सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
कवितेचा उत्सव
☆ पृथ्वीचे मनोगत… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
☆
अरे मानवा मानवा, सांगू काय आणि कसे?
उंच बांधण्या इमले, नको नष्ट करू राने!
*
तुझ्या प्रगतीचे बाळा, मज कौतुकच आहे,
ग्रह-ताऱ्यांशी पोचली, तुझी अवकाशयाने!
*
विकासाची घोडदौड, तुझी, चालूच राहू दे,
पण पेरू नको तू रे, तुझ्या विनाशाची बीजे!
*
लोकसंख्या बेसुमार, किती वाढते वाढते,
तोल सांभाळेना माझा, शेषनागही थकले!
*
वृक्ष तोडून तोडून, काँक्रिटीकरण सगळे,
मग पावसाचे पाणी, जिरणार सांग कुठे?
*
कधी कडाक्याची थंडी, ऊन साहवेना झाले,
ढगफुटी, महापूर, अतिवृष्टी, अवर्षणे!
*
झाडे लावा नि वाढवा, जपा कसोशीने राने,
पाणी वाचवा, जिरवा, स्वच्छ करा जलाशये!
*
अन्नधान्य हे दूषित, श्वास घेणे ना मोकळे,
प्रदूषण हे थांबवा, जपा कवच ओझोनचे!
*
बाळ शहाणा तू माझा, विश्वास मज आहे,
समजावूनी म्हणून, पृथ्वी माता मी सांगते!
☆
© सुश्री प्रणिता खंडकर
दिनांक.. २१. ०४. २०२५
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
छान विचार मांडलेत
पृथ्वी मातेला आता आक्रोश करणे तेव्हढे शिल्लक आहे. पण ती माताच आहे तेंव्हा ती समजाऊनच सांगणार.आक्रोश, आकांत करणे तीची प्रकृती नाही. विकासात रमलेला मानव अवकाशात भरारी मारतो आहे. आपण धरती वरून उड्डाण करतो आहे हे तो पूर्णपणे विसरला आहे. विनोबाजींच्या प्रार्थनेत ” जो विकासात रमला तो घोर अंधारात शिरला ” अशी एक ओळ आहे. गायत्री परिवार चं घोष वाक्य आहे ” हम सुधरेंगे युग सुधरेगा ” तेंव्हा आता आपणांसर्वांना आपल्यापासूनच सुरूवात करायला हवी , हरित तृणांचा मखमालीचा वसुंधरेचा स्नेहाचा पदर जपण्याचा. ताई, तुम्ही खूप छान व्यक्त झाला आहात. मनःपूर्वक अभिनंदन करतो. २)खंडकर हे आडनाव मला बालपणापासून माहित आहे. यवतमाळ, सागर,… Read more »