मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक ‘सोल’ कथा ☆ श्री विनय माधव गोखले

? जीवनरंग ❤️

☆ एक ‘सोल’ कथा ☆ श्री विनय माधव गोखले ☆

तर मंडळी, मौजेची घटना अशी घडली की ‘त्रिवेणी’ आश्रमाच्या कार्यालयापाशी पोहोचताच लक्षात आले की माझ्या उजव्या बुटाचा सोल (sole) पुढून निघून लोंबायला लागलाय. सकाळपासून आळंदी मंदिर, ‘ज्ञानेश्वरी’ मिसळ मध्ये ब्रेकफास्ट घेईपर्यंत व्यवस्थित वागणार्‍या सोलने ऐनवेळी समारंभाच्या सुरुवाती- सुरुवातीलाच मान टाकलेली पाहून माझ्या soul मध्ये धस्स! झाले.

पुढील दोन तास तरी सोलने तग धरावे, अशी मनोमन प्रार्थना करीत मी पुढे निघालो. आणखी दहा पावले पुढे  जातो न जातो तोच “घडू नये तेच घडले” आणि सोल बुटापासून तुटून चक्क बाजूला पडला. मी तळपाय तिरपा करून पाहिला असता माझा साॅक थेट दृष्टीस पडल्यावर तर मला ब्रह्मांडच आठवले. आली का आता पंचाईत!

मग अजयचा मित्रत्वाचा सल्ला मानून तो सोल तिथेच बाजूच्या एका वाफ्यामध्ये ठेवून दिला,  परत येताना घेऊयात ह्या विचाराने. तिथली एक सफाई कामगार स्त्री काम थांबवून माझ्या सर्व हालचाली टिपत उभी होती. माझी अवस्था पाहून तिने पदर डोळ्यांना लावण्याऐवजी नाकाला लावलेला माझ्या नजरेतून सुटले नाही. त्यात तिचा तरी काय दोष म्हणा!

तिच्याकडे पाठ करून मी येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याच्या निर्धाराने, जणू काही झालेच नाही अशा आविर्भावात चालत पुढे निघालो. माझ्या आजूबाजूने नवनवीन चपला आणि बूट घातलेली लोक घाईघाईने लग्नमंडपाकडे निघाली होती. मी मात्र साॅकला बोचणारे दगड, फरश्यांमधील फटींचा स्पर्श आदींचा ‘उजव्या’ पदोपदी अनुभव घेत हळूहळू मार्गक्रमणा करीत होतो. तिथे पोहोचल्यावर सर्वांनी  चप्पल स्टँडवर बूट-चपला काढायच्या होत्या ते पाहून मात्र माझ्या बुटात नव्हे पण जिवात soul आला!

पुढे सर्वत्र मी ‘पांढर्‍या पायाने’ नव्हे पण ‘सावळ्या पायाने’ तसाच अनवाणी फिरत राहिलो…डायनिंग हाॅलच्या बाहेरील लाॅन, रेलिंग, पायर्‍या, पुन्हा लग्नाचा हाॅल असा सगळीकडेच. तशीही बूट घालायची सवय गेली दोन वर्षे मोडली होतीच. त्यामुळे बुटाचे लोढणे न घेता फिरणेच मला छान हलकेहलके, मौजेचे वाटू लागले होते.

‘त्रिवेणी’ आश्रमात अनवाणी फिरणार्‍या ह्या भक्ताला पाहून इतर भक्त मंडळींचा माझ्याबद्दल आदर वाढतोय, असे मला उगीचच भासू लागले. पण तसा काही चमित्कार घडला नाही. माझ्या पायाकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही. आश्रमात बुटाच्या sole ला नव्हे तर “जय गुरुदेव!” ह्या विश्वव्यापी soul च्या पूजनालाच महत्व होते, हे अधोरेखित झाले.

बूटात पाय अडकवून कारपर्यंत ‘वाकडी’ पावले टाकत आलो. तत्पूर्वी परतीच्या मार्गावर मालकाची वाट पाहत पडलेल्या माझ्या उजव्या सोलला वाफ्यामधून उचलून कारमध्ये आणून टाकले. पुढे एखाद्या चांभाराचे दुकान दिसले तर “बुटाला सोल शिवून घेऊयात” असा एक पोक्त पण कळकळीचा सल्ला ड्रायव्हर सतीशने दिला.

आश्रमातून बाहेर पडून आळंदीजवळील एका छोट्या चपलांच्या दुकानात कामचलाऊ पण बरोबर मापाच्या सँडल्सचे शाॅपिंग झाले. तळपायांना sole आणि solace मिळाला आणि त्यासरशी तिथेच माझ्या ‘बाटा’ना करायचे ठरवले कायमचा टाटा! ??

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एकुलती -भाग पाचवा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ एकुलती -भाग पाचवा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(पूर्वार्ध :कार्तिकचं आपल्यावर किती प्रेम आहे, हे केतकीला जाणवलं .  आता पुढे….)

आणि आपण तरी कार्तिकशिवाय राहू शकतो का? नेहमी भांडत असलो, तरी प्रत्येक क्षणी कार्तिक मनात असतोच. त्याची पार्श्वभूमी असल्याशिवाय आपण कसलाच विचार करू शकत नाही. अगदी डिव्होर्सची वेळ आली तरीही.

ही डिव्होर्सची वेळ तरी कशी आली? त्याची कुठे भानगड, व्यसन…..? काहीच नाही. मग कशावरून आपलं एवढं भांडण झालं? कशावरून बरं? कारण तर आठवतच नाहीय. म्हणजे तेवढं महत्त्वाचं नसणारच. पण उगीचच ताणलं गेलं आणि इगोच्या लढाया सुरू झाल्या. तसा कार्तिक टिपिकल पुरुषासारखा इगो वगैरे कुरवाळणारा नाहीय. आपणच……

कार्तिक म्हणतोय, ते खरं आहे. एकुलतं एकपण ही आपण नेहमीच स्ट्रेन्थ समजत आलो. आपल्या तोंडातून जे बाहेर पडायचं, ते लगेच आपल्यासमोर हजर व्हायचं. आईबाबा नेहमीच आपले लाड करायचे. त्यामुळे आपण तोच आपला हक्क समजत आलो.

कार्तिककडूनही तीच अपेक्षा केली. सुरुवातीला तोही आपल्या मनाप्रमाणे वागायचा.पण नंतरनंतर त्याने स्वतःच्या मनाला मुरड घालणं बंद केलं.

चुकलंच आपलं. खूप खूप चुकलं.

“कार्तिक, गाडी थांबव.मला बोलायचंय तुझ्याशी.”

“इथे मध्येच थांबवता येणार नाही. पुढे थांबवतो.”

गाडी थांबल्यावर केतकीने सगळं सगळं कन्फेशन दिलं. बोलता बोलता ती रडत होती. रडता रडता बोलत होती.

कार्तिकला ती पूर्वीसारखीच बालिश, निरागस वाटली. त्याच्या मनात तिच्याविषयीचं प्रेम उफाळून आलं. तिला मिठीत घेऊन ओठाने तिचे अश्रू पुसण्याचा मोह त्याला झाला. पण   खुंटा अजून घट्ट करणं आवश्यक आहे, असं त्याला वाटलं.

“तुला काय म्हणायचंय, ते कळलं मला. पण मी प्रयत्नपूर्वक तुला माझ्या मनातून, आयुष्यातून बाहेर काढलंय.”

“पण… आपला… डिव्होर्स…तर… झाला… नाहीय… ना… अजून…!” तिच्या वाक्यात शब्दांपेक्षा हुंदकेच जास्त होते.

“लिगली नाही. पण मनाने आपण एकमेकांपासून खूप दूर गेलो आहोत.”

“मलाही तसंच वाटायचं. पण आता विचार करताना वाटतं, की आपण अजूनही एकमेकांचे आहोत. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, कार्तिक.”

“पण मला नाही ना वाटत तसं,” चेहऱ्यावर अतोनात गांभीर्य, आवाजात कठोरपणा आणत कार्तिक बोलला.

केतकीला धक्का बसला. आपल्याला वाटतं, त्यापेक्षा वेगळा विचार स्वीकारायची ही तिची पहिलीच वेळ होती. फुटू पाहणारे हुंदके प्रयासपूर्वक दाबत तिने तोंड घट्ट मिटून घेतलं.

कार्तिकला तिची दया आली.

“मी विचार करतो तुझ्या म्हणण्याचा. मला वेळ दे थोडा.”

केतकीने सुटकेचा निश्वास सोडला.”घरी पोहोचेपर्यंत सांगितलंस तरी चालेल.”

“दोन-तीन दिवस तरी लागतील मला.”

‘बापरे!’ केतकीच्या मनात आलं. पण तोंडाने मात्र तिने “बरं,”म्हटलं.

रात्री जेवणातही केतकीचं लक्ष नव्हतं.

“काय गं? जेवत का नाहीयेस?”आईने दोन-तीनदा विचारलं.

कार्तिक भराभरा जेवून उठला.

“बरं वाटत नाहीय का? तू झोप जा. आज मी आवरते मागचं,” असं आईने म्हणताच नेहमीप्रमाणे, “मी करते गं,”वगैरे न म्हणता केतकी सरळ बेडरूममध्ये गेली.

पाठोपाठ कार्तिक आलाच.

“हे बघ, हनी….” पुढे न बोलताच केतकीला सगळं कळलं.

किचनमधलं आवरून, बाबांना हवं -नको बघून आई झोपायला आली, तेव्हा दोघांना बघून ती म्हणाली, “आज मी झोपते हॉलमध्ये.”

गंमत म्हणजे आज या दोघांपैकी कोणीही तिला ‘नको’ म्हटलं नाही.

समाप्त

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एकुलती -भाग चौथा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ एकुलती -भाग चौथा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(पूर्वार्ध : कार्तिकने केतकीला दुसऱ्या लग्नाविषयी विचारलं . आता पुढे…..)

” मला पुन्हा त्या लग्नाच्या सापळ्यात अडकायचं नाहीय.”

“एकटीच राहणार?”

“आई -बाबा आहेत की सोबतीला.”

“आई-बाबा आहेतच म्हणा. पण मला वाटतं, आता त्यांचं वय झालंय. त्यात पुन्हा आपल्या डिव्होर्सचं ऐकल्यावर ते खचूनच जातील. त्याचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला, तर तू एकटी कितपत पुरी पडशील?”

“पुष्करदादा, शीलूताई वगैरे आहेत की मदतीला.”

“त्यांनाही त्यांचे संसार आहेत ना. पुष्करदादांवर त्यांच्या आई-वडिलांची जबाबदारी आहे. शीलूताईंच्या घरी त्यांचे सासू-सासरे आहेत. कल्पना कर, तुझ्या गरजेच्या वेळी त्यांच्या घरच्या सिनियर सिटीझन्सचीही तब्येत ढासळली, तर इच्छा असूनही ते तुझ्या मदतीला येऊ शकणार नाहीत.”

केतकी विचारात पडली – बाबांना ऍडमिट करायचं कळल्यावर सगळीजणं धावत आली होती. पण आता डिस्चार्जनंतर ते तीन-चार दिवसांआड येऊन भेटून जायचे. म्हणजे त्या अर्थाने सगळी जबाबदारी आपल्यावरच होती.

“एक लक्षात घे, केतकी. एकुलतं एकपण ही आतापर्यन्त तुझी स्ट्रेन्थ होती. आताच्या परिस्थितीत तो विकनेस झालाय.”

‘खरंय, कार्तिक म्हणतोय ते. आपण या दृष्टीने विचारच नव्हता केला.’ केतकीला कार्तिकचं म्हणणं पटलं.

“म्हणूनच मला वाटतं, तू एकटी ही जबाबदारी निभावू शकणार नाहीस. तेव्हा या सगळ्यांत तुला साथ देणारा एखादा जोडीदार शोध.”

थोडा वेळ दोघंही खाण्यात गर्क झाले.

“तुला मी मागेच सांगितलं होतं -जोपर्यंत आपण वेगळं राहत नाही, तोपर्यंत डिव्होर्सच्या कारवाईला सुरुवात होणार नाही. त्यामुळे तुम्ही आता माटुंग्याच्या घरी राहायला गेलं पाहिजे. तुम्हाला जाणं शक्य असेल, तर जा. मी तुम्हाला शिफ्टिंगसाठी मदत करीन. त्यानंतर मात्र मी तुमच्याशी कोणत्याही प्रकारे कॉन्टॅक्ट ठेवणार नाही. अजून थोडे दिवस आपल्या घरी राहणं, बाबांसाठी आवश्यक असेल, तर मी दादरच्या घरी राहायला जाईन.पण मी तिकडे फार दिवस नाही राहू शकणार. म्हणजे आई, बाबा, दादा समजून घेतील. पण वहिनीचा स्वभाव तुला ठाऊकच आहे. त्यामुळे लवकरात लवकर माटुंग्याला शिफ्ट व्हायचं बघ.”

कार्तिकचं बोलून झाल्यावर तो उठला आणि चालायला लागला.

परिस्थितीचं गांभीर्य आता कुठे केतकीच्या लक्षात यायला लागलं.आतापर्यंत केतकी आईबाबांना, त्यांच्या घराला, एवढंच नव्हे, तर कार्तिकलाही गृहीतच धरून चालली होती. डिव्होर्सची व्याप्ती एवढी मोठी असेल, असं आतापर्यन्त तिच्या लक्षातही आलं नव्हतं.

परतीच्या प्रवासात कार्तिक एकही शब्द बोलला नाही.

केतकीही विचार करत होती, ‘आईला डिव्होर्सचं कळलं तर ती आणखीच खचून जाईल. बाबांच्या जोडीने तीही अंथरुण धरेल. मग पुढचं सगळं जमेल आपल्याला?

पुष्करदादा, शीलूताई येऊ शकतीलच, असं नाही. शिवाय कार्तिकविषयी सर्वांनाच आदर वाटतो. आपल्या वागण्याने नाराज झाले, तर ते फिरकायचेसुद्धा नाहीत.

म्हणजे कार्तिक म्हणतो, तसं जोडीदार हवाच.

कार्तिक नेहमी कौतुकाने म्हणायचा -आपण अजूनही सुंदर दिसतो, व्यवस्थित मेंटेन करून आहोत. वय म्हटलं, तर -हल्लीच्या काळात या वयात कितीतरी जणींची लग्नं व्हायची असतात. त्यामुळे आपल्याशी लग्न करायला कोणीही एका पायावर…….

पण आजारी आईबाबांची जबाबदारी स्वीकारायला कितीजण तयार होतील? आणि समजा, सुरुवातीला तयारी दाखवलीच, तरी पुढेपर्यंत ती निभावतीलच, याची काय गॅरंटी? कार्तिकसारखं मायेने, जिव्हाळ्याने तर कोणीच नाही करणार.

त्या दिवशी सकाळी रात्रीचा निळू गेला आणि ट्रेनच्या गोंधळामुळे काशिनाथला यायला उशीर झाला. बाबांना पॉटची अर्जन्सी होती, तेव्हा कार्तिकच पुढे आला.

“असू दे. मी देते, कार्तिक. तुला कंटाळा येईल.”

“हे बघ, केतकी. तू पॉट दिलंस, तर त्यांना ऑकवर्ड होईल. ही वेळ आपल्याला काय वाटतं, यापेक्षा त्यांना काय वाटतं, याचा विचार करायची आहे.”

आताही तो स्वतःपेक्षा आईबाबांच्या सोयीचाच जास्त विचार करतोय.

त्याचं आपल्यावरही किती प्रेम आहे! मागे ऍबॉर्शनच्या वेळी तो पहिल्यापासून आपल्याबरोबर होता. आपला हात हातात धरून आपल्याला धीर देत होता. नंतर आपण शुद्धीवर आलो, तेव्हा आईशी बोलताना किती रडला तो! अगदी आईच्या बरोबरीने. “बाळाला जावं लागलं, तरी दुसऱ्या रूपाने तो आमच्याकडे नक्की येईल. पण केतकीला काही झालं असतं तर?” त्या दोघांची समजूत घालता घालता बाबांच्या नाकी नऊ आले.

क्रमश:….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एकुलती -भाग तिसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ एकुलती -भाग तिसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

पूर्वार्ध :हॉस्पिटलमधून बाबांना केतकीच्या घरी न्यायचं ठरलं. आता पुढे…..)

कार्तिक -केतकी कामापुरतंच बोलत होती. पण या आजारपणाच्या व्यापामुळे कोणाच्या ते लक्षातही आलं नाही.

गेस्टरूममध्ये बाबा आणि त्यांचा रात्रीचा अटेंडंट निळू झोपत असल्यामुळे आई केतकीबरोबर बेडरूममध्ये झोपत होती आणि कार्तिक हॉलमध्ये सोफा-कम-बेडवर.

आई मधूनमधून म्हणायची, “मी हॉलमध्ये झोपते ” म्हणून.पण कार्तिक -केतकी दोघंही घायकुतीला आल्यासारखे एकसुरात “नको, नको “म्हणून ओरडायचे.

वीकएंडला बराच वेळ तो घराबाहेरच असायचा. घरात असला, तर लॅपटॉप उघडून बसायचा.

आईचं चाललेलं असायचं,”अगं,जरा त्याच्याकडे बघ.थोडा वेळ त्याच्याबरोबर घालव.”

एकदा तर चक्क त्याच्यासमोरच म्हणाली, ” बाबा बरे आहेत. काशिनाथ आहे सोबतीला. तुम्ही दोघं बाहेर जा कुठेतरी. फिरायला, सिनेमाला.” केतकीला ‘नाही’ म्हणायला संधीच नाही मिळाली.

घरातून बाहेर पडल्यापासून घरी परत येईपर्यंत दोघात चकार शब्दाची देवघेव झाली नाही.

केतकीला आठवलं, लग्नापूर्वी आणि नंतरही सुरुवातीच्या काळात केतकीची अखंड बडबड चालायची. कार्तिक कौतुकाने ऐकत असायचा. तिचा प्रत्येक शब्द झेलायचा तो तेव्हा.

मग शनिवारी-रविवारी दोघांनी बाहेर पडायचं, हा नियमच करून टाकला आईने.

यावेळी लॉन्ग ड्राइव्हला मुंबईबाहेर पडायचं, ठरवलं कार्तिकने. तसा ट्रॅफिक खूप होता, पण फारसं कुठे अडकायला झालं नाही.

एका छानशा रिझॉर्टच्या रेस्टॉरंटसमोर त्याने गाडी थांबवली.

‘अरेच्चा!बॅग गाडीत ठेवायची राहिली. आता वॉशरूममध्ये हूक असला म्हणजे मिळवली,’ केतकीच्या मनात आलं. पण कार्तिकने हात पुढे केला. तिने गुपचूप बॅग त्याच्याकडे दिली.

कोपऱ्यातल्या टेबलवर कार्तिक बसला होता. ती येताच तो उठून फ्रेश व्हायला गेला.

वेटर डिशेस घेऊन आला. तिच्या आवडीचा मेन्यू होता.

ही त्याची चाल नाहीय ना? ‘सावध, केतकी, सावध,’ तिने स्वतःला रेड ऍलर्ट दिला.

खायला सुरुवात केल्यावर तिच्या लक्षात आलं, की तिला खरोखरच खूप भूक लागली होती.

थोडंसं खाऊन झाल्यावर कार्तिकने अचानकच विचारलं,  “भेटला कोणी? “

“म्हणजे?” त्याला काय विचारायचंय, हेच तिला कळलं नाही.

“म्हणजे आपला डिव्होर्स झाल्यानंतर ज्याच्याशी तू लग्न करशील, असा कोणी भेटला का?”

क्रमश:….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एकुलती -भाग पहिला ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ एकुलती -भाग पहिला ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

केतकीचं काय बिनसलं होतं, कोणास ठाऊक. सारखी भांडत असायची, भांडतच असायची कार्तिकबरोबर. पार डिव्होर्सपर्यंत पोहोचली होती मजल.

आताही रात्री घरी पोहोचायला उशीर झाला, तेव्हा कार्तिक खूप दमला होता. जेवण्याचंही त्राण नव्हतं त्याच्यात. पण मग “तू बाहेरून खाऊन आला आहेस.घरात बनवलेलं वाया जातं…..”वगैरे म्हणत केतकी भांडायला सुरुवात करणार, म्हणून तो जेवायला बसला.

“तू जेवलीस?” तोंडातून शब्द निघाल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपण घोडचूक केलीय.

“मी तुझ्यासाठी थांबायचं सोडून दिलंय हल्ली. तू काय? मनात आलं, तर बाहेरूनच खाऊन येणार. बायको थांबली असेल जेवायची……”

केतकीची बडबड चालूच होती.

शेवटी असह्य झालं, तेव्हा कार्तिकचंही तोंड उघडलं, ” पुरे आता. गप्प बस. दमून घरी यावं, तर…… “

“मग यायचं ना वेळेवर. उशिरापर्यंत बाहेर वेळ काढत बसलं की…..”

” बाहेर वेळ कसला काढणार? ऑफिसमध्ये चिक्कार काम असतं. त्यामुळे थांबण्याशिवाय गत्यंतरच नसतं. “

“मी घरबशी गृहिणी असल्यासारखं बोलू नकोस हं. सांगून ठेवते. मीही नोकरी करते…..”

“माहीत आहे तुझी नोकरी.”

“नीट बोल हं माझ्याशी. असलं ऐकायची सवय नाहीय मला.”

” हो, हो. कशी असणार? लाडावलेली मुलगी तू. एकुलती एक म्हणून डोक्यावर बसवून ठेवलंय आईवडिलांनी. “

“मला अगदी कंटाळा आलाय, तुझी कुजकट बोलणी ऐकायचा. केव्हा एकदा त्या डिव्होर्सच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लिट होतायत, असं झालंय.”

“पण तू तुझ्या आईबाबांना सांगितलंस का हे?”

“तू मला विचारत असतोस सारखा, ते तू तुझ्या घरच्यांना सांगितलंस का?”

“माझ्या घरच्यांना काय, नंतर सांगितलं तरी चालेल. इन फॅक्ट, एवढ्यात मी सांगणारच नाहीय त्यांना. तुझी गोष्ट वेगळी आहे. तुला माहेरी जाऊन राहायचं आहे. आणि तिथे राहायला जाण्यापूर्वी सगळ्या गोष्टी तुझ्या आईबाबांच्या कानावर घालणं आवश्यक आहे. पण तू तर टाळाटाळ करतेयस.”

“टाळाटाळ कशाला करणार?”

“मग का नाही सांगितलंस अजून? वरचेवर तर जात असतेस तिकडे.”

“या गोष्टी रागरंग बघून सांगायच्या असतात. कधी कोणी आलेलं असतं तिकडे, कधी बाबांची तब्येत बरी नसते, तर कधी आई नरमगरम असते.”

” हे तर चालूच राहणार ना. मला तर वाटतं, तुला रिकन्सिडर करायचं आहे. दॅट्स व्हाय यू आर बायिंग टाइम. “

“रिकन्सिडर माय फूट! उलट जेवढ्या लवकर तुझ्या कचाट्यातून सुटता येईल, तेवढं बरं. एक एक दिवस मोजतेय मी.”

“तेव्हा लग्नाच्या वेळीही मोजत होतीस एक एक दिवस.”

“माझ्यापेक्षा तुलाच जास्त घाई झाली होती तेव्हा.”

“मी मूर्ख होतो त्यावेळी.”

“होतो कशाला? अजूनही आहेस. अशा मूर्ख माणसाबरोबर आयुष्य नाही काढायचं मला. मध्ये ऍबॉर्शन झालं, तेव्हा खचून गेले होते मी. पण आता वाटतं, देव करतो, ते बऱ्यासाठी. उगीच त्या जिवाचीही परवड झाली असती.”

“…………..”

“उचकट ना आता तोंड. आता का गप्प बसलास?”

“मी क्रूर नाहीय तुझ्यासारखा, असल्या गोष्टीचा आनंद व्हायला.”

रोजच्यासारखं हे भांडण रात्री 2-2.30पर्यंत चाललं असतं. आणि मग कंटाळून कार्तिक गेस्टरूममध्ये झोपायला गेला असता. रोजच्यासारखाच.

पण आज अचानक केतकीच्या फोनची रिंग वाजली.

क्रमश:….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ साप…. भाग ४ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ साप…. भाग ४ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहीलं आई त्याला हलवून हलवून जागी करत होती. `बाहेर अजून थोडा अंधारच होता. तो उठला आणि तोंड धुवून खुळखुळून चुळा भरून खाटेवर बसला आणि रात्रीच स्वप्न आठवू लागला. आता पुढे -)

`अरे, याला सोडायला जंगलात जाणार आहेस ना!’ आईनं जशी आठवण करून दिली.

`जातो ना आई! इथून दोन फर्लांगावर तर जंगल आहे.’

`ते आहे रे! पण बिचारा रात्रभर मडक्यात बंद आहे. जितकी लवकर त्याला मुक्ती मिळेल, तेवढं बरं!

`ठीक आहे. पण काय ग आई, सकाळची स्वप्न खरी ठरतात नं?’

`हं! मीसुद्धा ऐकलं आहे तसं! पण बेटा, मी काही आजपर्यंत कुठलं असं स्वप्न पाहिलं नाही, की जे खरं झालं. झोपडीत रहाणार्‍यांची स्वप्नसुद्धा झोपडीछापच असतात नं?’

`मी सकाळी सकाळी एक स्वप्न पाहीलं आई, पण ते झोपडीछाप नव्हतं!’

`मग काय महालाचं स्वप्न बघितलंस तू?’

`आता मी परत आलो, की तुला सगळं स्वप्नच सांगेन.’

केर काढता काढता, रेवती आई आणि रमलूचा संवाद ऐकत एका कोपर्‍यात उभी होती. रमलूच्या तोंडून स्वप्नाबद्दल ऐकल्यावर तिचं तोंड हवेच्या झुळुकीमुळे फटकन उघडणार्‍या या दरवाजासारखं उघडंच राहीलं.

रमलूने मडकं उचललं आणि तो बाहेर पडला. थोड्याच वेळात तो रस्त्यावर आला. पहाट फटफटायची होती. रस्ता रिकामा आणि निरव, शांत होता. हा रस्ता म्हणजे शहराच्या बाहेर पडणारा बाय-पास आहे. चालत चालत तो रस्त्यावर लावलेल्या दिशा-दर्शकाच्या फलकापाशी पोचला. आणि मटका खाली ठेवून मध्यम प्रकाशात फलक वाचू लागला. फलकावर एका बाजूला लिहिलं होतं, `गुलमोहर कॉलनी मार्ग’ आणिदुसर्‍या बाजूला लिहिलं होतं, `रिझर्व फॉरेस्ट मार्ग.’ त्याने समोर पाहिलं. गुलमोहर कॉलनीचे शानदार बंगले अर्धवट अंधारातही स्पष्ट दिसत होते. क्षणार्धात रात्री पाहिलेलं स्वप्न त्याच्या डोळ्यापुढे तरंगू लागलं. त्याने मडकं उचललं आणि गुलमोहर कॉलनीच्या दिशेने चालता चालता विचार करू लागला, `आज माझ्याजवळ दहा-वीस साप असते तर…’

समाप्त

मूळ हिंदी  कथा – साप  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ साप…. भाग ३ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ साप…. भाग ३ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

( मागील भगत आपण पहिलं – `तो काळ वेगळा होता रमलू. त्यावेळी शाळेत प्रवेश मिळण्यासाठी पैसे द्यावे लागत नव्हते. आता काळ बदललाय. प्रत्येक गोष्टीसाठी पैसे द्यावे लागतात. ठेव. तुझ्या कामी येतील.’ आता इथून पुढे )

`नाही शेठजी! या कामाचं मी काही इनाम घेणार नाही. याएवजी मला पाच हजार रुपये अ‍ॅडव्हान्स द्या. मी दहा महिन्यात आपले पैसे परत करीन.’

अ‍ॅडव्हान्सच हवा असेल, तर उद्या तुला पैसे मिळतील. मी मुनीमांना आत्ताच सांगतो. … पण हे तुझ्या बहादुरीचं इनाम आहे. मला माहीत आहे, हे काम या पूर्वी तू कधीच केलं नाहीस. तुझ्या वडलांच्या निधनानंतर साप पकडणार्‍या  लोकांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलीय. या भागात हे काम करणारा आता कुणी राहिलाच नाही. हा आपला भाग म्हणजे जंगलचा हिस्साचआहे. इथे साप निघणरच. खरं तर आपण लोकच त्यांच्या क्षेत्रात येऊन वसलो आहोत. … आज मला या गोष्टीचा आनंद होतोय, की वेळा-काळासाठी एक पठ्ठा तयार झाला. ‘ शेठजींनी रमलूची पाठ थोपटत म्हंटलं.

`पण शेठजी या कामासाठी काही मेहेनताना घेतला जात नाही.’

`अरे बेटा, हा मेहेनताना नाही. लक्ष्मी आहे लक्ष्मी. ती स्वत: चालून तुझ्याकडे येतीय. तिचा अव्हेर करू नकोस. हीच गोष्ट तुम्हाला समजत नाही. लक्ष्मी याचकारणासाठी तुमच्यावर रुसून बसलेली असते. घे हे ठेवून दे.’ असं म्हणत शेठजींनी पाचशेच्या दोन नोटा रमलूच्या शर्टच्या खिशात घातल्या.

यावेळी रमलू काही बोलला नाही. तो माठ घेऊन मुकादमाच्या मागे मोटरसायकलवर बसला.

झोपडीत पोचताच रमलूच्या आईने रमलूकडून साप-पकड-अभियानाची सगळी हकिकत ऐकली. ते सगळं ऐकून ती एकीकडे भयभीत झाली, तर दुसरीकडे रोमांचितही. रमलूच्या पत्नीच्या रेवतीच्या डोळ्यातून मात्र अखंड अश्रूधारा वाहत होत्या. तिने शेंदुराची डबी आणून रमलूच्या हातात दिली. रमलूचे वडील होते, तेव्हा हे सर्व रमलूची आई करायची.

`तुम्ही हे काम करावं, असं मला वाटतनाही. ‘ डबी परत घेत ती हळूच म्हणाली.

`का?’

`का म्हणजे काय? जिवाशी खेळ आहे, हे काम म्हणजे. साप कधी तरी उलटतोसुद्धा! थोडीशी नजर चूक झाली…’

`वेडी आहेस का तू? बाबा म्हणत,`आपल्या लोकांना नागदेवतेपासून अभय मिळालय. जोपर्यंत आपण त्यांना मारत नाही, तोपर्यंत तो आपल्याला दंश करणार नाही.’ कळलं? आणि हे काम करणारा दुसरा कोण आहे या इलाख्यात?’

`मग आम्ही लोकांनी ठेका घेतला आहे का?’

`……’

`आता बाकीचं बोलणं राहू दे. याला जंगलात सोडून ये. घरात दोन-दोन लहान मुलं आहेत. हे संकट घरात फार वेळ ठेवणं बरं नव्हे.’

`पण आता अंधार पडलाय. बाबा म्हणायचे, सापाला अंधार झाल्यावर सोडता कामा नये. माठ आणि वरचं कापड दोन्हीही मजबूत आहे. मी उद्या पहाट होता-होताच त्याला सोडून येईन.’

रमलू अतिशय थकला होता. त्याने झोपडीसमोरचा हात पंप चालवून थंड पाण्याने आंघोळ केली आणि जेवण करून झोपून गेला. अर्ध्या रात्रीनंतर लघवीकरायला उठला. पण नंतर खाटेवर झोपायला जाण्यापूर्वी कोपर्‍यात ठेवलेल्या मडक्याकडे जाऊन पाहिले. त्यावर कापड अगदी जसंच्या तसं बांधलेलं होतं. मडक्याला स्पर्श करून मनातल्या मनात म्हंटलं, `बस, नागदेवता, आणखी दोन तास धीर धरा.’ तो खाटेवर जाऊन पुन्हा झोपला. तो झोपला खरा, पण आता त्याला पहिल्यासारखी गाढ झोप लागली नाही. खूपवेळपर्यंत तो कुशा बदलत राहिला. मग त्याला झोप लागली. झोपेत स्वप्न पडलं.

 स्वप्नात त्याला दिसलं, मुनीमजींच्या घरी साप निघालाय. रमलूला तिथेही साप पकडायला बोलावलं गेलय. मुनीमजींनीदेखील पाचशेच्या दोन नोटा रमलूच्या शर्टच्या खिशात घातल्याहेत. आता त्याने फार काही जोरात नको म्हंटलं नाही. मग शेजारच्या गुलमोहर कॉलनीत एकामागून एक साप निघू लागले. त्या कॉलनीत सगळे बंगले करोडपतींचेच. प्रत्येक ठिकाणी साप पकडायला त्यालाच बोलावलं जाऊ लागलं आणि प्रत्येक जण त्याला इनाम देऊ लागला. कुठे हजार. कुठे पाच हजार. मग तर त्याला शेजा-पाजारच्या गावातूनही बोलावणं येऊ लागलं. त्याने एक झकासपैकी जीप खरेदी केली. शेठजींच्या जीपपेक्षाही शानदार आणि तो जीप घेऊन साप पकडायला जाऊ लागला. दिवसेंदिवस त्याची ख्याती वाढू लागली. त्याने आपला कारभार संभाळण्यासाठी काही सहाय्यकही ठेवले. पुढे पुढे असं होऊ लागलं, की एखादा विशेष साप असेल, तरच तो धरायला जायचा. एरवी त्याने प्रशिक्षित केलेले सहाय्यकच सगळा कारभार संभाळायचे. त्याने बघितलं, त्याचा एक मोठा वाडा झालाय. त्यात त्याची आई शेठाणीसारखी बसलीय. रेवती नोकरा-चाकरांना हुकूम सोडतेय. त्याची दोनही मुले शिकण्यासाठी मोठ्या शहरात गेतील. त्यांना भेटण्यासाठी तो अधून मधून विमानातून जातो. आभाळात उडणारं विमान थोडं उलटं-पालटं होऊ लागलं, तेव्हा त्याची झोप उडाली. त्याची आई त्याला हलवून हलवून जागी करत होती. `बाहेर अजून थोडा अंधारच होता. तो उठला आणि तोंड धुवून खुळखुळून चुळा भरून खाटेवर बसला आणि रात्रीच स्वप्न आठवू लागला.                       

क्रमश:….

मूळ हिंदी  कथा – साप  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ साप…. भाग २ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ साप…. भाग २ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात  आपण पहिलं – `नाग नाही, नागीण आहे. बहुतेक कात टाकणारे…त्यामुळेच तिची गती संथ झालीय. नाही तर आतापर्यंत सगळ्या वाड्यात फिरून आली असती. ‘ पहिल्या नोकराने विस्तृत माहिती दिली. आता इथून पुढे )

`मग तुम्ही लोकांनी तिला घेरून मारलं का नाही?’

`अरे बाबा, हे लोक सापाला मारत नाहीत ना! त्यांच्याकडे तर नागदेवतेची पूजा केली जाते.’

`मग तुम्ही लोक एवढ्या जाड जाड लाठ्या घेऊन का उभा राहिलाय?’ रमलूनेविचारले.

`शेठजीम्हणाले, त्यावर लक्ष ठेवा, नाही तर कुठे घुसेल, कुणासठाऊक!’

`मग आता कुठे आहे?’

`त्या कोपर्‍यात पुस्तकांच्या कपाटाखाली वेटोळं घालून बसलाय.’

रमलूला आपल्या वडलांची आठवण झाली. साप पकडण्याचं चांगलंच कसब त्यांच्याकडे होतं. अनेकदा त्यांच्या`साप-पकड- अभियानात रमलूदेखील सहभागी व्हायचा.

रमलूने डोळे मिटून भोळ्या शंकराचं स्मरण केलं. त्याचे वडील तसंच करायचे. मग म्हणाला, `एक मोठा माठ आणा आणि एक चांगलं मजबूत कापड. माठाच्या तोंडावर बांधण्यासाठी…. तुझा हा पंचासुद्धा चालेल.’ त्याने एका नोकराच्या खांद्यावरचा पंचा घेऊन आपल्या गळ्याभोवती लपेटला. मगत्याने ४-५ फूट लांबीची काठी घेतली आणि तो खोलीत शिरला. त्याने कपाटाला थोडासा धक्का देताच सापाने एक फुत्कार टाकला आणि तो सर्रकन बाहेर आला.

दरवाजाशी उभा असलेला एक नोकर ओरडला, `रमलू सावध राहा रे बाबा!’ दुसरा म्हणाला, लक्ष ठेव साप उसळी मारून, उलटा होऊनसुद्धा चावतो. ‘

रमलू अधीक सावध झाला. खोलीत लावलेल्या गुळगुळित टाईल्समुळे सापाला वेगाने सरकता येत नव्हतं. तो भिंतीच्या कडेने दरवाजाच्या दिशेने सरपटू लागला. रमलू सावधपणे पुढे झाला आणि लाठीचं टोक सापाच्या मानेपाशी पूर्ण ताकदीने दाबलं आणि उजव्या हाताने त्याची शेपटी मजबुतीने पकडून झटकन त्याला उलटं पकडलं. साप रमलूपेक्षा एखदा फूट जास्तच उंच होता. सापाला सावधपणे पकडून रमलू अंगणात आला. शेठजी आणि त्यांच्या कुटुंबियांनी साप पाहिला, तेव्हा त्यांचे डोळे विस्फारलेच. तर्‍हेतर्‍हेच्या चर्चा सुरू झाल्या. या दरम्यान रमलूच्या इशार्‍यानुसार नोकर मोठं मडकं घेऊन तिथे आला. रमलूने सापाला मडक्यात सोडलं आणि पापणी लवायच्या आतआपल्या गळ्यातला पंचा काढून मडक्याचं तोंड बांधून टाकलं. सापाच्या अस्वस्थपणामुळे हलणारं मडकदेखील वाड्यातील लोकांच्या मनात भीतीचे शहारे उठवायला पुरेसं होतं. इकडे रमलूचं सारं शरीर पानाप्रमाणे थरथर कापत होतं. घामाने न्हाऊन निघाला होता रमलू. त्याने कोणत्या खुबीने सापाला कैद केलं, त्यालाच कळलं नव्हतं. शरीराची थरथर थोडी कमी झाली, तेव्हा घामाने ओला चिंब झालेला आपला सदरा काढला. पिळला आणि त्याने आपला देह पुसू लागला. शेठजी हे सगळं बघत होते. ते पुढे झले आणि रमलूला म्हणाले, `आज तू अगदी तुझ्या वडलांप्रमाणे बहादुरीचं काम केलंस. मी त्यांना साप पकडताना पाहिलं होतं.’

रमलूची बोलतीच बंद झाली होती. मोठ्या मुश्किीलीने त्याच्या कंठातून शब्द फुटले, `शेठजी, आता मला निघायला हवं. अंधार होण्यापूर्वी याला जंगलात सोडायला हवं. मुकादमांना, मला झोपडीपर्यंत पोचवायला सांगा.’

`झोपडीत जाऊन काय करणार? मुकादम थेट जंगलापर्यंत तुला घेऊन जाईल.’

`झोपडीत जाऊन मटक्याला शेंदूर लावायला लागेल. आम्हीदेखील सापाची पूजा करतो. पूजा झाल्यावर जंगलात सोडून येईन.’

`तुझे वडीलसुद्धा असं सगळं करत होते?’

`हो!’

`ठीक आहे. तू म्हणशील, तिथे मुकादम तुला सोडून येईल.’ शेठजींनी हाक मारली. एका क्षणात तिथे मुकादम हजर झाला. रमलूने माठ उचलला आणि मोटारसायकलच्या दिशेने निघाला. शेठजींनी पाचशेच्या दोन नोटा काढून रमलूच्या खिशात ठेवत म्हंटलं, `हे तुझं इनाम’

`माफ करा शेठजी, या कामासाठी कोणतंही इनाम घेतलं जात नाही. माझ्या वडलांनी शेकडो साप पकडून लोकांची सुटका केली होती. पण कधी कुणाकडून एक पैसासुद्धा घेतला नाही.’

`तो काळ वेगळा होता रमलू. त्यावेळी शाळेत प्रवेश मिळण्यासाठी पैसे द्यावे लागत नव्हते. आता काळ बदललाय. प्रत्येक गोष्टीसाठी पैसे द्यावे लागतात. ठेव. तुझ्या कामी येतील.’

भाग 2 समाप्त

मूळ हिंदी  कथा – साप  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ साप…. भाग १ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ साप…. भाग १ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

`रमलू…ए रमलू… ऊठ.  वाड्यातून  मुकादम  बोलवायला  आलाय.

`झोपू दे ना आई! आज माझा सुट्टीचा दिवस आहे. सांग त्या मुकादमाला.’

`अरे, तो म्हणतोय, वाड्यात साप निघालाय. म्हणून  शेठजींनी तुला बोलावलय. जा. मुकादमाच्या सायकलवर बसून जा.’

`आज मी मुळीच जाणार नाही आई! काही का होईना तिकडे. यांना आम्ही  आमचा देव समजतो. पण या लोकांच्या दृष्टीने आमची  किंमत कौडीची. नोकरच आम्ही फक्त. साप निघू दे,  नाही तर आग लागू दे! आम्हाला काय त्याचं? रमलू उठून खाटल्यावर बसला. तो पुढेही भुणभुणत राहिला. `त्यांच्याकडे नोकरी करायला लागून दोन वर्षं झाली. आधी म्हणाले, ऑफीसमध्ये काम करावं लागेल. पण आता शेतात-मळ्यात मजूरी, ट्रॅक्टरवर हमाली, त्यांच्या मुला-बाळांचं हागणं-मुतणं सगळं करवून घेतात. बारा तास करा… नाही तर वीस तास करा. कधी पाच रुपये स्वतंत्र फेकणार नाहीत. ते तर झालंच, यांची सायकल पंक्चर झाली तरी पंक्चर दुरुस्तीचे पैसे पगारातून कापून घेणार. मोठे शेठ म्हणवतात स्साले….!

`असं नाही बोलायचं बेटा, कसं का असेना, ते आपले अन्नदाते आहेत. जा. मुकादम उभा आहे बाहेर.’

`आई, मी काल तुला सांगितलं नाही? काल पाच हजार रुपये मागितले होते. आपल्या मुनियाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी. मुनीम, शेठजी, मोठ्या सूनबाई, धाकट्या सुनबाई सगळ्यांची विनवणी केली. गयावया केलं. पायसुद्धा धरले. पण सगळ्यांनी तोंड फिरवलं. पैसे मागितले, तेसुद्धा दान म्हणून नाही. अ‍ॅडव्हान्स म्हणून. मी म्हंटलंसुद्धा… दर महिन्याच्या पगारातून पाचशे रुपये कापून घ्या, पण कुणाला पाझर फुटला नाही.’

`अरे, मोठ्या शेठजींना सांगायचंस ना! ते तुझ्या वडलांपासून आपल्याला ओळखतात.’

`त्या मुठल्ल्यालासुद्धा सांगितलं. काय म्हणाला माहीत आहे? ‘

`काय? ‘

`म्हणाला उगीचच पैसे फुकट घालवता तुम्ही लोक. म्युन्सिपालटीच्या शाळेत का प्रवेश घेत नाही? तुम्हा लोकांसाठी ती शाळाच ठीक आहे. ‘

`अरे बेटा, एकदा नाही म्हंटलं, म्हणजे प्रत्येक वेळी नाहीच म्हणतील, असं थोडंच आहे? त्यांचीही काही अडचण असेल. तुझे बाबा गेल्यानंतर त्यांनी तुला नोकरी दिली नसती, तर आज आपण कुठे असतो? आज त्यांच्यावर संकट आलय, आणि आपण घरात झोपून राहतो, हे काही ठीक नाही.’

एवढ्यात झोपडीसमोर एक मोटरसायकल उभी राहिली. त्यावरून मुनीम आले होते.

`चल बेटा रमलू, वाड्यावर भयंकर गोंधळ माजलाय!’

`पण मुनीमजी, मी येऊन काय करू? मला साप पकडता येत नाही.’

एव्हाना रमलू चुळा भरून उपरण्याला तोंड पुसत बाहेर आला होता.

`तुझे वडील साप पकडायचे. त्यांचा कुणी साथीदार असेल, तर त्याला घेऊन जाऊयात. शेठजींनी त्यासाठी मोटरसायकल पाठवलीय.’

`अरे, ते रम्मैया चाचा असतील. तुझ्या बाबांबरोबर ते पण साप पकडायला जायचे.’

मुनीम आणि रमलू रम्मैयाचाचाकडे गेले, पण तिथे कळलं, ते आपल्या मुलाकडे पुण्याला शिफ्ट झाले आहेत.

रमलू मुनीमजींबरोबर वाड्यावर पोचला. शेठ-शेठाणी आणि घरातील इतर सगळे सत्रा-अठरा लोक अंगणात, कुणा संकटमोचकाची प्रतीक्षा करत उभे होते. मुकादम वाड्यावर आधीच पोचला होता. त्याने रमलूचा हात धरला आणि ज्या खोलीत साप होता, तिथे त्याला ताबडतोब घेऊन गेले. खोलीच्या दरवाज्याशी डावी-उजवीकडे दोन नोकर हातात लाठी घेऊन उभे होते. त्यापैकी एक जण म्हणाला, `सहा-आठ फुटापेक्षा कमी नाहीये! सगळ्यात आधी मोठ्या सूनबार्इंना दिवाणखान्यात दिसला. त्या ओरडल्या. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत कोठीच्या खोलीतून इथे रश्मीतार्इंच्या खोलीत पोचला.’

`वाटतय, अस्सल नाग आहे.’ दुसरा नोकरम्हणाला.

`नाग नाही, नागीण आहे. बहुतेक कात टाकणारे…त्यामुळेच तिची गती संथ झालीय. नाही तर आतापर्यंत सगळ्या वाड्यात फिरून आली असती. ‘ पहिल्या नोकराने विस्तृत माहिती दिली.

भाग 1 समाप्त

मूळ हिंदी  कथा – साप  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वयोवृद्ध वटवृक्ष ☆ प्रस्तुती – सुश्री आनंदी केळकर

? जीवनरंग ?

☆ वयोवृद्ध वटवृक्ष ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर ☆ 

सकाळचे साडेआठ वाजले होते. मोबाईल चाळत बसलो होतो.फेसबुकवर कोणाचे वाढदिवस आहेत का ते पाहून मेसेज करत होतो. बायकोला ऑफिसला जायचे होते, त्यामुळे तिची आवरा- आवर चालू होती.आई किचनमध्ये नाश्ता बनवत होती. अण्णा (माझे वडील) आणि रेवती (माझी सहा वर्षांची मुलगी) सकाळी सकाळी फिरायला सोसायटीच्या बागेमध्ये गेले होते.

“अरे आनंदा आंघोळ करून घे- पाणी तापलंय ” 

असा आईचा आवाज आला. तसा मी बोललो “ हो आलो पाच मिनिटात.” 

 “काय मेलं त्या मोबाईल मध्ये असतं– दिवसभर मोबाईल हातात धरून बसलेला असतो, “

आईची बडबड चालू होती. 

तेवढ्यात बाहेर रेवतीचा आवाज आला, ” पप्पा अण्णांनी बघा तिथं पडलेले आंबे उचलून आणलेत ” हे ऐकताच माझ्या कपाळावर आठ्या पडल्या.

दोन महिन्यांपूर्वीच मी स्वतःच्या फ्लॅटवर राहायला आलो होतो. त्याआधी अण्णा आणि आई गावी राहत होते. मी, रेवती आणि माझी बायको इथे पुण्यातच भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होतो. रेवतीने बाहेरून बेल दाबली आणि मी पटकन उठून दरवाजा उघडला.

अण्णा आणि रेवती आत आले आणि दरवाजा लावून घेतला. मी अण्णांकडे वळलो. अण्णांनी पंधरा ते वीस आंबे आणले होते.झाडावरून पडलेले असल्यामुळे त्यातले काही आंबे फुटले पण होते.

“अण्णा कळत नाही का तुम्हाला– पडलेले आंबे उचलून आणलेत.   “

‘अरे पोरा कोणी टाकून दिलेले आंबे नाहीत ते.  झाडाचेच खाली पडलेले आंबे आहेत. “ अण्णा म्हणाले.

” ते काही असू द्या.  आपण आता फ्लॅटमध्ये राहतो.  असल्या भिकार सवयी सोडा, नाहीतर रेवतीला पण त्या सवयी लागतील.” 

 अण्णा काही न बोलता पिशवीतून आंबे काढत होते.

” आणि हो आता इस्त्री केलेले कपडेच घालायचे.  चुरगळलेले कपडे घालायचे नाहीत.  “.

” ते भोकं पडलेलं बनियन आधी टाकून द्या.  दरिद्री पणाचे लक्षण सोडा, आणि जरा चांगले वागा. “

“ बरं बाबा.  आता तुझ्या घरात रहायचे म्हटल्यावर तुझंच ऐकावं लागेल. “ 

” अण्णा अहो तुम्ही तीस वर्षात कमावला नसेल एवढा पैसा मी एका वर्षात कमावतो. त्यामुळे ही असली फालतू काटकसर करू नका. आणि हो, अजून एक, तुम्ही सारखं सारखं खाली गेटवर वॉचमनशी गप्पा मारत बसत जाऊ नका.  सोसायटीतली माणसं तुमच्याकडे बघतात, बरं दिसत नाही ते. किती झालं तरी ते आपले नोकर. त्यांच्याशी एवढी सलगी ठेवायची नाही.” 

 माझा तोंडाचा पट्टा चालू होता.आणि अण्णा ते आणलेले आंबे आतमध्ये धुवायला घेऊन गेले. 

आई माझं सगळं बोललेलं  ऐकत होती, पण काही न बोलता तिचं काम चालू होतं.

  थोड्याच वेळात बायको ऑफिसला निघून गेली. आता घरात मी,आई,अण्णा आणि रेवती, आम्ही चौघेच होतो.अशाच गरमागरमीच्या वातावरणात दुपारचे दोन वाजले. जेवण वगैरे उरकल्यावर मी पुन्हा मोबाईल हातात घेऊन बसलो.आई पलीकडे चटईवर बसली होती. रेवती तिची खेळणी मांडून तिच्या बाहुलीसोबत खेळत होती.अण्णा खुर्चीतून उठले आणि सकाळी आणलेले आंबे घेऊन आले. त्यांनी सगळे आंबे एका पोत्यावर टाकले. मी आपलं बघून न बघितल्यासारखं केलं.  आंबे बघून रेवती अण्णांजवळ जवळ गेली. खरं तर तिला पण आंबा खायचा होता. पण मी रागवणार म्हणून गप्प बसली होती. अण्णांनी एक आंबा तिला दिला, तसा तिने आंबा खायला सुरुवात केली.

” वाव, किती गोड आंबे आहेत, ” रेवती बोलली आणि माझं लक्ष तिकडे गेलं.

“ खरंच एवढा गोड आहे का आंबा ? “ मी सहज बोललो.

” हो पप्पा. आपण मागच्या आठवड्यात आणलेल्या पेटीतल्या आंब्यापेक्षा गोड आहे. “

 मी तिचा आंबा खात असतानाचा फोटो मोबाईलवर काढायला लागलो, तसं मला अण्णांनी आवाज दिला– “ पोरा तुला पण लहानपणी पाडाचे आंबे फार आवडायचे,म्हणून तू शाळा सुटली की मुद्दाम पाटलाच्या आमराईतून घरी यायचास, आणि आमराईत पडलेले आंबे तुझ्या शाळेच्या दप्तरात भरून आणायचास. पडलेले आंबे उचलले तर पाटील पण कोणाला काही बोलत नसायचा. झाडाचे आंबे पाडले की मग मात्र पाटलाचं  नुकसान व्हायचं.”

 मी अण्णा बोलत असल्याचं पाहून मोबाईल बाजूला ठेवला.

“ तू लहानपणी आणलेल्या त्या आंब्यांना  माती लागलेली असायची, नाहीतर ते आंबे पाखरांनी खाल्लेले तरी असायचे.  तरीपण तुला ते आंबे आवडायचे. आता तुझ्याकडे  पैसे आलेत म्हणून तुला ते सगळं नकोसं वाटायला लागलंय. आमची चुरगळलेली फाटकी कापडं तुला नकोशी वाटायला लागलेत.  गावाला दुष्काळ पडला होता तेव्हा फक्त तीन टाईमच्या जेवणावर मार्केट यार्डात रात्रीच्या पाळीला वाचमेन होतो मी. रात्रीचं वाचमन काम आणि दिवसा हमाली केली त्या टायमाला. तुझ्या आईनी चार घरची धुणीभांडी केली.  पर कधी कुणासमोर हात पसरला नाही.अरे, आपल्या सोसायटीचा वॉचमन पण माणूसच आहे की. आणि त्याच्या पोरानी नशीब काढलं तर तुझ्यासारखा साहेब होईलच की. अरे माणसानं माणसासारखं राहिलं पाहिजे एवढंच कळतं बघ आम्हाला. म्हणून तर त्या वॉचमन बरोबर गप्पा मारत असतो. आणि  पहिल्यापासून असंच आहे आम्ही.

 पर एक मातुर छाती ठोकून सांगतो, तुला धरून सहा पोरं वाढवली.  पर कधी एक रुपयाची सुद्धा लबाडी केली नाही बघ. कालच्या वादळवाऱ्याच्या पावसात हे पिकलेले आंबे जसे गळून खाली पडले, तशी ही म्हातारी पाखरंसुद्धा तुमच्या आयुष्यातून उडून जातील.  आता आम्हा म्हातार्‍यांचे असे किती दिवस राहिलेत. “ 

मी मान खाली घालून सगळे ऐकत होतो.

मध्येच आईकडे लक्ष गेलं. ती पदराने डोळे पुसत होती.

माझ्या डोळ्यातही पाणी आलं,तसा मी आण्णांच्या पुढे हात केला आणि अण्णांना म्हणालो —

 “अण्णा, एक गोड बघून आंबा मला पण द्या की “–

अण्णांच्या चेहऱ्यावर हसू फुललं तसा सुरकुतलेला त्यांचा चेहरा टवटवीत दिसायला लागला.

प्रत्येकाच्या घरात असा वयोवृद्ध वटवृक्ष असतो. कुटुंबाची काळजी घेता घेता खंगून गेलेला असतो. घरातल्या अशा म्हाताऱ्या आजी आजोबा किंवा आई-वडिलांना थोडं त्यांच्या मनाप्रमाणे सुद्धा जगू द्या,कारण आयुष्यभर ते मन मारून जगलेले असतात– फक्त तुमच्यासाठी.

प्रस्तुती:-  संग्राहिका : सुश्री आनंदी केळकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares