मराठी साहित्य – विविधा ☆ डाॅ.अनिल अवचट .. एक निखळलेला तारा ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?विविधा ?

☆ डाॅ.अनिल अवचट .. एक निखळलेला तारा ☆ सौ राधिका भांडारकर ☆

कितीतरी तेजस्वी तारे निखळले…

डाॅ.अनिल अवचट हे ही ,पुण्यातील अत्यंत नामांकीत ,साहित्यिक, बहुआयामी व्यक्तीमत्व…!

एक पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ता,प्रतिभावंत कलावंत काळाच्या पडद्याआड गेला….

त्यांची कितीतरी पुस्तकं ..!!

त्यांची पुस्तकं वाचत असताना ,आपल्या मध्यम वर्गीय जगण्याच्या पलीकडे एक जग आहे,याची जाणीव होते..आपल्या सुरक्षित कोषातून बाहेर पडण्याची ऊर्मी त्यातून मिळते…

पूर्णीया  हे त्यांचं पहिलं पुस्तक.आणि माझं आवडतं पुस्तक.त्यांत त्यांनी बिहारचं अंतरंग उलगडलय्.तिथली समाजव्यवस्था,जमीनदारी,अस्पृश्यता,वेठबिगारी,कंगाली यांचं वर्णन वाचून अक्षरश:हादरायला होते.

ते संवेदनशील आणि मनमोकळे होते. लोकांमधे वावरणारे होते. ते नि:संशय मराठीतले महत्वाचे लेखक ठरतात.त्यांनी आयुष्यभर मिशनर्‍यांसारखं, वंचितांचं, गरिबांचं, कष्टकर्‍यांचं, जगणं, समाजासमोर आणण्याचं काम केलं.

आणि हे सर्व लिखाण प्रत्यक्ष बघून,फिरून ,बोलून!लोकांमधे वावरून केलं आहे.त्यामुळे त्यांत रुक्षपणा,बोजडपणा ,अजिबात नाही. जणू वाचकाचं बोट धरून त्यांना काही दाखवावं असं त्यांचं लेखन…मोकळं मुक्त…जसं बोलणं तसं लिहीणं…त्यामुळे अनिल अवचट यांच्याशी प्रत्यक्ष ओळख नसली तरी ते कधीही अनोळखी वाटले नाहीत…

धागे आडवे उभे,वाघ्या मुरळी,प्रश्न आणि  प्रश्न, वेध ,छेद, संभ्रम , कोंडमारा,माणसं ,अशा कित्येक पुस्तकांतून  हा पैलुदार साहित्यिक भेटत राहिला…त्यांच्या विचारातला लवचिक पणा ,तसा ठामपणाही सतत जाणवला.अस्तित्व टिकवणारी साहित्यनिर्मीती असंच मी म्हणेन…

दलीत पँथर, छात्र युवा संघर्ष वाहिनी, भूमीसेना, हमाल पंचायत वगैरेंशी त्यांचे संबंध होते. नामदेव ढसाळ, राजा ढाले, कुमार सप्तर्षी यांसोबत ते काही काळ या चळवळीत राहिले.पण कार्यकर्त्याचा आपला पिंड नाही हे जाणून ते त्यातून बाहेर पडले पण एकाचवेळी लेखनाच्या माध्यमातून जोडलेले ही राहिले.

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र ही त्यांचीमहत्वाची सामाजिक ओळख!या त्यांच्या कार्याला पुलंसारख्या आणि अनेक नामांकीत श्रेष्ठींने हात दिले.गेल्या पस्तीस वर्षात त्यांनी कितीतरी हजार व्यसनी लोकांना व्यसनमुक्त करून त्यांचे पुनर्वसन केले.मात्र याचे सर्व श्रेय त्यांनी आपली पत्नी सुनंदाला दिलं.”मी फक्त व्यसनी लोकांच्या जगण्यावर लिहीण्यापुरता…”असे ते म्हणत.

ओरिगामी या कलाछंदांतून ते जगभरच्या बालविश्वाशीही जोडले गेले. त्यांची कित्येक डिझाईन्स ही स्वनिर्मीत  होती… अनेक रुपातले मोर ,गणपती,पक्षी हत्ती घोडे, विदूषक, सांताक्लाॅज्.. त्यांनी स्वत: कागदातून बनवले..जपानमधे ती कायमस्वरुपी प्रदर्शनातही ठेवली आहेत…

ते सुंदर बासरीही वाजवायचे…चित्र काढायचे..

असा हा बहुयामी ,साहित्यिक कलावंत मुक्त मोकळा आणि एक सच्चा माणूस….आज नाही..

विसर्जीत झाला..

त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर…

कागदावरच्या प्रत्येक ठिपक्यात पारदर्शक विसर्जनाचे क्षण तरंगत असतात.

जंगलात ,ऋतुचक्रात हे सामावलेले असते..

झाडाचे पिकले ,पिवळेपान फांदीवरून निसटते.

हवेत तरंगत,मौनाच्या प्रार्थना सारखे जमिनीवर अलगद टेकते…विसर्जित होते.अगदी हळुवारपणे.विसर्जन ही एक  मौलीक गिफ्ट आहे…!!

साहित्यविश्वातले एक सुवर्णपान गळाले…

ज्यांनी जगणे उजळले…

सर्व साहित्यप्रेमींतर्फे या संवेदनशील व्यक्तीमत्वाला प्रेमपूर्वक वंदन…

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

मनोहर फार्म हाउस आज अगदी गजबजून गेलं होतं. जिव्हाळ्याचे नातेवाईक,  स्नेही-संबंधित जमले होते. गेल्या चार वर्षापूर्वी सुहासने आपल्या शाळेतल्या वर्गमित्राकडून प्रकाशकडून ही जमीन विकत घेतली होती. त्याच्या बायकोला कॅन्सर झाला होता आणि तिच्या उपचारांसाठी बर्‍याच पैशांची आवश्यकता होती. उपचाराच्या दरम्यान घरून येण्यासारखे कोणी नव्हते. तिची देखभाल त्यालाच करणं भाग होतं. त्या सगळ्यात त्याची नोकरीही गेली. पाच वर्षापूर्वी सुहासच्या शाळेतील दहावीच्या बॅचने गेटटूगेदर केलं. तेव्हा सुहासला त्याची परिस्थिती कळली. तो पैशासाठी जमीन विकणार असल्याचे तेव्हा म्हणाला. सारखी रजा घ्यावी लागत असल्यामुळे नोकरी कितपत टिकेल, याचीही त्याला शंका वाटत होती. सुहासने मग त्याची जमीन विकत घेतली. पुढे दोन वर्षांनी तिथे फार्म डेव्हलप केला. फार्म हाऊसही बांधलं. त्या सगळ्या इस्टेटीचा व्यवस्थापक म्हणून त्याने प्रकाशलाच नेमलं. जमिनीतून पालेभाज्या,  फळभाज्या,  फुले वगैरे लावून त्याचे उत्पन्नही प्रकाशने घ्यावे, असे त्याने सुचवले. प्रकाशला देवच मदतीला धावून आल्यासारखे वाटले. त्याच्या बायकोची रश्मीची ट्रीटमेंट झाली. आता तिचा धोका टळलाआहे,  असं डॉक्टर म्हणतात. प्रकाश नेहमी म्हणतो, `कृष्ण सुदामाची कथा आपण वाचली होती. सांगतही होतो लहानपणी. पण प्रत्यक्षात असा कृष्ण आपल्या नशिबात येईल, असं कधी वाटलं नव्हतं.’ आता रश्मीची तब्बेतही सुधारलीय.  ती पण भाजीपाला पिकवण्यात,  फुले, हार करणं,  यासारख्या कामात प्रकाशला खूप मदत करते.  सुहासचा एकेकाळचा जिवाभावाचा मित्र त्याचं फार्म आणि फार्म हाऊसचा व्यवस्थापक बनलाय.. त्याच्यावर विश्वास टाकून सुहास गावोगावी, देशोदेशी जायला मोकळा झालाय ॰.

आताशी नातेवाईक, संबंधित म्हणायला लागले होते, `सुहास, तू फार्म हाऊस बांधलंस म्हणे! एकदा बघायला हवं!’  सुहासच्याही मनात येत होतं,  एकदा कुठल्या तरी निमित्ताने आपल्या सगळ्या जिव्हाळ्याच्या माणसांना तिथे बोलवावं आणि सगळ्यांनी एक दिवस मस्त मजेत काढावा. पण काय निमित्त काढावं?  आणि त्याला एकदम आठवलं,  पुढच्या महिन्यात आप्पांना सत्तर वर्षं पूर्ण होताहेत,  तर वहिनींना साठ. शिवाय त्यांच्या लग्नालाही चाळीस वर्षं होताहेत. त्या निमित्ताने एक झकास गेटटूगेदर करू या. याबद्दल सुहास सुखदाशी बोलला,  तेव्हा ती म्हणाली, ‘`याबद्दल माई-आप्पांशी बोलूयात नको! त्यांना एकदम सरप्राईज देऊयात.’ सुहासला ती कल्पना आवडली. रोज वेगवेगळ्या योजना ठरू लागल्या. मिहीर-मिरालाही त्यांनी बजावलं, `माई-आप्पांना काही कळू देऊ नका. त्यांना एकदम…’

`सरप्राईज’ मुलं ओरडली.

मग मुलं रोज एकमेकांशी कानातल्या कानात कुजबुजू लागली. नेत्रपल्लवी, हातवारे होऊ लागले. घरात काही तरी शिजतय,  हे मालतीच्या लक्षात आलं.

`अग, काय चाललय काय तुमचं?’  मालतीनं न राहवूनविचारलं. `काही नाही ग!’ मिहीर मीराला तोडावर बोट ठेवून खुणा करत म्हणाला नाही तर ती पटकन बोलून गेली असती ना! 

 `ती ना, आमची एक गम्मतआहे.’ मीरा म्हणाली.

`आम्हाला पण कळू दे की तुमची गंमत.’

`अंहं! बाबा म्हणाले, कुण्णाला सांगायचं नाही.’

`आई-आप्पांना तर मुळीच नाही.’

`अरे, आम्हाला पण तुमच्या गमतीत घ्या ना!’

`सांगू का?’ मीरा म्हणाली, तशी मिहीरने तिला डोळ्यांनीच ‘गप्प बस’ म्हणुन खुणावले.

`की नाई, या महिन्यात वीक एंडला आपण फार्म हाऊसवर जाणार आहोत. ‘

`असं का? छान! छान!’

`आपणच नाही काही! काका-काकू,  मामा- मामी आणि खूप खूप लोकांना बोलावणार आहेत बाबा’

`हो का? पण का म्हणे?’

बोलता बोलता  मीरा विसरूनच गेली, की आजी आणि आप्पांना काहीच कळू द्यायचं नाहीये. ती पटकन म्हणूनगेली, ` अग, तुझा आणि आप्पांचा वाढदिवस आहे ना! तुझा साठावा. आप्पांचा सत्तरावा. ‘ आणि मग तिने एकदम जीभ चावली.

‘`काय हे मीरा?  सगळं सीक्रेट तू ओपन केलंस.’

 `सॉरी… सॉरी…’ मीरा कान धरत म्हणाली.

`अग, बाबा म्हणाले, त्या निमित्ताने आपण गेटटूगेदर करू या. ‘ 

संध्याकाळी सुहास घरी आल्यावर मालती म्हणाली, `अरे, कसला घाट घातलायस?’

`घाट? कसला?’

`ते काही तरी गेटटूगेदरम्हणत होते मीरा, मिहीर.’

`हां! ते होय?  अग,  बरेच दिवस सगळे म्हणताहेत, सुहास तुझं फार्म हाऊस बघायचंय.’

`ते ठीक आहे. गेटटूगेदर कर तू! पण ते वाढदिवस वगैरे असलं काही नको हं! वाढदिवस आता मुलांचे साजरे कराययचे?  की आमचे? ‘

`बरोबर आहे. आणि पंचाहत्तरी साजरी करतात. सत्तरी नव्हे. ‘ आप्पा म्हणाले.

`आणि लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजराकरतात. चाळीसावा नव्हे. ‘ मालती म्हणाली.

`आम्ही आणखी पाच -दहा वर्षं जगू की नाही,  अशी शंका नाही ना आली तुम्हाला? ‘ आप्पा हसत हसत म्हणाले.

`मुळीच नाही. आणखी पाच वर्षांनी आपण तुमचा अमृत महोत्सव साजरा करू. दहा वर्षांनी तुमच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सव नि त्याच्या पुढल्या वर्षी सहस्त्रचंद्र दर्शन.’ इती सुखदा. मालतीची लाडकी सून.

क्रमश:….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शताब्दी ची शिदोरी.. ऋजुता पेंडसे ☆ संग्राहिका – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 

? मनमंजुषेतून ?

☆ शताब्दी ची शिदोरी.. ऋजुता पेंडसे ☆ संग्राहिका – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

शताब्दी कार्यक्रम संपून जवळपास पंधरा दिवस झाले! अजूनही त्या दिवसांच्या आठवणी मनात रेंगाळत आहेत.. मागच्या वर्षी शताब्दी वर्ष सुरू झाले, तेव्हा कोरोनामुळे काही मर्यादित लोकांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम साजरा झाला.. मनात स्वप्न होते की, पुढच्या वर्षी कोरोनाचे संकट दूर झालेले असेल आणि आपण अधिक आनंदाने कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकू! पण.. … कोरोना पूर्ण गेलेला नसला तरी सुदैवाने डिसेंबर मध्ये तो मर्यादित प्रमाणात होता. त्यामुळे कार्यक्रमासाठी भरपूर उपस्थिती आपल्याला दिसली..

यंदा शताब्दी वर्ष असले तरी आपण या कालखंडाच्या माध्यान्हीच्या कालखंडात होतो.शाळेच्या 1969 च्या बॅचने 1996 साली पंचविसावे वर्ष उत्साहाने साजरे केले होते. तेव्हाही आपण उत्साहानं जमलो होतो, पण शताब्दी चा उत्साह काही वेगळाच! 25, 26, 27, 28 डिसेंबर 2021 हे चार दिवस शाळेच्या शताब्दी महोत्सवाचे होते.या चार दिवसांत उत्साह अगदी ओसंडून वाहत होता!

संस्थेचे अध्यक्ष  आणि कार्याध्यक्षा  यांनी कार्यक्रमाची आखणी अगदी व्यवस्थित केली होती. शाळेशी संबंधित सर्व लोक उत्साहाने कार्यक्रमाची आखणी करत होते.आम्ही हे सर्व व्हाॅट्सपच्या माध्यमातून पहात होतो. पहिले दोन-तीन दिवस तरुणाईचे होते. ज्यांनी शाळा सोडून जेमतेम वीस पंचवीस वर्षे झाली होती, त्यांचा उत्साह अपूर्व होता.त्या त्या दिवसाचे व्हिडिओ पाहून आम्हाला हे सर्व कळले.

२७ डिसेंबर ला आमच्या वर्गाची बॅच बरीचशी शाळेत  हजर झाली होती.शाळा अगदी सजली होती.

तो मोठा पेंडाॅल, त्यात चमकणाऱ्या झिरमिळ्या,   सगळीकडे लायटिंग आणि शताब्दी सोहळ्याचा आनंद दाखवणारा द्योतक म्हणून मोठ्ठा ‘आकाश कंदील!’जणू काही दिवाळीच होती शाळेची! मी आणि माझी मैत्रीण रिक्षाने हॉटेल वरून गावात येताना रिक्षावाला सुद्धा शाळेच्या शताब्दी बद्दल उत्साहाने बोलत होता!’ एवढा मोठा समारंभ पाहिलाच नाही कधी!’गावातले वातावरणही शाळे प्रमाणेच उत्साहाने भारलेले होते!

२८ तारखेला सकाळी नटून थटून आम्ही उत्साहाने शाळेत आलो. जवळपास पन्नास-पंचावन्न वर्षांनी काही चेहरे आम्ही प्रथमच पाहत होतो. त्यामुळे ‘हीच का गं ती, पूर्वी लांब केस असणारी, किंवा ‘हाच का तो, आता टक्कल पडलेला!’ असे प्रश्न एकमेकींना विचारले जात होते! वय वाढले तरी मूळचे रूप डोळ्यासमोर असतेच ना! एकमेकांशी किती बोलू नि किती नको असे चालू असतानाच नाश्त्याचा आस्वाद घेतला जात होता. चारही दिवस त्याच उत्साहाने पोहे, बटाटेवडे,चहा,काॅफी अखंड मिळत होती. मुख्य कार्यक्रम सुरु होताना ढोल-ताशांच्या गजरात शाळेच्या मुख्य दरवाज्यापासून ज्योत पेंडाॅलमध्ये आणण्यात आली. वातावरण अतिशय आनंदाचे होते. सर्व मान्यवर आपापल्या जागेवर स्थानापन्न झाले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणारे सर खूपच छान ओळख करुन देत होते सर्वांची! .पाहुण्यांची ओळख,  अध्यक्षीय भाषण तसेच इतरही प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाली. आणि सत्कार समारंभ सुरू झाला. शाळेसाठी खूप मोठमोठ्या देणग्या येत होत्या.मी वडिलांच्या नावे दिलेली देणगीची रक्कम फार मोठी होती असे नाही,पण त्यानिमित्त माझा सत्कार करण्यात आला.शाळा ही आपल्याला मातेसमान असते.आणि तिच्या हातून  हा माझा सत्कार झाला ह्याचे मला खूप अप्रूप वाटले! या सर्व कार्यक्रमानंतर जेवणाचा कार्यक्रम दोन अडीच वाजेपर्यंत चालू होता. त्या नंतर आम्हाला थोडावेळ आमच्या वर्गात जाण्यास मिळाला. आम्ही आपापली बाके धरून बसलो. आमचे जुने शिक्षक,बाई  … सर्वांच्या आठवणी आणि त्यांचे तास मनासमोर आणत खूप एन्जॉय केले! बालपण साक्षात उभे राहिले डोळ्यासमोर! तीन साडेतीन वाजता पुन्हा एकदा पेंडाॅलमध्ये  करमणुकीच्या कार्यक्रमासाठी जमलो. त्यात मला माझ्या दोन कविता वाचण्याची संधी मिळाली!

आमच्या वर्गाचा महंमद रफी असणाऱ्या मित्राची गाणी खासच झाली.कित्येक विद्यार्थ्यांनी शाळेच्या छान आठवणी सांगितल्या. त्यानंतर  मुलामुलींनी गाण्याच्या तालावर नाचून घेतले.तिथेअसलेल्या युनिफॉर्म मधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी च्या कट् आऊट मध्ये आम्ही फोटो काढले.तसेच 100  च्या अंकामागे उभे राहून ही फोटो काढले गेले! लहान मुलांप्रमाणे आम्ही बागडत होतो अगदी!कार्यक्रमाला वेळ खूपच कमी मिळाला असे म्हणत म्हणतच सहा वाजेपर्यंत कार्यक्रम आवरता घ्यावा लागला. पेंडॉल मधून बाहेर पडायला कुणाचेच मन होत नव्हते! प्रत्येकाचे पाय अडखळत होते पण शेवटी कुठेतरी थांबावेच लागते ना! घोळक्या घोळक्याने मुले -मुली(स्वतः ला आम्ही अजून शाळेचे विद्यार्थी च समजत होतो.) गप्पा मारत होते. एसटीचा संप, कोरोना ची भीती या सगळ्याला तोंड देत जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्षा सर्व परिचित असल्याने वातावरण आपुलकीचे होते.त्या दोघांनी तसेच इतर सर्व कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सर्वांनी  ह्या कार्यक्रमासाठी खूप कष्ट घेतले होते.शाळेच्या इतिहासात हे सुवर्णक्षण नक्कीच कायम स्वरुपी रहातील!  तिथून निघताना खूप सार्‍या आठवणींची शिदोरी बरोबर मिळाली होती .पुढची शताब्दी काही आपल्यासाठी नाही, पण या शताब्दी ची शिदोरी आम्हाला आनंद देण्यासाठी आयुष्यभरासाठी मिळाली असं मात्र मला वाटलं!

 

  – ऋजुता पेंडसे

संग्रहिका – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ किर्तीमुख.. ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ किर्तीमुख.. ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

देवळात गाभाऱ्याचे दरवाजावर किर्तीमुख कितीजणांना माहीत आहे?”

एकदा पार्वतीच्या सौंदर्याची स्तुती ऐकून महा शक्तिशाली जलंधर राक्षसाने पार्वतीस लग्नाची मागणी घालण्यास राहूला आपला दूत म्हणून पाठवले. राहू कैलासावर गेला,त्याने जलंधरासाठी पार्वती ला मागणी घातली, हे  ऐकून संतापलेल्या भोलेनाथांच्या तिसऱ्या डोळ्यातून एक भीषण राक्षस निर्माण झाला,आणि राहूवर धावून गेला.त्या राक्षसाचे महाभयंकर रूप बघून राहू गर्भगळीत झाला,त्याने शिवाच्या पायावर लोळणंच घेतली.भोलेनाथांनी दूत बनून आलेल्या राहूला माफ आणि तिथून काढता पाय घेतल्यावर महादेव परत ध्यानस्थ झाले. पण इकडे त्या भयंकर राक्षसाची भूक वाढतच होती. त्याने भोलेनाथांना विचारले, की मी काय खाऊ?ध्यानात मग्न होत असलेल्या महादेवांनी सांगितले,की खा स्वतःलाच.देवाधिदेव महादेवाची आज्ञा शिरसावंद्य मानून राक्षसाने स्वतःला पायापासून खायला सुरवात केली आणि खात खात त्याचे फक्त डोकेच उरले.

तरीही त्याची भूक भागली नाही.महादेवाचे ध्यान संपल्यानंतर त्याला दिसले ते फक्त राक्षसाचे डोके.त्या राक्षसाच्या आज्ञा पालनावर  भोलेनाथ प्रचंड खुश झाले. त्यांनी त्या डोक्याला नाव दिले कीर्तिमुख.

ह्या जगात कधीही न संपणारी गोष्ट म्हणजे मनुष्याचे पाप.

अमर्याद अशी भूक असलेल्या किर्तीमुखाला देवाने काम दिले भक्तांची पापं खाण्याचे पंढरपूरचा विठ्ठल असो,  कोल्हापूरची अंबाबाई,किंवा तुळजापूरची भवानी,ह्या महाराष्ट्राच्या देवतांच्या मागे जी चांदीची महिरप किंवा कमान असते,त्याकडे आपले फारसे लक्ष जात नाही.त्या कमानीवरच विराजमान असते हे किर्तीमुख.दक्षिण भारतात शिवमंदिरांच्या शिखरावर ही किर्तीमुखे कोरलेली असतात जी शिवभक्तांची पापे गिळत असतात.शिवाचा मनुष्याच्या पापे करण्याच्या क्षमतेवर पुरेपूर विश्वास.म्हणून किर्तीमुखाला आजही पोटभर खायला मिळते

संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – संस्मरण ☆ लेखांक # 8 – मी प्रभा… नावात काय आहे ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? आत्मकथन ?

☆ लेखांक# 8 – मी प्रभा… नावात काय आहे ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

माझं नाव प्रभा सोनवणे! गेली पंचेचाळीस वर्षे मी या नावानेच ओळखली जाते,साहित्य क्षेत्रात जी काही लुडबुड केली, ती आता नावारूपास आली आहे, कवयित्री, लेखिका, संपादक म्हणून प्रभा सोनवणे हे नाव लोकांना माहित आहे, परवा पासपोर्टचं नूतनीकरण करायला गेलो, त्या आधी एजंटने सांगितले होते आधार कार्डावर जसं संपूर्ण नाव आहे तसंच पासपोर्ट वर असायला हवं, म्हणजे नव-याच्या नावासकट! मग त्या संपूर्ण नावाची गॅझेट मधे नोंद करून घेतली त्यासाठी पैसा, वेळ वाया घालवला, पासपोर्ट ऑफिस च्या बाहेर एजंट ने सांगितले तिथे स्क्रीन वर नीट पाहून घ्या नाव आणि पत्ता बरोबर आहे का! तरीही व्हायचा तो घोटाळा झालाच, पत्ता चेक केला,नाव चेक करायचं राहून गेलं, पूर्वी पासपोर्ट वर “सोनवणे प्रभा” एवढंच नाव होतं ते तसंच राहिलं! नव-याचं नाव जोडायचं राहून गेलं, म्हणजे ज्या साठी केला होता आट्टाहास…..ते राहूनच गेलं!

प्रसिद्ध इंग्रजी लेखक  शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? पण नावात बरंच काही आहे. आई सांगायची तिला माझं नाव मृणालिनी ठेवायचं होतं पण त्या काळात देवबाप्पा हा सिनेमा खूप गाजला होता (माझा जन्म १९५६ सालचा आहे) त्यातल्या “चंदाराणी ” नावाचा बराच प्रभाव होता, माझ्या मामांनी माझं नाव चंदाराणी ठेवलं आणि  आईला आवडत असलेलं एक चांगलं  नाव मला मिळालं नाही!

लग्नानंतर सासूबाईंनी प्रभा नाव ठेवलं, आजीला आवडत असलेलं “नूतन”, गुरूजींनी क अक्षरावरून नाव ठेवायला सांगितलं म्हणून “कात्यायनी” ही नावं सुद्धा मी वापरली आहेत. कारण असं वाटतंच आपलं एक छानसं नाव असावं.

पण आता वयाच्या पासष्टाव्या वर्षी प्रभा हेच नाव स्वतःचं वाटतं कारण गेली पंचेचाळीस वर्षे तिच माझी ओळख बनली आहे. प्रभा सोनवणे या नावाला स्वतःची एक प्रतिमा निर्माण करता आली, या नावाची जनमानसात एक छाप आहे…..म्हणूनच या मालिकेचं नाव आहे……  मी…. प्रभा अर्थात हे शीर्षक मंजुषा मॅडमनी सुचवलं आहे!

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares