श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ गदिमा आणि काही गंमतीशीर गोष्टी – भाग-1 – लेखक : श्री सुमित्र माडगूळकर ☆ श्री सुहास सोहोनी ☆

(गदिमांच्या आंघोळीच्या ‘मिशा’ ते ‘ग. दि. माडगूळकर पोल्ट्री फार्म’.) 

गदिमांच्या आयुष्यात घडलेल्या काही गंमतशीर गोष्टी, त्यांच्या काही सवयी ज्या तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील !.

गदिमांना त्यांच्या मित्रांना गंमतशीर नावांनी हाक मारण्याची सवय होती. नावांची गंमत करणे हा त्यांचा आवडता छंद असायचा. मधुकर कुळकर्ण्यांना “पेटीस्वारी”, राम गबालेंना “रॅम् ग्याबल”, वामनराव कुळकर्ण्यांना “रावराव”, पु.भा.भाव्यांना ‘स्वामी’, पु.ल.देशपांड्यांना ‘फूल्देस्पांडे’. राजा मंगळवेढेकर यांना ‘मंगळ’, ‘राजा ऑफ मंगळवेढा’. पंचवटीत येणारा नवखा असेल तर ‘या’ असे भारदस्त आवाजात स्वागत व्हायचे. सलगीच्या लोकांना ‘क्यो गुरू’, ‘काय माकडेराव?’, ‘कसं काय फास्टर फेणे?’ असे स्वागत ठरलेले असायचे. अनेक मित्रांची अशी वेगवेगळी नावे ठरलेली असायची.

पु.भा.भावे म्हणजे गदिमांचे खास मित्र! तेही गदिमांना काही नावाने हाक मारत – गम्पटराव, बुवा, स्वामी, डेंगरु, लाल डेंगा, वुल्फ ऑफ माडगूळ, चित्तचक्षुचमत्कारिक!.. आणि गदिमांकडून चक्क त्या नावांस प्रतिसादही मिळत असे!.

त्या काळात जशी गदिमा-बाबूजी जोडगोळी प्रसिद्ध होती, तशी त्याच्या आधी एक त्रिकुट प्रसिद्ध होते – ‘लाड-माड-पाड’.. लाड म्हणजे गीतरामायणाचे जनक सीताकांत लाड, माड म्हणजे ग.दि.माडगूळकर व पाड म्हणजे पु.ल.देशपांडे!

गदिमा आनंदात असले, कुठले काम किंवा गोष्ट मनासारखी झाली, किंवा आवडली, तर त्यांचे वाक्य असे –  ‘गुड रे, गुड गुड गुड गुड गुड गुड….’, तर कधी ‘बेस्टम बेस्ट आणि कोपरानं टूथपेस्ट!’

एकदा गदिमांचा संबंध कोल्हापूरच्या ‘उत्तमराव शेणोलीकर’ नावाच्या गृहस्थांशी आला. त्यांना हे नाव इतके आवडले की त्यांनी त्या नावाचे रूपांतर ‘उत्तमराव’ –> ‘बेष्टराव’ शेणोलीकर असे करून टाकले. घरात कुठला चांगला पदार्थ झाला की त्यांचे पेट वाक्य ठरलेले असे, ‘एकदम ‘बेष्टराव शेणोलीकर’ झाला आहे!’

गदिमांना एक फोन आला, त्यांनी स्वतःच उचलला, समोरून आवाज आला, “मला ग.दि.माडगूळकर यांच्याशी बोलायचे आहे. मी ‘सत्येन टण्णू बोलतो आहे.” गदिमांना वाटले कोणीतरी गंमत करतो आहे. त्यांनी हे आडनाव ऐकले नव्हते. ते लगेच उत्तरले, “मी माडगूळकर अण्णू बोलतो आहे, बोला!”

गदिमांनी मराठी चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान मिळवले होते. ते इतके व्यस्त असत की, सकाळी एक, दुपारी एक व रात्री एक अश्या तीन चित्रपटांच्या कथा ते दिवसभरात लिहायला बसत. कधी कधी त्यात साहित्यिक कार्यक्रम असत. ते १२ वर्षे आमदार होते, त्या संबंधित कार्यक्रम असत. ते तयार होत. जाणे आवश्यक असे, पण कंटाळले की तयार होऊन म्हणत, ‘आम्ही नाय जायचा’, नाही जायचा की अजिबात नाही जायचा…’ मग अगदी मुख्यमंत्र्या॓चीही भेट ठरलेली का असेना!

बऱ्याच वेळा सकाळी उठल्यापासून मित्रांच्या बैठकी रंगत. विद्याताई मधूनच राहिलेल्या आंघोळीची आठवण करत. शेवटी गदिमा नाखुषीने उठता उठता म्हणत, ‘पाच मिनिटात आंघोळीच्या मिशा लावून येतो!’ ‘आंघोळीच्या मिशा’ हे एक गंमतशीर प्रकरण होते. एक गाणे होते गौळण खट्याळ कृष्णाला यमुनेच्या काठावर लाडिक रागाने म्हणत असते, ‘आंघोळीच्या मिषाने भिजविलेस अंग…’ पण एकदा गदिमांच्या नेम्याला (नेमीनाथ उपाध्ये उर्फ पुणे आकाशवाणीचे ‘हरबा’) प्रश्न पडला की ‘आंघोळीच्या मिशा’ कसल्या?  आणि तेव्हापासून गदिमा ‘आंघोळीच्या मिशा लावू का?’, ‘आंघोळीच्या मिशा लावून टाकतो म्हणजे सुटलो’, अशीच स्नानाच्या बाबतीत भाषा वापरत असत.

गदिमांचे एक मित्र होते ‘बाळ चितळे’ नावाचे. त्यांची एक वेगळीच तऱ्हा होती. सगळ्यांसारखे न करता वेगळे काहीतरी करायचे. उदा. सगळेजण हॉटेलमध्ये गेले आहेत व सगळ्यांनी डोसा मागविला, तर हे मिसळ मागविणार! अगदी सगळे करतील, त्याच्या बरोबर उलटे करायचे. यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे आमच्या घरात कोणी असे वेगळे वागायला गेला की त्याला ‘बाळ चितळे’ ही पदवी मिळत असे!.

गदिमांना कधी कधी छोटे अगदी सर्दीसारखे आजार पण सहन होत नसत. मग अगदी शिंक आली तरी त्यांचे मरणवाक्य सुरू होई, ‘मरतंय की काय आता!’ बिलंदरपणा हा त्यांच्यात ठासून भरलेला होता. हे सर्व गुण जन्मजात माडगूळच्या मातीतून आलेले होते. एकदा माडगूळ गावात सभा झाली. सभेनंतर एकाने टेबल-खुर्ची-सतरंजी या सकट अध्यक्ष, वक्ते यांचे आभार मानले. ते आभाराचे भाषण सीतारामबापू नावाच्या सरपंचाना इतके आवडले की, पुढे बोलताना बापू आभार शब्दाशिवाय बोलेनासेच झाले. अगदी त्यांना कोणी सांगितले की, ‘अमक्या तमक्याला मुलगा झाला’. तर ते चटकन म्हणायचे, ‘म्हणजे हे आभार मानायचंच काम झालं!’ कोणी बातमी दिली की कडब्याच्या गंजीला आग लागली, तर बापू झटक्याने म्हणणार, ‘म्हणजे हे आभार मानायचंच काम झालं!’ शेवटी सगळ्या गावाने त्यांचे नाव ‘आभार सीताराम’ असे ठेवले होते. तर सांगायचे असे की, हे विनोदी गुण बहुतेक गदिमांना आपल्या गावाकडच्या मातीतून व माणसांकडून उपजतच मिळाले होते.

गदिमांच्या धाकट्या भावाचे लग्न होते. वऱ्हाड घेऊन मंडळी लग्नघरी गेली. नवरा मुलगा बघायला नवरीच्या मैत्रिणींची पळापळ सुरू झाली. नवरा मुलगा कुठला, हे कोणालाच माहीत नव्हते. एक कोणीतरी मैत्रीण मोठ्याने गावाकडच्या टोनमध्ये म्हणाली, ‘कोन्ता ग कोन्ता?’ झालं. पुढचे अनेक दिवस कुठल्याही बाबतीत चौकशी करायची असेल तर गदिमांचे वाक्य तयार असे ‘कोन्ता ग कोन्ता?’ एखादे वाक्य दुसऱ्याला कंटाळा येईपर्यंत लावून धरणे, हे आम्हा माडगूळकरांचे खास वैशिष्ट्य!.

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री सुमित्र माडगूळकर

प्रस्तुती : सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments