श्री कचरू सूर्यभान चांभारे

? विविधा ?

☆ “दमलेल्या बापाची कहाणी ऐक मुला… —” ☆ श्री कचरू सूर्यभान चांभारे ☆

जून महिन्याचा तिसरा रविवार जागतिक पातळीवर सर्वत्र नव्हे, पण संख्येने सर्वाधिक देशात “पितृदिन “ म्हणून साजरा करण्यात येतो. अमेरिका, इंग्लड, जपान, सिंगापूर, फ्रान्स इत्यादी देशात तो आज आहे. रोमालियात मेचा दुसरा रविवार, तर तैवानमध्ये आठ ऑगस्ट, थायलंड ५ सप्टेंबर, ऑस्ट्रेलिया तर न्यूझीलंडमध्ये सप्टेंबरचा पहिला रविवार पितृदिन म्हणून साजरा करण्यात येतो. पित्याप्रती ऋण व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आपल्या भारतात अनुकरण म्हणून अमेरिका इंग्लडप्रमाणे आपण जूनचा तिसरा रविवारच पितृदिन म्हणून साजरा करतो. सांस्कृतिक व पारंपरिक दृष्टीने भारतातला पिता ‘ बाप ‘ म्हणून सदैव सोबतच असतो. बापाच्या मृत्यूनंतरही पितृपक्षात तो पुन्हा पुन्हा अवतरतो. कुटुंब व्यवस्थेत व सामाजिक व्यवस्थेत माता पिता यांना भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान आहे.पाश्चात्यांचे अनुकरण असले तरी संसारगाड्याने दमविलेल्या बाबाबद्दल ऋण व्यक्त करणं उचितच आहे.

पितृदिन साजरा करण्याचा जन्म कसा झाला याची कथा अत्यंतिक शोकांतिक व दर्दनाक आहे. १९०७ साली अमेरिकेतील पश्चिम वर्जीनिया प्रांतातील फेअरमोंट शहरी एका खाणीत झालेल्या दुर्घटनेत तब्बल ३६१ खाण कामगारांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी मृत कामगारांपैकी सुमारे २५० कामगार असे  होते की जे लहान लहान मुलांचे बाप होते. नियतीने एकाच फटकाऱ्यात हजारो मुलांना अनाथ व शेकडो माता भगिनींना वैधव्य दिलं होतं. हजारोंच्या आक्रोशाने धरणीलाही कंप फुटावा असं झालं होतं. दुःखाचा हा डोंगर विसरणं फेअरमोंट शहराला कदापिही शक्य नव्हतं. या दुःखद घटनेची स्मृति म्हणून ग्रेस गोल्डन क्लेंटन यांनी दरवर्षी सामुदायिक श्रदांजली कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली. दुर्दैवी पित्यांचे सार्वजनिक श्रदांजली कार्यक्रम प्रांताप्रांतातून अमेरिका खंडात व इंग्रजी राजवटीमुळे जगभरात सुरु झाले.१९३० च्या आसपास या दिनाचे रुपांतर पितृदिनात झाले. श्रद्धांजली सभेत कालओघात वुड्रो विल्सन, लिंडन जॉनसन, कूलिज अशा राष्ट्राध्यक्षांची भाषणे झाली. त्यामुळे राजसत्तेचे अधिष्ठान प्राप्त झाले आणि हा दिन कायद्याने सर्वसंमत झाला. अशी झाली पितृदिनाची निर्मिती.

भारतात मात्र माता पिता यांना देवादिकांच्या बरोबरीचे स्थान आहे. पितृसत्ताक पद्धतीत पित्याचे स्थान वरच्या श्रेणीत असले तरी भावनिक दृष्टीने आईला जेवढं सहज जवळतेचं स्थान आहे, तेवढं वडील नावाच्या पोशिंद्यास मात्र नाही. आजचा पिता व मागील काही पिढ्यातला पिता यांमध्ये खूप फरक पडला आहे. मुलानं तोंड उघडायची जागा म्हणजे आई व मुलाचं तोंड बंद व्हायची जागा म्हणजे बाप – असं समीकरण खूप मोठ्या कालखंडापासून अखंड चालत आलेलं आहे. पिता व वडील ही बापासाठी समानअर्थी शब्द योजना असली तरी ‘ बाप ‘ या शब्दाचा गर्भित अर्थ पिता व वडील या शब्दछटेत सापडत नाहीत. बाप तो बापच. काळाच्या ओघात  खडक विरघळावा तसा बाप हळूहळू विरघळतो आहे. पण पारंपारिक पाषाणखुणा अजून काही जात नाहीत. बाप या भावनेकडे करारीपणाचे पेटंट अजूनही आहे. पूर्वीच्या काळी उदरनिर्वाहासाठी खूप कष्ट उपसावे लागत असत. शेती, कारखानदारी, नोकरी या निमित्तानं पुरुषवर्गास, पर्यायाने बापमंडळीस जास्त काळ बाहेरच राहावं लागत असे. साहजिकच बाळास आईचा सहवास जास्त काळ मिळतो. बाळाचा हा काळ शिकण्याचा ,अनुकरणाचा असल्यामुळे बाळावर साहजिकच आईचा प्रभाव जास्त पडतो. त्यामुळे प्रेमरस पाजणारी व चिऊकाऊच्या नावाने घास भरवणारी आई सर्वांनाच आपोआप प्रिय होते. दिवसभराचं भरवणं, करणं नजरेत असल्यामुळे आई खूप आवडते. पण दिनभराच्या भरवणीसाठीचं पित्याचं महिनोनमहिने वर्षानुवर्ष खपणं दुर्लक्षित होतं. बाळाच्या वाढीच्या काळात खेळताना शिकताना काही चुकलं की थांब येऊ दे बाबाला, या महिला वर्गाकडील पिढ्यानपिढ्याच्या धमकीने आईच्या गळ्यात पडून तिच्या केसांना लाडिवाळपणे खेळणारी मुले पित्याच्या छातीवरील केसासोबत खेळलीच नाहीत. आईच्या कडेवर बसणं हे लेकराचं अढळ धृवीय असल्यामुळे बापाच्या कडेवर लेकरु हे मजबूत आसन उदयास आलेच नाही. पित्याचं करारीपण नेहमीच दिसलं, पण दिसलं नाही कधी काळ्या पाषाणात दडलेलं मायासागराचं तीर्थ.

आजचा बाप कुटुंबासाठी दररोजचा अर्जून होऊन रोजच लढतो आहे. बाप म्हणजे कुटुंबाचा ओझोन वायूच. समाजातील वाईट प्रवृतींना कुटुंबाजवळ तो येऊ देत नाही. पूर्वी बाप म्हणजे सर्वोच्च न्यायालय असे. आजी आजोबांकडे एखाद्या प्रकरणात अपील करता येत असे. पण आता आईला खंडपीठाचा दर्जा असल्यामुळे बापपणाला कात्री लागलीय. आजी आजोबांचे अधिकारही आणीबाणीत गोठीत झाले आहेत अन् अपील करण्याची मुभाच नाही, कारण खंडपीठाच्या न्यायमूर्तीला सर्वोच्च न्यायालयावर भरवसा नाही. पण तरीही बाप काही औरच असतो. 

मुलांचे लाड पुरविण्याचा मक्ता आईकडून वडीलाकडे कधी आला ते आईला कळलेच नाही. मुलांनी बेभान होऊन बापाची वाट पाहणं हे बापजन्माचं सार्थक आहे. घराची सुंदरता जपते ती आई, पण हे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी सतत झुंजतो तो बाप. दुःखाच्या कल्पनेने हादरते ती आई, पण दुःख छाताडावर पेलून मनातलं आक्रंदन उरातच जिरवितो तो बाप. लेकीच्या काळजीने रोजच हळवी होते ती आई, पण लेकीच्या कल्याणासाठी संपूर्ण हयात झिजवून विवाह मंडपी सगळं आवरल्यावर धाय मोकलून रडतो तो बाप. भावनिक दृष्ट्या बापाच्या वाट्याला चार क्षण कमी येतात, पण बापाच्या कायम जाण्याने आभाळ कोसळलं म्हणतात. हे एक वाक्य बापाचं स्थान सांगण्यास पुरेसं आहे. कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अपमान गिळण्याची ,कष्ट करण्याची तयारी बाप नावाची असते. लेकराबाळाच्या, बायकोच्या डोळ्यातला अश्रूबिंदू त्याच्यासाठी सागरी तुफान असतो. अश्रूच निर्माण होऊ नये म्हणून तो कायम वादळवाटेने धावत असतो. आणि कधीकधी हेच वादळ त्याला गिळतं. 

पेनाचं झाकण म्हणजे बाप, पाण्याच्या टाकीचं झाकण म्हणजे बाप, डब्यांची झाकणं म्हणजे बाप. ही झाकणं आकाराने छोटी असतात पण उघडंपण येण्यापासून वाचवतात. झाकणं नसतील तर या वस्तू अडगळीत जातात. बाप हे कुटुंबाचं झाकणच. झाकण खराब झालं ,वाकडंतिकडं झालं की त्याची आवरणमूल्यता संपते.  तसंच बाप हे झाकण व्यसनानं, विकृतीनं बिघडलं की कुटुंबाला किडेमुंग्या लागायला वेळ लागत नाही.

विभक्त कुटुंब पद्धती  व अर्थाला लाभलेला उच्चकोटीचा भाव, अर्थकारणावरच आधारलेली शिक्षण पद्धती, जीवनपद्धती यामुळे आजचा बाबा खूप दमलाय. धावपळीमुळे त्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नाही. संगोपनाच्या भाराने बाप आता झुकलाय. दमलेल्या बाबाची कहाणी सगळ्यांनी समजून घ्यायला हवी.

… डोंगराएवढ्या आभाळमायेच्या ‘बापभावनेला सलाम करावा वाटतो.

© श्री कचरू सूर्यभान चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments