सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “याला जीवन ऐसे  नाव….” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

याला जीवन ऐसे नाव गुलजार ह्यांच्या रचना वाचल्यावर त्या मनात घट्ट रुतून बसतात, भावतात आणि विचारात देखील पाडतात. परवा गुलजार ह्यांच्या खूप आवडतील अशा आशयपूर्ण चार ओळी मैत्रीणीने पाठविल्यात. त्या पुढीलप्रमाणे.

“इतनी सी जिंदगी है, पर ख्वाब बहुत है ।

जुर्म का पता नही, साहब मगर इल्जाम बहुत है।।

खरचं तसं बघितलं तर ह्या मानवजन्माला आलो आणि अवघी एकच इनिंग खेळायचं परमिट मिळालं.त्या अवघ्या पूर्ण हयातीत बालपण आणि म्हातारपण हे तसे बघितले तर जरा परस्वाधीनंच. फक्त जे काही तरुणपण शिल्लक उरतं त्यात आपलं कर्तृत्व दाखवावं लागतं.

हे आपलं कर्तृत्व दाखविण्यासाठी आपण आपल्या जिवाचा आटापिटा करतो जेणेकरून जनतेच्या,लोकांच्या नजरेसमोर आपली उर्जितावस्था आली पाहिजे. सध्याचं आपलं जगं हे खूप आभासी जगं तयार झालयं.ह्या आभासी जगाचा हिस्सा काही मूठभर मंडळी सोडली तर जवळपास सगळेजणं बनतात.

ह्या आभासी जगात वावरण्यासाठी मग “माझा सुखाचा सदरा “ह्याच प्रेझेंटेशन जगासमोर केल्या जातं.कित्येक भावंड सोशल मिडीयावर भाऊबीज, राखीपोर्णिमेचे फोटो धूमधडाक्यात व्हायरल करतांना प्रत्यक्षात मात्र वयस्कर पालकांची जबाबदारी घेतांना वा मालमत्तेची वाटणी करतांना एक वेगळचं चित्र आपल्यासमोर आणतात. तसेच एकमेकांच्या आचारविचारात साधर्म्य नसलेली जोडपी “मेड फाँर इच अदर”भासवतं अँनिव्हर्सरी केक कापतांनाचे फोटो अपलोड करतात.प्रत्यक्षात ही धडपड, द्राविडीप्राणायाम, आटापिटा कशासाठी केल्या जातो हे एक न उलगडलेले कोडेच.काही वेळा आपल्याला इतरांसाठी पण जगावं लागतं म्हणां. कदाचित त्यासाठी असावं.

ह्या आपल्या छोट्याशा आयुष्याच्या तरुणपणाच्या काळात माणूस मात्र स्वप्नं खूप विणतो आणि हे स्वप्नं विणणं अगदी स्वाभाविक असतं.जणू “करलो दुनिया मुठ्ठीमे”सारखीच अवस्था जवळपास प्रत्येकाच्या जीवनात येतेच.

खरचं ही स्वप्नं विणतांना पण खूप मजा येते.काही स्वप्नं ही नशीबाने आपोआपच आपलं काही कर्तृत्व खर्च न करताच पूर्ण होतात,काही स्वप्नं ही धडपड करुन, जिवाचा आटापिटा करुन माणूस पूर्ण करतो.ह्यात त्रास,दगदग, मनस्ताप हा होतोच पण स्वप्नपूर्ती नंतरचा आनंद पण खूप सुख देऊन जातो.काही स्वप्नं ही तशी आवाक्याबाहेरची असतात, आपल्याला कळतं ही अशक्यप्राय आहेत पण तरीपण कुठेतरी असंही वाटत असतं एखादा चमत्कार घडेल आणि कदाचित आपलं हे स्वप्नं पूर्णत्वास जाईल सुध्दा.

ही स्वप्नं उराशी बाळगतं बाळगतं एकीकडे आपण आपल्या जबाबदा-या पार पाडण्याचे काम पण लिलया करीत असतोच.जो घरातील सर्वात जास्त जबाबदार व्यक्ती असतो त्याच्या माथी वाईटपणा हा अटळंच.आपल्या जबाबदा-या पार पाडतांना त्याला कित्येक जणांच्या रोषाला कारणीभूत व्हावं लागतं तर कित्येकांच्या नाराजीचं कारण म्हणजे जबाबदा-यांच ओझं वाहणारी व्यक्ती असते.

जबाबदा-या उचलतांना प्रसंगी व्यक्तींना काही वेळ कठोर भूमिका पण नाईलाजाने घ्यावी लागते.हे सगळं करीत असतांना नशीबाने चांगुलपणा पदरी पडला तर आपण नशीबवान खरे.

ह्या सगळ्या जबाबदा-या स्विकारतांना, प्रमुख भूमिका बजावीत असतांना,ब-याच वेळा घडलेल्या घटनांचे पडसाद जर सकारात्मक उमटले तर काहीच प्रश्न नसतो पण चुकून जर का काही उन्नीस बीस झाले वा पडसाद नकारात्मक उमटले तर दोष हा जबाबदार व्यक्तीच्याच माथी येतो.कित्येकदा आपला स्वतः चा गुन्हा,अपराध नसतांनाही आळ,आरोप हा अंगावर येऊन पडतो.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments