ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ७ नोव्हेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ७ नोव्हेंबर  –  संपादकीय  ?

*केशवसुत (७ ऑक्टोबर १८६६ ते ७ नोहेंबर १९०५ )

कृष्णाजी केशव दामले म्हणजे केशवसुत, हे आधुनिक मराठी कवितेचे जनक मानले जातात. त्या वेळेपर्यंत मराठीत काव्यरचना व्हावयाची ती संत, पंत ( पंडीत) किंवा शाहीरी रचनेच्या स्वरूपाची. ती परांपरा केशसुतांनी मोडली. वास्तव जीवनातील विषयांवर कविता केल्या. ‘नव्या मनुतील नव्या दमाचा मी शूर शिपाई आहे.’ अशी ‘तुतारी’ फुंकत त्यांनी घोषणा केली,

 ‘आम्ही कोण म्हणोनी काय पुससी, आम्ही असू लाडके देवाचे

 देवाने दिधले जग तये आम्हासी खेळावया.’

आणि मग त्यांच्या लेखणीने कागदावर शब्दांचा खेळ मांडला. सौंदर्यवादी दृष्टीकोन  त्यांनी मराठी कवितेत प्रथम आणला. कवीप्रतिभा स्वतंत्र असावी, ती अंत:स्फूर्त असावी.  तिच्यावर बाह्य प्रभाव पडू नये, असं ते म्हणत. वर्डस्वर्थ, कीटस, शेली इ. इंग्रजी कवींचा त्यांच्यावर प्रभाव होता. इंग्रजी कवितेतील १४ ओळींचे सॉनेट हा रचना प्रकार त्यांनी  मराठीत ‘सुनीत’ या नावाने लोकप्रिय केला.  त्यांच्या आज १३५ कविता उपलब्ध आहेत. त्यात अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, याला विरोधा करून मानवतावादाचा त्यांनी पुरस्कार केला. त्यांनी राष्ट्रीयत्व, गूढ अनुभवांचे प्रगटीकरण, निसर्ग इ. विषयांवर कविता केल्या ‘नवा शिपाई, तुतारी, सातरीचे बोल, झपूर्झा , हरपले श्रेय’ इ. त्यांच्या कविता गाजल्या.

मधू मंगेश कर्णिक यांच्या प्रयत्नाने त्यांच्या जन्मगावी मालगुंड इथे त्यांचे स्मारक उभारले गेले. ८ मे  १९९४ साली कविवर्य कुसुमाग्रज यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले.

*य.गो.जोशी ( १७ डिसेंबर १९०१ ते ७ नोहेंबर १९६४ )

य.गो.जोशी हे कथाकार, पटकथाकार आणि प्रकाशक होते. त्यांचा जन्म भिगवणइथला. ‘अन्नपूर्णा, वाहिनीच्या बांगड्या, शेवग्याच्या शेंगा माझा मुलगा’ इ. यशस्वी मराठी चित्रपटांच्या कथा त्यांच्याच.

घरातील आर्थिक ओढगस्तीच्या परिस्थितीमुळे त्यांना ५वीतच शिक्षण सोडून द्यावे लागले. त्यानंर, शाई तयार करणे, सुगंधी तेले तयार करणे, वृत्तपत्रे विकणे इ. अनेक कामे त्यांनी केली. पुढे त्यांच्या लेखनास सुरुवात झाली. १९३४ मध्ये त्यांनी प्रकाशन व्यवसाय सुरू  केला.  त्यांची पहिली कथा ‘एक रुपया दोन आणे’ ही यशवंत मासिकात प्रकाशित झाली. पुढे याच मासिकाच्या कथास्पर्धेत १९२९ साली त्यांच्या ‘शेवग्याच्या शेंगा’ या कथेला पहिले पारितोषिक मिळाले आणि नंतर याच कथेवर आधारलेला ‘शेवग्याच्या शेंगा’ हा चित्रपटही खूप गाजला.

त्यांच्या कथांमधून पांढरपेशीय मध्यम वर्गाचे जीवन चित्रण आढळून येते. उत्कटता, सहजसुंदर संवाद, साधी, प्रसन्न, अर्थपूर्ण भाषाशैली इ. त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगता येतील. पुण्याहून प्रसिद्ध होणार्‍या ‘प्रसाद’ मासिकाचे ते संपादक होते.   

‘अनंता पारत आला ( कादंबरी) , ‘दुधाची घागर ‘ ( आत्मवृत्त ), अनौपचारिक मुलाखती, आवडत्या गोष्टी, औदुंबर आणि पारिजात, गजरा मोतियाचा ,जाई-जुई, तरंग, तुळशीपत्र आणि इतर कथा, पुनर्भेट भाग- १ ते १० इ. त्यांचे अनेक कथासंग्रह आहेत. महाराष्ट्राचा परिचयखंड १ व २ ह्या पुस्तकांचे संपादन त्यांनी केले. सह संपादक  होते, चिं. ग. कर्वे आणि सं.आ. जोगळेकर. महाराष्ट्राच्या माहितीच्या दृष्टीने हा महत्वाचा संदर्भ ग्रंथ आहे.

 *सुनीता देशपांडे (3जुलै1925 ते ७नोहेंबर २००९)

सुनीताबाई जशा लेखिका होत्या, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्याही होत्या. त्यांचे लग्न पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर १२ जून १९४६ रोजी झाले. त्यांनी  पु. लंबरोबर अनेक नाटकात कामे केली. ‘वंदे मतरम्’ आणि ‘नवरा-बायको’ या चित्रपटातही त्यांनी कामे केली. ‘राजमाता जीजाबाई’ हा एकपात्री प्रयोग त्यांनी केला. पु.ल. देशपांडे यांनी लिहीलेल्या ‘सुंदर मी होणार ‘ या नाटकात त्या ‘दीदीराजे यांची भूमिका करत.

 त्यांनी लिहिलेले ‘आहे मनोहर तरी’ हे आत्मचरित्र खूप गाजले. ‘प्रिय जी.ए.’ हा पत्रसंग्रह त्यांनी संपादित केला. मण्यांची माळ ( ललित ), मनातलं अवकाश’, ‘सोयरे सकळ, (व्यक्तिचित्रण ), . ‘आठवणींच्या प्रदेशातील स्वैर भटकंती’ इ. त्यांची पुस्तके मौज प्रकाशननी प्रकाशित केलीत, ’समांतर जीवन’ हा अनुवादीत लेखांचा संग्रह सन प्रकाशनाने प्रकाशित केलाय.

 जी.एं.च्या स्मरणार्थ दिला जाणारा पहिला पुरस्कार त्यांच्या’ प्रिय जी.ए.या पुस्तकास २००८ साली मिळाला.

केशवसुत, य.गो.जोशी आणि सुनीताबाई देशपांडे या तिघाही महनीय व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्मृतीदिंनंनिमित्त विनम्र अभिवादन ?

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट  

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आनंदी दिवाळी.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ आनंदी दिवाळी.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आठवणींच्या पणत्यांनी,

उजळत जाई माझी दिवाळी!

बालपणीच्या रम्य जीवनाची,

सुबक उमटते मनी रांगोळी!

 

स्वस्त आणि मस्त खरेदी,

करीत होते मन आनंदी !

छोट्या छोट्या आठवणींची,

मन कुपीत भरली धुंदी !

 

तारुण्याच्या मस्ती मधली,

होती दिवाळी आनंदाची !

सुखी परिवारासह मनी दाटली,

दिवाळी होती ती सौख्याची!

 

फुलबाज्या अन् रंग-बिरंगी,

अनार झाडे उडली अंगणात!

दिवाळी आमच्या आयुष्यात,

करी आनंदाची बरसात !

 

आनंदाचा अंक तिसरा ,

अनुभवत आहे जीवनात!

सर्वांचा आनंद पहाता,

आनंदी दिवाळी राहो हृदयांत!

 

© सौ. उज्वला सहस्रबुद्धे

वारजे, पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दिवे…. ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? कवितेचा उत्सव ?

☆ दिवे…… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

ती ;

पहाटेच्या अंधारात

शेणानं सारवून अंगण.

शेणानंच साकारलेल्या

शेणगोळ्याच्या गवळणीतले

तिच्या हृदयातून उमटलेले

अंगणातले सौंदर्य,

आणि

संस्कृतीचे धागे जतन करत रहायची .

त्यातच खोलगटलेल्या

दिव्याच्या प्रकाशात

तिचं समाधान लकाकून जायचं.

अंगणभर पसरलेल्या,

अंधुकशाच प्रकाशात

तिची दिवाळी उजळत रहायची.

अंगणातल्या चुलीवर पाणी तापवायची.

लेकराबाळांना अंघोळ घालायची.

नव्या धडूत्यांच्या सुवासात

नातवंडं भरून पावायची.

तिच्या हातच्या कानवल्यातलं सारण

असं टचटचीत भरून सांडायचं अंगणभर.

फुलबाजांच्या सुरसुऱ्यात,

तिची दिवाळी

अशी प्रत्येक वर्षी खुलून यायची.

………….

आज

थरथरत्या हातांनी

आणि

खोल गेलेल्या डोळ्यांनी,

वाट पहात

ती ;

अंगण न उरलेल्या

रित्या घरात

उजळवत राहतेय

आता ;

तिच्यापुरतेच दिवे …!

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर..

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ श्वानपुराण….. ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ श्वानपुराण….. ☆ सौ  ज्योती विलास जोशी 

बालवाडीतल्या माझ्या भावाची फी द्यायची म्हणून शिशु वर्गाची पायरी चढले,आणि पायरीवर पायरीगत दिसणाऱ्या कुत्र्यावर माझा पाय पडला.लगेच ‘सॉरी’ म्हटलं मी त्याला पण कुत्रचं ते… ‘जशास तसे’ या उक्तीनुसार ते चावलं मला अन् मी केकाटले. माझी जीवघेणी किंकाळी ऐकून शिरोळे गुरुजी धोतराचा सोगा सावरत बाहेर आले.मला एक जोरदार शिवी हासडून म्हणाले,” तू त्याच्यावरचं कशाला पाय ठेवलीस? पायरी नव्हती तुला पाय ठेवायला?त्याच्या का नादी लागलीस? गप पडलं होतं ना ते?” गुरुजी कुत्र्याची वकिली करत होते. कुत्र्याची खोडी काढायला, त्याचा नाद करायला मी निर्बुद्ध का आहे? पण गुरुजींच्या नादी कोण लागणार?माझ्या हातातले फीचे पैसे काढून घेऊन,”चल हेड बाईकडं..असं म्हणून माझा रट्टा धरून शिरोळे गुरुजींनी मला हेड बाईच्या पुढ्यात उभं केलं. हेडबाईच्या सांगण्यावरून त्यांनी मला माझ्या घरी पोहोचवलं.

कुत्रा चावल्यानं सरकारी हॉस्पिटल मध्ये माझ्या पोटांनं चौदा दिवस इंजेक्शनचा त्रास सोसला. मला कुत्रा चावल्याची बातमी पेपरमध्ये कदाचित येईल या आशेवर मी होते आणि पेपर चाळत होते.”अगं कुत्रा तुला चावला तर ती बातमी होऊ शकत नाही. याउलट तू कुत्र्याला चावली असतीस तर ती बातमी झाली असती” असं बाबा म्हटल्याचं आठवतं मला.

कुत्रा हा बातमीचा विषय नसून जिव्हाळ्याचा विषय आहे.हे माझ्या लक्षात आलं पण जेव्हापासून तो मला चावला तेव्हापासून कुत्र म्हटलं की मी नखशिखांत हादरते.तो माझा वीक पॉइंट झाला आहे. लहानपणी ‘हाथी मेरे साथी’ दोन-चारदा पाहिला…..प्रत्येक वेळी नव्याने पाहतो असा पाहिला…. प्रत्येक वेळी तेवढ्याच संवेदनशीलतेने रडून थिएटर डोक्यावर ही घेतलं.माझं मुसूमुसू रडं पाहून इतरेजन खुसूखुसू हसायचे, पण….. कुत्र्याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तेरी मेहरबानियाॅ’ या सिनेमाच्या पोस्टरकडेसुद्धा ढुंकून बघायची माझी इच्छा नसायची. इतका तिटकारा मला त्या कुत्र्याच्या चेहऱ्याचा….

स्वामीनिष्ठ, इमानदार अशा विशेषणांनी सुशोभित आणि रतन टाटा, बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज अशा प्रतिथयश लोकांच्या कुत्र्यावरील प्रेमाने प्रसिद्ध आलेल्या या जातीचा मला कधीकधी हेवा वाटतो. रतन टाटांनी गोव्याहून आणलेल्या ‘गोवा’ नावाच्या आपल्या कुत्र्याला आपल्या ग्लोबल हेडक्वारटर मधील म्हणजेच बॉम्बे हाऊस मधील खास जागेत ठेवलं आहे. शिवाजी महाराजांचा ‘वाघ्या’ तर सगळ्या मराठी माणसात प्रसिद्ध !! बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘टाॅबी’ कुत्रा सर्वश्रुत आहे.अमेरिकेतील एका शहरात एका मालकाने आपल्या मृत्यूनंतरची छत्तीस कोटीची प्रॉपर्टी ‘लुलू’नावाच्या त्याच्या कुत्र्याच्या नावे केली आहे. अहोभाग्य त्या कुत्र्यांचं !!!

कुत्र्यांच्या नावावरून एक गंमत अशी की आमच्या वाड्याच्या मालकिणीनं स्वतःच्या कुत्र्याचं नाव ‘पुराणिक’ठेवलं होतं. मी त्यावेळेस सात आठ वर्षाची असेन….मला आठवतंय मी बाबांना कळकळीनं असं सांगितलं होतं की माझं लग्न ‘पुराणिक’ आडनावाच्या माणसाची होता कामा नये.बाबांना फार उशिरा माझ्या त्या कळकळीच्या विनंतीचं प्रयोजन समजलं होतं…..

प्रेम म्हणजे प्रेम असतं,ते कुणी कुणावर करावं हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असतो. कुत्र्याबद्दलची माझी भूमिका स्वच्छ आहे.माझं त्याच्याशी वैर नाही पण त्याच्याविषयी प्रेम बिलकुल नाही. एकदा एका

मैत्रिणीकडे गेले होते. कसं कोणास ठाऊक पण ‘कुत्र्यापासून सावध राहा’ या पाटीकडं माझं लक्ष गेलं नाही. तिच्या घराची पायरी चढणार तो पुनश्च पायरीवर एक पायरीच्याच रंगाचं कुत्र झोपलेलं….. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी अर्थातच मी घेतली.तिला खालूनच फोन केला. “अगं काही करत नाही ते.” प्रत्यक्ष भगवंताला देखील इतक्या गॅरंटीनं सांगता येणार नाही तसं तिनं सांगितलं. “ओलांडून ये त्याला”( तो कोणावरच भुंकत नाही कोणालाच काही करत नाही. तर मग पाळलासंच का बिचारे ?असा प्रश्न मनांत आल्यावाचून राहिला नाही.) घाबरलेल्या भेदरलेल्या अवस्थेत मी त्याला ओलांडायला गेले आणि माझा पाय त्याच्यावर पडलाच. सिंहाच्या पिंजऱ्यात लाईट गेलेल्या रिंगमास्टरची काय अवस्था होईल तशी माझी झाली. इतक्यात मैत्रीण खाली आली. “किती घाबरतेस ग ?काही केलं का त्यांनं तुला?भुंकला देखील नाही गं तो!!”असं म्हणून तिने त्याला कडेवर घेतलं.”कम हनी, कम टू मम्मा” असं मातृप्रेम दाखवणाऱ्या तीच श्वानप्रेम बघून मी धन्य झाले, पण अप्रूप अजिबात वाटलं नाही त्या गोष्टीचं….

सकाळी फिरायला जाताना टापू टापूत बसलेली भटकी कुत्री आता माझ्या ओळखीची झाली आहेत. अर्थात असा हा माझा दावा…. माहित नाही कधी घेतील ती माझा चावा…. मालकाचं गळ्यात पट्टा बांधलेलं कुत्र दिसलं की संघटितपणे जोरजोरात त्याच्यावर ती भुंकायला लागतात. अगदी थेट ते टापूतून बाहेर पडेपर्यंत… वाघासारखं दिसणारं ते मालकाच्या संरक्षणाखाली ऐटीत चालत असतं. मालकाला जणु ते सांगत असतं आत्ता मला तू संभाळ. नंतर तुझं रक्षण करायची जबाबदारी माझी….तसा त्या दोघांत एक अलिखित करार असावा बहुदा…चार आण्याचा जीव असलेली ती भटकी कुत्री पण त्यांचा आवाज एखाद्या डॉल्बी लाऊड स्पीकर सारखा! आसमंत हादरवून टाकणारा!गांधीजीं सारख्या अहिंसावादी माणसानं भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर घेतला होता त्या बापूजींना माझे प्रणाम…..

रस्त्यावरच्या सार्वजनिक वाचन केंद्रावरची दोन कुत्री कुठलंही वाहन आली की त्या वाहनाच्या वेगानं फर्लांग भर पळत जातात आणि माघारी येतात. हे मी रोज पाहते. एक दिवस न राहून मी त्याच्या प्रमुखांना म्हटलं,”अहो यांना बांधून ठेवा की! उगा आपलं वाहनांच्या मागे पळत सुटतात.”त्यावर ते म्हणाले.”असुद्या मॉर्निंग रनिंग करतात !एरवी लडदूछाप आहेत. खाऊन खाऊन माजलीत दोघं.पहुडलेलीच असतात दिवसभर…. कोणावर भुंकत नाहीत. एन्जॉय करतात लाइफ झालं”….

जेव्हा मी ह्यांची अर्धागीनी झाले तेव्हा मात्र कुत्रं पाळणं हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न बनला. याचं कारण हे ‘श्वानप्रेमी’ आणि कुत्रा हा माझा वीक पॉइंट… अर्थात लग्नानंतर इतके चांगले विषय आम्हा दोघात होते की कुत्र्यासारखा विषय संभाषणात कधी आलाच नाही. त्यामुळं मला कुत्र्या विषयी इतका आकस आहे हे त्यांना ठाऊक नव्हत. तीन महिन्याची ओली बाळंतीण मी जेव्हा परतले त्यावेळी ह्यांनी माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट म्हणून घरी आणलेलं छोटासं कुत्र्याचं पिल्लू मला दाखवलं. मला ह्यांनी दोन बाळाची आई करून टाकलं होतं. पण मला मंजूर असायला हवं होतं ना ते?

मी अजूनही काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. ह्या गोष्टीचे त्यांनाही आश्चर्य वाटत होतं. दोन्ही पिल्लं अखंड कुई कुई करत होती. त्यात भरीस भर म्हणजे मालकिणीचं कुत्रं! एरवी ‘आओ जाओ घर तुम्हारा’ म्हणणारं ते आज आपल्या टापूत आलेल्या या नवख्या कुत्र्यावर अखंड भुंकत होतं. मालकीण यथावकाश खाली आली. माझं बाळ तिच्या हातात होतं ती म्हणाली,”आजच आलाय.आमचं कुत्र भुकायचं थांबणार नाही तेव्हा तुमच्या कुत्र्याला आजची रात्र घरातच बांधा. उद्या काहीतरी व्यवस्था करू” ……

दोन्ही पिल्लानी रात्र जागवली हे सांगायला नकोच. त्या दोघांकडे पाहात मी यांना माझं सगळं श्वासनपुराण सांगितलं आणि पहाटे पहाटे मी यांच्याकडून मला हवं असलेलं ते एक वचन घेतलं. वचन देता देता, ‘जे लोक कुत्रं पाळतात त्यांच्या घरी लक्ष्मी येते’असंही माझं समुपदेशन झालं, पण मला ‘लक्ष्मी’ नको होती, ‘शांती’ हवी होती. स्त्रीहट्ट कुणाला सुटलाय ?….सकाळ सकाळी कुत्र्याच्या पिल्लाची गावाकडं रवानगी झाली.. आणि माझं पिल्लू शांत झोपू लागलं.

भविष्यात पुन्हा या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी ह्यांना निक्षून सांगितलं,” एका म्यानात दोन तलवारी कधीच बसत नाही.ज्या दिवशी कुत्रं या घरात येईल त्या दिवशी मी बाहेर पडलेली असेन…..” अजून तरी तशी वेळ आलेली नाही.

सध्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. या करोना काळात कधीतरी कुत्र्याचं रडणं अपशकुनाचा संकेत देतं, तेव्हा  हे म्हणतात…

“अगं ,आम्ही जसे कुत्र्याचे शौकीन तसेच कुत्र्यांनाही आमची सवय… आताशा आम्ही त्यांना फारसे दिसत नाही आहोत ना रस्त्यावर म्हणून ती कावरीबावरी होऊन रडतात…..”

ते काही असो. कुत्र्याला ‘श्वान’ किंवा ‘सारमेय’ म्हणावं असं मला कधी वाटत नाही .कुत्रं समोर आलं की या जन्मी तरी हाssssड ……

हेच शब्द ओठी……

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भाजी मंडई – क्रमश: भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ भाजी मंडई – क्रमश: भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

मोहिनी देववंशीची प्रतीक्षा पूर्ण झाली. अखेर तो दिवस आलाच. टोरॅंटो शहरात देशोदेशींच्या साहित्यिकांची गर्दी जमली. त्यांना एयरपोर्टहून घेऊन येऊन, हॉटेलमध्ये पोचवण्यापर्यंतचा सगळा बंदोबस्त केलेला होता. सगळं काही शांतपणे होत होतं. नाही म्हणायला एकच चिंता होती.  “नंदन पुरी” नावाचा नाग, मोहिनी आयोजित करत असलेला सगळा कार्यक्रम उधळून न देवो. दोघांची दुश्मनी जगजाहीर होती. शहरातल्या सगळ्या शत्रुत्व असलेल्या गटांमध्ये, पहिल्या नंबरावर होती. आपल्या विश्वस्त सूत्रांनुसार तिला ही बातमी कळली होती की बहुधा नंदनजी एकांतवासात आहेत. तिथे फोनही लागत नाही आणि नेटवर्कही मिळत नाही. शहरापासून गाडीने तीन तास अंतरावर असलेल्या झोपडीत राहायला गेले आहेत. हेतू असा की तिथे त्यांना काही ऐकता येऊ नये आणि मत्सराने जीव जळू नये.   

  दिवसभरच्या प्रारंभिक भेटी-गाठीनंतर हिंदीवर भाषणं होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सन्मान समारंभ होता. भारतातून आलेल्या लोकांमध्ये खूप उत्साह होता. स्थानिक लोकांचीही चांगली गर्दी होती. हे लोक म्हणजे तर कार्यक्रमाचा प्राण होता. विदेशातून सन्मान घेऊन घरी परतणं, यापेक्षा दुसरी मोठी कुठली गोष्ट असू शकेल? सगळं काही योजनेनुसार चाललं होतं. मोहिनीचा उजवा हात असलेले ‘अशांतजी’ शांत दिसत होते. त्यांच्या खांद्यावरच समारंभाचा सारा भार होता. सुटा-बुटात, हातात  वॉकी-टॉकी घेऊन झुकलेल्या खांद्याने ते इकडे-तिकडे धावपळ करत होते. त्यांना पाहून वाटत होतं की तेच समारंभाचे मुख्य आयोजक आहेत. साडी नेसलेली मोहिनी अगदी आकर्षक दिसत होती. तिच्या शालीनतेमुळे तिचं व्यक्तिमत्व कसं झळाळून दिसत होतं. सगळ्या स्थानिक लोकांची उपस्थिती, एक सुनियोजित कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडण्याची जाणीव करून देत होती. समारंभाच्या भव्यतेची अनुभूती मोहिनीचा चेहरा तजेलदार बनवत होती. यानंतर तिच्या नावापुढे “सफल अंतरराष्ट्रीय सेमिनार आयोजक” अशी मोठीच पदवी लागली असती.

  दुसर्‍या दिवशीच्या सन्मान समारंभासाठी सर्टिफिकेटस तयार केलेली नव्हती. न जाणे कोण येतील… न येतील…विदेशी आणि स्थानिक, निमंत्रण नसलेल्या पण तिथे उपस्थित असलेल्यांची निश्चित संख्या लक्षात येताच लगेच व्यवस्था करण्याची योजना केली होती. त्याच दिवशी चार लोक एकत्र बसून सर्टिफिकेटस तयार करतील, असे ठरवण्यात आले.  योजना यशस्वी झाली. कार्यक्रमाच्या जागी सकाळी सात वाजल्यापासून गाड्या लागू लागल्या. चहा -कॉफीच्या कपाबरोबर काम सुरू झालं

लॅपटॉपला  कनेक्ट करून लेज़र कलर प्रिंटर, टेबलावर ठेवलला होता. धड़ाधड़ प्रिंट होऊन  प्रमाणपत्र बाहेर पडत होती. ‘डॉलर स्टोअर’ मधून विकत घेतलेल्या सजावटीच्या सामानातून प्रमाणपत्र सजवले जात होते. सोनेरी गोल स्टीकर लागताच तो सामान्यसा कागद प्रमाणपत्राचं रूप घेऊ लागायचा. कुठल्या कोपर्‍यात चादण्या लागायच्या, तर कुठे कुठे चमकत्या धारा… जसजशी सजावट वाढत गेली; तसतसं, प्रमाणपत्र, पूर्णपणे सन्मानाचं द्योतक सन्मानपत्र बनलं.  त्यानंतर तयार फ्रेममध्ये घातल्यावर ते अधीकच सुसाज्जित, अधिकारिक सन्मानपत्र बनलं. असं सन्मानपत्र, जे बघता बघता, व्यक्ती आपलं सारं आयुष्य समाधानाने घालवू शकेल. ती असा विचार करील की आपल्या कार्याचं आपल्याला योग्य असं पारितोषिक मिळालय. अशा समाधान देणार्‍या कागदांची फॅक्टरीच बनला होता हा कलर प्रिंटर. छापखानाच बनला होता तों म्हणा ना! प्रत्येकाचे नाव लिस्टमधून घेऊन, व्यवस्थित टाईप करून ‘प्रिंट’ क्लिक करत राह्यचं. दोन चार वेळा चुकीची नाव पडली. नाव चुकीचं पडलय, हे लक्षात येताच, तत्काळ तो कागद फाडला जात होता. क्षणभर वाटायचं, कागद नाही, सन्मानच फाटलाय. पण तत्काल त्याचा पुनर्जन्म व्हायचा. दोन रमा होत्या. दोघी शर्मा होत्या. दोघींना एकच सन्मान दिला जाणार होता. त्यामुळे कुणीही मंचावर यावं, काही फरक पडणार नव्हता.     

क्रमश:…….

मूळ कथा – भिंडी बाजार    मूळ लेखिका – डॉ  हंसा दीप

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ☆ अल्लड अवखळ मन ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

 ?  मनमंजुषेतून  ?

☆ अल्लड अवखळ मन ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

मायेच्या हळव्या स्पर्शाने फुलते

नात्याच्या गंधात धुंद मोहरते

मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे

का होते बेभान कधी गहिवरते—-

मन…कधीच न उलगडणारे कोडे… शब्दात न मांडता येणारे मन वेडे.. आकाशासारखे अथांग… सागरासारखे गहिरे.. क्षणात फुलणारे… क्षणात कोमेजणारे .. सावरणारे …अडखळणारे,

तर कधी आशेच्या हिंदोळ्यावर झुलणारे हे मन….

किती  सांगावी महती या मनाची.. मन चंगा तो कटोती  मे गंगा असे म्हणतात म्हणूनच उत्तम शरीराबरोबरच मनही निरोगी असणे तितकेच गरजेचे आहे. रिकामे मन हे सैतानाचे घर असते. यासाठी मनाला नेहमी चांगल्या गोष्टीत गुंतवायला हवे.

आपण इतरांची मने जपण्यासाठी खूप काही करतो. स्वतःच्या आशा अपेक्षांना मुरड घालतो पण या सर्वांची मने जिंकताना आपल्यालाही एक मन आहे हे साफ विसरून जातो. कधीतरी आपलेच मन आपल्याला विचारेल की, माझ्यासाठी तू काय केलेस? आहे उत्तर?….

योग्य आहार ,विहार, व्यायाम याने जसे शरीर चांगले राहते तसेच छंदाची जपणूक, चांगले मित्र, छान पुस्तक वाचन, गायन, वादन, बागकाम … मनापासून आवडणारे कोणतेही काम हे भरभरून आणि आनंदाने करायला हवे. थकलेल्या शरीराला जसे स्फूर्ती येण्यासाठी टॉनिक देतात तसेच आपले छंद आपल्या मनासाठी टॉनिक म्हणून काम करतात…

स्वतःचे ही मन जपा. त्याला काय हवे-नको ते बघा. त्याचेही कोड कौतुक करा.सकारात्मक विचारांनी त्याला फुलवा.आनंदी क्षणात भुलवा ..मग बघा जीवनाचे इंद्रधनुष्य कसे सप्तरंगानी बहरून येते…

    नजर को बदलो

नजारे बदल जायेंगे

    मन को बदलो

धूप मे भी छांवको पाओगे—–

 

© सौ. स्वाती रामचंद्र कोरे

खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शुभ्र नभासम….स्वप्नाली देशपांडे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ शुभ्र नभासम….स्वप्नाली देशपांडे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

शुभ्र नभासम कोरा कागद

नवी लेखणी हळवी मोहक

कसे न ठावे कातरवेळी

 भेट तयांची घडे अचानक 

 

   झाल ओढूनि तीही सजली 

   शब्दझुला ती गुंफित गेली

   लेवून शेला तोही सजला 

   शब्दझुल्यावर पुरता रमला

 

स्पर्श पहिला तिचा कोवळा 

निळा-जांभळा किंचित ओला 

स्पर्शाने त्या उत्कट पहिल्या

कागद भिजला जरा लाजला 

 

    आरस्पानी शब्दफुलांनी 

    कवितेचा अंकुर बहरला

    अद्वैताच्या अनुभूतीने 

    कागद सर्वांगी मोहरला. 

 

शेवट येता त्या कवितेचा 

नीलघनासम कागद ओला 

झुलून किंचित शब्द झुल्यावर

आत स्वत:च्या दुमडून गेला

–स्वप्नाली अतुल देशपांडे (मुंबई)

प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ Not At Home…. ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

 ☆ Not At Home…. ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆ 

खरंतर Not at Home हा परफेक्ट शब्द.

पण लहानपणी मे महिन्यात सगळी भावंडं एकत्र जमलो कि पत्त्यात हा डाव रंगायचा. पण तेव्हा विंग्रजी फार यायचं नाही मग जो तो ज्याला जसं ऐकू आला उच्चार तसं म्हणायचा. नाॅटॅट होम, नाॅटॅ-ठोम काय वाट्टेल ते !! तसंही आपण आपल्याच घरात तरी कुठे असायचो? ते ही Not At Home च. कधीही मित्र मैत्रिणीच्या घरी जाऊन हुंदडायला मिळायचं. येऊ का? वगैरे विचारण्याच्या formalities नव्हत्या. 

“Challenge” ला पण चायलेन्ज, चाॅलेन्ज काय वाटेल ते म्हणायचो.

“लॅडीज” नावाचा खेळ फक्त लेडीजनीच खेळायचा असं आपलं उगीच वाटायचं मला. त्यात एक वख्खई बोलली जायची. लाडूची म्हणजे ३२ कळ्या किंवा अर्धा लाडू १६ कळ्या वगैरे. झब्बू पण असाच एक डाव. झब्बू देताना एक पानी आणि गड्डेरी. मजाच सगळी.

हे सगळे शब्द कुठून आले ?देव जाणे?

काचापाणी, पट, सागरगोटे हे अजून काही प्रकार बैठ्या खेळातले. काचापाणीसाठी भांड्यांच्या काचा जमवायला अगदी कचराकुंडी पण गाठलीय.

सगळेच खेळ आपल्याला जिवंत ठेवायचे. वेगळा असा “स्पोर्टस् डे” नसायचा. रोजच खेळ. शाळा दुपारची असली की दप्तर फेकून ?‍♀️?‍♂️ धावत सुटायचं! कारण उशीरा पोहचलं खेळायला तर “कटाप” करायचे (actually cut off) खेळातून.

तळहातावर थोडसं चाटून “टॅम्प्लीज” (टाईम प्लीज खरा शब्द) करणं, लपंडावात “धप्पा” म्हणणे, “रडीचा डाव खडी”असं चिडवणे, मग समोरच्यानी आपल्याला “जो म्हणतो तोच” असं बोट आपल्यापुढे नाचवत म्हणणे या सगळ्याची मजा काही औरच.

आजच्या मुलांना काय कळणार ती??

लगोरीsss असं सात ठिक-या एकमेकांवर ठेवून त्यावर पाय फिरवणे, तो नाही फिरवला तर लगोरी लागली असं धरत नसत. तसेच “डब्बा ऐसपैस”. पत्र्याचा एक फालतू डबा पण अनन्यसाधारण महत्व मिळालेला.

डालडाचा वनस्पती तुपाचा हिरवं नारळाचं झाड असणारा डबा पण फार महत्त्वाचा. तो कमरेला बांधून विहीरीत धपाधप उड्या मारणे हा रविवार सकाळचा कार्यक्रम. 

“लपंडाव” खेळताना मुलं मुद्दाम एकमेकांचे शर्ट, टी शर्ट बदलून गंडवायचे आणि शर्टाची बाही दिसेल असे लपायचे. मग चुकीचं नाव घेतलं कि धप्पा मिळायचा “राज्य असणा-याला … ?

राज्य असणा-यालाच पकडायला लावायचं हा काय न्याय!! पण अशा नियमांवर अपील नसायचंच.

“जोडसाखळी, रस्सीखेच” म्हणजे नुसती ओढाओढी.

“दगड का माती” म्हटले की जे म्हणेल त्यावर उभं रहायचं. दगडावर उभं रहायचं असेल तर तो सापडेपर्यंत फक्त धावायचं.

“विषामृत”मधे विष म्हणुन स्पर्श करायचा मग विष मिळाले कि स्तब्ध उभं रहायचं. मग कुणी तरी येऊन अमृत द्यायचं…काय एकेक मज्जा !!

पावसाळ्यात घरी बसू असं तर मुळीच नाही. पावसाळ्यात “रूतवणी” हा खेळ. 

एक लोखंडी सळई घेऊन चिखलात रुतवत जायचे. त्याचे पाॅईन्ट्स मोडायचा. सळई पडली की दुसरा खेळायचा. पहिला औट. 

“आबाधूबी” (अप्पा-रप्पी) लई भारी गेम. पाठ शेकुन काढणारा. यात शक्यतो प्लास्टीकच्या बाॅल घेतला जायचा. रबरी ट्यूब कच-यातून, भंगारातून शोधून तिचे तुकडे करून त्याचाही बाॅल केला जायचा.

साबणाचे फुगे करायला कागदाची बारीक सुरनळी करणे, करवंटीचे फोन, काडेपेटीत वाळू भरून टिचकीनी ती उगडून अंगावर उडवणे… what a creativity !!! काही नाही तर बाॅल घेऊन “टप्पा- टप्पा” हा खेळ तरी व्हायचाच. ते मोजले जायचे ते ही सार्वजनिकरित्या, मोठ्याने बोंबलत.

क्रिकेट खेळताना फळकूट पण चालायचं. एखादी बोळ पण चालायची. टीम पाडायच्या. आपणच अनेक नियम बनवायचे. या कंपाउंड बाहेर गेला बाॅल की फोर, तिकडे सिक्स, एक टप्पा औट, रन आऊट चे नियम वेगळे. कुणाच्या खिडकीची काच फोडली तर सार्वजनिक धूम ठोकणे हा अलिखित नियम. मुली, मुलगे एकत्र खेळायचो तेव्हा. सगळेच मुलींचे “दादा”. क्रिकेट; कबड्डी साठी टीम मेंबर कमी असले की  मुलींना डिमांड. 

“टीपी टीपी टीप टॉप”, व्हॉट कलर डू यू वाँट”? काहीतरी भारी रंग सांगायचा. मग नसेल तर औट करायचे. यातही धावायचंच. “ढप, गोट्या” रिंगण आखून जो सांगितला जाई तो ढप किंवा गोटी रिंगणाबाहेर नेम धरून उडवायची–ऑलिंपिक लेव्हलची नेमबाजी.!! मग यात चंदेरी, पाणेरी, काळी, घारी अशी गोट्यांची वर्णनं. 

एक जबराट खेळ होता. टायर्स फिरवणे. जुने टायर्स घेऊन ते काठीने बडवत पळवत नेऊन त्याची शर्यत लावायची. खूप धमाल यायची टायर्स पळवायला! 

”ठिक्कर पाणी” हा फक्त मुलींचा खेळ समजला जायचा. एखादा मुलगा जरी यात आला तर “मुलीत मुलगा लांबोडा, भाजून खातो कोंबडा” ? म्हणुन चिडवायचे. फरशीची खपटी घेऊन त्याला थुंकी लावुन ती रकान्यात फेकायची आणि एका बाजुने लंगडी खेळत जाऊन ती पायानेच सरकावुन चौकटीच्या बाहेर जाईल अशा रितीने फेकायची. रेषेवर पडली तर औट. 

कांदाफोडी, डोंगराला आग लागली पळा पळा पळा, खांब खांब खांबोळी, शिवाजी म्हणतो, दोरीवरच्या उड्या, मामाचं पत्रं हरवलं, शिरा-पूरी भातुकली हे तर सगळे गर्ल्स स्पेशल खेळ. मुलींची monopoly. 

नाव, गाव, फळ, फूल, नाटक/सिनेमा, रंग, प्राणी, पक्षी, वस्तू काय वाटेल ते. वह्याच्या वह्या भरायच्या. 

भातुकली, दो-या बांधून घर घर खेळणं, दाण्याचे लाडू आणि चुरमु-याचा भात एवढाच कायम स्वैपाक असायचा भातुकलीत.

व्यापार, सापशिडी, सागरगोटे, काचापाणी हे दुपारचे खेळ. 

वारा पडलेला असेल तर बॅडमिंटन. 

पण तो श्रीमंती खेळ. जिच्या हाती रॅकेट ती/तो फार भाव खायचे. मग रॅकेट नसणारे एकत्र यायचे आणि बॅडमिंटन पेक्षा बाकी खेळ कसे भारी यावर वादावादी.

कॅरम पण तसाच श्रीमंती खेळ. 

ते नको असायचे. त्यात धांगडधिंगा करता यायचा नाही ना !! 

“पतंग बदवणे” यात जो माहिर, तो सगळ्यात भारी. ?

मुली आपल्या ही काट, ती काट सांगायच्या आणि फिरकी धरायच्या. मग ती काटताना ढील देणे वगैरे प्रकार करावे लागायचे. काटता आली नाही पतंग की मग मांजा नीट नाही, कन्नी नीट बांधली नाही या तक्रारी. 

दिवेलागणी झाली की परवचा म्हणून रात्री जेवणं झाली की अंताक्षरी आणि  भुताच्या गोष्टी.

निव्वळ Nostalgic !!!

समृद्ध, श्रीमंत बालपण होतं आपलं.

करता येईल का तसं आजच्या लहान मुलांचं???

काहीतरी जादू घडावी आणि होऊन जावं आपल्यागत.

नाही का ???

संग्राहक : श्री अनंत केळकर   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन-यात्रा ☆ आत्मसंवाद – लेखक हा आधी वाचक असावा लागतो…. – भाग 1 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? आत्मसंवाद ? 

☆ लेखक हा आधी वाचक असावा लागतो…. – भाग 1 ☆ श्री आनंदहरी

ज्येष्ठ साहित्यिका, संपादिका  सौ. उज्वलाताई केळकर यांनी ई अभिव्यक्ती आत्मसाक्षात्कार साठी स्वतःच स्वतःची मुलाखत घेण्याबाबत सांगितलं तेंव्हा पहिल्यादा नाही म्हणलं तरी दडपण आले कारण ज्येष्ठतम साहित्यिका तारा भवाळकर यांचा आत्मसाक्षात्कार वाचला होता..त्यानंतरही काही मान्यवरांनी स्वतःच घेतलेली स्वतःची मुलाखत वाचली होती. आणि खरेतर  मुलाखत घेणं आणि देणं याचा फारसा काही अनुभव नसताना ही मुलाखत घ्यायची होती. उज्वलाताईंचा आदेश ..

मग मीच माझे आयुष्य त्रयस्थपणे पाहण्याचा , स्वतःच्याच अंतरंगाशी , वर्तमानासह भूतकाळाशी जोडून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. तेंव्हा एकच प्रश्न पडला…

‘नाहीतरी, ‘ मी पणा’ वगळून, स्वतःत त्रयस्थभाव आणून आपण स्वतःशी असा कितीसा संवाद करत असतो ? ‘  ‘मी’ ला टाळता येत नसलं तरी ‘मी पणाला’ टाळण्याचा प्रयत्न करीत आत्मसंवाद साधण्याचा केलेला छोटासा प्रयत्न म्हणजे हा आत्मसाक्षात्कार..

मी :- नमस्कार!

आनंदहरी :- नमस्कार !

मी :-  प्रत्येकालाच स्वतःचा जीवनप्रवास हा काहीसा वेगळा आहे असे वाटत असते. तुमचा आजवरचा जीवन प्रवास कसा झाला ?

आनंदहरी :-   आपण जेव्हा मागे वळून पाहतो तेंव्हा वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर भूतकाळ पाहत असतो. आणि म्हणून प्रत्येक पिढीच्या तोंडी ‘आमच्यावेळी असे होते.. तसे नव्हते ‘ असे शब्द असतातच. बदलत जाणाऱ्या काळाबरोबर सुखाच्या, संपन्नतेच्या व्याख्या, परिभाषा बदलत जातात ही जाणीव आपल्याला भूतकाळ आठवताना नसते असे मला वाटते. त्यामुळे भूतकाळ पाहताना त्या काळाचा, स्थिती-परिस्थितीचा आणि भवतालाचे विचार असणे अत्यंत महत्वाचे आहे. आपण स्वतःला इतरांहून कुणीतरी वेगळे मानत असतो म्हणून आपला भूतकाळ वेगळा आहे, कष्टप्रद आहे असे वाटत असते. खरेतर अपवाद वगळता समाजजीवन हे तसेच असते. त्यात ‘आपले ‘ म्हणून फारसे वेगळेपण असतेच असे नाही.

माझा जन्म आणि बालपण पेठ सारख्या छोट्या गावात गेले. वडील न्यू इंग्लिश स्कुल, पेठ जि. सांगली या माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक होते. स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाची गंगा खेडोपाडी वहायला सुरवात झाली होती. तो, तो काळ होता. आजूबाजूच्या दशक्रोशीतील खेड्यातील मुले चालत शाळेत येत होती. विद्यार्थ्यांकडे (आणि शिक्षकांकडेही ) सायकल असणे ही अपवादात्मक बाब होती. त्याकाळात आजच्यासारखी वैज्ञानिक प्रगती नव्हती. माणसाच्या गरजा कमी होत्या. साधी राहणी हा विचार मनामनात रुजलेला होता. बालपणापासूनचा जीवनाचा काळ हा सर्वार्थाने सुखद आणि संपन्नतेत गेला. नोकरी हीच उपजीविकेचे साधन असल्यामुळे नंतर विद्युत अभियांत्रिकीतील पदविका मिळवली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विद्युत अभियंता म्हणून नोकरी करून, कौटुंबिक जबाबदाऱ्या फारशा उरल्या नाहीत, पेन्शन नसली तरी मिळणाऱ्या उपदानातून आपण उर्वरित आयुष्य आत्तासारखेच साधेपणाने, सुखाने जगू शकतो असा विचार मनात येताच वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली. असे कोणत्याही वळणवाटा न येता आजवरचे संपूर्ण आयुष्य हे सरळ रेषेसारखे व्यतीत झाले आहे.

मी :-  तुम्ही साधेपणाचा उल्लेख केला आहे.. साधेपणा म्हणजे तुम्हांला नेमके काय म्हणायचंय ?

आनंदहरी :- सुख, संपन्नता या गोष्टी त्या काळी पैशाशी जोडल्या गेलेल्या नव्हत्या, खरे तर आजही त्या तशा जोडल्या गेलेल्या नाहीत पण अनेकांना तसे वाटते हे मात्र खरे आहे. माणसाच्या गरजा मर्यादित होत्या.  स्वतःबरोबरच इतरांचा विचार जास्त केला जायचा. सुख आणि संपन्नता ही मनाची स्थिती आहे असे मला वाटते. माणूस जे आहे त्यात सुखी होता. माणूस माणसाशी आंतरिक भावाने जोडला गेलेला होता असा तो काळ होता. माणसाच्या अपेक्षा कमी होत्या. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे ‘ पोटापूरते देई देवा…’ हाच भाव बहुतेकांच्या मनात असायचा. अडी-नडीला माणूस माणसासाठी उभा असायचा. पैशापाठी पळणे नव्हते. बोरकरांच्या शब्दात सांगायचे तर सारे ‘सुशेगात’ होते. कालौघात जीवन आणि जीवनधारणा बदलत गेलीय आणि जात राहणारच तो निसर्ग नियमच आहे.

मी :- तुम्हांला साहित्य लेखनाची आवड  कशी निर्माण झाली ?

आनंदहरी :- गायक हा आधी उत्तम श्रोता असावा लागतो तद्वत लेखक हा आधी वाचक असावा लागतो असे मला वाटते. लहानपणी गोष्टी ऐकण्याची आवड निर्माण झाली ती आईमुळे. त्याकाळी चातुर्मासात घरात आणि घराजवळ असणाऱ्या सिद्धस्वामी मठात ग्रंथवाचन चालायचं. श्रावणात ‘ खुलभर दुधाची कहाणी ‘ सारख्या अनेक गोष्टी आई वाचायची त्यामुळे गोष्टी ऐकण्याची आवड निर्माण झाली होती. वडील काही कामानिमित्त इस्लामपूर, सांगली, कोल्हापूरला गेले की आवर्जून गोष्टीची पुस्तके आणत  त्यामुळे शाळेत जायला लागण्याआधीपासूनच चांदोबा, छान छान गोष्टी., बिरबलाच्या गोष्टी यासारखी गोष्टीची पुस्तके घरात होती. ती वाचण्यासाठी आम्हा बहीण भावात भांडणेही लागत. नंतरच्या कालखंडात या पुस्तकांबरोबरच बाबुराव अर्नाळकर, एस.एम काशीकर, गुरुनाथ नाईक यांच्या रहस्यकथा वाचण्याचा छंदच लागला. दिवाळीची सुट्टी म्हणजे दीपावली अंक वाचण्याची दिवाळीच असायचीव अजूनही आहे. उन्हाळी सुट्टी म्हणजेही वाचनाचीच दिवाळी. तेंव्हापासून वाचनाची आवड निर्माण झाली. माध्यमिक शालेय जीवनात शाळेच्या समृद्ध ग्रंथालयातून ययाती, अमृतवेल, मृत्युंजय, स्वामी सारखी अनेक पुस्तके वाचायला मिळाली.

नंतर वयोपरत्वे वाचन बदलत गेले. गुलशन नंदा सारख्या लेखकांच्या पुस्तकांसह जे जे हाती पडेल ते ते वाचायची सवय जडली. वृत्तपत्र नियमित घरी येत असे त्यामुळे ते नियमित वाचायची सवय लहानपणापासूनच लागली.

वाचायला सुरुवात केली तसे व्यक्त व्हायलाही सुरवात झाली होती, कविता, गीते ऐकायची आवडही निर्माण झाली होती. त्यामुळे बालपणातच तत्कालीन भावविश्वाच्या कविता.. यमक साधून लिहिलेल्या / रचलेल्या ओळी म्हणूया फारतर .. लिहायची सवय लागली. आठवीत असताना रहस्यकथा लिहिली होती. शालेय नियतकालिकातही लेख, कविता, कथा लिहिल्या होत्या. त्यावेळी कदाचित या नादात माझे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय हे जाणवून एकदा वडिलांनी सांगितले होते, ‘ मराठीत साहित्य लेखन हे चरितार्थाचे साधन होऊ शकत नाही. उपजीविकेसाठी नोकरी आणि नोकरीसाठी शिक्षण महत्वाचे आहे. साहित्यादी कला या छंद, आवड म्हणूनच ठीक आहेत. ते मनाच्या, विचारांच्या समृद्ध पोषणासाठी हवेतच पण पोट भरणे हेही महत्वाचे आहे.’ मग मात्र शिक्षण पूर्ण होऊन नोकरीत स्थिरसावर होईपर्यंत अभ्यासाकडे लक्ष राहिले. वाचन चालू राहिले तरी लेखन तसे कमीच झाले. नाही म्हणायला कविता,  क्वचित कथा लिहीत होतो.. मित्रपरिवारात त्या वाचल्या जात होत्या पण प्रसिद्धीला कुठं पाठवल्या नाहीत.जेव्हा जमेल तेंव्हा एखाद्या साहित्यिक कार्यक्रमात श्रोता म्हणून उपस्थित रहात होतो.

क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – संस्मरण ☆ व्यंग्य ☆ क्यों नहीं आते लेखक अच्छे अच्छे….. ☆ श्री कमलेश भारतीय

श्री कमलेश भारतीय

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ व्यंग्य ☆ क्यों नहीं आते लेखक अच्छे अच्छे…..☆ श्री कमलेश भारतीय ☆ 

अपने देश के विश्वविद्यालयों में अभी तक सिर खफा रहे हैं शोधार्थी कि सूरदास वगैरह प्राचीन कवियों के जन्मस्थान कहां हैं ?बेचारे शोध छात्र क्या करें ? सूरदास और तुलसीदास के काव्य सौंदर्य का आनंद लेने की बजाय उनके जन्म मरण के रहस्य में फंसे हैं ।

दूसरी तरफ हालत संत कवियों की भी अच्छी नहीं । कोई उन्हें कहीं विराजमान करता है तो कोई दूसरा कहीं और शोभायमान कर देता है । बेचारे संत कवि । इतिहास में भी एक जगह टिक कर बैठ नहीं सकते ।भक्ति में , काव्य में , लेखन में गले गले तक यानी आकंठ डूबे रहे और साहित्य रचते रहे । अपने शिष्यों को अपने बारे में कुछ भी नहीं बताया ।बस , काव्य ग्रंथ हाज़िर कर दिये कि लो , इनमें हमें ढूंढो रे बंदे । उन संत कवियों की नज़र में जन्म स्थान, जन्म तिथि व दूसरी किस्म के निजी ब्यौरे गैर-जरूरी थे । उनकी नज़र में मंगल की भावना ही प्रमुख थी ।

जहां प्राचीन कवि अपने लेखन से आज तक जाने पहचाने जाते हैं , वहीं आज लेखक तो मौजूद है लेकिन उसका लेखन गायब है । आज लेखक की साक्षात मूर्ति के दर्शन तो हो सकते है पर उसके लेखकीय दर्शन व विचार क्या हैं , इसे शोध का विषय बनाना पड़ेगा । आज का लेखक आत्मकथा और गर्दिश के दिन जैसी आत्मरचनाएं पहले लिखता है और असली लेखन बाद में करता है । यह है मैनेजमेंट फंडा । शायद वह हिन्दुस्तानी फिल्मों की हीरोइन की तरह आंसू अधिक बहाता है और मतलब की बात कम ही करता है ।

आधुनिक हिंदी साहित्य के पितामह भारतेंदु माने जाते हैं । सब जानते हैं कि भारतेंदु इनका नाम नहीं बल्कि उपाधि है -प्यार से दी हुई उपाधि । इन्होंने सितारे हिंद बनने की बजाय भारतेंदु बनना पसंद किया । अंग्रेज सरकार की बजाय जनता से मिली उपाधि स्वीकार की । पुरस्कार की दौड़ में शामिल न होकर हिंदी सेवा की दौड़ में शामिल होना पसंद किया । एक पूरा युग भारतेंदु के नाम हो गया । आज लेखक पुरस्कारों के पीछे इतने दीवाने हो चुके हैं कि जैसे तैसे पुरस्कार पा लेना चाहते हैं और पुरस्कृत होने का गौरव पा लेना चाहते हैं । इसीलिए पुरस्कारों की  अहमियत गौण होती जा रही है और राशि महत्त्वपूर्ण होती जा रही है । ऐसा लगता है कि ये पुरस्कार लेखन पर न होकर किसी ताश या लाॅटरी के रूप में निकाले जाते हों । या किसी औघड़ बाबा के आशीर्वाद का फल । सही लेखक की पहचान लेखन से होती है न कि पुरस्कारों से ।

भारतेंदु के पास बाप दादा का इतना धन था कि उसके बारे में खुद भारतेंदु कहते थे कि इस धन ने मेरे बाप दादा को खाया , मैं इसे खाकर ही जाऊंगा । भारतेंदु ने धन खाया नहीं बल्कि हिंदी की सेवा में अधिक लगाया । लेखक मंडली बनाई और लेखकों की जरूरत पड़ने पर आर्थिक सहायता की । आज हालत यह है कि लेखक मंडली नहीं बनाते बल्कि अपना अपना मठ बनाते हैं , माफिया बनाते हैं और भारतेंदु नहीं बल्कि मठाधीश कहलाते हैं । आजकल के लेखकों का एक ही नारा है :

हम तुम्हें

तुम हमें छापो ।

हम तुम्हें

तुम हमें उछालो ।

जो हमारे मठ का नहीं

उसे गिराओ ।

हिंदी साहित्य में से

उसका नाम मिटाओ …..

हालांकि हम सब जानते हैं कि साहित्य में नाम लिखना मठाधीशों के साथ में नहीं बल्कि पाठक के साथ में है ।

हिंदी साहित्य में एक पूरा युग दरबारी युग रहा है । दरबारी युग यानी रीतिकाल । इस युग के कवि राजाओं को खुश करने के लिए दोहे रचते थे । इन सबमें बाजी मार ले गये बिहारी बाबा जिनके एक दोहे पर सोने की अशर्फी मिलती थी । दरबारियों की वाह वाही अलग । वैसे इसी काल में कवि भूषण भी हुए जिनकी पालकी को खुद छत्रसाल ने कंधा दिया था :

शिवा को सराहों

 के सराहों छत्रसाल को ।

अब हम इसी तर्ज पर पूछ सकते हैं कि

बिहारी को सराहों

 के सराहों छत्रसाल को ?

इसीलिए तो स्वर्गीय डाॅ इंद्रनाथ मदान ने एक इंटरव्यू में चुटकी ली थी कि साधन तो बढ़ रहे हैं लेकिन साधना घट रही है । लेखक का उद्देश्य बड़ी पत्रिका से ज्यादा पैसा कमाना हो गया है । जबकि लेखक का उद्देश्य पैसे कमाना नहीं बल्कि रहती दुनिया तक नाम कमाना होता है ।

मुंशी प्रेमचंद लेखन और मजदूरी को एक ही समान समझते थे । एक बार एक आदमी उनसे मिलने आया । वे उस समय लिखने मे अर्थात् मजदूरी करने में व्यस्त थे । कुछ देर बात कर उन्होंने उस आदमी से पूछा कि यदि एक मजदूर मजदूरी नहीं करेगा तो खायेगा क्या ?

इस पर वह अतिथि बोला कि भूखा मरेगा और क्या होगा?

मुंशी प्रेमचंद ने कहा -एक लेखक लिखेगा नहीं तो खायेगा क्या ?

 मुंशी प्रेमचंद के मजदूरी शब्द को अनेक लेखकों ने अपनाया जरूर लेकिन बड़े  गलत तरीके से । आज बुक स्टाल ऐसी पत्रिकायें से भरे पड़े हैं जो युवा वर्ग को गुमराह कर रहा है । वे बड़ी शान से कहते हैं कि हम मुंशी प्रेमचंद की तर्ज पर मजदूरी कर रहे हैं । कम पैसे के लिए अश्लील साहित्य धड़ाधड़ लिखते चले जा रहे हैं । उरोजों चुम्बकों की बात करते रहते हैं । तब मुझे ऐसे एक लेखक महोदय को याद दिलाना पड़ा कि मुंशी प्रेमचंद जहां कलम के मजदूर थे वहीं वे कलम के सिपाही भी थे । उन्होंने मुम्बई की फिल्मी दुनिया को भी ठोकर मार दी थी । वे फिल्म निर्माताओं की कहानी बदलने की मांग को पचा नही पाये और वापस आ गये । कुछेक सिक्कों के लिए मुंशी प्रेमचंद ने समाज पर अपने पहले में कोई ढील नहीं दी थी । इसीलिए वे कहते थे कि साहित्य समाज को सुलाने के लिए नहीं बल्कि जगाने के लिए है ।

दूर क्या जाना । जैसे कल की बात हो । मोहन राकेश ने जब अनिता राकेश को कहा कि देखो , मेरी ज़िंदगी में पहले स्थान पर मेरा लेखन, दूसरे पर दोस्त और तीसरे पर तुम्हारी जगह है । अगर तुम इसमें कुछ उलट पुलट करोगी तो मुसीबत में पड़ जाओगी ।

इस बात की खूब आलोचना हो रही है और हुई भी । मोहन राकेश को खानों में ब॔टा आदमी तक कहा गया । जो भी हो , वे लेखक के तौर पर ईमानदार आदमी थे । लेखक के लिए लेखन सबसे पहले स्थान पर नहीं होगा तो क्या किसी बनिए के बही खाते में होगा ? आज कितने लेखक हैं जो लेखन के लिए उचित माहौल न पाकर मोहन राकेश की तरह इस्तीफे दर इस्तीफे दे सकते हैं ? कितने लेखक हैं जो सुविधाओं के पीछे न भाग कर लेखन के लिए और लेखक बन कर बंटे रह सकते हैं ? शब्द का मोल चुकाने वाले कितने लेखक हैं ?

अर्नेस्ट हेमिंग्वे ने भी द ओल्ड मैन एंड द सी उपन्यास लिखने के लिए मछुआरों के बीच समय गुजारा था । उस उपन्यास को नोबेल पुरस्कार मिला । तोल्सटाय ने वार एंड पीस उपन्यास को बी  बार से ऊपर लिखा या निरंतर संशोधित किया । ऐसा धैर्य और ऐसा त्याग किस लेखक में है या कितने लेखकों में है ?

कहा जाता है कि विदेशों में लेखक की असली लेखन यात्रा चालीस साल के बाद शुरु होती है क्योंकि वह जीवन के अनुभव से भरपूर हो जाता है जबकि हमारे दे  में एकदम उलट हैं हालात । बहुत सारे लेखक चालीस तक पहुंचते पहुंचते मठाधीश या परामर्शदाता बन चुके होते हैं ।

एक अखबार के संपादक के पास एक नवोदित कवि आया और अपनी रचना देकर कहा कि मुझे भी कवियों की लाइन में लगा दीजिए ।

इस पर संपादक महोदय ने बहुत शानदार जवाब दिया कि बरखुरदार , लाइन तो पहले ही बहुत लम्बी लगी है  लेकिन कोई इस लाइन का नेता बन सके , उसकी इंतजार है । हो सके तो आप ही आगे आइए न ।

वे कविता बगल में दबाये दुम दुम दफा कर भाग निकले ।

कुम्हारी अपना ही भांडा सलाह तो है । लेखक अपनी ही बिरादरी की आलोचना करने को मजबूर है । और यही पूछ रहा है – क्यों नहीं आते, लेखक अच्छे अच्छे …..?

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष, हरियाणा ग्रंथ अकादमी

1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares