मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लिगो (LIGO)… श्री विनीत वर्तक ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ? 

☆  लिगो (LIGO)… श्री विनीत वर्तक  ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

लिगो म्हणजे Laser Interferometer Gravitational-Wave Observatory.

 जगातील तिसरी लिगो अमेरिकेनंतर नासा भारतात उभारत आहे. अमेरिकेबाहेर पहिल्यांदा अशी अद्यावत लिगो भारतात आपल्या महाराष्ट्रात बनणार आहे. महाराष्ट्राच्या हिंगोली तालुक्याच्या औंढानागनाथ इथे लिगो आकाराला येत आहे. जवळपास १३०० कोटी रुपयांची जगातली महाग अशी प्रयोगशाळा आपल्या महाराष्ट्रात आकाराला येत असताना सो कॉल्ड मराठी आणि महाराष्ट्राचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांना त्याची पुसटशी कल्पना ही नाही. नासाचे वैज्ञानिक आणि भारतातून डी.ए.ई. चे अधिकारी ह्यांची वर्दळ गेल्या काही वर्षापासून ह्या भागात सुरु आहे. इथल्या जवळपासच्या लोकांना नासा काहीतरी मोठ्ठ प्रोजेक्ट करत आहे इतकीच जुजबी माहिती आहे. पण वैश्विक संशोधनाला  कलाटणी देणारी ही अत्याधुनिक प्रयोगशाळा आपल्या माजघरात आकार घेत असताना त्याची उत्सुकता आणि त्याबद्दल जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. 

लिगो म्हणजे नक्की काय? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी ग्रॕवीटेशनल वेव्ह (गुरुत्वीय लहरी ) समजून घ्यावी लागेल. विश्वात अश्या अनेक घटना घडत असतात की ज्या माणसाच्या कल्पनेच्या पलीकडल्या आहेत. एकूणच विश्वाची निर्मिती आणि त्यात असलेल्या अनेक गूढ गोष्टी ह्याबद्दल अजूनही बरेच संभ्रम आणि तोकडे ज्ञान आहे. २१ व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शोधाची अनेक नवीन दालन उघडी झाली आहेत. त्यातलं एक दालन म्हणजेच लिगो. गेल्या शतकात विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन ह्यांनी भाकीत केलं होतं की जेव्हा वैश्विक घटना,  म्हणजे कृष्णविवरांच (Black Holes) मिलन किंवा न्युट्रॉन ताऱ्यांची टक्कर अश्या घटना घडतील तेव्हा स्पेस – टाईम मध्ये त्यांच्या प्रचंड वस्तुमानामुळे आणि त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड गुरूत्वीय बलामुळे लहरी तयार होतील. नदीच्या पाण्यात दगड टाकल्यावर जसे पाण्यात तरंग निर्माण होतात त्याच पद्धतीने ह्या लहरी तयार होऊन विश्वाच्या पोकळीत प्रवास करतील. जेव्हा ह्या लहरी ग्रह तारे ह्यांना आदळतील तेव्हा स्पेस – टाईम मध्ये विश्व जेलीच्या बॉलसारखं  आकुंचन आणि प्रसरण पावेल. ते ज्या लहरींनी होईल त्यांना गुरुत्वीय लहरी असं म्हटलं गेलं .

पूर्ण विश्वात तरंग उमटवायला विश्वात होणारी उलथापालथ ही तितकी प्रचंड असली पाहिजे. गुरूत्वीय लहरी त्यामुळे ओळखणे कठीण आहे. कारण ह्या तरंगामुळे पृथ्वीचं  होणारं आकुंचन आणि प्रसरण हे अवघ्या  एका फोटोन च्या आकाराचे  असू शकते. तसेच ह्या तरंगाची क्षमता ही त्या उलथापालथी वर अवलंबून आहे. विश्वातील ज्या घटना अश्या गुरूत्वीय लहरी निर्माण करू शकतात त्या म्हणजे, दोन कृष्णविवरांच मिलन, दोन न्युट्रॉन ताऱ्यांचं एकमेकाभोवती फिरणं आणि सुपरनोव्हा. तर अश्या घटना जेव्हा विश्वाच्या पटलावर घडतात तेव्हा त्याचे तरंग गुरुत्वीय लहरींच्या स्वरूपात प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात. आधी म्हंटलं तसे पृथ्वीवरही हे तरंग सतत आदळत असतात, पण ते ओळखणे आधी तंत्रज्ञानाला शक्य नव्हतं. कारण एका फोटोनच्या आकारात होणारा फरक मोजणारी यंत्रणा आपल्याकडे नव्हती. पण विज्ञान सतत पुढे जात आहे, त्यामुळे आत्ता आपण तशी यंत्रणा निर्माण करू शकत आहोत. त्यामुळे ह्या लहरी जेव्हा जेव्हा पृथ्वीवर आदळतील, तेव्हा तेव्हा पृथ्वीच्या होणाऱ्या आकुंचन आणि प्रसरण ह्यावरून त्या लहरींचा स्त्रोत,  नक्की केव्हा ही लहर अस्तित्वात आली ह्याबद्दल सांगू शकतो. 

२०१५ साली जेव्हा लिगो तयार होऊन काम करायला लागलं, तेव्हा पहिल्यांदा आपल्याला ही वेव्ह पृथ्वीवर कळाली. ही  गुरुत्वीय लहर १.३ अब्ज वर्षांपूर्वी दोन कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झाली होती. म्हणजे १.३ अब्ज वर्षापूर्वी निघालेली ही वेव्ह तब्बल ३ लाख किलोमीटर प्रती सेकंद ह्या वेगाने पृथ्वीवर यायला इतकी वर्ष लागली. आत्तापर्यंत प्रकाश हे एकच माध्यम घेऊन आपण विश्वाकडे बघत आलो आहोत. पण जेव्हा ह्या वेव्हनी १.३ अब्ज वर्षापूर्वीची माहिती पृथ्वीवर पोचवली, त्या वेळेस आपण एका नवीन दरवाजातून विश्वाकडे बघू लागलो. आईनस्टाईनने ते स्वप्न बघितले आणि लिगोने तो दरवाजा शोधला. ४ जानेवारी २०१७ ला जेव्हा तिसरी वेव्ह लिगोने शोधली ती तब्बल ३ अब्ज वर्षापूर्वी तयार झाली होती. म्हणजे त्यावेळेचा पूर्ण इतिहास ही वेव्ह आपल्या सोबत घेऊन प्रवास करत होती. ह्या वेव्हच्या अभ्यासातून अनेक गोष्टी आपल्याला समजणार आहेत, ज्याबद्दल आपण अजून अनभिज्ञ आहोत. गुरूत्वाकर्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनच पूर्ण बदलून जाणार आहे. 

भारतासाठी अभिमानाची गोष्ट ही की लिगो तयार करण्यात भारतीय वैज्ञानिक अग्रेसर आहेत. आईनस्टाईनच्या ज्या थेअरी ऑफ रिलेटीव्हीटीवर आपण आज हे शोधू शकलो आहेत, ते लिगो उपकरण बनवण्यात भारतीय वैज्ञानिकांचे योगदान प्रचंड आहे. जगातील १००० हून अधिक वैज्ञानिकात भारताच्या अनेक संशोधकांनी आपले योगदान दिले आहे. लिगोमध्ये दोन आर्म काटकोनात चार किलोमीटरचे असतात. जेव्हा  ग्रॅव्हिटेशनल वेव्ह पृथ्वीवर आदळते, तेव्हा तिच्या आदळण्याने ह्या आर्मच्या लांबी मध्ये फरक होतो. हाच फरक लेझर, मिरर आणि अतिसूक्ष्म बदल नोंदवणाऱ्या उपकरणांनी बंदिस्त केला जातो. आनंदाची बातमी अशी की अस लिगो भारतात बांधण्यासाठी युनियन केबिनेट ने फेब्रुवारी २०१६ मध्ये मंजुरी दिली आहे. ६७ वैज्ञानिक १३ प्रयोगशाळा, जश्या ( DAE,TIFR, IIT Bombay, IIT Madras, IUCAA Pune, RRCAT Indore, UAIR Gandhinagar, IIT Gandhinagar, IIT Hydreabad etc.)  ह्यात सहभागी आहेत. २०२२ मध्ये लिगो तयार झाल्यावर अश्या वेव्हचा अभ्यास भारतीय वैज्ञानिकांना भारतात आणि महत्वाचे  म्हणजे महाराष्ट्रात करता येणार आहे. 

आईनस्टाईनने बघितलेले  आणि अभ्यासलेले स्वप्न आता प्रत्यक्षात आपण अनुभवतो आहोत. ह्या विश्वाच्या पसाऱ्यात आपल्याला माहित असलेल्या गोष्टी खूप कमी आहेत. आजवर प्रकाश ह्या एकाच दरवाज्याने आपण विश्व बघत आलो. पण आता ग्रॕव्हीटेशनल वेव्हमुळे अजून एक दरवाजा उघडला गेला आहे. ह्यातून विश्व समजून घेणे मोठे रंजक असणार आहे. ह्यात भारतीय वैज्ञानिक आणि संशोधक तितकाच समतोल वाटा उचलत आहेत हे बघून खूप छान वाटले. विश्वाच्या ह्या नव्या दरवाज्याचे स्वप्न बघणारा आईनस्टाईन आणि ते प्रत्यक्षात उतरवणारे “ लिगो “चे सर्वच भारतीय संशोधक ह्यांना सलाम.    

– श्री विनीत वर्तक

(माहिती स्त्रोत :- गुगल, नासा) 

संग्राहक :- मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ परशुराम –बुरोंडी दापोली ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ? 

☆ परशुराम –बुरोंडी दापोली  ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

स्व हिमतीवर भगवान परशुरामांचा पुतळा उभारुन आपल्या आराध्यदेवतेप्रती भक्तीचा महापूर वाहणाऱ्या ‘परशुराम भूमी’ प्रांगणाची निर्मिती करणाऱ्या आणि भगवान परशुरामांची भव्य मूर्ती उभारणा-या गानू परिवाराला कितीही धन्यवाद दिले, तरी अपूर्ण राहतील…

दापोलीतून कोळथरेला निघताना बुरोंडी दापोली लागते. तिथे भगवान परशुरामांचा भव्य पुतळा आहे. फारसा गाजावाजा न करता ही निर्मिती सुरु आहे.. आजूबाजूला पहाताना भव्य मूर्ती दिसते, ती पण भगवान परशुरामांची…. तिथे माणूस प्रचंड आनंदाने उतरतोच …..

ज्ञान, भक्ती, त्याग आणि सृजन यांचा साक्षात्कार म्हणजेच विष्णूंचा सहावा अवतार — भगवान परशुराम ! आपल्या युगातील अत्याचारी आणि समाजविघातक शक्तींचा नाश करुन तब्बल २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केलेले थोर पराक्रमी व समाजाला सुखाचा मार्ग दाखविणारे——- चिरंजीव भगवान परशुराम ! तपःसाधना, शस्त्रविद्या आणि वेदधर्म यांचा आद्य संगम म्हणजे—– भगवान परशुराम ! 

अशा भगवान परशुरामांचे मूर्त रुपात दर्शन घडावे आणि ते तरुण पिढीसाठीही प्रेरणादायी ठरावे, या हेतूने पुण्यातील न्यू मॉडर्न ऑप्टिशियन्सचे मालक – सौ.अश्विनी आणि अनिल गोविंद गानू यांनी परशुरामभूमीची निर्मिती केली आहे…..

४० फूट व्यासाच्या अर्धगोल पृथ्वीवर २१ फूट उंची असलेली परशुरामांची ही भव्य मूर्ती उभी असून फेरोक्रीट पद्धतीने हा पृथ्वीचा अर्धगोल बांधला आहे. भगवान परशुरामांचे हे भव्य शिल्प उत्तराभिमुख असून ‘तामसतीर्थ’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या समुद्रकिना-याचे दर्शन येथून होते. समुद्राच्या तेवढ्याच भागाचे पाणी तांबडे दिसते, म्हणून त्याला ‘तामसतीर्थ’ म्हणतात.

हे कमालीची स्वच्छता असलेले निसर्गरम्य ठिकाण  आहे. गोलाकार पृथ्वीच्या आत शिरल्यावर ध्यानगुंफा आहे. तिथे बसलात की, काहीही बोला – प्रतिध्वनी उमटतात. परशुरामांच्या चरणी लीन होतात.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा भव्य पुतळा, त्याची निगा आणि इतर खर्च प्रचंड असूनही,  येथे कसलेही प्रवेशशुल्क नाही…..

केवळ ‘जय परशुराम’ करुन न थांबता, प्रत्यक्षात भव्य मूर्ती उभारणा-या गानू परिवाराला लाखो धन्यवाद. सगळ्यांकडे खूप काही असते, पण द्यायला उंच मन लागते…. सभोवतालचा आल्हाददायी परिसर मन तजेल करतो. मनाला शांतता देणाऱ्या या परशुराम-भूमीच्या निर्मितीला आठ वर्षे झाली आहेत. 

माहिती संग्राहक : — सुहास सोहोनी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ विष्णू सहस्त्र नामाची सुरस माहिती ☆ प्रस्तुती – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

?इंद्रधनुष्य? 

☆ विष्णू सहस्त्र नामाची सुरस माहिती ☆ प्रस्तुती – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

पूर्वी एकदा १९४० किंवा ५० च्या दशकात कोणीतरी महापेरियार कांची धर्माचार्य चंद्रशेखर सरस्वती ह्यांची मुलाखत घेत होते. ते सद्गृहस्थ मुलाखत ध्वनिमुद्रित करीत असताना टेप रेकॉर्डरचा वापर करीत होते.  तेव्हा पेरियार ह्यांनी प्रश्नार्थक पवित्रा घेत विचारले, ” कोणाला सर्वात जुन्या टेपरेकॉर्डरविषयी माहिती आहे कां ???”

ह्या नंतर त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, “विष्णू सहस्त्र नाम आपल्या पर्यंत कसे आले ???

कुणीतरी म्हणाले, ” पितामह भीष्म ह्यांच्यामुळे ते आपल्याला प्राप्त होऊ शकले”, ह्या वर सर्वांचे एकमत झाले.

त्यावर महापेरियार ह्यांनी पुढचा प्रश्न केला, ” युद्धभूमीवर सगळ्यांनी भीष्म ह्यांना विष्णू सहस्त्रनाम म्हणताना ऐकले तेव्हा ते कोणी टिपून घेतले ???”

पुन्हा एकदा शांतता पसरली. तेव्हा महापेरियार ह्यांनी स्पष्ट केले, ” जेव्हा भीष्म कृष्णस्तुतीपर विष्णू सहस्त्रनाम म्हणत होते, तेव्हा कृष्ण, व्यास ह्यांच्यासमवेत सर्वजण त्यांच्याकडे पहात होते. जेव्हा त्यांनी १००० विष्णूनामे म्हणून पूर्ण केली, तेव्हा सर्वजण त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पहातच राहिले. सर्वात पहिले युधिष्ठिर भानावर येऊन ह्यावर संमिश्र प्रतिक्रिया देते झाले, ” पितामह ह्यांनी वासुदेवाची उत्कृष्ठ अशी रमणीय १००० नावे पठण केली, आपण सर्वजण फक्त ऐकतच राहिलो.  पण कोणी ती टिपून घेतली नाहीत. आता त्याचा क्रम पण आपण गमावला”. तेव्हा सगळेजण कृष्णाकडे मोठ्या आशेने वळून मदतीची याचना करु लागले. नेहमीप्रमाणे कृष्ण म्हणाला,

” मलासुद्धा तुम्हा सर्वांप्रमाणे ऐकलेली रचना आवडली.  पण आपण काय करू शकतो ???”

तेव्हा सर्वजण अमूल्य अश्या रचनेच्या पुनर्प्राप्तीसाठी कृष्णाची आर्जवं करु लागले.  तेव्हा वासुदेव उदगारले, ” हे फक्त सहदेव पुनर्प्राप्त करू शकेल आणि व्यास ते टिपून घेतील.” सर्वजण, सहदेव हे कार्य कश्याप्रकारे करु शकेल ??? हे जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले, तेव्हा कृष्णाने उत्तर दिले, ” आपल्या सर्वांमध्ये सहदेवाने एकट्याने सूत स्फटिक धारण केले आहे. जर त्याने शिवाची प्रार्थना केली आणि ध्यान केलं, तर तो स्फटिकाला ध्वनीलहरींमध्ये रुपांतरीत करु शकेल, आणि व्यास ते टिपून घेऊ शकतील”.

तेव्हा सहदेव आणि व्यास, जिथे त्यांनी भीष्म पितामहांना सहस्त्र नाम म्हणताना ऐकले होते, त्याच ठिकाणी खाली बसले. सहदेवाने स्फटिकाच्यामार्फत ध्वनीलहरींद्वारे सहस्त्रनाम प्राप्त करण्यासाठी शिवाचे ध्यान आणि प्रार्थनेला सुरवात केली.

स्फटिकाची प्राकृतिक रचना शांत वातावरणामध्ये ध्वनी हस्तगत करू शकेल अशी असते. जो श्वेतांबर आणि स्फटिकासमान आहे, अशा शिवाचे उचित असे ध्यान केल्यास ह्या ध्वनीलहरी पुनर्प्राप्त होऊ शकतात .

अश्याप्रकारे विश्वातील सर्वात पहिल्या “ स्फटिक ” टेपरेकॉर्डरमार्फत रचना ऐकून व्यासांनी ती

टिपून आपल्यापर्यन्त विस्मयकारक असे विष्णू सहस्त्रनाम पोहोचवले– हे जेव्हा महापेरियार ह्यांनी स्पष्ट केले तेव्हा सर्वजण स्तंभित होऊन ऐकतच राहिले..

आपण आज वापरतोय त्या हार्डडिस्क, मेमरी कार्ड मध्ये स्फटिकाचाच वापर होतोय, याचेशी तंतोतंत जुळणारी ही माहिती आहे. Quartz stone or SiO2 or silicon म्हणजेच स्फटिक…

साभार

ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ।।

प्रस्तुती : श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पानिपत -हृदय द्रावक शोकांतिका – भाग – 3 ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

?इंद्रधनुष्य? 

☆ पानिपत -हृदय द्रावक शोकांतिका – भाग – 3 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

(श्री. विश्वास पाटील यांच्या “ पानिपत “ या गाजलेल्या कादंबरीचा परामर्श ) 

(तेव्हा होळकरांच्याच मेहेरबानीवर पदरी असलेल्या कॅडम्याड पथकाने हुल्लडबाजी केली,  आणि ‘ मराठे हरले,’ असा कांगावा सुरू केला.) इथून पुढे —–

कुणाचा कुणाला मेळ लागेना. आपले कोण आणि परके कोण कळेना. सैन्य बिथरले आणि याच संधीचा गैरफायदा गिलच्यानी उचलला. त्यांच्यात चैतन्य संचारले. गोलाईचा व्यूह मोडू नका, ठरल्याप्रमाणे सर्व होऊ दे, अन्यथा फुकट मनुष्यहानी होईल, म्हणून इब्राहिम गारदी आणि इतरजण ओरडू लागले.  पण अगोदरच भुकेकंगाल आणि मरगळलेल्या सैनिकांना काही सुचत नव्हते. मारू किंवा मरू म्हणत ते बेछूट ,अंदाधुंदीने पुढे सरकून व्यूहातून बाहेर पडले.  यातच विंचूरकर आणि होळकरांसारखे जुने जाणते नेतेही होते. गिलच्यानी सपासप मुडदे पाडायला सुरुवात केली आणि मराठ्यांची दाणादाण उडाली. विश्वासराव आणि यशवंतराव पवारांसारख्या  शूरवीरांची प्राणाहुती पडली. जनकोजीला कैद केले आणि जीव मुठीत धरून सैन्य रणांगण सोडून पळू लागले.  त्यातच होळकर आणि विंचूरकर सुद्धा ! भाऊसाहेबही त्वेषाने लढत होते,पळणाऱ्या सैन्याला कळकळीने आव्हान करत होते.  मात्र कोणी कुणाचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. मराठ्यांची अशी दाणादाण दारुण अवस्था बघून गिलच्याना चेव चढला आणि निम्मे अर्धे सैनिक त्यांनी कापून काढले. तोफा,गोळ्या,आरोळ्याने रणांगणाने अक्राळविक्राळ रूप धारण केले. रक्त,मांसाचा चिखल झाला. पानिपत थरारले. दशदिशा भयकंपीत झाल्या. शेवटी भाऊसाहेबही धारातीर्थी पडले आणि उरलेसुरले सैन्यही जिवाच्या आकांताने सैरावैरा पळू लागले. गिलच्यानी त्यांना ताणून मारले. जिवाच्या भयाने रात्री -अपरात्री लपत छपत रस्ता कापणाऱ्या चार दोन टोळक्यांना देखील पाठलाग करून कापून काढले. काही स्त्रियांचे अवघ्या एक दोन रुपयात लिलाव झाले.

महाभारतानंतर प्रचंड भयंकर रणसंग्राम पानिपतचा झाला. महाराष्ट्रातील अठरा पगड जातीतील प्रत्येक उंबऱ्यातील एक एक तरुण पानिपत मध्ये गाडला गेला.

इतके दिवस माती आणि झाडपाला खाऊन विजयाच्या आशेने जिवंत राहिलेले सैन्य अर्ध्या -एक दिवसात खलास झाले. न भूतो न भविष्यती नरसंहार व पशुसंहार झाला. इब्राहिमला हालहाल करून मारले. भाऊसाहेबांच्या मृतदेहाची विटंबना झाली. समशेरबहाद्दर जखमी अवस्थेत बेशुद्ध होऊन रानोमाळ घोडा नेईल तिकडे चालला आणि वाटेतच मरण पावला.

अब्दाली जिंकला तरीही मराठ्यांच्या चिवट झुंजीने आणि पराक्रमाच्या शर्थीने तो आश्चर्यचकित झाला. नजीब आनंदाने बेहोष झाला. मराठे हरूनही जिंकले आणि अब्दाली जिंकूनही हरला. परत कधीच भारतावर आक्रमण करायचे धाडस त्याने केले नाही. वृद्ध जानूने पार्वतीबाईना (भाऊसाहेबांच्या पत्नी) पाठीशी बांधून शत्रूचा डोळा चुकवत महाराष्ट्रात सुखरूप पोहचवले.

पानिपतची माती मराठ्यांची शौर्यगाथा अभिमानाने गाईल. इतिहास होळकर विंचूरकरना माफ करणार नाही.  त्याचबरोबर छोट्या छोट्या चुकाही किती महाभयंकर परिणाम भोगायला लावतात याचे वास्तव हृदयद्रावक उदाहरण पानिपतचा इतिहास सांगेल. इब्राहिम ,समशेरबहाद्दर,जनकोजी शिंदे, विश्वासराव, भाऊसाहेब, यशवंतराव पवार, गंगोबातात्या, यासारख्या तेजस्वी पराक्रमी पुरुषांचे बलिदान इतिहास कधीच विसरणार  नाही.

महाराष्ट्राच्या हृदयात पानिपतच्या प्रचंड जीवितहानीच्या, मानहानीच्या व पराभवाच्या जखमा कायमच भळभळत रहातील.

मराठी माणूस नेहमीच पानिपतचे पारिपत्य आठवून हळहळत राहील आणि मराठयांच्या बलिदानाशी कृतज्ञ राहील. मराठी मातीशी इमान सांगणाऱ्या प्रत्येकाने पानिपतचा इतिहास व शौर्यगाथा मनात जिवंत ठेवायला हवी…

कादंबरीचे नाव :– पानिपत

लेखक:– विश्वास पाटील

राजहंस प्रकाशन,पुणे 

समाप्त 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पानिपत -हृदय द्रावक शोकांतिका – भाग – 2 ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

?इंद्रधनुष्य? 

☆ पानिपत -हृदय द्रावक शोकांतिका – भाग – 2 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

(श्री. विश्वास पाटील यांच्या “ पानिपत “ या गाजलेल्या कादंबरीचा परामर्श ) 

(पण प्रचंड नामुष्की, मानहानीही पत्करावी लागली ) इथून पुढे —–

खरेतर दत्ताजी शिंदेच्या पराभवापासूनच पानिपतच्या युद्धाची ठिणगी पडली आणि हा हा म्हणत तिने उग्र वणव्याचे रौद्र अक्राळविक्राळ रूप धारण करत लाखो बळी घेतले. कोणतेही युद्ध जिंकायला प्राणांची बाजी लावणारे शूरवीर लढवय्ये हवेतच, पण युद्धनीतीही तितकीच महत्वाची असतेच.  युद्धभूमीची आणि आसपासच्या भौगोलिक परिस्थिती आणि हवामानाची सुद्धा बिनचूक माहिती हवी असते. शत्रूच्या शस्त्रास्त्राच्या तोडीची हत्यारे हवीत, ती चालवणारे प्रशिक्षित सैनिकही हवेत. आणीबाणीच्या प्रसंगी अचूक निर्णय क्षमता हवी. दत्ताजी शिंदेंच्या बाबतीत हेच झाले. गिलच्यांच्या फौजांकडे आधुनिक बंदुका होत्या. याउलट मराठी फौजेकडे पारंपारिक हत्यारे होती. काटेरी दाट जंगलात गिलचे लपून बसायचे आणि गोळ्यांचा मारा करायचे. बोचरी थंडी आणि परका मुलुख, त्यात महिनाभर तळ देऊन बसलेल्या सैनिकांना ऐनवेळी कुठून रसदच मिळाली नाही. तरीही उपाशी पोटी ‘करू वा मरू’ म्हणत चिवटपणे झुंज देत दत्ताजीने प्राणांची बाजी लावली. दत्ताजीचे मुंडके छाटून तलवारीवर लटकवण्यात आले. लपून जीव वाचलेले मूठभर सैनिक सैरावैरा धावले.

पानिपतचा खरा सूत्रधार खलनायक नजीबखान साधा वजीर, पण त्याने मराठ्यांचा कायमचा बिमोड करून, दिल्लीचे तख्त बादशहाच्या अमलाखाली आणून, स्वतःस एखादी बक्षिसी मिळवायच्या स्वार्थी महत्त्वाकांक्षी इच्छेला कोणी भीक घालणार नाही म्हणून त्याला ‘जिहादचा’ रंग देऊन स्वतःची इच्छा तृप्त केली. त्यासाठी त्याने अफगाणहून अब्दालीला बोलवले. खरे तर मराठ्यांच्या मेहेरबानीवर जगलेला तो एक अस्तनीतला निखारा आणि विषारी सापाचे पिलू होते. बऱ्याच सरदारांना त्याची कुरापतखोर वृत्ती माहीत झाली आणि या जहरी सापाला वेळीच ठेचायचे ठरवले.  पण मल्हारराव होळकरांसारख्या जुन्या जाणत्या नेत्याने सतत अभय देऊन हा साप मोठा केला आणि एके दिवशी उपकारकर्त्यालाच तो डसला. नुसता डसलाच नाही, तर त्याने विषारी गरळ ओकून मराठेशाही गिळंकृत केली आणि मराठी सत्तेचं पानिपत केलं.

दिल्ली काबीज केल्यानंतर खरे तर अब्दालीला भिडायचे असे पक्के झाल्यावर मोर्चेबांधणीस सुरुवात केली. त्यासाठी रसद आणि वेगवेगळ्या सरदारांना पाठिंब्यासाठी, हातमिळवणीसाठी विनंती केली.  पण नजीबने शुजाउद्दौलासारख्या नेत्याविरुद्ध अब्दालीचे कान भरून जिहादची शपथ घालून, अब्दालीला मिळण्यास भाग पाडले. जाटासारख्या नेत्यांना कधी गोड बोलून तर कधी धमकी देऊन, तर कुणाला पदांची आमिषे दाखवून मराठयांना मदत वा कुमक मिळू दिली नाही. रसदीचे ओघ मधेच अडवले, लुटले गेले. महत्वाचे पत्रव्यवहार मध्येच अडवून स्वारांना मारले गेले. अशा तऱ्हेने मराठ्यांचे नाक तोंड दाबून त्यांना गुदमरायला लावले. त्यातच लढणारे कमी आणि हौसे नवसे गवसे, बायका मुले ,यात्रेकरू, खायला कहार आणि धरणीला भार अश्या लुंग्यासुंग्यांची फौज भाऊसाहेबांच्या पदरी जास्त होती.( जे शिवरायांनी त्यांच्या कारकिर्दीत कधीच केले नाही) त्यामुळं तातडीचे निर्णय भाऊसाहेबाना घेणे अवघड झाले. बऱ्याचदा महत्वाचे निर्णय घेतल्यावर जेरे-जोशीसारख्या पंचांगकर्त्यांनी मुहूर्त, वेळ वगैरेची प्रतिकुलता दाखवून भिववले. युद्धात महत्त्वाचे निर्णय मुहूर्त बघून घेत नसतात, तर सभोवतालची परिस्थिती पाहून घ्यायचे असतात. संधी साधून डाव टाकायचा असतो. त्यातच जेष्ठ श्रेष्ठत्वाचे अंतर्गत वाद,  यामुळं भाऊसाहेबाना विवश केले. कोणतेच निर्णय त्यांना ठोसपणे घेता येईनात. एकीकडे उपासमार आणि एकीकडे सगळीकडूनच जखडलेपणा,अन्नधान्य- चारा टंचाई, हे कमी की काय म्हणून निसर्गाची प्रतिकुलता ! यमुनेला दुथडी भरून आलेला पूर.  पानिपतच्या पराभवाचे हे जणू संकेत होते. कुंजपुऱ्याचा पाडाव आणि त्यातून मिळालेले थोडेसे धन ही एक बाब दिलासा देणारी आणि मराठ्यांचा उत्साह वाढवणारी होती. पण एवढ्या प्रचंड समुदायास आणि जनावरांस जगवणे मुश्किल होते. जनावरे मरू लागली माणसे उपासमारीने विव्हळू लागली.  त्यांचे हाल पाहून भाऊसाहेबांचे मन तडफडू लागले. जवळचे सोने नाणे सर्व विकून झाले. सड्या फौजा कुणीकडून कशाही माळरानाने, आडवाटेने तुकड्या तुकड्याने बाहेर पडून शत्रूवर तुटून पडल्या असत्या, पण बायका मुलांसह असल्यामुळे कुठलाच ठोस निर्णय घेता येईना आणि मार्ग निघेना. म्हणून शेवटी करू वा मरू म्हणून गिलच्याला तोंड देतच दिल्ली गाठू असा निर्णय झाला. त्यासाठी ‘गोलाई’ची व्यूहरचना करण्यात आली. कारण पानिपतच्या त्या उघड्या विस्तीर्ण मैदानावर गनिमी कावा उपयोगी नव्हता. पण इब्राहिम गारदीच्या व्यूहरचनेला विंचूरकर आणि मल्हारराव होळकरांसारख्या जेष्ठ श्रेष्ठ नेत्यांचा विरोध तर होताच, पण कालच्या मिसरूड फुटलेल्यांचे आम्ही ऐकायचे? ही ’अहं श्रेष्ठवादी ‘ असूया देखील ! एकीकडे नजीबसारख्या विषारी पिल्लाला मानसपुत्र मानून त्याला सहानुभूती देणारे होळकर, इब्राहिम गारदीच्या प्रामाणिकपणावर मात्र साशंक होते. आतून धुमसत होते. खरे तर कुंजपुरा इब्राहिम गारदीच्या व्यूहरचनेने आणि तिथल्या भूप्रदेशाच्या त्याच्या अचूक माहितीमुळेच जिंकला होता. म्हणूनच गोलाईच्या व्यूहाने गिलच्याला कापत कापत पुढे सहज जाऊ अशी अटकळ आणि खात्रीही होती.  पण युद्धाला जसे तोंड फुटले आणि मराठ्यांच्या बाजूने विजयश्रीचा कौल पडू लागला, तेव्हा होळकरांच्याच मेहेरबानीवर पदरी असलेल्या कॅडम्याड पथकाने हुल्लडबाजी केली,  आणि ‘ मराठे हरले,’ असा कांगावा सुरू केला.

क्रमशः……

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पानिपत -हृदय द्रावक शोकांतिका – भाग – 1 ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

?इंद्रधनुष्य? 

☆ पानिपत -हृदय द्रावक शोकांतिका – भाग – 1 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

(श्री. विश्वास पाटील यांच्या “ पानिपत “ या गाजलेल्या कादंबरीचा परामर्श ) 

खूप वर्षांपासूनची  पानिपत वाचण्याची इच्छा पूर्ण झाली.  पण  वाचून झाल्यावर मनात एक हुरहूर,  एक विव्हळ वेदना अंतर्यामी भरून राहिली. डोळे नकळत पाणावले. पानिपतचा रणसंग्राम,मनुष्यहानी आणि निसटता पराभव पाहून मन हळहळते,व्याकूळ होते आपण स्वतःस माफ करू शकत नाही.

‘मराठ्यांचे पानिपत झालं, विश्वास पानिपत मध्ये गेला”– किती सहजपणे म्हणतो आपण. पण दिल्लीचे तख्त सांभाळायला आणि मराठ्यांचा बिमोड करायला निघालेल्या अब्दाली-नजीबशी कडवी झुंज देऊन उपाशी अनुशी माती, झाडपाला खाऊन, निसर्गाच्या प्रतिकूलतेला टक्कर देत उघड्या मैदानातल्या बोचऱ्या थंडीत कुडकुडत, कुठल्याही क्षणी गिलच्यांचा -वैऱ्याचा हल्ला चढेल ही धाकधूक मनात ठेवून पानिपतच्या समरात जिंकू किंवा मरू म्हणत तळहातावर शीर घेऊन प्राणपणे लढणे आणि अस्मिता, स्वाभिमान जिवंत ठेवून भर उन्हात, आगीच्या लोळात प्राणपणे चिवट झुंज देणे म्हणजे खायचं  किंवा तोंडाच्या वाफा दवडण्याइतकं सोपं नाही! केवळ सेनापतीवरील आणि तेही अगदी वसंतातल्या कोवळ्या पानासारखे वय असलेल्या हळव्या पण कणखर मनाच्या भाऊंच्या, ज्यांचे वय फक्त सत्तावीस-अठ्ठावीस (आणि विश्वासरावांचे तर अवघे सतरा-अठराचे ज्या वयात सामान्यजन डोळे मन स्वप्नात रंगतात आणि  पहातात आणि त्याच धुंदीत जगतात!) विश्वासाखातर,प्रेमाखातर. मातीच्या,धर्माच्या,मायमराठीच्या अब्रूच्या रक्षणासाठी संकटाला समर्थपणे तोंड द्यायला शरीर आणि मनही तितक्याच चिवट,कडव्या वेगळ्या मातीचे बनलेले असावे लागते.

सैन्य पोटावर चालते हे खरे असले तरीपण आपल्याला एक दिवस उपवास घडला तर जीवाची घालमेल होते, तिथं महिनोंमहिने कधी अर्धपोटी तर कधी उपाशी अन्न पाण्याविना परक्या मुलुखात कोणत्या जाणिवेने तग धरला असेल ? माती खाऊन,पाणी भरून पोटातली आग शमवत कोणत्या ध्येयाने आणि धैर्याने तग धरून राहिले असतील ? उजाड झालेल्या कोणत्या झाडांचा पाला लाखो सैनिकांची भूक भागवत असेल ? आपल्या मातीपासून ,आपल्या मुलखापासून कोसो दूर रहात, तिकडील न काही हालहवाल न काही खबरबात जाणून घेता ,’ भविष्यात आपलं काय होईल?’ याची तमा न बाळगता शत्रूशी दोन हात करायला थांबलेल्या त्या शूर,बाजींद, कडव्या लढवैय्यांच्या कौतुकास शब्द तोकडे आहेत.इथं फक्त त्यांच्या जिगरीला, शौर्याला,संयमाला,अफाट -अमर्याद इच्छाशक्तीला सलाम करणे इतकेच आपल्या हाती आहे;कारण तोफांचे धमधमे बांधण्यापासून तोफगोळे उडवतानाचा जो त्रास आहे तो मेणाच्या किंवा लेच्यापेच्या माणसाला सहन होणे शक्यच नाही.त्यासाठी लोहचणे पचवलेले पोलादी कणखर तन मन हवे.पोटाची भूक माणसाला काहीही करायला लावते-प्रसंगी चोरी,लबाडी, खूनही.मधल्या आधल्या रस्त्याने सैन्य आपल्या घरी परतू शकले असते,बंड करून आम्ही इथून पुढं येणार नाही आपल्या मुलुखात परत जातो म्हणू शकले असते.पण रणांगणातून पळ काढणे किंवा पाठ लावून पळणे हे मर्दाचे,लढवैय्याचे लक्षण नव्हे,आणि भूषण तर नाहीच.अश्याना पळपुटे म्हणून मराठी मातीने हिणवले असते; उलट रणांगणावर मृत्यू येणे हे वीरांचे भूषण आहे म्हणून लाखो जीव आपले प्राण कुर्बान करायला तयार झाले.

‘तुका म्हणे तेथे जातीचे हवे, येऱ्या गबाळ्याचे ते काम नव्हे’ हीच उक्ती इथं चपखल वाटते. वर्षभर तळ ठोकून उपास घडत महिनोंमहिने युद्धाची कोंडी फुटण्याची वाट पहाणारे लाखो लोक दोनच दिवसात मातीत गाडले गेले.महाभयानक न भूतो न भविष्यती नरसंहार ,पशुसंहार , सैनिकांचे आणि पशूंचे देखील हाल पानिपतच्या मातीने प्रथमच पाहिले असावे आणि तिचेही काळीज फाटले असेल, तिच्याही मनाचा थरकाप उडाला असेल. ‘ युद्ध नको मज बुद्ध हवा ‘ असे तीही म्हणली असेल. भौगोलिक परिस्थिती, हवामान, स्थानिक सरदार यापैकी काहीच अनुकूल नसताना फक्त प्रचंड जिद्दीच्या आणि विजयाच्या आशेने धगधगत राहिलेल्या त्या रणकुंडास दुर्दैवाच्या फटकाऱ्याने क्षणार्धात विझवलेच, पण प्रचंड नामुष्की आणि मानहानीही पत्करावी लागली.

क्रमशः……

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रणरागिणी संजुक्ता पराशर ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ रणरागिणी संजुक्ता पराशर ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

हातात एके 47 घेऊन घनदाट जंगलात शिरल्यावर तब्बल 16 अतिरेक्यांना यम सदनाला पाठवून आणखी 64 अतिरेक्यांना अटक करणाऱ्या संजूक्ता पराशरची कहाणी स्वतःला अबला समजणाऱ्या देशातील प्रत्येक स्त्रीला माहिती व्हायला पाहिजे। 

दिसायला गोरीपान आणि सुंदर अशी संजूक्ता जर कधी आपल्या समोरून गेली तर तिच्या अफाट कर्तृत्वाची आपण कल्पनाही करू शकणार नाही। एक सामान्य स्त्री लाखो सामान्य पुरुषांनाही जमणार नाही असं काम करते तेव्हा तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे सोशल मीडियावर गायले जायला हवेत, पण आम्हाला राजकारण आणि जात, धर्मापलीकडेहि आणखी दुनिया आहे हेच मान्य नसतं। त्यामुळे संजूक्ता पराशरच्या फेसबुक पेजला लाखभरहि लाईक मिळत नाहीत आणि राजकारणी, सिनेनट मात्र करोडोंनी लाईक मिळवतात। 

आसाम सारख्या मागासलेल्या राज्यात शाळेत शिकून नंतर दिल्लीच्या जेएनयु मधून डिग्री घेणारी संजूक्ता 2006 मध्ये आयपीएस देशात 85 क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली। युएस फॉरेन पॉलिसी विषयात तीने पीएचडी केल्यामुळे ती डॉक्टर संजूक्ता पराशर म्हणून ओळखली जाते। तिचं लग्न झालं तेही आयएएस अधिकारी पुरू गुप्तांशी। त्यांना 6 वर्षाचा मुलगा आहे। संजूक्ताची आई त्याला सांभाळते। 

संजूक्ताची पोस्टिंग 2014 मध्ये आसाम मधील सोनीतपुर जिल्ह्यात सुप्रिंटेंडंट ऑफ  पोलीस म्हणून झाली आणि अग्निदिव्य म्हणजे काय ह्याची प्रचिती तिला रोजच घ्यावी लागली। बोडो अतिरेक्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता। शेकडो लोकांचे बळी गेले होते। आसामच्या घनदाट जंगलात शिरून त्यांच्याशी मुकाबला करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण। हातात एके 47 घेऊन संजूक्ता सीआरपीएफ च्या जवानांना घेऊन जेव्हा घनदाट जंगलात शिरायची तेव्हा जवानानाही दहा हत्तीचं बळ मिळायचं। अनेक मोहिमा यशस्वी झाल्यामुळे अतिरिकेही संजूक्ताच्या नावाने कापू लागले होते। तिला पत्राद्वारे आणि फोनद्वारे धमक्या येऊ लागल्या होत्या। परंतु शिर तळ हातावर घेऊन फिरणाऱ्या संजूक्तावर कसलाच परिणाम झाला नाही। तब्बल 16 अतिरेकी मारले गेले आणि 64 अटक झाले, तेही तिच्या अवघ्या 18 महिन्यांच्या कारकीर्दीमध्ये। 

आज संजूक्ता पराशर दिल्ली मध्ये कार्यरत आहे। देशातील दहशतवाद पूर्णपणे निपटून काढणं हेच तिचं ध्येय आहे। अशा ह्या खऱ्या खुऱ्या रणरागिणीच्या अफाट कर्तुत्वाला आपण सर्वानीच मानाचा मुजरा करायला हवा। सलाम करायला हवा!

#I_Salute_Sanjukta_Parashar

(सुवर्णमेघ या फेसबुकपेज वरुन साभार)

 

संग्राहक : सुनीत मुळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सहस्रचंद्रदर्शन शांती ☆ संग्राहक – श्री अशोक काका कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ सहस्रचंद्रदर्शन शांती ☆ संग्राहक – श्री अशोक काका कुलकर्णी ☆

वयाच्या ५० व्या वर्षापासून प्राचीन काळी वेगवेगळ्या शांती सांगितल्या आहेत.

त्या म्हणजे,—–

५० व्या वर्षी वैष्णव शांती, 

५५ व्या वर्षी वारुणी शांती,

६० व्या वर्षी उग्ररथ शांती, 

६५ व्या वर्षी मृत्युंजय महारथी शांती, 

७० व्या वर्षी भौमरथी शांती,

७५ व्या वर्षी ऐन्द्री शांती, 

८० व्या वर्षी सहस्त्र चंद्र दर्शन शांती,

85 व्या वर्षी रौद्री शांती, 

९० व्या वर्षी कालस्वरूप शांती,

९५ व्या वर्षी त्र्यंबक मृत्युंजय शांती 

आणि १०० व्या वर्षी त्र्यंबक महामृत्युंजय शांती. 

सहस्त्र चंद्र दर्शन म्हणजे त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात १००० वेळा पूर्ण चंद्र पहिला आहे. किंवा त्याच्या आयुष्यात १००० वेळा पौर्णिमा येऊन गेल्या. इतके सार्थ आयुष्य खूप कमी लोक जगतात म्हणूनच हे विशेष आहे. आपली मराठी कालगणना चान्द्रवर्षीय आहे म्हणून १००० चंद्र पाहण्याचा सोहळा केला जातो. हे मोजायची पण पद्धत आहे.

ती अशी –

८० वर्षात १२ x ८० म्हणजे ९६०, त्यात २७ अधिक महिने येतात म्हणजे ९६० + २७ = ९८७. म्हणजे ८० वर्षात १००० चंद्र पहिले जात नाही म्हणून ८१ वर्ष पूर्ण झाल्यावर येणाऱ्या १००० व्या पौर्णिमेला हा दिवस साजरा करतात. ह्या मध्ये काही ज्योतिष्यांच्या मते ३२ अधिक मास येतात म्हणून ८१ व्या वर्षातील ८ व्या महिन्यात सहस्त्र चंद्र पूर्ण होतात. पुन्हा ह्यामध्ये खग्रास चंद्र ग्रहण पण जमेस धरावे लागते. यावर शौनक ऋषिच्या विवेचनाच्या आधारे “वयोवस्थाभीधशांतीसमुच्चय:” ह्या पुस्तकात धर्मशास्त्र कोविद श्री नारायण शास्त्री जोशी, यांनी दिले आहे. त्यांच्या मते दरवर्षी सुमारे १२ अशी ७९ वर्षात ९४८ चंद्र दर्शने आणि खग्रास चंद्रग्रहणा नंतर नव्याने होणारे चंद्रदर्शन व असे २४ चंद्रदर्शन एव्हडे मिळून ९४८ + २८ + २४ = १००० चंद्रदर्शन होतात. ८० व्या वर्षानंतर ८ व्या महिन्यात केलेला विधी हा सौर कालगणनेनुसार असतो. म्हणजे वैखानस गृह्य सूत्रानुसार रविवर्षेण असते. शांती साठी देवता आणि हवन सामग्री पण ठरलेली आहे. सहस्त्र चंद्र दर्शनाला देवता आहे चंद्र आणि हवन सामग्री आहे आज्य. ह्या शान्तींच्या वेळी देवतेला हवन अर्पून त्या व्यक्तीच्या आयुरारोग्यासाठी प्रार्थना केली जाते. त्यायोगे त्या व्यक्तीचे पुढील आयुष्य सुखात जाते.

सामान्यत: एकसष्ठी, पंचाहत्तरी आणि ८१ वर्षानंतर अशा शान्त्या केल्या जातात. आता सहस्त्रचंद्र दर्शनच का सूर्य दर्शन का नाही? तर “चंद्रमा मनसो जात:”– म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे. मला वाटते साठीनंतरच वयस्क लोकांना आपण उपयोगाचे नाही, आपली सद्दी संपली, आपल्याला अडगळीत टाकतील, कोणी विचारणार नाही अशा अनेक शंका घेरून टाकतात. ऐंशी वर्षे म्हणजे फारच जास्त होतात, त्यांचीच मुले साठीला येतात. कधी – कधी जोडीदार पण साथ सोडून जातो. अशा वेळी घरातल्याच लोकांनी त्यांचे मन जाणून घेऊन ते अजून आम्हाला हवे आहेत असे एक सुंदरसा घरगुती का होईना कार्यक्रम करून त्यांना तसे वाटू दिले, त्यांना कपडे किंवा चष्मा, कवळी, चांगली पुस्तके, एखादा छोटासा टीव्ही अशी भेट देऊन, सहस्त्र दिव्यांनी ओवाळले तर त्यांना किती बरे वाटते. आपण अजून हवे आहोत ही भावनाच किती चांगली आहे. म्हणून सहस्त्रचंद्र दर्शन विधी असावा. आता होम करायचा कारण उत्सव मूर्ती ऐंशी वर्षे तंदुरुस्त का राहिली म्हणून कोणी नजर पण लावेल, सगळ्यांच्या नजरा चांगल्या असतात असे नाही. म्हणून होम करून सगळी अरिष्टे दूर करायची.

संग्राहक – श्री अशोककाका कुलकर्णी   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ Not At Home…. ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

 ☆ Not At Home…. ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆ 

खरंतर Not at Home हा परफेक्ट शब्द.

पण लहानपणी मे महिन्यात सगळी भावंडं एकत्र जमलो कि पत्त्यात हा डाव रंगायचा. पण तेव्हा विंग्रजी फार यायचं नाही मग जो तो ज्याला जसं ऐकू आला उच्चार तसं म्हणायचा. नाॅटॅट होम, नाॅटॅ-ठोम काय वाट्टेल ते !! तसंही आपण आपल्याच घरात तरी कुठे असायचो? ते ही Not At Home च. कधीही मित्र मैत्रिणीच्या घरी जाऊन हुंदडायला मिळायचं. येऊ का? वगैरे विचारण्याच्या formalities नव्हत्या. 

“Challenge” ला पण चायलेन्ज, चाॅलेन्ज काय वाटेल ते म्हणायचो.

“लॅडीज” नावाचा खेळ फक्त लेडीजनीच खेळायचा असं आपलं उगीच वाटायचं मला. त्यात एक वख्खई बोलली जायची. लाडूची म्हणजे ३२ कळ्या किंवा अर्धा लाडू १६ कळ्या वगैरे. झब्बू पण असाच एक डाव. झब्बू देताना एक पानी आणि गड्डेरी. मजाच सगळी.

हे सगळे शब्द कुठून आले ?देव जाणे?

काचापाणी, पट, सागरगोटे हे अजून काही प्रकार बैठ्या खेळातले. काचापाणीसाठी भांड्यांच्या काचा जमवायला अगदी कचराकुंडी पण गाठलीय.

सगळेच खेळ आपल्याला जिवंत ठेवायचे. वेगळा असा “स्पोर्टस् डे” नसायचा. रोजच खेळ. शाळा दुपारची असली की दप्तर फेकून ?‍♀️?‍♂️ धावत सुटायचं! कारण उशीरा पोहचलं खेळायला तर “कटाप” करायचे (actually cut off) खेळातून.

तळहातावर थोडसं चाटून “टॅम्प्लीज” (टाईम प्लीज खरा शब्द) करणं, लपंडावात “धप्पा” म्हणणे, “रडीचा डाव खडी”असं चिडवणे, मग समोरच्यानी आपल्याला “जो म्हणतो तोच” असं बोट आपल्यापुढे नाचवत म्हणणे या सगळ्याची मजा काही औरच.

आजच्या मुलांना काय कळणार ती??

लगोरीsss असं सात ठिक-या एकमेकांवर ठेवून त्यावर पाय फिरवणे, तो नाही फिरवला तर लगोरी लागली असं धरत नसत. तसेच “डब्बा ऐसपैस”. पत्र्याचा एक फालतू डबा पण अनन्यसाधारण महत्व मिळालेला.

डालडाचा वनस्पती तुपाचा हिरवं नारळाचं झाड असणारा डबा पण फार महत्त्वाचा. तो कमरेला बांधून विहीरीत धपाधप उड्या मारणे हा रविवार सकाळचा कार्यक्रम. 

“लपंडाव” खेळताना मुलं मुद्दाम एकमेकांचे शर्ट, टी शर्ट बदलून गंडवायचे आणि शर्टाची बाही दिसेल असे लपायचे. मग चुकीचं नाव घेतलं कि धप्पा मिळायचा “राज्य असणा-याला … ?

राज्य असणा-यालाच पकडायला लावायचं हा काय न्याय!! पण अशा नियमांवर अपील नसायचंच.

“जोडसाखळी, रस्सीखेच” म्हणजे नुसती ओढाओढी.

“दगड का माती” म्हटले की जे म्हणेल त्यावर उभं रहायचं. दगडावर उभं रहायचं असेल तर तो सापडेपर्यंत फक्त धावायचं.

“विषामृत”मधे विष म्हणुन स्पर्श करायचा मग विष मिळाले कि स्तब्ध उभं रहायचं. मग कुणी तरी येऊन अमृत द्यायचं…काय एकेक मज्जा !!

पावसाळ्यात घरी बसू असं तर मुळीच नाही. पावसाळ्यात “रूतवणी” हा खेळ. 

एक लोखंडी सळई घेऊन चिखलात रुतवत जायचे. त्याचे पाॅईन्ट्स मोडायचा. सळई पडली की दुसरा खेळायचा. पहिला औट. 

“आबाधूबी” (अप्पा-रप्पी) लई भारी गेम. पाठ शेकुन काढणारा. यात शक्यतो प्लास्टीकच्या बाॅल घेतला जायचा. रबरी ट्यूब कच-यातून, भंगारातून शोधून तिचे तुकडे करून त्याचाही बाॅल केला जायचा.

साबणाचे फुगे करायला कागदाची बारीक सुरनळी करणे, करवंटीचे फोन, काडेपेटीत वाळू भरून टिचकीनी ती उगडून अंगावर उडवणे… what a creativity !!! काही नाही तर बाॅल घेऊन “टप्पा- टप्पा” हा खेळ तरी व्हायचाच. ते मोजले जायचे ते ही सार्वजनिकरित्या, मोठ्याने बोंबलत.

क्रिकेट खेळताना फळकूट पण चालायचं. एखादी बोळ पण चालायची. टीम पाडायच्या. आपणच अनेक नियम बनवायचे. या कंपाउंड बाहेर गेला बाॅल की फोर, तिकडे सिक्स, एक टप्पा औट, रन आऊट चे नियम वेगळे. कुणाच्या खिडकीची काच फोडली तर सार्वजनिक धूम ठोकणे हा अलिखित नियम. मुली, मुलगे एकत्र खेळायचो तेव्हा. सगळेच मुलींचे “दादा”. क्रिकेट; कबड्डी साठी टीम मेंबर कमी असले की  मुलींना डिमांड. 

“टीपी टीपी टीप टॉप”, व्हॉट कलर डू यू वाँट”? काहीतरी भारी रंग सांगायचा. मग नसेल तर औट करायचे. यातही धावायचंच. “ढप, गोट्या” रिंगण आखून जो सांगितला जाई तो ढप किंवा गोटी रिंगणाबाहेर नेम धरून उडवायची–ऑलिंपिक लेव्हलची नेमबाजी.!! मग यात चंदेरी, पाणेरी, काळी, घारी अशी गोट्यांची वर्णनं. 

एक जबराट खेळ होता. टायर्स फिरवणे. जुने टायर्स घेऊन ते काठीने बडवत पळवत नेऊन त्याची शर्यत लावायची. खूप धमाल यायची टायर्स पळवायला! 

”ठिक्कर पाणी” हा फक्त मुलींचा खेळ समजला जायचा. एखादा मुलगा जरी यात आला तर “मुलीत मुलगा लांबोडा, भाजून खातो कोंबडा” ? म्हणुन चिडवायचे. फरशीची खपटी घेऊन त्याला थुंकी लावुन ती रकान्यात फेकायची आणि एका बाजुने लंगडी खेळत जाऊन ती पायानेच सरकावुन चौकटीच्या बाहेर जाईल अशा रितीने फेकायची. रेषेवर पडली तर औट. 

कांदाफोडी, डोंगराला आग लागली पळा पळा पळा, खांब खांब खांबोळी, शिवाजी म्हणतो, दोरीवरच्या उड्या, मामाचं पत्रं हरवलं, शिरा-पूरी भातुकली हे तर सगळे गर्ल्स स्पेशल खेळ. मुलींची monopoly. 

नाव, गाव, फळ, फूल, नाटक/सिनेमा, रंग, प्राणी, पक्षी, वस्तू काय वाटेल ते. वह्याच्या वह्या भरायच्या. 

भातुकली, दो-या बांधून घर घर खेळणं, दाण्याचे लाडू आणि चुरमु-याचा भात एवढाच कायम स्वैपाक असायचा भातुकलीत.

व्यापार, सापशिडी, सागरगोटे, काचापाणी हे दुपारचे खेळ. 

वारा पडलेला असेल तर बॅडमिंटन. 

पण तो श्रीमंती खेळ. जिच्या हाती रॅकेट ती/तो फार भाव खायचे. मग रॅकेट नसणारे एकत्र यायचे आणि बॅडमिंटन पेक्षा बाकी खेळ कसे भारी यावर वादावादी.

कॅरम पण तसाच श्रीमंती खेळ. 

ते नको असायचे. त्यात धांगडधिंगा करता यायचा नाही ना !! 

“पतंग बदवणे” यात जो माहिर, तो सगळ्यात भारी. ?

मुली आपल्या ही काट, ती काट सांगायच्या आणि फिरकी धरायच्या. मग ती काटताना ढील देणे वगैरे प्रकार करावे लागायचे. काटता आली नाही पतंग की मग मांजा नीट नाही, कन्नी नीट बांधली नाही या तक्रारी. 

दिवेलागणी झाली की परवचा म्हणून रात्री जेवणं झाली की अंताक्षरी आणि  भुताच्या गोष्टी.

निव्वळ Nostalgic !!!

समृद्ध, श्रीमंत बालपण होतं आपलं.

करता येईल का तसं आजच्या लहान मुलांचं???

काहीतरी जादू घडावी आणि होऊन जावं आपल्यागत.

नाही का ???

संग्राहक : श्री अनंत केळकर   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गेले ते दिवस ☆ संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

? इंद्रधनुष्य ? 

☆ गेले ते दिवस ☆ संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने ☆ 

आज आठवते ना आपल्या लहानपणीची दिवाळी. २५ पर्यंत पाढे पाठांतर, २१ दिवसांचे दहा ओळींचे शुद्धलेखन, कविता पाठांतर, निबंध. दिवाळी सुट्टी अभ्यासासाठी दोनशे पानी वही व शुद्धलेखनासाठी शंभर पानी दुरेघी वही.

गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. इतका दिवाळीतला गृहपाठ करूनसुद्धा आपण दिवाळीत धम्माल करायचो. किल्ले बनवायचो, रांगोळीसाठी अगरबत्तीने ठिपके पाड़ून द्यायचो. मनसोक्त फटाके फोडायचो. सापाची गोळी आठवते ना… टेलिफोनचा फटाका आठवतो का… चिड़ी कुठून कुठे उड़ायची माहित आहे ना… राॅकेट साठी कुठून पण बाटली शोधून आणायचो. रस्त्यावर लावलेला बाण आड़वा होऊन कोणाकोणाच्या ढेंगातून गेला होता आठवतंय ना. कधी कधी बाण कोणाच्या खिडकीतून घरात घुसायचा, मग त्या काकी भडकण्याच्या आधी सगळे तिथून धूम ठोकायचे. 

सगळे फटाके संपल्यावर अर्धवट पड़लेल्या फटाक्यांची दारू पेपरमध्ये जमा करायचो आणि पेपराला सगळ्याबाजूने आग लावल्यानंतर उड़ालेला आगीचा ज्वाळ पहाताना मिळणारा आनंद.

खरंच, दिवाळीच्या दिवसात आम्ही श्रीमंत व्हायचो कारण बाबा, मामा, काका, खिशात पैसे टाकायचे आणि उरलेल्या दिवसात अर्ध्या तासाचे 50 पैसे किंवा तासाचा 1 रुपया  देऊन सायकल भाड़्याने घेऊन फिरायला जायचो ना…

आता फक्त हातात मोबाईल घेऊन त्यातच गर्क असलेली  मुले दिसतात तेव्हा सांगावेसे वाटते, अरे दिवाळी म्हणजे व्हाॅटसअपवरचे मेसेज आणि व्हिड़ीओ नसतात रे….!

असो….  !! ?⭐?

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares