श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “सेवा समर्पण” – संपादन : सुश्री निवेदिता भिडे – अनुवाद : सुश्री सुनीता करकरे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : सेवा समर्पण
(सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक पुस्तक)
संपादन : सुश्री निवेदिता भिडे
अनुवाद : सुश्री सुनीता करकरे
प्रकाशक : विवेकानंद केंद्र
पृष्ठे : ४००
मूल्य : ३००/- रुपये
सेवा समर्पण आध्यात्मिक जीवनाची साधना – – –
कन्याकुमारी येथे विवेकानंद शिला स्मारक बघण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण जाऊन आले असतील. त्या शिला स्मारकाचे सर्व काम विवेकानंद केंद्रातर्फे पाहिले जाते.
१९७२ मध्ये स्थापन झालेल्या विवेकानंद केंद्रातर्फे देशभरात संस्कारवर्ग, योग प्रशिक्षण, शाळा असे अनेक प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक कार्य केले जाते.
विवेकानंद केंद्राचे संस्थापक मा. एकनाथजी रानडे यांनी केंद्राच्या पूर्णकालीन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ४० दिवसांची व्याख्यान-माला घेतली होती. त्या व्याख्यानमालेचे हे पुस्तकरूपी संकलन आहे.
हे पुस्तक फक्त विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांनी वाचावे असे नाही, तर कोणत्याही सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाचावे, एवढे महत्त्वपूर्ण आहे.
या पुस्तकात चार भाग आहेत. या चार भागांमध्ये ३० लेखांचा समावेश आहे.
१) आध्यात्मिक जीवनासाठी तयारी या भागात दोन लेख आहेत.
२) जीवनाचा प्रवासः स्वार्थाकडून निःस्वार्थतेकडे: या भागात नऊ लेख आहेत.
३) अध्यात्मप्रेरित सेवा संघटना या भागात आठ लेख आहेत.
४) संघटकांची साधना या भागात ११ लेख आहेत.
जीवनाच्या उषःकाली आपल्या जीवनाची योजना बनवता येणे ही मोठीच दैवी देणगी होय. आपल्यासमोर काही उद्दिष्ट नसेल, गंतव्यस्थान निश्चित केलेले नसेल, ध्येय निश्चित नसेल, तर आपण क्षणिक जीवन जगत असतो.
आपण शेकडो गोष्टी करू शकतो, पण त्यातील फक्त एकाचीच निवड करून ती गोष्ट कार्यवाहीत आणण्यासाठी, त्याचा योग्य तो आराखडा तयार करावा लागेल. त्या उद्दिष्टाच्या रोखाने व्यवस्थित वाटचाल सुरू केली, की स्वतःमधील अनेक सुप्त गुण आपल्या लक्षात येतील.
आकलनशक्ती, विचारातील लवचिकता, स्वतःवरील विश्वास, आत्मविश्वास असेल, तर वाटेल ते अडथळे येवोत, त्या अडथळ्यांवर मात करून आपण आपल्या ध्येयाप्रत निश्चित पोहोचू शकू.
आपल्या आयुष्यातील केवळ काही वर्षांचा कृतिशील वेळ आपल्याला मिळतो. तेवढ्या अवधीत आपले नियोजित रचनात्मक कार्य पूर्ण करावयाचे आहे. सांघिक वृत्तीने कार्य करीत असताना संकुचित मनोवृत्तीचे कवच भेदून स्थिरपणे, भयरहित, अविचलपणे कार्यरत असताना जरी अपयश आल्यासारखे वाटले, तरी निराशा किंवा उदासीनता येण्याचे कारणच नाही.
स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘तेच फक्त जगतात, जे दुसऱ्यासाठी जगतात. इतर सारे जगत असूनही मृतप्राय होत. दुसऱ्यासाठी जगणं म्हणजे काय, तर आपला वेळ आणि शक्ती इतरांसाठी खर्ची टाकणं. ‘
…… म्हणजेच ‘सेवा समर्पण’!
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈