सुश्री नीता कुलकर्णी

??

‘’कान’ गोष्ट…☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

आपण आपल्या अवयवांबद्दल कुठली ना कुठली विधानं करत असतो. 

पाणीदार डोळे, धारदार नाक, लांबसडक बोटे,गुलाबी गाल वगैरे…

कान हा जो आपला दर्शनी अवयव आहे त्याच्याकडे आपला कानाडोळा  होतो. 

आणि बोललं तरी चांगलं असं काही कोणी बोलत नाही.

…गुपित सांगायचं असेल तर आपण म्हणतो 

“जरा कान इकडे कर ” – आणि हळू आवाजात ते सांगतो.

अर्थात इतकी गुप्त गोष्ट कोणाच्या पोटात राहात नाही …

कधी एकदा ती दुसऱ्याला सांगतो अस त्याला होतं मग तो दुसऱ्याच्या कानाला लागतो….

लहान मुलींच्या वर्गात बाई येतात. अभ्यासाला सुरुवात करायची असते.

 एक मुलगी दुसरीच्या कानाजवळ हाताचा आडोसा करून म्हणते

 “आज बाई किती छान दिसत आहेत.”..

बाई विचारतात 

“काय कान गोष्टी चालल्या आहेत ?” – मुली नुसत्या हसतात…

एखादा आपली साक्ष काढतो म्हणतो..  ” त्या दिवशी काय झालं तुला माहित आहे ना?”

आपण कान झाकून घेत ” मला काही माहीत नाही ” – असं म्हणून त्या प्रसंगातून आपली सुटका करून घेतो… वर त्याला म्हणतो – 

“तसं माझ्या कानावरून गेल आहे, पण कान आणि डोळे यात चार बोटाचे अंतर असतं .. मी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही .तुला ते शपथेवर काही सांगू शकत नाही.”

…. म्हणजे पुराव्याच्या बाबतीत नुसत्या कानाची साक्ष ग्राह्य धरली जात नाही.

तसंच एखाद्याचं कानफाट्या नाव पडलं की तो कितीही चांगला वागला तरी उपयोग नसतो …

तो कानफाट्याच —

इंग्रजीमध्ये दोन शब्द आहेत

“ लिसन आणि हियर “

हियरचा अर्थ कानावर जे पडले ते नुसते  ऐकणे  असा आहे.आणि लिसनचा अर्थ लक्षपूर्वक ऐकणे असा आहे .– लिसन हे कानातून मेंदूपर्यंत जाते, तेथून ते हृदयापर्यंत पोहोचते आणि योग्य कृती होते.

मैत्रिणीची तरुण मुलगी एखाद्या मुलाबरोबर फिरताना दिसते .आपण मैत्रिणीला फोन करून तिच्या हे कानावर घालतो .— म्हणजे पुढे काय करायचे ते तिने बघावं .लेक चुकत असेल तर मैत्रिणीनी तिचा कान धरावा असं आपल्याला वाटतं.

थोड्या दिवसात एखादीचं महत्त्व वाढलं किंवा जास्त शहाणपणा करायला लागली की आपण म्हणतो “कानामागून आली आणि तिखट झाली…”

काहीवेळा आपलं बोलणं दुसऱ्याच्या कानावर जावं असं वाटत असतं.–  त्यावेळी ती  व्यक्ती आसपास आहे याची खात्री करून आपण मुद्दाम मोठ्यांदा बोलतो आणि आपला उद्देश सफल करून घेतो.

लिहिता लिहिता एक गाणं आठवलं —- 

‘रानात सांग कानात ,आपुले नाते

मी भल्या पहाटे येते ‘

खरं तर भल्या पहाटे त्यांचं बोलणं ऐकायला तिथं कोण येणार आहे? – तरी तो तिला कानातच सांगायला सांगतो ….

तसं ऐकण्यात जवळीक आहे ..  प्रेम आहे .. त्याला स्पर्शाची साथ आहे आणि अजून बरंच  काही आहे…..

कानात सांगितलेलं मनात ठेवायचं असतं .. .प्रेमिकांचं ते गोड गुपीत असतं.

नवीन लग्न झालेली जोडपी बघा .. एकमेकात रमून गेलेली असतात. एकमेकांचं बोलणं कानात प्राण आणून ऐकत असतात..

काही लोक मात्र फार हुशार असतात. त्यांची काम कशी या कानाची त्या कानाला कळत नाहीत.

कानाखाली जाळ काढीन किंवा  कानाखाली आवाज काढीन असं  म्हणतात… पण हा आवाज कुठे आणि कसा काढला जातो हे मात्र मला माहीत नाही. 

पूर्वी आजोबा नातवंडांना सांगायचे — ” मी काय सांगतो ते कान देऊन ऐका.  उगीच कानामागे टाकू नका”

मुलही आजोबांचा ऐकत असत.— कारण त्यावेळी कानाचा उपयोग शिक्षा देण्यासाठी सर्रास केला जात असे .आजोबांच ऐकलं नाही तर ते कान धरतील नाहीतर पीरगाळतील ही भीती असायची.

आजही एखाद्याकडून चूक झाली तर तो म्हणतो 

” वाटलं तर कान पकडून माफी मागतो मग तर झालं…”

म्हणजे अप्रत्यक्षरीत्या शिक्षेसाठी अजूनही प्रतीकात्मक का होईना कान धरला जातो …

वर तो म्हणतो … “आता कानाला खडा…परत अस होणार नाही.”

एखाद्यावेळेस अ ब च्या कानात क विषयी विष ओततो .त्याचे कान भरतो. क जर विचारी असेल तर तो त्याचे ऐकत नाही, पण तसा नसेल आणि अ च्या विचाराने क शी बोलला तर त्याचे नुकसान होते.

— अशा लोकांकडे कानाडोळाच करायला पाहिजे. नाहीतर त्यांची चांगलीच कानउघाडणी केली पाहिजे .हलक्या कानाच्या लोकांपासून सावध राहायला हवं.

एखाद्याचा स्वभाव सारखा तक्रार करण्याचा असतो .त्याचं बोलणं आपण या कानाने ऐकतो आणि त्या कानाने सोडून देतो.

समाजात ‘ बळी तो कान पिळी ‘ असतो. याचं प्रत्यंतर आपल्याला रोजच्या जीवनात येत असते.

कान ही खरं तर मोठी देणगी आहे…पण त्याचं आपल्याला काही विशेष वाटत नाही. 

मुकबधिरांकडे बघितलं की…त्यांच्याबरोबर अर्धा तास जरी थांबलो  तरी —  आपल्याला कान आहेत .. 

ऐकू येत आहे …  हे किती भाग्य आहे हे नीट समजेल…

तर असं  हे कान महात्म्य…

रामदास स्वामींनी लिहिले आहे — 

श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनम्

अर्चनं वंदनं दास्य सख्यमात्मनिवेदनम् – 

म्हणजे नवविधा भक्तीचं वर्णन करताना त्यांनी  श्रवणभक्तीला प्रथम स्थान दिलं आहे.

आपल्याला नको असते ते  पण आपल्या कानावर पडतच असते.–  पण आपण आपल्याला जे योग्य  वाटते ते ऐकावे ….तात्पर्य काय कानाचा चांगला उपयोग केला तर वागणे नीट होते.

 सुदृढ विचार वाढीस लागतात. आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल होतो…

 कानाचा कसा उपयोग करायचा हे आपल्या हातात आहे.

आपण कसे ऐकावे ते समर्थ दासबोधात सांगतात…

ऐसे हे अवघेची ऐकावे

परंतु सार शोधून घ्यावे

असार ते जाणोनी त्यागावे

या नाव श्रवणभक्ती…

समर्थांचे ऐकू या — शहाणे होऊ या… 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments