श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ५८ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- माझी जिथे घरगुती जेवणाची सोय झालेली होती ते घर आणि त्या घराशी जुळलेले माझे भावबंध हा माझ्या शेगावला जाण्याच्या उत्कट इच्छेच्या पूर्तीसाठी गजानन महाराजांनीच योजनापूर्वक निवडलेला अल्पकाळासाठीचा एक थांबा होता याची त्या क्षणी तरी मला कल्पनाही नव्हती!)
माझी अचानक अहमदनगरला बदली झाल्यानंतर योग्यवेळी आलेलं ते एक वळण होतं. हे वळण माझ्या ऋणानुबंधांचाच एक भाग होतं हे माझ्या अकल्पितपणे लक्षात आलं ती खूप नंतरची गोष्ट.
अचानक उद्भवलेल्या प्रतिकूल परिस्थितीत त्या काकूंनी गरजूंसाठी घरगुती जेवणाचे डबे द्यायला सुरुवात करून घराचा डोलारा हिमतीने सांभाळलेला होता ती त्यांची मुले लहान असतानाच त्यांचं सौभाग्य हरवलं होतं तेव्हाची गोष्ट! आता मुलं हाताशी आली होती, घरखर्चापुरतं कमवत होती, आईला आता दगदग करू नको, आराम कर म्हणत होती, तरीही सुरुवातीपासून जोडलेल्या चार दोन घरी जेवणाचे डबे देणं त्यांनी सुरू ठेवलेलं होतं. खरंतर ते कुटुंब कष्टातून वर येत होतं तेव्हाही घराचं घरपण टिकावं म्हणून काकूंनी घरी येऊन जेवणारे मेंबर्स कधीच स्विकारले नव्हते आणि आजतागायत तेच धोरण त्यांनी अवलंबलं होतं. त्यांनी स्वत:च ठरवून घेतलेल्या या नियमाला मी मात्र अपवाद ठरलो होतो. याला निमित्त ठरले होते ते आमच्या ब्रॅंचमधले श्री. कुलकर्णी. त्यांच्या शेजारचंच हे कुटुंब. केवळ या कुलकर्णींनी केलेल्या विनंतीला मान देऊन काकूंनी माझी जेवणाची सोय करायचं मान्य केलं होतं हे नंतर गप्पांच्या ओघात काकूंकडूनच मला समजलं.
काकू स्वयंपाक खूप रुचकर करायच्या. अगत्यानं, प्रेमानं वाढायच्या. ते घर भेटलं नसतं तर मला सगळं निभावणं खरंच खूप अवघड गेलं असतं.
अहमदनगरमधलं माझं रुटीन असं मार्गी लागलं तेव्हा इथली उर्वरित तीन वर्षे सुरळीत जाणं फारसं जिकीरीचं नसेल असं मला वाटलं खरं पण त्याच दरम्यान पडद्यामागे अशा कांही घटना घडत होत्या की त्या माझा इथला अन्नाचा शेर संपवण्याला लगेचच निमित्तही ठरल्या!
इथे येऊन मला फार तर चार महिनेच झाले असतील. मी त्या दिवशी नेहमीप्रमाणे काकूंकडे जेवण करून ब्रॅंचला जाण्याऐवजी, सकाळीच कांही महत्त्वाच्या कस्टमर्स व्हिजिट्स असल्याने उशीरा जेवायला जायचं ठरवून तसा निरोपही काकूंकडे देऊन आलो, तेव्हा मला कल्पनाही नव्हती की हा माझा इथला अखेरचा दिवस असणार आहे. कारण त्यादिवशीच्याच इनवर्ड मेलमधे माझी तातडीने अकोला ब्रॅंचला बदली झाल्याची ऑर्डर होती! हे सगळंच अकल्पित, अनाकलनीय आणि चक्रावून टाकणारं होतं! हे सगळं कां? .. कशासाठी? .. हे प्रश्न त्या क्षणी तरी निरूत्तरीतच होते. पुढे त्याचं जे कारण समजलं तेही तसं अकस्मात निर्माण झालेलं असंच होतं. ऍडव्हर्स ऑडिट रिपोर्टमुळे अकोल्याच्या मॅनेजरची रातोरात गच्छंती झालेली होती आणि तातडीची गरज म्हणून मग तिथं कुणाला तरी पाठवायलाच हवं, म्हणून माझं हे पोस्टींग. ‘.. पण मीच कां? ‘ याला समाधानकारक उत्तर नव्हतं. ही गजानन महाराजांनी सुरू केलेली माझ्या परीक्षेची सुरूवात असावी अशी पुसटशी शंकाही तेव्हा मनात यायचं कांही कारण नव्हतं. पण लौकरच त्याची प्रचिती मात्र येणार होती आणि आश्चर्य म्हणजे याचं सूतोवाच व्हायला निमित्त ठरणार होत्या या काकूच!
खरंतर इथलं रुटीन नुकतंच सुरळीत सुरू झालं तेव्हा मला आता निदान महिन्यातून एका वीकेंडला तरी सांगलीला घरी जाता येईल हाच विचार मनात येऊन मी त्यातच समाधान मानलं होतं. आणि आता मी कधी विचारही करू शकणार नाही अशा अकोल्यासारख्या दूरच्या ब्रॅंचमधे झालेली माझी ही अशी बदली यांचा मेळ बसवायचा कसा?
माझ्यापुरता विचार करायचा तर ही बदली अकाली आणि अन्यायकारकच नव्हती फक्त तर माझ्या दैनंदिन अडचणी प्रचंड प्रमाणात वाढवणारीही ठरणार होती. ही ट्रान्स्फर आॅर्डर वाचली त्याक्षणी तरी मला ती पनिशमेंटच वाटली होती. तोवरच्या माझ्या २८ वर्षांच्या बॅंकिंग करिअरमधे सतत होत आलेलं माझं कौतुक आणि मिळत गेलेलं यश यांना परस्पर छेद देणारी अशीच ही शिक्षा आहे या विचाराने मी अस्वस्थ होतो. आता कुठल्याही क्षणी झोनल ऑफिसचा तातडीनं रिलीव्ह होण्याचा फोन येईल हा विचार मनात आला आणि आठवण झाली ते मी रोज जेवायला जात होतो त्या काकूंची. मग घाईघाईनेच ब्रँच-रूटीनची व्यवस्थित घडी बसवून दुपारी एक-दीडच्या सुमारास त्यांच्या घरी जेवायला जाण्यासाठी मी ब्रॅंचमधून बाहेर पडलो. त्यांना माझी बदली झालीय हे सांगायला तर हवंच या विचाराचंच दडपण वाटत राहिलं. ते घर आणि तिथली माणसं यांनी माझ्या नेमक्या गरजेच्या वेळी मला कसलेही आढेवेढे न घेता केलेली मदत माझ्यासाठी खूप मोलाची होती. अतिशय अतूट असे हे ऋणानुबंधच आहेत अशीच माझी भावना होती. आता इथून कायमचं निघून जावं लागणाराय हे नाईलाजाने मी स्वीकारलं, तरी तसं काकूंना सांगणं मला खूप जड जाणार होतं. आज रात्री जेवायला येऊ तेव्हा सांगूया कां असंही एकदा वाटलं पण आजच अचानक रिलीव्ह व्हायला लागलं तर? .. हा विचार मनात आला आणि मी नाईलाजाने त्यांना हे आत्ताच सांगून टाकायचं असं ठरवलं. हे सगळे उलट सुलट विचार मनात घेऊनच मी बेल वाजवली. जेवणासाठी पानं घेऊन काकू माझीच वाट पहात होत्या.
“आज खूप उशीर केलात? ” आमच्या दोघांचीही पानं वाढता वाढता त्यांनी विचारलं.
“हो ना. तुम्ही जेवला नाहीत अजून? “
“तुमचीच वाट पहात होते. ” त्या म्हणाल्या.
भूक लागली होती तरी जेवणात माझं लक्षच नव्हतं. जे सांगायचं त्यासाठी मी शब्द जुळवत राहिलो.
” काकू ” मी क्षणभर घुटमळलो. “.. माझी बदली झालीय.. “
त्यांनी अविश्वासाने चमकून माझ्याकडे पाहिलं.
“बदली? अशी मधेच? “
त्यांना झालेला विषाद त्यांच्या शब्दांत झिरपलेला होता.
“कुठं झाली म्हणायची? “
“अकोल्याला. “
“अकोला? कुठलं अकोला? म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यातलं, जवळचंच ना? “
“नगर जवळचं म्हणजे? “
“इथं आपल्या नगर जिल्ह्यांत एक खेडंगाव आहे ना अकोला नावाचं. तिथंच ना? “
“छे छे.. नाही. तिथं आमच्या बँकेची ब्रॅंच नाहीये. माझी बदली झालेलं हे अकोला नागपूर जिल्ह्यात आहे. “
” हां. ते कां? माहितीय. ते गजानन महाराजांच्या शेगाव जवळचं. ” त्या म्हणाल्या.
अपेक्षितपणे त्यांचे हे शब्द कानावर पडताच मी चमकून त्यांच्याकडे पहातच राहिलो.
“कां हो? काय झालं? “
“अ..? नाही.. कांही नाही. मला.. मला.. हे माहित नव्हतं. शेगाव अकोल्यापासून जवळ आहे कां? ” मी उत्सुकतेने विचारलं.
“हो तर. अगदी जवळ. एस. टी. ने फार फार तर तासाभराचं अंतर. “
मी थक्क होऊन ऐकतच राहिलो. या क्षणापर्यंत मला अडचणीची, नकोशी वाटणारी ही बदली महाराजांनीच घडवून आणलेली आहे असा विचार मनाला स्पर्शून गेला आणि मी शहारलो. ताई गेल्यानंतरच्या अस्वस्थतेत मी अतिशय तळमळीने गजानन महाराजांना मनोमन केलेली प्रार्थना आठवली आणि मन भरून आलं. आपली बदली ही आपत्ती नाही तर इष्टापत्ती आहे हा विचार मनात आला आणि शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाण्याचा अचानक आलेला हा योग मनाला उभारी देऊन गेला. त्याच मनोवस्थेत मी काकूंचा निरोप घेतला. जाण्यासाठी वळणार तेवढ्यांत त्यांनी मला थांबवलं.
” नव्या जागी रुजू व्हाल तेव्हा शेगावला जाऊन, महाराजांचे आशीर्वाद घेऊन मगच रूजू व्हा. सगळं छान होईल. ” त्या म्हणाल्या.
मी हेच तर ठरवलं होतं. काकूंच्या तोंडून जणूकांही गजानन महाराजच ‘तथास्तु’ म्हणालेत असंच वाटलं आणि मी निश्चिंत झालो!
पण…? हे वाटतं तेवढं सोपं नसणाराय, यानंतर येणारा प्रत्येक क्षण माझी कसोटी पहाणारच ठरणार आहे याची पुसटशीही कल्पना मात्र मला नव्हती!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
छान लिहिले आहे.