श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – ५ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

मी मतदार का आहे ?

कारण आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी बनवलेले लोकांसाठी असलेले सरकार. म्हणजेच जनता सार्वभौम. म्हणजे जनताच राज्य करणार.

बूट पॉलिश मधल्या गाण्यामधले शब्द आठवतात…..

आने वाली दुनिया मे,

सबके सर पे ताज होगा !

हे सर्व म्हणजे नागरिक शास्त्राचे पुस्तकातील लोकशाही बाबतचे तत्त्व. लोकशाही येण्यापूर्वी रचलेली गाणी किंवा सिनेमातील कल्पना म्हणजे लोकशाही बद्दलचे स्वप्नरंजन. आता पंचाहत्तर वर्षानंतर लोकशाही म्हणजे काय हे थोडे थोडे प्रत्यक्षपणे समजू लागले आहे असे वाटत असतानाच मनात सगळा गोंधळ दाटला आहे.

लोकशाहीचे पहिले तत्व बहुमताचे सरकार.

इतक्या वर्षांमध्ये एकच लक्षात आले आहे की ज्या पक्षाला वीस ते पंचवीस टक्के मते मिळतात तो पक्ष राज्यकर्ता होतो. म्हणजेच पंचाहत्तर ते ऐंशी टक्के लोकांना नको असलेला पक्ष हा राज्य करतो. हे बहुमताचे सरकार ?

मतदार हा राजा .

या राजाच्या स्वागतासाठी काय काय गोष्टी राज्यकर्त्यांकडे असतात ? पोलीस यंत्रणा, लाठी मार, अश्रुधुर, धरपकड, अटक सर्वात शेवटी सैन्यबळ.

पूर्वी ज्याप्रमाणे संपूर्ण सिनेमांमध्ये (किंवा त्याकाळी प्रत्यक्षही असेल) असे दाखवायचे की जो खलनायक असतो तो चुकीच्या गोष्टी राजाच्या मनात भरवतो. गैरसमज निर्माण करतो. राजाची मती भ्रष्ट करतो. चुकीचे आणि खोटे पुरावे राजासमोर ठेवतो, आणि प्रत्यक्ष राजाच्या नावावर खलनायकसुद्धा राज्य करू शकतो.

लोकशाहीमध्ये वेगळे काय दिसते आहे ?

मतदार फक्त एक दिवसाचा राजा. फक्त मतदानाच्या दिवशी. पण त्याही दिवशी धाक, दपटशा, पळवा पळवी, लाचलुचपत व फसवणूक अशा पद्धतीने त्या दिवशी सुद्धा राजाला स्वस्थपणे मतदान करू न देता नामोहरम केले जाते.

या सर्व भल्या बुऱ्या मार्गाने सत्ता मिळाल्यानंतर पुढील निवडणूक येईपर्यंत त्या राजाला नामोहरम करण्याच्या बाबतीत कुठेही कमतरता होत नाही. गेली पंचाहत्तर वर्षे ज्या पद्धतीचे राज्य नशिबाला आले आहे त्यात सर्वांचे भले, गरिबांचे भले करणे हे सर्वच राज्यकर्त्यांचे ध्येय असते म्हणे. परंतु ते काही होत नाही. शेतकरी राज्यकर्ता झाला तरी त्या राज्यात शेतकऱ्यांचे भले झालेले दिसले नाही. कामगार राज्यकर्ता झाला तरी त्याच्या राज्यात कामगारांचे भले झालेले दिसले नाही. सर्वसामान्य मनुष्य राज्यकर्ता झाला तरी त्याच्या राज्यात सर्वसामान्यांचे भले झालेले दिसले नाही.

प्रशासनाने स्वतःच्या राजाला ज्या पद्धतीने वागवले आहे त्यावरून मतदार राजा खरंच आहे का हो ?

या प्रश्नाचे उत्तर मी मतदार म्हणून शोधतो आहे.

पूर्णपणे गोंधळलेला,

आणि कन्फ्युज्ड !

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments