डॉ. ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

☆ वेळ संग्राहिका – डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

खूप आहे आपल्याकडे असं आपल्याला वाटत असत पण प्रत्यक्षात खरंच तो नसतोच कोणाकडे अशी एक गोष्ट म्हणजे वेळ. हा शब्द किती आपल्या रोजच्या जगण्यात येतो नाही, कदाचित खूप कमी असतो म्हणून डोकावतो का इतका सहज. आपण किती म्हणतो काळ आला होता पण वेळ आली नव्हती. किंवा त्याहीपेक्षा साधंसं म्हणजे हा/ही कधी वेळेवर येईल तर शपथ. हातासरशी आणि वेळेवर करावीत ग कामं असं ऐकतं ऐकतंच तर मोठे होतो की आपण. हातातली कामं बदलत जातात फक्त पण वेळ आपला तसाच. कायम कमी पडत आलेला. हा वेळ म्हणजे वाढत्या ओढाळ वयाच्या मुलीचा फ्रॉक असावा जणू. सतत तोकडा पडणारा. माझी एक मैत्रीण सांगत होती मला परवा की कसं एक नामांकित बाई तिला सांगत होत्या ह्या वेळेवरून. मैत्रीण साधी आहे माझी सरळ, नेटका आणि तो सुद्धा एकटीनं संसार करणारी. मग तिच्याकडे कुठून असणारं वेळ. ह्या बाई एकट्या वर तारांकित व्यक्तिमत्व. मग त्या त्यांचा मौल्यवान वेळ खर्च करून सांगू लागल्या की वेळ नसतोच ग कोणाकडे. तो काढावाच लागतो. बघ. तू पण काढत जा. वेळ काढल्यानेच तो मिळतो. आपल्यासाठी आपण नाही वेळ काढणार तर कोण? चार वाक्यात चार वेळा बोलल्या त्या हा शब्द. आणि ती सांगायला जाणार इतक्यात त्यांच्याकडचा संपला बहुदा. मग त्या सरळ निघून गेल्या तिथून. वेळकाळ पाहून माणसं बरेचदा वागतं नाहीत ते असं. सल्ले देणं काय हो सोपं असतं खूप. तितक्या सहजतेनं आपण दुसऱ्याला देऊ शकतं नाही, तो असतो वेळ.

किती लोकांना सतत घड्याळात बघायची सवय असते. सवय काय पटकन लागते आणि चटकन सुटतं नाही. आणि कित्येकदा ती आपल्या सोयीची आणि समोरच्याच्या गैरसोयीची असते. ही पण तशीच एक सवय. आमचे एक काका आहेत. लहानपणी जेव्हा घरी येतं तेव्हा मी असे तिथेच. मांजरीसारखी लहान मुलं पण सारखी पायात घोटाळतात. तर ते आले की जवळपास पाचव्या मिनिटापासून भिंतीवरच्या घड्याळात बघत असत. तेव्हा ते खरंच व्यस्त असत. पण तरीही ते स्वतःहूनच येतं. तरी आल्यावर त्यांना किती हा आपण येऊन मूर्खपणा केलाय असं वाटू लागे बहुदा आणि मग त्यांच्या मनातली ही अस्वस्थता अशी घड्याळात डोकावून व्यक्त होतं असावी. अस्वस्थता किती पाण्यासारखी असते  वाट फुटेल तिथून झिरपत राहते फक्त. यथावकाश काकांची व्यस्तता कमी कमी होतं गेली. पण सवय कसली सुटायला. भिंतीवरून मनगटाकडे आणि तिथून पुढे हातातल्या मोबाईल वर येऊन ती स्थिरावली, इतकंच. वेळेचं आणि त्यांचं कधी जमलं नाही, असंच आता म्हणायचं.

अशाच एक खूप जवळच्या बाई. असं ऐकलं आहे खूप की यांना वेळेचं गणित कधी सुटलं नाही. वडील फार मोठा माणूस. लोकसंग्रह फार. नावाजलेलं आणि गाजलेलं नावं. पण ते सुद्धा त्यांच्या कामी आलंच नाही. वेळ नव्हती त्यांच्यासोबत हेच खरंय का मग. इतकं पिकलं पान होऊन गेल्या. ते सुद्धा ह्या अशा काळात आणि मुख्य म्हणजे ह्या अशावेळी जेव्हा कोणीही कितीही इच्छा असली तरी कोणाकडे सहज उठून जाऊ शकत नाही. त्यांना शेवटचा निरोप दयायला सुद्धा जास्त कोणी येऊ शकलंच नाही. वेळच आली होती अशी, काय करणारं. पण वाईट वाटतं. खूप वाटतं आणि….

किती जणांच्या बाबत म्हटलं जात की हा/ही वेळेआधीचं जन्माला आलायं. भविष्याचा वेध घेणाऱ्या माणसांच्या बाबतीत तर किती वेळा ऐकलंय. आपण त्यांना आज समजून घेऊ नाही शकतं म्हणजे आपली कुवत कमी पडली असं म्हणावं का तेच आलेत वेळेआधी असं म्हणावं ह्याचं संभ्रमात राहतो आपण. वेळेला समानार्थी शब्द म्हणून काळ हा शब्द वापरला जातो, मराठीत. आणि ह्या वेळेच्या संदर्भातच नुकत्याच निर्वतलेल्या श्री. मंगलेश डबराल ह्या जागतिक हिंदी कवीच्या शेवटच्या कवितासंग्रहाचे नाव, ‘स्मृती एक दुसरा समय है’ हे असावं आणि ते मला माहित सुद्धा नसावेत ह्याची इतकी खंत वाटते की अजून काही लिहिलं जाणार नाही. आता ते पुस्तक मी विकत घेईन. वाचेन त्यांना. पण वेळ साधता आलीच नाही ह्याची हळहळ कायमचं राहिलं मनात. आता ती स्मृतींमधून उरेल आणि काळ गेला किती तरी पुरेल. इतकंच ——–

संग्राहिका – डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments