श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

संक्रांत असते कुणावर?… लेखक : श्री आनंद देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

संक्रांत ते रथसप्तमी हा कालावधी आमच्या नागरी भागात “ महिला चैतन्य पंधरवडा ” असतो. महानगरातील लोकांच्या नशिबी हे सुख (?) नाही. गावभर साड्यांचे चालते बोलते प्रदर्शन असते. आमची माता भगिनी भर दुपारी अंदाजे अडीच तीन वाजता कामाला लागते. अत्यंत उत्साहात भगिनीवर्गाच्या झुंडीच्या झुंडी दुपारी तीन वाजल्यापासून  भन भन,भन भन गावभर फिरत असतात. दररोज नवी साडी, हातात पर्स आणि पायात चपला घातल्या की माउली जे निघते ते पार रात्री आठ वाजता खिचडी टाकायलाच घरी पोहोचते. बरे दुपारी निघतानाचा आविर्भाव ramp (म्हणजे तो नाही का फ्याशन शो मध्ये असतो) वर चालण्याचा असतो. संध्याकाळी घरी परतेपर्यंत कपाळ जगदंबेसारखे कुंकवाने  माखलेले असते. साडी जमिनीला टेकून खराब होवू नये म्हणून उचलून धरताना हात दुखतात तिचे पण वेदना जाणवत नाहीत घरी पोहोंचेपर्यंत. हे साड्या तयार करणारे लोक उंचीप्रमाणे साड्या का तयार करीत नाहीत हे एक आम्हाला पडलेले जुनेच कोडे आहे. साड्यांची जाहिरात करणाऱ्या बहुत्येक सर्व मॉडेल उंचच्या उंच आणि चवळीच्या शेंगेसारख्या आकाराच्या असतात.(लिखाणाला दर्जा प्राप्त होण्यासाठी लेखकाला किती सूक्ष्म निरीक्षण ठेवावे लागते याची नोंद घ्या). तर मग प्रश्न असा उभा राहतो की चवळीला आणि बरणीला एकच वस्त्र कसे चालेल ? असो. तर दरम्यानच्या काळात कुंकवाचा धनी आणि लेकरेबाळे हवालदिल झालेली असतात. ते बिचारे काल परवाच्या आईच्या वाणात काही खायचे आले आहे का याचा निष्फळ शोध घेतात. त्या दिवशीचे हळदी-कुंकू संपवून घरी परत आल्यानंतर बोलून बोलून, बोलून बोलून तिच्या घशाला कोरड पडलेली असते. आपण शांतपणे पिण्यासाठी पाणी आणून द्यावे. हाश-हुश्य झाले की संपूर्ण वृत्तांत ऐकून घ्यावा लागतो. म्हणजे “अमुक एक बाई, किती श्रीमंत पण वाणात लुटले (वाटले) काय तर रुपड्याच्या शाम्पूच्या पुड्या….” किंवा ,”तमुक बाईकडे दिलेले दुध इतके पांचट होते की मला तर  तिथेच कसेतरी होवू लागले…..संपूर्ण पिवूच शकले नाही मी…”  पुढचा डायलॉग संपूर्ण कुटुंबाला सुखावणारा असतो, “कधी एकदा रथसप्तमी येते असे झाले आहे.” त्यामुळे कधी एकदाची रथ-सप्तमी येते असे घरातील मुलांना आणि पुरुषवर्गालापण  झालेले  असते. हे थकव्याचे वैराग्य जेमतेम बारा तास टिकते. नवा दिवस, नवी साडी आणि तोच उत्साह दुसऱ्या दिवशी  असतोच असतो.

त्यात पुन्हा दूर अंतरावरील प्रतिष्ठित घरी हळदी कुंकू असेल तर होयबाला……माफ करा,,,,, नवरोबाला तिला गाडीवर बसवून न्यावे लागते. “तू पटकन हळदी-कुंकू घेवून ये तोवर मी इथे कोपर्यावर उभा राहतो”….यावर “आलेच पाच मिनटात” असे म्हणून ती अदृश्य होते. दहा, पंधरा, वीस मिनिटे होतात. याचे बिचार्याचे व्हाटसअप, फेसबुक पाहून होते तरी हिचा पत्ता नाही.  ‘त्या’ घरात गेलेली आपली माउली कधी बाहेर येते याची वाट पहात तो निरागस जीव  इतका कंटाळतो की इतक्या प्रतीक्षेने तर  विठूमाउलीचे दर्शन सुद्धा झाले असते असे त्याला वाटायला लागते. बरे कोपर्यावर असे आगंतुक उभे राहणाऱ्या पुरुषाला जाणाऱ्या येणाऱ्या महिला विचित्र नजरेने पाहतात त्यामुळे त्याला मेल्याहून मेल्यासारखे होते. आम्हाला साहित्यिक म्हणून ओळखणाऱ्या तर एकमेकीना,”बघ तेच ते…..कसे बेशरम सारखे उभे आहेत, बायका पहात “ असे म्हणत असाव्यात असा आम्हालाच संशय आहे. मग तब्बल चाळीस पंचेचाळीस मिनिटे झाल्यावर आपले ‘मॉडेल’ येतांना दिसते. बायकोच्या भन भन,भन भन फिरण्याला कंटाळलेला पती मग फन फन,फन फन करतो. (किती लयबद्ध वाक्यरचना आहे नाही? यातील संगीत कळण्यासाठी मराठवाड्यातच  जन्म घ्यावा लागतो महाराजा..). “उद्यापासून तुला वाटले तर तू जा , मी अज्जिबात येणार नाही”, अशी युती तोड्ल्यासारखी गर्जना तो करतो यावर ती गालातल्या गालात हसते, कारण तिला माहित असते की आज नाहीतर उद्या पुन्हा युती होणारच आहे.

या दिवसात एखादा मध्यमवयीन (म्हणजे हिंदीमध्ये याला अधेड उम्रका असे म्हणातात, म्हणजे ‘कुणी बाळा म्हणले तरी याला राग येतो आणि कुणी काका’ म्हणले तरी राग येतो.) पुरुष सायंकाळच्या वेळी विमनस्कपणे रस्त्यावर फिरताना दिसला तर हमखास समजावे की,”आज याच्या घरी हळदी-कुंकू आहे” म्हणून. म्हणजे ज्याच्या नावाने कुंकू लावले जाते त्यालाच घराबाहेर काढणारा सण म्हणजे संक्रांत होय. आता कळाले का आपली संस्कृती महान का आहे ते ? आपल्याच घरी जाण्याची सोय नसलेला हा कुटुंब-प्रमुख (?) मग  नियंत्रण सुटलेल्या उपग्रहासारखा भरकटत राहतो. या दिवसात थेटरात संध्याकाळी सहाच्या शो ला आलेले एकटे पुरुष हे असेच “हळदी-कुंकू के मारे” असतात.

अर्थात सगळेच विवाहित पुरुष काही इतके पापभिरू नसतात. चाणाक्ष मंडळी आपल्या घरी हळदी-कुंकू कधी आहे याची अधाश्यासारखी वाट पहात असतात.दिवसभर घरी सहकार्य करणारी  अशी मंडळी  साधारण चार-साडेचार च्या सुमारास जे फरार होतात ते थेट रात्री बारा वाजता, “उगवला चंद्र पुनवेचा”अशा परिपूर्ण अवतारात घरी अवतीर्ण होतात. आपण इकडे हळदी-कुंकू साजरे करीत होतो तेंव्हा आपल्या भाळावरील कुंकवाच्या धन्याने काय रंग उधळले असतील याची माउलीला लगेच कल्पना येते.   पण ती आज नेहमीप्रमाणे सौदामिनीचा अवतार धारण न करता ‘अलका कुबल’ होण्यात धन्यता मानते कारण आज ती तृप्त असते. आज तिच्या नव्या साडीचे, म्याचींग ब्लाउजचे. टिकलीचे, अंगावरील दागीन्यांचे, बैठीकीतील नव्या गालिच्याचे,  फ्लॉवरपॉटमधील फुलांचे, गजर्यातील वेणीचे, केलेल्या पदार्थांचे, लग्न होवून पुण्यात आयटी मधील नोकरी सांभाळून संसार करणाऱ्या आणि  आज संक्रांतीसाठी आलेल्या तिच्या लाडक्या लेकीचे  आणि तिचा जीव की प्राण असणाऱ्या तिच्या घराचे कौतुक झालेले असते. या सगळ्या कौतुकाचा एक ‘ग्लो’ तिच्या चेहऱ्यावर झळकत असतो. एकदाची रथसप्तमी होते आणि ती नव्या उमेदीने पुढच्या संक्रांतीची वाट पहाटते. असो. महानगरातील लोकांच्या नशिबी हे सुख (?) नाही.सुखाचा शोध लागलाच तर इकडेच कुठे तरी लागेल, ग्रामीण नागरी भागात.

लेखक : श्री आनंद देशपांडे, परभणी

संग्राहक : श्री श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments