प्रा. सौ. सुमती पवार
कवितेचा उत्सव
☆ अघटित… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
☆
विधिलिखित ते कुणा न चुकले दैव गती ही न्यारी
सारे काही ठरले म्हणतो, म्हणतो कृष्ण मुरारी..
अवघ्या काही क्षणात घडले घडले ते धडपडले
घास मुखी अन्नाचा ज्यांच्या त्यांना घेऊन गेले…
*
कुणी बाप तो कुणी आजोबा काका मामा होता
आधाराचा खांब घराचा कर्ता घराचा होता
काय तिथे आकांत उसळला कल्पनेत ना येतो
जीवघेणा हा प्रवास जीवनी क्षणात बुडबुडा फुटतो…
*
क्षणभंगुरता पदोपदी ही सामोरी ती येते
किती कोळसे झाले पहा ना जीव ते ओळखू न येती..
काळे कोळसे अवयवांचे जळून उघडे पडले
असे काय रे पाप तयांनी सांग जीवनी केले…
*
मुलाकडे कुणी घरटी आपुल्या आनंदे जात ते होते
रात्री उशिरा येतील परतून, तोडून गेले नाते
दृष्टीला हे पुन्हा न दिसतील कुणी कल्पिले होते
अर्ध्यावरती सोडून यात्रा असे कुणी का जाते..
*
उत्तर नाही जवळी आपुल्या कळसुत्री बाहुल्या
नाचनाचता सुटली दोरी यमसदनास पोहोचल्या
किती तो पैसा सुविधा सुखदा क्षणात विरूनी गेले
चटका लावून सुहृदांना ते होत्याचे नव्हते झाले..
*
डोंगर दु:खाचा तो पहाड कराड का कोसळली
का रे विधात्या सांग जरा तू पापे कोणती घडली
मनमानी तू करतो म्हणावे, म्हणतो सारे ठरले
जीवनरेषा बघ संपली दैव इथेही हरले…
☆
© प्रा.सौ.सुमती पवार
नाशिक
मो. ९७६३६०५६४२; ईमेल – svpawar6249@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈