मराठी साहित्य – विविधा ☆ भारतमातेस पत्र… 🇮🇳 ☆ सौ.मंजुषा आफळे

सौ.मंजुषा आफळे

🌳 विविधा 🌳

☆ भारतमातेस पत्र… 🇮🇳 ☆ सौ. मंजुषा आफळे ☆

हे भारत माते,

……. शि. सा. न. वि. वि.

आई तुझी आठवण नित्यनेमाने येते. तुझ्या पोटी जन्मलो आम्ही खूप भाग्यवान आहोत. रोज तुला नमन करूनच, आम्ही उद्योगाला सुरुवात करतो. चंदेरी मुकुट धारण केलेली निळसर झोपाळ्यावर, हिरवीगार पैठणी नेसलेली तू किती भारदस्त व मोहक दिसतेस.!! अवघ्या विश्वात शोभून दिसतेस.!!

तुझी लेकरे आम्ही सर्व भारतवासी सुखी, आनंदी व समाधानी आहोत. तू दिलेल्या संस्कृतीचा ठेवा जपताना आम्हाला खूप अभिमान वाटतो.तुझ्यामुळे आम्हाला जे निसर्गाचे वरदान लाभले आहे, ते आम्हाला समृद्ध करीत आहे. देवभूमी, रामायण, महाभारत, भगवद्गीता, संत महिमा यामुळे अवघ्या विश्वात तुझेच नाव श्रेष्ठत्वाने घेतले जाते. तू तर विश्व जननी शोभतेस.!!येथे तुझ्यामुळे निर्माण झालेले  दिव्य तेज, शांती, आनंद मनाला  तृप्तता देणारे आहे.

तुझ्याच प्रार्थनेत,  निर्माण होणाऱ्या संस्कारांमुळे आम्ही भारतवासी समृद्धीकडे वाटचाल करीत आहोत. तू निर्माण केलेल्या अन्नरसामुळेच आम्ही बलवान व सामर्थ्यवान झालो आहोत.देशवासीयांची देशभक्ती व बुद्धिमत्ता जगात सर्वांनाच अचंबित करते आहे.

तुझी रक्षा करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. व याचा आम्हाला कधीही विसर पडणार नाही हेच तुला सांगावेसे वाटते.

आई ,आम्ही अथक प्रयत्नांती नित्य नवे सुयश संपादन करीत राहू. सर्व त्रुटींना संपुष्टात आणून, आम्ही सर्व क्षेत्रात विश्वविक्रम करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहोत.

ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी तूच आम्हाला बळ देतेस. इतिहासातील पाऊलखुणा आम्हाला सतत मार्गदर्शन करतात.

तुझे कृपाशीर्वाद सतत पाठीशी असावेत हीच नम्र विनंती.🙏

इकडील सर्व काही ठीक. काळजी नसावी.

(ता.क…. “वसुधैव कुटुंबकम्” हे मनावर ठसले आहे.)

           तुझ्याच सेवेत हरघडी

             आम्ही भारतवासी.

                   जयहिंद

👳‍♀️👲🏻👷🏻‍♂️🧕👮‍♀️👷‍♀️👱‍♂️👱‍♀️

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ झंकारलेली तार ऐकू मात्र यायला हवी… भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ झंकारलेली तार ऐकू मात्र यायला हवी… भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

संगीत ऐकायला ते दरवेळी कळावंच लागतं असं काही नाही…. मैफिल जमली की, गायकाच्या हृदयात आधी तार झंकारते, ती ऐकू आली म्हणजे झालं…! 

मला रस्त्यावर जमलेल्या अशा अनेक मूक मैफिलींचा साक्षीदार होता आलं…! 

…. एखाद्याला छातीशी लावलं…तेव्हा त्याच्या हृदयाच्या धडधडीत, तबल्याचा ताल जाणवला… ! 

…. कसे आहात ? बरे आहात ना …?  यावर खाली मान घालून त्यांनी दिलेले उत्तर, ‘होय आम्ही बरे   आहोत’… यानंतर ढोलकी वर मारलेली “थाप” आठवली… !! 

…. नुकत्याच स्वर्गवासी झालेल्या पतीची कहाणी सांगता सांगता, फुटलेल्या बांगड्यांची किणकिण, सतारीशी स्पर्धा करतात…. !!! 

…. आणि हुंदके देत शब्द बाहेर पडतात त्यावेळी, बीन तालासुरांचं हे गाणं हृदय भेदत जातं…

…. ढोलकी गत दोन्ही बाजूंनी थपडा खाणारी ही माणसं… आयुष्याचा “तमाशा” कधी होतो तेच कळत नाही….! 

गाण्यातला सूर हरवला की ते गाणं बेसूर होतं….  परंतु आयुष्यातला सूर हरवला की आयुष्य भेसूर होतं… 

अशीच काही फसलेली गाणी आणि कविता या महिन्यात हाती आल्या…. 

आपल्याच साथीने… अशा काही बेसूर गाण्यांना सुरात बांधून चाली लावण्याचा प्रयत्न केला… 

ज्या कवितांतून शब्द निसटले होते… तिथे योग्य ते शब्द टाकून, त्या कविता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला….

…. जे काही घडलं, ते आपल्या साथीनं…. आपल्यामुळेच…. 

वैद्यकीय

१. भीक मागणाऱ्या लोकांच्या नेमक्या समस्या ओळखण्यासाठी, त्यांच्या अंगातले कलागुण शोधण्यासाठी, वैद्यकीय सेवा देण्याच्या निमित्ताने जेव्हा त्यांच्यात बसून जेवतो खातो, त्यावेळी परकेपणा आपोआप संपुष्टात येतो. यावेळी आपोआपच सुखदुःखाच्या गोष्टी बोलल्या जातात आणि त्या गोष्टींच्या आधाराने काही आराखडे बांधून त्यांना आपल्या सर्वांच्या साथीने छोटे मोठे व्यवसाय टाकून देत आहे. 

डॉक्टर म्हणून रस्त्यावर जे काही करणे मला शक्य नाही, अशा सर्व बाबींसाठीआपण इतर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अशा रुग्णांना ऍडमिट करत आहोत. यामागे हेतू हाच की आजारपणाचे निमित्त करून त्यांनी भीक मागू नये, आजार बरा झाल्यानंतर त्यांना जो जमेल तो व्यवसाय त्यांनी सन्मानाने करावा. 

भिक्षेकरी नाही ..  तर कष्टकरी होऊन, गावकरी म्हणून जगावे… ! 

या महिन्यात जवळपास ६०० रुग्णांवर रस्त्यावर उपचार केले आहेत. अति गंभीर अशा रस्त्यावरील ३ निराधारांना  सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांचे प्राण वाचले आहेत. 

.. गंमत अशी की या तिघांच्याही नातेवाईकांशी, मोठ्या ऑपरेशनपूर्वी त्यांची संमती घेण्यासाठी /सहीसाठी त्यांच्याशी संपर्क साधला… परंतु कोणीही पुढे आले नाही. 

झाल्या असतील यांच्याही काही चुका….

…. पण, माणसाची चूक म्हणजे पुस्तकातलं एक पान आहे….नातं म्हणजे आख्खे पुस्तक आहे…. चुकलं असेल काही तर ते एक पान फाडावं ना …  आख्खे पुस्तक फाडण्यात कोणता शहाणपणा आहे ???

.. असो, सर्व संमती पत्रावर पालक म्हणून माझी सही आहे…. ! एकाच महिन्यात तीन वयस्क आणि जीर्ण पोरांना जन्माला घालताना, बाप म्हणून, किती आनंद होतो ? शब्दात कसं सांगू…. ???

२. रस्त्यावरच रक्त लघवी तपासण्या, वॉकर, कुबड्या, काठी, मानेचे, पायाचे पट्टे यासारखी वैद्यकीय साधने देतच आहोत. पुन्हा हेतू एकच… व्यंगावर मात करत यांनी , माझ्या कुबड्या सोडून, स्वतःच्या पायावर सन्मानानं उभं राहावं… !!! 

अन्नपूर्णा प्रकल्प

रस्त्यावर असहायपणे पडून असलेले गोरगरीब आणि दवाखान्यात उपचार घेत असणारे गोरगरीब यांना आपण दररोज जेवणाचे डबे देत आहोत. (दिसेल त्याला सरसकट आम्ही डबे देत नाही)

जेवण तयार करणे, त्याचे पॅकिंग करणे, आणि ते योग्य त्या व्यक्तींपर्यंत वितरित करणे, हे सर्व काम आमचे सहकारी श्री अमोल शेरेकर हे त्यांच्या पत्नीच्या साथीने करत आहेत. 

अन्नपूर्णा हा संपूर्ण उपक्रम डॉ मनीषा यांच्या देखरेखी खाली सुरु आहे. 

आमचे हात हा प्रकल्प राबवत असले, तरीही देणारे हात मात्र तुम्हा सर्वांचे आहेत. 

एक बाबा… यांना आम्ही जेव्हा डबा द्यायचो, त्यावेळी हात जोडून, ते छताकडे पाहून, तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटायचे… एकदा गमतीने मी त्यांना म्हणालो ‘ काय मागताय बाबा ? ‘ 

.. यावर ते म्हणाले, ‘अरे बाळा, ज्यांनी माझ्या मुखात आज हा घास घातला…त्याला आणि त्याच्या पोरा बाळांना सुख, शांती, समृद्धी आणि समाधान दे… अशी देवाकडे प्रार्थना करतोय… ! ‘ 

.. हे बाबा स्वतः इतक्या त्रासात आहेत, परंतु मागणे मागताना त्यांनी इतरांसाठी मागितले….

शेवटी काय ? स्वतःसाठी मागणं ही झाली लाचारी… पण दुसऱ्यासाठी मागणं ही खरी प्रार्थना… !!!

त्यांची ही प्रार्थना आपणा सर्वांसाठी होती…

त्यांच्या मुखात घास खरंतर आपण सर्वांनी घातले आहेत मी फक्त पोस्टमनचं काम केलं…. तेव्हा त्यांचे आशीर्वाद आपणा सर्वांना लाभू देत हीच माझी शुभेच्छा ! 

– क्रमशः भाग पहिला

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ – एका सुंदर जीवनपटाचे साक्षीदार होताना… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

सौ. रेखा दयानंद हिरेमठ

? मनमंजुषेतून ?

☆ – एका सुंदर जीवनपटाचे साक्षीदार होताना… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ

माझ्या घरट्यात त्यांचं घरटं …….. 

दोन वर्षे  उलटली आता या गोष्टीला. १७ ऑगस्ट २०२१ ते ४ सप्टेंबर २०२१ दरम्यानच्या काळात आम्ही एक  सुंदर जीवनपट अनुभवला. कुतूहल, दया, काळजी,बालपण,पालकत्व, उत्साह ,भीती,आनंद अशा अनेक भावनांनी युक्त असा तो काळ होता आमच्यासाठी. 

२२ तारखेला मी आमच्या घराच्या गॅलरीमधल्या हँगीग कुंडीमध्ये पक्षी बसलेला पाहिला. गॅलरीचे दार उघडल्यावर भुर्रकन उडून गेला. साधा नेहमीचाच प्रसंग, त्यामुळे मी लक्ष दिले नाही. तो पक्षी जोडीने अधून मधून दर्शन देत राहतच होता. या जोडीने मला अजिबात थांगपत्ता न लागू देता हँगिंग कुंडीमध्ये त्याचा प्रशस्त बंगलाच  बनवून टाकला होता. सहज शंका आली म्हणून स्टूलवर चढून पाहिले तर सुंदर जीवांची वाट पाहत असणारं एक सुरेख घरटं तयार होतं. म्हटलं चला एक सुंदर अनुभव मिळेल आता. आणि त्या घरट्याचा मोबाईलमध्ये फोटो काढला. 

आता माझ्यातील मातृत्व जागे झाले, कारण ही कुंडी होती, त्यालाच लागून ग्रीलमध्ये कपडे वाळत घालायची दोरी बांधली होती. कपडे वाळत घालताना, काढताना त्या दोरीमुळे ती कुंडी हलत होती. धक्का लागून पक्षांची अंडी किंवा पक्षांचे पिल्लू खाली पडेल याची भीती जाणवली. त्यामुळे ती दोरी सोडून थोडीशी खाली बांधावी, जेणेकरून त्या पक्षांना त्रास होणार नाही असा विचार मनात येताच मी लगेचच अंमलबजावणीसाठी स्टूलवर चढून दोरी सोडू लागले. दोन मिनीटे देखील झाली नसतील तोवर ते दोन्ही पक्षी काही केल्या मला तेथे हात लावून देत नव्हते. मी मग ‘ थोडा वेळ जाऊ दे. मग पुन्हा आपले कार्य 

साधू ‘असा विचार करून मोर्चा किचनकडे वळवला. पक्षी जवळपास नाहीत याचा अंदाज घेऊन पुन्हा मोहीमेवर रुजू झाले. 

त्या दोरीच्या दोनतीन गाठी सोडून होईपर्यंत काहीतरी क्षेपणास्त्राप्रमाणे माझ्याकडे झेपावत आहे असे वाटले. तो पक्षी अक्षरश: सूर मारून येऊन मला हुसकावून लावत होता. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोपर्यंत हा कुठून आला कळलेच नाही. एकदम स्टूलवरचा एक पाय हलून तोल जाऊन मी पडते की काय असे वाटत असताना माझ्या प्रिय ग्रीलने मला वाचवले आणि पुन्हा एका short break साठी मी थांबले. ती दोरी सोडून खाली पुन्हा बांधण्याच्या पाच मिनिटांच्या कामाला अनेक व्यत्ययाने मला दोन तास लागले. पण शेवटी मोहीम फत्तेच केली. आणि एक आत्मिक समाधान मिळाले.

आता रोज उठल्याउठल्या स्टूलवर चढून पक्षाच्या घरटयाचं अवलोकन सुरु झालं. मी आणि माझा मुलगा रोज न चुकता हे काम उठल्याउठल्या करत असू. अर्थातच घरमालक आणि घरमालकीणबाई जवळपास नसताना.थोड्या दिवसांच्या  प्रतिक्षेनंतर घरट्यामध्ये एक अंडं आम्हाला दिसलं. दुसऱ्या दिवशी दुसरे आणि तिसऱ्या दिवशी तिसरे अशी तीन अंडी त्यांच्या घरट्यात विराजमान झालेली बघून मन अगदी लहान मुलां प्रमाणे बागडू लागलं. झाले.  आता आतुरता होती त्या नवीन पिल्लांची. मग रोज न चुकता आमच्याकडून फोटोसेशन चालू झालं. अकरा दिवसांनी एका अंड्यातून एका पिल्लाचे आगमन झाले. बाराव्या दिवशी तीनही जिवांची हालचाल बघून खूप आनंद झाला. 

ती गोंडस पिल्ले वाढताना बघणे म्हणजे एक अतिशय आनंददायी अनुभव होता. एका जीवनपटाचे आम्ही साक्षीदार झालो होतो. रोजच ते उत्सुकतेने घरटयात बघणे आम्ही आनंदाने करत होतोच. पण एक बालपण मी स्वत: देखील अनुभवत होते. अशातच एके दिवशी पक्षीणबाई रस्ता चुकून चक्क घरातच आल्या. अचानक तिचे असे घरात येणे मला एकदम घाबरवूनच गेले.. मी चटकन आधी पंखा चालू नाही ना हे चेक केले. तिच्या बाहेर पडण्यासाठीच्या घिरटया चालू होत्या पण तिला बाहेर जाण्याचा मार्ग काही सापडेना. ती किचनमधून बाहेर हॉलमध्ये आली. पण खिडकी बंद असल्याने बाहेर जाता येईना. मग खिडकी उघडल्यानंतर भुर्रकन उडून गेली. पण दोन मिनीटे घरात उच्छाद मांडला होता तिने. तेव्हापासून गॅलरीचं दार जास्त वेळ उघडून ठेवलेच नाही.

जसजशी अंड्यांमधून पिल्ले बाहेर येऊ लागली तसतशी ही पक्षाची जोडी आक्रमक होऊ लागली. गॅलरी म्हणजे आमचं साम्राज्य आहे आणि इथे कोणीही पाऊल ठेवायचं नाही असा धमकीवजा इशारा आम्हाला मिळू लागला. आम्ही मात्र आमच्याच घरात (गॅलरीत ) चोरासारखं वावरू लागलो. कपडे वाळत घालताना तर घरट्यापासून लांबच घालायचे. जरा म्हणून घरटयाच्या जवळ कोणी दिसले की कुठूनही ही जोडी प्रगट व्हायची. आता फोटो काढणंही खूप अवघड झाले होते. मी आणि माझा मुलगा हे दिव्य कसेबसे म्हणजे एकाने पहारा द्यायचा आणि दुसऱ्याने फोटो काढायचा असे करत होतो.

तर अशा रीतीने आमचं सहजीवन चालू होतं. यात खूप भावलेली एक गोष्ट म्हणजे पक्षी जेव्हा जेव्हा पिलांना खाऊ घेऊन येत तेव्हा जर आम्ही कोणी तिथे असू तर ते घरट्याजवळच घुटमळत. पिलांचा आवाज आल्यावर आम्ही लगेचच बघायला जात असू. पण आम्ही नजरेआड झाल्यावरच ते पिलांना खाऊ घालत. पूर्वीच्या आजीबाई लेकी- सुनांना सांगायच्या ना ..  सगळ्यांसमोर बाळाला खायला द्यायचं नाही, तो सल्ला आठवायचा. आणि मग मी पण गॅलरीचे दार बंद करून घ्यायचे. मग ते पक्षी पिलांना चिमणचारा खाऊ घालत. पक्षी असो जनावरे असोत की माणूस…  सर्वत्र मातृ-पितृभाव सारखाच ना ! शक्यतो दोन्ही पक्षी एकाच वेळी बाहेर जात नसत. एक जण पहारा द्यायचा आणि एक जण पिलांना चिमणचारा आणण्यासाठी जायचा. दोघांनी आपापली कामे वाटून घेतली होती.

अशा रितीने १४ दिवस कसे गेले काही समजलेच नाही. आम्हाला वाटले होते, जसा अंड्याचा क्रम होता तशी त्यांची वाढ होईल. पण सर्व पिल्ले बहुदा एकाच वेळी उडून गेली. बराच वेळ झाला पक्षी आणि पिलांचा आवाज का नाही म्हणून वर चढून बघितलं तर घरटे रिकामे होते. आनंद झाला होता पिलं आता आपल्या पंखांनी सर्वत्र हुंदडतील म्हणून….  पण काहीतरी हरवल्यासारखं पण वाटत होतं .

चला … एक जीवनपट सुफळ संपूर्ण झाला याचे समाधान घेऊन मी जवळजवळ २०-२२ दिवसांनी त्या कुंडीतल्या रोपाला पाणी घातलं.  मला वाटले होते ही वेल आता वाळते की काय. पण त्या वेलीनेही 

बिनपाण्याचा एवढे दिवस तग धरला होता. तीही त्या पक्षांना सहाय्य करीत होती. तिला पण मायेचा ओलावा मिळाल्यामुळे ती देखील बहरली होती….. 

दEurek(h)a

© सौ. रेखा दयानंद हिरेमठ

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ १५ ऑगस्टच्या निमित्ताने…🇮🇳 ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ १५ ऑगस्टच्या निमित्ताने 🇮🇳 ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

“फाळणीमुळे भारत- पाकिस्तान हे दोन देश फक्त भौगोलिक दृष्ट्या विभक्त झालेत असे नाही, तर हजारो वर्षांपासून नांदत असलेली संस्कृती विभागली गेली. या दोन देशात एक दिलाने राहणाऱ्या कोट्यावधी नागरिकांची मने दुभंगली, त्यामुळे फाळणी ही अश्वत्थामाच्या जखमेप्रमाणे भळभळणारी एक जखम म्हणून या विशाल खंडप्राय देशात राहणाऱ्या लोकांच्या काळजात ठसठसत राहिली आणि त्याचे प्रतिबिंब सहाजिकच साहित्यात उमटले. कृष्णाजी वामन पेंडसे हा सव्वाशे वर्षांपूर्वी कोकणात जन्मलेला माणूस, तारुण्यात धाडसाने कराचीला नोकरीसाठी जातो. आपल्या कर्तबगारीने तेथे अधिकार पद मिळवतो, पण फाळणीच्या जबरदस्त तडाख्याने कोकणात माघारी येतो. या दैव दुर्विलासात त्याला त्याची सहधर्मचारिणी खंबीरपणे साथ देते.” —– 

— प्रदीप गांधलीकर यांनी मंगला काकतकर यांच्या “आनंदाचे डोही आनंद तरंग” या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेतील हा काही भाग आहे.

(कै) मंगला काकतकर ही माझी आत्त्या, जन्मापासून कराचीत राहिलेली आणि फाळणीनंतर भारतात येऊन जिने खडतर आयुष्याला तोंड दिले. संगमनेर येथे शिक्षिकेची नोकरी केली व राज्य शासनाचा उत्कृष्ट शिक्षिका हा पुरस्कार मिळवला ,अशी अतिशय कर्तृत्ववान ! तिच्या सांगण्यातून आणि लेखनातून त्यांनी अनुभवलेली फाळणी आम्ही पाहिली !

एकेकाळी आलिशान बंगल्यात राहणाऱ्या व फाळणी झाल्यावर अचानक राहायलाही जागा नाही अशी परिस्थिती ! पण ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी राखेतून परत जन्म घेतो त्याप्रमाणे सर्व कुटुंबाने भरारी घेतली व नव्या आयुष्याला सुरुवात केली.

तिच्या पुस्तकाची सुरुवातच “8 फेब्रुवारी 1947 ,या दिवसाची !” गौरी सदन “कराची येथे नवीन घराची वास्तुशांती ! पण वास्तुशांतीला फक्त घरचे लोक व दोन भटजी ! देशातील वातावरणच अस्थिर होते. तेव्हा जे अनुभवले ते तिने शब्द रूप केले, पुढील पिढीला ते कळावे म्हणून !

“फाळणी नंतरचे काव्य” या लेखात ती सांगते, ” आमच्या जन्मापासून कराचीचे आणि आमचे नाते होते. कराची कधी सोडावी लागेल असे मनातही आले नव्हते. कराचीत दंगली उसळल्यावर सर्व कुटुंब मनोरा (कराची पासून जवळच असलेले बेट,जिथे आजोबांनी observatory त नोकरी केली ! ) येथे उदास व खिन्न मनस्थितीत गेले, केवळ दोन बॅगा बरोबर घेऊन ! त्यानंतर मिळेल तसे हे सर्व कुटुंब भारतात परतले. आत्त्या  सांगायची, ” वडिलांना फाळणीमुळे असे काही घडेल याची कल्पनाच आली नव्हती. इंग्रजी राजवट गेली, पाकिस्तानची येईल !सर्वसामान्य लोकांना काय त्रास होणार?” पण घडले भलतेच ! पाकिस्तानी लोकांनी त्यांना घराबाहेर काढले । सामानाची लुटालूट केली. त्यानंतर सर्व कुटुंब जसं येता येईल तसा प्रवास करून (पाच दिवस बोटीचा)   मुंबईला आले, तिथून पुण्याला आले आणि काही काळाने कोकणात जाऊन स्थिरावले !

७५ वर्षे होऊन गेली या कालखंडाला ! पण माझ्या माहेरच्या पेंडसे कुटुंबाने भोगलेल्या फाळणीच्या आठवणी स्वातंत्र्यदिनी जाग्या होतात आणि नकळत आपण हे सगळे भोगणाऱ्या कुटुंबाच्या साखळीची एक कडी आहोत ही जाणीव मनाला बोचत राहते !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ राष्ट्र मजबुतीचा संकल्प… भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

🌳 विविधा 🌳

☆ राष्ट्र मजबुतीचा संकल्प… भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

(कारण कुटुंब, समाज आणि राष्ट्र आपल्या प्रत्येक घटक जनांचे संरक्षण, पालन आणि पोषण करत असते. असा मोठा फायदा असल्याने या संकल्पना जगात आज खोलवर रुजल्या आहेत.) – इथून पुढे 

सद्य परिस्थितीत राष्ट्र ही सर्वात मोठी व्यवहारी संकल्पना आहे. देशाच्या अंतर्गत समाजकंटकांपासून न्यायप्रिय लोकांचे रक्षण करण्यासाठी पोलिस व न्याययंत्रणा असतात. राष्ट्राचे शत्रूराष्ट्राच्या आक्रमणांपासून रक्षण करण्यासाठी सीमेवर सेनादले कार्यरत असतात.  

दुसऱ्याच्या कष्टाचे ओरबडण्याला चोरी वा लुट असे म्हणतात. राष्ट्र सुद्धा चोऱ्यामाऱ्यांचा शॉर्टकट घेवून मोठे होण्याचा प्रयत्न करतात. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करून तेथील साधनसंपत्तीची लुटालुटली केल्याची अगणित उदाहरणे इतिहासात सापडतील. 

भारताने मात्र आजवर कुठल्याही राष्ट्रावर असा अन्याय केला नाही. पण भारतीयांच्या या सभ्यपणाला कदाचित भारताची कमजोरी समजली गेली. त्यामुळे खैबर खिंडीतून भारतावर आजवर अनेक आक्रमणे आली. 

एक हजार वर्षांपुर्वी भारताची अर्थव्यवस्था इतकी मजबुत होती की जगाच्या GDP च्या 37% वाटा एकट्या भारताचा होता. इतकी आर्थिक सुबत्ता असुनही सैन्यदले कमकुवत ठेवण्याची चुक आपल्या पुर्वजांनी केली. परिणामी एक हजार वर्षांची गुलामगिरी आणि प्रचंड आर्थिक शोषणाला भारत बळी पडला. 

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताची GDP जगाच्या GDP च्या केवळ 3% इतकीच शिल्लक राहिली होती. कधी काळी सोन्याचा धुर निघणारा संपन्न देश स्वतंत्र होईपर्यंत पार उघड्या-नागड्या लोकांचा देश झाला होता.

सीमेवर सेना सज्ज असेल तर देशाअंतर्गतही शांतता आणि स्थैर्य राहते. देशाअंतर्गत शांतता आणि स्थैर्य असेल तर देशात शेती, व्यवसाय आणि व्यापार वाढतो. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली की शेती, व्यापार आणि उद्योगधंदे बसतात. परकीय गुंतवणूक निघून जाते. म्हणून देशांच्या सीमेवर शांतता राहणे महत्वाचे असते. 

सीमेवर पराक्रमी सेना पहारा करत असेल तर देशामध्येही कायद्याचे राज्य येते. शांत आणि स्थिर वातावरणात शेती, व्यवसाय आणि व्यापार वाढतो. परकीय गुंतवणूक वाढते. तंत्रज्ञानाचा विकास होतो. आर्थिक सुबत्ता येते. या आर्थिक सुबत्तेतून सेना सक्षम होते. सक्षम सेनेच्या फक्त धाकाने शत्रू आक्रमणाची हिंम्मत करत नाही. त्यातून देशात अजून स्थिरता आणि स्थैर्य येते. अशा प्रकारे सेनेच्या रक्षणातून शेती-व्यापार-व्यवसाय वाढतात. तसेच शेती-व्यापार-व्यवसाय वृद्धीतून सेना सुदृढ होते. या सकारात्मक चक्रातून राष्ट्र बलवान आणि संपन्न होत जाते. 

देशाची सेना मजबुत करण्याची जबाबदारी फक्त एकट्या सरकारची नसून राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची असते. सेनेसाठी नागरिक जेव्हा तण-मन-धन अर्पण करतात तेव्हा सेना बलवान होते. सेनेवर नागरिक तण-मन-धन अर्पण करत असतील तर सेनेचे मनोबल वाढते. शेवटी प्रत्येक सैनिकाला ‘मी कुणासाठी जीव धोक्यात घालून लढतोय’ हा प्रश्न पडतोच की! 

पायाजवळचा स्वार्थ पाहणे सोडून सेना संवर्धनाचा दुरचा विचार करणारे सुज्ञ नागरिक ज्या देशात राहतात त्या देशाची सेनादले मजबूत होतात. ते जीव तोडून देशाचे रक्षण करतात. तिथेच प्रगती होते. हेच देश आज विकसित म्हणून गणले जातात. 

कठीण परिस्थितीत देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्यदलांचे आपण देणे लागतो का? असा प्रश्न प्रत्येक भारतीयाला पडायलाच हवा. कुणी असे म्हणू शकते की इतके मोठे सैन्यदल! मी एकटा अशी किती मदत करू शकतो? पण सामान्य भारतीयांकडे अशी एक शक्ती आहे जी कुठलाही बदल घडवून आणू शकतो. ती शक्ती आहे संख्याबळ!  

140 कोटींचा देश! प्रत्येकाने 100 रुपये दिले तरी 14000 कोटी जमतील. देशातील लोकांच्या एक वेळच्या चहा-नाष्ट्याच्या पैशात संपुर्ण सैन्याला बुलेटप्रुफ जॕकेट मिळाले असते. पण तरी जवानांना इतकी वर्षे वाट पहावी लागली. 

जर लोकांनी पैसे जमा केले तर हा सगळा पैसा योग्य मार्गाने जाणेही आवश्यक असते. नाहीतर अशा पैशांना वेगवेगळ्या वाटा फुटून तो पैसा ठगांच्या खिशात जातो. इंटरनेटवर थोडे पाहिल्यावर कळाले की सैन्यदलांनी त्यासाठी छान व्यवस्था करून ठेवलेली आहे.

National Defence Fund !   

1962 च्या युद्धात सामान्य जनतेने यथाशक्ति मदत केली व कोट्यावधी रुपये सैन्याला दिले. या पैशाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी National Defence Fund ची स्थापना झाली. या फंडात आपण नेट बँकींगने आॕनलाईन पैसे पाठवू शकतो. 

2016 सालच्या उरी हल्ल्यानंतर मी हादरून गेलो होतो. त्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकने मला रोमांचित केले होते. पण 2019 च्या जानेवारीत उरी चित्रपट पाहिल्यावर मी सर्जिकल स्ट्राईक मधील खरा थरार अनुभवला. त्यात डोणज्याच्या दवाखान्यात मला दाखवायला BSF चा हा जवान आला होता. त्याची गोष्ट ऐकली आणि अंगावर काटा आला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून हा जवान वाचला होता. त्याचा मित्र आणि सहकारी मात्र इतके नशीबवान नव्हते. सैन्यदलासाठी आपणही काहीतरी करावे हा विचार मनातून काही केल्या जाईना.

प्रत्येक वर्षी एका सैनिकाला लागणारे बॕटल गिअर खरेदी करता येतील इतके पैसे National Defence Fund मध्ये द्यावेत यावर मी विचार करू लागलो. मग नेटवर सैन्यदलांच्या सौद्यांविषयीच्या जुन्या बातम्या शोधल्या. सैन्यातील मित्रांना विचारले. थोडी माहिती मिळाली. 

Bullet proof jacket- कंपनी SMPP Pvt Ltd- किंमत प्रतिनग 35000 रुपये 

Assalt rifle- कंपनी SIG SAURE / कंपनी AK203- किंमत प्रतिनग साधारण 80000 रुपये 

Helmet- कंपनी Kanpur-based defence firm MKU- किंमत प्रतिनग 10800 रुपये 

Helmet mounted Night vision camera – कंपनी PVS 7 Gen 3 Night Vision Goggles- किंमत  65000 रुपये.

एकूण 35000 + 80000 + 10800 + 65000 = 190800 म्हणजे वर्षाला 200000 /- रुपये. 

हा सर्व विचार चालू असतानाच 14 फेब्रुवारी 2019 ची पुलवामाच्या आत्मघाती स्फोटाची बातमी आली. एक दहशदवादी स्वतःबरोबर चाळीस चाळीस जवान उडवून देतो. मन विषन्न झाले. देशाच्या शत्रूंची विद्ध्वंसक मानसिकता यातून पुन्हा जाणवली. दर वर्षी सैन्य दलाला दोन लाख रूपये द्यायचा मी तात्काळ निश्चय केला. 

खरे तर दोन लाख ही रक्कम माझ्या कमाईचा मोठा भाग होता. पण माझा निर्णय पक्का झाला होता. आता मागे फिरण्याचा विचारही शक्य नव्हता. माझ्या दवाखान्याशिवाय मी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे आॕपरेशन करायला जातो. त्याचे जे पैसे मिळतात ते या कामासाठी वापरायचे असे मी ठरवले. बायकोला बेत सांगितला. ती तर माझ्यापेक्षा जास्त खुष झाली.  “नक्की करा आणि घरखर्चाची चिंता करू नका. या कामात काही मदत लागली तर मलाही सांगा” असं ती म्हणाली. आणखी हुरूप वाढला.

पहिले इंटरनेट बँकींग ॲक्टिव्हेट करून घेतले. पहिले दोन लाख नॕशनल डिफेंस फंडाला पाठवले. काही मिळाले की आनंद मिळतो याचा अनुभव आजवर होता. देण्यातही खुप आनंद असतो याची मला प्रथमच प्रचीती आली. 

– क्रमशः भाग दुसरा 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कोसळणारा पाऊस…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

स्वपरिचय

शिक्षण –B A, MSW, PGDPC

  • व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ता आणि समुपदेशक म्हणून सामाजिक क्षेत्रात गेली 25 वर्षे काम करीत आहे.
  • वाचन आणि लेखनाची आवड. विविध नामवंत वर्तमान पत्रामध्ये सामाजिक प्रकल्पा विषयी लेखन प्रसिद्ध तसेच सामाजिक आशय असलेल्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.
  • २०१६ मध्ये मे महिन्याच्या एका रविवारी पहिल्यांदा संडे डिश या नावाने लघुकथा लिहिली. ती व्हॉटसपवर पाठवली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आजतागायत सलग 373 रविवार विविध विषयांवरच्या लघुकथा प्रसिद्ध झाल्या आहेत.
  • संडे डिश या रजिस्टर ब्रॅंड नावाने दर रविवारी सकाळी प्रसिद्ध होणारी लघुकथा वाचणं हा अनेक रसिकांसाठी रविवारचं नवं रुटीन झालयं.
  • अभिवाचन,ऑडिओ,व्हिडीओ,पुस्तक या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील विविध वाचकांपर्यंत पोहचलेल्या संडे डिशचं पुस्तकही प्रसिद्ध झालंय.

? मनमंजुषेतून ?

☆ “कोसळणारा पाऊस…” ☆ श्री मंगेश मधुकर

साल १९८६…

पावसाळ्याचे दिवस,मी सातवीत असतानाची गोष्ट.संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी न जाता ग्राऊंडवर खेळत होतो. ढग दाटून आल्याचं खेळण्याच्या नादात लक्षातच आलं नाही. शिपाईमामा ओरडल्यावर निघालो. काही वेळातच धो धो पावसाला सुरवात झाली. एका दुकानाच्या शेडमध्ये उभा राहिलो. दोन तीन लोक आधीपासून होतेच. पावसाचं आक्राळविक्राळ रूप पहिल्यांदाच बघत होतो. सुरुवातीला भारी वाटलं परंतु वीजांचा कडकडाट,लाईट गेलेले,सगळीकडे अंधार झाल्यावर घाबरलो. बराच वेळ झाला तरी पाऊस पडतच होता. मनातल्या मनात देवाचा धावा सुरू केला. खूप रडू येत होतं पण कसबसं आवरलं, कारण आजूबाजूला सगळे अनोळखी. रस्त्यावरसुद्धा फार गर्दी नव्हती. धीर सुटत चाललेला.

’काय व्हायचं ते होऊ दे, पण थांबण्यापेक्षा भिजत जाऊ ’ असं सारखं वाटायचं पण हिंमत होत नव्हती. सडकून भूक लागलेली. शेवटी कसंबसं रोखून धरलेलं रडू फुटलंच. हमसून हमसून रडायला लागलो तेव्हा सोबतच्या लोकांनी पाठीवरून हात फिरवत धीर दिला. इतक्यात…………

……. माझ्या नावाची नेहमीची हाक ऐकायला आली. कान टवकारले तर आवाज ओळखीचा वाटला. शर्टाच्या बाहीनं डोळे पुसून अंधारात आवाजाच्या दिशेने पाहिलं, तर समोर गुडघ्यापर्यंत दुमडलेली पॅन्ट, शर्ट, एका हातात जुनी छत्री अन दुसऱ्या हातात स्टीलची मोठी बॅटरीच्या प्रकाशात आडोशाला थांबलेल्या प्रत्येकाकडं कावऱ्याबावऱ्या नजरेनं पाहणारे ‘नाना’ दिसले. जीव भांड्यात पडणं ही शाळेत शिकवलेली ‘म्हण’ पुरेपूर अनुभवली. “ नाना,नाना ” मोठयानं ओरडत पावसाची पर्वा न करता नानांच्या दिशेने धावत गेलो आणि घट्ट बिलगून जोरजोरात हमसून हमसून रडायला लागलो. नानांनी उचलून कवटाळलं तेव्हा त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं. 

“ नाना,तुम्ही रडताय ”

“ नाही रे.पावसाचं पाणी तोंडवर उडलयं ”.. नानांनी तोंड फिरवून डोळे पुसलेले पाहिलं पण गप्प बसलो. घरी जाताना पाऊस होताच परंतु आता भीती वाटत नव्हती, कारण खांद्यावर दफ्तर एका हातात छत्री, बॅटरी असलेला हात मी घट्ट पकडलेला..  असे ‘नाना’ सोबत होते. हिमालयासारखा भक्कम आधार असल्यानं काही वेळापूर्वी भीतीदायक वाटणारा पाऊस आता भारी वाटत होता.

—- 

साल २०२3 

पावसाळ्याचे  दिवस … संध्याकाळी पाच वाजताच आभाळ भरून आल्यानं लवकर अंधारलं. घाईघाईत ऑफीसमधून निघालो, तितक्यात धो धो कोसळायला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासोबत पावसाचा जोर वाढत होता. लगेच ट्राफिक जाम,जागोजागी पाणी साठलं मग नेहमीप्रमाणे …. ..चीड, संताप, वैताग, हतबलता अशा भावना मनात येऊन नंतर सवयीनं शांत झालो. इंच इंच गाडी दामटत तब्बल दीड तासानं घरी पोचलो. सगळीकडे अंधार होता. अंगात रेनसुट असूनही ओला झालोच. मला  पाहून बायको प्रसन्न हसली.

“देवाची कृपा !! सुखरूप आलात”

“काय भयानक पाऊस आहे. ”

“हो ना.तुम्ही येईपर्यंत जीवात जीव नव्हता. पाऊस अन त्यात हा अंधार,फार भीती वाटत होती.”

“नाना आणि चिरंजीव कुठयंत ”

“नाना रोजच्याप्रमाणे फिरायला गेलेत आणि लेकाचा फोन आला होता दहा मिनिटात घरी येतोय.”

“एवढ्या पावसात फिरायला??”

“ते बाहेर पडले तेव्हा पाऊस नव्हता. सारखा फोन करतेय पण उचलत नाहीत.”

“छत्री??”

“नाही नेली. मी सांगितलं,जाऊ नका, तरीही बाहेर पडले.” 

“त्यांना घेऊन येतो. छत्री दे”

“आधी घरात या. कपडे बदला तोपर्यंत मी चहा करते.  मग जा”

“नको.जवळच कुठेतरी असतील आधी त्यांना घेऊन येतो मग निवांत चहा !!!” 

अंगात रेनकोट असूनही छत्री घेऊन चालतच बाहेर पडलो. सोसायटीत,रस्त्यावर अंधाराचं साम्राज्य होतं…..   ‘ काही गरज नव्हती.एक दिवस घरात बसले असते तर काही बिघडलं नसतं पण ऐकायचं नाही ’ स्वतःशीच चडफडलो.

मोबाईल टॉर्चमध्ये आडोशाला थांबलेल्यामध्ये शोधत होतो पण नाना  दिसले नाहीत. फोन केला तर उचलला नाही. चक्क कॉल कनेक्ट झाला.

“ नाना,नाना मी बोलतोय.कुठे आहात ”..  काहीच प्रतिसाद नाही. मी ‘हॅलो,हॅलो’ करत असतानाच फोन कट झाला. पुन्हा कॉल केला. नुसतीच रिंग वाजत होती. काहीवेळानं उभा असलेला प्रत्येक माणूस नानांसारखाच वाटायला लागला. जवळ जाऊन पहायचं, खात्री पटली की पुढे जायचं, असं करत करत घरापासून दोन चौक पुढे आलो पण…. मनातली धाकधूक वाढली. सत्तरी पार केलेले नाना कुठं असतील, कसे असतील, काय करत असतील, ..  ‘मन चिंती ते वैरी ना चिंती’ हेच खरं.

पुढे असलेल्या दुकानाच्या शेडमध्ये चारपाच जण उभे होते. जवळ जाऊन पाहीलं पण पुन्हा निराशा. पुढे निघालो. पुन्हा  फोन केला अन मागे असलेल्या दुकानाच्या बाजूनं ओळखीची  रिंगटोन ऐकायला आली. जोरजोरात “नाना,नाना” अशा हाका मारायला लागलो. तेव्हा तिथल्या माणसांमध्ये हालचाल जाणवली. सर्वात मागे उभे असलेले नाना सावकाश पावलं टाकत पुढे आले. भीतीमुळे हात थरथरत होते. डोळे किलकिले करून ते अंदाज घेत होते. अंधारामुळे मला ओळखलं नाही. त्यांना सुखरूप पाहून अतिप्रचंड आनंद झाला. 

“नाना !!!” म्हणत मिठी मारली तेव्हा त्यांनी घट्ट पकडलं. त्यावरून मन:स्थितीचा अंदाज आला. खांद्यावर डोकं ठेवल्यावर दिलेले हुंदके जाणवले, तेव्हा मीसुद्धा डोळ्यातलं पाणी रोखू शकलो नाही.

“चला” पुढे केलेला हात त्यांनी घट्ट पकडला आणि काठी टेकवत चालू लागले.

“मी आहे काळजी नको” 

“आजकाही खरं नव्हतं. मी तर आशा सोडली होती.वाटलं की आता……” कापऱ्या आवाजात नाना म्हणाले.

“नका टेंशन घेऊ. फोन का घेतला नाही”

“कसा घेणार, गडबडीत चष्मा फुटला. नीट दिसत नव्हतं. त्यात अंधार, एकदोनदा घेतला तर आवाज आला नाही म्हणून.. खरं सांगू खूप घाबरलो होतो. देवासारखा धावून आलास.”

“आठवतं… माझ्यासाठी तुम्हीपण असंच शोधत आला होता.” नाना फक्त हसले….. 

… घरी जाताना मोबाईल वाजायला लागला मी दुर्लक्ष केलं. एका हातात छत्री अन दुसरा हात नानांनी पकडलेला.

काळासोबत आम्हां बापलेकाच्या आयुष्यातल्या जागा, भूमिका आणि जबाबदाऱ्या सगळं सगळं बदललं.  फक्त एक गोष्ट कायम होती ती म्हणजे कोसळणारा पाऊस. आमच्या बदलत्या नात्याचा साक्षीदार …..

सोसायटीत पोचलो तेव्हा समोरून छत्री घेऊन येणारे चिरंजीव भेटले…. 

“बाबा,फोन का रिसिव्ह करत नाही”

“पाऊस होता म्हणून…”

“आईनं सगळा प्रकार सांगितला. तुम्ही दोघंही बाहेर, त्यात फोन उचलत नाही, मग शोधायला निघालो” . 

नाना आणि मी एकमेकांकडे पाहून हसलो तेव्हाच लाईट आले. सगळीकडे लख्ख प्रकाश पडला त्यात कोसळणारा पाऊस फारच सुंदर दिसत होता.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तोच चंद्रमा नभात… श्री मनोज मेहता ☆ श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? मनमंजुषेतून ?

☆ तोच चंद्रमा नभात… श्री मनोज मेहता ☆ श्री मेघ:श्याम सोनावणे

कधीकाळी बाबूजींची अन् माझी ओळख तरी होईल का, हेच माहीत नव्हतं, मैत्री तर दूरच ! आणि अचानक डॉ. पुणतांबेकर यांनी १८ एप्रिल २००० रोजी, फर्मान सोडलं, “मनोज, बाबूजींची छायाचित्रं तूच काढायचीत, आपल्याला उद्या त्यांच्या घरी जायचे आहे.” आणि त्याप्रमाणे आम्ही सकाळी १० वाजता बाबूजींच्या घरी पोचलो. सोसायटीच्या नामफलकावर एकच नाव मराठीत होतं, ते म्हणजे………… ‘सुधीर फडके’.

डॉक्टरांच्या मागून मी जरा घाबरतच घरात प्रवेश केला आणि, ज्यांनी करोडो मराठी रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले, त्यांचे मला साक्षात  दर्शन  झाले. लेंगा – झब्बा, बुटकी मूर्ती, प्रसन्न चेहरा! मी  भारावून काही क्षण पहातच राहिलो. त्यांनी “पाणी घ्या”, असं म्हटल्यावर, मी भानावर आलो.

डॉक्टर आणि बाबूजींचं बोलणं सुरू झालं. आणि माझं काम झपाझप सुरू झालं. आत्ताच्या भाषेत कँडीड छायाचित्रं… पूर्ण रोल संपला. त्यांच्या गप्पा संपल्या व डॉ. पुणतांबेकर म्हणाले, “मनोज आता आमची छायाचित्रे काढ”. 

मी लगेच म्हणालो, “माझी छायाचित्रे काढून झालीत”. 

मी असं म्हणताच डॉक्टर अचंबित होणे स्वाभाविक होते, पण बाबूजींनाही कुतूहल वाटले. गप्पांच्या ओघात त्यांचे माझ्या हालचालींकडे लक्षच नव्हते. आम्ही मग चहा घेऊन डोंबिवलीत परतलो. 

दुसऱ्या दिवशी मी रंगीत छायाचित्रे घरीच डेव्हलप केले आणि डॉक्टरांना फोन करून बाबूजींचा क्रमांक घेतला. बाबूजींशी दूरध्वनीवर बोललो. ते म्हणाले, “अहो, मीच तुमचा क्रमांक मागणार होतो. बरं झालं तुम्हीच दूरध्वनी केला. उद्या येताय का माझ्या घरी, वेळ आहे का तुम्हाला?”

“अहो बाबूजी, मी यासाठीच फोन केला होता, येतो नक्की”, असे सांगून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता दादरला त्यांच्या घरी पोहचलो. त्यांना नमस्कार केला, तेव्हा ते म्हणाले, “नमस्कार आई-बाबांना करायचा”.

छायाचित्रे हातात दिल्यावर, कधी एकदा ते उघडुन पाहू, अशी एखाद्या लहान मुलासारखी उत्सुकता दर्शवणारी बाबूजींची गंमत मी पाहिली. सगळी छायाचित्रे पाहून झाल्यावर मला म्हणाले, “इकडे या हो”. 

मी त्यांच्याजवळ गेल्यावर, त्यांनी दोन्ही हात माझ्या खांद्याला पकडून, माझ्या दोन्ही गालांचे गालगुच्चे घेतले. त्या क्षणाला मला माझा ‘सर्वोच्च बहुमान’ झाला असे वाटले. ते म्हणाले, “अहो, इतकी वर्ष कुठे होतात?”

त्यानंतर डोंबिवलीचे शिवसेनेचे धड़ाडीचे कार्यकर्ते नितिन मटंगे ह्यांनीही, ‘मला बाबूजींच्या गाण्यांच्या सूचीचे पुस्तक करायचे आहे, तूच बाबूजींची छायाचित्रे काढायचे’, असे म्हणून मला त्यांच्या घरी नेले. मला पाहताक्षणी बाबूजी नितिनला म्हणाले, “तुमच्या पुस्तकात माझे झक्कास छायाचित्र येणार”. असे बाबूजींनी म्हणताच, नितिन व वसंतराव वाळुंजकर हे उडालेच ! 

तद्नंतर वारंवार बाबूजींचा आणि माझा कधी प्रत्यक्ष, कधी दूरध्वनीवरून संवाद होणे तर कधी त्यांच्या घरी गप्पांचा फड कसा रंगत गेला हे कळलेच नाही. असे आमचे मैत्रीचे धागे जुळत गेले. 

डोंबिवलीचे बाबूजी, म्हणजे विनायक जोशी, यांचा दिल्लीत महाराष्ट्र मंडळातर्फे कार्यक्रम होता. विनायकचा हट्ट होता छायाचित्रे मनोजनेच काढावीत. हा हट्ट विनायकचा काल, आज व उद्याही असणारच. त्याने इतके अचानकच ठरवले आणि बाबूजींनाही तिथे पुरस्कार दिला जाणार होता.

बाबूजींबरोबर जाण्यास, श्रीधरजींना वेळ नव्हता, म्हणून त्यांनी मला विचारले, “मनोज, तुम्ही याल का माझ्याबरोबर दिल्लीला?” त्यांना मी छायाचित्रे काढायला तिथे येणार हे माहीत नव्हते. माझा तर आनंदच गगनात मावेना! आणि दिल्लीत त्या संपूर्ण सोहळ्यात मी एकटाच छायाचित्रकार ! 

महाराष्ट्र मंडळाचे मुख्य संयोजक श्री. हेजिब यांनी ७ केंद्रीय मंत्र्यांसमोर, श्री. लालकृष्ण आडवाणी ह्यांच्या हस्ते माझा सत्कार केला, तेव्हा बाबूजी म्हणाले, “मनोज, कॅमेरा द्या, मी तुमचं छायाचित्र काढतो.” केवढा हा माझा सन्मान. मला तर गगणाला गवसणी घातल्यासारखे वाटू लागले.

लगेच दोन महिन्यांनी बाबूजींना कलकत्ता येथे पुरस्कार समारंभासाठी जायचे होते. तेव्हाही बाबूजींनी आग्रहाने मला बरोबर नेले. तेव्हा मी बाबूजींना म्हटलं, “बाबूजी, तुमच्यामुळे हा योग आला.” तेव्हा लगेच ते म्हणाले, “तुमचे काम छान आहे, म्हणून सगळे तुम्हालाच बोलवतात.” कुठेही ते स्वतःला मोठेपणा घेत नसत. अशा दिलखुलास, सदाबहार, प्रेमळ पितृतुल्य व्यक्तिमत्त्वाचा सहवास मला लाभला त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.

माझी व शंना नवरे काकांची ४५ वर्षांची मैत्री असूनही, शंना काकांनाही असूया वाटली. गमतीने म्हणाले, “मनोज, तुझी बाबूजींशी इतकी कशी रे मैत्री झाली ?”

बाबूजींना नतमस्तक होऊन म्हणावेसे वाटते,

“सूर गेले दूर आता, शब्द मागे राहीला, चंद्र होता साक्षीला… चंद्र होता साक्षीला….”

लेखक – श्री मनोज मेहता

डोंबिवली. मो. ९२२३४९५०४४ 

प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘शब्दभेट… कृतज्ञतेची’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

??

☆ ‘शब्दभेट… कृतज्ञतेची‘ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

तसं बघायला गेलं तर मी कोणी फार महान व्यक्ती वगैरे नाही की मी स्वतःच्या आयुष्याबद्दल लिहावं आणि लोकांनी ते कौतुकानं वाचावं. पण शहापूरसारख्या आदिवासी भागात जगण्यासाठी रोजची तारेवरची कसरत करत, मी LIC सारख्या नामांकित वित्तीय संस्थेतून मॅनेजर पदावरून निवृत्त होणं, हे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप मोठं यश आहे. 

माझ्या या यशात वाटेकरी असलेल्या माझ्या कुटुंबियांइतकाच अनेक जणांचा हातभार, सहकार्य या प्रवासात लाभलं. कोणतेही नातेसंबंध नसताना, निःस्वार्थ वृत्तीने मदत करणारी अनेक माणसं भेटली, या साऱ्यांविषयी मनात नेहमीच कृतज्ञतेची भावना आहे आणि आजीवन राहील. आणि ती व्यक्त करण्यासाठीच हा लेखनप्रपंच ! 

तर अशाच एका व्यक्तीबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. ती व्यक्ती म्हणजे शीलामामी ! शीला शिवराम लेले. ही वर्षाची, म्हणजे माझ्या मैत्रिणीची मामी बरं का ! राजामामा, मामी त्यांची दोन मुलं-स्वाती – सचिन आणि वर्षाचे आजी-आजोबा अशी सहा माणसं या कुटुंबात होती. आधी हे भिवंडीला राहायचे, नंतर ठाण्यात, नौपाड्यात आले. बहुतेक मामाचं मुंबईत ऑफिस आणि मुलांच्या शिक्षणाची सोय म्हणून आले असावेत. मामीचं घर तसं लहानच, म्हणजे स्वैपाकघर आणि बाहेर एक खोली. तिथेच लागून जिना होता. 

रानडे म्हणजे शीलामामीचं माहेर ! या रानड्यांच्या घरातच वरच्या मजल्यावर लेले कुटुंब राहात होतं. स्वैपाकघराला लागून आणखी एक खोली होती ती रानड्यांच्या वापरात होती. त्यांच्या बाहेरच्या बंदिस्त व्हरांड्यातून वरती यायला दुसरा जिना होता. स्वैपाकघरातच एका सेटीवर वर्षाचे आजोबा झोपलेले असायचे. त्यांचं वय नव्वदच्या आसपास असेल. त्यांचं सगळं बिछान्यावरच करावं लागायचं. शीलामामीच करायची सगळं, तेही विनातक्रार ! बाहेरच्या खोलीत सेटीवर वर्षाची आजी, त्याही पंच्याऐंशीच्या आसपास ! जेमतेम स्वतःचं स्वतः आवरायच्या. त्यांची तब्येतही नरम-गरम असायची. 

सकाळी मामाचा डबा, मुलांची शाळा आणि बाकी सगळं घरकाम, मामी हसतमुखाने करायची. शिवाय इतर कलाकुसरीची कामंही हौसेने चालू असायची. रूखवताच्या वस्तू, मोत्यांची महिरप इत्यादि… 

तर या घराशी माझा संबंध आला तो १९८१ पासून. शहापूरच्या ग. वि. खाडे विद्यालयातून एस. एस. सी. झाल्यावर आम्ही दोघींनी अकरावीला मुलुंड काॅलेज ऑफ काॅमर्सला प्रवेश घेतला. अकरावी – बारावी आमची काॅलेजची वेळ दुपारी १.४५ ते ५.४५. शहापूरहून बसने आसनगाव ला यायचं आणि मग ११ वाजताची गाडी पकडून काॅलेजला जायचं. गाडी १२.३५ ला मुलुंडला आणि १२.४० ला आम्ही काॅलेजमध्ये पोचायचे. मग  एक तास बहुतेक लेडीजरूममध्ये डबा खाऊन आणि नंतर बसून काढायचो.  म्हणून मग अधून-मधून आम्ही दोघी मामीकडे जायला लागलो. 

मुलुंडच्या अलीकडचे स्टेशन ठाणे आणि स्टेशनपासून शाॅर्टकटनी दहा मिनिटात मामीच्या घरी ! अर्धा तास तिथे बसून परत ठाणे स्टेशन आणि काॅलेजला ! मामी नेहमीच हसतमुखाने स्वागत करायची. वडी, लाडू, शंकरपाळे, बिस्किट काहीतरी खाऊ नेहमीच हातावर ठेवायची. घरून आणलेली डब्यातली पोळीभाजी खायला बसलो तर नंतर गरम-गरम वरण-भात खायला लावायची. चाचणी परीक्षा असो की वार्षिक, आम्ही दोघी कायम मामीकडे राहायला जायचो. 

शहापूर – आसनगावहून मुंबईकडे जायला, त्यावेळी अगदी मोजक्या गाड्या होत्या. एक गाडी गेली की तीन तासांचा विराम. एकदा बस लेट झाल्याने आमची सकाळची गाडी चुकली आणि त्यामुळे प्रिलिमचा पेपर देता आला नाही. त्यावेळी इतर वाहनांनी रस्त्यामार्गे जाणं अवघडच होतं आणि शिवाय खिशालाही परवडलं नसतं. त्यामुळे परीक्षेच्या आदल्या दिवशी आम्ही दोघी ठाण्यात दाखल व्हायचो. स्वैपाकघराला लागून असलेली वैद्यांची खोली मग परीक्षा संपेपर्यंत आम्हाला दिलेली असायची. आणि त्याबद्दल रानडे कुटुंबियांनीही कधी नापसंती व्यक्त केल्याचं मी ऐकलं/अनुभवलं नाही.

रात्री जागून अभ्यास असो, पहाटे लवकर उठून करायचा असो, मामी सेवेला तत्पर असायची. चहा-खाणं, जेवण आपुलकीनं हातात आणून द्यायची. आणि याबाबतीत वर्षात आणि माझ्यात कधीच कोणताच भेदभाव नसायचा हं ! वर्षा तिच्या सख्ख्या नणंदेची मुलगी, तिची भाची, तिचं कोडकौतुक केलं तर एकवेळ समजण्यासारखं आहे. पण मी त्या भाचीची मैत्रीण, तरीही माझेही अगदी तस्सेच लाड केले जायचे. कुठले ऋणानुबंध असतात हो हे ! खालच्या रानडेआजी देखील काहीतरी गोडधोड मुद्दाम आणून द्यायच्या आम्हाला. वर्षाची आई आणि मामी, या नणंद-भावजयीचं नातं हा तर एका स्वतंत्र लेखाचा विषय व्हावा ! इतकं समजूतदारपणाचं, आपुलकीचं नातं खरंच दुर्मिळ आहे. 

आम्ही एस. वाय. बी. काॅमला असतानाच वर्षाचं लग्न झालं. वर्षाच्या लग्नाच्या आधीच तिची आई अंथरुणाला खिळली. कित्येक महिने हाॅस्पिटलमध्येच होती. लग्नालाही उपस्थित राहू शकली नाही. पण मामा-मामींनी खंबीरपणे उभं राहून सगळं व्यवस्थित पार पाडलं. लग्नानंतर थोड्याच दिवसात वर्षाचे बाबा अचानक गेले. पुढे काही दिवसांनी आईही गेली. वर्षाचं माहेरपण, बाळंतपण हे देखील मामींनीच केलं, आणि तेही अगदी पोटच्या लेकीप्रमाणे, हे मी स्वतः बघितलं आहे. 

काॅलेज संपलं. नोकरी, लग्न, संसार या व्यापात मीही गुरफटले. मामीही मुलांचे संसार, नातवंडं यात रमलेली. त्यामुळे वारंवार भेट काही होत नाही. वर्षाकडेच तिची विचारपूस करते. पण मागच्या वर्षी आमची वर्षाकडे भेट झाली. माझा कवितासंग्रह अलवार तिला भेट दिला. तिच्या डोळ्यातलं कौतुक आणि गळामिठी, न बोलता खूप खूप देऊन गेली.

आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पण मातृवत निःस्वार्थ प्रेमाचा वर्षाव करणारी मामी मला कायमच वंदनीय आहे. 

अधिक मासानिमित्त या आगळ्यावेगळ्या प्रेममूर्तीला साक्षात दंडवत. आणि ही शब्दभेट- —- कृतज्ञतेची ! 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मी देशाला बांधिल आहे का? कसे?…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “मी देशाला बांधिल आहे का? कसे?…” ☆ सौ राधिका भांडारकर 

मी देशाला बांधिल आहे का? हा प्रश्न अंतर्मुख करणाराच आहे.  जेव्हां  मी माझं स्वतःचं जगणं तपासून पाहते तेव्हां या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मीच मला प्रश्न विचारते की देशासाठी मी नक्की काय करते?  काय करू शकते आणि आतापर्यंत काय केलं?

सीमेवर जाऊन हातात बंदूक घेऊन आपण देशाचे रक्षण तर करू शकत नाही पण एक सामान्य नागरिक म्हणून जगताना निदान एक चांगली नागरिक म्हणून तरी जगले का? नागरिकत्वाच्या जबाबदाऱ्या मी काटेकोरपणे पाळल्या का?  अशा विविध प्रश्नांचं एक काहीसं अस्पष्ट पण सकारात्मक उत्तर मला नक्कीच मिळतं की आपल्या वैविध्यपूर्ण समाजातील सलोख्याचे वातावरण निदान आपल्यामुळे बिघडणार नाही याची मी काळजी घेतली. घेत असते. 

देशाने माझ्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा मी देशासाठी काय करू शकते/ शकतो हा प्रश्न अधिक संयुक्तिक वाटतो आणि मग एका प्रातिनिधीक  स्वरूपामध्ये देश माझा मी देशाचा या संकल्पनेतून प्रत्येक भारतीयाची देशाप्रतीची बांधिलकी काय असायला हवी आणि कशी याचं एक व्यापक चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं.

सर्वात प्रथम म्हणजे हा देश माझा आहे,  मी या देशात जन्मलो आहे आणि या देशाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी विश्वाच्या नकाशावर एक परिपूर्ण, स्वावलंबी, लोकशाहीची खरी तत्त्वं बाळगणारा  समृद्ध देश, म्हणून स्थान मिळावे ही भावना रुजली पाहिजे.  

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही आपण अजून विकसनशील देशांच्या यादीतच आहोत. का?  याची अनेक कारणे आहेत.  अगदी वैज्ञानिक, तांत्रिक,  डिजिटल क्षेत्रात अविश्वसनीय प्रगती जरी केली असली तरी देशाच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्यांचं निवारण किती परसेंट झालं आहे हा एक भेडसावणारा प्रश्न आहे. भूकबळी, दारिद्र्य, निरक्षरता, अंधश्रद्धा, अज्ञान, गैरसमजुती, जातीयवाद, धर्मभेद,  स्त्रियांचा अनादर,  त्यांची असुरक्षितता,  त्यातूनच होणारे बलात्कारासारखे गुन्हे, हुंडाबळी, केवळ मतांचे, सत्तेसाठीचे राजकारण,  बेकारी, महागाई,कायदेपालनाच्या बाबतीतली उदासीनता, अशा अनेक भयानक भुजंग विळख्यात आजही आपला देश आवळलेला आहे.  उंच आकाशातली  एखादी भरारी आपण नवलाईने पाहतो त्याचवेळी आपल्या जमिनीवरच्या पायांना चावे घेणार्‍या विंचवांचे काय करायचे?  हा विचार मनात नको का यायला?

ज्यावेळी आपण आपल्या देशाच्या बांधिलकीबद्दल भाष्य करतो तेव्हा जमिनीवरच्या समस्यांचे निराकरण प्रथम झाले पाहिजे असे मला वाटते.  इतर विकसित देशांशी तुलना करताना त्यांचे लष्करी सामर्थ्य, पैसा, पायाभूत सुविधा याचा आपण विचार करतो पण त्या देशातल्या लोकांची मानसिकता आपण जाणून घेत नाही.  शासनाचे नियम ते पाळतात.  नियम मोडणाऱ्याला— मग तो पुढारी असो वा सेलिब्रिटी असो त्याला शिक्षा ही होतेच.  स्थानिक प्रशासनाने नियमांची जी चौकट घातली आहे, ते बंधन न मानता कर्तव्य मानून त्याचे पालन केले जाते. आपल्याकडे मात्र येथे शांतता राखा असे लिहिले असेल तेथे हमखास कलकलाट असतो.  येथे थुंकू नका—नेमके तिथेच पिचकार्‍यांची विचकट रांगोळी दिसते.  नो पार्किंग पाटीच्या ठिकाणीच वेड्यावाकड्या गाड्या लावलेल्या दिसतात.  कृपया रांगेची शिस्त पाळा या ठिकाणीच माणसांची झुंबड उडालेली दिसते.  स्वच्छता राखा तिथेच कचऱ्याचा डोंगर असतो.  यातून एकच मानसिकता झिरपते की नियम हे मोडण्यासाठीच असतात जणूं . तेव्हा भारतीय घटनेने  दिलेले अधिकार, स्वातंत्र्य आणि सुजाण नागरिक म्हणून जगतानाची कर्तव्ये या सगळ्यांचे संतुलन, एक जबाबदार नागरिक म्हणून ठेवणे म्हणजेच देशाशी बांधिलकी जपणे आहे.

राजकारण्यांना प्रश्न विचारण्यापूर्वी प्रत्येक नागरिकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.  गरज फक्त कडक कायद्यांची नव्हे तर गरज सदसद्विवेक बुद्धीची आहे.  कायदा व सुव्यवस्था राखणे ही जरी पोलिसांची जबाबदारी असली तरी नागरिक म्हणून जगताना आपणही पोलिसांचे कान आणि डोळे बनले पाहिजे. 

पर्यावरणाचा विचार करणे, सार्वजनिक स्वच्छतेची काळजी करणे, अन्नाची नासाडी न करणे, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे, ग्रामीण भागातील जनता, कष्टकरी बळीराजा, त्यांच्या समस्या जाणून, तळागाळातील लोकांशी संवाद साधून, एकसंध समाजाची वज्रमूठ— साखळी बांधणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि हीच देशभक्ती आहे.  देशा प्रतीची आपली बांधिलकी आहे.

निसर्गाचं वावर कसं मुक्त मोकळं असतं !  त्यात पेरलेलं, उगवलेलं यावर जसा किडे, मुंग्या, कीटक, पक्षी यांचाही अधिकार असतो तसंच आपण कमावलेलं फक्त आपलंच नसतं.  त्यातलं काही समाजाचं देणं म्हणून बाजूला ठेवावं लागतं, ही भावना वृद्धिंगत झाली पाहिजे.  मी, माझे कुटुंब, माझा समाज आणि माझा देश या स्तरांवर आपलं शांततापूर्ण जीवन अवलंबून असतं.

रस्त्यांवरचे अपघात, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, भूकंप, वादळे,  अवकाळी पाऊस, पिकांची नासाडी,  शेतकऱ्यांची आत्महत्या, दहशतवाद, राजकीय आयाराम गयारामांच्या बातम्या आपण मीडियावर ऐकतो, पाहतो. आणि हळूहळू अलिप्त होतो कारण आपली वैयक्तिक गुंतवणूक त्यात नसते.  कधी रंजकता, कधी  बेचैनी अस्वस्थता जाणवते पण ते अल्पकालीन असते.  सजगपणा, डोळसपणा आणि त्या विरुद्ध आवाज उठवण्याची मानसिकता असणे म्हणजेच देशाविषयीची बांधिलकी ठरते.  कोणीतरी करेल पेक्षा मी का नाही? ही मानसिकता तयार झाली पाहिजे. मी माझ्या देश बांधवांसाठी, उपेक्षित, वंचित घटकांसाठी काय करू शकतो /शकते हे माणुसकीचं भान जपणं म्हणजेच देशाविषयीची बांधिलकी जपणे आहे. 

देशासाठी जगतानाच्या अनेक व्याख्या आता बदलत चालल्या आहेत.  पूर्वी शाळेत तास सुरू होण्यापूर्वी प्रार्थना होत असे. शाळा सुटताना वंदे मातरम म्हटले जायचे. यातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठ्या लोकांचा आदर याची शिकवण असायची.  या गोष्टी आता लुप्त होत चालल्यात असं जरी नसलं तरी त्यातली भावनिक, राष्ट्रीय गुंतवणूक जाणवत नाही.  १५ ऑगस्ट २६ जानेवारी हे राष्ट्रीय दिन असण्यापेक्षा सुट्टी साजरी करण्याचे, आनंदाचे, मजेचे दिवस ठरत आहेत याचं वाईट वाटतं.  देशाचा इतिहास समजून घेणे,  हुतात्म्यांचे बलिदान स्मरणं आणि त्यांचे बलिदान व्यर्थ होऊ नये म्हणून शपथ पूर्वक आपला देश प्रगतीपथावर कसा जाईल याचं धोरण  मनाशी आखणं ही देशाशी आपली बांधिलकी आहे.

या देशात आपण राहतो तिथे फक्त स्वतःपुरता विचार करून जगण्यापेक्षा मी केलेलं कोणतही काम या देशाचं अखंडत्व भंग करणारं नसेल याचं भान जपणं म्हणजेच देशाशी बांधील राहणं  ठरेल.

एक आठ नऊ वर्षाची भारतीय मुलगी दहा-बारा राष्ट्राच्या पंतप्रधानांना आमच्या पिढीसाठी पाणी आणि प्राणवायू ठेवा अशा मजकुराची पत्र पाठवते तेव्हा जाणवतं की  उगवत्या पिढीवर सामाजिक संस्कार करण्याची जबाबदारी मागच्या पिढीने पेलणे म्हणजेच देशाशी बांधिलकी जपणे आहे.

मला हा लेख का लिहावासा वाटला?” याचे उत्तर हे असू शकतं की देशाशी बांधिल राहताना मी देशासाठी काय करू शकते याची पुनश्च उजळणी व्हावी म्हणूनच …

🇮🇳 ।। वंदे मातरम् ।। 🇮🇳

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “स्वातंत्र्य दिनाचे चिंतन… प्रतिज्ञा व सत्य” 🇮🇳 ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “स्वातंत्र्य दिनाचे चिंतन… प्रतिज्ञा व सत्य… 🇮🇳” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

भारत माझा देश आहे

.. पण माझ्या देशात भारत आहे का ?

 

सारे भारतीय माझे बांधव आहेत

.. माझे सारे बांधव भारतीय आहेत का ?

 

माझ्या देशावर माझे प्रेम आहे।

.. माझ्या प्रेमाच्या यादीत देश कुठे आहे ?

 

माझ्या देशातल्या समृद्ध आणि .. विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।

,, देशाची समृद्धी कोणत्या चॅनलवर दाखवतात ?

.. परंपरांचा अपमान पदोपदी दिसतोच परंतू

.. अभिमानास्पद परंपरांची माहिती कुणाला आहे?

 

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।

.. पाईक होणे सोडा पण परंपरा झुगारण्यातच धन्यता मानणारी माणसेच हार घालून मिरवतात

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन

.. पालक, गुरुजन व वडिलधा-यांचा अपमान होणार नाही येवढेतरी घडते असे दिसते का ?

 

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।

.. सामान्य माणसाशी सौजन्याने कोण वागते हो ?

 

माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे।

.. निष्ठा या शब्दाच्या ख-या अर्थाशी किती जणांचा संबंध येतो ?

 

 त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे।

.. स्वत: व्यतिरिक्त कुणाचे कल्याण अथवा समृद्धी वा सौख्य यांचा विचार करणारे किती हो ?

बोले तैसा न चाले त्याची

सध्या वंदितो आम्ही पाऊले.

कराल विचार निदान आज ?

बनवायचा भारत महान ?

…. “१५ ऑगस्ट” – भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 🇮🇳

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print