श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
|| श्री नारद उवाच ||
यज्ज्ञात्वा मत्तो भवति, स्तब्धो भवति, आत्मारामो भवति ॥ ६ ॥
अर्थ : ज्या (प्रेमरूपा भक्तीला) जाणून मनुष्य उन्मत्त (आनंदभरित) होतो, स्तब्ध (शांत) होतो, (आणि) आत्माराम होतो.
“प्रेम-प्रेम सब कोइ कहैं, प्रेम न चीन्है कोय।
जा मारग साहिब मिलै, प्रेम कहावै सोय॥”
*
“प्रीति बहुत संसार मे, नाना बिधि की सोय|
उत्तम प्रीति सो जानिय, राम नाम से जो होय।”
प्रेमात भक्ति हवी की भक्तीत प्रेम हवे…? हा एक मोठा प्रश्न आहे. वर दिलेले संत कबीरांचे दोहे या बाबतीत पुरेसे बोलके आहेत असे खंत येईल…
कबीर म्हणतात, सर्वात चांगले प्रेम कोणते? तर रामानामाची…! बाकी सर्व व्यर्थ आहे.
मागेही आपण पाहिले आहे की जे अनित्य आहे, त्यावर कितीही प्रेम केले की ते प्रेम अनित्य असणार, अर्थात त्यातून शाश्वत आनंद मिळू शकणार नाही. कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच राहणार, कावळ्याला कितीही वेळा अंघोळ घातली तरी तो गोरा होणार नाही…. नाही का?
आता ज्याला ही सर्व कळतं तो परम प्रेम करू लागतो, तसा प्रयत्न करू लागतो…! या प्रेमाची खोली अथवा व्याप्ती जसजशी वाढू लागते, त्याप्रमाणात त्याच्या अंतरंगात काही बदल होऊ लागतात…!
साधक मत्त होतो. इथे मत्त या शब्दाचा भावार्थ आपल्याला घ्यायचा आहे. एखादा प्रियकर जेव्हा त्याच्या प्रियसीवर प्रेम करतो, तेव्हा तो तिच्या अनुसंधानात अखंड बुडालेला असतो. त्याला त्याच्या मनात, घरात, घराबाहेर फक्त त्याची प्रियसी दिसत असते. कोणी त्याला आवाज दिला तर त्याला प्रियसीने हाक मारली असं वाटतं. कुठे खुट्ट झालं तर प्रेयसी आली की काय असं वाटत राहत. थोडक्यात सर्व ठिकाणी, सर्वत्र त्याला फक्त त्याची प्रियसी दिसत असते, भासत असते. अशा मनुष्याला लोकं दिवाणा झाला असे म्हणतात, वेडा झाला असे म्हणतात….
रामकृष्ण परमहंस एक असेच भक्त आणि महान सत्पुरुष होऊन गेले. ते कालिमतेचे भक्त होते. काळीमातेने दर्शन द्यावं म्हणून त्यांनी कठोर तपस्या केली. कधीकधी त्यांना उन्माद व्हायचा (भक्तीचा) ते गडबडा लोळत असत. कालिमतेचे नाव घेतले की शांत होत असतं. या वेडाच्या पायीच त्यांच्यावर जगदंबा कालीमाता प्रसन्न झाली. ती त्यांच्याशी बोलू लागली….! ज्याप्रमाणे आज रामाशी हनुमंताचे नाव जोडले जाते, त्याप्रमाणे कालिमातेशी रामकृष्ण परमहंस यांचे नाव जोडले जाते..! अलीकडच्या काळातील रामकृष्ण परमहंस हे महान सत्पुरुष आहेत.
शुकाचार्य म्हणतात, भक्त प्रल्हाद हा बालक असताही भगवंताचे ठिकाणीच चित्त आसक्त झाल्यामुळे त्याने अनेक प्रकारची खेळणीही टाकूनच दिली होती. जसे काही श्रीकृष्णरूपी ग्रहाने (पिशाचाने) त्याचे चित्त ग्रासले होते, जगाला तो या रूपाने पाहतच नव्हता. बसता, उठता, फिरता, खाता, झोपता, पिताना, बोलताना, त्या प्रल्हादाला त्या कार्याचे भानच राहत नव्हते. कारण त्याला वाटत होते की, गोविंदाने त्याला चहूकडून घेरलेले आहे. कधी भगवंताचा वियोग झाला असे समजून रडत असे, कधी प्रभूच्या मीलनाचा आनंद वाटून हसत असे, कधी कधी भगवतांच्या लीलाचे गायन करीत असे, कधी मोठमोठ्याने हाक मारीत असे, कधी लाज सोडून नाचत असे, कधीकधी तर तन्मय होऊन स्वतःस श्रीकृष्ण मानून त्या शामसुंदराच्या लीलाचे अनुकरण करीत असे. ‘
भक्तीच्या वाटेवर चालताना अनेक स्थानके येत असतात, असे आपण म्हणू शकतो. भयंकर अश्रुपात होतो, पण तो हवाहवासा वाटत असतो. कधी साधकाची समाधि लागते, त्याला कधी उन्माद स्थिती प्राप्त होते. तर कधी तो एकदम स्तब्ध होऊन जातो. आपण त्यास तटस्थ स्थिती म्हणू शकतो.
साधक द्वैत भावात असेल तर भगवंत सर्व करीत या न्यायाने निश्चिंत असतो आणि अद्वैत भावात असेल तर माझ्याहून भगवंत वेगळा नाही, त्यामुळे मीच सर्व ठिकाणी आहे आणि मीच सर्व काही करीत आहे, हे त्याच्या डोक्यात पक्के असते. त्यामुळे तो बऱ्याच वेळेस स्तब्ध होत असतो….!
प्रेमभक्तीने गोकुळातील गोपिकांना प्राप्त झालेल्या तटस्थ्य अवस्थेचे म्हणजेच स्तब्ध स्थितीचे वर्णन तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून उत्कृष्ट असे केले आहे.
“दिवस राती कांही नाठवे तयासी । पहाता मुखासी कृष्णाचिया ॥
“याच्या मुखे नये डोळियासी वीट । राहिले हे नीट तटस्थचि ॥”
गोपी कायम प्रेम समाधीत असतं असे म्हटले जाते.
शेवटी साधक आत्माराम होतों असे सूत्र आहे – – –
भक्तीच्या यथार्थ ज्ञानाने तो भक्त मत्त होतो, स्तब्ध होतो, असे सूत्रात प्रारंभी म्हटले आहे. कोणाला वाटेल ही मत्तता, स्तब्धता कदाचित अन्य काही कारणाने ही प्राप्त होऊ शकते, पण भक्ताची ही स्थिती का होते, याचे कारण शेवटच्या या लक्षणात दिले आहे. ‘आत्मारामो भवति’ आत्माराम होणे म्हणजे आत्मस्वरूपी रममाण होणे. मागील सूत्रात ‘न रमते’ असे म्हटले आहे. जीवाचा स्वभाव कोठे तरी रमण्याचा आहे, अज्ञ जीव जड विषयात रमतो, पण भक्त केवळ आत्म्याच्या ठिकाणीच रममाण होतो, हे सिद्ध करण्याकरिता ‘आत्मारामो भवति’ असे म्हटले आहे.
आत्मा हा नित्य समीप आनंदमय आहे. विषय हे दूर आहेत व प्रारब्ध-साध्य आहेत. सर्वानाच अनुकूल विषयाचे प्रारब्ध सिद्ध असते असे नाही तसेच ते विषय प्राप्त झाले तरी त्याच्या भोगात अनेक प्रतिबंध असतात. त्यात आराम मिळणे अशक्यच असते. म्हणूनच गीतेत तिसर्या अध्यायातही,
*”यस्त्वात्मरतिरेवस्यादात्मतृप्तश्चमानवः।
आत्मन्येवच संतुष्टस्तस्यकार्य न विद्यते ॥ १७ ॥
(जो केवल आत्म्यातच रत, आत्म्यातच तृप्त आणि आत्म्याच्या ठिकाणीच संतुष्ट झाला त्याला कोणतेही कार्य उरत नाही.)
काही सूत्रे आपल्याला तांत्रिक वाटू शकतात. पण ज्याप्रमाणे सुगरण एखाद्या पदार्थात मोहन घालून तो पदार्थ करते, तसे आपण या सूत्रांमध्ये आपल्या “आवडीचे मोहन घालावे म्हणजे ही भक्तिसुत्रे आपल्याला आनंद देत मार्गदर्शन करतील…
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
नारद महाराज की जय!!!
– क्रमशः लेख क्र. ६
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈