सौ. उज्ज्वला केळकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “हुंकार काळजाचा” – (कविता-संग्रह) – कवयित्री : डॉ. शैलजा करोडे – परिचय : कवी / गझलकार अ. के. शेख ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

पुस्तक : हुंकार काळजाचा – (कविता-संग्रह) 

कवयित्री : डॉ शैलजा करोडे

प्रकाशक : अभिनंदन प्रकाशन कोल्हापूर

पृष्ठसंख्या 200

मूल्य ₹ 440

जेष्ठ कवयित्री शैलजा करोडे यांचा ” हुंकार काळजाचा ” या नावाचा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला. त्या नेरूळच्या आहेत. अभिनंदन प्रकाशन कोल्हापूरने हा संग्रह प्रकाशित केला आहे. या संग्रहात 100 कविता आहेत आणि 200 पानांच्या या संग्रहाचे मूल्य आहे रू. 440. मॅडमच्या नावावर पुष्कळशी ग्रंथसंपदा असून हे त्यांचे 21 वे पुस्तक आहे.

आपल्या पहिल्याच कवितेत त्या म्हणतात.

नभावरी खुलतसे इंद्रधनूची कमान

बांधियले कोणी असे नभी मंगल तोरण

अशा निसर्ग वर्णनाच्या कविता तर आहेतच त्याचबरोबर माणसाला आधार देणार्‍याही कविता आहेत, पाहा

जावे संकटा सामोरे मन करूनीया धीट

दुःखानेच कळत असे गोडी सुखाची अवीट

या संग्रहात अशा संस्कारी, प्रासादिक आणि मनाला भावणार्‍या कविता आहेत. जेव्हा उत्कट भावनांना त्यांचे विचार व विचारांना त्यांचे शब्द गवसतात तेव्हा कवितेचा जन्म होतो. या भावनांचे प्रकटीकरण जितक्या तीव्रतेने होते, तेवढा त्याचा कलात्मक आनंदही उंचीवरचा आणि वेगळा. केवळ दर्द नव्हे तर भावनांचा कल्लोळ व्यक्त करण्याची क्षमता कवीच्या ठायी असणे आणि त्यासाठी प्रज्ञेचीही जोड मिळणे, या गोष्टी निर्मिती प्रक्रीयेत महत्वाच्या ठरतात. मग लेखणीही लिहायला आतुर होते. पाहा—

“लेखणी माझी बनते कधी रसाळ मधुर

जणू ओघळते त्यातून दिव्य अमृताची धार”

कवितेचा भवतालाशी त्यातील घडामोडींशी, त्यातील अंतर्गत ताण तणावाशी संबंध असतोच. हे ताण तणावही निर्मिती प्रक्रीयेत महत्वाची भूमिका बजावतात. कवी लिहितांना कवी एका अद् भुताच्या प्रदेशातील सफरीवर निघतो. तिथे आधी कितीतरी वेळा जाऊन आलेले असतांनाही त्याला अनेकदा आधी अनुभवलेलेच पुन्हा गवसते, एका नव्या रूपाने. त्यामुळे व्यक्त होणार्‍या कवितेला अनेक पदर सुटतात. ज्याला जो भावेल तो त्याचा पदर. कोणाही रसिकाला कलेपासून मिळणारा आनंद घेण्याची क्षमता साध्य असावी लागते.

“कुणीतरी हवं असतं मन रितं करायला

हळव्या मनावरती फुंकर घालायला”

यातील सर्व कविता या अशाच आपल्या अवती भवतीच्या विषयांवरच्याच आहेत. त्यामुळे त्या आपल्या वाटतात. “आई कुठे काय करते” म्हटले की आपली आई आठवते. दिवसभर राब राबूनही तिला काय काम करते सांगता येत नाही. असेच सर्व विषय साध्या सोप्या शब्दात मांडलेले आहेत. विशेष म्हणजे या कविता सुबोध आहेत, दुर्बोध नाहीत. सहजच त्या सांगून जातात.

“दया करूणा मनी वसू द्या सफल होईल हा मानवजन्म

समाधान वसेल अंतःकरणी कशाला हवा पुनर्जन्म”

काळाच्या ओघात कविता ही कवीच्या जगण्याचा, सुखदुःखाचा किंवा त्याच्या अस्तित्वाचा एक अविभाज्य हिस्सा बनून जाते. कारण ती कवीच्या जीवनाच्या समृद्ध अनुभवातून, चिंतनातून निर्माण होत असते. हा संग्रह आणि त्यातील कविता अशाच आहेत. त्यामध्ये मानवी मनाच्या विविध पैलूंचे यथार्थ चित्रण प्रतिबिंबित होतांना दिसते. तसेच या कवयित्री नुसत्या कविता लिहिणार्‍या नव्हेत तर कविता जगणार्‍या कवयित्री आहेत. पाहा

“एक कप तो चहाचा वाढवी मैत्रीतील दृढता

गप्पा टप्पा समवेत आस्वाद चहाचा घेता” 

चहाची जशी त्यांना गोडी आहे, तशा त्या रसिकही आहेत.

“कमलदलासम उमलती 

अलगद तुझी ओठ कळी

रूप तुझे न्याहाळतो 

मम दोही नेत्रकमळी”

अशा या 101 कविता लयबद्ध आहेत. त्यात चाराक्षरी, पष्टाक्षरी, अष्टाक्षरी दशाक्षरी अशा रचना आहेत आणि त्या सर्व रसिकांना आवडतील अशाच आहेत. तर हा सग्रह घ्या, वाचा, आनंद लुटा.

“विश्वास ठेवण्यास शिका, विश्वासाने जगा

माणुसकी धर्म मोठा, विसरा सारा त्रागा”

परिचय : कवी / गझलकार अ. के. शेख, पनवेल

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments