सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “मृत्यू गरजेचा आहे का?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

एका राजाने शहराबाहेर, एका वृक्षाखाली बसलेल्या साधूला विचारले, _

“साधूमहाराज, मला अमर करू शकेल अशी दिव्य वनौषधी किंवा चांगले रसायन तुमच्याजवळ आहे का?“ 

साधू म्हणाला, “ हे राजा, हा समोरचा व त्यापलीकडील असे दोन पर्वत ओलांडून गेलास की, तुला एक सरोवर लागेल. त्याचे पाणी तू पी, म्हणजे अमर होशील. “ 

ते दोन पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी गेला. त्याचे पाणी पिण्यासाठी आपल्या हाताची ओंजळ करून सरोवरावर तो वाकला. तेवढ्यात त्याच्या कानावर कुणी तरी कण्हत असल्याचा आवाज आला. पाणी पिणे बाजूला ठेवून राजा आवाजाच्या दिशेने गेला. एक जर्जर माणूस एका झाडाखाली आडवा पडून कण्हत असलेला त्याच्या दृष्टीस पडला. राजाने त्याला कण्हण्याचे कारण विचारले. तो म्हणाला, या सरोवराचे पाणी प्यायल्यामुळे मला अमरत्व आले. परंतु वयाची शंभरी ओलांडताच माझ्या मुलाने मला घराबाहेर हकलून दिले. गेली पन्नास वर्षे मी या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत तळमळत पडलो आहे. आता माझी मुलं तर मेलीच, पण नातवंडेही मरायला टेकली असतील. हे बघावे लागू नये, म्हणून गेली पाच वर्षे मी अन्नपाण्याचा त्याग केला आहे. तरीही मी मरत नाही. ” त्या वृद्धाची करुण कहाणी ऐकून राजा मनात म्हणाला, “ छे! नुसत्या अमरत्वाला काही अर्थ नाही. म्हातारपणाशिवाय जर अमरत्व मिळालं, तरच त्यात मजा आहे. आपण त्याबद्दल साधूला माहिती विचारू. “

त्याने साधूकडे पर्याय मागितला. साधू म्हणाला, “ ज्या सरोवराकडे तू जाऊन आलास ना, त्याच्यापुुढे असलेला डोंगर ओलांडून तू पलीकडे गेलास, तर पिवळ्या जर्द फळांनी भरलेला एक वृक्ष तुला लागेल. त्या वृक्षाचे एक फळ तोडून तू खा. म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळेल. ”

साधूच्या सांगण्याप्रमाणे राजा त्या वृक्षापाशी गेला. त्याने एक पिवळे धमक फळही काढले. आता तो ते फळ खायला सुरुवात करणार, तोच जवळपास भांडण सुरू झाल्याचा आवाज कानावर पडला. एवढ्या दूर येऊन कोण भांडत असेल, या विचाराने राजा त्या लोकांजवळ गेला. तिथे त्याला चार तरुण आढळले. त्यातल्या एकाला राजाने भांडणाचे कारण विचारले, त्यावर तो म्हणाला, “आता मी अडीचशे वर्षांचा आहे. तरी माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले तीनशे वर्षांचे माझे बाबा, पूर्वापार मालमत्ता माझ्या स्वाधीन करत नाहीत. मग त्यांच्याशी भांडू नको तर काय करु.? “

राजाने त्या युवकाइतक्याच तरुण दिसणाऱ्या दुसऱ्या युवकाला विचारले, तर तो म्हणाला, “ अहो, माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले हे माझे साडेतीनशे वर्षांचे वडील आहेत. ते मला संपत्ती देत नाहीत, तर मी तरी मुलाला कुठून संपत्ती देऊ सांगा. ”

साडेतीनशे वर्षांच्या तरुणाकडे राजाने प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले असता, तो म्हणाला, “ मी तरी संपत्ती कुठून देणार? ही चूक माझ्या वडिलांची आहे. ते आता ४०० वर्षांचे आहेत. ”

यावर राजा म्हणाला, “ पण एवढी संपत्ती असताना तुम्ही डोंगर दऱ्यांमध्ये का वास्तव्य करताय? ” यावर पणाजोबा म्हणाले, “आमच्या घरात दिवसरात्र मालमत्तेवरून भांडणे होत असल्याने, गावकऱ्यांनी आम्हाला गावाबाहेर हाकलून दिले आणि आम्हाला इथे राहावे लागत आहे. ”

तो प्रकार पाहून राजा म्हणाला, म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळाले, तर तेही नकोच. कारण ते जास्त भयंकर आहे. राजा साधूजवळ परत आला आणि म्हणाला, “ तुम्ही मला मृत्यूचे महत्त्व पटवून दिलेत.

मृत्यू आहे म्हणून जगात प्रेम आहे, अन्यथा जवळचीच माणसे आपल्याच माणसांच्या जीवावर उठली असती. ”

साधू म्हणाला, “ मृत्यू टाळण्यापेक्षा मिळालेला दिवस आणि मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगून घे. त्यातच खरा आनंद आहे आणि मृत्यूनंतर उत्तम गतीही आहे! “

स्वतः बदला, जग बदलेल!!

 १) स्नान करताना नाम घेतले तर ते ‘तीर्थस्नान’ होईल!

 २) भोजन करताना नाम घेतले तर तो ‘प्रसाद’ होईल!

 ३) चालताना नाम घेतले, तर ती ‘तीर्थयात्रा’ होईल!

 ४) स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो ‘महाप्रसाद’ होईल!

 ५) झोपताना नाम घेतले तर ती ‘ध्याननिद्रा’ होईल!

 ६) काम करताना नाम घेतले तर ते कर्म ‘भक्ती’ होईल!

 ७) घरात नाम घेतले, तर ते घर ‘मंदिर’ होईल!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments