सुश्री अरूणा मुल्हेरकर

? सूरसंगत ?

☆ सूर संगत~ राग~ खमाज ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

मागील दोन तीन आठवडे लोकसंगीत~लावणी/पोवाडा/जीवन व संगीत अशा विषयांचा उहापोह केल्यानंतर आज विवेचनासाठी पुन्हा एक नवीन राग खमाज घेऊया.

पंडीत व्यंकटमुखींच्या ७२ थाटांतून पं.भातखंडेजींनी जी १० थाटांची रचना केली त्यांतील खमाज थाटांतून खमाज नावानेच हा राग निर्माण झाला म्हणून हा जनकराग.

या रागाचे “कल्पद्रुमांकूर” या पुस्तकात असे वर्णन आढळते.

“खमाजो यत्र तीव्रा ऋषभगधनयो मो मृदुर्नमृर्दुःस्याद् ।

आरोहे र्रिनिषिद्धेः प्रभवति परिपूर्णोsवरोहे पवक्रः।।

वादी गांधार एव प्रविलसति संप्रवादो निषादो।

रात्र्याम् यामे द्वितीये प्रमुदयति मनः श्रोतुरपियेष रागः।।

अर्थात ~या खमाज रागात रिषभ(रे),गंधार(ग) व  धैवत(ध)हे तीव्र म्हणजे शुद्ध आहेत. आरोहात रे वर्ज्य तसेच अवरोह संपूर्ण सात स्वरांचा.जसे

सा ग म प (नी) सां

सां (नी)ध प म ग रे सा

पंचमाचा उपयोग वक्र पद्धतीने होतो.{(नी) ध म प म प म ग म}

वादी स्वर गंधार  आणि संवादी निषाद या रागाला खुलवितात.

रात्रीच्या दुसर्‍या प्रहरी गायिल्याने/वाजविल्याने रसिकांच्या मनाला आनंदीत करतो.

ह्यांत भक्तीची भावना आहे म्हणून खमाज थाटाला ‘हरीका मेल” असे म्हटले असावे. कारण या रागात भक्तियुक्त पारंपारिक बंदीशी आढळतात.मग ती भक्ति ईश्वराप्रति असेल किंवा गुरूजनांप्रति आदर व्यक्त करणारी असेल.उदाहरणार्थ~

“नमन करू मै सद्गुरू चरणा।

सब दुखहरणा भवनिस्तरणा।।

शुद्धभाव धर अंतःकरणा ।

सूर नर किन्नर वंदित चरणा।।”

भक्तीबरोबरच खमाजच्या सुरावटीतून मुख्यत्वेकरून श्रृंगार रसाचा आविष्कार होतो.श्रृंगारिक भाव असलेली ठुमरी या रागाच्या सुरावटीत ऐकताना फार बहार येते.

शोभा गुर्टूंची ‘राधा नंदकुवर समझाये’ ही ठुमरी ऐकतांना अगतिक राधा डोळ्यासमोर उभी राहते.’बारी उमर लरकैया’,’कुसुमऋत आयी’ ह्या शोभाताईंच्या आणखी काही खमाज ठुमर्‍या आहेत.’जरा धीरेसे बोलो कोई सुन लेगा’ हा बेगम अख्तरबाईंचा खमाज दादरा प्रसिद्ध आहे.सुरेशबाबू माने’देखो जिया बेचैन’ आणि ‘नजरिया लागे प्यार’ या ठुमर्‍या रसील्या ढंगाने गात असत.केसरबाईंची ‘आये श्याम मोसे खेलत नाही, सिद्धेश्वरीदेवींची ‘तुमसे लागी प्रीत सांवरिया’ या खमाज ठुमर्‍यांचे रेकाॅर्डिंग ऐकतांना मन वेडावून जाते.शुभा मुद्गलांची ‘बाबूल जिया मोरा घबराये’ ही ठुमरीश्रोत्यांना मंत्रमुग्ध करते,

‘धीर धरी धीर धरी । जागृत गिरीधारी’,’नाही  मी बोलत नाथा,मधु मधुरा तव गिरा, ‘या नव नवल नयनोत्सवा’ ही नाट्यपदे,आज २००वर्षांनंतरही आपण ऐकतो.’या जन्मावर या जगण्यावर शतदां प्रेम करावे’ हे कै.अरूण दाते यांनी रसिकांच्या मनांत घर केलेले भावगीत, ही आणखी काही खमाजची उदाहरणे देतां येतील.

खमाज ऐकतांना आपल्या असे लक्षांत येते की ह्या रागाची वृत्ती आनंदी, खेळकर आहे. मनाला आनंद देणारे खमाजचे स्वर कधीतरी उदासही करतात मात्र.

संशयकल्लोळ नाटकाची नायिका रेवती जेव्हा एकटीच’संशय का मनी आला’ हे पद गात असते तेव्हा या उदासीनतेचा प्रत्यय येतो खरे तर हा जनक राग,परन्तु याचा पसारा फार मोठा नाही.त्यामुळे या रागांत ख्याल गायन ऐकावयास मिळत नाही.

मात्र उपशास्त्रीय संगीताच्या प्रांगणात हा राजाप्रमाणे दिमाखाने मिरविणारा राग आहे असे म्हणणे योग्यच ठरेल.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments