श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

रणजित देसाई ☆ श्री प्रसाद जोग

रणजित देसाई

जन्मदिन : ८ एप्रिल,१९२८

कथालेखक, नाटककार म्हणून रणजित देसाई यांचा परिचय असला तरी एक उत्कृष्ट दर्जाचे कादंबरी लेखक म्हणूनच महाराष्ट्राला आवडलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व होते त्यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड आहे. माध्यमिक शाळेत असतानाच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली.

त्यांचे कथा लेखन कोल्हापूरच्या ‘महाद्वार’ मधून प्रसिद्ध होत असे. त्यांच्या ‘भैरव’ या कथेला ‘प्रसाद’ मासिकाने घेतलेल्या कथा स्पर्धेत पारितोषिक मिळाले आणि त्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या कथालेखनाला सुरुवात झाली. ‘रुपमहाल’, ‘कणव’, ‘जाणे’, ‘कातळ’, ‘गंधाली’, ‘कमोदिनी’, ‘मधुमती’, ‘मोरपंखी सावल्या’ इ. त्यांचे अनेक कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ग्रामीण आणि सामाजिक विषयावरच्या कथांमधून आलेल्या शैलीमुळे त्यांचा ठरावीक असा वाचक वर्ग तयार झाला. ग्रामीण जीवनावरील त्यांच्या कथा या एक प्रकारे चित्रकथाच होत्या. इतकी त्यांची जिवंत मांडणी होती. ‘बारी’, ‘माझं गाव’ या कादंबर्‍या सुरुवातीला त्यांनी लिहिल्या.

त्यानंतर १९६२ साली ‘स्वामी’ ही थोरल्या माधवराव पेशव्यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी प्रसिद्ध झाली आणि तिने लोकप्रियतेचे शिखर गाठले. ‘स्वामी’ मुळे एक श्रेष्ठ लेखक म्हणून रणजित देसाईंचे नाव सर्वतोमुखी झाले. एखादी कादंबरी वाचकांनी उचलून धरली म्हणजे काय? हे स्वामी कादंबरीच्या आवृत्या ची लांबलचक यादी वाचल्यावर लक्षात येते . मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे  ते अजुनंच नम्र झाले आणि एका आवृत्तीच्या सुरवातीला त्यांनी लिहिले, 

अहंकाराचा वारा  ना लागो माझ्या चित्ता.

त्यांच्या स्वामी कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.

त्यानंतर शिवाजी महाराजांवर लिहिलेली ‘श्रीमान योगी’ ही कादंबरीसुद्धा अतिशय लोकप्रिय झाली आणि त्यानंतर वाचक वर्ग रणजित देसाई यांच्या नवीन येणार्‍या कादंबरीची वाट पाहू लागला.

‘लक्ष्यवेध’, ‘पावनखिड’, ‘राजा रवी वर्मा’ या सर्व कादंबर्‍यांच्या जोडीनं विशेष गाजलेली, त्यांनी लिहिलेली आणखी एक कादंबरी कर्णाच्या जीवनावरील ‘राधेय’ ही आहे. अशा प्रकारच्या ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबर्‍या लिहिणे ही त्यांची हातोटीच झाली होती. रणजित देसाईंनी पुढील काळात काही नाटकंही लिहिली. ‘रामशास्त्री’, ‘स्वरसम्राट तानसेन’, ‘धन अपुरे’, ‘वारसा’, ‘स्वामी’ आणि त्यातही ‘गरुडझेप’, ‘कांचनमृग’ आणि ‘हे बंध रेशमाचे’ ही नाटकं विशेष गाजली. या व्यतिरिक्त ‘नागीण’, ‘रंगल्या रात्री अशा’ ‘सवाल माझा ऐका’ इ. चित्रपटांच्या पटकथाही त्यांनी लिहिल्या. १९७७ साली झालेल्या गोरेगाव येथील मुंबई उपनगर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर बडोदे साहित्य संमेलनाचे १९६५ मध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषविले. १९८३ मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मानही त्यांना मिळाला.

हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यावर ज्या लोकांना फाळणीमुळे विस्थापित व्हावे लागले त्यांना मध्यवर्ती ठेवून शास्त्रीय संगीत गाणाऱ्या कुटुंबाची होरपळ त्यांनी ” हे बंध रेशमाचे” या नाटकात दाखवली.या नाटकाचे भाग्य काही औरच होते.याची श्रेय नामावली पहा.

दिग्दर्शक : मधुकर तोरडमल

गीते : शान्ता शेळके

संगीत : पंडित जितेंद्र अभिषेकी

नेपथ्य : रघुवीर तळाशिलकर

कलाकार : वसंतराव देशपांडे, रामदास कामत,जोत्स्ना मोहिले ,बकुळ पंडित,क्षमा बाजीकर

निर्माता : मोहन वाघ.

यातल्या शान्ताबाईंच्या गाण्यांनी नाट्य रसिकांवर टाकलेली मोहिनी आजही कायम आहे

आज सुगंध आला लहरत,

का धरिला परदेश,

काटा रुते कुणाला,

छेडियल्या तारा,

दैव किती अविचारी,

विकलं मन आज झुरत असाहाय्य,

संगीत रस सुरस.

हे बंध रेशमाचे या नाटकात लावणी गात असलेला प्रसंग आहे ती लावणी देखील लोकांना खूप आवडते >>दिवस आजचा असाच गेला उद्या तरी याल का अन राया अशी जवळ मला घ्याल का << क्षमा बाजीकर यांनी अगदी ठसक्यात ही लावणी म्हटली आहे .

रणजीत देसाई यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments