सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

वसंत वैभव ☆ सौ कल्याणी केळकर बापट

फेब्रुवारी महिना हा घरातील लग्नकार्यामुळे खुप जास्त गडबडीत गेला आणि आता मार्च महिना तर कायमच आम्हा बँकर लोकांसाठी धावपळीचाच. मात्र फेब्रुवारी महिना आणि मार्च महिन्याची सुरवात ही भ्रमंती साठी एकदम बेस्ट. ह्या दिवसात गारठा तर कमी होतो पण उन्हाची काहीली सुध्दा सुरू झालेली नसते. त्यामुळे हा मोसम फिरण्यासाठी खासच.

तसही ह्या मोसमामध्ये जरा शहराबाहेर भटकंती करण्याची मजा काही ओरच.मस्त सगळीकडे पळस फुललेला असतो.पळस म्हणजे अफलातून सौंदर्याचे काँम्बीनेशन.त्याचा तो मखमली केशरी रंग, त्या केशरीरंगाला साजेसा शेवाळी हिरवा पर्णसांभार,आणि ह्या सगळ्यांनी बनलेला त्याचा लफ्फेदार तुरा,खरचं वेडं लावतो अक्षरशः. एखादा ह्या फुलांचा गुच्छ खूप सुंदर भासावा आणि लगेच दुस-या गुच्छाकडे नजर टाकावी तो दुसरा त्याहुनही सुंदर भासावा,अशी ही सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण करणारा हा पळसाच्या फुलो-याचा आपला फेब्रुवारी, मार्च महिना हा खासच. अमरावती जवळ पोहो-याच्या जंगलात टिमटाळ्याला ह्या केशरी फुलांचे विस्तीर्ण पसरलेले जणू पठारच आहे असे म्हणतात. त्या सौंदर्य स्थळालाही एक दिवस निश्चितच भेट देईनच.पळसाचे नानाविध रंग असतात असे म्हणतात पण ज्याप्रमाणे नानारंगाच्या पैठण्या असल्या तरी पैठणी म्हंटली की डोळ्यासमोर ती जांभळट रंगाची टिपीकल पैठणीच उभी राहते त्याचप्रमाणे पळसाचे फुलं म्हंटले की ते मखमली केशरीच.

अजून जरा गावाबाहेर शेतांच्या बाजूला भटकंती वळवली तर अगदी इटुकल्या पिटुकल्या बाळकै-या झाडांना लटकून हवेच्या झोताबरोबर हिंदोळे देत आपल्याला खुणावत असतात.बाळकै-या बघितल्या की खूप द्विधा मनस्थिती होते.त्यांचं ते अजून पूर्ण विकसित न झालेलं,पिल्लासारखं, अवखळ रुप आपल्याला त्याला तोडण्यासाठी हात लावण्यापासून दूर खेचतं,तर त्याची किंचीत तुरट,आंबट चव ही जिभेवर रेंगाळायला मोहात टाकते डेरेदार लटपट लागलेल्या आंबट चिंचानी लदलदलेले झाड बघून अगदी दिवसभरलेली पहिलटकरीण वा लेकुरवाळी माहेरवाशीण घरी आल्याचा फील येतो.

खरचं कारमध्ये ड्रायव्हिंग सिटच्या बाजूला बसून, खिडकी उघडी करून अलवार मंद हवेच्या झुळुका अंगावर झेलतं,वा-यामुळे डोळ्यांवर येणाऱ्या अवखळ केसांच्या बटांना दूर सारतं फुललेल्या केशरी पळसाच्या सौंदर्याचे मनमुराद निरीक्षण करणे ह्यासारखा दुसरा आनंद नाही हे त्याक्षणी तरी वाटतं.

ह्या सौंदर्याच्या बरोबरीनेच वसंत ऋतू हा प्रेमाचे प्रतीक. कोणाचा व्हँलेटाईन तर कोणाला भारुन टाकणारी वसंतपंचमी ह्याच महिन्यातील.फेब्रुवारी महिना हा आम्हां नोकरदारांसाठी पण जरा आवडता महिना.अठ्ठावीस एकोणतीस दिवसाचा हा महिना का कोण जाणे पण लौकर आला आणि लौकर गेला असा भासणारा हा मास.  ह्या आवडत्या फेब्रुवारी मासाचा,पळसाच्या सौंदर्याचे आणि प्रेमाच्या वसंतपंचमी चे काहीतरी अनोखे नाते मात्र असते.ह्या निमित्ताने मी मागेच केलेली एक रचना खालीलप्रमाणे…

सुरु आहे सध्या फेब्रुवारी मास,

प्रेमीजीवां साठी पर्वणी खास ,

आसमंतात दरवळे प्रेमाचा सुवास,

खरेच असेल प्रेम की निव्वळ आभास?।।।

 

काहीवेळा जाणवे विरहातही गहिरे प्रेम,

कधी उपभोगापेक्षा  त्यागातही भासे प्रेम,

कधी अंतरातील दूरी घालवे हे प्रेम,

स्वच्छ नजरेने अनुभवले तरच कळेल हे पारदर्शी प्रेम।

 

प्रेमात असे ताकद, प्रेमात अनोखी शक्ती,

न्यारी असे राधेची श्रीकृष्णावरील भक्ती,

ना चाले ह्यात कधीच कुणाची सक्ती,

खरचं प्रेम ही नितांतसुंदर अनुभूती ।।।

 

प्रेमात सगळंच आपलं असतं ,

तुझं माझं काही नसतं,

पाडगावकर म्हणालेच ना हे  सेम टू सेम असतं,

सगळ्यांचचं सेम टू सेम असतं ।।।।।

 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments