सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ कोरे पत्र… ☆ सौ शालिनी जोशी

चांगदेव पासष्टी वाचली. चांगदेवानी संत ज्ञानेश्वरांना कोरे पत्र पाठवले. त्याचे उत्तर म्हणून संत ज्ञानेश्वरानी त्याच कागदावर ६५ ओव्या लिहून चांगदेवाना पाठविल्या. ६५ ओव्यात केलेला आत्मबोध म्हणून चांगदेव पासष्टी. यावरून पत्र या प्रकाराविषयी मनात कुतुहून निर्माण झाले. पत्र म्हटलं की एक ठराविक साचा डोळ्यासमोर येतो. सुरुवातीला मायना, मध्ये मजकूर व शेवट समारोपाचे शब्द व लिहिणाऱ्याचे नाव किंवा सही. पण येथे तर कोरे पत्र. मला वाटते भारताच्या इतिहासातले हे एकमेव कोरे पत्र असावे. आणि त्याच कागदावर त्याला संत ज्ञानेश्वर उत्तरही पाठवतात. ये हृदयीचे ते हृदय घातले असा हा उपदेश. ‘तत् त्वं असि’. जगातले अक्षर वाङ्मय ठरला. येथे चांगदेवानी कोरे पत्र पाठवून आपली योग्यता सिद्ध केली आहे. कोरेपण म्हणजे रितेपण, स्वच्छपणा, निरहंकारता आणि ज्ञानग्रहण क्षमता. हा पत्रातील नि:शब्द भाव संत ज्ञानेश्वरानी ओळखला आणि म्हणून त्यावर ज्ञानाची अक्षरे उठली.

दुसरे पत्र डोळ्यासमोर येते ते रुक्मिणीने श्रीकृष्णाला पाठवलेले पत्र. श्रीकृष्णाच्या रूपागुणाचे, सामर्थ्याचे, कर्तुत्वाचे वर्णन करणारे आणि श्रीकृष्णांबरोबर विवाहाची तीव्र इच्छा व्यक्त करणारे प्रेमपत्रच हे. रुक्मिणीने सात श्लोकात लिहून एका ब्राह्मण सेवकाबरोबर पाठवूण दिले आणि त्वरीत उत्तराची अपेक्षा ही व्यक्त केली. कारण घरातल्यांनी शिशुपाला बरोबर लग्न ठरवले होते. गडबड सुरू होती. ‘कुठून व कसे माझे हरण करा’ हे कळवणारे मोठ्या चातुर्यांना दिलेले उत्कट श्रीकृष्ण प्रेम व्यक्त करणारे हे पत्र. इतके की श्रीकृष्ण उत्तराच्या फंदात न पडता लगेच सैन्य घेऊन कौडिण्यपूरला निघाले. मोठे युद्ध करून रुक्मिणीचे हरण केले. पुढे विवाह झाला. असे हे कौंडिंण्यपूरहून द्वारकेपर्यंत आलेले पत्र.

आणखी आठवतो तो समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांच्यामधील पत्रव्यवहार. गुरुशिष्यांमधील हा पत्र व्यवहार. ‘ निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू’ अशी सुरुवात असलेल्या पंधरा ओव्यातील हे पत्र. हे मराठी पत्र साहित्याचे भूषण असेच आहे. शिवाजी महाराजांचा यथार्थ गौरव त्यात समर्थ करतात. राजकर्तव्य, परमार्थ उपदेश आणि हे राज्य ‘श्रीं’ चे आहे ही जाणीवही दिली आहे. स्वराज्याची प्रेरणा दिली.

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर १६८१ मध्ये संभाजी राजांना हृदय पिळवटून टाकणारे ओवीबद्ध पत्र समर्थांनी लिहिले. ‘उग्र स्थिती सांडावी, सौम्य स्थिती धरावी’, अशा शब्दात शिवरायांकडून प्राप्त झालेल्या श्रेष्ठ वारशाची त्यांना आठवण करून दिली. संभाजी महाराजांच्या वर्तनाने स्वराज्याला हादरा बसणार की काय या घोर चिंतेने व्याकुळ झालेल्या विरागी संताचे ते पत्र. त्यावरून त्यावेळच्या खरा इतिहास कळतो.

अशाप्रकारे पत्र हा एक वाङ्मय प्रकार आहे. त्यात वैविध्य आहे मुख्यत: याचे दोन प्रकार दिसतात, औपचारिक व अनौपचारिक. औपचारिक म्हणजे संस्थात्मक, कार्यालयीन कामकाजाविषयी, ठराविक पद्धतीने लिहिलेली आणि अनौपचारिक ही घरगुती, नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना, जवळच्या संबंधितांना लिहिलेली. अनौपचारिक पत्रे प्रेम आणि भावना व्यक्त करतात. पत्र हे संदेश कळविण्याचं एकमेव साधन त्यांकाळी होते.

इंग्रजांच्या काळात भारतात पत्र वाटण्याची पोस्टाची सुनियोजित पद्धत सुरू झाली. तीच सध्या ही प्रचलित आहे. यापूर्वी माणसांबरोबर तर कधी घोडेस्वारांबरोबर लखोट्यात घालून पत्रे पाठविली जात. पक्षांबरोबर पत्रे पाठवल्याचे उल्लेखही आढळतात. हे सर्व त्रासाचे होते. पण आता वाहनांच्या सोयीमुळे पोस्टाचे पत्र वाटण्याचे काम सुलभ झाले आहे. खेडोपाड्यापर्यंत पत्राद्वारे संपर्क साधता येतो.

अनौपचारिक पत्राला विषयाचे बंधन नाही. लिहिणारा आणि वाचणारा दोघांचे हृदय त्यात ओतलेले असते. त्यामुळे कधी आनंद तर कधी दुःख. हळूहळू या पत्राना साहित्याचे रूप आले. साने गुरुजींची श्यामची पत्रे, सुधेस पत्रे पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली. कवी अनिल व कुसुमावती देशपांडे यांच्यामधील पत्र व्यवहारांचे संकलन झाले. नेहरूंचे इंदिरेस पत्रे प्रसिद्ध आहेत. विनोबांची पत्रे पुस्तक आहे. तसेच रवींद्रनाथ टागोर, चिपळूणकर, कर्वे, आंबेडकर, लक्ष्मीबाई टिळक इत्यादी मोठ मोठ्या व्यक्तिमत्त्वांच्या पत्रांचे खंड प्रसिद्ध झाले आहेत. वर्तमानपत्रातही वाचकांची पत्रे’ असे एक सदर असते. एकंदरीत पत्र लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब पत्रात उमटते. पु. ल. देशपांडे यांची बोलकी पत्रे अपूर्वाई व पुर्वरंग मध्ये आहेत.

आता e mail, whatsapp यामुळे पारंपरिक पत्र पद्धत लोप पावल्यात जमा झाली आहे. पत्रांना दोन-चार ओळीचे स्वरूप आले. भावभावनांचे काम emojis करतात. मुले ‘आईचे पत्र हरवले. ते मला सापडले’ असा खेळ खेळत तोही काळाच्या पडद्याआड गेला. पत्र ज्या वर लिहितात ती पोस्टाची कार्डे, आंतर्देशीय, पाकिटे ही ही पुराण वस्तू म्हणून म्युझियममध्ये बघावी लागतील. ‘हाय पत्रा तुझी कहाणी! ‘

 ©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments