श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ काही कविता… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

वाऱ्याच्या बेताल वागण्याने

झाडा- घरांचे फारसे नाही बिघडले…

उभे पीक मात्र मोडून पडले…

          ***

कडूनिंबाची असो वा आंब्याची

दाट सुखावह असते छाया…

जशी आईची माया….

          ***

बहराचा ऋतू संपला की

झाड ओकबोक होतं..

मनातून..जनातून एकाकी पडतं…

          ***

वादळाने शेता घराची झालेली

पडझड साऱ्यांनीच पाहिली…

पण मनाची कुणालाच नाही दिसली…

          ***

वादळाने उठसूठ

धूळ..पाचोळयांचा छळ मांडला…

डोंगराशी झुंजताना मात्र घायाळ झाला…

          ***

फळांवर धरलेला नेम

चुकून चुकला….

निष्पाप फांदीने घाव सोसला…

          ***

वहातं पाणी थांबलं.

गढुळलं..शेवाळलं..

तहानलेल्या गुरांनीही टाळलं….

        ***

बेसूर वारे

कळक-बनातून गेले…

त्यांचे नादमधूर सूर झाले…

          ***

मकरंदासाठी फुलपाखरू

फुला फुलांवर गेलं…

पराग-सिंचन घडलं….

          ***

आडव्या डोंगराला

नदीने वळसा घातला…

प्रवाह हवा तिथे पोचला….

          ***

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments