श्री अ. ल. देशपांडे
पुस्तकावर बोलू काही
☆ “दशक्रिया” – लेखक: बाबा भांड ☆ परिचय – श्री अ. ल. देशपांडे ☆
पुस्तक : दशक्रिया
लेखक : बाबा भांड
किंमत : रु २३०
पृष्ठ संख्या : २१६
प्रकाशक : साकेत प्रकाशन
बरेच दिवसानंतर एक छान, गावकुसातील लहान सहान परंतू महान या श्रेणीतील घटनांचा अंतर्कल्लोळ ऐकायला मिळाला, वाचायला मिळाला.
श्री बाबा भांड
(महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सन्माननीय अध्यक्षपद भूषविलेले श्री बाबा भांड हे प्रसिद्ध लेखक पण आहेत . त्यांच्या दशक्रिया ह्या कादंबरीवर सिनेमा पण निघाला आहे.!)
पैठण पुष्य-नगरीचे घाट, घाटावरील बारीक सारीक घडामोडी, मानवी जगण्याच्या संवेदना, आगतिकता, अपरिहार्यता, सामाजिक भान, परस्परांचे हित जपत जपतच जगू शकण्याचे भान, सामाजिक विषमतेचा पट घट्ट विणलेली परिस्थिति, त्याचा भेद न करू शकलेले वर्तमान, सामान्यांची, अतिसामान्यांची दैनंदिन जगरहाठीत होत असलेली ससेहोलपट, उगवलेला दिवस केंव्हा मावळतो हेच असहाय्यपणे पहाणारे मानवी जीव, किरवंत म्हणूनच जीवन जगण्याचे नशिबी आलेले रोबोट सदृश्य निराकार चेहऱ्यावरील भाव उडून गेलेले जीव, एकेकाळचे समृद्ध, संपन्न, उन्मादाने जीवन जगलेल्या सावकारांच्या नशिबी आलेले भिक्षापात्र, परंपरेने भाळी आलेले क्रिया-कर्म करण्याशिवाय तरणोपाय नसलेल्या ब्रह्मवृंदाची पीठं, ती (पीठं) सांभाळणा-यांची पुढील पिढी आणि भानुदास नामें शाळकरी मुलाच्या समंजस जीवनसंघर्षाची ही ‘ दशक्रिया ’ नावाची अत्यंत वाचनीय अशी कहाणी वाचून खूप समाधान पावलो आहे.
मी स्वतः बाराबलुतेदार असलेल्या गावाचा रहिवासी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे व खेड्याशी अद्यापही नाळ जुळून असल्यामुळे दशक्रियेतील घटनांचा साक्षी असल्याचे जाणवले. ग्रामीणांच्या तोंडी असलेली बोलीभाषा ही व-हाडी बोलीभाषेचीच मावशी असल्याचे जाणवले. ही भाषा बोलणा-यांची दुर्दशाच असते हे माहित असुनही भाषा सौष्ठव, सौंदर्य त्यातील थोडे का होईना मार्दव हे निदान माझ्या सारख्या ग्रामीणाला आंदोलित करते. कुठेतरी ममत्व दडलेलं असल्याचा भास होतो. आणि वर्षानुवर्षे लोटलीत तरीही थेट ग्रामीणांच्या जीवन संघर्षात फारसा बदल नसलेल्याचे पाहून मन विषण्ण होते.
कांदबरी वाचतांना खूप पुढे गेल्यावर अनेक प्रश्न लेखकाला विचारावेसे वाटतात आणि सर्वसाधारण प्रथम पृष्ठा-वर असलेले लेखकाचे मनोगत “ एका कादंबरीची क्रिया व लेखन – प्रक्रिया “ ह्या रूपात जेव्हा वाचकांचे वाचून पूर्ण होते त्यावेळी त्याच्या मनातील प्रश्नांचा लोप होतो. त्याला प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतात. लेखकाच्या प्रामाणिक प्रयत्नांची दाद द्याविशी वाटते आणि ‘मनोगत’ हे शेवटी दिले असल्याने वाचकाच्या बुध्दिला सुध्दा अनेक पैलूंवर विचार करण्याचे स्वातंत्र्य आपोआपच मिळते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचक झपाटलेल्या मनःस्थितित राहतो.
आणि शेवटी कुणाच्या तरी मरणातच फक्त आनंद मिळविणारा भानुदास सूरपारंब्या सोबतच खेळलेल्या शकूच्या अस्थि पाहून थीजून जातो व वाचकाचे आंदोलित झालेले मन अखेरीस पाणावलेले डोळे टिपू लागतात
परिचय : अ. ल. देशपांडे, अमरावती (व-हाड)
संपर्क – “मथुरा”, मकान नंबर 4, विनोद स्टेट बैंक कॉलोनी, कैंप, अमरावती, महाराष्ट्र – 444602
मो. 92257 05884
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
,🙏🙏🙏🙏