मराठी साहित्य – विविधा ☆ लोकसाहित्य – राजस बाळराजा – भाग-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ लोकसाहित्य – राजस बाळराजा – भाग – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

‘जात्याला ईश्वर मानून आपले मन त्याच्याशी मोकळे करताना स्त्रियांनी आपल्या भाव-भावनांच्या शेकडो गोण्या उकललेल्या आहेत’, असं सरोजिनी बाबर म्हणतात. या गोण्यांपैकी एक महत्वाची गोणी म्हणजे ‘बाळराजा’वर गायलेल्या ओव्यांची. मुलाला जन्म देण्यात स्त्री जीवनाची सार्थकता आहे, असं मानणारी बाई मूल व्हायला थोडा वेळ लागतो आहे, हे बघताच लगेचच  नवस-सायासावर उतरते.

देवाच्या देवळात नंदीला कोरा शेला। सावळ्या सखीनं पुत्रासाठी नवस केला।। (इथे कधी कधी ओवी गाणारी आपलं नावही घालते. जसं की मागते तान्हे बाळ उषाताई किंवा मंदाताई  वगैरे… वगैरे…

नवसानं किंवा निसर्गानं सखीला दिवस जातात. मग सुरू होतो डोहाळगीतांचा कल्लोळ. बाळ झालं की त्याचं किती कटुक करू आणि किती नको, असं आईला होऊन जातं. ती म्हणते, ‘पालख पाळणा। मोत्याने गुंफला। त्यात ग निजला नंदूबाळ।।’ इथेही जी ती आई आपल्या मुलाचे नाव घेते. बाळराजा असंही कुठे कुठे म्हंटलेलं दिसतं. पालख पाळणा म्हणजे पालखीसारखा पाळणा. सतत हलता. पालखी नाही का सतत पढे पुढे जाते, तसा पाळणा हलत असतो. ‘पालख पाळणा’ऐवजी कुठे कुठे सोन्याचा पाळणा’ असंही म्हटलेलं दिसतं.

तुकारामांनी म्हंटलय ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने… शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू.’ इथे स्त्री गीतांतून शब्दरत्नांचं वैभव अनेक ठिकाणी लखलखताना दिसतं. काही काही ओव्यातून शब्द शस्त्रेही झालेली दिसतात.

झोप आली की बाळाला दूध हवं. मग आई गाईला सांगते, ‘ये ग तू ग गाई। चरून भरून। बाळाला दूध देई। वाटी भरून।।’ बाळाला दूध पाजलं. वाटी रिकामी झाली. इतक्यात तिथे मांजर आलं. मांजराने वाटी चाटली. पण वाटी रिकामी. तशी ते रागावलं. पण बाळावर मांजरसुद्धा रागावलेलं आईला खपत नाही. मग ती म्हणते,  ‘रिकामी वाटी। मंजर चाटी।। मंजर गेलं रागानं। तिथेच खाल्लं वाघानं।।’

बाळाचं इतकं कौतुक, इतकं कौतुक आईला वाटतं की त्याच्या हगण्या ओकण्याचंही कौतुक करणार्‍या ओव्या ती गाते. बाळाची ओकी काशी? तर दह्याची कवडी जशी. बाळाची शी कशी? तर हळदीचा पिंडा जशी, असं ती म्हणते.

बाळ मोठं होऊ लागतं. ‘दुरडी दळण।  लागयतं कोण्या राजाला ग। दुरडी दळण दळणारी अभिमानाने म्हणते, ‘बाळयाच्या घरी  माझ्या। गोकुळ नांदतं ग।।’ दळणारीच प्रश्न करते आणि दळणारीच उत्तरही देते. पूर्वी एकत्र कुटुंब असायचं. घर मुला-मोठ्यांनी गजबजलेलं शिवाय समृद्धही म्हणून ती म्हणते, माझ्या बाळाच्या घरी गोकुळ नांदतं. गोकुळ या शब्दातून घराचा ऐसपैसपणा, समृद्धी, आनंद सगळच सूचित होतं. पण हा शब्द काही तिने विचारपूर्वक, ठरवून वापरलेला नाही. तो उत्स्फूर्तपणे दळता दळता, गाता गाता आलाय. उत्स्फूर्तता हे लोकसाहित्याचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. बहिणाबाई म्हणतात, ‘दळण मी दळितसे, जात्यातून पडे पिठी। तसं तसं माझं गाणं, पोटातून येतं ओठी।। जात्यातून पीठ पडावं इतक्या सहजपणे, ‘दळिता, कांडिता, अंगण झाडता, सडा-संमार्जन करता’ स्त्रियांनी ओव्या गायल्या आहेत.

उगवता सूर्यही बाईला तान्ह्या बाळासारखा वाटतो. ती म्हणते, ‘ उगवला नारायण। उगवता तान्हं बाळ। शिरी सोन्याचं जावळ।।’ आता तो आणखी थोडा वर येतो. तिच्या उंबरठ्याशी येतो. मग ती म्हणते,’ सूर्य तो नारायण। अग चढूनी आला वरी। राजस बाळासंग। कर दूधभाताची न्याहारी।।’ यात माया आहेच. पण सकाळी उठून ‘दुरडी दळण दळून, सडा संमार्जन करून आपली न्याहारीही तयार करून झाली आहे.’ हेही ती मोठ्या खुबीनं सांगते.

सूर्य उगवताना उगवती लाल झाली आहे. त्याची लालस छटा अंगणावरही पडली आहे. ती म्हणते, ‘उगवला नारायण। उगवती झाली लाल।

राजस बाळ माझं। खेळे अंगणी मखमल।।’  बाळ राजस आहे आणि अंगण मखमलीसारखं.  बाळाच्या आईनं ते इतक्या निगुतीनं सारवलय की बाळाच्या पायाला त्याचा स्पर्श मखमलीसारखा वाटावा. इथे मऊ अंगणासाठी आणि त्यावर पसरलेल्या लालस छ्टेसाठी मखमल हा शब्द किती सहजपणे आलाय.

बाळ मोठं होतं. दुडुदुडू धावू लागतं. चुरुचुरू बोलू लागतं  आई अप्रूपानं  म्हणते, ‘झोपाळ्याची कडी। कशी वाजते कुरूकुरू। बोलतो चुरूचुरू। नंदूबाळ।।’ इथे प्रत्येक आई आपल्या मुलाचं नाव घेते. लोकसाहित्य परिवर्तनशील होतं ते असं. इथे झोपाळा सतत हलतो आहे. बाळ सतत बोलतो आहे. हे सातत्य.  तसच साम्य आहे, कडीचा कुरुकुरू आवाज आणि बाळाच्या चुरूचुरू बोलण्याचा आवाज. म्हणजे ध्वनीसाम्यही  इथे आहे. प्रथम जिने ही ओवी म्हंटली, ती तिची वैयक्तिक रचना होती. नंतर बर्‍याच आपल्या बाळाबद्दल, त्याचं नाव घेऊन ही ओवी म्हणू लागल्या आणि वैयक्तिक रचना सामाजिक झाली. लोकसाहित्याचं हेच वैशिष्ट्य.

क्रमश:  पुढील लेखात राजस बाळराजा – भाग 2

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लोकसाहित्य – जात्या तू ईश्वरा – भाग-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ लोकसाहित्य – जात्या तू ईश्वरा – भाग-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

एकएकटा राहणारा माणूस समूहाने टोळ्या करून राहू लागला. पुढे त्यातून कुटुंब व्यवस्था निर्माण झाली. परस्परांच्या भावना , विचार व्यक्त करण्यासाठी आधी हालचाल, हावभाव, मुद्राभिनय, ध्वनी इ. चा वापर व्हायचा. हळू हळू भाषा विकसित होऊ लागली. भाषेद्वारे आपले विचार, भावना अधीक परिणामकारकपणे व्यक्त करता येऊ लागल्या. तेव्हापासून लोकवाङमय निर्माण होऊ लागलं असणार. शेतीचा शोध लागल्यानंतर मानवी संस्कृती अधिकाधिक विकसित होऊ लागली. संस्कृतीबरोबरच भाषाही विकसित होऊ लागली. भाषा विकासाबरोबरच वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण लोकवाङमय निर्माण होऊ लागले. लोकसाहित्य तर भाषा विकासाच्या आधीपासून निर्माण झाले असणार. लोकसाहित्य हा शब्द व्यापक आहे. त्यात लोकवाङमयाबरोबरच चित्रकला, संगीत, नृत्य इये. अनेक लोककलांचा समावेश होतो.  तरीही बहुतेक वेळा लोकसाहित्य हा शब्द लोकवाङमय याचा समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. या लेखातही लोकवाङमय या अर्थी लोकसाहित्य हाच शब्द वापरला आहे.

लोकसाहित्याची परंपरा अतिशय पुरातन आहे. डॉ.  तारा भावाळकर म्हणतात, ‘लोकसाहित्याची मुळे प्राचीन वैदिक वाङमयात आढळतात.’  लोकसाहित्याची व्याख्या अनेकांनी केली आहे. त्यात भारतीय तसेच पाश्चात्य अभ्यासकही आहेत. त्या आधारे त्याची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. ते मौखिक किंवा अलिखित स्वरुपात असते. ( अर्थात मुद्रण शोधांनंतर अलीकडच्या काळात त्यांची संकलने प्रकाशित झाली आहेत.  एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे ते संक्रमित होते. त्यात पारंपारिकता असते. हे व्यक्तीने निर्माण केलेले असले, तरी त्याला असे स्वरूप प्राप्त होते की ते व्यक्तीचे न राहता समाजाचे बनते. लोकसाहित्यातून लोकसंस्कृतीचा आविष्कार जसा होतो, तसाच तो व्यक्तीच्या भाव-भावना, विचार, अनुभव , प्रकृती, प्रवृत्ती यांचाही आविष्कार होतो.

भारतातील प्रमुख भाषांच्या लोकसाहित्यात लोकसंस्कृतीचे काही समान घटक आढळतात. सर्व भाषांमधल्या लोकसाहित्यात विविध प्रसंगी गायली जाणारी, सण-उत्सवाच्या प्रसंगी गायली जाणारी गीते, शेता –शिवारात, घरात, काम करताना म्हंटली जाणारी श्रमपरिहाराची गीते, खेळगीते, ऋतुगीते अशी अनेक प्रकारची गीते आढळतात. लोकगीते पुरुषांनी आणि स्त्रियांनी दोघांनीही  रचली, म्हंटली आहेत. या लेखात मात्र विचार करायचा आहे तो स्त्री गीतांचा.

सरोजिनी बाबर म्हणतात, ‘भारतातील अन्य पारंपारिक स्त्रियांप्रमाणेच मराठी स्त्रियांनाही आपले मन मोकळे करता येईल, अशा जागा नाहीत. सासरचा त्रास माहेरी सांगणे हा मर्यादाभंग ठरतो. अशी स्त्री मग, जाते, उखळ, मुसळ, पाणवठा आशा आपल्या श्रमाशी अभिन्न असलेल्या निर्जिव वस्तूंनाच आपले सखे सवंगडी बनवून त्यांच्यापाशी आपले मन मोकळे करते. प्रसंगी आपल्या समवयस्क सखीशी मन मोकळं करून ती बोलते. शेजीबाईला उद्देशून तिने खूप ओव्या म्हंटल्या आहेत.’ आपल्या भावना, आपले विचार, आपले अनुभव, आपली जवळची, दूरची नाती याबद्दल तिने मोकाळेपणाने ओव्या गायल्या आहेत. यापैकी तिने आपल्या ‘बाळराजा’बद्दल, आपल्या ‘हावशा भ्रतारा’बद्दल, आपल्या ‘ताईता बंधुराजा’बद्दल, ‘तीर्थस्वरूप आई-वडलां’बद्दल जे जे म्हंटले आहे त्याचा, त्यातून व्यक्त झालेल्या तिच्या भाव-भावनांचा, अनुभवांचा आणि त्यातून दिसणार्‍या तिच्या स्थिती-गतीचा विचार इथे करायचा आहे. जवळच्या नात्यातून तिचे जे भावबंध उलगडत गेलेले दिसतात, तेवढ्यापुरतेच या लेखाचे विवेचन मर्यादित आहे.

क्रमश: ….. पुढील लेखात राजस बाळराजा

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ घडवं घडवं रे सोनारा….. भाग-2 ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

 ☆ विविधा ☆ घडवं घडवं रे सोनारा….. भाग-2 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

तेवढ्यात एका बदामाच्या आकाराच्या छोट्या संदुकीतून खुडबुड ऐकू येऊ लागली. सगळे तिकडे बघू लागले तर चार- पाच कर्णफुले, मोत्यांची कुडी, इअररिंग्ज, बुगडी आपापसात भांडताना संदुकीचे झाकण उघडले होते. आत एकत्र बसून त्यांचे अंग आंबले होते. कुडी कर्णफुलाला म्हणाली,“ मी या घरात सात पिढ्यापासून आहे. म्हणून सगळ्यांनी जपून ठेवलंय. तू काल- परवा आलीस आणि मिजास दाखवतेस होय? उर्मिला तर हल्ली तुझ्याकडे ढुंकूनसुद्धा बघत नाही. लग्नानंतर पहिल्या वाढदिवसाला तिच्या नवऱ्यानेच तुला तिच्यासाठी आणले. थोडे दिवस तुला भरपूर मान मिळाला आणि मग या इअररिंगची फॅशन आली. मग तुला माझ्याशेजारीच येऊन बसावे लागले. आता ही रिंग पण बाजूला पडली आणि उर्मिलेने नवीन फॅशनचे कानातले केले आहे. आधीच तू तुझ्या काट्याने मला सारखी टोचत होतीस आणि आता ही रिंग! सतत आपल्या रिंगणात आपल्याला अडकवत राहते. म्हणूनच आज सुटका करुन घेतली. मोकळ्या हवेवर किती बरे वाटतेय.” कुडी, कर्णफुले, इअररिंग्ज इकडे- तिकडे बागडू लागल्या तेवढ्यात उर्मिलेने खोलीत पाऊल टाकले. दागिन्यांच्या पेटीतील दागिने असे पसरलेले पाहून तिच्या लक्षात आले की हे लेकीचेच काम असणार! तिने रागाने लेकीला हाक मारुन विचारले असता लेक म्हणाली, “ अग ठेवतच होते ग आई! कोल्हापुरी साज नक्की असाच असतो का ते नेटवर बघत होते. आई अगदी तस्साच आहे  बरं का तो! आणि तो कंबरपट्टा आणि मोत्यांची नथ पण हवी आहे  मला उद्यासाठी!”  “ बरं बरं तुला काय हवंय ते घे यातले. पण बाळा, हे सगळे दागिने म्हणजे आपली आज्जी- पणजी यांची आठवण आहेत हो! त्यामुळे नीट नाजूकपणे ठेव. ती कानातली बघ कशी इकडे तिकडे विखुरली आहेत. ती नीट ठेव बघू. उद्या हे सर्व दागिने तुला आणि राजूच्या बायकोलाच देणार आहे मी!” त्यावर लेक लगेच म्हणाली,“ शी आई! असले दागिने कोण वापरतय आजकाल? मी आपली उद्याच्या दिवस कार्यक्रमासाठी घालणार. असले सोन्याचे दागिने हल्ली outdated झालेत ग. आजकाल प्लॅटिनमचे तरी वापरतात, नाहीतर फॅब्रिकचे दागिने एकदम बेस्ट! कोणत्याही ड्रेसवर चांगले दिसतात ग. जरा शिकले तर आपल्याला घरी पण करता येतात. मुख्य म्हणजे स्वस्त आणि use & throw ! उगाच सांभाळत बसायचे टेन्शन नाही.”

ते ऐकून उर्मिला काहीच बोलली नाही. पण एकेक दागिना हातात घेऊन ती हळुवार त्यावर हात फिरवू लागली. आपली सासू, आजेसासू, आई यांच्या एकेक आठवणी प्रत्येक दागिन्यातून तिच्या मनात फेर धरु लागल्या. मग हळुवार एकेक दागिना आत ठेवत ती मनातच म्हणाली, “ दागिन्यांची आवड प्रत्येक स्त्रीला जन्मजातच असते. भले ती वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या  प्रकारची असेल. पण एकही दागिना अंगावर नाही अशी बाई सापडणे विरळाच! अगदी आदिवासी भागात सुद्धा सोन्याचे नाहीत पण फुलांचे-पानांचे तरी दागिने त्या बायका अंगावर मिरवतातच. आणि दागिन्यांच्या फॅशन काय? आज येतात आणि उद्या जुन्या होतात. मी सुद्धा  काळानुसार काही काही दागिने नवीन फॅशनचे बनवून घेतलेच की!पण आता माझ्या लक्षात येतंय की पुन्हा जुन्याच दागिन्यांना नवीन लेबल लावले जाते आणि नवीन फॅशन म्हणून खपवले जाते. म्हणूनच माझा हा ठेवा मला जपून ठेवायला पाहिजे. कसले use& throw ? थोडे दिवसांनी त्याची पण फॅशन ही नवी पिढी throw करणार आणि या जुन्या दागिन्यांचा पुन्हा use करणार  हे नक्की! ” असे म्हणून तिने सर्व दागिने आपापल्या जागेवर पुन्हा नीटनेटके ठेवले. मालकीणीचा हात फिरल्याने खूष होऊन दागिन्यांनी पेटीत पुन्हा ऐटीत आपली जागा पटकावली आणि ते आनंदाने अधिकच झळाळू लागले.

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ घडवं घडवं रे सोनारा….. भाग-1 ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

 ☆ विविधा ☆ घडवं घडवं रे सोनारा….. भाग-1 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

“अरे ए, सरक ना बाजूला! जरा कुठे अंग पसरायला जागा नाही. शी बाई! या कंबरपट्ट्याने सगळीच जागा व्यापलीये. मोठ्ठा ‛आ’ वासून पसरलाय. आणि आजूबाजूला या मेखलाबाईंचा गोतावळा आहे. कशा नवरोबाना चिकटून बसल्या आहेत बघा. मेली लाज कशी वाटत नाही म्हणते मी! हल्ली या कंबरपट्याचा मान वधारलाय ना? म्हणून ही मिजास! त्याच्याच बाजूला या एकाच पेटीत आम्हाला आपले एका बाजूला अंग चोरुन घेऊन पडून घ्यावे लागतेय. आमचे म्हणजे त्या जीवशास्त्रातील अमिबासारखे आहे. मिळेल त्या जागेत, आहे त्या आकारात स्वतःला सामावून घ्यायचे. त्यामुळे कोणीही उचलावे आणि हवे तिकडे टाकून द्यावे.”

दागिन्यांच्या मोठ्या डब्यामध्ये एका बाजूला बसून या सोन्याच्या साखळीताईंची बडबड चालू होती.

तेवढ्यात पोहेहार तिच्याकडे सरकत म्हणाला, “ताई, कशाला वाईट वाटून घेतेस? अग, माझे तरी काय वेगळे आहे? मलाही आहे त्या जागेत कसेही कोंबतात ग. हे पदर एकमेकात अडकून कसा चिमटा बसतो हे तू अनुभवले नाहीस. माईंच्या लग्नात त्यांच्या सासूबाईंनी मला घडवले. माई होत्या तोपर्यंत किती हौसेने मिरवायच्या मला. पण माईंची सून उर्मिलेने एक दोनदा मला घातले आणि अडगळीतच टाकून दिले.  म्हणे मी outdated झाले आहे म्हणे. म्हणूनच ही अवस्था झाली आहे. अग साखळीताई, किमान वर्षातून लहान- सहान कार्यक्रमाला तरी तुला बाहेरची हवा मिळते. पण चिमटे बसून- बसून माझे अंग दुखू लागलंय बघ!”

त्याचवेळी एका सुंदरशा चौकोनी पेटीत मऊ गादीवर बसलेला कोल्हापुरी साज म्हणाला, “ इतके वाईट वाटून घेऊ नकोस रे दादा!  आता मिळतेय मला ही मऊमऊ गादी. पण मध्यन्तरीच्या काळात मलाही ही उपेक्षा सहन करावीच लागली आहे.  ‛रायाकडून’ हट्ट करुन करुन मला घडवून घेणाऱ्या या बायकांना काही दिवसांनी मी पण outdated वाटू लागलो. मग लागली माझी पण वाट! माझ्यातच गुंतलेल्या माझ्याच  तारेने- या बायकोने सारखे टोचून टोचून हैराण केले बघ मला. शेवटी बायकोच ती! पण एकदा एका पार्टीत उर्मिलेच्या मैत्रिणीने कोल्हापूरी साज ‛new fashion’ म्हणून घातला. तर काय? माझा भाव एकदम वधारला. उर्मिलेने पुन्हा माझी डागडुजी करून घेतली आणि मी झळकू लागलो. माझी बायको पण आता कशी शिस्तीत मला चिकटून बसली आहे बघ. आणि आता म्हणे उर्मिलेच्या लेकीचे कॉलेजमध्ये लावणी फ्यूजन आहे. त्यात मी हवाच आहे. म्हणूनच आपल्याला बाहेर काढले आहे आज आणि ही थोडी थोडी बाहेरची हवा चाखायला मिळते आहे. त्यामुळे थोडे सहन करा. कदाचित थोडे दिवसांनी पुन्हा तुमचे दिवस येतील.”

त्याच्याच शेजारी जोंधळ्यासारख्याच पण त्याच्यापेक्षा छोट्या छोट्या सोनेरी दाण्यांच्या नक्षीने सजलेली ठुशी समजूत काढत म्हणाली, “ नका रे एवढे निराश होऊ. शेवटी प्रत्येकाचे दिवस असतात हेच खरे. मला नाही कधी उपेक्षा सहन करावी लागली. अगदी जन्मापासून मी प्रत्येक बाईच्या गळ्यातला ताईत बनले आहे. माईंच्या सासूबाईंच्या आईने मला घडवून घेतले. त्यांच्यानंतर माई आणि आता उर्मिलासुद्धा अधूनमधून मला प्रेमाने मिरवतात. खूप वर्ष सेवा केल्यावर मध्यंतरी जरा आजारी पडले होते. पण माईंनी उर्मिलेच्या लग्नाच्या वेळी पुन्हा मला तंदुरुस्त केले आणि मी नवीन सुनेच्या गळ्यात तितक्याच दिमाखाने मिरवू लागले. त्यामुळे मी खूप पावसाळे पाहिलेत. म्हणूनच ‛एक ना एक दिवस प्रत्येकाचे चांगले दिवस येणार’हे माझे शब्द लक्षात ठेवा.”

तेवढ्यात एका कोपऱ्यात बसलेली पाटलीबाई मुसमुसत म्हणाली,“ तू म्हणतेस ते खरे ग ठुशीआज्जी! पण माझे काय? हल्ली हातात पाटल्या- बांगड्या घालायची फॅशन गेलीये म्हणे. माईंच्या सासूबाईंच्या लग्नात त्यांच्या सासऱ्यांनी चांगली पाच तोळ्याची आमची जोडी बनवून घेतली होती. माईच्या सासूबाईंचे वय अवघे आठ वर्षाचे ग त्यावेळी! बिचारी कशीबशी माझे वजन सांभाळायची. बरोबर बिलवर- तोडे या माझ्या भगिनी पण असायच्या ना ग! माई असेपर्यंत आम्ही सुखाने त्यांच्या हातावर नांदलो. उर्मिलेला मात्र रोज नोकरीवर जाताना सगळे हातात घालणे शक्यच नव्हते. तेव्हापासून आम्हा दोघींची रवानगी या छोट्या कोपऱ्यात झाली आहे. आणि आमच्या भगिनींचा मेकओव्हर करुन कंगन-ब्रेसलेटच्या रुपात अधून- मधून झळकतात उर्मिला आणि तिच्या लेकीच्या हातावर! मला मात्र घराण्याची आठवण म्हणून जपून ठेवले आहे हो! पण कधीतरी माझासुद्धा मेकओव्हर होईल की काय अशी भीती वाटत राहते. परवाच उर्मिलेचा राजू आईला सुनावत होता की ‛कसली घराण्याची परंपरा आणि काय? हे दागिने जपून ठेवून काय करायचे आहेत? त्यापेक्षा मला दे सगळे. त्याचे दुप्पट पैसे करुन देतो.’

पण उर्मिला काही बधली नाही हो त्याला. म्हणून आपण सगळे वाचलो आहोत आज.” “ हे बाकी खरे हो!” छोट्याश्या पेटीत बसलेली टपोऱ्या मोत्यांची नथ म्हणाली.“ मला माईंचा हट्ट म्हणून त्यांच्या यजमानांनी मुलाच्या मुंजीत पुण्यात पेठे सराफांकडून बनवून घेतले. माई सगळ्या कार्यक्रमात अगदी हौसेने मला मिरवत. उर्मिलेने पहिल्यांदा हळदी-कुंकू, मंगळागौरीत मला मिरवले. पण तिच्या नाकाला काही माझा भार सहन होईना. मग तिने तिच्या पहिल्या भिशीच्या पैशातून माझी ही छोटी सवत ‘हिऱ्याची नथनी’ करुन घेतली. आता तिच तोरा मिरवत असते.”

क्रमशः…

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खानदेशी  पाहुणचार! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ खानदेशी  पाहुणचार! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे 

दरवर्षी हा थंडीचा सिझन संपता-संपता येणाऱ्या उन्हाळ्यात मला शिरपूरची आठवण येते. साधारणपणे चाळीस वर्षे झाली आम्हाला शिरपूर सोडून, पण तिथे राहिलेले एक-दीड वर्ष अजूनही मनाच्या कोपऱ्यात  आहे. पश्चिम महाराष्ट्रात राहणारे आम्ही बदलीच्या निमित्ताने खानदेशात शिरपूर येथे गेलो. एकदम नवखा भाग, बरोबर दोन लहान मुले आणि आपल्या गावापासून खूप लांब त्यामुळे मनात टेन्शन होतेच! पण बघूया, जसं होईल तसं, म्हणून सामानासह शिरपूरला गेलो.

सरकारी दवाखान्याच्या आवारात असलेला मोठ्ठा ब्रिटिश कालीन बंगला आम्हाला राहायला होता. घरात सहा-सात खोल्या, वर कौलारू छप्पर, मोठ्या खिडक्या आणि दोन-तीन घराबाहेर जाता  येणारी दारे ! प्रथमदर्शनीच मन एकदम प्रसन्न झाले.बंगल्याच्या भोवतीच्या जागेत मोठे लिंबोणीचं झाड, गाडी लावायला गॅरेज, बसायला प्रशस्त अंगण आणि काय पाहिजे! हा दवाखाना गावापासून थोडा लांब एका टेकाडावर होता. दवाखान्याभोवती डॉक्टरांचा बंगला आणि कंपाउंडर, नर्स, क्लार्क वगैरे लोकांची घरे होती.  त्यामुळे हा परिसर खास आपल्यासाठी होता ! आम्ही आल्याबरोबर सकाळी आसपासची सर्व मंडळी हजर झाली. कोणी चहाची, तर कोणी नाश्त्याची व्यवस्था केली. नंतर जेवणाची व्यवस्थाही झाली. घरातील सामान लावायला चार हात पुढे आले, त्यामुळे दोन छोट्या मुलांबरोबर सामान लावण्याच्या माझ्या कसरती ला मदत झाली. लवकरच आम्ही तिथे रुळून गेलो.

एक दीड वर्षाचा कालावधी पण मला खानदेशी जीवनाचा त्यानिमित्ताने झालेला परिचय यात लिहावासा वाटतोय! आम्ही तिथे गेलो तेव्हा प्रथम जानेवारी ची थंडी होती. सकाळी खूप गारठा असे आणि नंतर दिवसभर ऊन तापत असे, इतक्या गरम आणि विषम हवामानाची आम्हाला सवय नव्हती, पण थोड्याच दिवसात तेथील रुटीन चालू झाले. सगळेजण मला आणि ह्यांना ताई, दादा म्हणत असत, बोलणे गोड आणि वागणूकही मान, आदर दाखवणारी!

रोज सकाळी लिंबोणी खालचा कचरा काढायला शिपाई आला की त्याच्या झाडू च्या आवाजाने जाग येई. अंगणात सडा मारून रांगोळी काढणे इतकेच काम असे! नंतर येणारी लता, भिल्ल समाजाची होती. सतरा-अठरा वर्षांची ती मुलगी स्वभावाने गोड आणि कामसू  होती.  ताई,ताई करून ती घराचा आणि मुलीचा ताबा घेत असे.केरवारा, भांडी करता करता मला सगळ्या गावाची माहिती देत असे.

माझी छोटी मुलगी जेमतेम तीन महिन्याची होती, त्यामुळे तिला आंघोळ घालण्यासाठी  लताची आई येत असे. गॅस नसल्यामुळे एका वातीच्या  आणि पंपाच्या स्टोव्हवरच स्वयंपाक करावा लागत असे. दवाखान्यातील एक शिपाई  भाजीपाला किंवा इतर सामान आणून देत असे, तर दुसरा एक  शिक्षित होता, तो माझ्यासाठी लायब्ररीची पुस्तके बदलून आणत असे, असं राजेशाही आयुष्य चालू होतं आमचं!

त्यावेळी संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी लाईट जाणं हे नेहमीच असे. लहान मुलांना त्याचा खूपच त्रास होई.उकाडा खूप! लाईट नाही,पंखा नाही, त्यामुळे तिकडच्या लोकांप्रमाणे आम्ही विणलेली बाज खरेदी केली होती, ती अंगणात टाकून त्यावर संध्याकाळी गप्पा मारत बसायचे. तिथल्या बायकांना आपल्याकडील पदार्थ, राहणीमान याविषयी मी सांगत असे, तर त्यांच्याकडून तिकडचे पदार्थ शिकत असे. दादर चे पापड, मूग, मठाचे(मटकीचे) सांडगे तोडणे, कलिंगड, खरबुजाच्या बिया भाजून खाणे अशा बऱ्याच गोष्टी मला तिथे कळल्या! बऱ्याच घरातून संध्याकाळी फक्त खिचडी बनवली जाई. त्या सर्वांना आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांसाठी मी रोज संध्याकाळी पण पोळ्या, भाकरी करते याचे आश्चर्य वाटे! दवाखान्यातल्या सिस्टर खूप चांगल्या होत्या, उन्हाळी पदार्थ करताना त्या मला मुद्दाम बोलवत, आणि गव्हाचा शिजवलेला चीक  खाऊ घालत!

सगळीच माणसे सरळ आणि प्रेमळ मनाची होती.

तो दवाखाना विशेष करून बाळंतिणीचा होता. त्यामुळे रोज जवळपास एक दोन तरी डिलिव्हरी असायच्याच! खाण्यापिण्याची सुबत्ता असल्याने एकंदर तब्येती छानच असायच्या! एकदा तर एका बाईचं अकरा पौड वजनाचे बाळ डिलिव्हरी झाल्या झाल्या दुपट्यात गुंडाळून आणून सिस्टरनी  मला आणून दाखवले.ते पाहून मीच आश्चर्यचकित झाले!

खाण्यापिण्याच्या बाबतीत शिरपूर एकदम छान होते. छान दूध, तूप, खव्याचे पदार्थ मिळायचे. कलिंगडं, खरबूज यासारखी फळफळावळ मुबलक प्रमाणात असायची. शिरपूरच्या जवळून तापी नदी वाहते. त्यामुळे सर्व भाग सुपिक होता. शिरपूर जवळ’ प्रकाशे’ नावाचे तीर्थक्षेत्र आहे. तिथे तापी आणि गोमती नद्यांचा संगम  आहे.’प्रती काशी’

म्हणतात त्या तीर्थक्षेत्राला!

गव्हाची  शेती खुपच असल्याने उत्तम प्रतीचा गहू मिळत असे. शिरपूर मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांना जवळ असल्याने तिथल्या भाषेवर हिंदी आणि गुजराथी भाषांचा प्रभाव दिसून येई. आणि अहिराणी भाषा ही तेथील आदिवासींची खास बोली! ती आम्हाला फारच थोडी समजत असे. शैक्षणिक दृष्ट्या हा भाग थोडा मागास असला तरी काळाबरोबर हळूहळू सुधारणा  होत आहेत. येथील सर्वांना सिनेमाचे वेड भारी होते. गावात तीन सिनेमा टाॅकीज होती, दर आठवड्याला पिक्चर बदलत असे. आम्हाला सिनेमाची फारशी आवड नव्हती आणि आमची मुले लहान म्हणून आम्ही कधीच सिनेमाला जात नसू. पूर्ण वर्षभरात सिनेमा न बघणारे आम्हीच! माझी कामवाली सखी-लता, प्रत्येक पिक्चर बघून यायची आणि मला स्टोरी सांगत काम करायची! तीच माझी करमणूक होती. शिरपूर लांब असल्यामुळे नातेवाईक ही फारसे येऊ शकत नसत. पण शिरपूर चे तो काळ खूप आनंदात गेला तो तिथल्या लोकांमुळे! शिरपूर ची खास तूरीची डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी आणि कढी विसरणार नाही. दादरचे पापड, सांडग्यांचे कालवण, डाल बाटी, तर्हेतर्हेची लोणची, खास खव्याचे मोठे मोठे पेढे आणि आमरस-पुरणपोळी हे पक्वान्न अजून आठवते!तिथले तीनही ऋतू अनुभवले!उन्हाळा, हिवाळा पुन्हा पावसाळा! आणि पुन्हा आपल्या गावाकडे परतलो, पण अजूनही शिरपूर चा खास पाहुणचार आम्ही विसरलो नाही. बहिणाबाईंच्या लोक गीतातून  दिसणारे खास खान्देशी समाज जीवन, तेथील प्रेमळ आदरातिथ्य आणि  तेथील मातीची ओढ हे सगळं दृश्य रूप होऊन डोळ्यासमोर आले! इतक्या वर्षांनंतरही शिरपूर चे ते थोड्या काळाचे वास्तव्य मनाच्या कोपऱ्यात तिथल्या साजूक, रवाळ तुपासारखे स्निग्धता राखून ठेवलं आहे!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ते” होते म्हणून – भाग-4 ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

सुश्री राजलक्ष्मी देशपांडे 

☆ विविधा ☆ “ते” होते म्हणून – भाग-4 ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे 

पुण्यापासून जवळच केडगाव आहे. तिथली नारायण महाराजांची सोन्याची दत्तमूर्ती Bank of Maharashtra मधे असते आणि वर्षातून एकदा दर्शनासाठी बाहेर काढली जाते. महाराजांचं सोन्याचं सिंहासन होतं. संन्यस्त असून हे ऐश्र्वर्य असल्याने नारायण महाराज उगाचच गैरसमजाच्या धुक्यात होते. पण त्यांच्या कार्यामागचा अर्थ वडिलांनी समजाऊन सांगितलेला… सहज शेअर करावासा वाटतो.

तसे घरातून माझ्यावर सर्वधर्मसमभावाचे संस्कार झालेले. म्हणजे घरी पारंपरिक सणवार, पूजाअर्चा, स्तोत्रपठण आणि गीतापाठांतर असेच वातावरण असले तरी मशीद आणि चर्चची ओळख आवर्जून करून दिली होती वडिलांनी. सगळ्याच लोकांना आणि चक्क मार्क्सवादी लोकांनाही आमचं घर “आपलं” वाटायचं कारण साऱ्या विचारांचा स्वीकार व्हायचा.

तरीही धर्म हा विषय समाजजीवनावर परिणाम करतोच. केडगावात तेच होत होतं. मिशनरी लोक गरीब लोकांना फक्त खायला द्यायचे आणि धर्मांतर करायचे. पंडिता रमाबाईंचं मिशनही कडेगावातच आहे. अर्थात तिथे आश्रयाला येणाऱ्या स्त्रियांवर धर्मांतराची सक्ती नसे… पण स्वतः रमाबाईंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.

पुन्हा दयानंदांच्या वेळचाच मुद्दा इथेही लक्षात घ्यायला पाहिजे. एक विचार केवळ धाकानं किंवा पैशानं का नष्ट करायचा? शिवाय राजकीय विषयही होताच हा. ब्रिटिशांचा धर्म स्वीकारला की त्यांची गुलामी बोचणारच नाही. मग देशाचं आर्थिक शोषण, आत्मविश्वास संपणं सगळं आलंच….यासाठी भुकेमुळं होणारं धर्मपरिवर्तन थांबवणं गरजेचं होतं. हिंदुस्थानच्या धार्मिक बाबीत ढवळाढवळ करणार नाही अशी राणीची पॉलिसी होती. म्हणून नारायण महाराजांनी एकशेआठ सत्यनारायण रोज करण्याची पद्धत सुरू केली. त्यासाठी खास रेल्वेच्या वॅगन मधून तुळशी यायच्या. प्रसाद म्हणून मोठे वाडगे भरून प्रसाद सगळ्यांना द्यायचे. गोरगरीबांना साजूक तुपाचा उत्तम शिरा पोट भरून दिला जायचा. एकच माणूस पुन्हा आला तरी त्याला पुन्हा दिला जायचा. या एका गोष्टीमुळे भुकेपोटी होणारं धर्मपरिवर्तन थांबलं. आपलं कार्य संपल्यावर सगळं ऐश्र्वर्य सोडून एका वस्त्रानिशी अवघ्या बत्तीसाव्या वर्षी नारायण महाराज केडगावहून निघून गेले आणि बंगलोर इथे राहून शेवटी त्यांनी देह ठेवला.

“नामस्मरण करून आनंदात राहावे” हा त्यांचा एकमेव उपदेश आहे.

नामस्मरण करावं हे ठीक आहे.. पण आनंदात राहावे हे तितकेच महत्त्वाचे आहे ना.. आनंदी राहण्यासाठी मनाला केवढी शिस्त हवी! एवढ्यातेवढ्याने रागवायचे नाही, कुणाचा हेवा करायचा नाही, कशाचा लोभ धरायचा नाही, निंदेला घाबरायचं नाही, समाधानी राहायचं तर आनंदात राहता येईल. थोडक्यात इतका स्वत:चा विकास विवेकानं करता आला तरच आनंद मिळणार. हा एवढा अर्थ भरला आहे या छोट्या वाक्यात.

श्रावणात घरोघरी सत्यनारायण पूजा सुरू झाल्या की मला केडगावच्या नारायण महाराजांची आठवण येते.

 

© सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

मो – 7499729209

(लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मत आहेत.)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आकाशाशी जडले नाते – श्री जयंत नारळीकर ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

 ☆ विविधा ☆ आकाशाशी जडले नाते – श्री जयंत नारळीकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

नाशिक येथे भरणार्‍या ९४व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माननीय वैज्ञानिक जयंत नारळीकर यांची निवड झाली त्या निमीत्ताने…. अर्थात् माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या व्यक्तीने एका प्रचंड बुद्धीमान व्यक्तीविषयी काही भाष्य करणे हे निव्वळ धाडसाचे…. नारळीकर हे मूळचे पारगावचे. तेथे ऐकलेल्या गोष्टीनुसार असे की, नारळीकरांच्या परसांत आंब्याची झाडे होती. आणि या आंब्याच्या झाडांना नारळा एवढे आंबे लागायचे, म्हणून त्यांचे नाव “नारळीकर” असे पडले.

डाॅ.जयंत नारळीकर यांची आत्मकथा “चार नगरातले माझे विश्व”

बनारस, केंब्रीज, मुंबई आणि पुणे….प्रत्येक संक्रमणाच्यावेळी, त्यांना आपण एक धाडस करतो असे वाटायचे. बनारसच्या शांत, सुखासीन जीवनपद्धतीला रामराम ठोकून परदेशात पदार्पण करताना आपण आपल्या माणसांपासून दूर एकटे आहोत ही जाणीव त्यांना व्यथित करायची… केंब्रीज सोडून भारतात परत येण्याचा निर्णय घेतला तेव्हां, “कशाला हे धाडस करता?”

हे विचारणारे अनेकजण भेटले. पण तेव्हांसुद्धा, देशबांधवांकरिता काहीतरी सकारात्मक आपल्या हातून घडावे हा विचार प्रेरक ठरला. एक प्रख्यात सुसंस्थापित संशोधनाची जागा सोडून दुसर्‍या नगरात, शून्यातून, आयुका ही नवीन संस्था निर्माण करण्याचे आवाहन स्वीकारणे हेही धाडसाचेच होते… बी.एस.सी. पदवी प्राप्तीनंतर, प्रचंड महत्वाकांक्षा मनात ठेऊन त्यांनी केंब्रीज विद्यापीठात पदार्पण केले.

रँग्लर किताब, टायसन स्मिथ्स, अॅडम्स आणि इतर अनेक सर्वोच्च मानाचे पुरस्कार मिळवत खगोलशास्रातील सापेक्षतावाद, पूंजवाद, गुरुत्वाकर्षण, विश्वरचनाशास्त्र यामधे विलक्षण संशोधनाचे टप्पे गाठत, करीअरचा आलेख सदैव उंचावर ठेवत गेल्याचा काळ म्हणजेच त्यांचे चौदा पंधरा वर्षाचे केंब्रीजमधील वास्तव्य.. एका परिषदेत इंग्लीश प्राध्यापकाने त्यांना व एका पाकिस्तानी विद्यार्थ्याला विचारले, “भारताचे विभाजन झाले, तेव्हां ज्या हिंदु मुस्लीम कत्तली झाल्या त्या भारताला किंवा पाकिस्तानला कां थांबविता आल्या नाहीत?”

नारळीकर ताबडतोब ऊत्तरले!  “विभाजन ब्रिटीशांनी घडवले! ते अस्तित्वात येत असताना,कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी ब्रिटीश सत्तेने पार पाडली असती तर ही दुर्दैवी घटना घडली नसती.”

पाकिस्तानी विद्यार्थ्यानेही या भाष्याला अनुमोदनच दिले. ते “ब्रिटीश” प्राध्यापक, गप्प, झाले. दोघांत भांडण लावून गंमत पाहण्याचे त्यांचे खोडसाळ धोरण त्यांच्यावरच ऊलटले.

स्वत:ला जागतिक कीर्तीच्या वैज्ञानिकांमधे आणि विज्ञानविश्वात सिद्ध केल्यानंतर स्वदेशी परतण्याच्या भूमिके बद्दल ते सांगतात, “माझ्या मनात परदेश वास्तव्याबद्दल एक ऊपरेपणाची भावना घर करत होती. सर्व छान असले तरी ही जागा माझी नाही. इथे मी पाहुणाच आहे. भारतात परतल्यावर विवीध गोष्टींसाठी करावी लागणारी धावपळ, कमी पगार, लालफीत, अधिकारशाही.. हे विचारात घेऊनसुद्धा मी आपल्या देशात, आपल्या माणसात आहे, ही भावना सगळ्यांवर मात करत होती…”

जीवनाबद्दलची कमीटमेंट त्यांना महत्वाची वाटते. ज्या देशाने त्यांना शिष्यवृत्ती देऊन यशाची वाट दाखवली, त्या देशाचं देणं द्यायला पाहिजे, हे महत्वाचं वाटतं.

स्वाक्षरी मागण्यार्‍या विद्यार्थ्यांना ते सांगतात, “इथे मी तुला स्वाक्षरी देणार नाही, पण तू मला एक पोस्टकार्ड पाठवून, विज्ञानातला तुला भेडसावणारा प्रश्न विचार. मी त्याला स्वाक्षरीसकट ऊत्तर पाठवेन.”

नंतर या प्रश्नोत्तरातूनच, “सायन्स थ्रु पोस्टकार्डस्.” असे लहानसे पुस्तक प्रकाशित झाले.

एक प्रश्न त्यांना विचारला जातो, “तुमचा देवावर विश्वास आहे का?”

प्रश्न विचारण्याला ‘हो’ किंवा ‘नाही’ असे एकशब्दी ऊत्तर अपेक्षित असते. पण तसे ऊत्तर ते देत नाहीत. कारण त्यांच्या मते देव आणि विश्वास या संकल्पनाच व्यक्तीसापेक्ष आहेत. सोपे ऊत्तर एवढेच, की एका परम शक्तीने विश्व निर्माण केले व त्याचे नियोजन करण्यासाठी वैज्ञानिक नियम ठेवले. त्या ‘परम शक्तीला देव म्हणता येईल.

वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय? याबद्दलही ते सांगतात, “कुठलाही तर्क प्रत्यक्ष निरीक्षणाने, पुष्टी देऊन मिळाल्याशिवाय, बरोबर मानायचा नाही आणि त्याचे स्थान टिकवण्यासाठी, त्याच्याकडुन वेळोवेळी नवी भाकिते यावीत, ज्यांची तपासणी करुन, मूळ तर्काचे खरेखोटेपण, ठरवता येते. तर्कशुद्धी विचारसरणी यालाच म्हणतात…

मा. जयंत नारळीकर यांचे व्यक्तीमत्व अनेक पैलु असलेले बहु आयामी आहे…ते वैज्ञानिक, तत्वचिंतक आणि साहित्यिकही आहेत. तसेच कला क्रीडा संगीत जाणणारे रसिक आहेत. एक जबाबदार सुपुत्र,चांगला पती आणि आदर्श पालकही आहेत. ज्यांच्या नावातच श्रीफळ आहे, त्याने विज्ञानाच्या या कल्पवृक्षाची जोपासना केली.. नुसतेच आकाश बघणार्‍या तुम्हांआम्हाला आकाशाच्या अंतरंगात बघण्याची गोडी लावली…

भारतरत्नाच्या दिव्यत्वाच्या या प्रचीतीला माझे हात सदैव जुळतील….

धन्यवाद!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्व. इलाही जमादार …… भावपूर्ण श्रद्धांजलि ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

☆  विविधा ☆ स्व. इलाही जमादार …… भावपूर्ण श्रद्धांजलि ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

(जन्म – 1 मार्च 1946 मृत्यु – 31 जनवरी 2021)

 

आकाशाला, भास म्हणालो, चुकले का हो?

धरतीला, इतिहास म्हणालो, चुकले का हो?

 

चिरंजीव वेदना, अंतरी, दरवळणारी

जखमांना, मधुमास म्हणालो, चुकले का हो?

 

कलेवराला, जगण्यासाठी, काय लागते?

आठवणींना, श्वास म्हणालो, चुकले का हो?

 

मरण्याआधी, नाव सांग त्या, हत्याऱ्याचे

मी त्याना, विश्वास म्हणालो, चुकले का हो?

 

निंदानालस्तीही, केवळ, मिळवत गेलो

प्रीतीला, हव्यास म्हणालो, चुकले का हो?

 

लिहिल्या कविता, लिहिल्या ग़ज़ला, गीते लिहिली

सरस्वतीचा, दास म्हणालो, चुकले का हो?

 

चौदा वर्षे, पतीविना, राहिली उर्मिला

हाच खरा, वनवास म्हणालो, चुकले का हो?

 

घात आप्त, आघात सगे, अपघात सोयरे

ह्रदयाची, आरास म्हणालो, चुकले का हो?

 

चुकले का हो? चुकले का हो? म्हणणाऱ्यांनो!

याचनेस, गळफास म्हणालो, चुकले का हो?

 

जन्मठेप, आत्म्याला कोणी, दिली `इलाही’?

कुडीस, कारावास म्हणालो, चुकले का हो?

 

 – इलाही जमादार

एक ऊत्तुंग मराठी गझलकार आज आपल्यांत नाही हे स्वीकारणं खूप कठीण आहे!

एक मार्च १९४६ साली दूधगाव सांगली येथे त्यांचा जन्म झाला. गझलकार सुरेश भट यांच्यानंतर गझलकार म्हणून इलाही जमादार यांचेच नांव घेतले जाते.

पुण्यात एका लहानशा आऊट हाऊसमधे रहात.. पुस्तके आणि मांजरांच्या पसार्‍यात हा अवलिया गढलेला असायचा. खोली लहान असली तरी कवी मन फार मोठे.. प्रत्येक मित्रासाठी हे मनाचे दार ऊघडे असायचे..

गझल क्लिनीकच्या माध्यमातून ते नवोदित कवींसाठी कार्यशाळा घेत…

काठावरी ऊतरली। स्वप्ने तहानलेली।

डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा।

किंवा,

जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला।

केलेत वार ज्याने तो मोगरा असावा।

अशा त्यांच्या काळीज भेदणार्‍या रचना मनात साठलेल्या आहेत….

आज ते नसले तरी हा शब्दगंध वातावरणात दरवळतच राहणार….!!

एक कलाकार, एक गझलकार म्हणून इलाही जमादार सदैव स्मरणात राहणार…

त्यांच्या स्मृतींस भावपूर्ण श्रद्धांजली….????

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आयुष्यावर बोलू काही ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

 ☆ विविधा ☆ आयुष्यावर बोलू काही ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

खरच किती प्रश्न डोकावतात नाही का मनात?

नक्की आयुष्य आहे तरी काय?अनेक प्रश्नांनी भरलेल, अनेक सुखाने, दुःखाने भरलेले नाना छटांनी नटलेले. आणि गंमत म्हणजे प्रत्येक माणसाचे प्रश्न वेगळे आणि उत्तर पण वेगळी.  प्रत्येक  माणसाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा.

कोणासाठी ते सप्तरंगी आहे तर कोणासाठी रंगहीन, नीरस. कोणासाठी ते समुद्राच्या लाटा आहेत खळखळणाऱ्या,सळसळणाऱ्या, तर कोणासाठी एखादी शांत वाहणारी नदी किंवा सुरेख संगम दोन नद्यांचा. कोणाला ते शीतल शांत चंद्राप्रमाणे भासतं , तर कोणाला सूर्याच्या प्रखर उन्हाच्या चटक्या प्रमाणे.

मला विचाराल तर, आयुष्य हे एक प्रश्न चिन्ह आहे ज्याचे उत्तर कधीच मिळत नाही, एक कोड आहे जणू, जर सुटल तर मोकळी वाट नाहीतर आपल्या वाट्याला घाटच घाट.

कधी वाटते की आयुष्य एक सोंगट्यांचा खेळ आहे. आपण फक्त आपली खेळी खेळायची, त्याच फळ काय द्यायचे ते मात्र देवानी त्याच्या हातात ठेवले आहे,थोडक्यात आपण प्यादी आहोत पटावरची, फासे तर तो टाकतो, तो सूत्रधार आहे ह्या आयुष्य रुपी नाटकाचा. आपण फक्त आपला अभिनय नीट पार पडायचा.

मला काही वेळा मात्र आयुष्य सप्तरंगी वाटतं छान सुंदर, इंद्रधनुष्याला जसे सात रंग असतात अगदी तस. मग त्यात प्रेमाचा रंग आला, आपुलकीचा आला, स्पर्धेचा, द्वेषाचा, मद, मत्सर अगदी सगळे रंग आले. हां आता ह्यातला आयुष्यरुपी कॅनव्हास वर कोणता रंग जास्त भरायचा हे मात्र आपल्या हातात आहे.

अचानक मला असे वाटले की जितकं आपलं वय,आपला अनुभव तसे भासत असेल काहो हे आयुष्य सगळ्यांना?

छोट्या मुलांना आयुष्य फुग्याप्रमाणे, किंवा फुलपाखरा प्रमाणे भासत असेल का छान हलकं हलकं आकाशात स्वच्छंद बागडणार आपल्याला हवे तसे  रंग स्वतः भरणार  ना कोणते नियम ना बंधन. स्वच्छंद बागडायचे फक्त. कोणतेच प्रश्न नाहीत , त्यामुळे तक्रार पण नाही.

थोडं मोठं झाल्यावर त्यांना ते स्वप्नं रुपी वाटत असेल का? जिथे अनेक स्वप्नं पहायची आणि ती सत्यात उतरवण्यासाठी झगडायचे. अनेक चॅलेंज घ्यायचे आणि ते पूर्ण ही करायची.

थोडक्यात नियम आणि कायदे आपलेच.

आंब्यांच्या झाडाला मोहर यावा, किंवा छान हिरवी गार पालवी यावी तस किंवा एखाद्या पाण्याचा धबधब्या सारखे स्वच्छंद सतत वाहणारं.

अजून मोठ झाल्यावर म्हणजे कदाचित तिशी ओलांडल्यावर, जेव्हा अनेक जबाबदार्‍या अंगावर येऊन पडतात  तेव्हा आयुष्य पझल गेम सारखं वाटत असेल का, किंवा डोके चालवा, सुडोकू सारखा जिथे प्रत्येक कोड सुटतच अस नाही पण तरीही आपण प्रयत्न करतोच ना. आणि बरेचदा मार्ग ही मिळतो.

आयुष्यभर सूर्यप्रकाशाचे चटके सोसल्यानंतर म्हणजेच सगळया जबाबदार्‍या संपल्या की हेच आयुष्य आपल्याला रात्रीच्या चांदण्यांसारखं शीतल शांत वाटत असेल का. ह्या  टप्प्यावर आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे असतीलच असं नाही,पण आता ती मिळावीत म्हणून धडपड ही नसेल. ना काही मिळवण्याची धडपड असेल ना काही गमावण्याच दुःख.

थोडक्यात काय तर जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही.

सहज मनाच्या कोपर्‍यातुन ?

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महात्मा गांधींचा खादीचा वसा ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆  विविधा ☆ महात्मा गांधींचा खादीचा वसा ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

खादी म्हणजे हातांनी विणलेले,  हातांनी तयार केलेले धागे व त्या धाग्यांपासून विणलेले कापड. (hand made, hand spun) टकळी किंवा चरख्यावर सूत कातले जाई, त्याला सूतकताई म्हणत.भारतातील खेड्यातून राहाणा-या गरीब जनतेला आर्थिक दौर्बल्यातून बाहेर काढण्यासाठी महात्मा गांधींनी 1918 मध्ये खादीची चळवळ सुरु केली. हातमागावर वस्त्र तयार करणे व विणणे या कार्यक्रमातून स्वावलंबन व स्व-शासन या दोन मूल्यांवर आधारित गुणांना त्यांनी उचलून धरले.या वस्त्रोद्योगासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे कपाशीचे पीक हे भारतातील खेड्यांत उत्पन्न केले जाईल.प्रत्येक जण या उत्पादनाच्या व कताईच्या कामात गुंतून राहील.प्रत्येक स्त्री पुरुष त्यांच्या आवश्यकतेनुसार व किमान गरजेइतकेतरी सूत कातून वस्त्र उत्पादन करेल असे चळवळी चे स्वरूप व ध्येय होते. स्वातंत्र्य पूर्व काळात किंवा नंतरही भारताच्या अनेक भागात शेतकरी वर्गाला वर्षभराच्या उपजीविकेसाठी सुद्धा पुरेसं काम नव्हतं. पाऊस पाण्याच्या दुष्काळामुळे वर्षाचे जवळ जवळ सहा महिने विना काम, विना उद्योग जायचे.

सर्वसामान्य लोक  आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि मानसिक दृष्ट्या हताश व निराश झाले होते. अशा वेळी वस्त्रोद्योग हा ठोस रामबाण उपाय ठरला.कुणालाही शिकता येईल, कुणालाही करता येईल असा उद्योग. जो अतिशय कमी खर्चात व किमान मुद्दल गुंतवणुकीत करता येईल असा व्यवसाय.   त्याकाळी कच्चा माल भारतातून इंग्लंडला निर्यात केला जाई आणि तिथे उत्पादित केलेले कापड भारतात आयात केले जाई. पण ते भारतातील जनतेला परवडण्यासारखे नसे. मुख्यतः भारतातील जनता काम व त्यापासून मिळणारा लाभ या दोन्ही पासून वंचित रहात असे. परदेशी मालावर अवलंबून न रहाता आपल्या देशातील कच्च्या मालापासून देशातच कापड तयार करण्याचा खादीचा व्यवसाय हा स्वावलंबनाचा पहिला धडा महात्मा गांधींनी घालून दिला.  इंग्रजांचा भारतावरील हक्क झुगारून देण्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल.

खादी उत्पादनामागे एक आर्थिक विचारही आहे. तो विचार ‘ Mass Production नको Production by Masses हवे, असा होता. मोठ्या यंत्रांच्या केंद्रित अर्थ व्यवस्थेमध्ये अनेक लोक बेकार तर होतातच, शिवाय मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊन त्याच्या विक्रीसाठी मोठी बाजारपेठ निर्माण करावी लागते. त्यामुळे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात.  हे सर्व टाळण्यासाठी भारतासारख्या मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध असलेल्या देशात विकेंद्रित अर्थव्यवसाय फायद्याचा ठरेल.

खादीच्या चळवळीमागे आणखी एक विचार होता. त्या काळी छोट्या,  बारीकसारीक कामे करणा-यांना कमी लेखले जाई. समाजातील उच्च-नीचतेच्या दरीवरती सेतू बांधण्याचं स्वप्न या खादीच्या चळवळीतून गांधींनी पाहिलं होतं. देशातील प्रत्येकाने मग तो उच्चपदस्थ असो वा कमी, श्रीमंत असो वा गरीब,  स्त्री-पुरूष प्रत्येकाने दिवसातील किमान एक तास सूतकताईला द्यावा व खादी निर्मितीला हातभार लावावा,  जेणेकरून गरिबांची सेवा व गरजवंताला मदत होईल. समाजातील दोन भिन्न वर्ग एका सूत्राने बांधले जातील. गांधीजींची ही खादीची चळवळ फक्त राजकीय नव्हती तर त्यामागे सामाजिक,  सांस्कृतिक व आर्थिक कारणे होती. 1934-35 साली एका व्यक्तीच्या स्वावलंबनातून सुरू केलेली ही चळवळ संपूर्णं खेडे, संपूर्ण गाव स्वावलंबी बनवण्याइतकी विस्तारित करण्यात आली. 1920 नंतर संपूर्णं देशभरात स्वयंसेवकांची असंख्य शिबिरे भरवून ही चळवळ देशव्यापी केली गेली.

परिश्रम, स्वावलंबन, परस्परांतील भेदाभेद विसरून एकत्रित काम करणे, परदेशी वस्तू, परदेशी कापड न वापरता,  आपल्या देशात तयार होणारे वस्त्र, वस्तू वापरून आपल्या गरीब बांधवांना मदत करणे, या गुणांची ओळख करून देताना विस्मरणात गेलेल्या आपल्या संस्कृतीतील  तत्वांचा पाठपुरावा महात्माजींनी केला. खादी ही विशिष्ट काळापुरती मर्यादित चळवळ न राहता तो जीवनाचा स्वभावधर्म होईल इतका पगडा तरूण मनावर बिंबवण्याचे काम या चळवळीने केले. पारतंत्र्याला झुगारून स्वदेशीच्या अभिमानाचं स्फुल्लिंग महात्मा गांधीनी मनामनात चेतवलं.

गांधीजी म्हणत, ” गांधी या नावाचा विसर पडला तरी चालेल पण गरिबांना आधार असलेल्या या चरख्याचा व त्यामागच्या विचारांचा देशाला कधी विसर न पडो.” ते पुढे म्हणत, ” समर्पणाला व त्यागाला आंतरिक व बाह्य शुद्धतेचे पाठबळ  असेल तेव्हाच ते परिणामकारक होते.  शुद्ध त्याग हा दृढ विश्वास राखून प्रसन्न चित्ताने केलेला असतो.  मत्सर, दुर्भावना किंवा शत्रूबुद्धी यांचा पुसटसा सुद्धा स्पर्श नसतो.”

खादी हा कापडाचा तुकडा नाही तर तो ताठ मानेने आयुष्य जगण्याचा मार्ग आहे हा मंत्र त्यांनी दिला.

हा मंत्र आत्मसात करून स्वतः चरख्यावर सूत कातून स्वतःची वस्रे म्हणजे हातरूमाल, साडी, ब्लाऊज, अंथरूण पांघरुण,  टॉवेल ( पंचा), झोळी,  शर्ट,  पायजमा वापरणारी माणसे अजून हा घेतलेला वसा जोपासत आहेत.

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares