मराठी साहित्य – विविधा ☆ “टेक यूवर ओन डिसिजन…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “टेक यूवर ओन डिसिजन…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

टेक युवर ओन डिसिजन… 

या वाक्यात आता नवीन काही नाही. निर्णय काय घ्यावा? हो… कि नाही… किंवा समोर असलेल्या पर्यायांपैकी कोणता चांगला. आणि कोणता निवडावा. असा प्रश्न पडला की हे वाक्य ऐकायला मिळत.

बऱ्याचदा विचारशक्ती वाढण्यासाठी, निर्णयक्षमता येण्यासाठी, गरज असल्यास थोडी जोखीम पत्कर काही लागल, चुकल तर मी आहे असा धीर देण्यासाठी वडीलधारी या वाक्याचा आधार घेतात. पण…

सध्या घरात जेव्हा मला काही विचारल जात, आणि मी हे वाक्य म्हणतो, तेव्हा माझ्या निर्णयाची फक्त औपचारिकता असते. बाकी जवळपास त्यांचं सगळ ठरलेल असत. डिसिजन जवळपास झालेला असतो.

जसं… जेव्हा मला विचारल जात, मी काय म्हणते… मुलं विचारतात की संध्याकाळी खायला ऑनलाईन काय मागवायच?…

यात मागवायच का?  हो का नाही हा प्रश्न नसतो. मागवायच हे ठरलेल असत.

यात मुलांना घरातल काही नकोय. आणि बायकोला देखील आपणच काही करण्याची इच्छा नसते. म्हणजे यात घरातल नकोच हा निर्णय त्यांचा झालेला असतो.

यातही ऑनलाईन अस विचारल्यावर आपण कुठेही जायच नाही. आवडणाऱ्या ठिकाणाहून घरीच मागावयच आणि आरामात खायच. हे सुध्दा ठरलेल असत. माझ्या निर्णयाची गरज नसते. फक्त मला विचारल जात. मग मी म्हणतो… टेक युवर ओन डिसिजन. यात माझाही गाडी चालवायचा आणि पार्किंग साठी जागा शोधायचा त्रास वाचणार असतो.

तसं नाही… पिझ्झा मागवायचा कि बर्गर…?

म्हणजे पदार्थ सुध्दा त्यांचे ठरलेले असतात. त्या दोन व्यतिरिक्त तीसरा नसतोच. कदाचित त्याचा नंबर पुढे नजीकच्या काळात येणार असावा. किंवा आज या दोन पदार्थांवर त्यांच्या भाषेत जम्बो डिस्काउंट असावा. आता त्यांच्या  निर्णयात मी डिस क्वालीफाय सारखा डिस काउंट असतो. पण मला विचारतात. मी परत म्हणतो. टेक युवर ओन डिसिजन.

हे झालं खाण्याच. दुसऱ्या गोष्टी सुध्दा याच पद्धतीने विचारल्या जातात.

मला वाटतं… या दिवाळीत कपड्यांऐवजी एखादा दागिना घ्यावा. नाही छोटासा असला तरी चालेल. यात छोटासा म्हणताना हाताची चिमटी जेवढी लहान करता येईल तेवढी लहान करता करता आवाज वाढवता येईल तेवढा वाढवला जातो. पण आवाजात गोडवा आणि नाजूकपणा असेल याची काळजी घेतली जाते.

आता दागिना छोटासा म्हटला तरी कमीतकमी आठ ते दहा ग्रॅम पासून सुरुवात. परत यांच्या तब्येतीला तो शोभून दिसला पाहिजे. थोडक्यात ठसठशीत हवा. सांगा कपडे आणि दागिना यांच बजेट जवळपास कुठे जमत का?

परत पुढे वाक्य असतच. मागे आम्ही एक पाहून आलो आहे. छान आहे. आणि डिझाईन पण नवीन आहे. हां… थोडीफार भर मीपण घालीन की. यांच भर घालणं म्हणजे दागिना घ्यायला भरीस घालण असत. थोडक्यात वस्तू पाहून झालेली असते. निर्णय झालेला असतो. आपल्याला विचारण्याची औपचारिकता असते. मग म्हणावच लागत. टेक युवर ओन डिसिजन…

माझ्या कपड्यांच्या बाबतीत सुद्धा तेच होत. नेहमी नेहमी पॅन्ट शर्ट हेच असत. कामावर तेच बरे असतात. पण झब्बा लेंगा कमीवेळा घेतला जातो. तो सुटसुटीत सुध्दा असतो. यावेळी झब्बा लेंगा पहा… असं मला वाटत. तुम्हाला त्याची सवय नाही. पण  अगदीच काही वाइट दिसणार नाही. (हे वाक्य माझ्यासाठी असत का झब्बा लेंगा याच्यासाठी हा डिसिजन मात्र मी घ्यायचा असतो. ) पण पुढे तेच मला म्हणतात. टेक युवर ओन डिसिजन…

दिवाळीच्या फराळाचही आता तसच होणार… घरी काय करायच आणि बाहेरुन काय घ्यायच, किंवा करून घ्यायच हे जवळपास निश्चित नक्की झालेल असत. पण सुरुवात अशीच होईल.

ऑफिसमुळे सगळ्या गोष्टी घरी करण शक्य होणार नाही. काही पदार्थ घरी करू आणि काही तयार आणू. लाडू घरचेच आवडतात मुलांना. ते घरीच करु. आणि बाहेरुन काय आणायच त्याची यादी मी देते. त्या प्रमाणे तुम्ही घेऊन या. तयार पदार्थांसाठी ऑर्डर मी देईन. चालेल ना? तुम्हाला काय वाटतं… म्हणजे कुठे ऑर्डर द्यायची ते सुद्धा त्यांच ठरलेलं असतं किंवा तेच ठरवणार असतात. मी म्हणतो.

टेक युवर ओन डिसिजन…

पण ऑफिस किंवा इतर गोष्टी सांभाळून घरच सगळ व्यवस्थित आणि वेळच्या वेळी करण्याचा त्यांचा जो आटापिटा असतो त्या त्यांच्या डिसिजन ला मात्र सलाम… तेच करु जाणे… तिथे मी म्हणतो, तुझ्या निर्णयाला आणि कामाला सलाम…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सुंदरता आणि कुरूपता… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

सुंदरता आणि कुरूपता…  ☆ श्री विश्वास देशपांडे

(रंगसोहळा या पुस्तकातून घेतलेला लेख)

बालकवी म्हणतात

सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे

चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे.

परवा श्रीकृष्ण मालिका पाहत असतानाचा एक प्रसंग आठवला. कंसाच्या आमंत्रणावरून श्रीकृष्ण मथुरा नगरीत येतो. मथुरेत फेरफटका करीत असताना, श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या दृष्टीस एक  कुबड असलेली आणि त्यामुळे अत्यंत वाकून चाललेली स्त्री दृष्टीस पडते. ती कंसासाठी तयार केलेला एक सुगंधी लेप घेऊन जात असते. श्रीकृष्ण तिला थांबवून म्हणतो, ‘ हे सुंदरी, तुझ्याजवळ सुगंधी अशी कोणती वस्तू आहे आणि तू ती घेऊन कुठे जात आहेस ? ‘ तेव्हा ती म्हणते, ‘ मी कुब्जा आहे. मी कुरूप असल्यामुळे सगळे लोक मला कुब्जा म्हणतात. एक वेळ मला कुब्जा म्हटले असतेस, तर चालले असते. पण तू मला सुंदरी म्हणून माझा उपहास केला आहेस. त्यामुळे मी व्यथित झाले आहे. ” त्यावेळेस श्रीकुष्ण तिला जे सांगतो, ते मला खूप आवडले. तो म्हणतो, ‘ कुरूपता ही शरीराची असू शकते. पण तुझ्याजवळ मनाचे सौंदर्य आहे. आत्म्याचे सौंदर्य आहे. म्हणूनच मी तुला सुंदरी असे म्हटले. ‘

आपण सर्वसामान्य माणसे.  वरवरचे सौंदर्य पाहण्याची सवय आपल्याला लागलेली असते. पण वरवर दिसणाऱ्या सौंदर्यापलीकडे किंवा कुरुपतेपलीकडे सुद्धा सौंदर्य असू शकते, याचा अंदाज आपल्याला येत नाही. कधी कधी मला असे वाटते की सौंदर्य आणि कुरूपता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या सापेक्ष गोष्टी आहेत. असं म्हणतात की वस्तूत, व्यक्तीत सौंदर्य नसते. सौंदर्य हे  पाहणाऱ्याच्या नजरेत असते. जी गोष्ट एखाद्या व्यक्तीला सुंदर वाटेल, तीच गोष्ट दुसऱ्याला तितकी आकर्षक वाटणार नाही. एखाद्या व्यक्तीला अगदी साधारण वाटणाऱ्या गोष्टीतही सौंदर्याचा साक्षात्कार होतो. गवतफुलासारखी सामान्य गोष्ट. पण एखाद्या कवीला त्यातही सौंदर्य दिसते आणि तो सहज म्हणून जातो

रंगरंगुल्या, सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला

असा कसा रे सांग लागला, सांग तुझा रे तुझा लळा.

कुरुपतेतूनही सौंदर्य जन्म घेते. काट्यांवर गुलाब फुलतात. चिखलात कमळ उगवते. ओबडधोबड अशा दगडातून सुंदर मूर्ती तयार होते. सुंदर घरांची निर्मिती होते. आंतरिक ओढ कशाची आहे ते महत्वाचे. कमळाला आतूनच फुलण्याची ओढ असते. काट्यांवर असला तरी खेद न मानता गुलाबाला फुलायचे असते. आणि ज्याला फुलायचे असते, आपले सौंदर्य जगापुढे आणायचे असते, त्याला कोणी रोखू शकत नाही. कारण ती तुमची आंतरिक ओढ असते. मग परिस्थिती कशीही असो. चिखल असो वा काटे. चिखलात फुलणारे कमळ , काट्यांवर फुलणारा गुलाब जणू आपल्याला संदेश देतात, की बघ, मी कसा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा पूर्णांशाने फ़ुललो आहे. माझे सौंदर्य जराही कमी होऊ दिले नाही. ओबडधोबड दगडातून सुंदर मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारात सुद्धा अंतरात सौंदर्याची ओढ असते. म्हणूनच अशी सुंदर कलाकृती जन्म घेते.

फुलपाखरांचा जन्म कसा होतो माहितीये ? कुरूप अशा दिसणाऱ्या अळ्यांमधून फुलपाखरे जन्म घेतात. इतक्या कुरूप अळ्यांमधून इतकी सुंदर मन मोहून टाकणारी फुलपाखरे जन्माची हा निसर्गाचा एक चमत्कारच नाही का ?

मग त्यांना जन्म देणाऱ्या अळ्यांना कुरूप तरी कसे म्हणावे ? आकाशात दिसणारे पांढरे मेघ छान दिसतात. पण त्यांचा काहीच उपयोग नसतो. काळे ढग कदाचित दिसायला सुंदर नसतील, पण आपल्या जलवर्षावाने ते अवघ्या सृष्टीला नवसंजीवनी देतात, म्हणून त्यांचे बाह्य रूप न विचारात घेता, आंतरिक सौंदर्य विचारात घ्यायला हवे. जे सौंदर्य इतरांना आनंद देते, इतरांच्या उपयोगी पडते, ते खरे सौंदर्य. इतरांसाठी जे स्वतःचं सर्वस्व झोकून देऊन काम करतात, त्यांच्या कार्याचा कीर्तिसुंगंध आपोआपच पसरतो. नुसते सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणे महत्वाचे आहे. ही सुंदरता विचारांची आहे. कृतीची आहे.

आपल्या देवादिकांचे फोटो पाहिले तर त्यांच्या पाठीमागे एक तेजोवलय आपल्याला दिसते. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज, एक प्रकारची आभा दिसते. ते जे सौंदर्य आहे ते सत्याचे प्रतीक आहे. तेच शिव आहे आणि तेच सुंदर आहे.   इंग्रजी कवी किट्स म्हणतो, ‘ Truth is beauty and beauty is truth . ‘ त्याचा अर्थ हाच आहे. आणि त्याचे आणखी एक वाक्य प्रसिद्ध आहे ‘ A thing of beauty is joy forever .’ जी गोष्ट सुंदर असते, ती नेहमीच आनंद देते. कृत्रिम सौंदर्य फार काळ आनंद देऊ शकत नाही. सौंदर्य प्रसाधने, पोशाख इ च्या साहाय्याने आपण आपले सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करतो. पण जी गोष्ट मुळचीच सुंदर असते, तिला दिखाव्याची गरज असत नाही. चेहऱ्यावरचे निर्मळ आणि नैसर्गिक हास्य, आपले काम करताना भाळावर येणारे घामाचे मोती या गोष्टी सुंदरच दिसतात. आपले आरोग्य चांगले असेल, विचार चांगले असतील आणि मन प्रसन्न असेल, तर सौंदर्य तुमच्या व्यक्तिमत्त्वातून आपोआपच प्रकट होईल. त्यासाठी मेकअप किंवा दिखाव्याची गरज भासणार नाही.

‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख …’ हे गाणं आपल्या सगळ्यांना माहिती असेल. त्या तळ्यात बदकांसमवेत एक राजहंस वाढत असतो. त्याला आपल्या सौंदर्याची जाणीव नसते. बदकांची पिले तो वेगळा असल्याने त्याला कुरूप समजतात. म्हणून तोही दुःखी असतो. पण एके दिवशी त्याला उमजते की आपण बदक नसून राजहंस आहोत, तेव्हा त्याचे भय, वेड सगळे पळून जाते. कारण त्याने त्याच्यातील ‘ स्व ‘ ला ओळखले असते. असाच आपल्या प्रत्येकामध्ये सुद्धा राजहंस दडलेला असतो. फक्त आपल्याला त्याला ओळखता आले पाहिजे, जागे करता आले पाहिजे.

लेखक – श्री विश्वास देशपांडे,

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सर्व अंधश्रद्धांविरूद्ध लढणारा झुंजार योद्धा – जेम्स रँडी – भाग-२ – लेखक – डाॅ प्रदीप पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

🔆 विविधा 🔆

सर्व अंधश्रद्धांविरूद्ध लढणारा झुंजार योद्धा – जेम्स रँडी – भाग-२ – लेखक – डाॅ प्रदीप पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

(त्याच्या या कामाची दखल घेऊन त्याला मॅक आर्थर फाउंडेशनचा प्रतिष्ठित पुरस्कार व फेलोशिप जरी मिळाली तरी त्याचे वेगवेगळ्या चाचण्या व प्रयोग करणे काही थांबले नाही. बायोरिदम या खूळाच्या त्याने मजेशीर चाचण्या घेतल्या. सेक्रेटरीचा चार्ट एका बाईस देऊन नोंदी ठेवायला सांगितल्या आणि त्या बाईने तो तिचा चार्ट समजून ऍक्युरेट नोंदीचा निर्वाळा दिला !!)

क्रमशः…

जेम्स रँडीने वैद्यकीय क्षेत्रातल्या ‘हम्बग्ज’चाही चांगलाच समाचार घेतला. ब्राझील-फिलिपिन्समधील स्वयंघोषीत डाॅक्टर आरिगो मुळे प्रसिद्ध पावलेल्या ‘सायकिक सर्जरी’ या प्रकारात कोणतेही शस्त्र न वापरता शस्त्रक्रिया केली जाते असा दावा होता… पण ती चलाखीची शस्त्रक्रिया ज्याला तो हस्तक्रिया असे म्हणायचा, ती कशी होती हे फिलिपिन्समध्ये जाऊन रँडी ने दाखविले. ऑपरेशनच्या वेळी अरिगो व त्याच्यासारख्या इतर अनेकांनी सायकिक सर्जरीचा दावा करणाऱ्या लोकांनी ऑपरेशन नंतर दाखविलेले रक्त व मांस हे बोकडाचे किंवा गाईचे असायचे हे रिपोर्ट सहित दाखविले.

व्हाईट हाऊस मध्ये बेटी फोर्ड या बाईं समोर अतींद्रिय शक्तीचे तथाकथित पण साधार प्रयोग दाखविणारा जेम्स रँडी हा एकमेव विज्ञानवादी होय.

कॉर्नेल, हॉर्वर्ड, एम.आय.टी, ऑक्सफर्ड, प्रिन्स्टन, येल अशा अनेक विद्यापीठात जेम्सने व्याख्याने दिली. चलाखी व विज्ञान यांच्यावर चर्चासत्रे घडवीत एक्सॉन रिसर्च लॅब पासून नासा, नॅशनल जिओग्राफिक सोसायटी पर्यंतच्या अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये व्याख्याता म्हणून जाऊनही सामान्यातल्या सामान्य भोंदूच्या चाचण्या घेण्यास जेम्स रँडी कचरला नाही. तो या चाचण्या अतिशय हुशारीने, गूढ अतिंद्रिय दाव्यासाठी, वेगवेगळ्या तयार करीत असे.

कॅलिफोर्निया हुन आलेल्या विन्स वायबर्ग या पाणाड्याने ‘डाऊझिंग’ म्हणजे काठी घेऊन विशिष्ट पद्धतीने जमिनीतील अचूक पाणी दाखवण्याचा दावा केला तेव्हा त्याने जमिनीखाली पाण्याच्या पाईप टाकून काही मधून पाणी जाणारे पाईप्स शोधून काढण्याच्या तयार केलेल्या चाचणीची तर खूपच प्रशंसा झाली. विन्स अर्थातच दावा हरला. स्यू वॅलेस नावाची पिरॅमिड व चुंबक विकणारी तरुणी मानवी रोगांचे निदान मॅग्नेट थेरपीने करीत असे. रँडीने तिच्या दाव्यांची डबल ब्लाइंड, कंट्रोल टेस्ट घेऊन तिचा चुंबकोपचाराचा दावा फोल कसा आहे हे दाखवून दिले.

1978 मध्ये ‘सायकिक न्यूज’ नावाच्या मासिकाने जाहीर केले की बिंगो स्वान हा सर्व ग्रहांवर सूक्ष्म देह आधारानं जाऊन आला आहे व मरिनर 10 आणि पायोनियर 10 या कृत्रिम उपग्रहांनी गुरु ग्रहाची माहिती जी नंतर दिली ती स्वानने पूर्वीच दिली आहे, हे दावे जसेच्या तसे एडगर मिशेल या अंतराळवीराने मान्य केले आहेत,.. याही दाव्यांची खोलवर छाननी करून रँडीने त्याच्या दाव्यांची व वैज्ञानिक दाव्यांची तुलना केल्यावर आलेल्या निष्कर्षांची जी माहिती दिली आहे ती वैज्ञानिक चाचण्या कशा कराव्यात याचा सुरेख नमुना आहे.

रँडी चा प्रोजेक्ट अल्फा नावाचा अतिंद्रिय बुवा-महाराज-परामानसशास्त्री यांची परीक्षा घेणारा आराखडा खूपच गाजला आहे.

विसाव्या शतकातील असामान्य नास्तिक म्हणून ‘दि कमिटी फॉर द सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्लेम्स ऑफ द पॅरानॉर्मल’ तर्फे वैज्ञानिक व नास्तिक विचारवंत यांची यादी करून निवड करण्यास सांगितली असता कार्ल सेगन, मार्टिन गार्डनर, पॉल कुर्टझ,  रे हॅमन, अल्बर्ट आईन्स्टाईन, बर्ट्रांड रसेल, फिलीप क्लास, कार्ल पॉपर, रिचर्ड डॉकिन्स अशा दिग्गजांनाही मागे सारून जेम्स रँडी सर्वाधिक मते घेऊन प्रथम क्रमांकावर राहिला होता ते केवळ तो कार्यकर्त्यांच्या अभिनिवेशाने सर्वत्र आव्हाने देत राहिल्याने. प्रबोधनाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा रँडी हा अंधश्रद्धांच्या विरोधी लढाई करणारा खरातर योद्धाच!

रँडीने लिहिलेल्या तेरा पुस्तकांपैकी एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रसिद्ध लेखक आर्थर क्लार्क म्हणतो, ” रँडीची ही पुस्तके म्हणजे पुस्तक दुकानातून हजारोंचे मेंदू सडविणाऱ्या अवैज्ञानिक गोष्टींना योग्य मार्गावर घेऊन जाणारे दीपस्तंभ आहेत”

धर्माचा आधार घेऊन प्रचंड शोषण व फसवणूक चाललेल्या पीटर पॉपहॉफ सारख्या ख्रिस्तोपदेशकाचे बिंग  फोडताना व्यथित झालेला रँडी म्हणतो…

‘मानवाचे शहाणपण, पैसा आणि कधीकधी जीवसुद्धा हिरावून घेणाऱ्या अवैज्ञानिक अतिंद्रिय गुढ गोष्टींची हकालपट्टी केली पाहिजे.’

यावर वॉशिंग्टन स्टार या दैनिकाने टीका करून हे सारे अस्तित्वात कुठे आहे असे विचारले. तेव्हा रँडीने फटकारले…..

“लिहिणाऱ्याने त्या गरीब पालकांचे चेहरे पाहिले नाहीयेत ज्यांची मुले गूढ संप्रदायामध्ये सामील होऊन वहावत गेली आहेत…त्याने अशी माणसे पाहिली नाहीत ज्यांनी शापाचा धसका घेऊन जीव घालविला… अशी स्त्री पाहिली नाही की ज्या स्त्रीने धर्म बैठकातुन प्रियकराचा धावा केला पण ती तेथेच लुटली गेली… महाशय जा त्या गयानात जेथे 950 मुडदे केवळ रेव्हरंड जिम जोन्स मुळे हेवन गेट कडे गेलेत…!! उकरून काढाल ते मुडदे?”

20 ऑक्टोबर 2020 ला रँडी विश्वात विलीन झालाय.

आतड्याच्या कॅन्सरशी झुंज देत 92 वर्षांपर्यंतच्या प्रवास करणे सोपे नसते..10 वर्षापूर्वी तो म्हणाला होता..” मृत्यू कधीतरी येणार आहेच. या पृथ्वीने मला प्राणवायू एवढी वर्षे पुरवलाय हेच खूप नाही का?….!”

डाॅ.  प्रदीप पाटील

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सर्व अंधश्रद्धांविरूद्ध लढणारा झुंजार योद्धा – जेम्स रँडी – भाग-१ – लेखक – डाॅ प्रदीप पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

🔆 विविधा 🔆

सर्व अंधश्रद्धांविरूद्ध लढणारा झुंजार योद्धा – जेम्स रँडी – भाग-१ – लेखक – डाॅ प्रदीप पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

युरी गेलर नावाच्या इस्त्रायल मधील तेल अविव गावच्या माणसाने 1973 मध्ये केवळ मनशक्तीने चमचा वाकविण्याचा चमत्कार अमेरिकेत केला आणि सगळीकडे अतिंद्रिय दाव्यांची सिद्धता मिळाल्याचे पडघम वाजू लागले! केवळ चमचाच नव्हे तर युरिने लोकांच्या घरातील घड्याळं बंद पाडली आणि जमिनीखालचे पाणी मनशक्तीने सांगण्याचा सपाटा लावला. मनो सामर्थ्य हा अतींद्रिय शक्ती चा प्रकार आजवर सिद्ध झालेला नव्हता. तो युरीने सिद्ध केला असे सांगत जगन्मान्य ‘नेचर’ मासिकात युरी वरील संशोधन प्रबंध ही प्रसिद्ध झाला. ‘सायंटिफिक अमेरिकन’, ‘टाईम’ इत्यादींनी त्याची गंभीर दखल घेतली आणि….

युरी गेलरचा अतिंद्रिय दाव्यांचा फुगलेला फुगा फोडला जेम्स रँडी ने. एक जादूगार. कॅनडातील टोरंटो येथे 1928 मध्ये जन्मलेल्या जेम्स रँडीने कॉलेजला जाऊन शिक्षण घेतले नाही की कोणती वैज्ञानिक संशोधनासाठी पीएचडी केली नाही.. आपल्याकडे असलेल्या गाडगेबाबांसारखेच आहे हे ! चलाखीने चमत्कार करण्यात अपूर्व हातखंडा असलेला रँडी जेव्हा अमेरिकेत पोहोचला तेव्हा तेथे दूरसंवेदन,( टेलीपथी ) पासून टीव्हीवरून ख्रिस्तोपदेशकांचे चमत्कार दाखविण्यापर्यंत ,ज्यांना एव्हांजेलिस्ट असे म्हणतात अशा सर्व अंधश्रद्धांचा सुळसुळाट चालूच होता. युरी गेलरच्या अतींद्रिय दाव्या मागील हातचलाखी दाखवून व बिंग फोडूनच जेम्स रँडी थांबला नाही तर गेलरचा संपूर्ण जीवन आलेख लोकांच्या समोर मांडून त्यातील फोलपणा  दाखवून दिला. टाईम मासिकाचे ज्येष्ठ संपादक लिओन जेराॅफ यांच्या उपस्थितीत रँडीने गेलरची चलाखी पहिल्यांदा स्पष्टपणे ओळखली. डॉ. अंडरिझा पुहारिश यांनी युरी चा शोध लावला आणि अमेरिकेतील स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूट मधील दोन वैज्ञानिक हेरॉल्ड पुटहाॅफ ( विशिष्ट प्रकारच्या लेसर चा शोधक ) आणि रसेल टर्ग ( मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी प्लाझमा ओसीलेटर चा शोधक)  हे यूरी गेलरच्या चमत्काराने प्रभावित का झाले याचा रँडीने शोध घेतला. पुटहाॅफ हा सायंटॉलॉजी नावाच्या स्वर्ग-सुपरपॉवर मानणार्या पंथात होता तर टर्ग हा गूढ पुस्तक विक्रेत्याचा मुलगा. टर्ग-पुटहाॅफ यांनी स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये गेलरची चाचणी घेऊन ऑक्टोबर 1974 च्या नेचर मध्ये प्रबंध प्रसिद्ध केला. परामानसशास्त्र किंवा ढोंगी मानसशास्त्रास ‘नेचर’ मध्ये स्थान नसताना तो छापला गेल्यावर गेलरची प्रचंड प्रसिद्धी झाली आणि त्याचा भरपूर प्रचार टर्ग-पुटहाॅफनी केला. तेव्हा रँडीने ‘नेचर’ च्या त्या अंकातील डेवीस यांच्या संपादकीयात अपुरा, अव्यवस्थित आणि ‘रॅगबॅग ऑफ पेपर’ हा शेरा उघडकीस  आणून  ‘नेचर’ ने हा प्रबंध प्रकाशित करण्याचा उद्देश फक्त आज परामानसशास्त्राच्या चाचण्या कशा घेतल्या जातात हे दाखविण्यासाठीच होता, हे रँडीने दाखवून दिले. ‘न्यू सायंटिस्ट’चे संपादक बर्नार्ड डिक्सन यांनीही त्यास दुजोरा दिला.

गेलरच्या हातचलाखीस टर्ग- पुटऑफ हेच वैज्ञानिक फसले होते असे नव्हे तर अनेक वैज्ञानिक फसले होते. लंडनच्या बायोफिजिकल लॅबोरेटरी मध्ये 1971 मध्ये जेंम्स  रँडी ने युरी गेलरच्या जादू दाखविल्या तेव्हा ‘न्यू सायंटिस्ट’ च्या जो हॉनलॉन  बरोबर होते नोबेल पारितोषिक विजेते डी.एन. ए. आराखड्याचे शोधकर्ते डॉक्टर मॉरीस विल्किंस. त्यांचीही दिशाभूल युरी गेलरमुळे झाली होती. ते जेम्स रँडीस म्हणाले, परामानसशास्त्राच्या किंवा पॅरासायकॉलॉजीच्या चाचणीसाठी वैज्ञानिकांची गरज असते हे चूक असून चांगल्या जादूगाराचीही तेवढीच गरज असते!

रँडीने हेच ठळकपणे समोर आणले. वैज्ञानिक हे वैज्ञानिक चाचण्यात मुरलेले असतात. त्यांना हातचलाखी, जादुगिरी याची भाषा अवगत नसते. त्याचा फायदा परामानसशास्त्रज्ञ-बुवा-महाराज घेतात. हे युरी गेलर प्रकरणात रँडी ने दाखवून दिले आणि रँडी ने वैज्ञानिक चाचण्या बरोबर जादुगिरी, चलाखी शोधणे अशी जोड देऊन अतींद्रिय शक्तीचे दावे, चमत्कार, आत्मे- भुते यांच्या अस्तित्वाचे दावे, छद्म विज्ञान किंवा स्युडोसायन्स इत्यादी गोष्टींचा भांडाफोड केला. आणि त्याने अनेक वैज्ञानिक व विज्ञान नियतकालिकांना जादूगाराची मदत घेणे हे कसे योग्य आहे हे समजावून सांगितले. त्याने मग अश्या गोष्टींच्या सायकिक टेस्ट करण्यासाठी चार नियम मांडले. साध्या चलाखीचा वापर करणे, फसवणूक हाच उद्देश, परिणामकारक चलाखीचे प्रदर्शन, संशय घेणाऱ्या व्यक्तींच्या उपस्थितीत चलाखी कोलमडणे, हे सायकिक असे 4 अवगुण उघडे करण्यासाठी रँडी ने एक नियमावली तयार केली. सुमारे 17 नियम असलेली ही नियमावली आजही सर्वच भ्रमांचा वेध घेण्यासाठी उपयुक्त ठरत आली आहे. वैज्ञानिक चाचणी बरोबर या चाचण्यांनाही तेवढेच महत्त्व प्राप्त करून देण्यात हॅरी हुदिनी या प्रख्यात जादूगाराच्याही दोन पावले पुढे जाऊन रँडी ने मोठे यश मिळविले. त्याहीपुढे जाऊन त्याने अतिंद्रिय शक्ती, खोटे मानसशास्त्र, गुढ-चमत्कारी गोष्टी सिद्ध करण्यासाठी दहा हजार डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले. जवळपास सहाशे पन्नास जणांनी हे आव्हान स्वीकारले. त्यापैकी फक्त 54 जणांनी टेस्ट दिल्या आणि आव्हान कुणीच जिंकू शकले नाहीत आजवर! आज त्याच्या नावाने स्थापन झालेल्या जेम्स रँडी एज्युकेशनल फाऊंडेशनने ही रक्कम एक लाख डॉलर्स केली आहे.

जादू आणि चलाखी यांच्या व्याख्या त्याने स्पष्ट केल्या. विशिष्ट मंत्र आणि तांत्रिक विधी यांनी चमत्कार करणे म्हणजे मॅजिक व कौशल्य वापरून चमत्कार करणे म्हणजे चलाखी किंवा कॉन्ज्युरिंग असे त्याने स्पष्ट केले.

या गदारोळात सोसायटी ऑफ अमेरिकन मॅजिशियन्स व इंटरनॅशनल ब्रदरहुड ऑफ मॅजिशियन्स इत्यादी संघटनांनी रँडीवर जादू उघडे करण्याचा आक्षेप घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या ‘मॅजिक’ या मासिकातून जेम्स रँडीच्या विरोधात सूर उमटू लागला..

त्यावर रँडीने म्हंटले,

‘जेव्हा वैज्ञानिक एखाद्या परामानसशास्त्रज्ञांची चलाखी ओळखू शकत नाहीत तेव्हा आपणच त्या विरोधात ठामपणे उभे राहायला हवे. कारण सामान्य जनांची फसवणूक आणि शोषण यांचा आपण विचार करायलाच हवा.. हाच मानवतावाद आहे.’

जेम्स रँडीने केलेल्या या कार्याची पावती म्हणून वैज्ञानिक वर्तुळात त्यास मानाचे स्थान प्राप्त झाले. कमिटी फॉर द सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन ऑफ ऑफ द पॅरानॉर्मल या संस्थेचा तो सन्माननीय सदस्य बनला. या समितीत प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन, विज्ञान लेखक आयझॅक असीमोह,  रे हॅमन, रिचर्ड डॉकिन्स, मार्टिन गार्डनर अशी फेमस वैज्ञानिक मंडळी त्यावेळी होती. 

1988 मध्ये फ्रेंच होमिओपॅथ जॅकस बेनव्हेनिस्ते याने ‘नेचर’ मध्ये होमिओपॅथीच्या सिद्धतेचा पुरावा म्हणून शरीरातील पाण्यात होमिओपॅथिक औषधांची स्मृति राहते असा प्रबंध लिहिला. त्याची छाननी करण्यासाठी ‘नेचर’ तर्फे गेलेल्या त्या पॅनेलमध्ये संपादक जॉन मेडाॅक्स व इतरांबरोबर जेन्स रँडीही होता आणि या पॅनेलने होमिओपॅथी विषयी चा दावा फेटाळून लावला.

रँडीची ही वाटचाल जादूगिरीपासून वैज्ञानिक वृत्तीच्या विज्ञानवाद्यापर्यंत घडत गेली ती वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारल्या मुळेच. त्याचा परिणाम असा झालाकी जगभर हिंडत असताना अनेक अंधश्रद्धांचा, भ्रमांचा भेद त्याने कौशल्याने आणि पुराव्यासहित केला. थायलंडमधील कागदा आधारे बुवाबाजी करणाऱ्या विणकाम्याची जादू, सर आर्थर कॉनन डायलच्या फेअरी टेल्स मधील एल्सी आणि फ्रान्सिस यांच्या छोट्या छोट्या परी कन्या व राक्षस यांच्याबरोबरच्या फोटोतील बनवाबनवी, या परी कन्यांचे प्रिन्सेस मेरीज गिफ्ट बुक या पुस्तकांमधील हुबेहूब चित्रे शोधून दाखविलेले साम्य (ज्यावर ऑलिव्हर लॉज व विलियम कृक्स या वैज्ञानिकांचाही विश्वास होता ती ही बनवाबनवी), महर्षी महेश योगीच्या ‘महर्षी इफेक्ट’मुळे आयोवा व व इतर प्रांतातील ठिकाणी गुन्हेगारी कमी झालेल्या खोट्या रिपोर्ट चा समाचार… एरिक व्हॉन डॅनिकेन या स्विस लेखकाने चारियाटस् ऑफ गॉड्स व इतर चार पुस्तकातून परग्रहातून आलेल्या लोकांची छापलेली चित्रे ही कशी बनवाबनवी होती, या सर्व प्रकरणातील चलाखी व लबाडी त्याने पुराव्यासहित दाखवून दिली.

त्याच्या या कामाची दखल घेऊन त्याला मॅक आर्थर फाउंडेशनचा प्रतिष्ठित पुरस्कार व फेलोशिप जरी मिळाली तरी त्याचे वेगवेगळ्या चाचण्या व प्रयोग करणे काही थांबले नाही. बायोरिदम या खूळाच्या त्याने मजेशीर चाचण्या घेतल्या. सेक्रेटरीचा चार्ट एका बाईस देऊन नोंदी ठेवायला सांगितल्या आणि त्या बाईने तो तिचा चार्ट समजून ऍक्युरेट नोंदीचा निर्वाळा दिला !!

क्रमशः…

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक सुंदर अनुभव – मनातल्या घरात –  श्री विकास शहा ☆ प्रस्तुती – सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

🔆 विविधा 🔆

☆ एक सुंदर अनुभव – मनातल्या घरात –  श्री विकास शहा ☆ प्रस्तुती – सौ. जयश्री पाटील ☆

मनातल्या घरात (Self – Introspection)

आपण मनातल्या घराला कधी भेट दिली आहे कां ??? 

एका ठिकाणी बसून करमत नाही. मग उगाच आपण, इथे तिथे फिरायला जातोच की !!! मग ती  पर्यटन स्थळ असतील किंवा कोणाच्या तरी घरी !!! याच्या त्याच्या घरी, या ना त्या कारणाने आपण पाहुणा म्हणून जातोच. मग मी ठरवले, कां नाही आपण आपल्याच मनाच्या घराचा पाहुणचार घेऊन यावा ???

हो, हो, चक्क स्वतःच्याच मनाच्या घरचा पाहुणचार !!! आपणच आपल्या मनाच्या  घराला भेट द्यावी म्हंटले, बघावे तरी काय आणि कसं ठेवलंय हे मनाचे घर !!! कोण, कोण रहातात तिथे ???  कसे स्वागत होत ते ???

ठरल्याप्रमाणे मनाच्या घराच्या दारापर्यंत पोहचलो. अगदी छोटेसे होते, पण छान होते !!! आत काय असेल, या उत्सुकतेने दार वाजवले, तर आतून आवाज आला, “कोण आहे ???? काय पाहिजे ????” असा प्रश्न आतून विचारला जाईल याची कल्पना नव्हती पण खरंच आपण कोण आहोत, हे त्याला सांगितल्या शिवाय तो आपल्याला आत तरी कसा घेणार ???

मी ही सांगितले, “मी *स्व  आहे रे !!! ज्याचे तू कध्धी ऐकत नाही. ज्याच्याशी तू सतत वाद घालत असतोस, ज्याच्याशी तू दिवस रात्र गप्पा मारत असतो तो मी !!!”

आतून आवाज आला, ” बरं…. बरं…उघडतो दार !!!” दार उघडल्या नंतर आत पाहिले, तर गडद अंधार होता. म्हणून मी विचारले, ” कां रे एवढा अंधार ???” तेव्हा तो म्हणाला, ” तुमच्याच कृपेने !!! मी म्हंटले, ” माझ्या कृपेने ??? तर तो म्हणाला, “हो !!! तुझ्याच कृपेने !!! कारण इथे उजेड तेव्हा पडेल, जेव्हा तू सकारात्मक विचारांचे दिवे लावशील.”

मी ही जरा ऐटीतच म्हणालो, “ठीक आहे… ठीक आहे !!! लावतो दिवे” म्हणत, पुढे सरकलो. थोडं पुढे चाचपडत गेलो तर काय !!! तिथं असंख्य खोल्या होत्या. अगदी कोंदट वातावरण होते. मी त्याला पुन्हा विचारले, “काय रे, त्या खोल्यात काय दडलंय ???”

तो पुन्हा म्हणाला, ” बघ की उघडून एक एक खोली, कळेल काय आहे ते.” मग मी हळूच एका खोलीचे दार उघडले.  आणि…फडफड करत अनेक रागीट चेहरे समोर आले. जणू काही ते मला गिळंकृतच करणार आहेत. मी पटकन दार लावले. तेव्हा तो म्हणाला, ” काय झालं ??? दार कां लावले ???” मी म्हंटले, ” कसले भयानक होते रे ते !!! ” तर तो पुन्हा हसत म्हणाला, ” तुम्हीच गोळा केले आहेत ते !!! तुम्ही ज्यांचा ज्यांचा तिरस्कार करता, ज्यांचा राग करता, त्यांची संख्या किती आहे ते कळलं कां ??? तुम्हीच केलेली मेगा भरती आहे ती !!!”

हुश्श…अरे बापरे !!! पुढचं दार उघडायचे धाडसच होईना, पण म्हंटले आता आलोच आहे तर उघडावे. तिथे ज्या काही घटना पहिल्या त्याने तर घामच फुटला. तो पुन्हा मिस्कीलपणे म्हणाला, ” काय, काय झालं…??? मी म्हंटले, “अरे बाबा, हे काय ??? तो पुन्हा म्हणाला, ” तू तुझ्या आयुष्यात सतत दुःखद आठवणीच गोळा करीत गेलास, त्याला मी तरी काय करणार ??? आता तर साठवून ठेवायला या खोल्यासुद्धा अपुऱ्या पडत आहेत.”

तिथं अशा किती तरी खोल्या होत्या, ज्यांना उघडायच धाडस माझं झालं नाही. मग त्याने त्या उघडून दाखवल्या, ही भीतीची खोली, ही द्वेष, ईर्षा, वाईट विचारांची, मतभेदांची, गैरसमजांची खोली अशा अनेक खोल्या पाहिल्या, सर्वच्या सर्व अंगावर येत होते.

आता मात्र माझं डोकं गरगरायला लागले, अस्वस्थता वाढली होती. किती भयावह होत ते सर्व !!! त्यामुळे पुढं काय आहे, हे बघण्याची इच्छाच होत नव्हती. हे सारं भयाण बघून अंगाला काटा आला होता. स्वतःचाच तिरस्कार वाटत होता.

मी त्याला म्हंटले, “मी जातो आता. मला काही बघायचं नाही आता.” तो म्हणाला, ” थोडं…थांब, आलाच आहेस तर हे पण बघून जा.”

थोडी हिंमत दाखवत आम्ही पुढच्या दिशेने निघालो….तिथं संपूर्ण जाळ लागलेला होता…मग थोडं पुढे गेलो आणि पाहिलं तर काय….आहा…..हा हा…स्वर्ग सुख मिळावं असं वातावरण होत, तिथं प्रेम होतं, तिथं माया होती, तिथं आनंद होता, उत्साह होता, नवीन नवीन कल्पनांचा बाजार होता. सुख, समाधान शांती ने भरलेले, अगदी नयन दिपून टाकेल असं सर्व काही होते.

मी म्हंटले, “काय रे हे इतकं सुंदर आहे, हे तू मला आधी कां नाही दाखवलं ???” तर तो मिस्कील पणे हसत म्हणाला, ” अहो, तुमचं मनातलं खरं घर तर हेच आहे.” मग मी म्हणालो, ” जे आधी पाहिलं, ते काय होतं ???” तो पुन्हा हसत म्हणाला, ” त्या…त्या…तुम्ही अतिक्रमण करत वाढविलेल्या खोल्या आहेत. तुम्ही केलेला राग, इर्षा, द्वेष, भीती, नावडती माणसं, नावडत्या आठवणी याची जी साठवणूक केली, ती या सुंदर घराच्या प्रवेशद्वारा पुढे पहारेकरी बनून बसले आहेत, जे तुम्हाला इथं पर्यंत येण्यास अडवत आहेत.”

आम्ही वर्तमान काळात सजग नसतो, त्या वेळी आमच्या स्वभावाची नशा असते, आणि नंतर कळते तेंव्हा पञ्चाताप झालेला असतो…

क्षणभर विचार केला, खरंच की आपणच आपल्या सुख, आनंदाच्या कडे जाणारा रस्ता, या नकारात्मक गोष्टींची साठवणूक करून अडवलेला आहे. मनाच्या घराचा पसारा आवरायला वेळ लागणार होता पण ठरवलं की, आता या अडथळा बनून बसलेल्या खोल्यांची साफसफाई करायची. तिथं सकारात्मक विचारांचे दिवे लावायचे आणि सुख समाधान, शांती कडे जाणारा मार्ग सोपा करायचा.

बरं झालं. आज मनाच्या घरात फिरून आलो, नाहीतर आपल्या मनावर नकारात्मक विचारांचे अतिक्रमण झालेले आहे हे कळलंच नसतं.

मनाच्या घरचा पाहुणचार खूप काही शिकवून गेला. आपल्या मनाचं घर, दुसऱ्याच्या हातात द्यायचं नाही. स्वतःच्या घराची साफसफाई स्वतःच करायची.

साफसफाई करायची म्हणजे काय तर स्व दर्शन म्हणजे ध्यानावर यावे लागेल त्यासाठी ध्यान करावे लागेल…

मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो.. तुम्ही तुमच्या मनाच्या घराला कधी भेट देत आहात ???

आपण सुरुवात छान केलेली आहे..

BE POSITIVE… BE HAPPY

सकारात्मक रहा.. आनंदी रहा..

पत्रकार श्री विकास शहा, तालुका प्रतिनिधी दैनिक लोकमत , शिराळा ( सांगली )

प्रस्तुती – सौ.जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ह्या वयातले चंद्र (मुखी) अभियान…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “त्या वयातले चंद्र(मुखी) अभियान…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

कसं आहे नं, आकाशातला चंद्र हा…. तो चंद्र असतो…….. पण भूतलावर आपल्याला आवडणारा चंद्र मात्र ती…… असते. त्याला चंद्रमूखी असंही म्हणतो……

भारतान आपल चंद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरवल आणि इतिहास रचला. आणि यामुळेच याच्याही आधीचा आमच्या त्या वयातल्या अनेक (फसलेल्या) चंद्र(मूखी) अभियानांचा इतिहास आठवला. हा इतिहास माझ्यासह अनेकांचा आणि आपला असू शकतो.

 म्हणूनच आमच्या अभियानाचा इतिहास असं म्हटलं. नाहीतर माझा इतिहास म्हटलं असतं.

चंद्रावर यान पाठवण्यासाठी इतर देशांनी जेवढे प्रयत्न केले असतील तितकेच, कदाचित त्यापेक्षा थोडे जास्तच प्रयत्न आम्ही आमच्या चंद्र अभियानासाठी केले असतील.

यात काही जणांच हे अभियान अगदी पहिल्या किंवा कमी प्रयत्नात यशस्वी झाल. काहींच्या अभियानाला (चंद्र) ग्रहण लागल. तर काहींना त्याच चंद्रमूखीच्या मुलांनी मामा…. मामा…. म्हणत त्यांच्या मनापासून केलेल्या अभियानाचा आणि त्यांचा अक्षरशः मामा केला.

भारताने ज्या चंद्रावर यान पाठवल त्याच चंद्रावर इतर देशांनी देखील आपल्या आधी आपल यान पाठवल आहे. काही पाठविण्याच्या तयारीत असतील. पण कोणीही हा चंद्र माझा….. असा हक्क सांगायचा प्रयत्न केला नाही. पण आमच्या या चंद्रमूखी अभियानात मात्र तो चंद्र (मिळाला तर‌‌……. ) माझाच राहिल असा हट्ट होता. कारण त्याच चंद्रासाठी इतरांच्या देखील मोहीम सुरू आहेत याची जाणीवच नाहीतर पक्की खात्री होती. आम्ही सोडून दुसऱ्यांच हे अभियान यशस्वी झाल तर मात्र आमचं ते अभियान तिथेच आणि लगेच थांबवाव लागत होत. एक मात्र होत………..

आकाशातला चंद्र एकच असल्याने आणि अजूनतरी कोणाचा त्यावर हक्क नसल्याने, देशांनी आखलेली चंद्र मोहीम सफल झाली नाही तरी दुसरी, तिसरी, किंवा पुढची प्रत्येक मोहीम ही त्याच चंद्रासाठी असते. आमच मात्र तस नव्हत. मोहीम अपयशी झाली तरीही आमचे पुढच्या मोहिमेसाठी अथक प्रयत्न सुरू असायचेच.. फक्त…….. या मोहिमेसाठी आम्ही चंद्रच बदलत होतो. कारण…. कारण दुसऱ्या चंद्राचे पर्याय होते.

सर सलामत तो पगडी पचास….. याच धर्तीवर “एक चंद्र मिळाला नाही तरी, होऊ नको हताश….. ” असा आशादायी कार्यक्रम होता.

कोणत्याही अभियानासाठी गरज असते ती मदतीची, आणि तिथल्या एकूण परिस्थितीच्या अभ्यासाची. मित्रांकडून मिळणारी मदत कमी नव्हती. तसच या बाबतीत आमचाही अभ्यास काही कमी नव्हता. किंबहुना याच अभ्यासाचा ध्यास होता.

या अभ्यासात आमच्या या चंद्राची भ्रमणवेळ, भ्रमणकालावधी, भ्रमण कक्षा यांची काटेकोर माहिती घेतली जात होती. तसेच त्या चंद्राच्या आजुबाजुला असणारी शक्ती स्थळ, परिणाम करणारे घटक (नातेवाईक, भाऊ, वडील), वातावरण यांचा योग्य तो अभ्यास झालेला असायचा. या त्याच्या भ्रमण काळात त्याच्या भ्रमण कक्षेत आमच यान (मित्राची काही वेळासाठी घेतलेली दुचाकी) साॅफ्ट लॅंडींग करु शकेल का? आणि चंद्राच्या जास्तीत जास्त जवळ जाता येइल का? याचाही अंदाज घेतला जात होता. यात बऱ्याचदा एक तर आमच यान वेळेच्या अगोदरच त्या कक्षेत प्रवेश करायच, आणि साॅफ्ट लॅंडींगच्या सुरक्षित जागेच्या शोधातच योग्य वेळ टळून गेलेली असायची. चंद्र आमच्या कक्षेच्या बाहेर गेलेला असायचा.

काही चंद्रांना याची जाणीव झाली असावी. कारण अचानक त्यांची भ्रमणवेळ, भ्रमण कक्षा, भ्रमण काळ बदलायचा. मग त्यांच्या भ्रमण मार्गाचा शोध घेतांना आमच्या यानातल इंधन (पेट्रोल) किंवा ठरलेली वेळ संपण्याच्या भितीने कक्षा सोडून परत फिराव लागायच.

चंद्राचे पर्याय असलेतरी काही चंद्र मात्र केव्हा, कुठे, आणि कितीवेळ दिसेल हे सांगता येत नव्हत. पण तो दिसलाच तर.. त्याची माहिती मात्र एकमेका साहाय्य करू…… या तत्वावर लगेच मिळत होती. किंवा दिली जात होती. अगदी त्या वेळी मोबाईल नसतांना सुध्दा. यात आपापसात स्पर्धा नव्हती.

अशा या चंद्र मोहिमेसाठी काहीवेळा गरज नसताना बाजारात गेलो. न आवडणाऱ्या कार्यक्रमांना सुध्दा हसत मुखाने हजेरी लावली. पण वेळ वाया गेल्याचच लक्षात आल. कारण नेमकं कोणीतरी मधे असायचं आणि चंद्र झाकला जायचा. आणि संपर्क करण्यात अडचण व्हायची. यासाठी गरज नसतांना लायब्ररी किंवा काॅलेजच्या रीडिंग रुम मध्ये मुक्काम ठोकला. आर्टस्, सायन्स, काॅमर्स अशा सगळ्या विभागातून फिरलो…….

आशी मोहीम काही काळ सुरुच होती. (आता ही मोहीम केव्हा थांबवली हे मात्र विचारु नका. पण ती केव्हाच आणि कायमची थांबली आहे हे खरं आहे. ) त्यातलेच काही चंद्र आता मात्र चंद्रकोर न राहता पौर्णिमेच्या चंद्रासारखे गोल गोल झाले आहेत. एखाद छान शिल्प किंवा चित्र ज्या बारकाईने पहाव तस ज्यांना पूर्वी बघत होतो तेच चंद्र आता पुस्तकाची पानं चाळल्यासारख (दिसले तरच) वर वर चाळले जातात. आता ते डोळ्यांना दिसले नाही तरी फरक पडत नाही. काही तर अमावस्येच्या चंद्रासारखे लुप्त झाले आहेत. पण त्यासाठी कोणतही अभियान नाही.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “एक दिवा त्यांच्यासाठी…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “एक दिवा त्यांच्यासाठी…” ☆ सौ राधिका भांडारकर 

एक दिवा त्यांच्यासाठी..

दुरितांचे तिमिर जावो

विश्व स्वधर्म सूर्ये पाहो

जो  जे वांछील तो ते लाहो

प्राणीजात।।

खरोखरच माऊलीने मागितलेलं हे पसायदान किती अर्थपूर्ण आहे!  यातला संदेश वैश्विक आहे. त्रिकालाबाधित  आहे .

आज दिवाळी सारखा प्रकाशाचा सण साजरा करत असताना मनात असंखय विचारांचं जाळं विणलं जातं. दिवाळी म्हणजे उजळलेल्या पणत्या, रंगीत रांगोळ्या, वातावरणातला तम सारणारे कंदील, खमंग —मधुर फराळ, नवी वस्त्रे, गणगोतांच्या भेटी, आणि अनंत हार्दिक शुभेच्छा. आनंद, सुख समाधानाच्या या साऱ्या संकल्पना. पण या पलीकडे जाऊन विचार केला तर असं वाटतं कुठेतरी यात “मी” “ माझ्यातले अडकले पण” आहे फक्त. यात प्रवाहापासून लांब असलेल्या, वंचित, उपेक्षितांच्या जीवनातही आनंदाचा उजेड पडावा यासाठी काही केले जाते का आपल्याकडून ?अनोख्या चैतन्याने आणि मांगल्याने भारणारा हा सण आहे.  पण या चैतन्य उत्सवाच्या तरंगात सर्वव्यापीपणा अनुभवास येतो का? आपण आपल्यातच मशगुल असतो.  आपल्या पलीकडे काय चाललं आहे, इतर जन कोणत्या अवस्थेत आहेत याचा विचार सहसा आपल्या मनाला स्पर्श करत नाही. आपल्या पलीकडल्यांचा विचार करणे हे या निमित्ताने गरजेचे वाटायला नको का?  केवळ आर्थिक विषमतेच्या पातळीवरच नव्हे, तर मानसिक आधाराच्या दृष्टीनेही ते गरजेचे आहे.  आनंद सुख समाधानाचे भाव केवळ आपल्या आपल्यातच अनुभवण्यापेक्षा  विवंचनेत असणाऱ्या, परिस्थितीने गाजलेल्या, वंचित, उपेक्षित कारण परत्वे कुटुंबाने व समाजानेही नाकारलेल्या, टाकलेल्या व्यक्तींच्या जीवनातले काही क्षण या सणाच्या निमित्ताने आपण उजळण्याचा का प्रयत्न करू नये?

माझ्या मनात बालपणापासून जपलेली एक आठवण आहे. खरं म्हणजे आज त्या आठवणीला मी एक संस्कार म्हणेन.  बाळपणीच्या त्या दिवाळ्या स्मरणातून जाणे ही अशक्य बाब आहे.  एका  गल्लीतलं एकमेकांसमोर असलेल्या एक खणी दोन खणी घरांच्या वस्तीतलच  आमचंही घर.  तिथली माणसं ,तिथलं वातावरण ,तिथले खेळ, सण, विशेषता दिवाळीची रोषणाई, पायरीवरच्या मंद पणत्या, ओटीवरच्या रांगोळ्या आणि एकमेकांच्या घरी जाऊन केलेले फराळ हे सतत फुलबाजी सारखे मनात उसळत असतात.  पण या साऱ्या आनंदाच्या उन्मादात एक आकृती मात्र विसरता येत नाही.  वृद्ध, थकलेल्या गात्रांची, काशीबाईच्या घराच्या बाहेरच्या ओसरीवर कधीतरी कुठून तरी आश्रयाला आलेली.  नाव, गाव ,स्थान कशाचीच माहिती नसलेली एक उपेक्षित अनामिका.  पण अभावीतपणे ती या गल्लीची कधी होऊन गेली हे कळलेच नाही.  आणि कुठलाही सण असो सोहळा असो गल्लीतली सगळी माणसं प्रथम तिचा विचार करायचे.  पहिला फराळ तिला पोहोचवला जायचा.  आम्ही गल्लीतली मुलं तिच्या पायरीवर पणत्या लावायचो. रांगोळ्या काढायचो. काशीबाईंनीही  तिला तिचा ओसरीवरचा आश्रय कधीही हलवायला सांगितले नाही.  या ऋणानुबंधाचा अर्थ तेव्हा कळत नव्हता पण त्या सुरकुतलेल्या अनामिकेवरच्या चेहऱ्यावरची आनंदाची लकेर आम्हाला खरा सणाचा आनंद द्यायची. आणि ती लकेर तशीच आजही मनात जपून आहे.

या सणानिमित्ताने भावंडात होणारी वाटणी कशाचीही असू दे ,फराळाची, नव्या कपड्यांची. फटाक्यांची पण त्या सर्वांमधून बाजूला काढलेला एक सहावा हिस्सा असायचा. तो घरातल्या मदतनीसांच्या मुलांचा, रोज रात्री “माई” म्हणून हाक मारणाऱ्या त्या भुकेल्या याचकाचा, जंगलातून डोक्यावर जळणासाठी सालप्याचा भार घेऊन येणाऱ्या आदिवासी कातकरणीचा आणि घटाण्याच्या मागच्या गल्लीत  वस्ती असलेल्या तृतीयपंथी लोकांचाही.  त्यावेळी सहजपणे, विना तक्रार, विना प्रश्न होणाऱ्या या क्रियांचा विचार करताना आता वाटतं, वास्तविक तेव्हा हे उपेक्षित, वंचित, प्रवाहापासून दूर गेलेले कुणीतरी बिच्चारे म्हणून मुद्दाम का आपण करत होतो ? तेव्हा या विषमतेचा भावही नव्हता. तो केवळ एक रुजलेला उपचार होता. पण तरीही नकळत “कुणास्तव कुणीतरी” हा संस्कार मात्र मनावर बिंबवला गेला.  या एका जीवनावश्यक सामाजिक संवादाची गुणवत्ता,आवशक्याता  जाणली गेली हे मात्र निश्चित आणि पुढे वाढत्या वयाबरोबर हे पेरलेले बीज अंकुरित गेलं.

इनरव्हील क्लब ची प्रेसिडेंट या नात्याने आम्ही दिवाळी सणांचे काही उपक्रम राबवत असू. वृद्धाश्रमातील फराळ भेट असे, रिमांड होमच्या मुलांबरोबर तिथेच फराळ बनवण्याचा कार्यक्रम असायचा, तसेच रांगोळ्या फटाके वाजवणे अशी धम्माल त्या मुलांबरोबर करताना खरोखरच एक आत्मिक समाधान अनुभवले.  तांबापुरा वस्तीत घरोघरी जाऊन पणत्यांची रोषणाई केली, फराळ वाटप केले ,कपडे, शाली त्यांना दिल्या आणि हे संवेदनशील मनाने  केले. केवळ पेपरात फोटो येण्यासाठी नक्कीच नव्हे. रोटरी, इनरव्हील तर्फे आजही या सणांचं हे भावनिक बांधिलकीच रूप पाहायला मिळतं. शिवाय समाजात “एक तरी करंजी” सारख्या तरुणांच्या संघटना आहेत, जे स्वतः आदिवासी पाड्यावर जाऊन त्यांच्या समवेत दिवाळी हा सण धुमधडाक्यात साजरा करतात.

अमळनेरला माझ्या सासरी पाडव्याच्या दिवशी घरातले सर्व पुरुष प्रथम धोबीणी कडून दिवा उतरवून घेतात. तिला ओवाळणी देतात. खूप भावुक असतो हा कार्यक्रम. धोबीणी कडून दिवा उतरवून घेणे आजही शुभ मानले जाते. या प्रथा गावांमध्ये आजही टिकून आहेत. विचार केला तर असे वाटते, हर दिन त्योहार असलेल्यांसाठी हे सण नसतातच.  ज्यांच्या घरी रोजची चूल पेटण्याची विवंचना असते त्यांच्यासाठीच या सणांचं महत्त्व असतं आणि म्हणून सण साजरा करताना त्यांची आठवण ठेवून काही करण्यात खरा आनंद असतो

दिवाळीच असं नव्हे तर कुठलाही सण साजरा करताना अगदी सहज आठवण येते ती निराधार, बेघर, रस्त्यावर झोपणाऱ्या असंख्य लोकांची. भविष्याचा अंधकार असणाऱ्या, उघड्या नागड्या उपासमारीत वाढणाऱ्या मुलांची, दुष्काळामुळे हातबल झालेल्या शेतकऱ्याची, जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची, शरीराचा बाजार मांडणार्‍या  लालबत्ती भागातल्या असाहाय्य, पीडित, लाचार स्त्रियांची, कुटुंबाने नाकारलेल्या लोकांची, सीमेवर राष्ट्रासाठी स्व सुखाकडे पाठ फिरवून प्राणपणाने थंडी, वारा, ऊन पावसाची पर्वा न करता सीमेचं रक्षण करणार्‍या सैनिकांची, त्यांच्या कुटुंबीयांची, अनाथ —अपंगांची ,सुधार गृहात डांबलेल्या, विस्कटलेल्या मुलांची. कोण आहे त्यांचं या जगात? त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची कोणाची  जबाबदारी?  या समाज देहाचा तोही एक अवयवच आहे ना मग एक तरी पणती त्यांच्या दारी आपण लावूया. स्नेहाची, अंधार उजळणारी.

एक तरी करंजी त्यांना देऊया.  एक मधुर, भावबंध साधणारी.

एक फुलबाजी त्यांच्यासमवेत लावूया. ज्याने त्यांच्याही चेहऱ्यावर हास्याची कारंजी उसळतील.

नकारात्मक बाबींच्या अंधकारावर प्रकाशाचे असे चांदणे पेरूया. 

आपल्या भोवती असंख्य अप्रिय घटनांचा काळोख पसरलेला असला तरी अवघे विश्व अंधकारमय नाही. सत्याचे, दातृत्वाचे, चांगुलपणाचे, सृजनशीलतेचे असंख्य हात समाजात कार्यरत आहेत.  जे पणती म्हणून सभोवतालचा अंधकार छेडण्याचे कार्य करत आहेत. आपणही अशीच त्यांच्यातली एक मिणमिणती  पणती होऊया.तिथे जाणीवांचा,संवेदनाचा उजेड पेरुया..

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणीतला क्षण… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ आठवणीतला क्षण… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

तो फेब्रुवारी महिना होता. बाहेर उन मी मी म्हणत होते. आम्ही गावी चाललो होतो. अन्शीच्या घाटातून गाडी वळणे घेत जात होती. शिशिराचे आगमण झाल्यामुळे पानगळ चालू होती. झाडांची पाने गळून झाडे नुसत्याच फांद्याबरोबर झुलत होती. येरवी गर्दहिरव्या घनदाट झाडीतून न दिसणारी घरे तुरळक दिसत होती. भोवताली गर्द झाडी आणि कुठेतरी ओहळातून शेतीसाठी तयार केलेले वाफे नजरेस पडत होते.  पहावे तिकडे घनदाट जंगल ,उंच डोंगर ,  कुठेतरी उतारावर दिसणारे चार घरांचे खेडे. उदरनिर्वाहासाठी केलेली भातशेतीची छोटी छोटी

वाफाडी .मुख्य रस्त्यावरून आत जंगलात  पायवाट जाताना दिसली की, लक्षात येते तिथे लोकवस्ती असेल. मनात विचार आला इतक्या प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेऊन कसे रहात असतील इथले लोक ?

गायींचे कळप रस्त्याच्या कडेने धुळ हुंगताना दिसत होते. त्यांच्या मागे कुणी राखणदार दिसत नव्हता.घनदाट झाडीतून पाखरांचे विविध आवाज कानावर पडत होते. आमची गाडी घाटातून वर आली तेंव्हा रस्त्याच्या कडेला एक चौदा-पंधरा वर्षाची मुलगी हातात रानफुलांचा हार घेऊन उभी दिसली.आम्ही गाडी थांबवताच तिचा चेहरा आनंदानी खुलला .तीने गाडी जवळ येऊन हातातील हार घेण्यास आम्हाला विनवू लागली. इतक्या रखरख उन्हात ती हार विकण्यास उभी होती. मला तिचे कौतुक वाटले. म्हणावे असे चांगले कपडे अंगावर नव्हतेच. तिच्या कपड्यावरून तिची गरिबी जाणवत होती.

हार पुढे करून ती आम्हाला विनवू लागली,” दहा रूपयाला हाय!घ्या यकच राहिलाया “.

मी तिला विचारले ,” इथे घर तर दिसत नाही. तू कुठे रहातेस?”.

तिने झाडीतून दुर बोट दाखवत एक घर दाखविले आणि स्मितहास्य करत म्हणाली  “तिथं “.

नंतर मी विचारले, “हा हार कुणी गुंफला “.

तीने लगेच सांगितले  ,मी फुलं आणून दिली. आणि आजीनं हार बनवला. मी शाळेत जायाच्या आधी फुलं आणून ठेवती.आजी हार बनवून देती . शाळेतनं आल्यावर रोजच मी हार इकायला इथं उभी रहाती .आईला तेवढीच मदत ह्युती खर्चाला “

ती मोठ्या धैर्याने बोलत होती. ती पुन्हा कविलवाणी होऊन आम्हाला आम्हाला हार घेण्यास विनवू लागली.मी तिला विस रूपये देवून  तिच्या कडून हार घेतला.  लगेच ती दहा रूपये परत करू लागते मी म्हटले  “राहुंदे ठेव तूला”.

पैसे पाहून तिचा चेहरा आनंदात उजळतो. ती खूप आनंदी होते.

आम्ही पुढे निघून गेलो. पण त्या मुलीचा गोड, आनंदी चेहरा कितीतरी वेळ नजरेत रेंगाळत राहिला. लोक रोज हजारानी पैसे कमावतात पण समाधानी नसतात. तो हार विकून विस रूपये मिळताच तिचा चेहरा आनंदानी फुलून गेला.  उन्हातान्हाचे ,घनदाट जंगलातून गेलेल्या रस्त्यावर हार विकून मिळालेल्या दहा-विस रूपयांचे पण केवढे  ते समाधान ! केवढा आनंद! .आपण किती पैसे कमावले तरी आपला हव्यास संपत नाही. त्या निरागस , गरीब ,  कोवळ्या वयातील  मुलीला आपली आजची गरज भागली या कल्पनेनेच किती आनंद झाला.  खरा आनंद हाच असेल का ?आपल्या मुलांना आपण किती  खाऊ   महागाची खेळणी आणून दिले , तरीपण त्यांच्या मागण्या बंद होत नाहीत . वाढत्या वयासोबत त्यांच्या मागण्या सुध्दा वाढत जातात. पण प्रतिकूल परिस्थितीतून मिळालेले दहा-विस रूपये पण किती आनंद देतात हे त्या मूलीकडे पाहून कळले.

आम्ही घरी पोहचेपर्यंत तो  रान फुलांचा हार सुकून गेला . पण त्या मुलीच्या चेहर्‍यावरचा आनंद तसाच ताजाटवटवीत राहून कितीतरी दिवस मनात रेंगाळत

राहीला आणि त्या रानफुलांचा गंध मनाला सुखावत राहिला.

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फटाक्यांमागील भयानक वास्तव लेखक – पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

? विविधा ? 

☆ फटाक्यांमागील भयानक वास्तव लेखक – पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

सातवीत असतांना मी फटाक्याचा उद्योग सुरू केला. एवढासा मुलगा आणि एकदम लिस्ट वगैरे बनवून ‘श्री इंडस्ट्रीज’ या नावाने एकदम प्रोफेशनल पध्दतीने फटाक्यांचा व्यवसाय करतोय म्हटल्यावर ओळखीच्या लोकांनी माझ्याकडून फटाके घेऊन मला या व्यवसायात घट्ट उभं केलं. आज या फेसबूकवरही हे जाणणारे व मला मदत करणारे उपस्थित आहेत. माझा वैयक्तिक पातळीवरील हा पहिला “उद्योग-व्यवसाय”. याच व्यवसायाने मला खरतंर उद्योजक बनवलं.

सन १९९२ ते सन २००४ असं एक तप मी हा व्यवसाय केला. फटाक्याच्या या व्यवसायात पहिल्या वर्षी मला १८९२/- रूपये निव्वळ फायदा व उरलेले फटाके असा भरपूर फायदा झाला होता. सन २००४ साली शेवटच्या वर्षी याच धंद्यात मी ९, २०, ०००/- रूपयांचा निव्वळ नफा कमावला होता. झटपट फायदा मिळवून देणारा हा सिझनल धंदा खुप भारी वाटायचा. घरातील आर्थिक परिस्थिती मजबूत असल्यामुळे या फायद्यातील एकही रूपया कधीही आईबाबांनी घेतला नाही. करतोय धंदा तर करू दे फक्त हा विचार त्यांचा असायचा. त्यामुळे फटाका व्यवसाय याबाबत सर्व अधिकार माझेच होते.

सुरवातीला डंकन रोड (मुंबई), उल्हासनगर व शहापूर (ठाणे जिल्हा) येथील होलसेल दुकानातून फटाके घेता घेता सन २००४ सालापर्यंत मी फटाक्यांची पंढरी असलेल्या शिवकाशीहून (तामिळनाडू राज्य) थेट आयात करू लागलो होतो. वय वर्षे बारा ते वय वर्षे चोवीस या बारा वर्षात या धंद्यात इतकी भलीमोठी प्रगती झाली होती. असे असतानाही मी सन २००४ साली हा धंदा कायमस्वरूपी बंद केला.

गल्ली ते थेट तामिळनाडू राज्य असा प्रवास करत असताना व इतका फायदेशीर धंदा बंद करण्यामागचं कारण काय असावं?? काय घडलं असेल असं?? सर्वांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे.

फटाका इंडस्ट्री – दक्षिणेत गृह उद्योग ते मोठ्या कार्पोरेट लेव्हलवर फटाक्यांचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आपल्याकडे जसे स्त्रिया दोन पैसे मिळवण्यासाठी पापड लाटतात त्याच धर्तीवर तिथे फटाके वळले जातात. आपल्या येथील स्त्रियांच्या सुदैवाने पापड व्यवसायात कोणताही ज्वालाग्रही – केमिकल वा विषारी धोका नाही. फटाक्यांच्या व्यवसायात नेमकं उलट आहे.

तांबे, कॅडीनियम, शिसे, मॅग्नेशियम, जस्त, सोडीयम, सल्फर असे सर्वच विषारी घटक या उद्योगातील संबधित व्यक्तीला उघड्या हातांनी हाताळावे लागतात. त्याचे फार मोठे दुष्परिणाम होतात.

सगळ्यात भयानक बाब म्हणजे या उद्योगात ‘चाईल्ड ट्रॅफिकींग’ या गुन्हेगारी पध्दतीने देशभरातून लहान मुलं पळवून आणून जुंपली जातात. त्यांच्यावर काम करण्यासाठी अनन्वीत अत्याचार केले जातात. बहुतांश वेळा यातील मुली मोठ्या झाल्या की त्यांना वेश्याव्यवसायात विकले जाते. एकूणच फार मोठ्या प्रमाणावर चिमुकल्या जीवांचे आयुष्य बरबाद केले जाते.

हे झालं एक कारण..

दुसरं कारण म्हणजे या आधीच ज्वलनशील असलेल्या उद्योगाला मानवी हयगयीने व नैसर्गिक उष्णतेमुळे वारंवार लागत असलेल्या आगी व त्यात होरपळून मरणारे आपलेच निष्पाप बांधव.. कोणत्याही प्रकारची ॲन्टी फायर सिस्टम संबधित उद्योगात वापरली जात नाही. मोठे उद्योग केवळ शो म्हणून व कायद्यास दाखविण्यासाठी फायर इक्विमेंट ठेवतात. एखादा उद्योजक वगळता सर्वत्र ही सत्य परिस्थिती आहे. दरवर्षी या फटाक्यांच्या कंपन्यांना लागलेल्या आगीत अनेक जीव जातात. . काही होरपळून निघतात.

हे झालं दृष्य.. अर्थात दिसणारं.. तर न दिसणारं म्हणजे वर उल्लेख केलेल्या विषारी धातू व केमिकल्स नी हजारोंना विविध भयंकर आजार जडले आहेत. दुर्दैवाने यात महिला व मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याची अधिकृत आकडेवारी कधीही उपलब्ध होत नाही. सगळा प्रकार सर्वसामान्य फटाक्यांचे समर्थन करणारा विचारही करू शकत नाही इतके भयानक आहे.

दोष समर्थन करणारे यांचा नाही कारण ही भयानक वस्तुस्थिती त्यांना ज्ञातच नाही. ज्या दिवशी ही बाब फटाके समर्थक प्रत्यक्षात पहातील, समजून घेतील त्या दिवशी ते फटाक्यांचे समर्थन बंद करतील हे निश्चित. कोणताही हिंदू कधीही मेलेल्याच्या वा मरणार्‍याच्या टाळूवरील लोणी गोड असतं असं म्हणू शकत नाही.

सन २००४ सालातील डिसेंबरात मी पुढील वर्षाची ऑर्डर देण्यासाठी शिवकाशीस गेलो होतो. तोपर्यंत पत्रकारीता करू लागल्याने दुनियादारी समजायला लागली होती. आतापर्यंत समोर असूनही न दिसणारे सामाजिक प्रश्न समोर दिसायला, कळायला लागले होते. शिवकाशीतल्या त्या चार दिवसांनी फटाका इंडस्ट्री च्या काळ्या बाजू बद्दल खुप काही दाखवलं – शिकवलं. सर्वच सहनशक्तीच्या पलिकडचं होतं.

“जे आपल्या मनाला पटत नाही ते कधीही करायचं नाही. . मग काय वाट्टेल ते होऊ दे” हे धोरण माझं पहिल्यापासून फिक्स आहे.

“कायद्याचं काय हो ठरवलं तर अनेक मार्ग कायदा न मोडता अगदी कायदेशीररित्या काढता येतात. ” पण करायचाच नाही हा प्रकार. . शक्यच नाही ते. . तर विचारच का करा??

हा सर्व फटाक्यांचा फाटका प्रकार पाहिल्यावर खरंतर ताबडतोब हा सर्व प्रकार बंद करावा असे वाटले. वय लहान होतं. तितकी समज नव्हती. काहीतरी करायला हवं याने भडकलो होतो. दोन चार लोकांना ‘हे बंद करा’ वगैरे उपदेश – धमकी – बिमकी देऊन अखेर ऑर्डर न देताच घरी परतलो.

घरी बाबांनी मला समजावल्यावर मग आपल्या पुरता मी निर्णय घेतला आणि फटाक्यांचा व्यवसाय कायमस्वरूपी बंद केला.

एकटा काय करू शकतो हा विचार न करता आपण वैयक्तिक दृष्ट्या खुप काही करू शकतो हेच खरं. तेच मी ही केलं.

जोवर सर्वंकष फटाक्यांच्या उत्पादनावर बंदी येत नाही तोवर हे असेच चालणार. दिवाळी हा आनंदाचा मोठा सण आहे हे निश्चित परंतु तो आनंद कोणाच्या जीवावर उठणारा नसावा इतकेच..

फटाकाबंदीला केवळ ध्वनी वा वायू प्रदूषण या बाबीवर नक्कीच समर्थन नाही. कारण असे प्रदूषण करणारे इतरही अनेक उद्योग व प्रकार आहेत. फटाकाबंदीच स्वागत आहे ते केवळ निष्पाप लहानमोठ्या जीवांच्या अकाली कोमजणार्‍या आयुष्यासाठी. . . . .

लेखक – श्री पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ — श्रीमद् भागवत पुराण कथा ज्ञानयज्ञ … ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

सुश्री प्रज्ञा मिरासदार

स्व-परिचय 

प्रज्ञा मिरासदार. मूळ गाव पंढरपूर. द.मा. मिरासदार हे माझे दीर. शिक्षण- मराठी विषयात पदवी. मी संस्कृत व इतरही विषयांच्या ट्यूशन्स घेत होते. गाण्याच्या परीक्षा दिल्या आहेत. शास्त्रीय संगीतावर आधारित भजनाचे क्लासेस चालविले. सध्या एकच क्लास चालविते. अनेक विषयांवर लेख लिहिले आहेत. कविता करते. अनेक काव्यसंमेलनात कविता सादर केल्या आहेत. पारितोषिके मिळाली आहेत. प्रत्येक सहलीची प्रवासवर्णने लिहिणे, हा माझा छंद आहे. अमेरिकेत जितक्या वेळा गेले त्या प्रत्येक वेळेची प्रवासवर्णने लिहिली आहेत.

? विविधा ? 

☆ — श्रीमद् भागवत पुराण कथा ज्ञानयज्ञ … ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆ 

दि. २३ सप्टेंबरपासून यंदा श्रीमद्भागवत सप्ताह सुरू झाला. तो २९ सप्टेंबरपर्यंत चालला. अनेक मंदिरे, तीर्थक्षेत्रे, घरे, मठ इथे हा सप्ताह अत्यंत भक्तिभावाने साजरा होतो. तो ऐकण्यासाठी लोक गर्दी करतात. खरोखरच या ग्रंथात प्रचंड प्रमाणात ज्ञान आणि विज्ञान भरलेले आहे. हे श्रीमद् भागवत मूळ संस्कृत भाषेतूनच सांगितले आहे. सर्वसामान्य जनांना संस्कृत भाषा आकलनास अवघड असते. म्हणून पुण्यातील एक विद्वान पंडित कै. प्रा. डॉ. प्रकाश जोशी ( एम्. ए. पी.एच्. डी. ) यांनी आमच्यासारख्या सामान्य जनांसाठी त्या श्रीमद् भागवताचा सारांश सांगणारी सात पुस्तके मराठी भाषेत लिहिली आहेत.

त्यामधे नुसताच अनुवाद नाही तर पूर्ण भागवत पुराणाचा भावार्थ, त्यातील तत्वज्ञान त्यांनी उलगडून सांगितले आहे. शिवाय भाषा सोपी आहे. सुमारे ९० पृष्ठांचा प्रत्येक भाग आहे. त्यामध्ये त्यांनी सुरवातीलाच ही पुस्तके लिहिण्याचा उद्देश सांगितला आहे.ते म्हणतात की, कलियुगात नामस्मरण आणि श्रीमद् भागवत पुराण कथा श्रवण हाच एकमेव उपाय आहे.असे महर्षि वेदव्यासांनी म्हटले आहे. अनेक पुराणे वेदव्यासांनी रचली. तरीही भगवंताच्या अवतार स्वरूपांचे वर्णन करणारे भक्तिरसपूर्ण असे श्रेष्ठ पुराण भागवत पुराण रचल्यानंतरच त्यांना अतीव समाधान प्राप्त झाले होते.

हा भागवताचा ज्ञानदीप प्रथम श्रीविष्णु भगवंतांनी ब्रह्मदेवांना दाखविला. नंतर नारदमुनींना आणि नारदांच्या रूपाने भगवंतानेच महर्षि वेदव्यासांना दाखविला. व्यासमुनींनी त्यांचे पुत्र शुकाचार्य मुनींना दाखविला,तर शुकाचार्यांनी मृत्यूच्या वाटेवर असणाऱ्या राजा परिक्षिताला तो दाखविला.

राजा परिक्षित हा पांडवांचा नातू.  अतिशय न्यायप्रिय होता. धर्मानुसार आचरण व राज्य करीत होता.तो शिकारीस गेला असताना तहानेने व्याकुळ होऊन शृंग ऋषींच्या आश्रमात गेला. तिथे ऋषी ध्यानस्थ बसले होते. त्यामुळे त्यांचे लक्ष राजाकडे गेले नाही. याचा राग आल्यामुळे राजाने जवळच एक मरून पडलेला साप ऋषींच्या गळ्यात अडकविला आणि तो तिथून निघून गेला. थोड्या वेळाने शृंग ऋषींचे पुत्र शौनक ऋषी आश्रमात आले. त्यांनी शापवाणी उच्चारली की, ज्याने हे कुकर्म केले आहे, त्याला आजपासून सात दिवसांच्या आत तक्षक नाग दंश करून मारून टाकील. ऋषींचा हा शाप खराच होणार होता. त्या सात दिवसांत प्रायोपवेशन म्हणून परिक्षित राजा गंगानदी तीरावर नैमिषारण्यात राहिला. तिथे महामुनी शुकाचार्य आले. त्यांना राजा अनेक प्रश्न विचारीत राहिला आणि मुनी शुकाचार्य राजाला श्रीमद् भागवत कथा कथन करते झाले.अशी ही प्रस्तावना आहे.

भाद्रपद शुद्ध नवमी (किंवा अष्टमी ) पासून ते प्रोष्ठपदी पौर्णिमेपर्यंत सात दिवस भागवत पुराण सप्ताह ऐकण्याची, ऐकविण्याची परंपरा भारत देशात हजारो वर्षांपासून अव्याहतपणे चालू आहे. तसे त्याचे पारायण केव्हाही केले तरी चालते. त्यासाठी डॉ. प्रकाश जोशी यांनी सर्वसामान्य जनांसाठी ही सात अत्यंत श्रवणीय, भागवताचे पूर्ण सार सामावलेली पुस्तके मराठी भाषेत लिहिली आहेत. चार ते पाच तासात एक पुस्तक वाचून होते.

दुर्दैवाने लेखक डॉ. प्रकाश जोशी वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी अकालीच निधन पावले. त्यांच्या मृत्यूनंतर गीताधर्म मंडळाने ही सात पुस्तके प्रकाशित केली आहेत. मी स्वतः प्रतिवर्षी ही पुस्तके वाचते. माझ्या घरी श्रीमद् भागवत सप्ताह साजरा होतो. अत्यंत साधेपणाने पण भक्तिभावाने आम्ही सगळे मिळून तो संपन्न करीत असतो.

ती पुस्तके वाचल्यानंतर श्रीमद् भागवत वाचनाचे, श्रवणाचे पूर्ण समाधान मिळते. या सात पुस्तकांचे संक्षिप्त वर्णन मी पुढे काही भागात करीत आहे. सर्वांना ते वर्णन आवडेल अशी आशा करते.

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print