☆ डॉक्टर लालित्य ललित को अंतर्राष्ट्रीय विश्व मैत्री मंच की ओर से हरिशंकर परसाई स्मृति सम्मान – अभिनंदन ☆
भोपाल, हिंदी भवन में देश की राजधानी दिल्ली के व्यंग्यकार डॉक्टर लालित्य ललित को अंतर्राष्ट्रीय विश्व मैत्री मंच की ओर से हरिशंकर परसाई स्मृति सम्मान दिया गया। इस अवसर पर यह सम्मान वरिष्ठ व्यंग्यकार गिरीश पंकज एवम हिंदी भवन के अध्यक्ष श्री रास बिहारी गोस्वामी के साथ संस्था की अध्यक्ष कथाकार संतोष श्रीवास्तव ने प्रदान किया।
इस मौके पर डॉ लालित्य ललित ने अपने अनुभव भी साझा किए और उन्होंने यह भी बताया कि विसंगतियां मनुष्य के साथ साथ चलती है वह कहीं बाहर से नहीं आती।ललित ने महिलाओं के संदर्भ में उनकी मेहनत की तुलना विसंगतियों के आदर्श रूप से की तो महिलाओं ने करतल ध्वनि से उनका आदर सत्कार करके अपने आमंत्रित अतिथियों को मंत्रमुग्ध कर दिया।
इस अवसर पर जयपुर से राजेंद्र मोहन शर्मा,राजेश श्रीवास्तव,दिल्ली से डॉक्टर संजीव कुमार सहित शहर के अनेक गण्यमान्य विद्वान मौजूद थे। कार्यक्रम के अंत में आमंत्रित कवियों ने अपनी रचनाओं का पाठ भी किया और शाम को सुमधुर बना दिया।
💐 ई- अभिव्यक्ति परिवार की और से डॉक्टर लालित्य ललित जी को इस विशिष्ट सम्मान के लिए हार्दिक बधाई 💐
आई तुझी आठवण नित्यनेमाने येते. तुझ्या पोटी जन्मलो आम्ही खूप भाग्यवान आहोत. रोज तुला नमन करूनच, आम्ही उद्योगाला सुरुवात करतो. चंदेरी मुकुट धारण केलेली निळसर झोपाळ्यावर, हिरवीगार पैठणी नेसलेली तू किती भारदस्त व मोहक दिसतेस.!! अवघ्या विश्वात शोभून दिसतेस.!!
तुझी लेकरे आम्ही सर्व भारतवासी सुखी, आनंदी व समाधानी आहोत. तू दिलेल्या संस्कृतीचा ठेवा जपताना आम्हाला खूप अभिमान वाटतो.तुझ्यामुळे आम्हाला जे निसर्गाचे वरदान लाभले आहे, ते आम्हाला समृद्ध करीत आहे. देवभूमी, रामायण, महाभारत, भगवद्गीता, संत महिमा यामुळे अवघ्या विश्वात तुझेच नाव श्रेष्ठत्वाने घेतले जाते. तू तर विश्व जननी शोभतेस.!!येथे तुझ्यामुळे निर्माण झालेले दिव्य तेज, शांती, आनंद मनाला तृप्तता देणारे आहे.
तुझ्याच प्रार्थनेत, निर्माण होणाऱ्या संस्कारांमुळे आम्ही भारतवासी समृद्धीकडे वाटचाल करीत आहोत. तू निर्माण केलेल्या अन्नरसामुळेच आम्ही बलवान व सामर्थ्यवान झालो आहोत.देशवासीयांची देशभक्ती व बुद्धिमत्ता जगात सर्वांनाच अचंबित करते आहे.
तुझी रक्षा करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. व याचा आम्हाला कधीही विसर पडणार नाही हेच तुला सांगावेसे वाटते.
आई ,आम्ही अथक प्रयत्नांती नित्य नवे सुयश संपादन करीत राहू. सर्व त्रुटींना संपुष्टात आणून, आम्ही सर्व क्षेत्रात विश्वविक्रम करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहोत.
ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी तूच आम्हाला बळ देतेस. इतिहासातील पाऊलखुणा आम्हाला सतत मार्गदर्शन करतात.
तुझे कृपाशीर्वाद सतत पाठीशी असावेत हीच नम्र विनंती.🙏
☆ स्वप्न – मोठं होण्याचं… – भाग ३ ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆
तिकडे सुश्रिया झाडाच्या फांदीवर बसून मस्त झोके घेत होती. तिथून तिला स्वयंपाकघरात काम करणारी आई दिसत होती. तिची स्वयंपाक करायची गडबड सुरू होती. सुश्रिया पंख पसरून मस्त भरारी मारून आली. हिरवी हिरवी झाडं, त्यावरची रंगीबेरंगी नाजूक नाजूक फुलं तिला खूप आवडली. तिच्या पलीकडच्या फांदीवर एक पक्षी चोचीनं किडा खात होता. ईऽऽई सुश्रिया मनात म्हणाली. आपण आता किडे खायचे? पटकन ती आपल्या घराच्या खिडकीजवळच्या फांदीवर आली. आईच्या पोळ्या करून झाल्या होत्या. आता तिच्या आवडीच्या काचर्या करत होती. सुश्रियाच्या पोटात आता कावळे ओरडायला लागले. अं! आता मो आत कशी जाणार? पोळी कशी खाणार? सुश्रियाला रडायला आलं. तेवढ्यात आई म्हणाली, “ए सुश्रिया, इतकं वाकडं रडवेलं तोंड करून का बसलीस? ये बरं पटकन पोळी खायला.” सुश्रियानं डोळे किलकिले करून पाहिले. अरेच्चा! पुस्तक वाचता वाचता डुलकी लागली अन् स्वप्न पडले की काय? बरे झाले, आपण पक्षी नाही ते!”
दुसर्या दिवशी सगळ्यांनी आपले मनोगत वाचून दाखवले. बाई एकदम खूष! “शाब्बास मुलांनो, सगळ्यांनी छान लिहीलंय आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना आपण मानव असल्याचे महत्त्व समजलंय. हो ना! आता एक मुलगा म्हणून, मुलगी म्हणून तुमच्याकडे जे सुप्त गुण आहेत ते ओळखून ते वाढवण्याचा प्रयत्न करा. कसं ते बघा हं, आर्यनकडे घोड्यासारखी चपळता आहे. त्याचा उपयोग त्याने बॅडमिंटन सारख्या खेळात करून शाळेला, राष्ट्राला आणि देशाला बक्षीस मिळवून द्यायचं, देशाचं नाव उज्ज्वल करायचं. अवनी, सुश्रियाला उडायला आवडतं, त्यांनी त्यांना जे करायला येतं, आवडतं, त्यामध्ये उंच भरारी घ्यायची. राधानं मनीमाऊ सारखं नुसतं झोपायचं नाही, तर जे करायचं ते तल्लीन होऊन, एकाग्रचित्तानं करायचं. ती गाणी छान म्हणते, पेटी वाजवते. ते चांगल्यात चांगलं करायचं. रमाला वाचायला आवडते ना, तिने मोठ्या लोकांची, शास्त्रज्ञांची चरित्रे वाचायची आणि खूप अभ्यास करून पहिला नंबर मिळवून शास्त्रज्ञ व्हायचं, शोध लावायचा आणि आमचा ऑल राऊंडर अथर्व इतका हुशार आहे, त्याच्याकडे इतकी शक्ती आहे की तो काहीही करू शकेल. बाॅडी बिल्डर होईल, क्रिकेटीयर होईल किंवा डाॅक्टर, इंजिनियरसुद्धा बनेल. तुम्ही सगळी मुलं खूप हुशार आहात. त्या हुशारीचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करा आणि आपल्या शाळेला, देशाला खूप मोठ्ठं करा. ठीक आहे? आता आपण उद्या भेटू.”
सगळ्यांचे मोबाईल बंद झाले. पण प्रत्येकाच्या डोळ्यांपुढे खूप मोठ्ठं होण्याचं स्वप्न दिसत होतं.
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ झंकारलेली तार ऐकू मात्र यायला हवी… भाग – 1☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
संगीत ऐकायला ते दरवेळी कळावंच लागतं असं काही नाही…. मैफिल जमली की, गायकाच्या हृदयात आधी तार झंकारते, ती ऐकू आली म्हणजे झालं…!
मला रस्त्यावर जमलेल्या अशा अनेक मूक मैफिलींचा साक्षीदार होता आलं…!
…. एखाद्याला छातीशी लावलं…तेव्हा त्याच्या हृदयाच्या धडधडीत, तबल्याचा ताल जाणवला… !
…. कसे आहात ? बरे आहात ना …? यावर खाली मान घालून त्यांनी दिलेले उत्तर, ‘होय आम्ही बरे आहोत’… यानंतर ढोलकी वर मारलेली “थाप” आठवली… !!
…. नुकत्याच स्वर्गवासी झालेल्या पतीची कहाणी सांगता सांगता, फुटलेल्या बांगड्यांची किणकिण, सतारीशी स्पर्धा करतात…. !!!
…. आणि हुंदके देत शब्द बाहेर पडतात त्यावेळी, बीन तालासुरांचं हे गाणं हृदय भेदत जातं…
…. ढोलकी गत दोन्ही बाजूंनी थपडा खाणारी ही माणसं… आयुष्याचा “तमाशा” कधी होतो तेच कळत नाही….!
गाण्यातला सूर हरवला की ते गाणं बेसूर होतं…. परंतु आयुष्यातला सूर हरवला की आयुष्य भेसूर होतं…
अशीच काही फसलेली गाणी आणि कविता या महिन्यात हाती आल्या….
आपल्याच साथीने… अशा काही बेसूर गाण्यांना सुरात बांधून चाली लावण्याचा प्रयत्न केला…
ज्या कवितांतून शब्द निसटले होते… तिथे योग्य ते शब्द टाकून, त्या कविता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला….
…. जे काही घडलं, ते आपल्या साथीनं…. आपल्यामुळेच….
वैद्यकीय
१. भीक मागणाऱ्या लोकांच्या नेमक्या समस्या ओळखण्यासाठी, त्यांच्या अंगातले कलागुण शोधण्यासाठी, वैद्यकीय सेवा देण्याच्या निमित्ताने जेव्हा त्यांच्यात बसून जेवतो खातो, त्यावेळी परकेपणा आपोआप संपुष्टात येतो. यावेळी आपोआपच सुखदुःखाच्या गोष्टी बोलल्या जातात आणि त्या गोष्टींच्या आधाराने काही आराखडे बांधून त्यांना आपल्या सर्वांच्या साथीने छोटे मोठे व्यवसाय टाकून देत आहे.
डॉक्टर म्हणून रस्त्यावर जे काही करणे मला शक्य नाही, अशा सर्व बाबींसाठीआपण इतर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अशा रुग्णांना ऍडमिट करत आहोत. यामागे हेतू हाच की आजारपणाचे निमित्त करून त्यांनी भीक मागू नये, आजार बरा झाल्यानंतर त्यांना जो जमेल तो व्यवसाय त्यांनी सन्मानाने करावा.
भिक्षेकरी नाही .. तर कष्टकरी होऊन, गावकरी म्हणून जगावे… !
या महिन्यात जवळपास ६०० रुग्णांवर रस्त्यावर उपचार केले आहेत. अति गंभीर अशा रस्त्यावरील ३ निराधारांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांचे प्राण वाचले आहेत.
.. गंमत अशी की या तिघांच्याही नातेवाईकांशी, मोठ्या ऑपरेशनपूर्वी त्यांची संमती घेण्यासाठी /सहीसाठी त्यांच्याशी संपर्क साधला… परंतु कोणीही पुढे आले नाही.
झाल्या असतील यांच्याही काही चुका….
…. पण, माणसाची चूक म्हणजे पुस्तकातलं एक पान आहे….नातं म्हणजे आख्खे पुस्तक आहे…. चुकलं असेल काही तर ते एक पान फाडावं ना … आख्खे पुस्तक फाडण्यात कोणता शहाणपणा आहे ???
.. असो, सर्व संमती पत्रावर पालक म्हणून माझी सही आहे…. ! एकाच महिन्यात तीन वयस्क आणि जीर्ण पोरांना जन्माला घालताना, बाप म्हणून, किती आनंद होतो ? शब्दात कसं सांगू…. ???
२. रस्त्यावरच रक्त लघवी तपासण्या, वॉकर, कुबड्या, काठी, मानेचे, पायाचे पट्टे यासारखी वैद्यकीय साधने देतच आहोत. पुन्हा हेतू एकच… व्यंगावर मात करत यांनी , माझ्या कुबड्या सोडून, स्वतःच्या पायावर सन्मानानं उभं राहावं… !!!
अन्नपूर्णा प्रकल्प
रस्त्यावर असहायपणे पडून असलेले गोरगरीब आणि दवाखान्यात उपचार घेत असणारे गोरगरीब यांना आपण दररोज जेवणाचे डबे देत आहोत. (दिसेल त्याला सरसकट आम्ही डबे देत नाही)
जेवण तयार करणे, त्याचे पॅकिंग करणे, आणि ते योग्य त्या व्यक्तींपर्यंत वितरित करणे, हे सर्व काम आमचे सहकारी श्री अमोल शेरेकर हे त्यांच्या पत्नीच्या साथीने करत आहेत.
अन्नपूर्णा हा संपूर्ण उपक्रम डॉ मनीषा यांच्या देखरेखी खाली सुरु आहे.
आमचे हात हा प्रकल्प राबवत असले, तरीही देणारे हात मात्र तुम्हा सर्वांचे आहेत.
एक बाबा… यांना आम्ही जेव्हा डबा द्यायचो, त्यावेळी हात जोडून, ते छताकडे पाहून, तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटायचे… एकदा गमतीने मी त्यांना म्हणालो ‘ काय मागताय बाबा ? ‘
.. यावर ते म्हणाले, ‘अरे बाळा, ज्यांनी माझ्या मुखात आज हा घास घातला…त्याला आणि त्याच्या पोरा बाळांना सुख, शांती, समृद्धी आणि समाधान दे… अशी देवाकडे प्रार्थना करतोय… ! ‘
.. हे बाबा स्वतः इतक्या त्रासात आहेत, परंतु मागणे मागताना त्यांनी इतरांसाठी मागितले….
शेवटी काय ? स्वतःसाठी मागणं ही झाली लाचारी… पण दुसऱ्यासाठी मागणं ही खरी प्रार्थना… !!!
त्यांची ही प्रार्थना आपणा सर्वांसाठी होती…
त्यांच्या मुखात घास खरंतर आपण सर्वांनी घातले आहेत मी फक्त पोस्टमनचं काम केलं…. तेव्हा त्यांचे आशीर्वाद आपणा सर्वांना लाभू देत हीच माझी शुभेच्छा !
साधारण तीस वर्षांपूर्वी ‘कालनिर्णय’ दिनदर्शिकेने काढलेल्या ‘पाकनिर्णय’ या नावाच्या ,बक्षीसपात्र पाककृतींच्या पुस्तकाला विद्वान लेखिका, व्युत्पन्न संशोधक, नामवंत समाजशास्त्रज्ञ आणि पाककलानिपुण दुर्गाबाई भागवत यांची व्यासंगी आणि प्रदीर्घ प्रस्तावना लाभली आहे. त्या सुंदर प्रस्तावनेचा हा परिचय आहे.
दुर्गाबाई लिहितात, ‘अन्नपूर्णेचे राज्य म्हणजे रूप, रस, गंध, स्पर्श यांनी भरगच्च भरलेले समृद्ध आणि रहस्यपूर्ण राज्य! रुचीचा भोक्ता अन्नाला ‘रसवती’ असे लाडके नाव देतो.
ज्याला आपण खातो ते आणि जे आपल्याला खाते ते अन्न’ असे वैदिक काळापासून माहित असलेले सत्यही त्यांनी इथे सांगितले आहे. अन्न हे पूर्णब्रह्म आहेच पण त्याचा अतिरेक माणसाला विनाशाकडे नेतो असा अमूल्य अर्थ त्यात आहे. या प्रस्तावनेत त्यांनी ‘रसवती’बद्दल मनोरंजक, वैविध्यपूर्ण माहिती दिली आहे. दुर्गाबाई लिहितात की, ‘शाकाहार अथवा मांसाहार कुठलाच आहार निषिद्ध नसतो… नसावा. मद्य घेणे ही तर मानवाची प्रकृतीच आहे. बाणभट्टाने कदंबापासून बनविलेल्या मदिरेचे ‘कादंबरी’ हे नाव गंधर्व राजकन्येला देऊन त्या नावाला अमरत्व दिले.’
१९३८ च्या सुमारास मध्यप्रदेशच्या जंगलातून हिंडताना दुर्गाबाईंनी एकदा बिनभांड्यांचा स्वयंपाक केला. पळसाच्या पानावर कणिक भिजवून त्याचे चपटे गोळे केले. ते रानशेणीच्या अंगारात भाजले. त्यातच वांगी भाजली. भाजलेल्या वांग्यात मीठ घालून त्याचे भरीत केले. झाला बिनभांड्यांचा स्वयंपाक! दुर्गाबाई म्हणतात, मीठ ही अशी वस्तू आहे की एकदा तिची चव कळली की माणसाला ती सोडतच नाही. म्हणून तर श्रीकृष्णाने सत्यभामेला ‘तू मला मिठासारखी आवडतेस’ असे म्हटले आहे.
पुण्यश्लोक नळराजा हा सूपविद्याप्रवीण होता. त्याच्या नावावरील ‘नलपाकदर्पण’ हे संस्कृतमधील लहानसे पुस्तक भारतीय सूप विद्येतील मोलाचा आद्य ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात पिण्याचे पाणी शुद्ध कसे करावे, ते सुवासिक कसे करावे, बर्फ कसा दिवसच्या दिवस जपून ठेवावा ते सांगितले आहे. या ग्रंथात एक मिश्र शिकरण दिलेलं आहे. आंबा, फणस, केळी, संत्री, द्राक्षे वगैरे फळांच्या फोडी करून त्यात नारळाचा रस, गूळ आणि खायचा कापूर घालून करायची ही शिकरण उत्तम लागते असा स्वानुभव दुर्गाबाईंनी सांगितला आहे.
अकबरच्या काळी अबुल फजलने लिहिलेल्या ‘ऐने अकबरी’त २६ शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची नावे व कृती दिली आहे. यात गव्हाच्या चिकाचा हलवा दिला आहे. फा हियान या पहिल्या चिनी प्रवाशाने उत्तर भारतातल्या अनेक पाककृतींचे वर्णन केले आहे. त्यात त्याने कांद्याच्या भज्यांची फार स्तुती केली आहे.
‘भोजन कुतूहल’ या नावाचा ग्रंथ रघुनाथ गणेश नवाथे उर्फ नवहस्ते या रामदासांच्या शिष्याने सतराव्या शतकात लिहिला. रामदासांच्या आज्ञेप्रमाणे तो तंजावरला स्थायिक झाला होता. जिलेबीची कृती देणारा हा पहिलाच ग्रंथ आहे. जिलेबीला ‘कुंडलिका’ असा शब्द त्याने वापरला आहे. मडक्याला आतून आंबट दही चोपडून मग मैदा व तूप एकत्र करून, मडक्यात घालून हाताने घोळून मडके उन्हात ठेवावे. आंबल्यावर कुंडलिका पाडून तुपात तळून साखरेच्या पाकात टाकाव्यात अशी कृती लिहिली आहे.
या ग्रंथात इडली हा शब्द नाही पण कृती आहे. दुर्गाबाई लिहितात की, जात व प्रांत यांची वैशिष्ट्ये, त्या त्या भागात मिळणारे पदार्थ आणि त्यांचा अन्नात केलेला वापर यामुळे तेच पदार्थ वेगवेगळ्या चवीचे बनतात. भोपाळच्या रानभागात प्रवास करताना तिथल्या स्त्रिया उडदाचे पापड पिवळे व लज्जतदार होण्यासाठी मेथीची पुरचुंडी पाण्यात रात्रभर भिजवून ठेवून त्या पाण्यात पापडाचे पीठ भिजवतात असे त्यांनी पाहिले.
दुर्गाबाईंनी माणूस प्राथमिक अवस्थेत पदार्थ बनवायला कसा शिकला याची दोन मनोरंजक उदाहरणे दिली आहेत .दक्षिणेच्या जंगलात अस्वले कवठाचे ढीग गोळा करतात. त्यातील पिकलेली कवठे पायांनी फोडून त्यात मध व सुवासिक फुले घालून ती पायांनी कुटून त्याचा लगदा करतात तेच अस्वली पंचामृत.
माणसाने वानराकडून डिंकाचे लाडू उचलले. गंगेच्या एका बेटावर माकडीण व्याली की नर डिंक गोळा करतो. त्यात बदाम वगैरे घालून गोळे करतो. शिकारी लोक वानरांचे लाडू, अस्वलांचे पंचामृत पळवतात असेही त्यांनी लिहिले आहे.
कुड्याच्या फुलांची थोडे पीठ लावून केलेली ओलसर भाजी फार सुवासिक होते व पोटालाही चांगली असते. शेवग्याच्या शेंगा व पिकलेल्या काजूच्या फळांचे तुकडे यांची खोबरे, वाटलेली मोहरी व मिरच्या घालून केलेली भाजी अगदी उत्तम होते पण फारच क्वचित केली जाते. दुर्गाबाईंनी जायफळाच्या फळांचे लिंबाच्या लोणच्यासारखे लोणचे बनविले. त्याच्या पातळ साली कढीत, सांबारात घातल्या.तसेच त्या फळांच्या गराचा उत्तम चवीचा जॅम बनविला.
१९७४ साली काश्मीरच्या जंगलात फिरताना दुर्गाबाईंना तिथल्या गुजर बाईने चहाबरोबर सकाळीच केलेली मक्याची थंड, पातळ, पिवळसर, खुसखुशीत भाकरी दिली. त्या बाईने सांगितले की, मक्याच्या पिठात थोडेसे लोणी घालून खूप मळायचे आणि हातावर भाकरी फिरवून ती मातीच्या तव्यावर टाकायची. दुर्गाबाई लिहितात की, हातावरची भाकरी आणि तुकड्यांची गोधडी या दोन वस्तू म्हणजे भारतभरच्या सर्व प्रांतातल्या गरीब, अशिक्षित स्त्रियांनी दिलेल्या अत्यंत मौल्यवान देणग्या आहेत. कौशल्य आणि कारागिरी असणाऱ्या या दोन गोष्टींनी भारताचे सांस्कृतिक ऐक्य शाबूत ठेवले आहे.
भारतीय पाकशास्त्र हा विषय अफाट व आगाध आहे. अनादी अनंत आहे. दुर्गाबाई म्हणतात, घरोघरीच्या अन्नपूर्णांचा हा कधीही नष्ट न होणारा वसा आहे.
अनेक विषयात कुतूहल आणि रुची असलेल्या दुर्गाबाईंनी पाकशास्त्राविषयी खूप मनोरंजक माहिती दिली आहे . दुर्गाबाईंमधील अन्नपूर्णेला आदराने नमस्कार.🙏
☆ “अस्ताला न जाणारा सूर्य… नारायण गंगाराम सुर्वे” ☆ श्री कचरू चांभारे ☆
१६ ऑगस्ट …. कविवर्य शब्दसूर्य नारायण गंगाराम सुर्वे यांचा स्मृतिदिन.
गिरणी कामगारांची व्यथा ,वेदना नारायण सुर्वे यांनी दाहकपणे शब्दबद्ध केली. त्यांची कविता म्हणजे कामगारांच्या मनातली खदखद आहे.
रस्त्याच्या कडेला पडलेलं अनाथ बाळ ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हा नारायण सुर्वेंचा प्रवास रोमांचकारी आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मी आपणास त्यांच्या ‘ ऐसा गा मी ब्रम्ह ‘या काव्यसंग्रहाचा परिचय करून देत आहे.
नारायण सुर्वे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या लेखनातील वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी जे जगलं ,पाहिलं ,अनुभवलं तेच मांडलं. अण्णाभाऊ गद्यातून बोलले अन् नारायण सुर्वे पद्यातून बोलले. कविवर्य सुर्वे यांच्या
स्मृतिदिनानिमित्त आपण ‘ ऐसा गा मी ब्रम्ह ‘ ची चर्चा करू. या कविता संग्रहात कामगाराचे वर्णन, आईविषयी कृतज्ञतेची कविता व प्रेमकाव्यही आहे. या कवितासंग्रहातील जवळपास सर्वच कविता कोणत्या ना कोणत्या वर्गाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या आहेत किंवा येऊन गेलेल्या आहेत हे विशेषत्वाने सांगायला हवे.
कामगाराची प्रीतभावना व्यक्त करताना ‘क्षण माघारी गेले‘ या कवितेत कवी सुर्वे म्हणतात …..
मलाही वाटते तिला हात धरून न्यावे
निळ्या सागराच्या कुशीत बिलगून बसावे
विसरावे तिने अन् मीही भोगलेले दुःख
एकमेकां खेटून सारस जोडीने उडावे.
रात्र संपूच नये अधिकच देखणी व्हावी
झाडे असूनही नसल्यागत मला भासावी
तिची रेशीम कुरळबटा गाली झुळझुळावी
माझ्या बाहूत पडून स्वप्ने तिने पाहावी…
‘शब्दांचे ईश्वर‘ या कवितेत कवी, कवी झाल्याची खंत व आनंद अशा दोन्ही भावना व्यक्त करतो.
कवी नसतो झालो तर… असे म्हणताना कवी सुर्वे लिहितात…
कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते
निदान देणेक-यांचे तगादे तरी चुकविता आले असते…
… याच कवितेच्या शेवटी कवी म्हणतो ‘ आम्ही कवी झालो नसतो तर तुमचे दुःख कोणी मांडले असते ? बापहो, तुमच्या वेदनांना अमर कोणी केले असते ? ‘ या ओळीत कवीची सामान्य जनांच्या वेदनेविषयी तळमळ दिसून येते.
‘तोवर तुला मला‘ या कवितेतून कवीने प्रचंड आशावाद व्यक्त केलेला आहे. कवी म्हणतो …..
याच वसतीतून आपला सूर्य वर येईल
तोवर मला गातच राहिले पाहिजे.
नगर वेशीत अडखळतील ऋतू
तोवर प्रिये जगत राहिले पाहिजे…
‘दोन दिवस‘ या प्रसिद्ध कवितेत जगण्याची भ्रांत मांडलेली आहे……
दोन दिवस वाट पाहण्यात गेले ;दोन दुःखात गेले
हिशेब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली…
… जगण्याची दाहकता वरील कवितेत आहे.
‘ऐसा गा मी ब्रम्ह‘ या कवितासंग्रहातील प्रत्येक कविता मनाला चटका लावणारी आहे.
कवी नारायण सुर्वेंविषयी थोडसे ….
माझे विद्यापीठ ,जाहीरनामा, सनद असे एकाहून एक सरस कवितासंग्रह देणारे नारायण सुर्वे यांची जीवनकथा म्हणजे अक्षरशः चित्तरकथा आहे.
१५ आॕक्टोबर १९२६ ची पहाट होती. मुंबईतल्या लोकांना पहाट ही आकाशाच्या रंगावरून न दिसता हातातल्या घड्याळाच्या वेळेवरूनच ओळखू येते. वुलन मिलमध्ये काम करणारं एक जोडपं गंगाराम कुशाजी सुर्वे व सौ.काशीबाई रोजच्याप्रमाणे कामाला चाललं होतं. पहाटेच्या शांत वातावरणाला चिरून टाकणारा लहान लेकराचा टाहो, शेजारच्या उकांडासदृश्य कचराकुंडीतून त्या जोडप्याच्या कानी येतो. कारण काही का असेना पण मूल नको असलेल्या कुणीतरी तो मुलगा असलेला कोवळा जीव अंधारगर्भात रस्त्याच्या कडेला फेकला होता. गंगाराम-काशीबाईने ते मूल घरी आणलं .त्यांचे घर आधीही लेकुरवाळे होते. घरात खाणारी तोंडे खूप. पण मातृत्वाच्या ममतेने त्यांनी अजून एक तोंड घरात वाढवलं होतं.हे लहानगं बाळ म्हणजेच नारायण सुर्वे होत.
तिसरीपर्यंत शिकलेले नारायण गरीबीमुळे पुढे शिक्षण घेऊ शकले नाहीत. ते ही नंतर वुलन मिलमध्येच कामगार म्हणून रूजू होतात. लिहिण्याची व वाचण्याची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अनेक यशस्वी स्त्रियांमागे पुरूष उभा असल्याचं आपण वाचले आहे ,ऐकले आहे. पण नारायण सुर्वे याला अपवाद आहेत. त्यांच्या पाठीशी त्यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे खंबीरपणे उभ्या राहिल्या म्हणूनच नारायण सुर्वे घडले. या कृष्णामाईसुद्धा एका अर्थाने अनाथच होत्या. फरक एवढाच होता की नारायणरावाच्या ख-या आईवडीलांचा मागमुस दुनियेस नाही व कृष्णामाईच्या आईवडिलांनी ही दुनिया अकाली सोडलेली होती. यासाठी कृष्णाबाई लिखित ‘ मास्तरांची सावली ‘ ही त्यांची आत्मकथा वाचायला हवी. रोजंदारीमुळे शिक्षण सोडलेल्या नारायणरावास सातवी ,जुने डी.एड्. कृष्णाबाईनेच बळेबळेच करायला लावले. त्यामुळेच जिथं शिपाई म्हणून काम केले ,तिथंच नारायण सुर्वेंना अध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पुस्तक लिहिणं व प्रकाशित करणं खर्चिक आहे म्हणून कविवर्य सुर्वे ग्रंथ निर्मितीकडे वळतच नसत. कृष्णाबाईने स्वतःचे मंगळसूत्र मोडून आलेल्या पाचशे रूपयातून ‘ ऐसा गा मी ब्रह्म ‘ लिहून प्रसिद्ध करायला लावले. कृष्णाबाई सुमारे एक वर्षभर बिना मंगळसूत्राच्या होत्या. चाळीतल्या बायाबापड्यांचे टोमणे त्या खातच होत्या, पण एका सधवा स्त्रीला मंगळसूत्र गळ्यात नसल्याची किती वेदना वाटत असेल ? याची कल्पना एक स्त्रीच करू शकते. पुढे बरोबर वर्षभराने ‘ऐसा गा मी ब्रम्ह’ला शासनाचा पुरस्कार मिळाला व पुरस्कारापोटी मिळालेल्या हजार रूपयातून नारायण सुर्वेंनी कृष्णाबाईस मंगळसूत्र व कानातले करून आणले.
रस्त्याच्या कडेला सापडलेलं अनौरस बाळ ,त्या बाळाचा गंगाराम-काशीबाईने केलेला सांभाळ ,गंगाराम सुर्वेंनी दिलेले स्वतःचे नाव ,कृष्णाबाईची भक्कम साथ … यामुळे जे मराठीतलं अलौकिक सारस्वत उभं राहिलं, त्या सारस्वत सूर्याचं नाव म्हणजे शब्दसूर्य नारायण गंगाराम सुर्वे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित व ज्यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो ,अशी उंची या सारस्वताने निर्माण केली .हाच शब्दसूर्य १९९५ साली परभणी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होता.
… आणि हो ,आनंदाने सांगावेसे वाटते ….. हा सूर्य मी दोनदा जवळून पाहिला होता.