मराठी साहित्य – सूचनाएं/Information ☆ सौ.राधिका भांडारकर– अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

‘सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ राधिका भांडारकर

☆ संपादकीय निवेदन ☆

 💐🥇अभिनंदन 🥇💐

 आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका राधिका भांडारकर यांना तितिक्षा इंटरनॅशनल साहित्य समुहाचे  विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

तितिक्षा इंटरनॅशनल साहित्य समुहातर्फे आयोजित गणेशोत्सव २०२४ या दैनंदिन काव्यस्पर्धेत १६/०९/२०२४ दिवशीच्या त्यांच्या गिरीजात्मज या भक्तीगीतास सर्वोत्तम पुरस्कार मिळाला आहे. तसेच तितिक्षा ईंटरनॅशनल पुणे आयोजितदैनंदिन दशदिवसीय, आदिमाया आदिशक्ती या काव्यस्यर्धेत घटस्थापना या काव्यास विशेष पुरस्कार मिळाला आहे. शिवाय  तितिक्षा ईंटरनॅशनल पुणे, बाबा काव्यस्पर्धेत (२०२४) त्यांच्या माझे बाबा या कवितेस लक्षवेधी कविता म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

राधिका भांडारकर यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल  त्यांचे ई अभिव्यक्ती समुहातर्फे मनःपूर्वक अभिनंदन  आणि  हार्दिक शुभेच्छा 💐💐

संपादक मंडळ

ई  अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “पार सावलीचा…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “पार सावलीचा” ☆ सौ राधिका भांडारकर 

(पुरस्कार  प्राप्त  कविता -> विषय: माझे बाबा – काव्यप्रकार: दिंडी वृत्त)

तीर्थ ते उरले गेली ती गंगा

बाबा पाळती ही विचारगंगा॥

 *

भाव  त्यात  असे  हो स्थिर चित्ताचा

त्याग लोभाचा आणि संचयाचा ॥

 *

अभ्यास गाढा व्यासंग दांडगा

समाधान हाच सुखाचा तोडगा ॥

मते कुणावरी कधी ना लादली

संस्कार कामी स्वये ती पाळली ॥

 *

वेचले कण ते आम्ही ज्ञानाचे

सहज जगताना कसे अमृताचे ॥

 *

 मुक्त शांत सदा निसर्गात रमले

अज्ञात एका शक्तीस मानले॥

 *

 स्वयं बुद्धीने सत्यास जाणले

शाश्वत सर्व ते आम्हा बिंबविले ॥

 *

 ती दृष्टी दिली सुंदर जगण्याची

 ओंजळीत दिली शिकवण प्रेमाची॥

 *

 पहाडासमान कणखर ते होते

संकटात किती ताठ उभे होते॥

 *

 साहित्यिक कला संगीतात रुची

आस बाळगली ध्यान धारणेची ॥

 *

ध्यास विद्येचा विद्यार्थी घडले

जगण्या जाणते  संस्कारी केले ॥

 *

चतुरस्त्र होते व्यक्तिमत्व त्यांचे

अभिमान वाटे असे कार्य त्यांचे॥

 *

पंचकन्यांचे परमपूज्य बाबा सुखदुःखातल्या पथी जणू थांबा॥

 *

कसा खात्रीचा  खांदा मायेचा

वटवृक्ष होता पार सावलीचा ॥

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावित्रीबाईंच्या मनातलं… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी `

🌸  विविधा  🌸

☆ सावित्रीबाईंच्या मनातलं☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

मी सावित्री बोलतेय गं माझ्या लेकींनो तुमच्याशी. मलाही थोडं मन मोकळं करावसं वाटतयं नं तुमच्या जवळ!

आज तुम्ही सगळ्या माझ्या कामाची दखल घेऊन कृतज्ञता व्यक्त करता आहात नं!खूप बरं वाटतयं मला!खरचं तेव्हा मला खूप कष्ट पडले गं मुलींनो प्रवाहा विरुद्ध पोहोतांना! सगळ्या समाजाचा विरोध होता मुलींना शिकवण्यासाठी. पण माझ्या पतीचा ज्योतीबांचा भरभक्कम हात होता माझ्या पाठीवर म्हणून मी तरून जाऊ शकले. अर्थात मलाही तेव्हढं धैर्य गोळा करावच लागलं बरं का?

का शिकवायचं नाही मुलींना याचं मुख्य कारण काय सांगायचे तेव्हाचे बुजरूक माहिती आहे का?ते म्हणायचे, मुलींना शिकवलं तर त्या आपल्या याराला पत्र लिहितील आणि त्याच्या सोबत पळून जातील. पण नंतरच्या काळात साने गुरूजींनी ठाम पणे सांगितले की खूप काळाने दाव्याला बांधलेली गाय सोडली की ती हुंदडते व आपल्या वासरासाठी घरी परतते. त्याचप्रमाणे स्त्री सुद्धा खूप काळ बंधनात होती म्हणून थोडा काळ भरकटल्यासारखी दिसेल पण आपल्या पिल्लांसाठी घरट्यात परतेलच!बरोबर आहे न गं मुलींनो! आतापर्यंत तरी तुम्ही त्यांचे बोल खरे करून दाखवले. शिकून, नौकरी करून, स्वातंत्र्य घेऊनही घरटं नीट सांभाळलं. आपल्या भारतीय संस्कृतीचे पाळंमुळं घट्ट धरून ठेवलीत.

पण आजकाल थोडं थोडं चित्र बदलू लागलयं का गं?मुली वरवरचं रूपडं बघून प्रेमात पडतात आणि स्वतःचंच जीवन उद्ध्वस्त करताहेत!अगं मला माझ्या ज्योतिबांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं म्हणून माझ्या हातून येव्हढं मोठं कार्य घडलं. पण मी आपल्या भारतीय संस्कृतीशी नाळ जोडलेलीच राहू दिली. कारण पाळंमुळं खोलवर रूजली होती मनात. शिकून मुलींनी उंच झेप घ्यावी. स्वतःची उन्नती करून घ्यावी. हेच चित्र होतं माझ्या डोळ्यापुढे तेव्हा. बरोबर होत ना गं ते!तुम्ही पण ते चित्र छान रंग भरून सर्वांसमोर आणलं बरं का!मला खूप अभिमान वाटतोय त्याचा.

पण एक सांगू का तुम्हाला?तुम्ही शिक्षणाचा उपयोग आपल्या उन्नती बरोबर आपल्या देशाची, संस्कृतीची शान राखावी या करताच करा हं मुलींनो. आज आपले मुलं मुली कुठल्या दिशेने धावताहेत याकडे वेळीच लक्ष द्या बरं का?दुसर्‍या संस्कृतीमधील चांगल्याबरोबर वाईटही गोष्टी आधुनिकतेच्या नावाखाली उचलू नका. अन्यथा पश्चात्तापाची वेळ येईल. अजूनही लगाम तुमच्याच हातात आहेत. ते आवरा, उधळू देऊ नका. “सावित्री बाईंनी स्त्री शिक्षणाचे दरवाजे खुले केले” या शब्दांना अलगद सांभाळणं, या शब्दां बरोबरचं माझाही मान राखणं आता तुमच्याच हाती आहे बरं का!कारण मी हाती घेतलेला वसा मी तुमच्या हाती खूप विश्वासाने सोपवला आहे. माझा विश्वास सार्थ करणे तुमच्याच हाती आहे.

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘दोन पिढ्यांमधील समन्वय…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

?विविधा ?

☆ ‘दोन पिढ्यांमधील समन्वय…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

नवीन आणि जुन्या पिढीत वैचारिक मतभेद असणे हे अत्यंत स्वाभाविक आहे, कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियमआहे.  काळानुसार जीवनशैली बदलत असते. शिक्षण, विज्ञान, जागतिकीकरण यातून नवीन विचार प्रवाह अस्तित्वात येत असतात. नवीन पिढी हे नवे विचार लवकर आत्मसात करते. तर जुन्या पिढीला हे स्वीकारायला वेळ लागतो. यातून संघर्ष निर्माण होतो आणि अनेकदा तो विकोपाला जाऊन एकमेकांबद्दल कटुता निर्माण होते, दुरावा निर्माण होतो.  याचा परिणाम कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर होतो. आज कुटुंबात हा वाद आई-वडील आणि मुलं यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.  त्यामानाने काही अपवाद वगळता, आजी-आजोबा आणि नातवंडं यांच्या संघर्षाची तीव्रता कमी आहे.

पूर्वी एखाद्या समस्येचं निराकरण करण्यासाठी कुटुंबातील सदस्य अथवा समाजातील ज्येष्ठ व्यक्तींशी प्रत्यक्ष चर्चा केली जात असे. त्यामुळे वैचारिक देवाणघेवाण करताना एकमेकांशी आपुलकीचे संबंध निर्माण होत.  पण आता गुगलवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या भांडारामुळे हा संवाद हरवत चालला आहे. पाठीवरच्या हातातून मिळणारं पाठबळ व स्पर्शातून व्यक्त होणारं प्रेम, हे दृक्श्राव्य माध्यमातून होणाऱ्या शाब्दिक चर्चेतून कसं मिळणार?कोविडच्या काळात तर अगदी शिशु वर्गातील मुलांना मोबाईल हातात घेऊन शिक्षण घेणं क्रमप्राप्त झालं. आई-वडील लॅपटॉपवर ऑफिसच्या कामात गर्क आणि मुलं अभ्यास आणि नंतर मोबाईलवर गेममध्ये दंग!

पूर्वी एखादा नवीन पदार्थ करायचा असेल तर नवविवाहिता, शेजारच्या एखाद्या काकू, मावशीचा सल्ला घेत असे, माहिती घेत असे.  कालांतराने पाककृतींची पुस्तकं उपलब्ध झाली. आणि आता तर मोबाईलमुळे *कर लो दुनिया मुठ्ठी में *, त्यामुळे देशी-विदेशी कोणत्याही पाककृती काही सेकंदात तुमच्या समोर असतात आणि त्याही दृक्श्राव्य स्वरूपात! केवळ पाककृतीच नव्हे तर कोणत्याही विषयासंबंधी माहिती, मोबाईलवर क्षणात सापडते. या आभासी जगात रमताना कौटुंबिक आणि सामाजिक संवाद हरवत चालला आहे.

जागतिकीकरणामुळे कामाच्या वेळेचा आपल्या स्थानिक वेळेशी मेळ नाही. त्याचाही विपरीत परिणाम शारीरिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर होत आहे.

आपल्या मुलांनी दिवसभरात चार शब्द आपल्याशी बोलावे, ही घरातील वडील मंडळींची साधीशी अपेक्षा.  पण कामाच्या या विचित्र वेळेमुळे कुटुंबातील ज्येष्ठांची साधी विचारपूस करायलाही तरूण पिढीला वेळ नाही.  मग इतर अपेक्षांची काय कथा!त्यामुळे त्यांच्या परस्पर संबंधात काहीसा दुरावा निर्माण होतो आहे.  लग्न, मुंजीसारखे समारंभ किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात भाग घेणं देखील, त्यांना त्यांच्या कामाच्या वेळेनुसार, अनेकदा शक्य होत नाही. मग नातेवाईक आणि समाजातील अन्य व्यक्तींशी संबंध जुळणार तरी कसे? आपण सुखदुःखाच्या प्रसंगात कोणाकडे गेलो नाही, तर आपल्याकडे तरी कोण येणार? याचा परिणाम नवीन पिढीला एकाकीपणा बहाल करत आहे. वैफल्यग्रस्त बनवत आहे.  त्यांच्या स्वभावातील चिडचिडेपणा वाढवत आहे.

यामुळेही कौटुंबिक कलह निर्माण होऊन, भावनिक दुरावा निर्माण होत आहे.

मग या दोन पिढ्यांत समन्वय साधणार तरी कसा?कारण प्रत्येक पिढीला स्वतःचंच वागणं बरोबर वाटत असतं. त्यांची जीवनशैली व सामाजिक मूल्ये वेगवेगळी असतात. परस्पर संवाद, चर्चा आणि सामंजस्य याद्वारे हा दुरावा, अंतर नक्कीच कमी करता येईल.

जुन्या पिढीतील लोकांनी नवपिढीला परंपरागत, सामाजिक व धार्मिक विचारांचे महत्त्व पटवून द्यावे, परंतु नवपिढीवर ती बंधन म्हणून लादू नये. सातच्या आत घरात, ही पूर्वीची परंपरा. आज शिक्षण, नोकरी, व्यवसाय इ. च्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या नवीन पिढीला, हे कसं शक्य होईल?घरी परतायला रात्रीचे ९-१०वाजत असतील तर झोपायला १२ वाजणार, मग पहाटे लवकर उठणं कसं जमणार? आता वटपौर्णिमेला वडाची साग्रसंगीत पूजा आणि उपास केवळ परंपरा म्हणून केला पाहिजे, हे नवीन पिढी ऐकणार नाही. पण वटवृक्षाचं संगोपन, निसर्गाचा समतोल आणि आरोग्य या गोष्टींसाठी ते करावं, हे समजावून सांगितल्यावर आजच्या पिढीतील तरूण आणि तरूणी, दोघंही वृक्षारोपणाचा वसा उचलायला स्वतःहून पुढाकार घेत आहेत.  रोज देवपूजा करणं हा जुन्या पिढीच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग. पण नवीन पिढीला कदाचित तो वेळेचा अपव्यय वाटू शकतो किंवा त्यांच्या कामाच्या घाईगडबडीत त्यांना ते जमवता येत नसेल.  नवपिढी जर प्रामाणिकपणे त्यांचं काम करत असेल, त्यांना जमेल तसं सामाजिक उन्नतीसाठी शारीरिक, आर्थिक, बौद्धिक मदत करत असेल तर, जुन्या पिढीने हे समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान, योगाभ्यासाची आवश्यकता संयतपणे तरूण पिढीला समजावून सांगितली पाहिजे.

आजच्या शिक्षणपद्धतीत जीवनमूल्यांचा अभाव जाणवतो. जीवघेण्या स्पर्धेच्या या युगात झापड लावल्यासारखी अवस्था आहे नवीन पिढीची! जुन्या पिढीतील लोकांनी नवपिढीला जुन्या जीवनमूल्यांचे महत्त्व आणि आजच्या परिस्थितीत त्यांची उपयुक्तता समजावून सांगणे आवश्यक आहे. कारण काळ कितीही बदलला तरी नेहमी खरे बोलणे, प्रामाणिकपणे वागणे, वडीलधाऱ्यांचा आदर आणि सेवा करणे ही शाश्वत मूल्ये कधीच कालबाह्य होत नसतात.

नव्यापिढीचे स्वैर वागणे, मुला-मुलींचे एकत्र फिरणे, रात्री उशिरा घरी परतणे, त्यांची कपड्यांची फॅशन, जुन्या पिढीला आवडत नाही.  जुनी पिढी, पालक अनेकदा या मुलांच्या आवश्यक गरजा पूर्ण करत नाही.  यातून मग वाद निर्माण होतो.  आपल्या वागण्याचं, गरजांचं योग्य समर्थन नवीन पिढीला करता आलं पाहिजे आणि आपल्या विरोधामागची भूमिका, जुन्या पिढीलाही नीट समजावून सांगता आली पाहिजे. अर्थात हे करताना दोन्ही बाजूंनी संयम राखणं खूप आवश्यक आहे. अन्यथा केस कापायला आई-वडिलांनी परवानगी दिली नाही म्हणून मुलीची आत्महत्या, मित्रांबरोबर पार्टी करायला पैसे दिले नाही, म्हणून वडिलांच्या खूनाचा प्रयत्न, मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून वडील आणि भावांनी तिला जीवे मारले, यांसारख्या घटना समाजात घडताना दिसतात.

नवीन पिढीला तंत्रज्ञानाची माहिती आपल्यापेक्षा जास्त आहे, हे वडीलधाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. घरबसल्या मोबाईलच्या मदतीने ते अनेक कामं, अगदी चुटकीसरशी पार पाडतात. मग ते लाईट बील भरणं, औषधं मागवणं, एखाद्या कार्यक्रमाची/प्रवासाची तिकिटे आरक्षित करणं असं काहीही असेल. पण यामुळे वेळ, पैसा आणि मनुष्यबळ यांची छान बचत होते. या पिढीच्या उधळपट्टीवर, अवास्तव खर्चावर टीका करणाऱ्या मंडळींनी हेही लक्षात घेतलं पाहिजे. दुसऱ्या शहरात अथवा परदेशात राहणारी अनेक मुलंही वेबकॅम सारख्या उपकरणांचा उपयोग करून आपल्या पालकांची काळजी घेताना दिसतात. त्यांच्या दैनंदिन गरजा आॅनलाईन व्यवहाराद्वारे पूर्ण करताना दिसतात.

 ‘आमच्या वेळी नव्हतं हो असं ‘, हे म्हणणारी पिढी कधीच मागे पडली आहे.  आत्ताचे पन्नाशीच्या आसपासचे आई-वडील अथवा सासू-सासरे बघितले, तर ते नवीन पिढीशी बरंच जुळवून घेताना दिसतात.  मुलांची कामाची वेळ, घरून काम, त्यांचं स्वातंत्र्य यांचा विचार करून, त्यांचं वेगळं राहाणं ते समजून घेतात. शक्य असेल तिथे पालक मुलांच्या लग्नाआधीच त्यांची वेगळं राहण्यासाठी सोयही करून ठेवतात. हे परिवार वेगळ्या घरात राहात असले तरी एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात आणि परस्परांना शक्य तेवढी मदतही करतात. आपल्या आचरणातून होणारे संस्कार पुढील पिढीत आपोआप झिरपत असतात. म्हणूनच परदेशात राहणारी अनेक मुलंही आपल्या परंपरा, मातृभाषा आवर्जून जपताना दिसतात.  कदाचित ते जपण्याची त्यांची पद्धत काळानुरूप थोडी वेगळी असेल.  पण हे चित्र नक्कीच आशादायक आहे.

  प्रत्येकाने आनंदात राहावे असे वाटत असेल, तर दोन्ही पिढ्यांनीआपल्या भूमिकेची अदलाबदल करून पाहावी. म्हणजे एकमेकांना समजून घेणं सोपं होईल. आपल्या बोलण्यातून, वागण्यातून एकमेकांबद्दल प्रेम, आदर, काळजी व्यक्त झाली पाहिजे. मानवी संवेदनशीलता हरवता कामा नये. दोन्ही पिढीतील सदस्यांनी वैचारिक भिन्नतेचा आदर राखला पाहिजे.

 सामाजिक संबंध सलोख्याचे ठेवण्यासाठीही एकमेकांस समजून घेणे आवश्यक आहे.

एकमेकांच्या भावना, विचारसरणी, सामाजिक मूल्ये समजून जीवन जगले पाहिजे. तेव्हाच दोन्ही पिढ्यांमध्ये समन्वय साधला जाईल.  शिक्षण, चौफेर वाचन, सामाजिक माध्यमांचा योग्य वापर यातून कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर नक्कीच अनुकूल परिणाम दिसून येईल.  आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे अधिक संवेदनशीलतेने आणि सजगपणे बघण्याचा दृष्टीकोन जाणीवपूर्वक जोपासण्याचा प्रयत्न दोन्ही पिढ्या करत आहेत, ही समाधानाची बाब आहे.  शालेय शिक्षणात मूल्य शिक्षण आणि पर्यावरण विषयक जागरूकता यांचा समावेश हे त्यातील एक महत्वाचं पाऊल!याशिवाय अनेक सेवाभावी संस्था आणि गट वृक्षारोपण, रक्तदान, प्लास्टिक हटाव, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्याचं वाटप, जुनं प्लास्टिक व मोबाईल सारखा ई-कचरा गोळा करून पुनर्वापरासाठी पाठवणे, असे उपक्रम राबवत आहेत.  या उपक्रमांमध्ये लहान-थोर सगळ्यांना सामील करून घेतलं जातं.  त्यामुळे दोन्ही – तिन्ही पिढ्यांमध्ये प्रत्यक्ष संपर्क, संवाद आणि आपुलकीचं नातं निर्माण होण्यास, खूप छान मदत होत आहे.  

 © सुश्री प्रणिता खंडकर

दि. १८/०७/२०२३

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रकाशक – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ प्रकाशक – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

जयंतरावांचा पाचवा स्मृतीदिन जवळ आला तसा साहित्यिक विश्वात त्यांच्याविषयी लिहून यायला लागलं.  जयंतरावांचे फॅन्स सर्वत्र, मुंबई, पुण्यात जास्त.  पुण्याच्या साहित्य जीवन या गृपने मला प्रमुख म्हणून आमंत्रित केलं.  तसे दरवर्षी मला कुठे ना कुठे बोलावलं जातंच.  पण यंदा पुण्याच्या गृपने एक महिना आधी माझा होकार मिळविला.  मी जयंताचा प्रकाशक..  त्यापेक्षा जवळचा मित्र म्हणून मला जास्त मागणी.

गेले महीनाभर जयंताच्या आठवणी पिंगा घालत अवतीभवती फिरत होत्या.  नेहमी प्रमाणे त्याच्या कवितासंग्रहाच्या आणि कथा पुस्तकांच्या आवृत्या माझ्या प्रकाशन संस्थेमार्फत काढल्या.  या सुमारास त्याची पुस्तके खपतात हा अनुभव.  प्रत्येक आवृत्तीची छपाई झाली की त्यातील एक पुस्तक माझ्याकडे येत होते.

प्रत्येक पुस्तक म्हणजे जयंताच्या आठवणींची एक लाट.  लाट अंगावर येवून मला चिंब भिजवत होती.

पुण्याच्या कार्यक्रमासाठी मी आधल्या दिवशी पुण्यात पोहचलो. सकाळी नऊ वाजता कार्यक्रम सुरू झाला.

व्यासपीठावर जयंताचा मोठा फोटो लावला होता.  टेबल, चार खुर्च्या आणि समोर जयंताच्या साहित्याचे चाहते.  त्यामुळे हॉल त्याच्या चाहत्यांनी भरला होता.  सुरूवातीस स्वागत झाले. माझ्या हस्ते जयंताच्या फोटोस हार घातला गेला आणि माझ्या भाषणाऐवजी जयंताच्या आठवणीसाठी माझी मुलाखत घेण्यासाठी दोन मुली समोर येवून बसल्या.  आणि प्रश्नोत्तरे सुरू झाली….  

प्रश्न- “सर, जयंतराव हे तुमचे मित्र आणि लेखक सुद्धा.  तुम्ही त्यांचे चार कविता संग्रह आणि तीन कथा संग्रह प्रकाशित केलेत, मग तुमचे जास्त जवळचे नाते काय? मित्र की लेखक ? “

मी – मैत्री पहिली. आम्ही दोघे मुंबईच्या एलफिस्टन कॉलेजमध्ये शिकत होतो.  लेखन, वाचन, नाटक, संगीत या आवडीने जवळ आलो.

प्रश्न – मग तुम्ही प्रकाशन व्यवसायात कसे आलात ? 

मी – प्रकाशन हा माझ्या कुटुंबाचा व्यवसाय.  त्या वेळी आमची मुंबईत दोन पुस्तकांची दुकाने होती, आता सहा आहेत.

प्रश्न – जयंतराव केव्हापासून लिहू लागले? कॉलेजमध्ये असताना की नंतर ?

मी – तो कॉलेजमध्ये असताना कविता करायचा.  आम्हाला कॉलेजमध्ये शिकवायला प्रसिद्ध लेखक, कवी होते.  त्यांचे पण संस्कार त्याच्यावर झाले.  कॉलेजनंतर तो म्युनिसिपालटीमधे नोकरीला लागला. लेखन सुरूच होते.

प्रश्न- जयंतरावांना संगीताची पण समज होती असं म्हणतात.

मी- समज होती नाही..  तो उत्तम गायचा, आमची खरी मैत्री गाण्यामुळे झाली.

प्रश्न – सर, जयंतरावांची पत्नी ही तुमची वर्गमैत्रीण ना? त्यांना अनेक कलांची देणगी होती असे म्हणतात.

मी – ती उत्तम अभिनेत्री, लेखिका, गायिका होती 

प्रश्न – सर, कॉलेज मध्ये असताना तुम्हा तिघांचा गृप होता असे म्हणतात हे खरे आहे काय?

मी – हे खरे आहे, मी, जयंता आणि अनघा नेहमी एकत्र असायचो.  तिघांच्या आवडीनिवडी सारख्या, त्यामुळे आमचं मस्त जमायचं.

प्रश्न – त्या काळात तुम्ही नाटके पण फार बघायचात ? 

मी – होय.  आम्ही विजया मेहतांच्या रंगायन गृपमध्ये होतो.  विजया मेहता अल्काझींच्या विद्यार्थीनी.  त्यांनी मराठी नाटकात नाविन्य आणले.  लहान हॉलमध्ये नाटके व्हायची, आम्ही लहान-लहान भूमिका करायचो, तसं नाटकाचं सारच करायचो, नेपथ्य लावायचो, लाईट जोडायचो, मेकअप करायचो, सतत बाईंच्या बरोबर असायचो.

प्रश्न – आणि तुमचा व्यवसाय?

मी – व्यवसाय सांभाळायचोच, कॉलेजमध्ये असतानाच मी पुस्तक प्रकाशन व्यवसायात आलो.

माझ्यापेक्षा तिप्पट, चौपट वयांच्या लेखकांची पुस्तके मी प्रकाशित करत होतो.  

प्रश्न – तुम्ही जयंतरावांची पण पुस्तके प्रकाशित केलीत?

मी – त्याचे कवितासंग्रह, कथासंग्रह मीच प्रकाशित केले.

प्रश्न – आणि त्यांची नाटके? विशेषत: त्यांचे प्रसिद्ध नाटक अलेक्झांडर? 

मी – त्याची नाटके दुसर्‍या प्रकाशकाने प्रसिध्द केली 

प्रश्न – तुम्ही एवढे जवळचे मित्र असताना ती पुस्तके दुसर्‍यांकडे का गेली ?

मी- ते आता मला तुम्हाला सविस्तर सांगावे लागेल.  कॉलेज काळात मी, जयंता आणि अनघा कायम बरोबर असायचो.  जयंता मध्यमवर्गीय गिरगावातला मुलगा, दहा बाय दहाच्या जागेत आठ जण राहायचे, अनघा ही फायझरच्या ऑफिसरची मुलगी.  त्या काळी वडीलांची गाडी वगैरे असलेली.  मी ग्रॅन्टरोड भागातील उच्च मध्यम वर्गीय.  आमचे कुटुंब पुस्तक व्यवसायात. अनघा मला आवडत होती.  विजयाबाईंच्या रंगायनमध्ये छोट्या मोठ्या भूमिका करायचो, नाटकाच्या तालमीला जाताना अनघा आपली गाडी घेऊन यायची, माझ्या घराजवळ येवून मला गाडीत घ्यायची, पुढे जयंताला ठाकूरव्दारच्या कोपर्‍यावर घ्यायची.  तालमी संपवून येताना आम्ही तिघे गिरगाव चौपाटीवर बसायचो.  जयंता त्याच्या कविता म्हणायचा, अनघा त्याला चाल लावायची आणि गाणं म्हणायची.  अनघा जयंताला म्हणायची – “चांगल्या इंग्लीश नाटकांची भाषांतरे कर, तू कवि मनाचा आहेस, आपण बाईंना सांगू नाटक बसवायला. ” अनघाने ब्रिटीश लायब्ररीमधून सात -आठ इंग्लीश नाटके आणून दिली. जयंताने मनापासून त्यांची रूपांतरे केली. अलेक्झांडर त्यातील एक, बाईंनी अनघाला हे नाटक बसवायला सांगितले.  नव्या जुन्या कलाकारांना घेवून अनघाने हे नाटक बसविले. त्याचा प्रयोग मी पाहीला.  आणि जयंताला म्हटले- ” हे नाटक मी छापणार”. , त्यावर जयंता म्हणाला – ” तूच छाप, तूझ्याशिवाय दुसरं कुणाला देणार ?” त्या नाटकाचा बराच बोलबाला झाला, जयंताचे खूप कौतुक झाले. अनघाने नाटक बसवले म्हणून तीचे कौतुक झाले.  पुस्तक मी प्रकाशित करणार या आनंदात होतो.  सहा महीने झाले तरी जयंताने त्या पुस्तकांची हस्तलिखीते दिली नाहीत, अचानक मला समजले की ही पुस्तके पुण्याचा एक प्रकाशक छापत आहे. मी आश्चर्यचकित झालो.  आणि जयंताच्या घरी गेलो.

“जयंता, तुझी नाटकाची पुस्तके पुण्याचा प्रकाशक छापतो आहे हे खरे काय”?

”होय, हे खरे आहे”

”पण मी तुला तुझी सर्व नाटके छापणार हे सांगितलं होतं. आणि मी हस्तलिखीते मागत होतो ”.

“अनघाने या प्रकाशकाला माझ्याकडे आणले. ”

“अनघाने? मग तिने मला कां नाही सांगितले”?

“अनघाचे म्हणणे तू जे माझे कवितासंग्रह छापलेस, त्याचे मानधन फारच कमी दिलेस, त्याच्या डबल पैसे मिळायला हवे होते. ”

“अरे, पैशांचा व्यवहार माझा मोठा भाऊ पाहतो, मी नाही आणि मला जर हे अनघा बोलली असती तर मी भावाकडे बोललो असतो”.  

“अनघा म्हणते, तू जी पुस्तके छापलीस त्याची क्वॉलीटी चांगली नव्हती.  इतर प्रकाशक पुस्तके छापतात त्या मानाने काहीच नाही. “

“हा आरोप मला मान्य नाही. मी तुझी पुस्तके मुंबईतील सर्वोत्तम प्रेसमधून छापून घेतलीत आणि अनघा म्हणते…..  हे काय आहे..  तुझे काय मत आहे? तुझी पुस्तके खराब केली असे तुला म्हणायचे आहे काय”? 

”होय’ !

त्याच क्षणी मी रागाने जयंताच्या घराबाहेर पडलो  

– क्रमशः भाग पहिला  

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – आत्मसाक्षात्कार ☆ मी… तारा… – भाग – ४ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? आत्मसाक्षात्कार ?

☆ मी… तारा… भाग – ४ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वत:शीच केलेलं हितगुज किंवा आपणच घेतलेली आपली मुलाखतच म्हणा ना!

डॉ. तारा भावाळकर या लोकसाहित्याच्या आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक समीक्षक आणि संशोधक. या व्यतिरिक्त नाट्य, समाज, शिक्षण इ. अन्य क्षेत्रातही त्यांच्या लेखणीने करामत गाजवली आहे. त्यांनी आपला लेखन प्रवास, कार्यकर्तृत्व, आपले विचार, धारणा याबद्दल जो आत्मसंवाद साधला आहे… चला, वाचकहो… आपण त्याचे साक्षीदार होऊ या. वस्तूत: ही मुलाखत १३ एप्रील १९२१ पासून क्रमश: ई-अभिव्यक्तीवर ५ भागात प्रसारित झाली होती. आज डॉ. : तारा भावाळकर विशेषांकाच्या निमित्ताने ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रकाशित करत आहोत.. उज्ज्वला केळकर )

ताराताराबाईंच्या आयुष्यात अडचणी आल्या, पण त्याचप्रमाणे अचानक आनंद देणार्‍या घटनाही घडल्या असतीलच ना!

ताराबाईहो.  तर! नशिबाने चांगली माणसंही भेटत गेली.  प्रोत्साहन देणारी माणसं भेटत गेली……  इथून पुढे )

ताराबाई हो.  तर! नशिबाने चांगली माणसंही भेटत गेली.  प्रोत्साहन देणारी माणसं भेटत गेली.  त्याच वेळी घरातल्यांचाही चंगला पाठीबा मिळत गेला.  ताराबाईंच्या आईलाही त्यांचं खूप कौतुक होतं.  मित्र-मैत्रिणी मिळत गेल्या.  त्या आजतागायत मिळताहेत.  ताराबाईंचं नशीब इतकं चांगलं की त्यांना वयापेक्षा लहान असलेल्या मित्र-मैत्रिणी, वयाची ८० वर्षं ओलांडली, तरी मिळताहेत.  त्यांना हा आपल्या जीवनातला मोठा भाग्ययोग आहे, असं वाटतं.  त्यांच्याशी चर्चा, गप्पा हेही आनंदाचे क्षणच की! पण काही आनंदाचे क्षण अचानकही त्यांना लाभले आहेत.  विशेषत: अनेक पुरस्कारांच्या बातम्या त्यांना अकस्मित रीतीने कळालेल्या आहेत.  

प्रबंधाला पुरस्कार मिळाल्याची बातमी पेपरमध्ये कुठे तरी कोपर्‍यात छापून आली होती.  कॉलेजमधील एका प्राध्यापकांनी ती त्यांना दाखवत विचारलं, ‘ही बातमी बघितली का?’ त्यानंतर विद्यापीठाचं पत्र आलं.  असे अनेक पुरस्कार; म्हणजे सह्याद्री वाहिनीचा पुरस्कार, साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्ती, सु.  ल.  गद्रे पुरस्कार, खाडीलकर पुरस्कार, आंबेडकर शिष्यवृत्ती, असे अनेक…  सामान्यत: निवृत्त झालं की लोक विशेषत: प्राध्यापक मंडळी सुशेगात रहातात.  पण ताराबाई निवृत्तीनंतरही बोलत राहिल्या.  लिहीत राहिल्या.  व्याख्याने देत राहिल्या.  सेवा निवृत्तीनंतरही दरवर्षी एक पुस्तक आणि एक पुरस्कार त्यांच्या खात्यावर जमा आहे, ते अगदे आत्ता आत्तापर्यंत कोरोना सुरू होण्याच्या काळापर्यंत, त्यांचं पुस्तक आलेलं आहे.  ‘लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा’ हे ते पुस्तक.  

अचानक मिळालेले काही धक्कादायक आनंदाचे क्षण असे आहेत, की काही मोठ्या पदावर असलेल्या मोठ्या व्यक्तींनी, साहित्य क्षेत्रातल्या नव्हे हं, अन्य क्षेत्रातल्या मोठ्या व्यक्तींनी, मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींनी, कुठून तरी फोन नंबर मिळवून ताराबाईंना फोन केला आहे आणि त्यांचे पुस्तक आवडल्याचे सांगितले आहे.  लेखकांनी, विद्यार्थ्यांनी, घरच्यांनी कौतुक केले, तर त्याचे विशेष काही नाही.  त्यांना कौतुक असतेच.  पण ज्यांनी खटाटोप करून, नंबर शोधून काढून, लेखन आवडल्याबद्दल फोन केला, त्याचे स्वाभाविकपणेच ताराबाईंना अप्रूप वाटते.  

मुंबईला असताना अचानक एकदा इनामदारांचा फोन आला.  ‘कोण इनामदार?’ ताराबाईंनी विचारलं, ‘पोलीस कमिशनर इनामदार… ’

‘यॅस! आय अ‍ॅम पोलीस कमिशनर इनामदार… ’ ताराबाई गडबडून गेल्या.  यांचा आपल्याला का फोन आला असेल?’ त्या विचार करत असतानाच इनामदार म्हणाले.  ‘तुमचं पुस्तक वाचलं.  ‘स्त्री मुक्तीचा आत्मस्वर.  खूप आवडलं, म्हणून फोन केला.  ताराबाईंना हे अगदीच अनपेक्षित होतं पण त्यामुळे आनंद द्विगुणित झाला.  हेच पुस्तक आवडल्याचा काही महिन्यांपूर्वी आनंद करंदीकरांचाही फोन आला होता.  हे पुस्तक अनेकांना आवडलं आणि त्याच्या आवृत्त्याही निघाल्या.  आकाशवाणी साठी, पु.  मं.  लाड व्याख्यानमालेत ३ व्याख्याने दिली होती, त्यावर हे पुस्तक आधारलेले आहे.  

अगदी एवढ्यातच काही दिवसांपूर्वी व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज आला, ‘ तुमचा ‘लोकसाहित्यातील सीता’ हा लेख खूप आवडला.  तो मेसेज अभय बंग यांचा होता.  तर असे काही धक्कादायक आनंदक्षण मिळत गेले.  त्यामुळे हार्ट अ‍ॅटॅक वगैरे काही आला नाही, पण आनंद खचितच झाला.  सांगायचं तात्पर्य असं की लेखनामुळे बर्‍याच चांगल्या गोष्टी आयुष्यात घडत गेल्या.  त्यामुळे जगणं हे ओझं झालय, असं अजून तरी वाटत नाही.  

तारा – आत्तापर्यंत तुम्ही आपल्या लेखनाचा धावता आढावा घेतलात, आता मागे वळून बघताना तुम्हाला नेमकं काय वाटतं? एवढं लेखन झालं, त्याचं कौतुक झालं, पुरस्कार मिळाले, त्यामुळे तुम्हाला धन्यता वाटत असणारच! नाही का?

ताराबाईते धन्यता वगैरेसारखे शब्द ताराबाईंच्या व्यक्तिमत्वात बसत नाहीत.  

क्रमश: भाग १

डॉ. ताराबाई भावाळकर

संपर्क – ३, ’ स्नेहदीप’, डॉ. आंबेडकर रास्ता, सांगली, ४१६४१६ मो. ९८८१०६३०९९

 प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हॅप्पी न्यू इयर !!!!! ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ हॅप्पी न्यू इयर !!!!! ☆ श्री सुनील देशपांडे

तो म्हणाला..  “हे बरोबर नाही नववर्षाचं स्वागत करायचं नाही.  आपलं वर्ष गुडीपाडव्याचं..  “त्यां”चं अनुकरण करायचं नाही”

मी म्हणालो..  “ आजची तारीख काय?”

“३१ डिसेंबर”

“आजची तिथी काय?’

“माहीत नाही”

“मग आपलं नक्की काय?”

“ मला रोजची तारीख माहिती..  माझं सगळं नियोजन तारखेवर… म्हणून माझं नववर्षही तारखेवर.

“ मग पाडवा? “

“ तो ही माझा आहेच.  मी आनंदाचा प्रवासी, जिथे आनंद तिथं मी.  ‘शादी किसीकी हो, अपना दिल गाता है. ’

ही माझी वृत्ती, हा माझा पिंड…  खरं तर प्रत्येक सकाळ ही एका नववर्षाची सुरुवात असते.  ‘ सवेरेका सूरज हमारे लिये है ‘ असं म्हणणारा कलंदर मी…..  

….  ‘ न जाने कौनसा पल मौत की अमानत हो.  

हर एक पलको खुशी से गले लगाते जियो 

..  हीच वृत्ती असावी.  खरं म्हणजे प्रत्येक क्षणच नवा असतो, नवा जगायचा असतो.  कोणता क्षण अंतिम असेल हे काय ठाऊक? म्हणूनच प्रत्येक क्षण साजरा करावा.  प्रत्येक दिवस साजरा करावा.  पण रोज साजरा करायला जमतंय कुठं? जमलं तर तेही करावं.  कुणाच्याही आनंदात आपला आनंद शोधावा.

आनंदाला ना जात ना धर्म ना देश.  म्हणूनच – – 

..  ‘ आनंदाचे डोही आनंद तरंग…’ असं म्हणत मित्रांनो साजरा करूया “ निखळ आनंद “….  

..  मग तो कुणाचा का असेना..  आणि कधीही का असेना !!!

….  तर चीssssssssअsssssर्सssss !! 

…  , हॅप्पी.. , न्यू.. , इयर !!!!!

© श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सरत्या वर्षाला निरोप… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

??

☆ सरत्या वर्षाला निरोप… ☆ सौ. वृंदा गंभीर

सरत्या वर्षाला निरोप – – –

बोलता बोलता 2024 सरल निरोप देतांना आपण या वर्षात काय मिळवलं, काय सोडलं, काय चुकलं आणि काय राहून गेलं हे मनातील विचार मंथन चालू झालं….

” माणुसकी हरवली का, ती जपली का?.  हेच प्रश्न मनाला विचारले…   

स्वतः साठी किती जगलो, समाजासाठी किती पळालो, दुसऱ्यांना किती उपयोगी आलो…

” मनातील वाईट विचार काढून चांगले विचार आत्मसात केले हे महत्वाचे…

” सकारात्मक विचाराने तर प्रगल्भ विचारांची देवाण घेवाण होते व समाज प्रबोधन होते एक सुंदर संदेश समाजास मिळतो…

” नकारात्मक विचार आनंद मिळू देत नाही, गैरसमज निर्माण करून नाती टिकू देत नाही हे लक्षात घ्यायला हवं…

आपण, समाजाचे काहीतरी देणं लागतो हे लक्षात ठेऊन कार्य केल तर निस्वार्थी समाज सेवा घडली जाते यात शंकाच नाही…

सात्विक विचार दुसऱ्याप्रति आपुलकीची भावना कळकळ हे आदर्श माणुसकीचा ठेवा आहे तो सर्वांना मिळावा थोडं तरी दुःख हलकं होईल…

” एक अशीच पोळीभाजीच कामं करणारी महिला होती, खूप गरीब आणि प्रामाणिक होती…

” बिचारीला पतीदेवांचे सुख अजिबात नव्हते सतत भांडणं तिला मारणे चालू होते…

एक दिवस तिला खूप मारलं रक्त आलं तोंडातून हिरवं निळं अंग झालं…

त्याही परिस्थितीमध्ये ती माझ्याकडे आली बॅग घेऊन म्हणाली “.  मी आता इथे राहत नाही मी माहेरी जाते… मी तिला म्हणाले तू आज इथे रहा आपण उद्या बोलू.

” तिला चार दिवस ठेऊन घेतलं, समजून सांगितलं थोडा राग शांत झाला तब्बेत सुधारली… ” तिला म्हणाले तू वेगळी रहा, इथेच कामं करतेस ते कर..  जून वाढव … पण माहेरी जाऊ नको…  

जो मान तुला इथे राहून मिळेल तो माहेरी काम करूनही मिळणार नाही ” तिला ते पटलं आणि ती रूम घेऊन राहायला लागली… 

” बऱ्याच वर्षांनी मी तिच्याकडे गेले तर चाळीतील घर जाऊन दोन माजली माडी झाली होती.  तो एक योग्य सल्ला योग्य निर्णय तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला आणि तीच आयुष्य सुधारलं….  

, ” माणुसकी, सकारात्मक विचार योग्य दिशा दाखवतात…

” नवीन वर्ष सुरु झाल्यावर मनाशी संकल्प करावा आणि तो वर्षात पूर्ण करावा…  

” मी, स्वतःसाठी जगेनच पण इतरांना वेळेनुसार मदत करेल… 

गरिबांना मदत करेल परिस्थिती नुसार गरीब मुलांना शिक्षण देईल…  

 ” निराधारांना आधार अनाथ मुलांना आश्रय देईल, माझ्या कुवतीनुसार मी नक्कीच प्रयत्न करेन….

” आज पैसा, यश, समृद्धी सगळीकडे आहे नाही फक्त ” वेळ “..  तो देता आला पाहिजे…  

” आई वडील वयस्कर झाले मुलं परदेशीआहेत, त्यांना सांभाळायला 50 हजार पगार देऊन केअरटेकर ठेवले सर्व सुविधा दिल्या…. तरीही आई वडील नाराज राहू लागले त्यांचं मन उदास असल्याने तब्येत बिघडू लागली…

” त्यांना हे काही नको होत, फक्त मुलांचं प्रेम आणि नातवंडाचं सुख हवं होत…  

“मुलांनी आई वडिलांच्या प्रेमाच्या मायेच्या बदल्यात काय दिल तर पैसे फेकून केअरटेकर… हे प्रेम आहे कि उपकाराची परतफेड… तसं असेलतर आई वडिलांचे उपकार कुणीच फेडू शकत नाही.

विचार आला मनात ” आपण माणुसकी जपली ना, काहीतरी कार्य केल ना… तेंव्हा मन म्हणतं हे वर्ष सुंदर गेलं, नवीन वर्षात अजून कामं करेन… 

“खूप प्रश्न भेडसावत आहेत समाजात खूप प्रश्न सोडवायचे बाकी आहेत.

“वाढते वृद्धाश्रम, बेकारी, मुलांचे लग्न हा तर फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे…

“समाजात परिवर्तन घडवणं आपलं काम आहे, अपेक्षा करण्यापेक्षा आव्हानाला सामोरं जाऊन स्व कष्टाने मिळवलेलं कधीही चांगलं…  

“ज्या आईवडिलांनी घडवलं पायावर उभं केलं याची जाणीव ठेवून दोन शब्द प्रेमाने बोलून त्यांना सांभाळणं हे लक्षात ठेवले तर वृद्धाश्रमाची गरज कशाला लागेल.

“सरते शेवटी काय झालं, काय केलं, हा आनंद मनात ठेवून काय राहिलं, याचा संकल्प करून 2024 ला निरोप देऊन 2025 च स्वागत करूया…

© सौ.  वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या), नऱ्हे, पुणे

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्नेहवन… ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्नेहवन… ☆ प्रा. भरत खैरकर 

श्री अशोक देशमाने.  

अशोक देशमाने हा एक साधा, पण असामान्य युवक….  तो एका शेतकरी कुटुंबात जन्मला होता.  त्याचे आईवडील शेतात काबाडकष्ट करत होते.  त्याचे घर आणि शेत कायमच आर्थिक अडचणींचा सामना करत होते.  अशोक बालपणापासूनच या कठीण परिस्थितीला सामोरा गेला होता.  त्याच्या आईवडिलांचा चेहरा कधीच आनंदाने भरलेला दिसला नाही!कारण प्रत्येक दिवसच एक नवीन संघर्षाचा होता..

गावातील शेतकरी कुटुंबांच्या दुःखाची गोष्ट सर्वांनाच माहिती होती.  शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्याच्या कुटुंबातील अनाथ झालेले मुलं, उघड्यावर पडलेले संसार, यामुळे अशोकला तीव्र मानसिक त्रास होऊ लागला.  तो रोजच हे दृश्य पाहून हळवा होई.  त्याचं हृदय पिळवटून काहीतरी करायला हवं असा आवाज देत होतं.

अशोकने शिक्षणात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला.  त्याला अशी आशा होती की, शिक्षणाचं सामर्थ्य त्याला काहीतरी बदल घडवायला मदत करेल.  त्याने खूप मेहनत घेतली, आणि आयटी क्षेत्रात नोकरी मिळवली.  त्याने आयटी इंजिनियर म्हणून उच्च पगाराची नोकरी केली.  पण नोकरी करत असताना, त्याचे मन नेहमी त्या दु:खी मुलांचा, शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा आणि त्यांच्यापासून होणाऱ्या वेदनांचा विचार करत राहायचं.

एका रात्री, कामातून परत येताना अशोक विचार करत होता.  ‘काहीतरी करायला हवं…  याही मुलांना एक चांगलं भविष्य द्यायचं आहे. ‘ त्याच्या मनात एक विचार आला ‘माझ्या कुटुंबात..  समाजात..  बांधवांत.. जे दुःख होते, ते मी कसे संपवू शकेन? त्यासाठी काहीतरी वेगळं करायला पाहिजे. ‘ त्याने ठरवले की खपण अनाथाश्रम सुरू करूया..

अशोकने सुरुवात केली.  दोन छोट्या रूम्स भाड्याने घेतल्या आणि सात ते आठ मुलांना त्यात आश्रय दिला.  त्या मुलांचे जीवन अत्यंत हालाखीचे होते.  ते सर्व शेतकरी कुटुंबातील होते.  शाळेतील शिक्षण आणि एक सुरक्षित आश्रय त्यांच्या जीवनातील पहिला सोनेरी क्षण होता.

अशोकने या मुलांना शाळेत दाखल करून त्यांचे सर्व काही व्यवस्थित सुरु केले.  त्यांना एक सुरक्षित आणि प्रेमळ घर दिले.  जेथे त्यांना जगण्याची एक नवी दिशा मिळाली.  अशोक त्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर जीवनाच्या तत्त्वज्ञानाची शिकवण देत असे.  त्याने त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रोत्साहित केले, आणि त्यांना जीवनातील कष्टाचे महत्त्व समजावून सांगितले.

हे सर्व करत असताना अशोकने पाहिलं की, या छोट्या उपाययोजनांनी या मुलांच्या आयुष्यात मोठा बदल घडविला होता.  ते शिकत होते, खेळत होते, आणि नवा आत्मविश्वास मिळवत होते.  अशोकने त्यांना एक लक्ष्य दिलं ‘कधीही हार मानू नका, कारण तुमच्या जीवनात तुम्हीच सर्वात मोठे हिरो आहात. ‘

जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी अशोकच्या अनाथाश्रमाची वाहवा सुरू झाली.  मुलं मोठी होऊ लागली, शाळेत उत्तम गुण मिळवू लागली.  काही मुलं तर उच्चशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभी राहिली.  गावाच्या इतर मुलांसाठी अशोक एक आदर्श बनला.

अशोकच्या यशाचं गुपित त्याच्या मनाच्या दृढतेत आणि त्या मुलांच्या भविष्यावर त्याने दिलेल्या प्रेमात होतं.  त्याच्या आयटी क्षेत्रातील पगाराची नोकरी कधीच त्याच्या हृदयाचा भाग बनली नाही.  त्याचे खरे सुख त्याच्या अनाथाश्रमात पाहिलेल्या मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यांत होतं.

अशोकने जेव्हा अनाथाश्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याच्या मनात एक स्पष्ट दृष्टीकोन होता – मुलांना शिक्षण आणि आत्मनिर्भरतेच्या मार्गावर आणणे.  त्याने त्यासाठी दोन एकर जमीन घेतली होती, जिथे त्याने एका संपूर्ण आश्रय स्थळाची उभारणी केली.  हे आश्रम एक साधे, पण अत्यंत आधुनिक आणि शिक्षणासोबतच जीवन कौशल्यांची शिकवण देणारे केंद्र बनले.

अनाथाश्रमाची इमारत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बांधली गेली.  मुख्य इमारतीच्या छतावर सोलर सिस्टिम बसवला गेला होता.  ज्यामुळे आश्रमात पूर्णपणे स्वच्छ आणि हरित उर्जेचा वापर होत होता.  पाणी व्यवस्थापनासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम स्थापित केली गेली होती.  ज्यामुळे पावसाचे पाणी साठवून शौचालय आणि उद्यानासाठी वापरता येत होतं.

आश्रयातील मुलांसाठी गोबर गॅस निर्माण करणारी यंत्रणा ठेवली होती, ज्यामुळे गॅस तयार होतो आणि स्वच्छतेसाठी लागणाऱ्या इतर गोष्टींसाठीही त्याचा वापर केला जातो.  इथे गोपालन देखील सुरु होतं, जिथे मुलं दूध, दही, पनीर असे दुग्धजन्य पदार्थ तयार करायचे.. मुलचं गाईंची काळजी घेत होती.

आश्रयाची आणखी एक महत्वाची सुविधा होती ओपन लायब्ररी आणि खेळणी लायब्ररी.  ओपन लायब्ररीमध्ये विविध वाचनासाठी पुस्तकांचा खजिना होता, आणि मुलांना प्रत्येक आठवड्यात एक पुस्तक वाचण्याचा नियम लागू केला गेला होता.  यामुळे त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण झाली आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊ लागला.  खेळणी लायब्ररीमध्ये मुलांना शारीरिक आणि मानसिक विकासासाठी विविध खेळणी मिळत होती.

आश्रयात आणखी एक अद्वितीय सुविधा होती, इलेक्ट्रिकल वर्कशॉप, केमिस्ट्री आणि बॉयोलॉजी लॅब्स.  मुलं इथे आधुनिक शास्त्रीय प्रयोग करू शकत होती! आणि विज्ञानात रुची निर्माण करायला शिकत होती.  या सर्व कक्षांच्या माध्यमातून मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन आणि व्यावहारिक ज्ञान मिळत होतं.

म्युझिक लॅब हे एक वेगळेच आकर्षण होतं.  ह्या लॅबमध्ये सर्व प्रकारची वाद्ये होती. आणि मुलांना वादन शिकवले जात होते.  अशोकने मुलांना एक गोष्ट ठरवून दिली होती ‘प्रत्येकाने किमान एक वाद्य वाजवायला शिकले पाहिजे. ‘ यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढत होता, आणि संगीत शिकणे त्यांना मानसिक शांती आणि आनंद देत होतं.

मुलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी फॅशन डिझाईन आणि शिलाईयंत्र होती.  इथे मुलं कपडे डिझाइन करू शकत होती.  शिवाय पिठाची गिरणी, ग्रेव्ही मिक्सिंग मशीन, आणि पापड तयार करण्याची मशीन, चपाती मशीन अशा विविध यंत्रांद्वारे कौशल्य शिकवले जात होते.  ह्या सुविधांद्वारे मुलं व्यवसायिक कौशल्यांमध्ये पारंगत होऊन स्वतःचे जीवन सुटसुटीत बनवण्याच्या मार्गावर होते.

आश्रयाची आणखी एक महत्वाची गोष्ट होती आध्यात्मिकतेला महत्त्व देणे.  रोजचा हरिपाठ, आणि ‘राम कृष्ण हरी’ म्हणून मुलांनी एकत्र केलेला नमस्कार यामुळे वातावरणात एक आध्यात्मिक शांती होती.  मुलांच्या हृदयात धर्माची आणि संस्कृतीची शिकवण बसवण्यासाठी, ह्या प्रथांचे पालन करून घेतले जायचे.

अशोकने आश्रमाच्या शिस्तीला देखील महत्त्व दिलं.  मुलांना कॉन्व्हेंट स्कूलसारखे ड्रेस दिले.

आश्रमात वेळोवेळी विविध तज्ञ, विचारवंत, समाजसेवक, लेखक, कवी, येऊन मुलांना मार्गदर्शन करत होते.  शिक्षण, व्यवसाय, जीवन कौशल्य आणि मानसिक विकासावर भाषणं ईथे चालायची.  हे मुलं प्रेरित होऊन आत्मविश्वासाने भरलेले होते, आणि त्यांना जीवनाच्या कठीण परिस्थितीचा सामना कसा करावा.  हे इथे शिकवले जात होते.

अशोकच्या या अनाथाश्रमाच्या माध्यमातून, मुलांना एक नवा दृष्टिकोन मिळाला.  त्यांचं जीवन आता फक्त भाकर भाजीवर अडकलेलं नव्हतं, किंवा फ्रीज, फियाट, फ्लॅट ह्यातच अडकून नव्हते तर त्यांना एक सुज्ञ, सशक्त आणि आत्मनिर्भर भविष्य मिळवायचं होतं.  स्वावलंबन आणि समाजाच्या भल्यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा ही त्यांच्यात अशोकने पेरली होती.

अशोकच्या मनानं एक ठरवलेलं होतं – ‘मुलं फक्त शिकली पाहिजेत असं नाही, त्यांना स्वावलंबी आणि समाजासाठी काहीतरी करणारे व्यक्तिमत्त्व बनवले पाहिजे. ‘त्याच्या याच विचारधारेवर आधारित, त्याच्या आश्रमाने नवा आदर्श निर्माण केला.  

आश्रमातील प्रत्येक मुलाने त्याच्या आत्मविश्वासाने आणि मेहनतीने आपले स्वप्न साकारले होते.  त्यांची जीवनाची दिशा आता स्पष्ट होती, आणि त्यांच्या प्रत्येक पावलावर एक नवा सूर्य उगवत होता.  अशोकने जो परिवर्तन आणले, ते यथार्थ झाले होते.

आश्रम एक नवीन जीवनाची सुरुवात बनला होता, जिथे प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर यशाचा उत्सव होता.  हेच त्याचं सर्वात मोठं यश होतं – एक दिलदार माणसाने सुरू केलेलं..  पाहिलेलं छोटं स्वप्न, आज एका सशक्त आणि आत्मनिर्भर पिढीचे भविष्य उगमस्थान बनलं होतं.. जे ‘स्नेहवन’ नावाने नावारूपाला आले आहे..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य –  वाचताना वेचलेले  ☆ “सरणारे वर्ष मी…” – कवी : मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “सरणारे वर्ष मी…” – कवी : मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

(…मंगेश पाडगावकरांची वर्षाच्या निरोपाची सुंदर कविता)

*

मी उद्या असणार नाही

असेल कोणी दुसरे

मित्रहो सदैव राहो 

चेहरे तुमचे हसरे ।।

*

झाले असेल चांगले

किंवा काही वाईटही

मी माझे काम केले

नेहमीच असतो राईट मी ।।

*

माना अथवा मानू नका

तुमची माझी नाळ आहे

भले होवो, बुरे होवो

मी फक्त ‘ काळ ‘ आहे ।।

*

उपकारही नका मानू

आणि दोषही देऊ नका

 निरोप माझा घेताना

 गेटपर्यंंतही येऊ नका ।।

*

उगवत्याला “नमस्कार”

हीच रीत येथली

विसरू नका ‘एक वर्ष’

साथ होती आपली ।।

*

धुंद असेल जग उद्या

नववर्षाच्या स्वागताला

तुम्ही मला खुषाल विसरा

 दोष माझा प्राक्तनाला ।।

*

शिव्या, शाप, लोभ, माया

यातले नको काही

मी माझे काम केले

बाकी दुसरे काही नाही ।।

*

निघताना “पुन्हा भेटू”

असे मी म्हणणार नाही

‘वचन’ हे कसे देऊ

 जे मी पाळणार नाही ।।

*

मी कोण? सांगतो

“शुभ आशीष”देऊ द्या

“सरणारे वर्ष ” मी

आता मला जाऊ द्या ।। 

 

प्रस्तुती : शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares