श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र-“नव्या जागी रुजू व्हाल तेव्हा शेगावला जाऊन महाराजांचे आशीर्वाद घेऊन मगच रुजू व्हा. सगळं छान होईल. ” काकू म्हणाल्या.

मीही हेच ठरवलं होतं. काकूंच्या तोंडून जणूकांही गजानन महाराजच ‘तथास्तु’ म्हणालेत असं वाटलं आणि मी निश्चिंत झालो!

पण हे वाटतं तेवढं सोपं नसून या नंतर येणारा प्रत्येक क्षण माझी कसोटी पहाणारा ठरणार आहे याची पुसटशीही कल्पना मला नव्हती!)

काकूंचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. बोलाफुलाला गांठ पडावी तसं त्याच संध्याकाळी मला रिलीव्ह व्हावं लागलं. सामानाची बांधाबांध, रात्रीच्या प्रायव्हेट लक्झरी स्लीपिंग कोचचं रिझर्वेशन हे व्याप होतेच.. पण सर्व स्टाफ मेंबर्सच्या आपुलकीच्या सहकार्यामुळे सगळं सुरळीत पार पडलं. अकोला ब्रँचचा चार्ज ज्या परिस्थितीत मला घ्यावा लागणार होता याचा विचार केला तर तिथं काय वाढून ठेवलं असेल याच विचाराने मी एरवी अस्वस्थ झालो असतो. पण आश्चर्य म्हणजे रात्रभर मनात या कशाचंच दडपण नव्हतं. उद्या अकोल्याला पोचल्यानंतर तातडीने चांगल्या लॉजचा शोध घेऊन, सकाळी ब्रॅंचला रिपोर्ट करण्यापूर्वी शेगावला जाणं कसं जमवायचं याचेच विचार मनात होते. मी अकोल्याला बसमधून उतरलो तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. तो गुरुवार असणं हा मला एक शुभशकूनच वाटला. मनानं उभारी धरली तरी आदल्या संपूर्ण दिवसभराची दगदग आणि रात्रभराच्या प्रवासातलं जागरण यामुळे शांत झोप नव्हतीच. सगळं शरीर ठणकत होतं. पण आता झोपून चालणार नव्हतं. मी वेळ न दवडता रिक्षा करून स्टॅंडपासून जवळचंच एक लॉज गाठलं, तेव्हा पहाटेचे सव्वा चार वाजले होते.

“इथून शेगावला पहिली बस कधी आहे? ” चेकइनच्या फॉर्मॅलिटीज सुरू असतानाच मी रिसेप्शनला विचारलं.

“आत्ता पाच वाजता. नंतर साधारण दीड दोन तासांच्या अंतरानं. “

‘आता आराम करायच्या मोहात पडायचं नाही. कांहीही झालं तरी पाचची बस चुकवायची नाही.. ‘ मी स्वतःलाच बजावलं आणि…. ,

“रूमवर गरम चहा पाठवून द्या लगेच आणि गरम पाणी असेलच ना आंघोळीसाठी? ” मी विचारलं.

किमान या दोन साध्या गोष्टी माझ्यासाठी त्या क्षणी तरी अत्यावश्यकच होत्या.

“कॅन्टीन सहाला सुरू होईल साहेब.. आणि गरम पाणी सात नंतर. “

यावर बोलण्यासारखं काही नव्हतंच. नाईलाजाने मी रूम गाठली. पाय धुऊन कपडे बदलले. तातडीनं शेगावच्या बससाठी बाहेर पडणं आवश्यक होतं आणि माझं थकलेलं शरीर तर अंथरुणाला पाठ टेकायला आसुसलेलं होतं! ही बस चुकली तर सगळं वेळापत्रकच विस्कळीत होणार होतं पण त्याला आता नाईलाज होता. कारण आंघोळ न करता शेगावला जाणं योग्य वाटेना. अखेर आता तातडीने शेगावसाठी निघणं शक्य नाही हे मी मनाविरुद्ध स्वीकारलं आणि अंथरुणाला पाठ टेकली. तो एकच क्षण आणि त्यानेच जादूची कांडी फिरवावी तसं झालं! सहजच माझं लक्ष समोरच्या भिंतीकडे गेलं आणि समोर जे पाहिलं त्या दृश्यानेच गारूड केलं. मी भान हरपून पहातच राहिलो! त्या संपूर्ण भिंतीवर गजानन महाराजांचं खूप मोठ्ठं अतिशय जिवंत असं चित्र रंगवलेलं होतं! त्यांच्या मिष्कील हसऱ्या नजरेने ते माझ्याकडेच पहात असल्याचा भास मला झाला न् मी ताडकन् उठून बसलो. घड्याळ पाहिलं. साडेचार वाजून गेले होते. बॅग उचकटून मी घाईघाईने टॉवेल /कपडे घेऊन बाथरूमकडे धावलो. गार पाण्याचे चार तांबे अंगावर घेऊन आंघोळ उरकली. तेवढ्यानंही प्रवासाचा शीण निघून गेल्यासारखं मन प्रसन्न झालं. घाईघाईने कपडे बदलून, सॅक घेऊन बाहेर धावलो. रिसेप्शनजवळ किल्ली दिली आणि गडबडीने बाहेर पडलो. जवळपास रिक्षा दिसत नव्हती आणि रिक्षासाठी थांबायला माझ्याकडे वेळ नव्हता. स्टॅन्ड जवळ आहे हा अंदाज होताच. मी क्षणाचाही विलंब न लावता स्टॅंडच्या दिशेने धाव घेतली तेव्हा पावणेपाच वाजून गेलेले होते. स्टॅण्ड जवळ जाताच त्याक्षणीच्या अनिश्चित परिस्थितीत धीर न सोडता निकराचा एक शेवटचा प्रयत्न म्हणून थेट स्टॅंडवर जाऊन चौकशी करून प्लॅटफॉर्म शोधण्यात वेळ न घालवता मी बसेस् बाहेर पडतात तिथून आत जायचा निर्णय घेतला. त्या दिशेने धावत फारतर दोन-चार पावलेही गेलो नसेन तेवढ्यांत समोरून एक बस बाहेर पडताना दिसली. प्रयत्न करूनही अंधारात बस वरचा बोर्ड दिसत नव्हता. पुढे झेपावत हात हलवून मी बस थांबवायचा केविलवाणा प्रयत्न केला. बस थांबली. कंडक्टरने दार उघडलं. बस कुठं जाणाराय याची चौकशी केली. आश्चर्य म्हणजे ती शेगावला जाणारीच बस होती. मी गडबडीने बसमधे चढलो न् पाहिलं तर बस पूर्ण रिकामी होती. बसमधे फक्त कंडक्टर. जणू खास माझ्यासाठीच ती बस सोडलेली असावी तसा मी एकटाच प्रवासी आहे हे लक्षांत येताक्षणी मनाला स्पर्शून गेलेलं अतीव समाधान तोवरच्या धावपळीचा सगळा शीण नाहीसा करणारं होतं! !

आजवरच्या असंख्य प्रवासांमधला तो प्रवास मी कधीच विसरू शकणार नाही. तो प्रवास फक्त शेगावचा नव्हता. कारण मी थेट महाराजांपर्यंत जाऊन पोचल्याचा आभास निर्माण व्हावा असे अनेक अनुभव पुढे अकोल्याच्या माझ्या त्या अल्प वास्तव्यात मला आले. अकोल्यातलं जेमतेम सहा महिन्यांचं माझं वास्तव्य. या दरम्यान दर पौर्णिमेला शेगावला दर्शनाला जाण्याचे योग सहज जुळून येत असत. शेगावहून मुद्दाम आणलेली गजानन महाराजांची पोथी मी याच अल्पवास्तव्यात सर्वप्रथम वाचली, तेव्हा.. ‘ तू स्वतःच ती पोथी एकदा वाच म्हणजे तुझं तुलाच समजेल हे गजानन महाराज कोण ते‌.. ‘ हे माझ्या ताईचे शब्द शब्दश: खरे झाल्याची मनाला स्पर्शून गेलेली अनुभूति मला अनेक अर्थाने समृध्द करणारी होती! माझ्या अंतर्मनातला तो आणि गजानन महाराजांसारख्यांचं अवतारी रूप यांच्यामधलं अद्वैत मला लख्खपणे जाणवलं ते ही पोथी वाचल्यानंतरच!

‘आपल्या घरी चालत आलेला दत्तसेवेचा राजमार्ग सोडून ताई ही पोथी कां वाचते? ‘ या त्यावेळी केवळ अज्ञान आणि अहंकारातून माझ्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाचं उत्तर ही पोथी वाचूनच मला मिळालं! किंबहुना माझ्या मनातल्या तेव्हाच्या त्या प्रश्नातली निरर्थकताही मला नेमकी जाणवली. जसा कांही तो प्रश्न मी महाराजांनाच विचारला असल्यासारखं त्या प्रश्नाचं नेमकं उत्तर महाराजांनी १९ व्या अध्यायात मला दिलं असल्याचं प्रथम वाचनातच माझ्या लक्षात आलं. या अध्यायात श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी आपल्याला भेटायला येणार असल्याचा संकेत गजानन महाराजांना मिळतो तेव्हा गजानन महाराज त्यांच्या सेवेकऱ्याला यांची पूर्वकल्पना देताना म्हणतात, ” अरे बाळा, उदयिक माझा बंधू येतो देख मज साठी भेटण्या, त्याचा आदर करावा l” ती भेट कशी तर फक्त कांही सेकंदांची! ‘एकमेकांसी पहाता, दोघे हसले तत्वता l हर्ष उभयतांच्या चित्ता, झाला होता अनिवार ll ‘ असं नेमक्या शब्दातलं त्यांच्या भेटीचे वर्णन!

ही नजर भेट होताच एकमेकांकडे पाहून स्मितहास्य आणि.. ” बंधो, आम्ही निघतो.. ” असे टेंबे स्वामी महाराजांचे अनुमती मागणारे मोजके शब्द आणि त्यानंतर गजानन महाराजांनी होकारार्थी मान हलवताच त्यांचे निघून जाणे… सगळंच अतर्क्य! श्री गजानन महाराज आणि टेंबे स्वामी महाराज दोघेही समकालीन आणि दोघांचेही नियत कार्य पूर्ण होताच त्यांची झालेली अवतार समाप्ती! या अवतारी पुरूषांच्या अवतारकार्याचे प्रयोजन आणि नियोजन या दोन्हींमागचं गूढ म्हटलं तर अनाकलनीय पण तरीही सहजसोपंसुध्दा! आता हेच पहा ना. श्री. टेंबे स्वामी अतिशय कर्मठ आणि गजानन महाराज अतिशय साधे, सोवळ्या-ओवळ्याचा कसलाच विधिनिषेध न बाळगणारे… आणि तरीही त्या दोघांमधे हे सख्य आणि हे अद्वैत कसं? हाच प्रश्न त्यांच्या सेवेकऱ्याच्या मनात निर्माण झाल्याचे जाणवताच त्या शंकेचे निरसन करताना कर्म, भक्ती आणि योग या परमेश्वरापाशी नेणाऱ्या तीनही वाटांचं गजानन महाराजांनी केलेले नेमकं निरूपण मुळातूनच वाचावं असंच आहे. माझ्या अंतर्मनातल्या ‘ तो’ चं खरं स्वरूप मला लख्खपणे जाणवलं म्हटलं ना ते हे सगळं समजून घेतल्यानंतरच, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं!

“नव्या जागी रुजू व्हाल तेव्हा शेगावला जाऊन महाराजांचे दर्शन घ्या आणि मगच रूजू व्हा. सगळं छान होईल” असं काकू मला म्हणाल्या होत्या. मीही तेच ठरवलं होतं. म्हणूनच काकूंच्या तोंडून गजानन महाराजच ‘तथास्तु’ म्हणालेत असंच मला वाटलं होतं. यातल्या ‘सगळं छान होईल’ म्हणजे नेमकं काय आणि कसं याचा प्रत्यय, कलियुगातला एखादा चमत्कार घडावा तसाच माझ्या अकोल्यातील वास्तव्यात लवकरच मला अगदी अकल्पितपणे येणार होता‌, पण त्याबाबतीत मी स्वत: मात्र तेव्हा अनभिज्ञच होतो! !

क्रमश:…  (दर गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments