प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ अघटित ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

विधिलिखित ते कुणा न चुकले दैव गती ही न्यारी

सारे काही ठरले म्हणतो, म्हणतो कृष्ण मुरारी..

अवघ्या काही क्षणात घडले घडले ते धडपडले

घास मुखी अन्नाचा ज्यांच्या त्यांना घेऊन गेले…

*

कुणी बाप तो कुणी आजोबा काका मामा होता

आधाराचा खांब घराचा कर्ता घराचा होता

काय तिथे आकांत उसळला कल्पनेत ना येतो

जीवघेणा हा प्रवास जीवनी क्षणात बुडबुडा फुटतो…

*

क्षणभंगुरता पदोपदी ही सामोरी ती येते

किती कोळसे झाले पहा ना जीव ते ओळखू न येती..

काळे कोळसे अवयवांचे जळून उघडे पडले

असे काय रे पाप तयांनी सांग जीवनी केले…

*

मुलाकडे कुणी घरटी आपुल्या आनंदे जात ते होते

रात्री उशिरा येतील परतून, तोडून गेले नाते

दृष्टीला हे पुन्हा न दिसतील कुणी कल्पिले होते

अर्ध्यावरती सोडून यात्रा असे कुणी का जाते..

*

उत्तर नाही जवळी आपुल्या कळसुत्री बाहुल्या

नाचनाचता सुटली दोरी यमसदनास पोहोचल्या

किती तो पैसा सुविधा सुखदा क्षणात विरूनी गेले

चटका लावून सुहृदांना ते होत्याचे नव्हते झाले..

*

डोंगर दु:खाचा तो पहाड कराड का कोसळली

का रे विधात्या सांग जरा तू पापे कोणती घडली

मनमानी तू करतो म्हणावे, म्हणतो सारे ठरले

जीवनरेषा बघ संपली दैव इथेही हरले…

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

मो. ९७६३६०५६४२; ईमेल – svpawar6249@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments