या जबाबदारीमुळे त्याचा त्यावेळचा सुरुवातीचा सगळा पगार घरखर्चासाठीच संपून जायचा. तरीही त्या वयातल्या स्वतःच्या हौसामौजा बाजूला ठेवून तो हे मनापासून करीत राहिला. मला आठवतंय, पगार झाला की तो स्वतःसाठी अगदी मोजके पैसे ठेवून बाकी सगळे आईकडे घरखर्चासाठी द्यायचा. मी इस्लामपूरला रहायला गेल्यानंतरच्या त्याच्या पगाराच्या दिवशी त्याने मला बाजूला बोलवून घेतले आणि स्वतःसाठी ठेवून घेतलेल्या दहा रुपयातले पाच रुपये माझ्या हातावर ठेवले.

“हे काय? मला कशाला? नको” मी म्हणालो.

“असू देत”

“पण का?.. कशासाठी? मला लागलेच तर मी घेईन ना आईकडून. आणि तसेही मी इथे असताना मला कशाला लागणारायत?”

त्याला काय बोलावं सूचेना. त्यानं मला आधार दिल्यासारखं थोपटलं. म्हणाला,

“नाही लागले, तर नको खर्च करूस. तुझे हक्काचे म्हणून वेगळे ठेव. कधीतरी उपयोगी पडतील.”

खरंतर म्हणूनच माझं मुंबईला जायचं ठरलं तेव्हा माझ्या भाडेखर्चाची जुळणी करायचा विषय निघाला तेव्हा त्यानेच दर महिन्याला मला दिलेले ते पैसे खर्च न करता मी साठवलेले होते, ते त्याला दाखवले.

“हे पुरेसे आहेत अरे.वेगळी तजवीज कशाला?”मी म्हंटलं.तो अविश्वासाने बघत राहिला होता..!

त्याचेच पैसे बरोबर घेऊन मी आज मुंबईला निघालो होतो.

त्याचा हात निरोपासाठी हातात घेतला, तेव्हा हे सगळं आठवलं न्  माझे डोळे भरून आले.

रात्रभरच्या संपूर्ण बस प्रवासात मी टक्क जागा होतो. न कळत्या वयापासूनच्या या अशा सगळ्या आठवणी मनात गर्दी करत होत्या. रात्र सरेल तसा मनातला हा अंधारही दूर होईल असं वाटलं.’सगळं सुरळीत होईल. काळजी करू नको ‘ घर सोडतानाचे बाबांचे हे शब्द आठवले आणि मनातलं मळभ हळूहळू दूर झालं.

मुंबई मी पूर्वी कधी पाहिलेलीही नव्हती. माझं असं ध्यानीमनी नसताना मु़बईला येणं  माझ्या आयुष्यातल्या निर्णायक वळणावर मला घेऊन जाणाराय याची त्याक्षणी मला कल्पना कुठून असायला?पण यानंतर घडणाऱ्या घटनांची पावलं सूत्रबध्दपणे त्याच दिशेने पडत होती हे आज मागे वळून पहाताना मला लख्खपणे जाणवतंय.आणि या जाणिवांमधेच ‘त्या’च्या दत्तरुपातल्या आस्तित्वाच्या दिलासा देणाऱ्या गडद सावल्याही मिसळून गेलेल्या आहेत!

मुंबईतलं सुरुवातीचं माझं वास्तव्य अर्थातच माझ्या मोठ्या बहिणीच्या बि-हाडी दादरलाच होतं.त्यामुळे माझं ‘घरपण’ शाबूत होतं!एकच रुखरुख होती ती म्हणजे माझ्या बालवयापासून इतकी वर्षं विनाविघ्न सुरु असलेल्या दत्तसेवेत मात्र खंड पडणार होता. एरवीही ते तसं सगळं इथं शक्यही नव्हतंच.इथं  गुरुचरित्राची ती पोथी नव्हती.बाबांना मिळालेल्या प्रसाद पादुका नव्हत्या. ही सगळी हरवलेपणाची भावना मनात घर करू लागली. पहिल्या दिवशी  आंघोळ होताच मी तिथल्या देवघरातल्या दत्ताच्या तसबिरीकडे पाहून हात जोडले. अलगद डोळे मिटले. पण मिटल्या डोळ्यांसमोर ती तसबिरीतली दत्तमूर्ती साकार झालीच नाही. अंत:चक्षूंना दिसू लागलं होतं, बाबांनी मला दिलेल्या फोटोतलं पिवळ्या धमक रंगाचं जरीकाठी सोवळं नेसलेलं, लालचुटूक रंगाचं उपकरण घेतलेलं हसतमुख, प्रसन्नमुद्रा असणारं ते दत्तरुप!! त्याच्या नजरेचा स्पर्श होताच मनातली कांहीतरी हरवलेपणाची भावना खालमानेनं निघून गेली!

एक-दोन दिवस असेच गेले. मग एक दिवस रात्री माझी बहीण आणि मेहुणे दोघांनीही मला दुसऱ्या दिवशी मुंबईतल्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमधे जाऊन माझं नाव नोंदवून यायला सांगितलं. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ऑफिस कुठे आहे, तिथे किती नंबरच्या बसने, कोणत्या दिशेला कसे जायचे हे सगळे समजावूनही सांगितलं. मुंबईत कुणीही बरोबर नसताना एकट्यानेच हे सगळे करायचे याचं दडपण होतंच शिवाय मला त्याची काही गरजच वाटत नव्हती. कारण माझी स्टेट बँकेच्या टेस्ट इंटरव्ह्यूमधून नुकतीच निवड  झाली होती. फक्त पोस्टिंग व्हायला काही दिवस वाट पहायला लागणार होती. थोडा उशीर झाला तरी अनिश्चितता नव्हती. शिवाय तोपर्यंत एका खाजगी नोकरीच्या बाबतीत मेव्हण्यांनी स्वतःच बोलणीही पक्की करत आणली होती. असं असताना एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमधे नाव कशाला नोंदवायचं असंच मला वाटत होतं.

“नाही..नको.आता त्याची काय गरज आहे?” मी म्हणालो.

“हे बघ. आता गरज नाहीय असं वाटलं तरी अचानक गरज उद्भवलीच तर? त्यानंतर नाव नोंदवायचं म्हटलं तर वेळ हातातून निघून गेलेली असेल. आत्ता मोकळा आहेस तर ते काम उरकून टाक.त्यात नुकसान तर कांही नाहीये ना? हवं तर मी रजा घेऊन येतो तुझ्याबरोबर.”मेव्हणे मनापासून म्हणाले. ‘ते माझ्या हिताचंच तर सांगतायत. त्यांना विरोध करून दुखवायचं कशाला?’असा विचार करून मी ‘ एकटा जाऊन नाव नोंदवून यायचं कबूल केलं.

प्रत्येकाला भविष्यात घडणाऱ्या विविध घटना, त्यांचा घटनाक्रम, त्यांचं प्रयोजन..हे सगळं पूर्णत: अज्ञातच तर असतं. पण घडणारी प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग विनाकारण घडत नसतोच. त्याला कांही एक कार्यकारणभाव असतोच. माझ्या बहिण आणि मेव्हण्यांचं मला एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधे नाव नोंदवायला प्रवृत्त करणंही याला अपवाद नव्हतं. कारण नंतर पुढे घडणाऱ्या सगळ्याच अनपेक्षित घटना त्या त्या वेळी नकारात्मक परिणाम करणाऱ्या असल्या तरी त्यांतून मला अलगद बाहेर काढण्यासाठीचं ‘त्या’नेच माझ्यासाठी केलेलं हे नियोजन होतं याचा थक्क करणारा प्रत्यय मला लवकरच येणार होता!

ते सगळंच अघटीत वेळोवेळी मला कडेलोटाच्या काठावर नेऊन उभं करणारं,माझी कसोटी पहाणारं ठरणार तर होतंच आणि माझ्या मनातलं ‘त्या’चं स्थान अधिकाधिक दृढ करणारंही!

क्रमश:.. (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ २१मे… आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त — चहा – अमृततुल्य पेय – भाग-२ ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?  विविधा ?

☆ २१मे… आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त — चहा – अमृततुल्य पेय – भाग-२ ☆ सुश्री त्रिशला शहा 

(त्यात परत अजून गोळी चहा,डस्ट,चाॅकलेट, ग्रीन टी ,लेमन टी हे ही उपप्रकार आहेतच)…

काही हाँटेल्समध्ये तर चहाला वेगळे नाव देऊन तो प्रसिद्धीस उतरवलाय.पुण्यामध्ये ‘अम्रुततुल्य चहा ‘  प्रसिद्ध आहे तर सांगलीमध्ये  ‘ हरमन चहा ‘म्हणून प्रसिद्ध आहे.याशिवाय ‘ मटक्यातील चहा ‘सुध्दा नावारुपाला येतोय.

चहा कसा प्यायचा यातही खूप गमतीदार प्रकार आहेत.पूर्वी किंवा अजूनही काही ठिकाणी  खेड्यामध्ये,झोपडीत चुलीवर साखरेऐवजी गुळ घालून चहा केला जातो.चहा पिण्यासाठी कपाचा वापर केला जातो.कपभर चहा किंवा चहाचा कप ही संकल्पना यामुळेच रुजली असेल.पण व्यक्ती आणि स्थान परत्वे चहा पिण्याच्या साधनात पण बदल होत गेला.पुर्वी किंवा आजही काही लोक चहा पिण्यासाठी कपबशीचा वापर करतात,पण आता मात्र या कपबशीची जागा ‘ मग ‘ ने घेतली आहे.बशी न देता नुसत्या मगमधून चहा देण्याची फँशन आली आणि ती रुढही झाली.वेगवेगळ्या रंगांचे,डिझाईनचे मग बाजारात उपलब्ध आहेत.त्याही पुढे जाऊन आता थर्माकोलचे युज अँड थ्रो वाले मग लोकांच्या पसंतीस उतरले आहेत.विशेषतः समारंभात, टपरीवर अशा कपांचा वापर केला जातो.

उत्साह वाढविणार पेय म्हणून चहाकडे पाहिल  जात असल तरी या चहाच्या अतिरिक्त सेवनाने त्याचे दुष्परिणाम सुध्दा दिसून येतात. चहा पिण्यामुळे बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो.चहा खरतरं दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी घेतला जातो.पण काही जण दिवसातून तीन चार वेळा चहा घेतात.शिवाय घरात कुणी पाहुणा आला तर त्यांना कंपनी म्हणून, आँफिसमध्ये काम करताना उत्साह वाटावा म्हणून चहा घेत रहातात.दिवसातून दहा कप चहा पिणारे सुध्दा काही लोक आहेत.इतका चहा पिण्याने भूक मरते,जेवणावर परिणाम होतो हे लक्षातच घेत नाहीत.शरीरात उष्णता वाढते,पित्त वाढते हे बरेचजण विसरतात. आयुर्वेदात तर चहा पिणे वर्ज्य आहे असे म्हणतात. चहा  कधीही नुसता न पिता त्याबरोबर काहीतरी खावे म्हणजे त्याचा फारसा त्रास जाणवणार नाही.

चहाबद्धल कितीही चांगल्या वाईट समजूती असल्या तरी ते एक उत्साह वाढविणारे तसेच मैत्री वाढविणारे पेय आहे हे नक्कीच.

 – समाप्त –

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ २१मे… आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त — चहा – अमृततुल्य पेय – भाग-१ ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?  विविधा ?

☆ २१मे… आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त –☕ चहा ☕- अमृततुल्य पेय – भाग-१ ☆ सुश्री त्रिशला शहा 

“काय बाई तरी, त्या मालतीबाईंच्या घरी गेले, तर साधा चहासुध्दा विचारला नाही “, ” चहाला या बरं का घरी, ” ” पावणं चला जरा च्या घेऊ”, ” झालं का चहापाणी?”, मालक, जरा च्या-पान्याच बघा की ”  मंडळी या सगळ्या बोलण्यातून एकच शब्द वारंवार येतोय आणि तो म्हणजे  ‘ चहा’. या सगळ्यामध्ये महत्वाचे जाणवते ते म्हणजे आपुलकीची जाणीव. एकमेकांच्या मैत्रीतला दुवाच जणू या चहाने जपलाय. या चहामुळे अनेक नाती जोडली जातात, शिवाय अनेक कार्यक्रम, मिटींग यांची सांगता चहापानाने होते.

भारत आणि आता काही प्रमाणात परदेशात सुध्दा ‘चहा’ एक अनमोल पेयच बनून राहिले आहे. कोणत्याही ऋतुमध्ये, कोणत्याही वेळी चहा प्यायला चालतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, आजारी व्यक्ती, स्त्री-पुरुष, देशविदेशातील व्यक्ती यातील कुणालाही चहा पिणं वर्ज्य नाही. झोपून उठल्यावर, कामाचा शीण जावा म्हणून, मित्रांनी आग्रह केला म्हणून, अभ्यास करताना, ड्रायव्हिंग करतान झोप येऊ नये म्हणून, खूप थंडी आहे म्हणून, डोक दुखतयं म्हणून, टाईमपास, पाहुणचार म्हणून यातील कोणतेही कारण चहा पिण्यास पुरेसे आहे.

पूर्वी  चहा पावडरची एक जाहीरात रेडिओ वर लागायची ” अवं सुवासिनीनं कुकवाला आन् मर्दानं चहाला नगं म्हणू नये”. म्हणजे इथेसुध्दा चहाला एक मानाचं पेय म्हणून प्रसिध्दी, दर्जा मिळवून दिला गेलाय हे लक्षात येत. तस अगदी साध वाटणारं चहा नावाच हे पेय म्हणजे पाणी, दूध, साखर आणि चहापावडर भांड्यात  एकत्र करुन  गँसवर उकळलेल एक  पेय आणि ते गरम पिण्याचीच मजा. यामध्ये मग काहीजण आलं, वेलची, गवती चहा, चाँकलेट पावडर, चहाचा मसाला असे आपल्या आवडीनुसार चहात घालतात, तर काहीजण कच्चे दूध घालतात, काहीजण पाणी न घालता नुसते दूध वापरतात. दुधाऐवजी लिंबू टाकून काहीजण पितात. अशा कितीतरी प्रकारे चहा प्याला जातो. काही हाँटेल्स किंवा टपऱ्या, गाडे या निव्वळ चहासाठी प्रसिद्ध आहेत. तिथे तर चहाचे अजून वेगळे प्रकार पहायला मिळतात. विशेषतः टक्कर चहा, कटिंग चहा, स्पेशल चहा, साधा चहा, गुळाचा चहा इत्यादी.

प्रत्येकाच्या चहा पिण्याच्या पध्दती पण वेगवेगळ्या. कुणाला जास्त साखरेचा गोड चहा लागतो तर कुणाला चहापावडर जास्त टाकलेला, कुणाला एकदम फिक्का तर कुणाला बिन दुधाचा, कुणाला फक्त दुधाचा तर कुणाला मसाल्याचा. प्रत्येकाची चहा पिण्याची पध्दत वेगळी काहींना एकदम गरम चहा लागतो, काहींना थोडा थंड आवडतो, काहींना चहात दुधाची साय घातलेली आवडते. अर्थात चहा पिण्याच्या कितीही वेगळ्या पध्दती असल्या तरी चहा पिण्याची एक तल्लफ असते आणि तो त्याचवेळी प्याला तर त्याची लज्जतही वाढते हे खरचं.

चहा बनविण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या चहा पावडरमध्येसुध्दा खूप प्रकार आहेत. त्यामध्ये सध्या प्रसिद्ध असलेले म्हणजे जी. एस् चहा, रेड लेबल, ब्रुकबाँड, सोसायटी, ताजमहल, गिरनार, वाघ बकरी, सरस्वती, अग्नी, लाँयन, मगदूम चहा, फँमिली मिक्श्चर चहा असे कितीतरी प्रकार उपलब्ध आहेत. त्यात परत अजून गोळी चहा, डस्ट, चाँकलेट, ग्रीनटी, लेमनटी हेही उप प्रकार आहेतच.

क्रमशः…

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पाहिल्याने प्रदर्शन… ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ पाहिल्याने प्रदर्शन… ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

बालपण ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. बालपणीचा काळ हा जीवनातला अत्यंत आनंदाचा, नवीन गोष्टी शिकण्याचा आणि संस्कार करण्याचा महत्वाचा काळ. ‘बालपण’ जगातल्या सर्व देशात, सर्व काळात आहे. म्हणूनच लहान मुलांच्या करमणूकीसाठी रंगीबेरंगी साधने व उपकरणे जगात सर्वत्र आढळतात. अगदी अश्मयुगापासून ती तयार होत असल्याचे अनेक पुरावे उत्खननात सापडले आहेत. ही साधने म्हणजेच खेळणी, त्या त्या युगाची संस्कृती सांगतात. या खेळण्यांतून लोकजीवन कळते.

विटी-दांडू, सागरगोटे, गोट्यां, ठीक-या, लगोरी आणि भातुकली हे आपले पारंपारिक खेळ. लहान मुलींची बाहुली त्यात आलीच. ‘बाहुली’ हे जगभरातलं समान खेळणं. मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृतीत, शृंगकाळात, कुशाणकाळात व गुप्त काळातल्याही बाहुल्या होत्या. भारतात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश या प्रांतात मुली भातुकली मांडून बाहुला-बाहुलीचं लग्न लावतात. शिवाय काही ठिकाणी तर मुलीच्या लग्नात  बाहुल्या, भातुकलीची भांडी अशा वस्तू आंदण म्हणून देण्याची प्रथा आहे. जेणे करून मुलामुलींनी प्रत्यक्ष संसाराला लागण्यापुर्वी ती भांडी हाताळावीत, अनुभवावीत.म्हणजे भविष्य काळात किचन कसे हाताळायचे याची ही रिहर्सल असायची. प्रत्येक राज्यातल्या बाहुलीचं नाव वेगळं. बंगालची असते कालीचंडिका, राजस्थानची गंगावती तर महाराष्ट्राची आपली ठकी. या बाहुल्या नुसताच एक खेळ नसून या बाहुल्यांवरून त्या त्या प्रांताची परंपरा, पोषाख, संस्कृती यांचा इतिहास कळतो.           

दिल्ली येथे ४,नेहरू हाउस, बहादूरशहा जफरमार्ग,दिल्ली,११०००२. (वेळ-स.१०ते सायं ६) येथील शंकर्स इंटरन्याशनल डॉल्स म्युझिअम मध्ये जगातल्या सुमारे ८५ देशातल्या ६५०० बाहुल्या पाहायला मिळतात. भारतीय पोशाखातील १५० प्रकारच्या बाहुल्या, भारतीय नृत्यप्रकार कथ्थकलीच्या संपूर्ण कोस्च्युम्ससहित बाहुल्या. जपान मध्ये मुले आणि मुलींसाठी वापरणा-या बाहुल्या, इंग्लंडच्या राणीच्या संग्रहातील रेप्लीका डॉल, हंगेरीच्या मेपोल, जपानच्या सामुराई डॉल, थायलंडचा वूमेन ऑर्केस्ट्रा अशी जगाच्या कानाकोप-यातून आणलेल्या आणि भेट म्हणून मिळालेल्या बाहुल्यांची विविध रूपे आहेत.

१९६५ मध्ये राजकीय व्यंगचित्रकार के.शंकर पिल्लई(१९०२-१९८९) यांच्या कलेक्शन मधून भारतातले हे खूप मोठे प्रदर्शन उभे राहिले आहे.यात हाताने बनवलेल्या विविध पेहरावातल्या असंख्य प्रकारच्या बाहुल्या लहान मुलांचे बालपण तर दाखवितातच परंतु विविध देशांमधील विविध काळातील संस्कृती, डिझाईनचे नमुने, दाग-दागिने, अशी अभ्यासपूर्ण कलाकुसर पाहायला मिळते. युरोपिअन देश, एशियन देश, मध्य पूर्व देश, अफ्रिका आणि भारत या प्रांतातल्या सुंदर बाहुल्या इथे पहायला मिळतात. अशा प्रकारची प्रदर्शने खूप माहिती देत असतात. असंच दुसरं महाराष्ट्रातील भातुकलीच फिरतं प्रदर्शन आपल्या मागील पिढ्यांचा वारसा सांगतं.

भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे इथली कुटुंबपद्धती, परंपरा चालीरीती इत्यादी होत, त्यामुळे आपल्या संस्कृतीचा पाया भक्कम. ‘भातुकली’ या चिमुकल्या संसारात या सर्व संस्कृतीचं प्रतिबिंब  पाहायला मिळतं. भातुकलीचा खेळ बाजारात कुठेही मिळतो. पण, आज भातुकली खेळायला मित्रांची, भावंडांची कंपनीच नाही आणि मुलांना व पालकांना वेळही नाही.  काळाच्या ओघात चौसोपी वाडे जाऊन घरे झाली, घरे जाऊन आज इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे वन बीएचके, टू बीएचके मध्ये जागाही कमी झाली. प्लास्टिकचा जमाना. युज अॅंड थ्रो पद्धत, शिवाय गरजाही बदलल्या. त्यामुळे जुनी, पारंपारिक भांडी, वस्तू जपून ठेवायला जागाच नाही. मुलांच्या खेळण्यांना तर थाराच नाही. आमच्या वेळचा भातुकलीचा संसार आम्ही सांभाळून ठेवू शकलो नाही ही खंत आज वाटते. मला वाटतं ही सर्वांचीच खंत असणार. पण आपल्या आजच्या पिढीला, पुढच्या पिढीला ही संस्कृती, हा वारसा, परंपरा, इतिहास समजावा म्हणून काही छंद जोपासणारे ,संग्राहक अशा वस्तूंचा संग्रह करतात. पुण्याच्या विलास करंदीकर यांचा भातुकलीच्या संग्रहाचा खटाटोप आहे.

ही संस्कृती, हे संस्कार जपले जावेत, तुमच्या आमच्या घरातल्या काळाच्या पडद्याआड गेलेल्या वस्तूंची माहीती व्हावी, परंपरेची ओळख व्हावी या उद्देशाने करंदीकर आपल्या भातुकलीचं प्रदर्शन भरवतात. ‘भातुकली म्हणजे करंदीकरच’ हे समीकरण पुणेकरांना ठाऊक आहे. कारण झाडून सर्व पुणेकर इतिहासप्रेमी, परंपरा व वारसा जतन करणारे. योगायोगाची गोष्ट म्हणजे करंदीकरांच्या पुढच्याच गल्लीत राजा केळकर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचं संग्रहालय आहे. जे कै. दिनकर केळकर यांच्या वैयक्तिक छंदातूनच निर्माण झालेलं आहे. विलास करंदीकरांचं ‘भातुकली’ प्रदर्शन हेदेखील वैयक्तिक छंदातूनच साकारलंय. परंतु मुख्य फरक आहे ‘भातुकली’ हे प्रदर्शन फिरतं, चालतं बोलतं आहे आणि या संग्रहातल्या पारंपारिक वस्तूंशी आपला थेट संबंध आहे. ते पाहताना अरे ही तर आपण खेळलेली भांडीकुंडी, चूल बोळकी आहेत. मग आपण मुलामुलींना, भाच्या पुतण्यांना, नातवंडांना “आमच्यावेळी हे असं होतं” हे सांगताना, त्या वस्तू प्रत्यक्ष दाखविताना, केवढा आनंद होतो. अशा या भातुकली प्रदर्शनातील भांड्यांच्या इतिहासाचे साक्षीदार आपण स्वतःच असतो.

करंदीकर यांच्या या चिमुकल्या संसारात ३००० भांडी आहेत. ती पितळी, स्टील, तांबे, लाकूड, दगड, सिमेंट, कापड, माती आणि चांदीची सुद्धा आहेत. भांड्यांच्या छोट्या प्रतिकृती अगदी हुबेहूब. छोटी असूनही प्रत्यक्ष वापरता येणारी भांडी आहेत. यातला तांब्याचा छोटा बंब पेटवून पाणी गरम होतं, स्टोव्ह पेटवून चहा करता येतो, चकलीच्या सोऱ्यातून चकली करता येते. हापशीतून धो-धो पाणी पडते.या संग्रहात वसुदेव प्याला, संपूट, दिव्याच्या समया, गंगेचे भांडे,  तिर्थोटी, आड-रहात, दगडी डोणी, अग्नीहोत्र पाट, बंब, दूधदूभत्याचं  कपाट, चुली व शेगड्यांचे,  भांड्याचे  अनेक प्रकार, भाताच्या भत्त्या,  वेड्भांडे,  शकुंतला भांडे,  रुबवटा,  ठेचणी या घरातून  हद्दपार झालेल्या वस्तूंबरोबरच मोक्षपट,  गंजीफा, सारीपाट, सागरगोटे, गुंजा असे पारंपारिक  खेळही आहेत. तसेच  देवपूजेची भांडी, प्रवासाची साधने यांचाही इतिहास कळतो. या प्रदर्शनात भर पडली ती चांदीच्या भातुकलीची. 

१९९० मध्ये जुन्या वाड्याच्या नूतनी करणा पासून हा संग्रह सुरु झाला.हळू हळू २६८ भांडी झाली.त्याचं पाहिलं प्रदर्शन पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात मे १९९८ मध्ये भरलं.आता पर्यंत महाराष्ट्रात व बाहेर  १५० च्या वर प्रदर्शने झाली.प्रत्येक वेळी त्यांच्या संग्रहात नवी भर पडत आहे. प्रदर्शन बघायला ९१ वर्षांच्या आजी, त्यांची ६६ वर्षांची मुलगी, तिची ३५ वर्षांची सून व तिची ६ वर्षांची मुलगी अशा चार पिढ्या एकाच वेळी येतात तेव्हा त्या आजींना त्यांचं  बालपण आठवतं ,तर पणतीला पणजीच्या वेळच्या भांड्यांच कौतुक वाटतं.

अशी ही भातुकली. म्हटलं तर लहान मुलांचाच खेळ. पण त्यांच्या जीवनातील हा महत्वाचा टप्पा. खेळ त्यांच्या मानसिक वाढीला पोषक असतात. खेळणी मुलांची नुसतीच करमणूक करत नाहीत. त्यांच्यात जिज्ञासा निर्माण करतात. त्यांची कलात्मक प्रवृत्ती वाढवितात. या खेळातून त्यांना एकमेकांबद्दल प्रेम, ओढ, मन जपण्याची, सहकार्याची, कर्तव्याची अशा मानवी नातेसंबंधातल्या भावभावनांची, जीवनातल्या मूल्यांची शिकवण मिळत असते. खेळ म्हणजे बिनभिंतींची शाळाच असते. 

लुटूपूटूच्या संसारात ही मुले कधी आई-बाबा होतात, कधी डॉक्टर, तर क्षणात शाळाशाळा खेळतात. क्षणात भूक लागते. दुसऱ्याच क्षणाला विद्यार्थी झालेली ही मुलगी आई होऊन स्वयंपाक करते. सर्वांना समाधानाने जेवू घालते. असं हे बालविश्व.  या आपल्या आठवणींना हे प्रदर्शन उजाळा देतं. अशी संग्रहालये आणि प्रदर्शने मनोरंजना बरोबरच ज्ञान देतात. पालकांनी आणि शिक्षकांनी अशांची दखल घेतली पाहिजे. ती मुलांना आवर्जून दाखवली पाहिजेत. कित्येकदा आपल्याच शहरातलं एखादं संग्रहालय सुद्धा आपल्याला माहिती नसतं किंवा ते महत्वाचही वाटत नसतं. पालकांच्याच मानसिकतेवर मुलांची मानसिकता अवलंबून असते. तेव्हा ही दोन्ही प्रदर्शने मुलांना जमेल तशी, जमेल तेंव्हा अवश्य दाखवा. पर्यटन किंवा सहलीला गेलात तर तिथल्या म्युझियमला नक्की भेट द्या.    

© डॉ. नयना कासखेडीकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्री सक्षमीकरणाचे उदाहरण….!!! ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🔅 विविधा 🔅

स्त्री सक्षमीकरणाचे उदाहरण….!!! सुश्री शीला पतकी 

वीस बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मी सेवासदन शाळेमध्ये कार्यरत होते साधारण जून महिन्याच्या आसपास एक मध्यमवयीन महिला माझ्याकडे आली आणि म्हणाल्या बाई माझा मुलगा आपल्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता तो दोन महिन्यापूर्वी वारला मला जरा धक्काच बसला कारण मुलगा अगदी तरुण होता 23 24 वर्षांचा त्यावर त्या बाई म्हणाल्या त्याची बायको वीस वर्षाची आहे तिचे काय करावे मला समजत नाही मी म्हटलं किती शिकली आहे ?त्या म्हणाल्या आठवी नापास झालीय… कारण घरामध्ये सावत्र आईचा त्रास होता त्यामुळे शाळेत जाऊ शकत नव्हती मग भावाची मुलगी म्हणून मी माझ्या मुलाला करून घेतली पण दुर्दैवाने एका वर्षातच हे असे घडले पोरगी देखणी आहे वयाने लहान आहे मी कामाला जाते घरात माझा तरूण मुलगा आहे म्हणजे तिचा दीरआहे मला काही सुचत नाही मी काय करू मी म्हणाले बाई शिकवा मुलीला शिक्षण द्या शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही धुणेभांडे करत ही मुलगी गेली तर तिच्यावर अनेक आपत्ती येऊ शकतात… मुलगी खरोखरच दिसायला खूप सुंदर होती. गोरा पान रंग बोलके डोळे लांब केस छान उंची बांधा हे सगळं सौंदर्य आता बाधक ठरणार होते .मी म्हणाले हिला शिकवा त्या म्हणाल्या आता कुठे शाळेत पाठवणार …मी म्हणाले माझ्या शाळेत पाठवा..

नापास मुलांच्या ..तिथे तिला आपण दहावी करून घेऊ आणि मग पुढचा मार्ग हुडकू….. त्यावेळेला आठ हजार रुपये फी होती मी त्यांना सांगितले 8000 रुपये फी भरावी लागेल त्या म्हणाल्या माझ्याकडे एवढे पैसे नाहीत मी म्हणाले फुकट शिक्षणाची किंमत नसते मी तुम्हाला एक मार्ग सुचवते… त्यावेळेला माझ्याकडे बालवाडीला सेविका हवीच होती मी त्यांना एक मार्ग सांगितला की सकाळी  8 ते 11 बालवाडीला सेविका म्हणून तीने काम करावे साडेअकराला शाळेत बसावे साडेपाचला शाळा सुटते जाताना परत साफसफाई करून तिने घरी जावे मी महिना तिला पाचशे रुपये देईन आणि हे पाचशे रुपये फी म्हणून ते कट केले जातील याप्रमाणे तिची काही रक्कम होईल त्यामध्ये मी थोडीशी भर घालून तिची ही भरेन फॉर्म फी मात्र तुम्हाला भरावी लागेल त्यांना ते पटलं पण आठवी नापास झालेली मुलगी चार वर्षानंतर दहावी पास होईल याबद्दल मात्र त्या साशंक होत्या मी त्यांना दिलासा दिला ही माझी जबाबदारी आहे तुम्ही काळजी करू नका त्या म्हणाल्या.. तुमच्या पदरात लेक म्हणून टाकते आहे तुम्ही सांभाळा मी म्हणाले हरकत नाही आता ती माझी जबाबदारी आहे याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली मुलगी हुशार होती कामाला चपळ होती एकही दिवस शाळा बुडवायची नाही ठरलेलं होतं त्यामुळे शाळेला सुट्टी नाही काम उत्तम व नेटके करत होती अभ्यासाची गोडी वाढली अनेक शिक्षकांनी  आमच्या तिला प्रोत्साहन दिले त्यामुळे मुळात ती संस्थेत रमली थोडा वेळ मिळाला तरी अभ्यास करत बसायची परिस्थितीची जाणीव तिला उत्तम झाली होती या पद्धतीने तिचा अभ्यास सुरू झाला. पहिल्या चाचणीत तिला उत्तम गुण पडले तिचा उत्साह वाढला मुलगी खरंच हुशार होती पण खेडेगावात संधी मिळाली नव्हती हे सगळं ठरत असताना त्या बाईंनी मला सांगितले होते की हिच्या नवऱ्याचे दर महा मासिक घातलं जाते त्या दिवशी मात्र तिला दुपारच्या शाळेसाठी दोन तासाची सुट्टी द्यावी आणि ते कार्य दुपारी बाराला असते याप्रमाणे तिच्या नवऱ्याच्या मासिक घालण्याच्या दिवशी ती फक्त दोन तास उशिरा येत असे तिला पाहिल्यानंतर आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक हळहळ असायची.. तिला काहीच कळत नव्हते संसार म्हणजे काय कळण्यापूर्वीच तिच्यावर हा घाला झाला होता त्यामुळे सगळेजण तिच्याशी प्रेमाने वागत होते आणि त्या प्रेमाच्या ताकतीनेच तिला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळाले साधारण डिसेंबर महिन्यात तिची सासू माझ्याकडे आली जी तिची आत्या होती म्हणाली बाई एक विचार तुमच्याशी बोलायचाय.. मी म्हणाले बोला त्या म्हणाल्या माझ्या मुलाची एक लाखाची पॉलिसी होती ती हिच्या नावावर केलेले आहेत पण एवढ्याने तिचे आयुष्य संपणार नाही तेंव्हा तिचे दुसरे लग्न करण्याचा आम्ही विचार केला तर अन्य कुठला मुलगा बघून द्यावा तर पुन्हा त्यांच्या घरात काही प्रॉब्लेम निर्माण झाले तर पोरगी घरीयेईल  काही झालं तरी भावाची मुलगी आहे हो म्हणून ..अगदी खरे आहे मग काय विचार केलात त्या म्हणाल्या माझ्या धाकट्या मुलाला तिला करून घ्यावी म्हणते …खरंतर मला तिच्या या विचाराचे कौतुकच वाटले होते पण तरीही आईच्या सावध पणाने मी त्यांना म्हटलं का एक लाख रुपये आपल्या घरात राहावेत आणि तुमचा थोडासा अपंग असलेल्या मुलाला चांगली मुलगी मिळावी हा हेतू ठेवून हे लग्न करताय का त्या म्हणाल्या नाही हो बाई पोरीला सावत्र आई आहे बाप कुठवर बघणार माझ्या घरात तरी काय वेगळं आहे माझा नवरा आजारी पोरगा अपंग तिचा तो मुलगा झाडावरून पडून त्याचा हात आणि एक पाय याच्यामध्ये थोडास अपंगत्व आलं होतं बाकी मुलगा चांगला होता निर्व्यसनी होता एका दुकानात काम करत होता बाईच स्वतःचा घर अगदी भर पेठेत  होतं जुन्या चाळीत राहत असलेल्या घरालाच मालकाने त्यांना मालकी हक्क दिले होते त्यामुळे दोन खोल्यांच छप्पर डोक्यावर होतं बहिणीचा शेतीतला वाटा म्हणून भाऊ शेताचा माल आणून टाकत होता आता मुलीचा वाटा म्हणूनही थोडे अधिक देऊ शकला असता या सर्व दृष्टीने विचार करता अन्न वस्त्र निवारा आणि सुरक्षितता या सगळ्याच बाबतीत स्थळ वरचढ होतेच मी म्हणलं मुलीच्या वडिलांना बोलवून घ्या आमच्या संस्थेत ते मला भेटायला आले बरोबर त्यांच्या नात्यातले चार माणसही आली बोला चाली झाल्या लग्न ठरले पण मी त्यांना एकचअट घातली की लग्न रविवारी करायचं मुलगी शाळा बुडवणार नाही एका दिवसात फार खर्च न करता देवळात लग्न करायचे ठरले त्यांच्या गावाकडे म्हणजे त्यांचा जो देव होता तिथे जाऊन लग्न करायचे ठरले मग मुलीलाही चार गोष्टी समजून सांगितल्या अर्थात हे सगळे तिला एकटीला घेऊन समजून सांगितले तिला विचारले हे तुला चालणार आहे का दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू त्याच घरात राहणार आहेस तुझी आणि नवऱ्याची बेडरूम जी होती तिथेच तुझी आणि तुझ्या दिराची बेडरूम असणार आहे त्याच घरात तुला वावरावयाचे आहे हे सर्व तुला नव्याने जमवता येईल का? तिची मानसिक तयारी चांगली झाली होती ती म्हणाली हो मी हे करेन तो दीर सुद्धा चांगला आहे आणि सासू तर माझी आत्याचा आहे आणि ती माझी आई पण आहे तरीही आई आणि बाई या नात्याने मी तिला दोन सूचना दिल्याचं मी तिला सांगितले तुझा पहिला नवरा तुझ्या या नवऱ्याचा भाऊ असला तरी त्याच्याबद्दल कुठलीही गोष्ट त्याच्याशी बोलू नकोस पुरुषांना हे आवडत नसते त्याची थोडी पडती बाजू आहे म्हणून त्याने तुला स्वीकारले आहे पण त्याचा अहंभाव दुखावेल असे पहिल्या नवऱ्याबद्दलचे काहीही शब्द तू त्याच्याकडे बोलू नकोस आठवणी सांगू नकोस हे पथ्यपाळ म्हणजे तुझा संसार सुखाचा होईल हे खरंतर खूप अवघड होते पण तिला निभावणे भाग होते झाले मग काय लग्न झाले सोमवारी नवी नवरी जावई पाया पडायला आले शाळा सुरू झाली जेमतेम दोन महिने राहिले होते परीक्षेला त्यानंतर आमची अभ्यासिका परीक्षा सराव परीक्षा हे सगळं पार पडलं आणि मुलगी 75 टक्के गुणांनी पास झाली ….मग पुढचा विचार सुरू झाला तिच्या नवऱ्याला आणि सासूला मी बोलवून घेतले आणि सांगितल की आता हिच्या पायावर उभे राहील असेच काही शिक्षणाला दिले पाहिजे ते दोघेही माझ्या शब्द बाहेर नव्हते लगेचच मी आमच्या इथे असलेल्या मुळे हॉस्पिटल मधील नर्सिंग कोर्सला तिला प्रवेश घ्यायला सांगितला गुण उत्तम असल्यामुळे तिला तीन वर्षाच्या नर्सिंग कोर्स प्रवेश मिळाला आता या तिन्ही वर्षात मुल होण्याचा अडथळा येता कामा नये याची दक्षता घ्या इतके मी त्यांना सांगितले खरं तर इतक्या बारीक गोष्टी होत्या पण काय करणार इलाज नव्हता आणि त्यांनी हे सगळं वेळोवेळी ऐकल…अतिशय सद्भावनेने! त्यानंतर ती त्याही परीक्षेमध्ये अव्वल गुणाने पास झाली आणि लगेचच तिला तिची सासू ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती त्याच डॉक्टर महिलेने तिला आपल्याकडे जॉईन करून घेतले नोकरीतल्या सुरक्षिततेचा प्रश्न संपला नोकरी घराजवळच होती आणि मंडळी अत्यंत विश्वासू आणि खूप चांगली होती आज ती तिथे उत्तम काम करीत आहे दहा हजारहून चांगली प्राप्ती आहे दोन गोंडस मुले झाली आहेत संसार सुखाचा चालला आहे स्त्री सक्षमीकरणाचे उदाहरण यापेक्षा काय वेगळे असेल…! मी असा हात अनेकांना देण्याचे ठरवले तरी श्रद्धा ठेवून यांच्याकडून आपले काही भले होईल अशा विश्वासाने काही चार गोष्टी ऐकल्या तर खूप चांगले घडू शकते याचे हे उदाहरण आहे आज कधीतरी ती आपल्या मुलांना घेऊन माझ्या भेटीला येते तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि संसारामध्ये असलेले सुख समाधान हे मला वाचता येते आणि लक्षात येतं की हे केवळ शिक्षणाने घडले आहे दहावी परीक्षा पास होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण त्यानंतर तुम्हाला अनेक वाटा मिळू शकतात ज्या वाटांवर तुम्ही स्वतःचा उदरनिर्वाह करू शकाल अशा गोष्टी तुम्हाला सापडतात लक्षात ठेवा शिक्षणाशिवाय पर्याय नसतो न शिकलेली मोठी झालेली माणसंही आहेतच पण ते वेगळे शिक्षणाने येणारे सामंजस्य आणि विचार यांनी माणूस नुसता मोठा होत नाही तर सुखी होतो म्हणून माझे सगळ्यांना सांगणे आहे शिका आपल्या आसपास असणार्या व्यक्तींना शिकायला प्रोत्साहन द्या जमलं तर एखाद्याला लिहायला वाचायला शिकवा आणि त्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करा शिक्षणाने माणूस स्वतःच्या आयुष्याचा काही वेगळा विचार करू शकतो आणि सक्षम होऊ शकतो याचे हे सुंदर उदाहरण आहे…! मग काय करा सुरुवात जून मध्ये एखाद्या मुलीला शाळेत घालण्यासाठी मदत करा शिक्षणापासून वंचित असणाराना शिक्षणाची गोडी लावा त्याला प्रवाहात आणा इतके तरी आपण करू शकतो ना…….!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बीज… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ बीज… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆

बीज हा शब्द माहित नसेल असा मनुष्य शोधून सुद्धा सापडणार नाही.सर्वसाधारणपणे कोणत्याही वनस्पतीच्या बी ला *बीज* असे म्हटले जाते. इंग्रजी माध्यमात शिकलेली मुलं फार तर Seed अस म्हणतील, पण त्यामागील मर्म मात्र सर्वांना ठाऊक आहे.

आपला देश कृषिप्रधान आहे. पूर्वी *”उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी”* असे सूत्र समाजात प्रचलित होते. स्वाभाविकच शेती करणाऱ्याला समाजात खूप मोठा आणि खराखुरा मान होता. दुष्काळ काय सध्याच पडायला लागले असे नाही, ते याआधीही कमी अधिक प्रमाणात होतेच. त्याकाळात शेतकरी जरी पारंपारिक पद्धतीने शेती केली जात होती. शेतकरी आपल्या बियाण्याची पुरेशी काळजी घेत असत. शेती नैसर्गिक पद्धतीने केली जायची, श्रद्धेनी केली जायची. रासायनिक शेती नव्हतीच. आपली शेती तेव्हा पूर्णपणे गोवंशावर आधारित होती. त्यामुळे तेव्हा जे काही कमी अधिक अन्नधान्य  शेतकऱ्याला मिळायचं ते *’सकस’*असायचे, ते पचविण्यासाठी आणिक हाजमोला खाण्याची गरज पडत नव्हती. एका अर्थाने मागील पिढ्या धष्ठपुष्ट होत्या. शिवकाळातील कोणत्याही सरदाराचा पुतळा किंवा छायाचित्र बघितले तर ते आपल्या सहज लक्षात येईल.

कोणत्याही कर्माचे फळ हे त्या कर्माच्या हेतूवर अवलंबून असते. शरीरावर शस्त्रक्रिया करणारा तज्ञ मनुष्याचे पोट फाडतो, आणि एखादा खुनी मनुष्यही पोट फाडतो. दुर्दैवाने शस्त्रक्रिया करताना रुग्णास मृत्यू आला तर त्या तज्ञास शिक्षा होत नाही, पण खून करणाऱ्यास शिक्षा होण्याची शक्यता जास्त असते. पूर्वीच्या काळी बलुतेदार पद्धती असल्यामुळे शेतकरी धान्य फक्त स्वतःसाठी, अधिकाधिक फायद्यासाठी न पिकवता संपूर्ण गावासाठी पिकवायचा आणि तेही देवाचे स्मरण राखून. आपली समाज रचना धर्माधिष्ठित होती. इथे ‘धर्म’ हा धर्म आहे, आजचा ‘धर्म’ (religion) नाही. धर्म म्हणजे विहीत कर्तव्य. समाजातील प्रत्येक घटक आपापले काम ‘विहीत कर्तव्य’ म्हणून
करायचा. त्यामुळे त्याकाळी प्रत्येक काम चांगले व्हायचे कारण एका अर्थाने तिथे भगवंताचे अधिष्ठान असायचे.

मधल्या  काळात पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेले. देश स्वतंत्र झाला. विकासाची नविन परिमाणे अस्तित्वात आली आणि ती कायमची समाजमनात ठसली किंवा जाणीवपूर्वक ठसवली गेली. जूनं ते जुनं (टाकाऊ) आणि नवीन तितके चांगले असा समज समाजात जाणीवपूर्वक दृढ करण्यात आला. भारतीय विचार तेवढा मागासलेला आणि पाश्चिमात्य विचार मात्र पुरोगामी (प्रागतिक) असा विश्वास समाजात जागविला गेला. विकासाचा पाश्चात्य विचार स्वीकारल्याचे दुष्परिणाम आज आपण सर्वजण कमीअधिक प्रमाणात अनुभवत आहोत. अधिकाधिक धान्य उत्पादन करण्याच्या नादात रासायनिक खतांचा बेसुमार वापर करून आणि गोकेंद्रित शेती न करता आपण इंधन तेलावर आधारित परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च करणारी ‘श्रीमंत’ शेती करू लागलो आणि वसुंधरेचे नुसते आपण नुसते दोहन केले नाही तर तिला ओरबाडून खायला सुरुवात केली. त्यामुळे पुढील पिढीला जागतिक तापमान वाढ, वातावरणातील बदल, आर्थिक विषमता आणि भूगर्भातील पाण्याचा तुटवडा अशा कितीतरी भयानक गोष्टी भेट म्हणून जन्मताच वारसाहक्काने दिल्या असे म्हटले तर वावगे होऊ नये. ह्यातून आज तरी कोणाची सुटका नाही.

ह्या सर्व गोंधळात आपण *बीज* टिकविण्याचे  सोयीस्कररित्या विसरलो. जिथे *बीजच* खराब तिथे पीक चांगले येईल अशी अपेक्षा करणे हा मूर्खपणाच ठरणार, नाही का? *”शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी ।।”* असे संतांनी सांगितले असताना आपण ते ‘संतांनी’ सांगितले आहे म्हणून दुर्लक्ष केले आणि हीच आपली घोडचूक झाली असे म्हणता येईल. आपल्या सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आली असेलच. *खराब* झालेले बीज फक्त शेतातील बियाण्याचे नाही तर आज प्रत्येक क्षेत्रात आपल्याला त्याची प्रचिती येते.
समाजातील सज्जनशक्तीबद्दल पूर्ण आदर व्यक्त करून असे म्हणावेसे वाटते की खूप शिक्षक पुष्कळ आहेत पण चांगला शिक्षक शोधावा लागतो, शाळा भरपूर आहेत पण चांगली शाळा शोधावी लागते, डॉक्टर भरपूर आहेत पण चांगला डॉक्टर शोधावा लागतोय, वकील पुष्कळ आहेत पण चांगला वकील शोधावा लागतोय, अभियंते भरपूर आहेत पण चांगला अभियंता शोधावा लागतोय. आज ही परिस्थिती समाजपुरुषाच्या प्रत्येक घटकास कमीअधिक प्रमाणात लागू आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. हे चित्र बदलण्याचे कार्य आज आपणा सर्वांना करायचे आहे. कारण संकट अगदी आपल्या घरापर्यंत येऊन पोहचले आहे. हे सर्व ऐकायला, पहायला, स्वीकारायला कटू आहे पण सत्य आहे. आपण आपल्या घरात कोणते बीज जपून ठेवत आहोत किंवा घरात असलेले ‘बीज’ खरेचं सात्विक आहे की त्यावरील फक्त वेष्टन (टरफल) सात्विक आहे याचीही काळजी घेण्याची सध्या गरज आहे. वरवर दिसणारे साधे पाश्चात्य शिष्ठाचार आपल्या संस्कृतीचा बेमालूमपणे ऱ्हास करीत आहेत. *शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा आणि आपल्या घरात शिवाजीचा मावळा सुद्धा जन्मास येऊ नये असे जोपर्यंत आईला वाटेल तो पर्यंत यात काहीही फरक पडणार नाही.*

संत ज्ञानेश्वरांच्या काळात देखील असेच अस्मानी आणि सुलतानी संकट होते. राष्ट्राचा विचार करताना दोनचारशे वर्षांचा काळ हा फार छोटा कालखंड ठरतो. माऊलींपासून सुरु झालेली भागवत धर्माची पर्यायाने समाज प्रबोधनाची चळवळ थेट संत तुकारामांपर्यंत चालू राहिली. ह्या सर्व पिढ्यानी सात्विकता आणि शक्तीचे बीज टिकवून ठेवले त्यामुळे त्यातूनच शिवाजी राजांसारखा हिंदू सिंहासन निर्माण करणारा स्वयंभू छत्रपती निर्माण झाला. *”बहुता सुकृताची जोडी । म्हणोनि विठ्ठलीं आवडी।।”* म्हणणारे तुकोबाराय सुद्धा हेच सूत्र (शुद्ध बीज टिकविले पाहिजे) वेगळ्या भाषेत समजावून सांगत आहेत. समर्थांच्या कुळातील मागील कित्येक पिढ्या रामाची उपासना करीत होत्या, म्हणून त्या पावनकुळात समर्थ जन्मास आले. कष्टाशिवाय फळ नाही, नुसते कष्ट नाही तर अखंड साधना, अविचल निष्ठा, तितिक्षा, संयम, धैर्य अशा विविध गुणांचा संचय करावा लागतो तेव्हा कुठे ‘ज्ञानेश्वर’, ‘तुकाराम’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘सावरकर’, ‘भगतसिंग’, डॉ. हेडगेवार जन्मास येत असतात.

*मृग नक्षत्र लागले की आपल्याकडे पाऊस सुद्धा कमी अधिक प्रमाणात सुरु होतो. शेतकऱ्यांची बियाणे पेरायची झुंबड उडते. शेतकरी आपले काम श्रद्धेनी आणि सेवावृत्तीने करीत असतात. आपणही त्यात आपला खारीचा वाटा घ्यायला हवा. आपल्याला देशभक्तीचे, माणुसकीचे, मांगल्याचे, पावित्र्याचे, राष्ट्रीय चारित्र्याचे, सांस्कृतिक स्वातंत्र्याचे, तसेच समाजसेवेचे बीज पेरायला हवे आहे आणि त्याची सुरुवात स्वतःपासून, आपल्या कुटुंबापासून करायची आहे.*

विकासाच्या सर्व कल्पना मनुष्यकेंद्रीत आहेत आणि ती असावयासच हवी. पण सध्या फक्त बाह्यप्रगती किंवा भौतिक प्रगतीचा विचार केला जात आहे. पण जोपर्यंत मनुष्याचा आत्मिक विकास होणार नाही तोपर्यंत भौतिक विकासाचा अपेक्षित परिणाम आपल्याला दिसणार नाहीत. मागील शतकात लॉर्ड मेकॉले नावाचा एक ब्रिटिश अधिकारी भारतात येऊन गेला. संपूर्ण भारतात तो फिरला. नंतर त्याने ब्रिटिश संसदेत आपला अहवाल सादर केला. त्यात तो स्वच्छपणे सांगतो की संपूर्ण भारतात मला एकही वेडा आणि भिकारी मनुष्य दिसला नाही. सर्व जनता सुखी आहे. आणि ह्याला एकच कारण आहे ते म्हणजे इथली विशिष्ठ कुटुंब रचना आणि कुटुंबातील जेष्ठांचा आदर करण्याची पद्धत (‘एकचालकानुवर्तीत्व’).
आज आपल्याकडे काय परिस्थिती आहे हे वेगळे सांगण्याची गरजच नाही, वृद्धाश्रमांच्या संख्येवरूनच ते आपल्या लक्षात येईल. हे एक उदाहरण झाले. अश्या बऱ्याच गोष्टीत आपण पाश्चात्य लोकांस मागे टाकले आहे.

एक छान वाक्य आहे. *”लहानपणी आपण मुलांना मंदिरात घेऊन गेलो तर तीच मुलं म्हातारपणी आपल्या तीर्थयात्रा घडवतात”*.
‘मुलं एखादवेळेस ऐकणार नाहीत पण अनुकरण मात्र नक्की करतील हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. मुलांनी अनुकरण करावे असे वातावरण आपण आपल्या नविन पिढीला देऊ शकलो तर हे खूप मोठे राष्ट्रीय कार्य होईल. त्यासाठी समाजात नवीन आदर्श प्रयत्नपूर्वक निर्माण करावे लागतील आणि असलेल्या आदर्शाना समाजासमोर प्रस्तुत करावे लागेल. आपल्या मुलांकडून माणुसकीची अपेक्षा करण्याआधी आपण त्यांना आपल्या आचरणातून माणुसकी शिकवावी लागेल. आपल्याकडे  विवाहसंस्कार सुप्रजा निर्माण करण्यासाठी आहे. तो फक्त *’सुख’* घेण्यासाठी नक्कीच नाही, पण याचा विचार विवाहप्रसंगी किती कुटुंबात केला जातो ?, मुख्य *’संस्कार’* सोडून बाकी सर्व गोष्टी दिमाखात पार पाडल्या जातात, पण विवाह संस्था आणि गृहस्थाश्रम म्हणजे काय हे कोणी सांगत नाही. ते शिकविणारी व्यवस्था आज नव्याने निर्माण करावी लागेल.

हिंदू संस्कृती पुरातन आहे. जशी आपली ‘गुणसूत्रे’ आपण आपल्या पुढील पिढीस सुपूर्द करीत असतो तसेच ‘नीतीसूत्रे’ही पुढील पिढीस देण्याची निकड आहे. अर्थात नितीसुत्रे देताना मात्र आचरणातून अर्थात *’आधी केले मग सांगितले’* या बोधवचनाचे स्मरण ठेऊन द्यावी लागतील आणि हा महान वारसा जपण्याची प्रेरणा सुद्धा. आपल्या पुढील पिढीला आपल्या वडिलांची कीर्ती सांगावीशी वाटेल असे आपण जगायचा प्रयत्न करायला हवा. पाऊस पडल्यावर सर्व वसुंधरेस चैतन्य प्राप्त होते, बहुप्रसवा असलेली वसुंधरा हिरवा शालू पांघरते, या सृजनातून सर्व प्राणीमात्रांना वर्षभर पुरेल इतके अन्नधान्य प्राप्त होत असते. या आल्हाददायी वातावरणाचा मानवी मनावरदेखील सुखद परिणाम होत असतो.

*या आल्हाददायी, मंगलमयी वातावरणामुळे आपल्या विचारांनासुद्धा नवसंजीवनी प्राप्त व्हावी आणि ‘सुसंस्कारांचे, सात्विकतेचे बीज संवर्धित आणि सुफलीत’ करण्याचे कार्य आपणा सर्वांकडून घडावे अशी श्रीरामचरणी प्रार्थना करतो.*

भारत माता कि जय।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

२२.०६.२०१८

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares