श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “घरभरणी !” भाग -१ श्री संभाजी बबन गायके 

“ब्राह्मणाला फसवलंस! तुझा वंशखंड होईल,इस्कोट होईल सगळ्याचा!” सुदामने भरबाजार पेठेच्या मोक्याच्या जागी बांधलेल्या नव्या कोऱ्या घरासमोर उभे राहून गोविंदभट अगदी सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाले तसे सुदामच्या घरातले सगळेच बाहेर आले.

कालच सुदामने साग्रसंगीत गृहप्रवेश,वास्तुशांती, सत्नारायण इत्यादी धार्मिक विधी करून घेतले होते. रात्री सात ते नऊ कीर्तन कार्यक्रम झाल्यावर येईल त्याला जेवू घातले होते.

वडिलांच्या माघारी सुदामने घरगाडा मोठ्या नेटाने हाकला आणि आईच्या उतारवयात तिचं मोठ्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात आणलं होतं. त्याच्या बायकोच्या माहेरची काही मंडळी आजही मुक्कामालाच होती. आणि अशात ही भलती शापवाणी ऐकून सारेच भांबावले आणि रागावले सुध्दा आणि हे साहजिकच होतं.! पण नक्की काय झालं हे सुदामला सुद्धा उमगत नव्हतं.

“आवो,काका! ही काय बोलायची रीत झाली का काय? शाप कशापायी देतात माझ्या भरल्या घराला?” सुदाम आवाजात शक्य तेवढा मऊपणा आणीत बोलला,पण त्याच्या काळजाला डागणी मात्र बसली होतीच.

“हा गोविंदभट काय मेला होता की काय की तू बाहेरचे ब्राह्मण बोलावून एवढी मोठी घरभरणी घातलीस ते? आम्ही काय दक्षिणेसाठी कधी अडून बसलो होतो की काय? अरे,तुझ्या बापजाद्यापासून भिक्षुकी करतोय या पंचक्रोशीत. चिमुटभर शिधा आणि मूठभर तांदळाशिवाय कधी काही अधिकचं मागितलं का ते विचार तुझ्या म्हातारीला!” गोविंदभट एखाद्या वळवाच्या पावसाच्या सरीगत बरसत होते,त्यात सुदाम चिंब भिजून गेला!

सुदामची आई हौसाबाई डोक्यावरचा पदर सारखा करीत बाहेर आल्या. “आवो,काका! का असं वंगाळ बोलताय? आमची आतापर्यंतची सारी कार्यं तुमच्याबिगर कधी झालीत का? पण तुम्हीच या वक्ताला आम्हांला फशिवलं!”

यावर गोविंदभट तडकले. “मी का तुम्हांला फसवू? आज सकाळी आलो तर तुमची घरभरणी कालच झाल्याचं दिसलं! मला सोमवारी सांगताय आणि रविवारीच कार्यक्रम उरकून घेताय म्हणजे काय? आणि तो सुद्धा बाहेरचे ब्राम्हण बोलावून?”

यावर सुदाम मध्ये पडला. “काका, मागल्या महिन्यात बाजारात भेटला होता तुम्ही तेंव्हा रविवारच ठरला होता की आपला! तुम्हीच नव्हता का मुहूर्त सांगितला आणि यादी दिली होती सामानाची?”

“रविवार नाही सोमवार म्हणालो होतो मी! हे बघ या डायरीत सर्व लिहिलेलं असतं माझं. काय आज नाही करत मी भिक्षुकी. जन्म गेलाय यातच माझा. तुम्हांला शहरातल्या शिकलेल्या ब्राम्हणांचं वेड लागलंय. सारं कसं अगदी भारीतलं पाहिजे!”

गोविंदभटांचाच खरं तर तारखेचा आणि सुदामचा समजूतीचा घोटाळा झाला होता. बरं या आधी असं कधीच झालेलं नव्हतं. गोविंदभटांनी डायरीत नोंद तर घेतली होती पण ती भलत्याच पानावर. वयोमानानं चष्मा लागलेला आणि स्मरणावर विसंबून राहण्यासारखी परिस्थिती नव्हती राहिली त्यांची.  शिवाय सुदामने कुणा हाती दिलेला आठवणीसाठीचा निरोप देणं राहून गेलं होतं त्या माणसाकडून. आणि गोविंदभटांची त्या आठवड्यात बाजारात फेरी काही झालेली नव्हती. त्यांनी नेमका रविवारचा एक उद्योग घेतला होता पलीकडच्या एका आडगावातला. रात्री यायला त्यांना उशीरच झाला होता. पायी फिरूनच ग्रामीण भागात भिक्षुकी करावी लागत असे त्यावेळी.

सुदाम म्हणाला,”काका, काही झालं असेल तर ते होऊन गेलं. आता आलाच आहात तर तेवढी उत्तरपूजा करून द्या की.”

यावर तर गोविंदभटांचा राग अगदी पराकोटीला गेला. “बोलवा की तुमच्या त्या शहरातल्या भटांना!”

सुदाम म्हणाला,”आवो,त्यांना यायला जमणार नाही म्हणाले इतक्या लांब. सकाळी आरती करून तुमची तुम्ही पूजा काढून घ्या म्हणाले! एकतर कालच त्यांना मी अर्जंट बोलावून घेतलं होत्ं तुम्ही आला नाहीत म्हणून!”

“असली उष्टी कामं नाही करीत मी! पूजा काढून घ्या नाहीतर राहू द्या!” गोविंदभट काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ते सुदामच्या घरावरून तसेच ताडताड चालत पुढं निघून गेले. त्यांच्या गावाकडे निघालेल्या एका वडाप वाहनाला हात दाखवला आणि तो ही बिचारा काकांना बघून लगेच थांबला. पुढच्या सीटवरच्या एकाला मागे पिटाळून त्याने काकांना पुढे बसायला बोलवलं. गोविंदभटांचा पारा अजूनही चढलेलाच होता. वडापवाल्यानं विचारलं,”काका, काय झालं? चेहरा का असा लालेलाल दिसतोय?”

“लोकांना लाजा नाही राहिल्या आजकाल. सांगतात एक आणि करतात भलतंच. अरे, बाजारातल्या सुदामने मला आजची घरभरणी सांगितली होती. आणि येऊन बघतोय तर कालच उरकून घेतला कार्यक्रम पठ्ठ्यानं!” त्या जीप गाडीतल्या सर्व प्रवाशांनी हा सगळा संवाद ऐकला होताच. त्यांपैकी अनेकांना गोविंदभटांचा शीघ्रकोपी स्वभाव माहित होताच. पण उभ्या पंचक्रोशीत गोविंदभटाचं एकच घर भिक्षुकाचं. आणि शहरातून इतक्या लांबवरच्या ‘उद्योगांना’ कुणी धार्मिक कृत्ये करून देणारा सहजासहजी यायचा नाही. शिवाय इतरांचा वारसाहक्क असणा-या गावांत इतर भिक्षुकांनी व्यवसाय करू नये, असा शिरस्ताच असतो.

अर्ध्या तासाभरात गोविंदभटांच्या गावचा फाटा आला. “काका,इथं सोडू का? आज तुमच्या गावातलं तुम्ही एकटंच शीट आहात म्हणून विचारलं. गाडी गावात नेण्यात वेळ जाईल म्हणून म्हणलं.” ड्रायवरने असं म्हणताच गोविंदभट आणखीनच करवादले. त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकीत पायउतार झाले. घरभरणीसाठी अत्यावश्यक साहित्य भरलेली पिशवी आता त्यांना जड झाली होती. उन्हाचा चटका वाढत चाललेला होता. त्यांच्या नशीबाने त्यांच्या गावाकडं निघालेला एक मोटारसायकलवाला त्यांच्या दृष्टीस पडला आणि गोविंदभट गावात पोहोचले.

गोविंदभटांच्या पत्नीला ते असे लवकरच परत आल्याचे आश्चर्य वाटले. काहीतरी गडबड झाल्याचे तिच्या लक्षात आले. पण लगेचच काही विचारावं तर स्वारी एकदम अंगावर येण्याची शक्य्ता तिने नेहमीप्रमाणे गृहीत धरली होती. रीतसर पाणी वगैरे दिल्यानंतर तिने विचारले,”लवकर उरकला का उद्योग? कुणी सोबतीला नेलं होतं का?” यावर झाल्या प्रकाराची अगदी साग्रसंगीत पुनरावृत्ती झाली. याही वेळी गोविंदभटांचा आवेश तोच होता. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments