☆ हक्क – शिक्षणाचा आणि जीवनाचाही… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
सन २००५, सप्टेंबर महिना. अमेरिकेतील अराकान्सास राज्याची राजधानी लिटल रॉक्समधील रॉबिन्सन शाळेचा नव्या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस. सगळी मुलं सुट्टी संपवून मित्र मैत्रिणींना भेटण्याच्या उत्साहात होती.
इतिहास शिकवणाऱ्या मार्था शिक्षिकेच्या डोक्यात मात्र काही तरी वेगळंच शिजत होतं. मुख्याध्यापकांच्या परवानगीने, तिने तिच्या वर्गातली सर्व बाके काढून टाकली होती. वर्गात मुलं आली आणि मोकळा वर्ग बघून भांबावली.
” मॅम, बाकं कुठे आहेत ? आम्ही बसू कशावर ?”
” त्या बाकांवर बसण्याचा हक्क तुम्हाला कसा मिळाला, हे जर तुम्ही सांगितलंत, तरच मी तुम्हाला बाकांवर बसू देईन.”
मुलांच्या चेहऱ्यावर भली थोरली प्रश्नचिन्हं…
“आम्ही चांगले गुण मिळवले म्हणून …” एकाने धीर करून सुरुवात केली. मार्थाची मान नकारार्थी हलली.
“आम्ही चांगले वागतो म्हणून …” आणखी एक प्रयत्न.
“चांगली वागणूक, चांगले गुण – या दोन्ही गोष्टी चांगल्या आहेतच. पण बसायला बाक मिळण्यासाठी त्या पुरेशा नाहीत.” मार्था.
प्रत्येकजण आपापल्या परीने कारणं सांगत होता, पण योग्य उत्तर काही गवसत नव्हतं.
पहिला तास संपला, दुसरा, तिसरा, चौथा. मधली सुट्टी झाली. शाळाभर बातमी पसरली, मुलांनी आपल्या आईवडिलांना कळवलं, वृत्तवाहिन्यांना या घडामोडींचा सुगावा लागला. शाळेत गर्दी जमू लागली. तर्क वितर्क होऊ लागले.
होता होता शेवटची तासिका सुरू व्हायची वेळ आली. मार्थाचे विद्यार्थी वर्गात जमिनीवरच फतकल मारून बसले होते. विद्यार्थ्यांचे पालक, पत्रकार – कोणी शाळेच्या प्रांगणात, कोणी वर्गाच्या खिडक्यांमधून आत डोकावत होते.
“ठीक आहे. तुम्ही तुमच्या परीने योग्य उत्तरं देण्याचे चांगले प्रयत्न केलेत. आता मी तुम्हाला खरं उत्तर सांगते.” असं म्हणत मार्थाने वर्गाचं दुसरं दार उघडलं. त्या दारातून, हातात एक बाक घेऊन, एक पूर्ण गणवेशधारी माजी सैनिक वर्गात आला, त्याच्या मागोमाग आणखी एक, आणखी एक… सैनिकांनी ते सगळे बाक व्यवस्थित लावले आणि बाजूला उभे राहिले.
विद्यार्थ्यांच्या आणि खिडकीतून डोकावणाऱ्या पालकांना – पत्रकारांना हळूहळू थोडा अर्थबोध होऊ लागला होता.
“या बाकांवर बसण्याचा हक्क तुम्ही मिळवलेला नाहीत. तो या सैनिकांनी तुम्हाला दिला आहे. काहींनी स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडले असेल, काहींनी मनावर दगड ठेवून त्यांच्या तुमच्यासारख्या लहान मुलांना घरी ठेवलं असेल आणि स्वतः सीमेवर लढायला गेले असतील, बर्फ – ऊन – वारा – पाऊस यांना तोंड दिलं असेल, स्वतः बंदुकीच्या गोळ्या झेलल्या असतील, जीवलग मित्रांना वीरगती प्राप्त होताना पाहिलं असेल – यांच्या त्यागाने, निरलस सेवेने हा हक्क तुम्हाला दिला गेला आहे. आता तुमची जबाबदारी ही आहे की चांगलं शिकून, चांगलं नागरिक बनून सैनिकांच्या या उपकाराचे तुम्ही उतराई व्हाल.”
मार्थाची ही सत्य कथा इथे संपली.
… पण ही कथा आपल्यालाही तितकीच लागू होते.
अगणित स्वातंत्र्य सैनिकांनी जीवाची बाजी लावली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आपले सैनिक, पोलीस कामावर तैनात आहेत म्हणून आपण सुरक्षित जगू शकतो. आपले आई वडील, शिक्षक या सगळ्या सगळ्यांनी खस्ता खाल्ल्या त्यामुळे आपल्याला हा जगण्याचा हक्क मिळाला आहे.
…. सचोटीने वागून त्यांच्या या त्यागाला सार्थ, यथार्थ बनवणं हे आता आपलं कर्तव्य हे आहे, नाही का ?
तिच्याबरोबर काही वेळेला मॉलमध्ये जाणे घडते. ती शिक्षकी पेशातली. बऱ्याचदा अचानक ३० ते ४५ या वयोगटातले तरुण जवळून जातांना थबकतात आणि म्हणतात, “आपण मोघे मॅडम ना ! मॅडम ओळखलत? मी १९९३ बॅचचा… मी १९९६ बॅचचा…. ” आणि काही बोलायच्या आत ते वाकून नमस्कार करतात. “ मॅडम अजूनही तुम्ही शिकवलेला धडा आठवतो.” कुणाला शिकवलेली कविता आठवते, कुणाला केलेली आर्थिक मदत आठवते, तर कुणाला दिलेला आत्मविश्वास… तो दिवस हिच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा, धन्यतेचा दिवस असतो. तिच्या शिक्षकी पेशापुढे मला माझे अधिकारीपण थिटे वाटायला लागते. जगातल्या कुठल्याच क्षेत्रात, शेवटच्या श्वासापर्यंत अखंडपणे असा सन्मान आणि धन्यता लाभत नाही. ते पवित्र नाते पाहून परमेश्वराने पुढच्या जन्मी शिक्षक करावे, असे का कुणास ठावूक त्याक्षणी वाटू लागते.
हे असे बऱ्याच ठिकाणी घडते. प्रसंग मॉलमधला सांगण्याचे कारण एव्हढेच, की या नात्याच्या भेटीसोहळ्यात वेशभूषाही आडवी येत नाही, एव्हढे हे नाते पक्के असते. ही तिथे साडीमध्येच असते असेही नाही आणि तोही विद्यार्थ्यांच्या पेहरावात असतोच, असे नाही. पण या नात्यात आदरयुक्त भावनेचे प्रोग्रॅमिंग विद्यार्थ्यांच्या मेंदूत कायमचे झालेले असते आणि ‘लाईफटाईम ॲन्टी व्हायरस कीट’ या नात्यात “इनबिल्ट” असते.अगदी आई वडिलांच्या आणि मुलांच्या नात्यातही दुराव्याचा,गैरसमजाचा व्हायरस आल्याचे काही ठिकाणी दिसते.पण या नात्यात ते अपवादाने नाही. त्यामुळे समोरची व्यक्ती माझ्या प्रेमयुक्त आदराची आहे, याबाबत मन, बुद्धी आणि देहाचे कधी नव्हे ते क्षणात ऐक्य होते आणि नमस्काराची कृती होते. आपल्या शिक्षकांबाबतही आपले असेच होत असते.
परवाच माझे एक स्नेही, सेवानिवृत्त प्राध्यापक श्री. मित्रगोत्रीसर घरी मुक्कामाला होते. सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. ते ठाण्यात येणार हे कळताच ,परिसरातल्या त्यांच्या विद्यार्थ्यांचे फोन सुरु. स्टेशनवर स्वागत, घरी घेऊन जाणे, पुन्हा स्टेशनवर पोहचविणे, प्रेमाचा आग्रह, भेट होताच सर्वांचा वाकून नमस्कार, या सर्व गोष्टी पाहून शिक्षकी पेशातल्या व्यक्ती खरेच नशिबवान असे वाटले,.त्यांचा हेवाही वाटला.
या मंडळींना स्वत: ऐश्वर्यवान होण्यापेक्षा विद्यार्थी ऐश्वर्यवान झालेले पाहणे आवडते. पंखात बळ देऊन, भरारी घेण्याचा आत्मविश्वास देऊन विद्यार्थ्यांचा निरोप घ्यायचा, पुन्हा नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना घडवत राहायचे. हे ज्ञानदानाचे,विद्यार्थी घडविण्याचे अग्निहोत्र प्रज्वलित ठेवण्याचे पुण्यकर्म करणाऱ्या सर्वच शिक्षकांना वंदन.
आजचा दिवस शिक्षणपद्धती, शिक्षक यांच्या दोषांविषयी बोलण्याचा नक्कीच नाही. शहरी आणि ग्रामीण भागातल्या समस्या, गरजांमध्ये झालेले बदल, तात्विक अधिष्ठानात झालेले बदल हे तुमच्या आमच्यात, डॉक्टर, वकील इत्यादी सर्वच पेशात झालेले आहेतच. तेव्हा यात ‘सर्व बदलले ते ठीक, पण शिक्षकांनी तरी बदलायला नको, त्यांनी पूर्वीप्रमाणेच त्यागी, तत्वनिष्ठ रहावे,’ असे म्हणून त्यांच्यावरच नैतिकतेचा, तत्वनिष्ठतेचा बोजा टाकणे, योग्य वाटत नाही. तीही माणसेच आहेत. आपण बदललो, तीही बदलली आहेत.
अजूनही चांगल्या शाळा, महाविद्यालये आहेत. चांगले शिक्षक, प्राध्यापक आहेत. जे चांगले आहेत, तेच पुढे आठवणीत राहतील…मनाशी मनाचे नाते जुळलेले राहील आणि खूप वर्षांनी जरी अशा शिक्षकांना विद्यार्थी भेटले, तरी ते तेव्हाही निश्चितच त्यांना वाकून नमस्कार करतील.
श्रावण महिना आला की, सणांची रेलचेल असतेच असते. अगदी भराडी गौर, शिवामूळ, मंगळागौरी, नागपंचमी, शुक्रवारची सवाष्ण, वरदलक्ष्मी व्रत, राखी पौर्णिमा, जन्माष्टमी, पिठोरी मातृपूजन, पोळा ! दर दोन तीन दिवसाआड येणारे सण.
सर्व सणांचं ठीक आहे. पण मला नेहमीच जन्माष्टमीचं कायम नवल वाटायचं. श्रीरामजन्म, श्री दत्त जन्म श्री हनुमानजन्म, जवळपास सगळेच मंदिरात होतात. मात्र कृष्णजन्माचा उत्सव हा मंदिरांसोबतच प्रत्येक घरी होतो. माझ्या माहेरी तर जन्माष्टमीला आम्ही गोकुळाष्टमी म्हणायचो. माझे वडील प्रख्यात मूर्तीकार. सकाळी आंघोळ झाली की ते गोकुळ करीत बसायचे. प्रारंभी गणपती, नंतर श्रीकृष्ण, वसुदेव, देवकी, नंद, यशोदा, राधा, काही गौळणी, अगदी पूतनामावशी सुद्धा. काही गायी वासरं, कालिया. श्रीकृष्णाचे मित्र वगैरे. मजा यायची. आम्हाला कुठलं काय येतंय ? पण शिकवण्याचा कुठलाही आविर्भाव न आणता बाबा आम्हाला मातीकाम शिकवायचे. माणसं, प्राणी करणं कठीणच प्रकरण होतं. मग कुठे पाण्याचं टाकं, नाग, गौळणीच्या डोक्यावरचा माठ, फळं, ताकाचा डेरा असं काहीतरी करायचो. पुढे पोळ्यालाही वाडबैल वगैरे करताना तीच त -हा ! बाबा एकच वाक्य बोलायचे. ” आज ओल्या मातीला हात लावला नाही तर पुढला गाढवाचा जन्म मिळतो. ” झालं. गाढव कोण होणार ? म्हणून आम्हीही करायचो. कळत नकळत असं कलेचं शिक्षण मिळत गेलं. नंतर त्यांची साग्रसंगीत पूजा नैवेद्य व्हायचा. दुपारी रात्रीच्या भजनाची आणि सुंठवड्याची तयारी असायची.
रात्रीचं भजन छानच रंगायचं. पंचपदी, शिक्का, गजर झाला की इतर भजनं व्हायची. त्या दिवशी कृष्णाची गाणी जरा जास्तच व्हायची. नंतर गवळण. ती झाली की कृष्णजन्म. कृष्णजन्म होताच गुलालाची उधळण होई. मग कृष्णाचा पाळणा. त्यावेळी घरातल्या स्त्रियाही त्यात सहभागी होत. शेवटी आरती आणि सुंठवड्याचा प्रसाद.
दुसऱ्या दिवशी पुन्हा भजन आणि गोपालकाला. हे सर्व झालं की गोकुळाचं विसर्जन. इकोफ्रेंडली हा शब्द आज सर्वांना ठावूक झालाय, पण शंभर वर्षांपासून किंवा त्याच्याही आधी माझ्या माहेरी तो होता. कारण गोकुळाचं विसर्जन पाण्यात न होता, परसातल्या दोडक्याच्या किंवा पडवळाच्या झाडाखाली व्हायचं. सगळं गोकुळ आम्ही त्या वेलांच्या मुळाशी ठेवायचो. पूर्वी श्रावणात श्रावण बरसायचा. रंग नसायचेच त्या मुर्त्यांना. हळूहळू ती ओली माती मातीत मिसळून जायची.अनेकांच्या घरी हा कुळाचार पण आहे.
मला बालपणी पडलेला प्रश्न हाच होता, की कृष्णजन्म घरोघरी का होतो ? ब्रह्मा विष्णू महेश हे ठावूक होतं. उत्पत्ती स्थिती लय. पण स्थिती म्हणजे विष्णूरूप रामाचेही होते.. आदर्श पुत्र, आदर्श भ्राता, आदर्श राजा. एकपत्नी, एकवचनी, एकबाणी प्रभू रामचंद्र. लहानपणी कळत नव्हतं पण जसजशी मोठी होत गेले तेव्हा स्वतःच विचार करू लागले. आजही कृष्ण कळला नाहीच. जरासा विचार केला एवढंच. रामाबद्दल वाटतो तो आदर. आदरयुक्त प्रेम. आणि कृष्ण वाटतो सखा. मनापासून प्रेम करावं असं वाटणारा.
आपल्या कुळाचाराचे देव कुण्या मोठ्या घरी असतात किंवा परंपरेने आपल्याकडे आलेलेही असू शकतात. पण सामान्यपणे आपल्या देवघरात कोण असतं ? श्री गणपती, अन्नपूर्णा आणि रांगता बाळकृष्ण ! सासरी जाताना आई लेकीला अन्नपूर्णा देते. ” तूही तुझ्या घरची अन्नपूर्णा हो ” असा आशीर्वाद देते. आणि दुसरा असतो बाळकृष्ण. मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक ! देवाची पूजा करताना ती मुलगी हळुवारपणे बाळकृष्णाला आंघोळ घालते. त्याचे वस्त्र बदलते. त्याला मुकुट, गळ्यात साखळी, हातात पायात कडे तोडे घालते. नटवते. सजवते. जसं आपल्या बाळाशी वागावं तशी ती लाडिक वागते. राखी पौर्णिमेला ती त्याला राखी बांधते, स्वतःचा रक्षणकर्ता मानते. घरात काही घडलं तर त्याच्या कानात सांगते. जसं जिवाभावाच्या मित्राशी बोलावं तसं. आधार वाटतो त्याचा. आणि कधी काही सुचेनासं झालं की, त्याचाच सल्ला घेते.
कृष्णाने काय शिकवलं ? तुमचं कर्म तुम्हीच करा. यश आहेच. कारण मी पाठीशी आहे. सोबत आहे. कृष्णाने कुठला त्याग नाही केला ? जन्मतः च आईबाप दुरावले, नंतर नंद यशोदा दुरावले, राधा दुरावली, गोकुळ दूर गेले. असाही त्याग ? पुन्हा मागे वळून न बघण्याचा ? द्रौपदी सखी त्याची. तिचं लज्जारक्षण करणारा सखा तिचा.असूराच्या तावडीतून सोळा सहस्त्र एकशे नारींची त्याने सुटका तर केली. पण पुढे समाजातलं त्यांचं स्थान काय.. म्हणून त्यांना स्वतःचं नाव दिलं. पती म्हणून. बालपणी गुरं राखली, आणि मोठेपणी मित्राच्या रथाचा सारथीही झाला. त्याला योग्य मार्गदर्शन करीत जय मिळवून दिला.
…… आणि एवढं सगळं करूनही अलिप्त तो अलिप्तच राह्यला.
आपल्या मुखातून मातेला ब्रह्मांडाचे दर्शन घडवणारा कृष्ण माझ्या एवढ्याशा शब्दात बांधला जाणार आहे होय ? पण खरंच एवढं कायम वाटतं की, पुत्र, पिता, सखा, मित्र, अगदी पळवून नेणारा प्रियकर आणि नवरासुद्धा श्री कृष्णासारखाच असायला हवा.
(मला तर सगळे प्रकरणच रोमांचकारी वाटू लागले. आणि त्या डोक्यावर छत्री नसलेल्या पण डोक्यावर हुडी घालून नखशिखान्त भिजणाऱ्या तरुणाला मी घरात घेतले.) — इथून पुढे —
माझ्या घरात सगळीकडे फ्रेम करून लावलेली चित्रे होती. ती त्याने प्रामाणिकपणे व्यवस्थित पाहीली पण त्याची नजर काही तरी वेगळे चित्र शोधत होती. मग मी माझी नुकतीच पूर्ण केलेली पावसाची, दाट धुक्याची, जलरंगातील चित्रे दाखवली. आणि अर्शद एकदम खुष झाला.
असे म्हणत त्याने ती तीन चित्रे सिलेक्ट केली. माझा अकाऊंट नंबर ऑनलाईन पेमेंटसाठी विचारला पण माझ्याकडे तशी त्यावेळी सुविधा नव्हती. मग तो क्रेडीटकार्डची सुविधा उपलब्ध आहे का? असे विचारु लागल्यावर मी नकार दिला. कारण मी त्यावेळी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणे एवढे सुरक्षित नव्हते.मग एटीएम मधून रोख पैसे देण्याचा पर्याय नक्की झाला. बबल रोलच्या प्लॅस्टीकमध्ये गुंडाळलेली व्यवस्थित पॅक केलेली चित्रे त्याच्या गाडीतून अर्शदने मागच्या सीटवर ठेवली व आम्ही पाचगणीच्या शॉपींग सेंटरच्या पोस्टाशेजारच्या स्टेट बँकेच्या एटीएमला गेलो. त्याने पेमेंट काढून रक्कम हातात दिली.मग कितीतरी दिवस मनात साचलेले एक मोठे ओझे दूर झाल्याने मी रिलॅक्स झालो. कारण ती रक्कम पावसाळ्याचे चार महिने पुरेल इतकी होती.आणि एटीएम शेजारच्याच पुरोहीत नमस्ते या हॉटेलमध्ये आम्ही निवांतपणे कॉफी पिण्यासाठी गेलो.
मला तर फारच आश्चर्य वाटत होते की इतक्या धुवांधार पावसात हा माणूस माझ्याकडेच चित्र घ्यायला का आला असावा ? त्याला कोणी रेफरन्स दिला ? त्याला चित्रेच का घ्यावीशी वाटली ? तो या गावात शिकला,त्याचा व पाचगणीचा काय संबंध ? माझे अनेक प्रश्न मी त्याला विचारले. पण अर्शदने थोडक्यात प्रश्नांची उत्तरे दिली.
आज खूप वर्षानंतर मी पाचगणीला आलो. शाळेत असताना हा वादळी पावसाचा दिवस, कडाक्याची थंडी, हे धुके मला सतत आठवत असते. आज सध्यांकाळी मी लॅपटॉपवर सहज पाचगणी पेंटीग्ज या नावाने सर्च मारला तर तुमच्या पेंटिंगचे फोटो दिसले. कुठूनतरी अचानक एक अज्ञात शक्तीने सुचवले किंवा मनात विचारांचे वादळच उठले की आताच जावून या चित्रकाराला भेटलेच पाहीजे. मी आता परदेशात स्थायिक झालो आहे.मनातल्या साचलेल्या या पावसाच्या धुक्याच्या आठवणी चित्ररुपाने मला नेहमीच या परिसराची,तुमची व येथील पाचगणीच्या या भेटीची आठवण करून देत राहतील. प्रेमाने गळाभेट घेऊन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि माझी प्रत्यक्ष अनुभवलेली,घडलेली खरी गोष्ट इथे संपली.
डोक्यावर हुडी घालून चाललेला पाठमोरा अर्शद त्यादिवशी मला देवदूतासमान वाटला. कित्येक वर्ष ह्या नखशिखान्त पावसात ओलाचिंब झालेल्या या देवदूताची प्रतिमा मनाच्या अज्ञात पोकळीत स्वस्थ बसून राहिली होती आज या थिंक पॉझिटिव्हच्या लेखामूळे पुन्हा जागृत झाली, पुन्हा आठवली.
खरं तर मी नास्तिकही नाही व आस्तिकही नाही. मी नियमित देवपूजा व मंदिरानां भेटीही देणारा धार्मिक माणूस नाही. पण गेले कित्येक वर्ष मला हा प्रश्न सतावतो की हे अज्ञात देवदूत मला का भेटत गेले ? या देवदूतांचे वैशिष्ठ्य म्हणजे ते वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या ठिकाणांचे, वेगवेगळ्या देशांचे, वेगवेगळ्या वर्णाचे, स्त्री किंवा पुरुष असो वेगवेगळ्या रुपाने अडचणींच्या वेळी हजर कसे होतात ? आणि ते कधीकधी परत भेटतात किंवा कधी आयुष्यात भेटतही नाहीत. आपण कोणाला मदत केली किंवा मार्गदर्शन करून नवा रस्ता दाखवला याचा त्यानां कधी अभिमान वाटत नाही. ते कुठे याचा नामोल्लेखही करत नाहीत. त्यांच्या भावविश्वात मी आता मदत केली आहे तर तुमच्याकडून मला परतफेडीची अपेक्षा आहे असे त्यांचे वर्तन कधीही असत नाही.
मी हिंदू आहे व अर्शद मुस्लीम आहे म्हणून आमच्यामध्ये कधी असा दुजाभाव, दुराचाराचा विचार आला नाही. देवदूतानां कुठे धर्म,जात असते
आपल्या आयुष्यातील कठीण काळात सर्वतोपरी छोटी असो वा मोठी मदत करणाऱ्यानां देवदूतच म्हणावे लागेल ना ?
म्हणजे देवदूतानां जात, धर्म, पंथ नसतो. मग आपण का जात,धर्म, पंथ व हिंदूत्व कवटाळून बसतो. मी तर मंदिराच्या परिसरात चित्र रेखाटण्यासाठी जात असूनही कधी आत जात नाही. देवाच्या दर्शनाला रांग दिसली की लांबूनच हात जोडतो. आणि देवाला मनातूनच सांगतो बाबा रे ! तुला तर माहीतच आहे की तुझ्यापासून काहीही लपवू शकत नाही.तू तर सर्वज्ञ आहेस, सगळीकडे तुझा वावर असतो मग रांगा लावून तुझ्याकडे येण्यासाठी वेळ कशाला घालवू ? रांगेत फुकट वेळ घालवायचा याला काय अर्थ आहे ? तू जे अडचणींच्या काळात मनुष्यरूपी देवदूत पाठवतोस ते काय कमी आहे का ? मग मनातूनच माझा नमस्कार स्विकार कर.
यु नो एवरीथिंग अबाऊट मी.
आजही कधीतरी मोठी अडचण आली की मला परत कधीही न भेटलेल्या हुडीवाल्या देवदूताची प्रतिमा आठवते. माझा तीस पस्तीस वर्षांचा चित्रकलेचा प्रवास अशा ज्ञात अज्ञात देवदूतांनी सुखकर करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी,वेगवेगळ्या मार्गाने अचानक प्रकट होवून भरघोस यशाशक्ती मदत केली. आमची चित्रकला बहरली, फुलली संपन्न झाली त्या या देवदूतांमूळेच. या सर्व जातीच्या, धर्माच्या, पंथांच्या मानवी सजीव देवदूतानां आज यानिमित्ताने मी नतमस्तक होऊन सप्रेम नमस्कार करतो.
मन, शरीर, बुद्धी व आत्मा या चार जीवनातील गोष्टींचे योग्य संतुलन असले की देवदूत भेटतातच, किंवा भेटले नाही तर कधी कधी आपणच कोणाचा तरी देवदूत बनून समोरच्या व्यक्तिच्या आयुष्यातील अडचणी सोडवण्यासाठी थोडा प्रयत्न केला, त्याची चिंतामग्न अवस्था समजून हातभार लावला, खरी मदत जर केली तर या जन्मात आपणही एक छान कर्म केल्याचे मानसिक समाधान नक्की मिळेल.
मी जरी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी कधीही गेलो नाही तरी त्यांचे दोन शब्द मला नेहमीच प्रेरणा देतात.
‘श्रध्दा’ और ‘सबुरी’.
आपल्या कामावर असलेली निस्पृह निष्ठा,मनात असलेली प्रामाणिक इच्छाशक्ती व आपल्या जोपासलेल्या कोणत्याही क्षेत्रातील व्यावसायिक काम असो किंवा तुमच्या आवडत्या कलेवर असलेले निर्व्याज सच्चे प्रेम असेल तर ध्येयपूर्ती व स्वप्नपूर्ती करायला एक दिवस देवदूत नक्की भेटायला येतो.तो नवनव्या वेषात येतो. कधी तो सरकारी अधिकारी म्हणून येईल, तर कधी शिक्षकाच्या, मित्राच्या रुपाने प्रकट होईल. कधी काळ्या कोटात वकीलाच्या रुपाने येईल तर कधी पांढरा कोट घालून डॉक्टरांच्या रुपाने येईल. कधी साध्या वेशात येईल, कधी टाय सुटबुटातील पोशाखात उद्योजकाच्या रुपाने येईल तर कधी हुडीवाला पोशाख घालून शांतपणे सुखाची पखरण करत व मदत करून निघून जाईल.
पण पक्का विश्वास ठेवा स्वतःवर
एक दिवस अचानक हुडीवाला देवदूत नक्की भेटायला येतो.
एक दिवस अचानक हुडीवाला देवदूत नक्की भेटायला येतो.
🌟 🌟 🌟 🌟
(माझ्या चित्रकलेच्या अडचणीच्या संघर्षाच्या प्रवासात या हुडीवाल्या देवदुताला मी पार विसरूनच गेलो होतो. लेख लिहील्यानंतर त्या रात्री कित्येक वर्षांनी देवदूताचा गुगल, फेसबूक अशा समाज माध्यमांवर शोध घेतला तर देवदूत सापडला. मेसेंजरवर रात्री त्याला उशिरा मेसेज पाठवला तर देवदूताने मोठ्या उत्स्फूर्तपणे लगेच मला प्रतिसाद दिला. आपण आपल्या धकाधकीच्या जीवनात देवदूताना विसरतो पण देवदूत कधीच आपल्याला विसरत नसतात. या देवदूताचा चेहरा मला आठवत नव्हता. आज खूप वर्षानंतर त्या देवदूताचा बायोडाटा पाहीला तर हा स्मार्ट देवदूत त्यावेळी जागतिक बँकेचा प्रेसिडेंट होता.त्यांचा फोटो सुरुवातीला मुद्दाम दिला आहे.)
मी निसर्गचित्रकार म्हणून जगायचे ठरवले होते . निसर्गात सतत फिरायचे निसर्गाच्या सान्निध्यात राहून जी निसर्गदृश्ये मनाला भुरळ घालतात ती जलरंगात उतरवत राहायचे हा माझा आवडता छंद आहे .
मी पाचगणीत राहायचो . हे तर महाराष्ट्राचे स्वित्झर्लंड. निसर्गाने येथे दोन्ही हाताने भरभरून निसर्गवरदान देलेले गाव .अशिया खंडातील सर्वात मोठे टेबललॅन्डचे पठार , त्या पठारावरून दिसणारी चिखली , पांगारी ,भिलार , तायघाट , भोसे , राजपूरी गावांची व्हॅलींची दृश्ये , स्ट्रॉबेरीची शेती , उंचच उंच सिल्व्हर वृक्षांच्या सान्निध्यातील ब्रिटीशकालीन शाळा व बंगले . हिलस्टेशनची टिपिकल उतरत्या छपरांची घरे , धोम धरणाचे चमकणारे पाणी , कमळगड , नवरानवरीचा डोंगर , महाबळेश्वरच्या सह्याद्री व प्रतापगडाच्या पर्वतांच्या विशाल रांगा , जावळीचे खोरे , वाईचे गणपती मंदीर ,पेशवेकालीन दगडी घाटांचा परिसर व मेणवलीचा घाट चित्रित करताना मी देहभान हरपून जायचो . त्या दृश्यानां कागदावर जलरंगात रेखाटण्याचा माझा छंद इतका विकोपाला गेला होता की माझ्या घरच्यांनी मला पुर्णपणे दुर्लक्षित केले होते.
मी अभिनवला शिकलो व तेथे माझी स्वातीशी मैत्री झाली . नंतर लग्नही झाले पण आम्ही मुंबई पुण्यासारख्या शहरात रमलो नाही . चित्रं काढली तरी ती विकायची कशी याची आम्हाला जाणीव नव्हती . आम्ही तीनचार ठिकाणी स्वतःची आर्ट गॅलरी तयार करून प्रदर्शन आयोजित केले . पण त्यात आम्हाला यश आले नाही. त्यात एकुलत्या एक मुलीचा मृत्यू झाला व नाईलाजाने मला व स्वातीलाही आर्टटिचरची नोकरी करावी लागली . चित्रकारीता पूर्ण बंद करून टाय सूटबूट घालून मी एका ब्रिटीश स्कुलमध्ये स्थिरावलो . या स्कूलमध्ये नाश्ता ,जेवण , राहण्यासाठी बंगला , लाईटबील फ्री व इतर सर्व काही सुविधा होत्या पण पगार खूप कमी होता . सकाळी सात ते रात्री सात पर्यंत बारा तासांची व्यस्त नियोजनबद्ध बांधीलकी होती . फक्त रविवारची एक सुट्टी . चारपाच हजारात सर्व गरजा भागविण्यासाठी संघर्ष करायला लागायचा. शेवटी कंटाळून आम्ही एकापाठोपाठ या पर्मनंट सुखाच्या नोकऱ्या कायमच्या सोडल्या व चित्रकार म्हणूनच जगायचे या वेड्या ध्येयाने प्रेरीत होऊन नवा प्रवास सुरू केला .
पाचगणी गावाजवळ असलेल्या रुईघर व्हॅलीत गणेशपेठच्या गावाबाहेर आम्ही एक जागा घेतली . या जागेला जायला सत्तर ऐंशी पायऱ्या चढून जायला लागायचे. घर बांधताना गाढवावर वाहून वीट वाळूची वाहतूक करावी लागली . समोर महू धरणाचे विहंगम दृश्य दिसणार होते . भिलार व कासवंड गावाची व्हॅली समोर दिसायची . आम्ही घरबांधणी सुरु केली आणि लवकरच सर्व प्रकारच्या सामानाची वाहतूक करताना येणाऱ्या अडचणींमूळे घराचे बजेट दुप्पट झाले . लवकरच पैसे संपले . चित्रकलेची साधना करत आता जगायचा नवा प्रयत्न आम्ही सुरु केला होता पण स्थिर पगार नव्हता .महिना संपल्यानंतर घरसामान किराणा वस्तू तर विकत आणायला लागणारच होत्या. त्यात सामान वाहतूक व साफसफाईसाठी सुधाकर कांबळे नावाचा गडी कामाला ठेवला होता . त्याला महिन्याला पगार द्यायचे ठरले होते . जीवन जगणे एक कठिण समस्या होती . पैशांशिवाय जगणे म्हणजे मोठी परीक्षाच समोर आली होती .
कलावंत मंडळी थोडी वेडी असतात , त्यानां व्यवहारज्ञान नसते , जगरहाटीचे सर्वसामान्य जगणे त्यानां माहीत नसते असे सगळेजण म्हणतात ते खरे असावे . व्हॅन गॉग नाही का व सतत चित्र काढत फिरायचा तशीच काहीशी माझी मनाची अवस्था झाली होती . आणि येथे तर दोन व्हॅनगाँग होते .असे रोज कलेसाठी वेडे होऊन जगणे म्हणजे रोज विस्तवावरून चालणे असते . जाणूनबूजून नेहमीची तयार वाट सोडून काट्याकुट्यातून प्रवास करत एका अनोळख्या , नव्या अवघड मार्गाचा तो प्रवास असतो . आम्ही अशा काट्यातून प्रवास करत असताना वास्तवात जीवन जगणे किती कठीण असते याची प्रॅक्टीकल झळ आम्हाला वारंवार बसत होती . पण नोकरी करायची नाही या मतांवर मात्र आम्ही दोघेही ठाम होतो .
आम्ही कलावंत आहोत , आम्ही चित्रांसाठी जगतो ना? मग चित्रांनी आम्हाला का जगवू नये ? असा ठाम विचार मनात घेऊन आम्हीच निर्माण केलेल्या प्रश्नाला आम्हीच उत्तर देत होतो . ” चित्रांनीच आम्हाला जगवले ” पाहीजे हे नवे जीवनसूत्र डोळ्यासमोर ठेऊन जगत होतो . रोज चित्र काढणे, चित्र रंगवणे, चित्रमय राहणे म्हणजे जगणे. आपले जीवन जगणे म्हणजे चित्रनिर्मितीशी १००% प्रामाणिक राहणे या सुत्रांवर आमचे प्रयत्न सुरू असायचे . आलेला दिवस आम्ही आनंदाने चित्रमय जगत मस्त एन्जॉय करत होतो.
विहीरीत पाण्याचा साठा असला तरी विहिरीच्या तळाशी सतत जिवंत निर्झर वाहणारे झरे असावे लागतात तरच विहीर सतत पाण्याने भरत असते . तसे रोजचे जगण्यासाठी पुरेसा पैशांचा साठा असला तरी सतत नवीन पैशांचा पुरवठा करणारी यंत्रणा लागतेच . अन्यथा जवळ असलेला साठा एक ना एक दिवस कधीतरी संपतोच आणि ती वेळ आमच्यावर लवकरच आली . त्याचे मुख्य कारण म्हणजे पावसाळा .
महाबळेश्वर हे महाराष्टातील सर्वात जास्त पाऊस पडणारे गिरिस्थान आहे . त्याच्या शेजारी असलेलया पाचगणीतही कधीकधी प्रचंड पाऊस पडतो . त्यात आम्ही डोगरांच्या व्हॅली फेसिंगला राहत होतो . पावसाळ्यात कडाक्याची थंडी , धुके व पावसाचा तडाखा कायम लक्षात राहील असा असतो , कारण आमच्या घरावर पत्रा बसवला होता . या पत्र्यावर पावसाचा जोर वाढला की दणादण पावसाच्या गारांचा , पाण्याचा वर्षाव व्हायचा . पडणाऱ्या गारा दगडासारख्या टणाटण पत्र्यावर आपटायच्या . निसर्गाचे हे रौद्र रूप आम्हाला त्यावेळी विलोभनीय वाटायचे . पावसाळ्यात पर्यटकांची संख्या खूपच कमी व्हायची . शाळा जून महिन्यांमध्ये नियमित सुरु झाल्यामुळे पालकवर्गही यायचा नाही . त्यामुळे चित्र विकत जाण्याची अजिबात शक्यता नसायची . अशा वेळी शांतपणे बसून चित्रनिर्मिती करणे एवढेच हातात असायचे . पण महिन्याच्या गरजा भागविण्यासाठी पैसे कसे कमवायचे ? याची चिंता नेहमीच असायची . असाच चिंतामग्न अवस्थेत असताना तो दिवस उजाडला. जो भावलेला व कायम मनात घर करून राहिला आहे .
त्यादिवशी भयानक गारांचा पाऊस कोसळत होता. गारांमुळे पत्र्यावर दगडांचा वर्षाव झाल्यासारखे वाटत होते . सगळीकडे धुक्याचे इतके दाट पदर पसरले होते की पाचसहा फुटांवरचेही ढगाळ वातावरणामूळे काहीही दिसत नव्हते . दिवसभर पाऊस ,पाऊस आणि नुसता पाऊस . पावसामुळे हवेत गारठा वाढलेला होता . त्यात लाईट गेल्यानंतर तर नुसते बसून राहणे एवढेच हातात होते . मुख्य रस्त्यालगत मोठे लोखंडी गेट बसवले होते त्यानंतर सत्तर पायऱ्या चढून रात्रीच्या वेळी कोणी येण्याची शक्यता नव्हतीच . बंगल्यासमोर दुसरे गेट कुलूपबंद करून आम्ही दोघे निवांत बसून राहिलो होतो . बाहेर प्रचंड प्रमाणात पाऊस पडत होता व मनात पैशांची, रोजच्या जगण्याची चिंता खूपच भेडसावत होती त्यामुळे थोडासा अंधारही भयानक काळोखासारखाच भासत होता .
रात्रीचे सातआठ वाजले असावेत . रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती . स्वाती जेवणाची तयारी करण्यासाठी किचनमध्ये गेली होती . हॉलमध्ये मी निराश मनाने बसून राहिलो होतो आणि अचानक खालच्या पायऱ्याशेजारचे गेट कोणीतरी उघडल्याचा आवाज आला . मी खाली डोकावले तर डोक्यावर हुडी असलेले जॅकेट घालून कोणीतरी अज्ञात तरुण व्यक्ती हळूहळू पायऱ्या चढून येत होती . पायऱ्या चढून आल्यावर मोठे बंगल्याचे गेट कुलूपबंद असल्याने मी घाबरलो नाही . त्या अनोळखी हुडीवाल्या तरुणाने दरवाजात उभा राहून मला हाक मारली .
मिस्टर काळे , प्लीज ओपन दी गेट !
आय वाँट टू बाय युवर पेटींग्ज .
मी तर चकीत झालो . एवढया मोठया दाट धुक्याच्या पावसात चिंब भिजलेली कपडे घालून सत्तर पायऱ्यांचा हा डोंगर चढून कोण अनोळखी इसम माझ्या दारात चित्र विकत घेण्यासाठी आला असावा ? कदाचित क्षणभर मीच स्वप्नात आहे की काय ? किंवा मनात जास्त प्रमाणात विचार करून मलाच काही भास होतोय आहे की काय? असेही मला वाटू लागले .
माय नेम इज अर्शद सईद .
आय एम स्टेईंग अब्रॉड.
बट आय स्टडीड इन न्यू इरा स्कूल .
आता हा पाचगणीतील एका शाळेचा माजी विद्यार्थी , ज्याची माझी कधीही भेट झाली नव्हती , अशा अज्ञात व्यक्तीने माझ्याकडे येऊन चित्र विकत घेण्याची इच्छा प्रकट करावी आणि तीदेखील अशा प्रचंड पावसात पूर्णपणे भिजत . मला तर सगळे प्रकरणच रोमांचकारी वाटू लागले . आणि त्या डोक्यावर छत्री नसलेल्या पण डोक्यावर हुडी घालून नखशिखान्त भिजणाऱ्या तरुणाला मी घरात घेतले .
बाजारात फिरताना अचानक एका दुकानात “ती” दिसली आणि मी एकदम ३५ वर्षांपूर्वीच्या काळात गेलो.
शाळेतली धावण्याची स्पर्धा, जीव तोडून धावलो, नंबरात नाहीच आलो, पण शर्यत संपल्यावर मराठे बाईंनी हातावर ठेवली, तीच ती लिमलेट ची गोळी.
शर्यतीत धावताना बक्षिसापेक्षा त्या गोळीची क्रेझ जास्त होती.
नारंगी केशरी रंगातली ती अर्धचंद्रकोर आकारातील गोळी बघूनच तोंडाला पाणी सुटायचं!
कदाचित त्या काळी फारशी व्हारायटीच नसल्याने त्या गोळीचं अप्रूप असायचं. ५ पैशाला पा….च गोळ्या मिळायच्या हे सांगितलं तर माझी मुलं सुद्धा विश्वास ठेवणार नाहीत.
असो!
काही विशिष्ट गोळ्याच मिळायच्या त्या काळी! त्यातली सगळ्यात आवडती सगळ्यांना परवडणारी हीच ती लिमलेटची गोळी, हिच्या थोड्या वरच्या पातळीवर होती ती छान प्लास्टिक च्या कागदात गुंडाळून येणारी रावळगाव गोळी, तिच्याच पातळीवर लाकडी काडी लावलेली स्ट्रॉबेरीच्या आकाराची आणि खाल्ल्यानंतर जिभेवर रंग रेंगाळणारी स्ट्रॉबेरीची गोळी. एखादा धाडसी मुलगा कधीतरी हुबेहूब सिगरेट सारखीच दिसणारी, टोकाशी निखारा असल्यागत लाल ठिपका असलेली सिगरेट ची गोळी ऐटीत तोंडात ठेऊन यायचा. उभट चौकोनी आकारात मिळणाऱ्या पेपेरमिंट च्या गोळ्या तर खायला कमी आणि रुखवतात तुळशी वृंदावन नाहीतर बंगल्यासाठी जास्त वापरल्या जायच्या. त्या नंतर कधीकाळी दिसायची ती आठवलेची काजू वडी, परफेक्ट चौकोनी आकारातली, वर सोनेरी कागदाचा रुपया असणारी!!
पूर्वी शाळेत वाढदिवसाला वाटली जाणारी एकमेव गोळी म्हणजे लिमलेटच!!
पण काही श्रीमंत मुलं मात्र आम्हाला जणू गुलबकावलीच्या फुला प्रमाणे असलेली, सहजसाध्य नसलेली, वेष्टनापासून चवीपर्यंत सर्वांगसुंदर अशी इकलेअर वाटायचे तेव्हा काय भारी वाटायचं, आणि तेवढया दिवसापुरता त्या मुलाचा भाव वधारायचा!!
आमच्या आईचा एक मामेभाऊ दर दिवाळीच्या आसपास भाऊबीजेला यायचा. आईला ओवाळणीत बंद पाकीट घालायचा. पण आम्हाला त्या चंदुमामा ची ओढ वेगळ्याच कारणासाठी असायची!
तो आम्हा भावंडांसाठी चक्क एक मोठं फाईव्ह स्टार चॉकलेट आणायचा!!
वर्षातून एकदाच मिळणाऱ्या त्या चॉकलेटची वर्षभर वाट पाहायचो आम्ही!!
कधीतरी बाबा खुश असले तर बाजारातून येताना चंदेरी किंवा सोनेरी वेष्टनात मोल्ड केलेले चॉकलेट आणत तो दिवस म्हणजे तर दिवाळीच!!
आमची एक मावशी परदेशात राहते तिनं पहिल्यांदाच आणलेल्या फॉरेन च्या चॉकलेटची चांदी तर कित्येक वर्षे माझ्या अभ्यासाच्या वहीत होती, आणि त्यावर फुशारकीही मिरवलेली आठवतेय.
त्याच तंद्रीत ते गोळ्याचं पाकीट घेतलं आणि घरी आलो, मुलांसमोर धरलं तर नाक मुरडत मुलगी म्हणाली “ईई ह्या काय गोळ्या आणल्यास बाबा, अनहायजीनिक असतात त्या”
आता त्यांना काय डोंबल सांगू की तुमच्या कॅडबरी सिल्क किंवा हल्ली घरोघरी दिसणाऱ्या फॉरेन चॉकलेट (म्हणजे खरंतर एअर पोर्ट च्या ड्युटी फ्री शॉप मध्ये मिळणाऱ्या) च्या जमान्यात आमच्या करता अजूनही लिमलेटची गोळी म्हणजेच फिस्ट आहे म्हणून……..
☆ अदृश्य बंधनातून ‘मुक्त’ होऊयात? ☆ डॉ. प्राप्ती गुणे ☆
… ” वाॅव ! सगळेजण किती छान डान्स करत आहेत… मी पण जाऊ का?…. नको राहू देत.”
… ” मला वाटतंय आज हा राणी पिंक ड्रेस घालूयात…. पण नको, जरा जास्तच भडक वाटायचा तो….. बघू, नंतर घालू पुन्हा केव्हातरी.”
… “आज असं वाटतंय की स्पा मध्ये जाऊन, छान रिलॅक्स व्हावं…पण नको, परीक्षा दोन महिन्यांवर आल्या आहेत.”
… “ढोल पथक पाहून मला एकदम भारावल्यासारखं वाटतं. किती जोशपूर्ण वातावरण निर्माण होतं. मीही यावर्षी ढोल पथकात भाग घेऊ का ? अरे… पण ऑफिसहून आल्यावर मला खूप दमून गेल्यासारखं होतं.”
प्रत्येक वेळी मनात एखादी कल्पना आली– की काहीतरी नवीन ‘ट्राय’ करून बघूयात, की त्याला क्षणार्धात ‘प्रत्युत्तर’ देणारा आवाज नेहमी हजर होतोच. आणि बऱ्याचदा तो नकारात्मक आणि डीमाॅरलायझिंग असतो ….. ” मला नाही जमणार, मला वेळ नाही, मला आता शक्य नाही, उगाच वेळ वाया जाईल ” …. वगैरे वगैरे…… या प्रत्युत्तरांची यादी कधीही न संपणारी आहे.
मला प्रश्न पडतो की हे सगळे मनाचे इन्स्टंट रिप्लाय नकारात्मक असतील तर आपण लगेच ऐकतो आणि कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टींचा पिच्छा पुरवणं लगेच सोडून देतो.
पण मन म्हणालं की –
… जा, डान्स कर !
… तो राणी पिंक ड्रेस घाल !
…. रिलॅक्स हो !
…. ढोल पथकात भाग घे !
तर आपण आपल्या मनाचं ऐकत नाही. आपल्याच मनामध्ये हे द्वंद्व सतत चालू असते आणि आपण त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत राहतो. आणि मग स्वतःच देवाकडे तक्रार करतो की मला जे हवं ते मला कधीच मिळत नाही.
मग ही अदृश्य बंधने कोणती आहेत जी आपल्याला आपलं मन म्हणते तसं जगण्यापासून अडवत असतात? आपल्याला हवे ते मिळवण्यापासून रोखत असतात ?…….
तर ही बंधने म्हणजे …… आपल्या मनात खोलवर रुजलेल्या ” गैरसमजुती “ !
नकळतपणे लहानपणापासून घडलेल्या काही गोष्टींचा, घटनांचा, समजुतींचा किंवा त्यावेळच्या काळानुरूप दिल्या गेलेल्या शिकवणुकींचा आपल्यावर खोलवर परिणाम घडत असतो. त्या गोष्टींचा इम्पॅक्ट जरी प्रत्यक्षात त्या क्षणापुरता घडून येत असला, तरी त्याचे परिणाम मात्र आपल्याही नकळत लाईफ-लॉन्ग आपल्या मनात रेंगाळत राहिलेले असतात. आणि प्रत्यक्ष आयुष्यात त्याच परिणामांचे दडपण आपण विनाकारण बाळगत राहतो… काळाबरोबर त्या पूर्वीच्या गोष्टींचे संदर्भ किंवा अन्वयार्थ नक्कीच बदलतात आणि ते आवश्यकही असते. पण आपण मात्र त्या पूर्वीच्या परिणामांच्या बंधनातून मनापासून बाहेर यायला उगीचच कचरत असतो. आता हेच बघा ना ….
जाता येता कोणीतरी तिसरा त्याला वाटलं म्हणून काहीतरी कमेंट पास करतो ….
… राणी पिंक कसा भडक रंग वाटतो….
… परीक्षा संपेपर्यंत मी रिलॅक्स होऊच शकत नाही…
… कंपनीचं काही सांगता येत नाही, आज सांगेल, उद्या कामावर येऊ नका… रिस्कच नको.
… सगळ्यांसमोर डान्स करायला जायचं आणि सगळेजण आपल्यावर हसायचे…
— आणि आपल्या मनात दडलेल्या अशाच काही गैरसमजुती अशावेळी नेमक्या आपल्या मनाला आत्ता मनापासून जे वाटतंय ते ऐकण्यापासून थांबवतात…. हीच ती मला अनेकदा जाणवणारी आणि विचार करायला अगदी भागच पडणारी बंधने …
परंतु ही बंधने शब्दशः ‘अदृश्य’ असल्याने आपल्याला ही प्रत्यक्ष दिसत नाहीत. आणि जे बंधन ‘प्रत्यक्ष’ दिसत नाही ते तोडणार कसं ना ? …हा एक बाळबोध प्रश्न स्वतःला विचारून आपण एक प्रकारे स्वतःची खोटी समजूत घालत असतो. बरोबर ना …
पण या प्रश्नाचे उत्तर मी सांगू ?…… मन जे म्हणते ते एकदा प्रत्यक्ष करून तर पहा ! आणि मग ही अदृश्य बंधने तुमच्याही नकळत तुटलीच किंवा तुटायला सुरुवात झाली असं नक्की समजा.
मग नुकत्याच साजऱ्या झालेल्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आपणही मनाच्या ह्या अदृश्य बंधनांतून “ मुक्त “ होऊयात ?….
… मनापासून प्रयत्न केला तर नक्कीच जमेल … Try n try n try … But never cry …
योग थेरपिस्ट – आजपर्यंत योग या विषयावर ६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
मनमंजुषेतून
☆ प्रिय परमेश्वरा… ☆ सौ. अंजली धडफळे ☆
प्रिय परमेश्वरा!…
दंडवत प्रणाम
‘तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम ‘ …. खरंच तुझ्यामुळे हा जीवनाचा प्रवास चालला आहे. तुझी रुपं तरी किती ! अगाध आणि अफाट !!
परमेश्वर – देव आहे की नाही, तर ‘ आहेच ‘ असं उत्तर येतं.
कारण या जीवनरुपी सागरात नौका घातली… आणि आता पैलतीर जवळ येऊन ठेपला… हे कोणी केले... तूच केलेस रे परमेश्वरा ! देवा ! तूच ताकद देतोस.
काल माझी नात म्हणाली, ‘God is there or not I don’t know. But I feel God.’ एवढ्या छोट्या मुलीला देव आहे का नाही कळत नाही, पण तो कळतोही. मी तिला म्हटलं, ‘ तू मोठी झालीस ना, की तुला कळेल देव आहे का नाही. ‘
तुझ्या परवानगीशिवाय झाडाचे एकही पान हलू शकत नाही. तू ब्रम्हांडात आहेस, पिंडात आहेस, पंचमहाभूते तुझ्यामुळे निर्माण झाली. मग दर्शन का देत नाहीस? ही सृष्टी हेच तुझे दर्शन मानायचे ना!
कर्ता करविता तूच आहेस. `दळिता कांडिता तुज गाईन अनंता |`
सोमवारी तू शंकर भगवान असतोस, मंगळवारी दुर्गा माता, बुधवारी पांडुरंग, गुरुवारी दत्त महाराज, शुक्रवारी तुळजाभवानी, शनिवारी वीर मारुती, रविवारी खंडोबाराया. कोणत्याही रूपात असलास तरी तुझं दर्शन विलोभनीय आहे, हेच खरं.
किती दिवस सगुणाची उपासना करायला लावणार? निर्गुणाकडे जायचंय. द्वैत सोडून अद्वैताची साधना करायची आहे. त्यासाठी तूच हवास बळ यायला.
ईश्वरीय भक्ती अगाध, अनाकलनीय आहे. तुझ्या दर्शनाचा तुझा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू झालीये. त्यातही तूच साथ देतोस, देणार आहेस.
शब्देविण संवादू अशी तुझी भाषा. शब्दांशिवाय पण तुझं असणं कळतं बरं का !
घराबाहेर पडताना मी तुला नमस्कार करते व म्हणते,
‘देवा माझ्याबरोबर चला !’
‘गातांना देवा माझ्या गळ्यात या !’
‘चालताना देवा माझ्या पायात या !’
‘खाताना देवा जेवायला या माझ्याबरोबर !’
‘झोपताना देवा उद्याची सकाळ प्रेरणादायी होण्यासाठी रात्रभर माझ्याजवळ राहा !’
लिहिताना हातात, शिकवताना गळ्यात रहा असे म्हटले की तुझी जाणीव प्रकर्षाने होते…. असे म्हणत राहण्यासाठी ताकद दे. दर्शन दे.
अनावश्यक रुढी-रिती-रिवाज, परंपरा लादल्या गेलेल्या, उपास-तापास मुकाटयाने सहन कराव्या लागणाऱ्या,.. अंधःश्रद्धेच्या जोखडात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीचा तुम्ही आवाज होता..!
तुम्ही देव वा देवावरची लोकांची श्रध्दा कधीच नाकारली नाहीत. तरीही तुमची भीती वाटली इथल्या काहींना.
विवेकनिष्ठ, विज्ञानवादी समाजाचं स्वप्न तुम्ही पाहिलं..सर्वांना दाखविण्याचा प्रयत्न केला..!
त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त दुःख झालं… तुम्ही गेल्यावर..!
तुम्ही कळला नाहीत, रुचला नाहीत, पचला नाहीत,
तुमची भीती वाटली म्हणून तुम्हाला गोळ्या घातल्या गेल्या..!
….. पण .. .. कितीही गोळ्या घातल्या तरी तुम्ही मरणार नाहीत.
कारण गांधी, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश
मरत नसतात… हेच त्यांना कळत नाही.
विचारांची लढाई विचारांनी लढणाऱ्या प्रत्येक माणसांत तुम्ही आहात..तुमच्या विवेकनिष्ठ विचारांनी, तुम्ही केलेल्या प्रत्येक परिवर्तनवादी लढाईतील आठवणीत तुम्ही जिवंत आहात…
हल्लीच्या पिढीबाबत, आपल्या देशाबाबत आणि अनेक सरकारी योजनांबाबत (आपापल्या वैयक्तिक अनुभवांमुळे) आपण कमालीचे निराशावादी असतो. पण दिल्लीच्या सौरभ वर्मा यांना २०१७ साली आलेला अनुभव म्हणजे या काळ्या ढगांची एक चंदेरी किनार आहे.
सौरभ दिल्ली मेट्रोने प्रवास करत असताना एक typical कॉलेज विद्यार्थी कानांना हेडफोन्स लावून, गाणी ऐकत मांडीवर डबा ठेवून, खाताना त्याला दिसला. काहीतरी झालं आणि त्या विद्यार्थ्याचा डबा खाली पडला आणि मेट्रोच्या फ्लोअरिंगवर ते सगळं अन्न सांडलं.
सौरभने मनातल्या मनात कपाळावर हात मारला. आता हे खरकटं दहा जणांच्या पायाखाली येणार, आणि सगळीकडे बरबट होणार हे सगळं भविष्य त्याला लख्ख दिसू लागलं.
पण पुढच्याच क्षणी त्याला एक आश्चर्याचा सुखद धक्का बसला. ” लगे रहो मुन्नाभाई “चा परिणाम म्हणा किंवा ” स्वच्छ भारत अभियानाचा ” परिणाम म्हणा, पण तो विद्यार्थी उठला… आपल्या वहीतून त्याने एक पान फाडून घेतलं, त्यात ते सगळं खरकटं गोळा केलं, जवळच्या पाण्याच्या बाटलीने ती जागा पुसून घेतली आणि चक्क स्वतःच्या हातरूमालाने जमीन पुसून काढली. जिथं अन्न सांडलं होतं तो मेट्रोचा भाग आता पुन्हा पूर्ववत स्वच्छ झाला होता.
सौरभने आवर्जून त्या विद्यार्थ्याला त्याचे नाव विचारले. स्वच्छ अभियानाचा तो हिरो होता ” प्रांजल दुबे “.
सौरभने आपल्या फेसबुकवर ही कथा छापली होती.
सत्कृत्य करणारा प्रांजल आणि ते लोकांपर्यंत पोचवणारा सौरभ यांच्याकडे पाहिलं की नक्कीच म्हणावंसं वाटतं —– “ मेरा देश बदल रहा है !”