सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ ‘धर्म…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

धर्म म्हणजे काय ?

तर माझ्या मते धर्म म्हणजे एक आदर्श जीवन पद्धती आहे.

नियम आणि चौकटी धर्माने आखून दिलेल्या आहेत.

त्यांचे योग्य तऱ्हेने पालन करून जीवन जगावे .असे जीवन आनंददायी आहे .

 

अगदी सकाळी ऊठल्यानंतर  अंथरुणावरून खाली उतरण्याच्या आधीच गादीवर बसून  …

प्रार्थना केली जाते…

“कराग्रे वसते लक्ष्मी 

करमुले सरस्वती

करमध्ये तु गोविंदा

प्रभाते कर दर्शनम्

समुद्र वसने देवी

पर्वत स्तन मंडले विष्णुपत्नी नमोस्तुभ्यमं 

पादस्पर्श क्षमस्व मे…”

हे पृथ्वी माते माझ्या पायांचा तुला स्पर्श होणार म्हणून क्षमा याचना करून दिवसाची सुरुवात करायची.

 

हे म्हणताना शब्दातून आपोआप लीनता येते. आपली कृतज्ञता दाखवली जाते.

हात जोडले जातात..

नंतर नित्यकर्म सुरू….

आंघोळ करून देव पूजा …

तेव्हा मग स्तोत्र – मंत्र आरती……..

 

मात्र हे नुसतं म्हणायचे नसतात ..

त्यात शिकवण असते …मनाची समजूत असते… 

तसे देवाचे प्रेम आणि माया पण असते .

त्याचा अर्थ आणि मुख्य म्हणजे भावार्थ समजून घेऊन ती म्हणायची असतात.

 

संकटात दुःखात मनाला त्यांचा फार मोठा आधार असतो.

फुलांनी सजलेल देवघर,मंद तेवणारी समई,उजळलेली निरांजन बघताना मनात  सदभावना दाटून येते.

 

सकाळ अशी सात्विकतेने सुरू झाली की दिवस आपोआप निरामय आनंदात जातो.

हे नुसतं म्हणणं नाही तर याचे पाठांतर पण हवे ….

यासाठी अभ्यास हवा..

त्यासाठी आवर्जून वेळ काढायला हवा …

 

आणि मग ते स्तोत्र – मंत्र शांतपणे डोळे मिटून एकांतात म्हटले की मिळणारा आनंद हा शब्दात सांगता येत नाही .

त्याचा अनुभव घ्यायला हवा.

 

जेवताना…

“वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे….”.म्हणावे..

मग ते साधे जेवण होत नाही तो  यज्ञ कर्म  होतो हे …  मार्मिकपणे सांगून ठेवले आहे .

याला आयुर्वेदाचा आधार आहे….

“सीताकांत स्मरण जय जय राम…”

 म्हटल्यानंतर त्या अन्नाकडे बघायची आपली दृष्टी बदलते .

अन्न उत्तम रीतीने पचते .घरच्या गृहिणीने कष्ट घेऊन ते बनवलेले असते. त्याचा आपोआप मान राखला जातो .पवित्रता जपली जाते .

 

म्हणूनच त्याला पूर्णब्रह्म म्हटलेले आहे …..

 

हे रोज म्हणायला जमणार नाही पण सणावारी …रविवारी म्हणून तर बघा आपला आपल्यालाच आनंद वाटतो.

 

शाळेत आजही सरस्वती मातेला प्रथम वंदन केले जाते .

“या कुंदेंदु तुषारहार धवला

या शुभ्र वस्त्रावृता…”

असे म्हणून सरस्वतीची प्रार्थना केली जाते .तिच्याकडे आमची जडता (अज्ञान) दूर कर अशी विनवणी करायची. मात्र त्यासाठी प्रयत्न आपण करायचे आहेत.  आपल्याला अभ्यास करायचा आहे हे लक्षात ठेवायचे आहे.

 

मनाचे श्लोक ,अथर्वशीर्ष ,पसायदान हे शाळेत म्हणून घेतले जाते.पाठ करून घेतले जाते.

 कदाचित त्या वयात अर्थ लक्षात येत नाही .पण मोठे झाल्यानंतर तो आपोआप बरोबर कळतो… समजतो..

हेच ते संस्कार….

हुरहुर  लावणारी संध्याकाळ… दिवेलावणीची वेळ  झालेली असते… तेव्हा देवासमोरचा दिवा लावला जातो … तेवढ्या मंद प्रकाशाचाही आधार वाटतो…क्षणभर हात जोडले जातात.

“शुभंकरोती कल्याणम्…” म्हणायचं ..आरोग्यम् धनसंपदा हे किती वर्षांपूर्वीच आपल्याला सांगून ठेवलं आहे .सवयीने आपण ते म्हणतो पण ते कृतीतही यायला हवं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

निरामय आरोग्यासाठी आपला आहार विहार योग्य असायला हवा. जाताजाता केवढी शिकवण दिलेली आहे. आपण सहजपणे नेहमी  म्हणतो म्हणून आपल्याला त्याची किंमत कळत नाही…

 

रात्री झोपायच्या वेळी शरण आलेल्या लोकांचे क्लेश दु:ख दूर करणाऱ्या गोविंदाला नमस्कार करायचा .

“कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः”

 

असा संपूर्ण दिवस प्रार्थनेने संस्काराने आपोआप बांधला गेला आहे.

त्याचे एक संरक्षित आवरण आपल्या भोवती असते. त्यात आपल्याला सुरक्षित वाटते.

एक अदृश्य शक्ती आहे ती मला सांभाळते आहे… हा मनात विश्वास असतो .

संकट येत नाही तोपर्यंत काही वाटत नाही .मात्र ते आले की आपण आपोआपच परमेश्वराला शरण जातो. मस्तक टेकवले जाते. हात जोडले जातात.. त्या क्षणी त्या एकाचाच आधार आहे  हे आपल्या अंतरंगातून आपल्याला जाणवते.

.. आणि मग त्याची प्रार्थना अजूनच आर्ततेनी  केली जाते. 

मनापासून जेव्हा आपण शरण जातो तेव्हा ती प्रार्थना सफल होते..

 

 आत्ताच्या या धकाधकीच्या जीवनात इतकं सगळं म्हटलं जात नाही.

 हेही तितकच अगदी खरं आहे .

नाही म्हटलं गेलं तरी चालेल …

पण दिवसातून एकदा अगदी मनापासून त्याला हाक दिली त्याची आळवणी केली तरी ती त्याच्या पर्यंत पोहोचते….

 किती वेळा काय काय म्हणतो… हेही महत्त्वाचे नाही .

आतूनच जाणीव होऊन खरं खरं  त्याच्याशी बोलायचे…

 त्याला सांगायचे….

अभ्यास वाढला की सांगणे पण कमी होते…

तो सर्वज्ञच आहे….

याची जाणीव होते..

 

इतके सारे ज्ञान भांडार आपल्या हाताशी आहे. पूर्वजांनी हा ठेवा  देऊन ठेवलेला आहे.

 

 शब्दांचा फार मोठा आधार असतो. त्या जगनियंत्त्याला शरण जाऊ…

आपली विनवणी त्याच्यापर्यंत पोहोचेलच….. तो विश्वास मात्र मनात हवा.

तो असला की पुढचे सगळे सोपे होते.

“सर्वेपि सुखिनः:सन्तु सर्वे संन्तु निरामया:

सर्वे भद्राणी  पश्यन्तु मा कश्चित दुःखमाप्नुयात…”

.. .. रात्री झोपताना सर्वांचे कल्याण व्हावे कोणी दुःखी असू नये अशी प्रार्थना करायची.

आपल्याही नकळत आपला दिवस असा जातो…..

 

हाच तो धर्म…… प्रत्येकाचा आपला आपला धर्म असतो.आणि तो त्याप्रमाणे वागत असतो.

सर्व धर्मात हीच शिकवण असते .. शब्द फक्त बदलतात…..

 

यासाठी  दिवसाच्या चोवीस  तासांतील फक्त काही मिनिट आपल्याला  द्यावी लागतील.

 प्रत्येकाला सुखी शांत आणि आनंदी जीवनाची आस असते, तसंच प्रत्येकाचा ही एक स्वतःचा असा

” धर्म.”…….असतो.

मला काय म्हणायचे आहे तुम्हाला समजले असेलच…. 

त्याप्रमाणे आचरण करून निश्चिंत  जीवन जगूयात. 

शुभं भवतु…..

श्री कृष्णार्पणमस्तु…. 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments