प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 जीवनरंग 🌸

☆ वंध्यत्व… भाग – २ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

(गजाभाऊ काय न्हाय तुझ्या नातवाला बघाय आलो व्हतो. अस गजाभाऊ म्हनला. तस नाम्यांनी चहाची अर्डर सोडली,  अन नातवाला बी भैर घेऊन यायल सांगीतलं.) इथून पुढे —- 

चहा झाला , नातवाला धुपट्यात गुंडाळून नाम्याच्या बायकोनं सोप्यात आणलं अन त्याला सुपात गजाभाऊ समोर ठेवलं . तस गजाभाऊ न शंभर रुपयांची नोट तीन आठवड्याच्या बाळाच्या मुठीत ठेवली .

बाळाला सरस्पतींन मुलाला सुपासकट आत न्हेल . मग गजाभाऊन प्रश्न केला ? नाम्या तुझ्याबी घरात

चारपाच वर्स पाळणा हलत नव्हता , तू काय केलंस ? तस नाम्या म्हणाला आर माज्या सरस्पतीच्या भावान , माझ्या मेव्हन्यांनं सूनबाईला मिरजला दाखवाय दवाखान्यात नेली . अन औषधांचा मारा चालू केला . तस दोघबी नवरा बायकू मिरजला एक वरीस खेट घालत व्हत ! तवा कुठं हे दिस बघाय मिळालं . गजाभाऊंन मिरजचा पत्ता घेतला . दुसऱ्याच दिशी , गंप्या अन गोदावरीला टकोटाक मिरजचा दवाखाना गाठला .  पण गप्प बसला न्हाय .

मरणाचा उन्हाळा ! उन्ह जरा मावळतीला कल्याल ! सावल्या लांब लचक व्हत हुत्या ! कागवाड तस मोठं गाव , शिरमंत पटवर्धन सरकारच संस्थानिक गाव ! पण गावाला यष्टी स्टॅन्ड नव्हतं ! गावच्या येशी भैर मोती तळ ! आता त्याला मोतीतळ का म्हणत्यात कुणाला बी म्हैत नव्हतं !  त्या तळ्याच्या म्होर एक फर्लांगवर , मोठं लिंबऱ्याच झाड , ततच समद्या यष्टी बस थांबत व्हत्या ! झाडाला लागून एक हॉटल , त्याच्या म्होर म्हमद्याच पानाचा ठेला . बाजूला बाजी मोरेच सायकलीच दुकान . दुकानाम्होर भाड्याने द्यायच्या सायकली , तीस पैसे भाड तासाला . पंचर झाली तर पन्नास पैसे ज्यास्त !

तेवढ्यात येक यष्टी मिरजकडून अथणी कड जाणारी आली . गाडी थांबली तस धुरळा उडाला .

गाडीतुन बरीच लोक उतरली . सगळ्याच तोंड घाम्याजलेली . अन मळकट ! मरणाचा  उन्हाळा! कसबस धोतर्याच सोगा पकडून गजा भाऊ उतरले . त्यांच्या मागोमाग त्यांची सून गोदावरी अन मुलगा गंप्या पण उतरला .

पडक्या सिनेमा टाकीज मधून गेलेल्या रस्त्याने आडवी वाट करत जाऊ लागले . तस बाजीराव न त्यांना हटकले , म्हनला तात्या असल्या उन्हात कुठं गेला व्हता ?  अस म्हनताच गंप्याला राग आला , पण गप्पगार बसला . बोलणार कस ! त्यावर गजाभाऊ म्हनलं काय न्हाय पावण्याच्या लग्नला गेलं व्हतो . गजाभाऊ मनातल्या मनात त्या बाजीला शिव्या हसडत व्हते . नसत्या चांभार चवकश्या लागतात ह्यांना!

येशीतन मारुती देवळा म्होरन चालत वरच्या डांबर कट्ट्यावरून त्यांनी वळसा घातला अन घर जवळ केलं . चार पायऱ्या चढून सोप्यात येऊन बसल . तोंडातील तंबाकू काढली . डोक्यावरील काळी टोपी बाजूला करून , हातानी घाम बाजूला केला . तेवढ्यात राधाकाकू म्हणजे गजाभाऊ च्या पत्नी मठातील गार पाणी आणून गजाभाऊ म्होर ठेवलं . तस गजाभाऊ नी तांब्या तोंडाला लावून गट गट आवाज करत पाणी खतम केलं . अन गार फरशी वर आडवे झाले !

गजाभाऊ कदम म्हणजे मोठी गावची आसामी ! गावात चिरेबंदी दुमजली  वाडा , मोठं ऐसपैस आंगण ! अंगणात पडवी त्यात खिल्लारी बैलजोडी ढवळ्या अन पवळ्या .  चार म्हसर , दोन गायी , दोन कालवड . अंगणातन वरच्या बाजूला चौसोपी कट्टा अन सोपा . मधोमध मोठा दरवाजा . बाजूला चबुतरा , माजघर , माजघरातल्या आतल्या बाजूस चार खोल्या . कोठीच्या खोलीत धान्यांनी भरल्याली पोती .

मधल्या बाजूला ऐसपैस कडेपाट ! त्यावर राधकाकू बसून हिंदोळे घेऊ लागल्या !

गंप्या नवसाचा पोरगा ! एकुलता एक ! त्याच लगीन होउन बारा वरीस उलटली तरी बी पाळणा हलीत नव्हता ! त्यासाठी राधा काकूंनी लै उपाय केलं , पण गोष्ट काय जमून येत नव्हती !

देव देवरूशी , अंगारे धुपारे , समद करून झालं व्हतंच ! कोण काय म्हणतील ते करत व्हती बिचारी .  चोळाप्पा मंत्रिकाकडे तर त्यांनी खेट घातलं ! त्यो सांगिल ते केलं  . उलट्या पखाची कोंबडी उतरून टाकली . समद झालं पण वीस एकर रानाला वारस घावंत नव्हता !

यल्लमाचा  जग आणून घरी बसवला ! देवीचा गोंधळ झाला पण , काय बी उपेग झाला न्हाय .

गंपू दादा अशी कोणतरी हाळी मारली तस त्या तंद्रीतन भानावर आल्या ! गोदानी चहा आणून हातात ठेवला . मग त्यानी कडेपाटवर बसून चहा घेतला भैर रानातला सालगडी गोप्या अन गोप्याची बायको आली व्हती . दोघांना एकदम बघून गजाभाऊ चमकलेच !

गजाभाऊ म्हनलं आज जोडीने आलायस ? त्यावर काय न बोलता गप्पगुमान आत माजघरात गेले . गोप्या गेली कित्येक वर्स त्यांचा घरगडी व्हताच . वहिवाट पण लै दिसची व्हती . गोदानी समद्याना चहा दिला . तस राधकाकू म्हंल्या आज काय काढलंय बाबा !

त्यावर गोप्याची बायकू म्हणली , काकू एवढं समद करतायसा एकडाव मरगुबाईल का जात न्हाईसा . तस राधकाकू म्हंल्या समद झालाय बघ . तीत बी जाऊन देवीची ओटी भरून पाळणा पण बांधून आले . आता देवच डोळे झाकून गप्प बसलाय तर आम्ही काय करणार . आमच्या हातात जेवढं जेवढं होत ते समद केलं . आता भार देवावर च !

पुढं गंप्या अन गोदा जवळपास वरीसभर,  मिरजला औषधाला जात व्हती , हे गावच्या लोकांना बी कळलं . अन एकदिस असा आला की गजाभाऊ अन राधकाकू हंरकून गेल्या . त्यांना काय करावं काय नकु अस झाल्याल .

कारण बी तसच व्हत , गोदाला दिस गेलं व्हत , अन तिची चोर चोळी करायचा घाट गजाभाऊ नी आखला व्हता . तीन महिन्याच्या आत चोरचोळी केली अन आख्ख्या गावाला जेवणाच

आवतान बी दिल !

— समाप्त — 

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments