सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ शिवोsहम्… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

एखादी प्रेम कथा लिहावी असं मनाशी ठरवलं, आणि त्या दिशेने मनात स्वाभाविकपणे काही प्रवाह वाहू लागले. 

तिची आणि त्याची एक प्रेम कहाणी. म्हणजे कहाणीत ती आणि तो असणारच.  कथेतली  “ती” सुंदर असायलाच पाहिजे अशी काही आवश्यकता नव्हती..  पण पाहता क्षणीच म्हणा, अथवा काहीशा ओळखीने म्हणा,  त्याला ती आवडायला लागली. तोही अगदी काही सिनेमातला हिरो टाईपच हवा, असं नव्हे. पण त्याचं बोलणं, चालणं काहीसा हसरा, मिस्कील, विनोदी स्वभाव आणि बराचसा बिनधास्त पणा तिला आवडला आणि गुटर गु व्हायला लागलं.

जमतय.  ओढ वाटतेय् . पुन्हा पुन्हा भेटावसं वाटतंय. एकमेकांना दिलेल्या छोट्या-मोठ्या वस्तू सांभाळून ठेवाव्याशा  वाटतात.  तेच तेच गोड शब्द कानात रुंजी घालताहेत.  त्यामुळे ओठावर, नकळत वेळी अवेळी हंसू उमटते.  निसटते स्पर्श, त्याने अंग मोहरते.  गोड गोड लहरी जाणवत आहेत.  प्रीतीचा अविष्कार हाच नाही तर कोणता?कथेतले  ती आणि तो एकमेकांत गुंतत आहेत.

कथा तशी कोंबातच आहे. पण उलगडेल  हळूहळू. तिची आणि त्याची आकृती नक्कीच तयार झालीय्.  कथेत मीही हळूहळू गुंतत चाललले आहे, त्यापेक्षा कथा मनावर पांघरतेय. 

त्या दिवशी दामोदर आला.  दामोदर आला म्हणजे काही तरी बातमी असणारच.  तीही सनसनाटी.  आणि माझी अपेक्षा खरी ठरली.

चहापाणी, शिवाय गरमागरम कांद्याची भजी खाल्ल्यावर, दामोदर जरा मुळावर आला.  म्हणजे सुरुवातीला अवांतर बोलणं झालं.

” काय वहिनी? इतक्या ठिकाणी मी भजी खाल्ली आहेत पण ही चव नाहीच.”

मग गरमागरम भजीचा आस्वाद घेत त्याने एखादी अनधिकृत गोटातली बातमी सांगावी तसा अविर्भाव करून, म्हटलं,

” वहिनी कळलं का तुम्हाला?”

” कशाबद्दल? काय ते?”

” अहो सदानंद बद्दल?”

” सदानंद? काय झालं त्याचं?”

” सांगतो मी. पण सांभाळून! नाहीतर एखादी कथाच लिहाल त्याच्यावर.  म्हणजे तसा प्लॉट कथेसाठी चांगलाच आहे.”

” अहो पण झालं काय?”

” सदानंदची बायको सदानंदला सोडून गेली.”

” सोडून गेली? मग ही काय अशा रीतीने सांगण्याची बातमी आहे का?”

” अहो सोडून गेली म्हणजे वरती नाही हो! रश्मीकुमार सोनी बरोबर ती पळून गेली.”

” काय सांगताय काय?”

” सदानंदच्या बायकोबद्दल ऐकलं आहे मी. लोक काहीही बोलतात रे! चांगली आहे ती. शिवाय टॅलेंटेड आहे. त्यांची मुलं किती हुशार आहेत!  शिवाय कसली कमतरता नाही संसारात. ती कशाला अशी वागेल?”

” वहिनी! तुम्ही पण साध्या आणि सरळ आहात.  पण दुनिया फार निराळी आहे.  दिसतं तसं नसतं. आणि रश्मीकुमारचे अन मिसेस सदानंदांचे संबंध काही आजचे नाहीत.  फार पूर्वीपासूनचे आहेत.  ते काहीसं म्हणतात ना प्लॅटॉनिक लव, समान वैचारिक कल, जीवनाकडे पाहण्याचे कलात्मक दृष्टिकोन वगैरे…  बरीच मोठी स्टोरी आहे.  सांगेन सवडीने.  पण सध्या सदानंद पार हादरला आहे. प्रतिष्ठा, पोझिशन. ठीक आहे. पण त्याचं काय आहे शो मस्ट गो ऑन. वरवर तो भासवतोय्, “मला काही फरक पडत नाही.”

मग जाता जाता दामोदर एवढेच म्हणाला, “काय वहिनी? दिलं की नाही कथानक तुम्हाला? आता कल्पनेने रंग भरत बसा त्याच्यामध्ये.”

खरंय्.  प्रेम कथा लिहायचं ठरवले आहे  मी. तो आणि ती आहेतच माझ्या कथेत.  अजून त्यांचं वय, आकार, काळ ठरायचंय पण त्याच्यात  “रश्मी कुमार” आणि तिच्यात सदानंदची  बायको ,हे काय माझ्या कथेच्या साच्यात बसत नव्हतं.  म्हणजे घटना असेल प्रेमाची, पण माझ्या कथेतील प्रेम, त्याचं स्वरूप, रंग हे नाहीत एवढे नक्की.

अगदी नदीकिनारी, मावळता सूर्य, डोंगर, क्षितिज, गुलमोहराचे  झाड, वगैरे काव्यमय संकेत घालायचं  टाळत होते मी. कारण प्रेमाच्या बदलत्या परिभाषेचं भान ठेवायचं ठरवलं होतं मी.  म्हणजे डॉट कॉम, ई लँग्वेज वापरायला हरकत नव्हती.  प्रेमाचा  गाभा तोच असला तरी,  नवं स्क्रीन आणि इतर आधुनिक साधनं उपयोगात आणायला हरकत नव्हती. पण “रश्मी कुमार “आणि “सदानंदची बायको”  ही प्रेम कथा या पठडीतली नव्हती. ती जरा वयस्कर, वाकड्या वाटेने जाणारी, आणि असंस्कृत वाटत होती.  म्हणजे संस्कृतीच्या ज्या चौकटी आपण आखल्या आहेत आपल्या भोवती, त्यात बसणारी नव्हतीच मुळी. 

मला असं काही लिहायचं नव्हतं.  म्हणजे उच्च अभिरुची, ढासळलेल्या समाजाची घडी, बदलत्या माध्यमाचा वेडावाकडा प्रभाव ,वगैरे इतकं काही उंचीचं, टोकाचं नाही म्हणायचं मला.  पण एक नक्की,  ज्या समाजात मी वावरले, जगण्याची दिशा नक्की ठरली आहे त्या समाजात हे असं काही नव्हतं, म्हणून मला असं काही लिहिता येणार नाही.

क्रमश: भाग १

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments