श्री सदानंद आंबेकर

? मनमंजुषेतून ?

☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –4 ☆ श्री सदानंद आंबेकर

२२ जून :: धर्माच्या मार्गावर धर्मपुरी गाव : अंतर २७.७८ कि.मी. 

आज बरड गावात पालखीचा मुक्काम होता पण आमची सोय सुमारे पाच किमी लांब धर्मपुरी या गावात होती। बरड गावापर्यंत तर सहज चालत आलो, आता थकवा वगैरेची जाणीव नव्हती होत. त्या नंतर तिथून किंचित अंतरावर राजुरा गावात पुढे जाण्याकरिता दिंडीतर्फे मिनी ट्रक आला. त्यातून काही लोक गेले नि आपल्या ठिकाणी आलो। आज मी पण या वाहनाने आलो। इथे ग्रामपंचायत भवनात सोय होती आणि मुख्य म्हणजे नळ आणि हैंडपंप दोन्ही असल्यामुळे सगळयांनी मनसोक्त कपडे धुतले, त्यात मी सुध्दा सामील होतो। आज संध्याकाळी येथे हरिपाठ आटोपल्यावर दिंडी संचालिका सौ माईसाहेब आणि दिंडी प्रमुख डॉ भावार्थ यांनी भारूड प्रस्तुत केले। भारूड म्हणजे सहज रीतिने धर्मशिक्षण। त्यात विशेष होती ती संत एकनाथांची रचना — ‘‘विंचू चावला विंचू चावला देवा रे देवा  हे भारूड !! श्री शंतनु गटणे यांच्यासोबत डॉ भावार्थ यांनी प्रस्तुत केलेलं हे भारूड खूप काही सांगून गेलं। खरोखर दिव्य होता तो अनुभव। याशिवाय आमच्यातल्या काही माउलीताईनी पण भारूड प्रस्तुत केले। अनेक लोकांनी आज पावली खेळली – तेही खूप छान प्रकारे। इथे लाइटनी खूप त्रास दिला पण नंतर सर्व ठीक झाले। आज रात्री  तर जेवणात वेगळाच स्वाद होता अन् तो होता आम्रखंडाचा। दिंडीमधे काही बंधुंनी आपल्यातर्फे ही मेजवानी सादर केली होती। पुन्हा उद्याची तयारी करायला हवी म्हणून आम्ही ग्रामपंचायतच्या ओट्यावर खूप थंड हवेत झोपी गेलो. 

येथे मी एका गोष्टीचा विशेष उल्लेख करू इच्छितो, मी एकटा असल्यामुळे मला बरेच वेळा जागा शोधावी लागायची. पण आमच्या गटातल्या अनेक माउलींनी बहुदा स्वतः बोलावून ज्या आपुलकीने आपल्या शेजारी जागा दिली त्याची आठवण मला नेहमी राहील।

२३ जून :: गाव नातेपुते : अंतर १२.५६ कि.मी. 

बरड गाव सोडून नातेपुते करिता निघालो। गावातून बाहेर येता येता एक भली मोठी नहर अर्थात् कैनाल दिसली। किंचित वेळ थांबून पुढे निघालो। आज बारा दिवस झाले होते. आता मी आसपासच्या वारकरी लोकांना पाहत चालत होतो। श्रध्देचं प्रमाण इतकं होतं की कोणालाही आपण कपडे काय घातलेत, पायांत जोडे़ चपला आहेत की नाही, बाहेर ऊन आहे की सावली आहे, जेवण मिळते की नाही,  ही काळजी नव्हतीच। खांद्यावर झोळी, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ, मुखाने हरिनाम आणि मनात विठ्ठल ठेवून चालणे हेच त्यांचं उद्दिष्ट। नातेपुते पण एक गांव आहे अन् आमची शाळा गावात एकदम आत होती। आज पण संध्याकाळी हरिपाठ होत असतांना बरेच वारकरी पावली खेळायला आले अन् खूप आनंद घेतला। फुगडीवर त्याची पूर्णता होते ती पण आम्ही बघितली। आज पण जेवणात खूप स्वाद होता नि आज एका बंधूंची विवाह वर्षगाठ होती, म्हणून त्यांच्यातर्फे आम्हाला मेजवानी होती। आता उद्या पुन्हा लांब चालायचे आहे म्हणून इथे विश्रांति घेऊया।

२४ जून :: माळशिरस : अंतर २१.९८ कि.मी. 

आज पण आम्हाला सदाशिवनगर या ठिकाणी रिंगण बघायला मिळणार होतं। आजचे गोल रिंगण। मोठ्या शेतांत जागा करून त्यात चुन्याच्या रेघांनी मैदान तैयार केले होते। पोलिसांची सक्त व्यवस्था होती पण लोक ऐकत नव्हते। थोडयाच वेळात पालखीचे आगमन झाले अन् मागोमाग दोन अश्व आले। पहिल्यांदा  पूर्ण मैदानाचा एक फेरा लावला नि नंतर रिंगण सुरू झाले। वर ड्रोन सतत रेकॉर्डिंग करत होते। लोकांचा जल्लोष, उत्साह आणि आकाशातून पावसाची भुरभुर चालू होती। रिंगण पूर्ण होताच गर्दी व्हायच्या  आत आम्ही आपला मार्ग धरला। आधी पाऊस होऊन गेल्यामुळे आज गावात खूप चिखल होता. तरी आम्ही शोधत-शोधत आपलं ठिकाण मिळवलं। जागा मिळाल्यावर थोड्या वेळाने खूप जोरात पाऊस सुरू झाला नि शाळेच्या संपूर्ण मैदानात जणू तलाव निर्माण झाला। संध्याकाळी रोजच्याप्रमाणे हरिपाठ व रात्रीचे जेवण आटोपलं।

२५ जून :: आले वेळापुरः अंतर २३.४५ कि.मी. 

जसे-जसे पंढरपूरचे अंतर कमी होत होते तसतसा उत्साह वाढत जात होता। आजही त्या उत्साहात पाणी चिखल असतांनासुध्दा कमी वेळात वेळापुरला आलो. मात्र गावात आमची शाळा शोधायला खूप विचारावे आणि चालावे लागले। शाळा पण एकीकडे होती जिची वाट पूर्णपणे पाणी आणि चिखलानी भरून गेली होती। इथे खडूसफाटा येथे गोल रिंगण होते पण आम्ही ते नाही पाहिले। या गावात एक अर्धनारी नटेश्वर मंदिर दिसले जे प्राचीन वाटत होते. पण दर्शनासाठी खूप रांग लागली होती, त्यामुळे बाहेरून दर्शन करून आपल्या ठिकाणावर पोचलो। येथे मात्र संध्याकाळी खूप पाऊस आला, त्यामुळे रोजचा हरिपाठ, प्रवचन लहानशा जागेत करावे लागले। शाळेच्या समोर एक मंच आणि मोठ्ठे अंगण होते,  पण पाऊसामुळे तिथे झोपणे शक्य झाले नाही।

इथे सकाळी नित्यक्रियेकरिता जागा शोधावी लागली, कारण आसपास सगळी रहाती वस्ती होती, तरी प्रश्न कसाबसा सोडवला। रोजचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण घेऊन निघालो आपल्या शेवटच्या टप्प्या करिता। हा प्रवास पण फार लांबचा असणार होता.             

२६ जून :: यात्रेची शेवटची पायरी – शेळवे गावः अंतर २८.८१ कि.मी. 

सकाळी चालणे सुरू केल्यावर आज पावलं लवकर पडत होती। आज पण एका ठिकाणी गोल रिंगण होते. पण बहुतेक लोक सरळ चालत राहिले। दुपारी १२ वाजता मी भंडीशेगाव गावात आलो जिथून शेळवे गावाचा सहा किमी.चा रस्ता होता। फाटा येताच आमच्या वारीचे काही बंधु दिसले जे शेयर टेंपोत बाकी यात्रेकरूंची वाट बघत होते। आम्ही तीन लोक आल्यावर गाडी फुल झाली व तीस मिनिटांत आम्ही गावात उतरलो। इथे पण दोन दिशेला शाळा व एक बाजूस एक मंदिर आणि समोर काही टिनाचे वर्ग होते।  आधी झाडाखाली विसावा घेतला नि चार वाजता जवळच असलेल्या भीमा नदीत आम्ही सात आठ लोकांनी मनसोक्त आंघोळ केली। आमच्या सोबत एक तरुण वारकरी होते त्यांनी पूर्ण तन्मय होऊन – ‘बाप रखुमादेवी वरू, विठ्ठलाची भेटी, जाईन गे माये तया पंढरपुरा‘—- या ओळी गायल्या, आम्ही पण त्याच स्वरात त्यांची साथ दिली। शाळाभवनांत परत आल्यावर कळले की या दिंडीची एक विशिष्ट परंपरा आहे, दिंडीप्रमुख स्वतः आपल्या हातानी सर्वांना भीमा नदीवर आंघोळ घालतात. त्याप्रमाणे आम्ही पुन्हा नदीवर जाऊन या परंपरेचा आनंद लुटला। नंतर आम्ही सर्वांनी त्यांना पण तसेच स्नान घातले। हीच भीमा पंढरपुरात चंद्रभागा म्हटली जाते असे सांगण्यात आले। पुढील दिवशी पहाटे स्त्रियांकरिता सौ माईसाहेब यांनी स्नानाची सोय केली होती। सूर्यास्त व्हायच्या आधी आज सर्व माऊलीभगिनींनी सौ माईंच्या गाण्यांवर मन भरून नाच केला, फुगड्या घातल्या। खूप ‘आनंदी आनंद गडे होता। आज संध्याकाळचा हरिपाठ विशेष होता। आधी, आज जे एक विशिष्ट पाहुणे आमच्या दिंडीत आले होते, त्यांनी खूप सुरेख स्वरात अभंग ऐकविले अन् त्यानंतर विशेष उल्लेख म्हणजे, डॉ भावार्थ यांनी आपल्या पूर्ण टीमचा परिचय त्यांच्या कामा- -सकट करवून दिला। त्यात, आचारी भगिनी, चालक बंधू, साउंड लाइटवाले, इतर व्यवस्था करणारे हे सर्व होते, ज्यांच्या सहकार्याने ही यात्रा खूपच सोयीची झाली होती। आजचे जेवण पण विशिष्ट होते। आता सर्वांना उद्याची प्रतीक्षा होती जेव्हा श्रीहरिविठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन होणार होते। उद्या कोण केव्हा परत निघून जाणार हे माहिती नसल्याने आजपासूनच एकमेकांचे संपर्क सूत्र फोन नंबर घेण्यास सुरुवात झाली होती।

– क्रमशः भाग चौथा…

© सदानंद आंबेकर

भोपाळ, मध्यप्रदेश 

मोब. 8755756163 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments