सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ धुकं – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर

डॉ. हंसा दीप

आज नक्कीच विटेला वीट टक्करणार. आरडा-ओरड्याचा आवाज येणार. घरात भांडणं होणार. घटनेची गंभीरता लक्षात घेता तीक्ष्ण आणि धारदार वाद-वितंडवाद होणार, याची सगळ्यांना खात्री होती. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही.

भिंती शांत होत्या. कुठेच भड-भड, खड-खड झाली नाही. घरातली सारी भांडी गुपचूप आपआपल्या जागी बसलेली होती. रोटयांच्या कडाही चमकत होत्या. जाळल्याची कुठे नामोनिशाणीही नव्हती.

इतकी शांतता का होती? अवीने गाडी धडकवली होती. पांढरी मर्सिडीज गाडी. बाबांची जान आणि आईची शान. वादळ येऊ घातलं होतं. ‘कितीदा सांगितलं तुला, गाडी नीट ल्क्षपूर्वक चालव. हजारदा सांगितलं तुला, गाडी चालवताना रस्त्याकडे फोकस कर. फोनवर बोलण्यास मनाई आहे. ऐकतं कोण? इयर फोन लावून बोलत असतोस. लक्ष विचलित होणारच ना! ’ 

‘आता घ्या. इतक्या चांगल्या, महागड्या गाडीची वाट लावलीस. ’

‘गाडीचा नेम ब्रॅंड पाहून दुरुस्त करणारे वाटेल ती किंमत सांगतील! कुठून आणायचा इतका पैसा?’ 

हे सगळं आईकडून बोललं जायचं होतं. बाकी सगळ्यांनी गप्प बसून ऐकायचं होतं. रागारागाने बाबा बाहेर निघून जाणार होते. अवीला बाईक स्टार्ट करून निघून जायचं होतं. इलाला आपल्या पुस्तकात डोकं खुपसून बसायचं होतं. पण क्रियेची प्रतिक्रिया न होता घर शांत होतं.

अवीने खुणेनेच बाबांना विचारले, ’ आई ठीक आहे ना?’

बाबांनी मूकपणेच उत्तर दिले, ‘थांब जरा, आत्ता सुरू होईल तुझी खिचाई! ’

अवी विचार करत होता, ‘जे बोलायचं आहे, ते लवकर बोलून टाक आई. हे बेचैन क्षण लवकर संपूदेत आणि मला इथून लवकर बाहेर पडता येऊ दे. ’ 

अवी, बाबा, आणि इला तिघे वाट वाट होते. डोळ्यांच्या कोपर्‍यातून बघत होते. की आईचा राग आत उसळून उसळून लाव्हासारखा फटकन बाहेर येईल. तेव्हा त्यात जळून तिघांच्या अंतरातील गर्मी थंड होईल.

बाबांनी आईला उकसत म्हंटलं, ’अग, ऐकलस का? याने गाडीने धडक मारली. सगळं बॉनेट खराब झालं! ’

‘हं! ’

‘आणि बाबा, तुम्ही मिठाई खाताय. ’ अवी मोठ्याने म्हणाला, म्हणजे आईला नीट ऐकू येईल.

‘होय. गाडीचं टेंशन आहे. टेंशनमध्ये गोड खाल्ल्याने शांत वाटतं. ’ बाबांनी विनाविलंब आपली बाजू मांडली.

आई, जशी पुतळाच बनली होती. भावविहीन चेहरा. जसं काही कुठल्याही गोष्टीचा तिच्यावर परिणामच हहोत नाहीये. आईच्या या नि:शब्दतेने घराच्या भिंती विरूप वाटू लागल्या होत्या. एकदम उजाड. अपमान, उपहास, टीका-टोमणे, आरडा-ओरड्याचा तो कारखाना, न थांबणार्‍या मशीनसारखा धडधड चालायचा, तो आज ठप्प झाला होता. एक तास असा गेला.

घरच्या तिन्ही सदस्यांनी बाहेरच्या खोलीत जाऊन मीटिंग घेतली. ‘आईचं असं गप्प बसणं कुठल्या आजाराचं लक्षण तर नाही न?’ 

‘चुकून कुठलं चुकीचा औषध तर घेतलं नाही ना, जे डोक्याच्या नसाच बदलून टाकेल. ’ 

‘बाबा काही तरी चुकीचं घडलय आईच्या बाबतीत. ‘ 

‘आपल्याला लगेच हॉस्पिटलमध्ये जायला हवं’ आईच्या लाडक्या इलाच्या कपाळावर चिंतांचं जाळं उमटलं.

प्रत्येक वेळी ‘ठीक आहे, ’ असं आईचं उत्तर सामान्य नव्हतं. दोन्ही मुले आणि त्यांचे बाबा हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत होते. बाबांसाठी आईच्या खांद्यांचा मोठा आधार होता. तिचं मुलांना रागवणं, ओरडणं बाबांचा राग बाहेर निघण्याला मादत करत होतं. एक तर स्वत: मुलांच्या नजरेत वाईट ठरत नसत. पण पत्नी बोलत असल्यामुळे त्यांचं ब्लडप्रेशर सामान्य होत असे. जेव्हा स्वत: बोलायचे, तेव्हा बी. पी. वाढायचं आणि मग नॉर्मलला यायला खूप वेळ लागायचा. त्यामुळे त्यांच्या गप्प बसण्याने एकाच वेळी अनेक फायदे होत असत.

आज मुलांची आई गप्प बसली होती. बाबांचं सगळं लक्ष तिचाकडे होतं. अनेक विचारांनी गोंधळलेलं मन कुठल्याही ठोस परिणामाशी येऊन पोचत नव्हते. अखेर, तिला झालं तरी काय? इतकी विरक्ती फक्त मृत्यूच्या आधी येते. मग काय, तिचा शेवट जवळ आला की काय? तिच्याशिवाय हे घर कसे चालेल? खाणे-पिणे, कपडे-लत्ते, रागावण्या-ओरडण्यापासून ते अनुशासनापर्यंतची जबाबदारी बाबांना आणि मुलांना पेलवणारी नाही.

आईच्या विचारात आज सूर्य पश्चिमेकडे उगवला होता. स्वत:ला तोलून बघू लागली होती. घरातल्या तिन्ही सदस्यांची काळजी घेता घेता थकली होती. घराची गाडी रुळावर ठेवण्याच्या प्रयासात तिचा स्वत:चा स्वभावाच बदलून गेला होता. रागावणं, संतापणं, ओरडणं हे सगळं, सतत चालू राहायचं. सारी इंद्रीय, चैतन्यावस्थेतही चेतनाशून्य होऊन जायची. आतला देव झोपायचा आणि दैत्य जागा व्हायचा. तेव्हा घर, घर न होता त्रासघर बनायचं. आईला स्वत:ला या वागण्याचं दु:ख व्हायचं. आपाल्यांच्याच वर रागावून ती कशी खुश होणार? तिला स्वत:चाच राग यायचा. मुलांची काळजी वाटायची. दोन्ही तर्‍हेने ती तुटून जायची. सगळ्यांना खूश बघण्याच्या प्रयत्नात सगळ्यांना दु:खी करायची आणि स्वत:देखील दु:खी व्हायची.

आज पूजा करून उठली, तेव्हा ती खूप थकलेली होती. शारीरिक नाही, मानसिक थकवा होता तो. आता तिला शांती हवी होती. तिने विचार केला, का ओरडायचं, ? कुणासाठी ओरडायचं, ? माणसाने चूक केली, स्वत: समजून घ्यावी. नाही समजला तर ठोकर खाईल. पडला, तर आपला आपण उठेल आणि स्वत:ला सावरायचा प्रयत्न करेल. जो करेल, तो भोगेल. मग जाणेल. आपलेपणालाच निष्ठूरतेने अस्वीकृत केलं. जेव्हा दु:खही राहिलं नाही, तेव्हा रागही उडून गेला. त्यामुळेच आज गाडीने ठोकर मारल्याची बातमी ऐकूनही ती गप्प बसली. शांत रहाण्याचा हा पहिला अनुभव होता. ओरडण्याने आज पर्यंत काही फरक पडला नव्हता. जे व्हायचं होतं, ते होऊन गेलं होतं. काहीही म्हंटलं, तरी खर्च काही थांबणार नाही. शांतपणे तिने ही बातमी पचवली. आतल्या आत खूप गुदमरल्यासारखं झालं. स्वत:शीच संघर्ष केला. गप्प बसण्याची शपथ घेतली. जर मन शुद्ध असेल, तर ते काम चांगलंच असतं. पवित्र असतं. आणि…. आणि एका नव्या आईचा जन्म झाला.

— क्रमशः भाग पहिला 

मूळ हिन्दी कथा – “कुहासा“

मूळ लेखिका : डॉ. हंसा दीप, कॅनडा 

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817  ईमेल  – [email protected]

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments