श्री सुनील देशपांडे
📚 क्षण सृजनाचा 📚
☆ नभांगणातून आग ओकितो… ☆ श्री सुनील देशपांडे ☆
वीस वर्षे झाली, परंतु अजूनही तो दिवस आठवतो.
स्कूटर वरून नाशिक गावातून एमआयडीसी मधील फॅक्टरी कडे चाललो होतो. असेच मे महिन्याचे शेवटच्या आठवड्यातले दिवस. नुकताच पाऊस पडून गेला होता आणि जाता जाता मातीचा खमंग सुगंध एकदम नाकात भरला. मन एकदम प्रसन्न झालं. प्रफुल्लित झालं. मला काही समजेचना. मी एका वेगळ्याच जगात गेल्यासारखा झालो.
आणि माझ्या डोक्यात काही शब्द घुमायला लागले…
प्रसन्नता अन् सृजनशीलता ठाई ठाई रुजली.
बस तेवढीच ओळ. डोक्यामध्ये गुंजारव करायला लागली.
मी फॅक्टरी वर आलो माझ्या केबिन मध्ये बसून कागद आणि पेन हातात घेतले ती ओळ निघून काढली आणि विचार करत बसलो. पण काही सुचेचना! पुढचा एकही शब्द एकही ओळ सुचेना. असं कधी यापूर्वी झालं नव्हतं. एखादी ओळ सुचते आणि नंतर हळूहळू पुढील ओळी सुचत जातात. फार तर त्या लिहून काढल्यानंतर त्यात थोडे बदल करावेसे वाटतात. काही ओळी पुन्हा लिहाव्या लागतात. काही अधिक चांगल्या ओळी सुचतात. आणि कविता पूर्ण होते.
पण याबाबतीत काहीच होईना. मी अस्वस्थ झालो. मूड गेला. चहा मागवला. तरी सुद्धा काही सुचेना. पुन्हा बाहेर पडलो, टपरीवर जाऊन एक सिगरेट मारली. पण काहीच नाही… अस्वस्थ अस्वस्थ.
पुन्हा फॅक्टरी वर येऊन कामांमध्ये गुंतून घेतलं. तो विषय तिथेच थांबला.
अधून मधून कधीतरी ती ओळ आठवायची आणि असेच अस्वस्थतेत काही तास जायचे. पण पुढे काही सुचायचं नाही अशी तब्बल दोन वर्षे गेली!
त्यानंतरही अनेक कविता सुचल्या लिहिल्या. लेखनही केले. परंतु त्या होळीच्या पुढे काहीच सुचैना.
एक ओळ म्हणजेच कविता?
तसे आमच्या मित्राचे नरेश महाजनचे एक पुस्तक ‘लव्हाळी’ वाचनात आलेच होते. एक ओळीच्या कविता. त्याला त्याने लव्हाळी हे नाव दिले होते. पण त्यामध्ये एक ओळ अशी सुचते की तेवढ्यातच कविता होऊन जाते. एकदा कविता होऊन गेली की अस्वस्थता रहात नाही.
त्याच्या एका लव्हाळीचे उदाहरण देतो
तुझी वेणी, जीवघेणी!
बस्स! यापुढे काही असू शकत नाही.
या दोन-तीन शब्दातच पूर्णत्व आहे.
परंतु माझ्या त्या ओळींमुळे मी कायम अस्वस्थ असे. काहीच सुचत नाही आणि ती एक ओळीची कविता सुद्धा नव्हे. त्या एका ओळीत पूर्णत्व आहे असे वाटत नाही.
बघता बघता दोन वर्ष गेली. संध्याकाळी एका कवी संमेलनानंतर चहा पिताना आमचा एक कवी मित्र आणि डॉक्टर सुद्धा. डॉ सुधीर करमरकर त्याला ती ओळ ऐकवली. त्यालाही ती ओळ आवडली आणि त्यानंतरची अस्वस्थता ती सुद्धा त्याला सांगितली.
तेव्हा तो म्हणाला मला असे वाटते की तू चुकीच्या पद्धतीने विचार करतोयस म्हणून तुला पुढे काही सुचत नाही. कधीही जेव्हा पुढचा मार्ग बंद होतो त्या वेळेला मागे वळून पाहायचे असते. मला असे वाटते की ही ओळ तुझ्या कवितेची शेवटची ओळ आहे आणि शेवटची ओळ असल्यामुळे पुढे काही सुचणे शक्यच नाही. त्या दृष्टीने विचार करून पहा नक्कीच सुचेल. माझ्या डोक्यात वीज चमकल्यासारखे झाले. अरे खरंच आपण या दृष्टिकोनातून विचारच केला नाही कधी. तोही दिवस मे महिन्यातलाच आणि तसाच काहीसा घरी जाता जाता एका ओळीच्या दोन ओळी झाल्या.
मृद्गंधाच्या लहरीवरती स्वार होउनी आली,
प्रसन्नता अन् सृजनशीलता ठाई ठाई रुजली.
त्यानंतर घरी आलो मस्तपैकी चहा करून घेतला आणि टेबलवर बसलो.
आणि मग आठवत बसलो दिवसभराची उन्हाने झालेली काहिली, दुपारची मरगळ, जणू काही सगळं आयुष्य थांबून गेलंय आणि एवढ्यात, …. एकदम वारा आला, छोटासा ढग काही पाण्याचे शिंतोडे उडवून गेला आणि मग तो मातीचा सुगंध आ हा हा…. हे सर्व आठवलं आणि मग माझी लेखणी पाझरू लागली……
नभांगणातुन आग ओकितो ग्रीष्म आज बलशाली.
तगमग तगमग अवनीवरती लाही लाही झाली.
सचेतनाला अचेतनाची मरगळ येथे आली.
चराचरातून सृजनशीलता आज लोप पावली.
मृतवत सारी सृष्टी आणिक प्रसन्नता लोपली.
शुष्क वृक्ष अन् पान न हाले शुष्क जणू सावली.
भूगर्भातून जीवन शोषी दिनकर हा बलशाली.
भूपृष्ठाची तडतड होऊन तृषार्तता रणरणली.
जीवन धारा आज जशी की बाष्प रूप जाहली.
चराचराची जीवनतृष्णा कुंठित स्तंभित झाली.
मेघसावळा दिसे अचानक वरुणाची सावली.
तुषार काही उधळून नंतर लुप्त कुठे जाहली.
आगमनाची वर्षेच्या परि वार्ता सुखवून गेली,
निद्रित साऱ्या सजीवतेला हलवून उठवून गेली.
मृद्गंधाच्या लहरीवरती स्वार होऊनी आली,
प्रसन्नता अन् सृजनशीलता ठाई ठाई रुजली.
बऱ्याच वेळेला अनेक जण विचारतात तुम्हाला कविता सुचते कशी? तर ती ही अशी…
कवितेचा जन्म, नाही सुखासीन।
सहू रात्रंदिन ।। शब्दवेणा ।।
☆
© श्री सुनील देशपांडे
(पुणेरी नाशिककर)
पुणे, मो – 9657709640 ईमेल : sunil68deshpande@outlook.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈