मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अत्रंगी… लेखक : रवीकिरण संत ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ अत्रंगी… लेखक : रवीकिरण संत ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

तीन हा माझा अत्रंगी आतेभाऊ! वयाने माझ्याहून चार वर्षे लहान. बालपण त्याने आणि मी पुरेपूर एन्जॉय केले. आमची जाॅइंट फॅमिली नव्हती, पण घरे जवळ होती. त्यामुळे बरेचदा एकत्र रहाणे,जेवणे व्हायचे.

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे त्याचे उद्योग आम्हाला चढत्या क्रमाने पहायला मिळाले. घरातील वातावरण बऱ्यापैकी धार्मिक. संध्याकाळी नितीन दिवेलागणीला हातपाय धुवून देव्हाऱ्यासमोर हात जोडून ‘शुभंकरोती’ म्हणायचा. कारण ह्यामुळे देव चांगली बुद्धी देईल, असे आत्याने त्याच्या मनावर बिंबवले होते.

नितीन अजिबात अभ्यास करत नसे. पहिलीत असताना सहामाही परीक्षेत नापास झाला, म्हणून आत्याने त्याला चांगलेच बदडले. त्यानंतर रात्री निजानीज झाल्यावर स्वयंपाक घरातून खलबत्त्याने कुटण्याचा आवाज येऊ लागला. आत्याने उठून, दिवा लावून पाहिले, तो काय, हा देव्हाऱ्यातल्या देवांना खलबत्त्यात घालून कुटत होता !

“अरे हे काय करतोस?” असे आत्याने विचारल्यावर ,” ह्यांचं इतकं केलं,पण काही जाण आहे का बघ! ” हे आत्याने नणंदाना कधीतरी उद्देशून बोललेले वाक्यच त्याने चपखलपणे तिला ऐकवले.

व्हा नितीन सात वर्षांचा झाला, तेव्हापासून जास्तच मस्ती करू लागला. माझी आत्या त्याच्या उपद्व्यापांनी हैराण व्हायची. त्यावरून त्याला ओरडाही मिळे. एकदा तो आत्याला म्हणाला,” आई, तूझ्या अशा आरडाओरड्याने चाळीत मला वेडीचा मुलगा म्हणतात!” ह्यावर आत्याला हसावे की रडावे हे कळेना.

तो चौथीत असताना, १९७० सालच्या १४ नोव्हेंबरला शाळेत बालदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा ठेवली होती. एकामागून एक मुले चाचा नेहरूंबद्दल भरभरून बोलत होती. पण नितीनचे भाषण हे स्वयंभू होते. नितीन बोल्ड तर होताच, पण सभाधीटही आहे हे मला त्यावेळी कळले. मी तेव्हा आठवीत होतो.        नितीन स्टेजवर उभा राहिला. एक नजर सर्वांवर फिरवून तो बोलू लागला –

“आज मी आपल्या सर्वांचे लाडके चाचा नेहरू यांच्याबद्दल चार शब्द सांगणार आहे.

चाचा नेहरूंचा जन्म १४ नोव्हेंबरला झाला. त्यांना मुले फार आवडायची. मुले दिसली की सर्व कामे सोडून ते मुलांत खेळत बसायचे. ते मोठे असल्यामुळे मुलेही त्यांना चाचा चाचा असे म्हणायची.

ते मुलांची खूप मस्करी करीत,” पुढे नक्कल करत नितीन सांगू लागला –

“चाचा त्यांना जीभ काढून वेडावून दाखवत.

त्यांचे केस ओढत.

त्यांचे गालगुच्चे घेत.

त्यांना टपला मारीत.

त्यांचे नाक ओढत.

त्यांच्या पोटाला चिमटे काढत.

त्यांच्या काखेत गुदगुल्या करत.

त्यांचे कान ओढून लांब करत.

त्यांना उचलून सूर्याची पिल्ले दाखवत.”

– – अशा रीतीने स्वतः करत असलेले सर्व चाळे तो नेहरूंच्या नावावर खपवू लागला तसतसे सर्व शिक्षक खो खो हसू लागले.हसण्याच्या गदारोळात आम्हाला पुढचे महत्त्वाचे मुद्दे ऐकूच आले नाहीत!

नितीनला बक्षीस मिळाले नाही, पण पुढचे बरेच दिवस ते भाषण आठवून सर्वजण, विशेषतः शिक्षक हसत होते.

त्यानंतर तो पाचवीत असताना १ ऑगस्टला टिळक पुण्यतिथीनिमित्त शाळेने वक्तृत्व स्पर्धा ठेवली होती. गतवर्षीच्या अनुभवानंतर एक अट ‘सांस्कृतिक शिक्षणा’च्या सरांनी स्पर्धेसाठी  घातली होती, ती म्हणजे कोणीही भाषणात शेंगा-टरफले आणि संत-स न त-सन्त हे शब्द जरी आणले तर याद राखा, इतर काहीही चालेल. याला कारण असे होते की बहुतेक सर्व मुले हेच किस्से अगदी अजीर्ण होईपर्यंत सांगत.

त्यामुळे प्रथमच मंडालेच्या तुरुंगात लिहिलेला गीतारहस्य ग्रंथ, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’सारखा अग्रलेख वगैरे नवी माहिती मिळाली.

मग नितीनचा भाषणासाठी नंबर आला. नेहमीच्या सहजपणे त्याने “लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली ह्या गावी झाला,”अशी दमदार सुरवात केली. – –  ” टिळकांची आई त्यांना रोज जेवणाचा डबा द्यायची. पण काही मुलांच्या आयांनी एकदा तो दिला नाही. मग त्या मुलांना खूप भूक लागली. शेवटी नाईलाजाने शाळेबाहेर गाडी लावून बसणाऱ्या भय्याकडून ते काही खाण्याच्या वस्तु घेऊन आले. त्या कोणत्या ते मी तुम्हाला सांगणार नाही.(असे म्हणून त्याने एकदा ‘सांस्कृतिक शिक्षणा’च्या सरांकडे पाहिले.) त्या वस्तू खाल्ल्यावर साहजिकच वर्गात कचरा झाला. सरांनी ‘हा कोणी केला’, असे दरडावले. कोणीच कबूल करेना, तेव्हा त्यांनी सर्वांना छडीने मारायला सुरवात केली. टिळकांपाशी येताच ‘मी तर डबा आणला होता’ असे म्हणून आपला रिकामा डबा त्यानी दाखवला व छडी घ्यायला नकार दिला. तसेच ‘इकडे तिकडे लक्ष न देता जेवण खाली मान घालून जेवावे अशी आईची शिकवण आहे म्हणून मी कचरा करणाऱ्यांकडे पाहिलेही नाही’ असेही ते म्हणाले.”

पुढे तो सांगू लागला, “एकदा मराठीच्या तासाला निबंध लिहीत असताना एकच शब्द तीन वेळा आला. तो कोणता हे मी तुम्हाला सांगणार नाही.( इथे पुन्हा एकदा नितीनने ‘सांस्कृतिक शिक्षणा’च्या सरांकडे पाहिले तर ते रागाने थरथर का कापताहेत हे त्याला कळेना ) पण टिळकांनी तीनही वेळेला तो वेगवेगळ्या प्रकाराने लिहिला. तेव्हा त्यांचे सर रागावले आणि त्यांनी फक्त पहिला बरोबर ठरवून पुढचे दोन शब्द चुकीचे ठरवले. पण टिळकांनी विक्रमादित्यासारखा आपला हट्ट सोडला नाही. ते म्हणाले, ” जर माझे पुढचे दोन शब्द चुकीचे असतील, तर माझ्या डोक्याची शंभर छकले होऊन माझ्याच पायावर लोळू लागतील.” यावर सरांनी पाच मिनिटे वाट पाहिली. पण तसे काही न झालेले पाहून पुढचे दोन्ही शब्द बरोबर ठरवले. तर मुलांनो, यातून आपल्याला खूप शिकण्यासारखे आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद.”

यावेळीही त्याला बक्षीस मिळाले नाही. पण त्यानंतर त्याच्या भाषणाला सर्व शिक्षक आवर्जून हजेरी लावू लागले.

नितीन नेहमी ऐकीव गोष्टीत आपला मालमसाला मिसळून ठोकून भाषण करीत असे. 

सातवीत असताना एकदा तर त्याने कहरच केला आणि त्यानंतर त्याची शाळेत मुख्याध्यापकांनी यथेच्छ धुलाई केली.

त्याचे असे झाले की २ ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त शाळेत वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती.

नितीनने, “अध्यक्ष महोदय, उपस्थित गुरूवृंद आणि वर्गमित्रांनो,” अशी छान सुरुवात केली.

महात्मा गांधींचा जन्म २ ऑक्टोबरला पोरबंदर येथे झाला. लोक त्यांना आदराने बापूजी म्हणायचे. ते अभ्यासात हुशार होते.  वकिली परीक्षा पहिल्या फटक्यात पास झाले.

त्यावेळी आपला भारत देश पारतंत्र्यात होता. इंग्रजांचे राज्य होते. इंग्लंडच्या कारखान्यात बनलेल्या वस्तूंनी बाजार भरले होते. अशावेळी बापूजींनी गावोगाव हिंडून स्वदेशीचा प्रचार केला. पॅण्ट- शर्ट घालणे सोडून ते फक्त पंचा वापरू लागले. एका हातात काठी आणि कमरेला पंचा अशी त्यांची मूर्ती पायी फिरून जनजागृती करू लागली. पंचाचा एक फायदा असा की प्रवासात सामानाचे ओझे नको. आंघोळ केली की आदल्या दिवशी घातलेल्या पंचाने अंग पुसायचे मग तो ओला झालेला पंचा वाळत टाकायचा आणि दुसरा वाळलेला गुंडाळला की झाले!   

लोकांना त्यांनी निर्भय होऊन इंग्रजांशी सामना करा, पण अहिंसा पाळा असे सांगितले. इथे लोक थोडे विचारात पडले, की मग काठी कशासाठी? बर्‍याच विचाराअंती लोकांच्या लक्षात आले की रात्री- अपरात्री फिरताना जर भटकी कुत्री मागे लागली तर त्यांना हाकलण्यासाठी ते योग्य साधन होते. 

बापूजी नेहमी बकरीचे दूध पित. कारण सतत बाहेर राहिल्यामुळे घरची गाय त्यांना ओळखेनाशी झाली. ते दूध काढण्यासाठी समोरून गेल्यावर ती शिंगे उगारू लागली व पाठीमागून गेल्यावर लाथा झाडू लागली. मग कंटाळून त्यांनी बकरीच्या दुधाचा पर्याय निवडला. 

आता भाषण ऐकणार्‍या शिक्षक वृंदात थोडी चुळबुळ सुरू झाली. मुख्याध्यापक अस्वस्थपणे ह्या हातातील वेताची छडी त्या हातात फिरवू लागले. आणि अचानक नितीनने बाॅम्ब टाकला !

” गांधीजींना दोन पत्न्या होत्या, एक कस्तुरबा आणि दुसरी विनोबा…” नितीनचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत चार ढेंगात मुख्याध्यापक त्याच्यापर्यंत पोहोचले. सपकन् वेताची छडी त्याच्या पायावर बसली. तसा तो कळवळून खाली बसला. पुढे त्याची यथेच्छ धुलाई झाली. पालकांना बोलावण्याचे फर्मान सुटले. 

नंतर त्याला कोणत्याही विषयावर भाषण करण्याची मनाई केली गेली, असे कळले.

पुढे मी SSC होऊन काॅलेजला गेलो. त्यानंतर इंजिनीअर होऊन नोकरीसाठी बाहेरगावी गेलो. नितीनच्या भेटी कमी झाल्या. माझ्या लग्नाला मात्र तो आत्यासह आला होता. पुढे तोही B.Com होऊन महाराष्ट्र बँकेत नोकरीला लागल्याचे कळले. 

एकदा गणपतीत १० दिवसांची सुट्टी घेऊन घरी आलो असता नितीनच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचे कळले. मी लगोलग आत्याच्या घरी गेलो. तेथे आत्या चार- सहा मुलींचे फोटो व माहिती घेऊन बसली होती. ती शनिवारची दुपार होती. नितीनचे वडील ऑफिसातून घरी आले नव्हते. नितीनला सेकंड सॅटरडेची सुट्टी होती. घरात आत्या, नितीनची आजी आणि नितीन ह्यांच्याबरोबर मीही फोटो बघण्याच्या कार्यक्रमात सामील झालो.

त्यातील एक मुलगी फोटोवरून नितीन आणि आत्याला आवडली. तिची माहितीही चांगली वाटली. कुणास ठाऊक, पण नितीनच्या आजीला ती फारशी आवडल्याचे दिसले नाही. आत्या सांगू लागली, 

 “मुलगी गोरीपान आहे.”

 ” रंग काय चाटायचाय?”आजी उत्तरली.

” मुलीचे डोळे किती सुंदर आहेत!”

 “डोळे काय चाटायचेत ?” आजी नाक मुरडत म्हणाली.

 ” मुलीकडे फर्स्ट क्लास डिग्री आहे.”

” डिग्री काय चाटायचीय?” आजी तिरसटपणे म्हणाली.

आता मात्र नितीनचा संयम सुटला. वळून तो म्हणाला, ” आज्जी, नक्की काय चाटायचं असतं, ते जरा सांगशील का?” 

या अनपेक्षित प्रश्नाने आजी कावरीबावरी झाली.

पण लगेच माझ्या आत्याने पुढे सरसावत त्याच्या साटकन् कानाखाली वाजवली आणि तिथून चालते व्हायला सांगितले. 

मी हळूच काढता पाय घेतला. माझ्यामागून नितीनही गाल चोळत बाहेर पडला. रस्त्यात मला म्हणाला, ” दादा, पुढे बायकोसमोरही आई मला असेच मारेल का रे?” 

मी गंभीरपणे म्हणालो,

” पुरुषाची कधीही मारापासून सुटका नसते. शहाणा असेल तर शब्दाने, मूर्ख असेल तर व्यवहारात, नेभळट असेल तर समाजात आणि चावट असेल तर असाच कधीतरी मार तो खातो.”

“दादा, तू यातल्या कोणात बसतोस?” नितीनने मौलिक प्रश्न केला, पण मला उत्तर द्यायचे नव्हते !

लेखक :श्री. रविकिरण संत

©  सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जुळले बंध नात्यांचे — ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ जुळले बंध नात्यांचे — ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

आज सकाळपासून देवयानीची धावपळ चालली होती. मावशी येणार होती ना आज तिची तिच्याकडे ! आपला हा आलीशान बंगला, नोकर-चाकर, दागदागिने, बघून केवढा आनंद होईल तिला, आणि हो ! तिच्यासाठी घेतलेली भारी पैठणी बघून किती खुश होईल आपली मावशी.आता माहेरच असं कुणी राह्यलच नाहीय्ये. हो एकुलता एक भाऊ, भावजय, भाची आहे म्हणा. पण आता काय त्याचं ? ती नाती तर केव्हाच तुटलीत. आपली आणि त्याची शेवटची भेट कोर्टात झाली होती. आई-बाबांच्या इस्टेटीची मागणी आपण केली, कोर्टात केस लढवली, आणि निकाल आपल्या बाजूने लागून आपण केस जिंकलो. तेव्हांपासून सबंध तुटले. भावाचं म्हणणं असं होतं की ‘ ताई जरा सबुरीने घे. सध्या मी अडचणीत आहे, त्यातून डोकं वर निघाल की,तुझा सगळा वाटा हिस्सा मी तुला नक्कीच परत करीन. ‘. पण देवयानीला आणि तिच्या मिस्टरांनाही दम नव्हता. हट्टाने वाटा हिस्सा हिसकावून घेतला होता, तिने आणि तिच्या नवऱ्याने. पण जाऊ दे आता काय त्याचं ? आपला वाटा, शिवाय आईची माळ, कर्णफुलं बाबांचे घड्याळ आणि अंगठी तर लाटली ना आपण. आणि आता भावाची, शंकरची परिस्थिती सुधारली असेलच की. मनांतले विचार झटकून तिने ड्रायव्हरला गाडी बाहेर काढायला सांगितली. क्षणभर लहानपणीचा शांत,समजूतदार शंकर तिच्या डोळ्यासमोर आला. आणि तिचं मन गलबललं. मनातला विचार झटकून मावशीला आणायला ती निघाली. मावशी आली.

आपल्या भाचीचा मोठा बंगला, नोकर-चाकर, सारं वैभव बघून मावशिला खूप खूप आनंद झाला. नंतरचे दोन दिवस अगदी मनसोक्त भटकण्यात गेले. रोज आवडीचे पदार्थ झाले. पंचपक्वान्ने झाली. आणि मावशीचा निघायचा दिवस उजाडला. दोन दिवसांपासून बोलू का नको, असा विचार करणारी मावशी आपल्या विचारांशी ठाम झाली. आणि देवयानीला जवळ बसवून म्हणाली ” हे बघ देवयानी, ताई आणि बाबासाहेब गेले तेव्हां मी परदेशात होते, त्यामुळे तुझ्यात आणि शंकर मध्ये कां दुरावा झाला, त्याबद्दल काहीचं माहिती नाही मला. पण एवढं मात्र कळलं की तुझ्या आईची आठवण म्हणून तू ताईचे बरेचसे दागिने हट्टाने शंकरकडून घेऊन आलीस. असं मला तिसरीकडून कळलं. मध्यंतरी शंकरची भेट झाली. तो खूप शांत आणि समजूतदार आहे गं ! त्याने आणि त्याच्या बायकोने काही म्हणजे काहीही तक्रार केली नाही माझ्या जवळ. तो फक्त एवढंच म्हणाला, ” “मावशी,आई बाबा, ताईचे तसे माझेही आई वडील होते. बाकी काही नाही पण, आई-बाबांची आठवण म्हणून आईचा फक्त एखादा दागिना, बाबांचं घड्याळ माझ्यासाठी ठेवलं असत देवयानीताईने, तर बरं झालं असतं. फक्त आई-बाबांची आठवण जवळ हवी म्हणून म्हणतोय. आणि आजीची आठवण असावी म्हणून वैदेहीच्या लग्नात तिला मी आईची माळ देणार होतो. वैदेहीवर फार जीव होता ना आजीचा “. देवयानी तुझ्याबद्दल शंकरनी आणि त्याच्या बायकोने काही म्हणजे काहीही तक्रार केली नाही. याचचं फार कौतुक वाटलं मला. तुझ्याबद्दल अजूनही आदर आहे त्यांच्या मनात. मावशी पुढे म्हणाली, ” देवयानी माझ ऐक, वैदेहीचं लग्न दोन दिवसावर आलं आहे. मदतीसाठी म्हणून मी आधीच इथून परस्पर शंकरकडे जायचं म्हणतेय. मोठं माणूस म्हणून कुणीतरी हवं ना त्यांच्या पाठीशी.. मला वाटतं हेवेदावे मागचं सगळं वैर विसरून तू पण यावंस माझ्याबरोबर”. देवयानी हट्टी होती.पण मनाने चांगली होती. तिच्या मनांत आलं बाई गं ! आपली लाडकी भाची इतकी मोठी झाली ? आपला शंकर तसा खूप हळवा आहे. लेकीच्या लग्नानंतर, तिच्या वियोगाने तो कासाविस होईल. आपल्या लग्नातच किती रडला होता तो. पाठवणीच्या वेळी आपण सासरी निघतांना तो दिसला नाही, म्हणून आपली नजर त्याला शोधत होती. आणि एका कोपऱ्यात हमसाहमशी रडत बसलेला आपला शंकर, आपला धाकटा भाऊ तिला दिसला. आणि मग एकमेकांच्या गळ्यात पडून अश्रूंचा बांध फुटला होता. सारं काही तिला आठवलं. तिचे ओघळलेले अश्रू पुसत शांता मावशी म्हणाली ” देवी तुझी चूक उमगून, तुला आता पश्चाताप झालाय हो नां ? अगं किती झालं तरी रक्ताचं नातं आहे तुमचं. असे सहजासहजी तुटणार नाहीत हे नात्याचे बंध. पश्चाताप झालाय ना तुला ? मग माझ ऐक बाळा! माझ्या बरोबर वैदेहीच्या लग्नाला चल. माझ्यासाठी भारी पैठणी घेतलीस ना, ती शंकरच्या बायकोला दे. मला एवढी जड साडी या वयात नाही ग पेलवत. शंकरला बाबासाहेबांचे घड्याळ दे. आणि तुझ्या लाडक्या भाचीच्या गळ्यात ताईची मोहनमाळ घाल. तुझ्याकडच्या अशा आहेराने खूप खूप आनंदित होतील गं ते तिघजण. तू चलच माझ्याबरोबर लग्नाला. ऐक माझं, देवयानी, ईर्षा आणि अहंकार यात जय शेवटी रक्ताच्या नात्यांचाच होतो, बरं का बाळ.!

आणि मग देवयानीला आपली चूक उमगली. ती ताडकन उठली.भराभर आहेराची तयारी झाली. आणि गाडी वेगाने धावत माहेरच्या वाटेने पळू लागली. माहेरच्या अंगणात मांडव सजला होता. सनईच्या सुरात गृहमखाची तयारी चालली होती. आणि कुणीतरी ओरडलं, “देवयानी आली ” सोवळं नेसलेला शंकर तीरासारखा धावला. आणि ताईच्या गळयात पडला. डबडबलेल्या आनंदाश्रूनी म्हणाला, “माझी ताई आली अहो बघा ! माझी ताई विसरली नाही मला. मुंडावळ्या सांवरत वैदेही पुढे झाली, आणि आत्याच्या कुशीत शिरत म्हणाली, “मला खात्री होती आत्त्या ! तू माझ्या लग्नाला येशील म्हणून”. प्रेमळ वहिनी तिला सोफ्यावर बसवत म्हणाली, ” उन्हातून आलात, दमलात नां वन्स ? हे सरबत घ्या बघू आधी. वहिनीच्या डोळ्यात तिला आईची माया,आईचं वात्सल्य दिसलं. आणि शंकर ! तो तर आनंदाने वेडाच झाला होता. आपल्या ताईला कुठे ठेवू अन् कुठे नाही असं झालं होतं त्याला. तो म्हणाला, “मावशिनी कोर्टापासून दुरावलेले आपल नातं जुळवून आणल. तिचे खूप उपकार आहेत माझ्यावर. देवीताई माय गेली आपली, पण माय सारखी माय माऊली मावशी, आई आपल्या साठी मागे ठेवून गेली आहे “. आणि मग दोघंही मावशीच्या पायाशी वाकले. मावशीने भरभरून आशिर्वाद दिला. “बाळांनो असंचं तुमचं बहीण-भावाचं नातं अतूट राहूं दे. अगदी शेवट पर्यन्त. एकमेकांना कधीही अंतर देऊ नका “.

— तर मंडळी.. असा झाला हा नात्यांचा गोड शेवट. रक्ताची काय आणि मानलेली नाती काय एकदा आपलं म्हटलं की कापलं तरी आपलंच असत. ह्या नात्याचे व्यवहाराच्या करवतीने कधीच दोन भाग करू नका. शेवट गोड झालेली अशी ही नात्यांची गुंफण नक्कीच तुम्हाला आवडेल हो नां ?

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन बोधकथा – अक्षय / गणपती ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? जीवनरंग ?

दोन बोधकथा – अक्षय / गणपती ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

१) अक्षय 

एक राजा होता. त्याला आपल्या प्रजेसाठी काहीतरी करावे असे नेहमीच वाटायचे. त्या प्रमाणे तो नेहमीच काहीतरी करून प्रजेला आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचा. कारण त्याला माहित होते की प्रजा आनंदी तर राज्य आनंदी आणि राज्य आनंदी तर राजा मनापासून आनंदी.

एके दिवशी त्याला असे वाटते की आपण प्रजेला अशी एखादी गोष्ट देऊ की जी कधीच संपणार नाही. अर्थातच अशी कोणती गोष्ट आहे जी कधीच संपणार नाही याचा शोध त्याने घ्यायचे ठरवले.

त्याने नगरात दवंडी पिटवली की जो कोणी राजाला अशा गोष्टीची माहिती देईल त्याला राजा मोठे बक्षीस तर देईलच पण ती गोष्ट तो प्रजेला देऊन प्रजेला अजून सुखी करण्याचा प्रयत्न करेल.पण त्या व्यक्तीने ती गोष्ट नाशवंत नाही असे सिद्ध करून दाखवावे लागेल.

राजाची दवंडी ऐकून बक्षीसाच्या आशेने अनेकजण येतात आणि सांगतात. पण सिद्ध करायची वेळ आली की त्यात ते नापास होतं होते.

एक जण येतो आणि म्हणतो सूर्यप्रकाश नाशवंत नाही. तो इथे नसला तरी दुसरीकडे प्रकाशमानच असतो म्हणून तो नाशवंत नाही. पण राजा म्हणतो ते जरी खरे असले तरी रोज रात्री सूर्यास्त झाला की हा प्रकाश येथे रहातच नाही त्यामुळे ते काही खरे नाही. मग तो म्हणतो सोलर एनर्जी साठवली तर ते शक्य आहे. आणि त्याने ते करूनही दाखवले. राजा खूष होतो. त्याला बक्षीस देऊन आपल्या राज्यात सगळीकडे सोलर सिस्टीमने रात्री पण प्रकाश निर्माण करतो. त्यामुळे वीज बचत होऊन राज्याची प्रगतीच होत आहे असे त्याला वाटले.

परंतु पुढे जून महिन्यात दिवसाच सूर्यप्रकाश अपूरा असल्याने सोलर सिस्टीम सक्रिय होत नव्हती म्हणून ते पण नाशवंत आहे हे लक्षात आले.

मग राजा त्या व्यक्तीला परत बोलावतो आणि सांगतो अरे ही सूर्यप्रकाशाची वाट तूच दाखवलीस पण ती चुकीची ठरली. आता तू अजून दुसरी गोष्ट सांग नाहीतर बक्षीसाच्या दुप्पट दाम लगेच परत कर… असे केले नाही तर तुला राजाची फसवणूक केली म्हणून मृत्यूदंड दिला जाईल.

ती व्यक्ती घाबरते. थोडा विचार करते आणि पटकन म्हणते, ” अमृतमं ज्ञानम अभयस्य तत् कदापि नहन्यते ”  अर्थात हे राजा जगात अमृत, ज्ञान आणि अभय या तीन गोष्टी शाश्वत आहेत. याचा कधीच नाश होत नाही.

राजाला ते पटते आणि तो त्या व्यक्तीची शिक्षा माफ करतो. तसेच एका गोष्टी ऐवजी तीन तीन गोष्टी सांगितल्या म्हणून त्याला अतिरिक्त बक्षीस देतो.

मग तो आपल्या प्रजेला निडर रहायचे धडे देतो त्यामुळे अभय भाव मनात येऊन कोणत्याही संकटाला धीराने सामोरे जायचे मग काही बिघडत नाही हे लक्षात येऊन राज्याकडे वाकड्या नजरेने कोणी पाहिले नाही. अमृत ही गोष्ट तो प्रजेसाठी देऊ शकला नाही पण अमृताचे गुण जाणून त्याने प्रजेला आयुर्वेद महत्व सांगितले. त्याप्रमाणे सगळ्या प्रजेने वागल्याने प्रजेचे आरोग्य सुधारले आणि आयुष्यमान वाढले. अर्थात हे ज्ञान सगळ्यांना दिल्याने हा ज्ञानदीवा अखंड तेवता राहिला ज्याचा कधीच नाश नाही झाला.

राजाने सगळ्यांना ही शिकवण दिल्याने पिढ्यानुपिढया सगळ्यांच्या मनात आत्मविश्वास आला आणि सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान प्राप्त करू लागल्याने राज्याची प्रगतीच होत राहिली.

पण तरी अमृत ही गोष्ट तो देऊ शकला नाही म्हणून त्याने ती गोष्ट नाशवंत न म्हणता अस्तित्वातच नाही असे सांगून ते सुभाषित बदलले आणि स्वानुभवातून त्याने सांगितले सत्यम ज्ञानम अभयस्य तत् कदापि नहन्यते…

सत्य हे कायम सत्यच रहात असल्याने ते पण अक्षय म्हणून मानले जाऊ लागले.

लेखिका : सुश्री वर्षा बालगोपाल

२) गणपती

श्रीपाद आणि सुलोचना गरीब जोडपे. लोकांच्या घरची धुणी भांडी, आणि मोलमजुरीचे काम करून आपली उपजीविका करत होते. खाऊन पिऊन सुखी होते.

निसर्ग नियमाने सुलोचना आई होऊ घातली होती. खरे तर इतकी आनंदाची बातमी तरी सुलोचना धस्तावलेलीच होती. तिला त्याबद्दल विचारले तर ती म्हणाली श्रीपाद आणि घरच्यांना मुलगी नको आहे. मुलगी झाली तर आम्ही सांभाळणार नाही म्हणत आहेत. म्हणून काळजी वाटते.

असे म्हटले तरी तसे होणार नाही. शेवटी आपलेच बाळ म्हणून स्वीकारतील. तसे नाही झाले तर त्यांना समजावता येईल. तू काळजी करू नको असे सुलोचनाच्या घरचे तिला धीर देत होते.

यथावकाश सुलोचना प्रसूत होऊन मुलगीच झाली. ती सुद्धा दिव्यांग… हात पाय छोटे असलेली. गिड्डूच रहाणारी. डॉक्टरांनी हे सांगितले मात्र श्रीपाद आणि त्याच्या घरच्यांनी मुलगी नाकारली. तिला तू कोठेही सोडून ये आम्हाला मुलगीच नको होती त्यातून अशी तर मुळीच नको. तुला आम्ही स्वीकारू….

असे म्हणताच सुलोचनाने त्याला ठाम नकार दिला. मी येईन तर मुलीला घेऊनच नाहीतर मी मुलीला घेऊन कशीही राहीन. असे म्हणून ती त्यांच्याकडे अपेक्षेने पाहू लागली पण त्याला न बधता ते खरेच तिला आणि मुलीला सोडून गेले.

मामाने भाचीला आधार दिला तरी सुलोचनाने तिला धुणं भांड्यांची कामे करून चांगले वाढवले. तिला 10वी पर्यंत शिकवले. मानिनी तिचे नाव. पुढे याच बळावर मानिनीने दिव्यांग मुलांसाठीच शाळा काढण्याचा निर्णय घेऊन त्या दृष्टीने 2 कोर्स केले आणि मामाच्या घराच्या पडवीतच ही शाळा सुरु केली. तिला सरकारी मदत मिळाली आणि मग त्या जागेत तिने मोठी शाळा चालू केली.

ते पाहून श्रीपाद तिच्या पैशासाठी तिला स्वीकारायला तयार झाला.

तेव्हा सुलोचना म्हणाली तुम्ही श्री गणेशाची पूजा करता ना? श्रीपाद म्हणाला हो. पण त्याच काय इथे? पुढे सुलोचना म्हणाली तुम्ही गणपतीची भक्ती विघ्नहर्ता म्हणून करता त्यावेळीच तो बुद्धीदाता आहे कलाधिपती आहे हे विसरलात. आणि ज्या गणपतीची उपासना तुम्ही करता त्याच्याकडे नीट बघता का तरी? गणपतीच्याही जीवनात त्याच्या जन्माच्या वेळेसच संकट आले आणि तो स्वतः दिव्यांगच झाला नाही का? त्याच्या डोक्याच्या भारामुळे त्याचे पोट मोठे झाले म्हणून बेढब नाही का झाला? पण तरीही आपल्या बुद्धीच्या जोरावर कलांच्या साहाय्याने त्याने आपले स्थान अबाधित केलेच ना?

तशीच माझी मुलगी आहे. तिने तिच्या बुद्धीने आज यश मिळवून तिची महानता सिद्ध केली आहे.

एक लक्षात घ्यायला हवं आंधळ्या माणसाला सिक्सथ सेन्स असतो म्हणून त्याला समजते. न बोलता येणाऱ्याला ऐकू चांगले येते. म्हणजेच एक भाग कमी असला तरी काही ना काही जास्त त्याकडे असते. तेच आपल्यातील बळ आहे हे ओळखून काम केले तर दिव्यांग व्यक्ती अविश्वसनीय काम करून दाखवते. त्याला प्रोत्साहन द्यायचे पाठिंबा द्यायचे काम समाजातील इतर घटकांनी करायचे असते. मग दिव्यांग खऱ्या अर्थाने दिव्यांग होतील. अगदी गणपतीबाप्पासारखे.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वप्न ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? जीवनरंग ❤️

☆ स्वप्न ☆ श्री सुनील शिरवाडकर

साडेदहा वाजता पूजा दुकानात आली, तेव्हा बाळुने नुकतेच दुकान उघडले होते. बाळु दुकानाची साफसफाई करत होता. दोन तीन वर्षांत दुकानाने चांगलाच जम बसवला होता. पूजा मागच्याच वर्षी दुकानात कामाला लागली होती. सेल्सवुमन म्हणून. दुकान तसे छोटेसेच. शहराच्या नव्या उपनगरात. पूजा आणि अमित त्या कॉलनीतच रहात होते. संसाराची नुकतीच सुरुवात झाली होती. अमित,पूजा आणि पाच वर्षाची इशु.अमीतच्या पगारात जरा ओढाताणच होत होती, म्हणुन पूजाने नोकरी करायचे ठरवले. योगायोगाने कॉलनीमधल्याच या सराफी दुकानात पूजाला जॉब मिळाला.

सकाळचा गजर झाला. गजर बंद करून थोड्या वेळासाठी पुजा पुन्हा झोपली, तर झोपच लागून गेली. जाग आली तेव्हा साडेसात वाजले होते. घाईघाईत उठली. सगळ्यात आधी अमीतला आणि तिला चहा ठेवला आणि मग इशुला उठवायला गेली.

“इशु उठ..आधीच उशीर झालाय”

“अं….हो उठतेच”

“उठते नाही.. उठच”

खसकन तिचे पांघरूण ओढत पुजा म्हणाली. कुरकुर करत,डोळे चोळत इशु उठली आणि ब्रश करायला गेली. अमित उठलाच होता. दोघांनी चहा घेतला. नुकताच आलेला ‘लोकसत्ता’ घेऊन अमीत गैलरीत बसला. पूजाने टिफिनची तयारी सुरू केली.

काल रात्री येतानाच पुजाने भेंडी, फ्लॉवर आणला होता. सोलुन ठेवलेला मटार फ्रिजमध्ये असायचाच.इशुसाठीही भेंडी चिरायला घेतली. अमीतसाठी मटार फ्लॉवरची भाजी करायला घेतली. ते झाल्यावर पोळ्यांसाठी कणीक भिजवली.

साडेनऊ वाजता अमितचा टिफिन भरुन ठेवला आणि जरा निवांत झाली. तिला जरा उशिरा निघाले, तरी चालण्यासारखे होते.

“मम्मी, दिवाळीची सुट्टी कधी गं लागणार?”

“आहे अजुन दहा बारा दिवस.”कैलेंडरकडे नजर टाकत पुजा म्हताली.

तिला मागची दिवाळी आठवली.नोकरी लागल्यानंतरची पहिलीच दिवाळी. नको वाटली तिला दिवाळीची ती आठवण. सर्व जग दिवाळीचा सण साजरा करीत असते. आणि आपण..?

दिवसभर उभे राहुन पायात गोळे येतात. रात्री घरी जाण्याची वेळ निश्चित नाही. कसला आलाय सण?रात्री घरी येते तर इशु झोपुनच गेलेली असे. आपल्यासाठी दिवाळीची सुट्टी नाही की काही नाही.

साडेदहा वाजता इशुच्या शाळेची व्हॅन आली. तिला पोहोचवुन,कुलुप लावुन ती बाहेर पडली.किल्ल्या तळमजल्यावरील जोशी काकूंकडे दिल्या.  दुकान पायी अंतरावरच होते. त्यामुळे जाण्यायेण्याचा वेळ वाचायचा.

दुकान उघडून बाळुची साफसफाई चालू होती. जयंतशेठ बाहेरील बाकावर बसुन पेपर चाळत होते पुजा आत गेली. दुकानाच्या मागच्या खोलीतून तिने तिजोरीतुन दागिन्यांचे ट्रे काढले. त्याची चळत पुढे येऊन काउंटरवर ठेवली. तिजोरी पुन्हा लॉक करुन किल्ल्या शेठकडे दिल्या. स्टॉकबुक घेऊन सर्व आयटेम्स चेक केले, आणि सर्व माल शोकेसमध्ये लावला.

काऊंटरवर मागच्या बाजूला लक्ष्मी, गणपती, स्वामी समर्थांच्या तसबिरी होत्या त्याच्या बाजुलाच शेठजींच्या वडिलांचा मोठा फोटो. फुलाची पुडी सोडुन सर्व फोटोंना माळा घातल्या. उदबत्ती, निरांजन लावली आणि गिऱ्हाईकांकडे वळली.

एका मागून एक गिऱ्हाईक येत होते. आणि तेच पुजाला पण सोयीचे वाटत होते. एकदम दोन तीन गिर्हाईके आली की तिची तारांबळ उडे.शेठ तर फक्त गल्ल्याजवळ बसुन रहात. मोडीचे व्हैल्युएशन करणे .कोणाला काय मजुरीत सुट देणे एवढेच त्यांचे काम. बाकी सर्व पुजावरच.ती पण आता सरावाने तयार झाली होती.

दुपारी तासभर जेवणाची सुट्टी. तिला जरा मोकळा वेळ मिळे.घरी जाऊन जेवण करुन जरा वेळ अंथरुणाला पाठ टेकुन झोप घेई,की पुन्हा चार वाजता दुकानात.

संध्याकाळी मोबाईल वाजला. अमितचा फोन होता.

“हैलो पूजा.. कामात आहेस का?”

“हं..बोल तु”

“अगं माझा मित्र,तो सतीश नाही का? त्याला चेन घ्यायची आहे. तो संध्याकाळी येईल.तुमच्या दुकानात.”

“हं..बरं..बोल पटकन”

दुकानात गिर्हाईकांची गर्दी. एकिकडे मान तिरपी करुन पुजाने मोबाईल अडकवला होता.

“काही नाही गं..थोडी मजुरीत सुट वगैरे देता आली तर बघ.तसे त्याल मी सांगितले आहे म्हणून”

“ओके.. ठेवते मी फोन”

संध्याकाळी सतीश आणि त्याची बायको दुकानात आली. चांगली दोन तोळ्यांची चेन घेतली त्यांनी. सतीशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या बायकोने त्याल घेऊन दिली. दोघे खुश होऊन निघुन गेले.

रात्री घरी येताना पुजाच्या डोक्यात विचार चालु.आपणही अमीतसाठी एक चेन घ्यावी का?नाही दोन तोळ्यांची.. एक तोळ्याची तर घेऊ शकतो.मनाशीच आकडेमोड करीत ती घरी आली.

रात्री जेवण झाल्यावर तिने अमीतजवळ विषय काढला. एकदा वाटले.. सरप्राईजच द्यावे. पण तिच्याच्याने राहवेना.

“अमीत.. तुझ्या पुढच्या वाढदिवसाला मी तुला सोन्याची चेन देणार आहे. चांगली एक तोळ्याची.”

“अरे वा..पगारवाढ झालेली दिसते आहे”

“नाही रे..तो कसला पगार वाढवतोय.पण एवढी सराफी पेढीवर मी काम करतेय.आपल्यासाठी आपण काहीच सोने घेत नाही”

“मग तुझ्यासाठी बनव ना काहीतरी”

“नको.. माझ्या गळ्यात आहे मंगळसुत्र. साध्या दोर्यामध्ये गाठवलेले का होईना. नंतर पुढे मागे करीन मी गंठण.इशुला पण चेन आहे बारश्याची.तुलाच काही नाही”

“मला काय गं..मी चेन घालायला तयारच आहे, पण मला वाटते की तुझ्यासाठी काहीतरी बनव.दिवसभर एवढी सोन्याचांदीच्या दुकानात उभी असते. त्याचा तुला नाही होत मोह कधी?”

पुजाच्या डोळ्यात पाणी तरळले. बायका येतात.. सुंदर सुंदर दागिने घेतात. आरशासमोर उभे राहून दागिने घालुन बघतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यातील आनंद तिला आठवला. मनाशी तुलना होई.आपल्या नशीबात कधी येणार कुणास ठाऊक?दिवसभर मौल्यवान दागिने हाताळायचे..पण आपण मात्र लंकेची पार्वतीच.कसली खंत आणि कसला खेद?आणि हा म्हणतोय..तुला मोह होत नाही का?

“जाऊ दे..मी ठरवलं आहे. आणि मी ठरवले ते मी करणारच.”

म्हणता म्हणता वर्ष गेलं.दुकानातच सोन्याची भिशी होती. ती पुजाने लावली. वर्षभरानंतर भिशीचे पैसे आणि काही वरती थोडे असे मिळुन पुजाने एक सुंदर चेन घेतली.

आजच तिच्या अमीतचा वाढदिवस होता. लाल मखमलीच्या डबीत चेन घेऊन ती निघाली.शेठना सांगुन आज ती जरा लवकरच निघाली.येताना चौकातल्या केक शॉपमधुन तिने केक घेतला. इशु आणि अमीत तिची वाटच पहात होते. फ्रेश होऊन.. कपडे बदलुन ती हॉलमध्ये आली. केक टिपॉयवर ठेवला.त्याच्या बाजुला चेनची डबी.त्यातुन चेन काढुन तिने अमीतच्या गळ्यात अडकवली.फासा पक्का केला.

” हैप्पी बर्थडे.. अमीत”..पुजा म्हणाली.

लगेच इशु  म्हणाली..

“हैप्पी बर्थडे.. पप्पा”

पुजाच्या डोळ्यात पाणी आले. आज तिने पाहीलेले एक छोटेसेच स्वप्न पूर्ण झाले होते. तिच्याकडे पाहुन अमीतही गहिवरला. छोटी इशु मात्र आळीपाळीने दोघांकडे पाहात होती.

तिला कळत नव्हते.. आज पप्पांचा वाढदिवस आहे.. तर मम्मी, पप्पा का रडताहेत?

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “जरा हा पत्ता कुठे आला सांगता?…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? जीवनरंग ?

“जरा हा पत्ता कुठे आला सांगता?…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

बबनराव शिवडीकर रिटायर्ड हाडाचा प्राथमिक शाळेचा मास्तर… उंच शरीरयष्टी, किरकोळ बांधणीचा देह, नाकावर चष्मा गॅलरीतून वाकून बघण्याऱ्या माणसा सारखा.. विद्यादानाच्या सेवाव्रतालाच अख्ख आयुष्य वाहून घेतलेलं ,त्यामुळे गृहस्थाश्रमाला तिलांजली दिलेली.. दोन वेळेचा सरस्वतीबाईंच्याकडे जेवणाचा डबा लावलेला… बाकी सर्व स्वावलंबनाचा परिपाठ ठेवलेला… शाळा सुरू होती तोपर्यंत सगळं काही सुरळीत सुरू होतं… घड्याळात फावला वेळ नसायचा.. नि आता दिवसाचे बरोबर रात्रीचे तास जाता जात नसत… रिटायर्ड होईपर्यंत विद्यादानाचं अग्निहोत्र अखंड चालू होतं ..पण आता त्यात विरंगुळा हवा होता… म्हणून शिकवण्याच्या मोहा पासून दूर राहिले… आणि हो पेन्शन उत्तम मिळत होती त्यामुळे कसलीच ददात नव्हती… सकाळी फिरायला जाणे, वाचनालयातून पेपर वाचणे, पुस्तक घरी आणून वाचनाची भूक भागवणे, संध्याकाळी कुठे टेकडीवर, एखाद्या देवळात नाहीतर बागेत फेर फटका मारून रात्र वस्तीला घरी चल म्हटल्यावर झोपायला घरी येणे…एक दोन जुन्या शिक्षकांशी स्नेह होता पण जुजबी… त्या सगळ्यांना प्रपंच होता अर्थात त्याच्या जबाबदाऱ्याही होत्या.. बबनराव काय सडाफटींग माणूस.. पिंपळावरचा मुंजा असल्यासारखा… सुखी माणूस, राजा माणूस.. कसलं व्यसन नाही कि कुठं जाणं येणं नाहीच… कुणी जवळचे नातलग सुद्धा नाहीत… रिटायर्ड झाल्यावर सुरवातीला कसे अगदी आखून रेखून मोजून मापून दिवसाचा सगळा कार्यक्रम पार पडला जाई.. नि रात्री शांत झोप लागे… पण पण जेव्हा हा दिनक्रम यांत्रिकी सारखा वाटू लागला, तेव्हा निरस, उदास उदास वाटू लागले… शेजारी पाजारी अवतीभवती जरी असले तरी त्यांचे त्यांचे व्याप का कमी होते.. नाही म्हणायला जुजबी बोलाचाली होत असे. पण बबनरावानाची संवादाची भुक मात्र शमत नसे.. हळूहळू त्यांनी सगळ्या शेजारी पाजारींचा वेळ खायला सुरुवात केली… त्यांना बरं वाटत होतं पण लवकरच शेजारी पाजारी शहाणे झाले.. त्यांना हळूहळू टाळू लागले.. ते समोर दिसताच दिशा बदलू लागले.. स्वताची सुटका करून घेण्यात धन्यता मानू लागले… बबनरावानां ही बाब लक्षात आली. .. आता पुढचा पर्याय काय शोधावा या विचारात असताना.. त्यांना रस्त्यावरून जाणारा पोस्टमन दिसला आणि त्यांच्या सुपिक डोक्यात एक कल्पना अवतरली…

… रोज सकाळी वाचनालयात पेपर वाचताना त्यातील जाहिरातीतील पत्याचा एकच भाग लिहून घेऊन त्यापुढे दुसऱ्या जाहिरातीतील दुसरा भाग, त्यापुढे तिसरा, चौथा… असं करत एक संपूर्ण आगळा वेगळा पत्ता कागदाच्या चिटोऱ्यावर लिहून घेऊन  वाचनालयातून जे बाहेर पडायचं ते चिठोऱ्यावर लिहिलेला पत्ता हुडकण्यासाठी… मग त्यासाठी सुरुवातीला रस्त्यावर पहिला जो भेटेल त्याला थांबवून, 

“मला जरा हा पत्ता कुठे आला सांगाल काय? ” असं म्हणून त्या माणसाकडे तो पुढे काय सांगतोय इकडे उत्सुकतेने नजर फिरवून बघणे .. पत्ता वाचला कि माणूस अचंबित होऊन जाई… कशाचा कशाला लागाबांधा लागायचाच नाही.. जर घाईत असेल तर

” नाही बुवा नक्की कुठला पत्ता आहे ते कळत नाही.. तुम्ही शेजारच्या दुकानदाराला विचारा. तो तुम्हाला नीट सांगेल.. “

संवाद खुंटला कि बबनराव ते चिठोरे घेऊन पुढे निघत.. मग एखादा दुकानदार, चहाचा टपरीवाला.. एकादा रिक्षावाला असे नवे नवे गिर्हाईक शोधली जायची.. पण पत्ता सापडयला मदत होत नसे.. कुणी विचारले या गावात नवीन आलात काय? तर तोच धागा पकडून काही वेळा संवादाची गाडी सुरू करत असत.. ” नाही हो इथलाच…गावाकडचा जुना मित्र या पत्त्यावर आला आहे त्यानं मला तिथं भेटायला बोलावलं असल्यानं हा पत्ता शोधतोय…  गडबडीत मोबाईल नंबर लँडलाईन नंबर लिहून घ्यायचा राहून गेला.. आणि असा हा पत्ता शोधण्याची पायपीट करतोय… तुम्ही त्या  पत्त्याच्या एरियातले आहात तर… ” संवाद रेंगाळत चालला आहे पाहून बबनरावांना आनंद झाला… पण फार काळ तो टिकला नाही…पत्तात बरीच सरमिसळ झालेली दिसतेय.. एव्हढं बोलून मग समोरचा माणूस कलटी मारे… वाचनालयातून निघाल्या पासून दोन तीन तासाचा वेळ छान जाई… मग दुपारी घरी येऊन जेवण करून विश्रांती घेतली जाई.. त्यावेळी कोण कसं रिॲक्ट झालं याची मनाशी उजळणी होई.. बबनराव हसू येई…  संध्याकाळी पुन्हा पत्ता शोध मोहीम सुरू व्हायची…आता रोजचा कार्यक्रम ते राबवू लागले.. रोज नवी नवी डोकी धरु लागली.. कधी संवादाची गाडी रेंगाळे तर कधी जलदगतीने निघून जाई… रोज नव्या नव्या एरियातल्या आड रस्तावर ते बाहेर पडायचे… सकाळचा नि संध्याकळचा घराजवळच्या चहाच्या टपरीवाला कडून चहा पिऊन झाला कि आपल्या पत्ता शोध मोहिमेला निघत असत…त्या चहाच्या टपरीवाल्याला सुद्धा त्यांनी सोडलं नाही… तो तर कायम बुचकळ्यात पडलेला असायचा.. या माणसाला  असा विचित्र पत्ता दिला कुणी असा प्रश्न त्याला पडायचा.. कि हा पत्ता कधीच न सापडेल असाच आहे.. आणि हा शाळा मास्तर असून याला हे ठाऊक असू नये.. म्हणजे… का काहीतरी या माणसाचा रिकामटेकडेपणाचा चाळा असावा…कधी कधी बबनरावांचे ग्रह फिरलेले असले तर बोलाचाली… वादावादी… गाव जमा होऊन आरोप प्रत्यारोप… लफंगा, भुरका चोर… बाईलवेडा… वगैरे वगैरे शेलक्या शब्दात, तर कधी प्रकरण हातघाई वर येई..  त्यांच्या घराबाहेर असलेल्या त्या चहा टपरीवाल्याकडे  पोलिसांनी बबनरावांची चौकशी केली..तो टपरी टपरीवाला म्हणाला अरे साब वो मास्टर एक नंबरका पागल है..उसका कोई नही है इसिलिए एक झुठा पत्ता धुंडने लता है और उसके बहाने लोगोंसे बाते करता रहता है..जिस दिन बाते ज्यादा होती है तो खुशीकेमारे सिटी बजाता देर रात को घर आता है..और जिस दिन बात ही नहीं बनती तो मेरे यहा दो दो कप कटिंग चूप चाप पी के घर चलता है… रात्री घरी आल्यावर  त्यांना खूप खजिल वाटायचे.. हा पत्ता शोध उपक्रम आपल्या हवा तसा प्रतिसाद मिळत नाही हे पाहून ते खूप दुखी कष्टी झाले.. एक दोन दिवस बाहेर सुध्दा पडले नाहीत.. नवा मार्ग शोधयाचा प्रयत्न करून पाहू लागले… पण एकांत सुटावा संवाद घडावा याची भुक मात्र खूप खवळली जाऊ लागली… . त्या टपरीवाला चहावाल्याला सुद्धा बबनराव दोन दिवस न दिसल्या बदल वेगळीच शंका येऊन गेली.. तो घरी जाऊन त्यांना दारातून पाहून आला… बबनराव एका कागदाच्या चिठोऱ्यावर पत्ता लिहिण्यात मश्गुल होते… दहाबारा पते त्यांनी तयार करून घेतले… आज त्यांनी हा पत्ता शोधायचा नाद सोडून देण्याचे मनानेच ठरवले होते.. तयार होऊन घराबाहेर पडले.. टपरीवाला चहावाल्याच्या समोरून शीळ घालत पुढे निघून गेले… 

… चालत चालत नदीच्या काठावर आले… संध्याकाळची वेळ होती काठ अगदी निर्मनुष्य असल्याने शांत शांत होता… बबनरावांनी खिशातले ते सगळे पत्ते काढले आणि हळूहळू एकेक करत त्या नदीच्या प्रवाहात सोडत राहिले… जणूकाही आपल्या छंदाला त्यांनी जलार्पण केले होते… आपणच आपल्या या वेगळ्या छंदाला हसत होते… 

.. अरे हा तर माझ्या घराशेजारचाच पत्ता आहे कि.. कोणीतरी बोललं.. त्या वाहत्या पाण्यातील एक पत्याचा भिजलेला अक्षर धुवून गेलेला कागद हाती घेऊन तो बबनरावांकडे बघत म्हणाला… बबनराव चमकले त्यांनी त्या अनोळखी व्यक्ती कडे पाहिले आणि हसत हसत विचारले.. 

” इथं बसून तुम्ही काय करता आहात..काय शोधताय या ठिकाणी ?… त्या अनोळखी माणसाने  आपल्या खिशातील एक कागदाचा चिटोरा काढत म्हटले….. 

.. ‘ मला जरा हा पत्ता कुठे आला सांगता? ‘… 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन लघुकथा : १) चिमूटभर आपुलकी… २) टेडी बेअर ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ दोन लघुकथा : १) चिमूटभर आपुलकी… २) टेडी बेअर ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

१) चिमूटभर आपुलकी… 

रोजच्याप्रमाणेच आजही तो घाईघाईत कामावर निघाला. आणि दोनच मिनिटांत घरी परतला. बेल वाजल्यावर आईने दार उघडलं, तिला वाटलं – हा बहुधा डबा, किल्ली, पाकीट काहीतरी विसरला धांदरटपणे. 

पण तो घरात शिरलासुद्धा नाही. दारातूनच आईला म्हणाला, “मी निघालो तेव्हा तू आंघोळीला गेली होतीस. तुला टाटा केला नव्हता, म्हणून परतलो. टाटा. चल, मी पळतो!” म्हणत तो परत गेला पण. 

आज त्याची रोजची ९:१३ चुकणार होती. पण त्याच्या आईच्या चेहऱ्यावर आज दिवसभर हसू राहणार होतं.

🌸

आज ऑफिसासाठी डबा भरताना, तिनं एका छोट्या डबीत लिंबाचं लोणचं घेतलं होतं. तिच्या ऑफिसमधली स्मिता परवा दुसऱ्या कोणाला तरी सांगत होती, तिला सध्या लोणचं खावंसं वाटत होतं म्हणून. 

🌸

आज तो ऑफिसहून घरी येताना, गरमागरम बटाटेवडे घेऊन आला होता. त्याचे निवृत्त वडील चाळीतल्या त्यांच्या घरासमोरील व्हरांड्यात बसले होते. याने त्यांना ते वडे देऊ केले. 

हा शाळकरी असताना, त्याचे वडील ऑफिसमधून येताना, कधीकधी, त्याच्यासाठी असंच काहीतरी चटकमटक आणायचे. त्यांना ते आठवलं आणि मोतीबिंदू झालेले त्यांचे डोळे चष्म्याआडून लुकलुकले. 

🌸

त्याच्या गिरणीत – कंपनीत हडताळ चालू होता. खर्च भागवताना तो मेटाकुटीला आला होता. बायकोशी त्याचं यावरूनच बोलणं चाललं होतं. एवढ्यात त्यांचा दुसरीतला मुलगा आपली पिगी बँक घेऊन आला, त्याला दिली आणि म्हणाला, 

“बाबा, हे घ्या. माझ्याकडे चिक्कार पैसे आहेत!”

🌸

लेकीच्या कॉलेजमध्ये आज ‘साडी डे’ होता. हिने आज तिच्या आईची आठवण असलेली तिची सर्वात लाडकी साडी लेकीला दिली.

🌸

ऑफिसमध्ये तो तसा कडक शिस्तीचा बॉस म्हणून ओळखला जाई, पण चहा पिऊन परतताना तो रोज वॉचमनसाठी चहा घेऊन येई, हे कोणालाच ठाऊक नव्हतं.

🌸

त्याचे वडील रस्त्यावरील एका अपघातात अचानक वारले. हा जेमतेम कॉलेजमधून बाहेर पडलेला. दोन वर्षांपूर्वी ज्या मित्राशी भांडण झाल्याने अबोला धरला होता, तो आला, आणि पैशाचं एक पाकीट त्याला देऊन गेला, 

“राहू देत, लागतील,” म्हणाला. 

🌸

आज ती एक नवी रेसिपी ट्राय करत होती. Sugar free टॅब्लेटस् घालून मिठाई करत होती. सासूबाईंना मधुमेह असल्याने, कालच एका बारशाला तिने त्यांना गोडधोड खाऊ दिलं नव्हतं.

🌸

माहेरी असताना लाडकं शेंडेफळ म्हणून खूप नखरे होते तिचे. आज ती आई झाली होती, लेकाला सर्दी झाली होती. रात्री झोपला की शेंबडानं नाक चोंदायचं लेकाचं. त्याला कडेवर उभं धरून, ही रात्ररात्र बसून रहायची. 

आज तिचा वाढदिवस होता. हा ऑफिसमधून येताना एक मस्त सुवासिक गजरा घेऊन आला तिच्यासाठी, आणि नाटकाची दोन तिकिटं!

🌸

या धकाधकीच्या जीवनात, सुख मिळवण्यासाठी दरवेळी वारेमाप पैसा खर्च करायची गरज नसते. ही ‘चिमूटभर आपुलकी’ पुरते, घेणाऱ्यालाही आणि देणाऱ्यालाही!

लेखक :  मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे

 

२)  टेडी बेअर …

माने हवालदारांची नुकतीच पुण्यातील मंडईजवळच्या शुक्रवार पेठ पोलीस चौकीत बदली झाली होती. शरीर विक्रयासाठी – वेश्या व्यवसायासाठी बदनाम असलेल्या बुधवार पेठेला लागून असलेली ही पोलीस चौकी. 

तरुण, तडफदार इन्स्पेक्टर भोसले स्टेशन इन् चार्ज आहेत, शिस्तीला कडक आहेत, असं त्यांच्याविषयी माने बरंच काही ऐकून होते.

माने कामावर रुजू झाले अन् भोसल्यांना त्यांनी नियमाबरहुकूम एक कडक सॅल्युट ठोकला. नमस्कार चमत्कार झाले, प्रथमदर्शनीच भोसल्यांबद्दल मान्यांचं चांगलं मत झालं. 

आणि आज ते भोसल्यांच्या बरोबर जीपने राऊंडला निघाले होते. भोसले साहेब जीपमध्ये पुढच्या सीटवर, जाधव ड्रायव्हरच्या शेजारी डावीकडे बसले होते आणि माने मधल्या रांगेत जाधवच्या मागे. 

काही कामासाठी भोसल्यांनी पॅसेंजर सीटसमोरचा कप्पा उघडला आणि मान्यांना त्यात दोन तीन टेडी बेअर (सॉफ्ट टॉईज) दिसले. मान्यांना आश्चर्य वाटलं. काल काहीतरी कारणाने त्यांनी साहेबांच्या टेबलाचा ड्रॉवर उघडला होता, त्यातही दोन टेडी बेअर होते, थोडे वेडेवाकडे पडले होते ते मान्यांनीच नीट करून ठेवले होते. 

साहेबांचं लग्न झालं असावं आणि त्यांना छोटी मुलं असावीत असं मनातल्या मनात म्हणत मान्यांनी मान डोलावली. 

“माने, तुमचं निरीक्षण चांगलं आहे, पण निष्कर्ष चुकीचा आहे,” आरशातून भोसले सरांनी आपल्याला कधी पाहिलं हे मान्यांना उमगलंच नाही. 

“म्हणजे माझ्याकडे टेडी बेअर असतात, हे खरं. पण माझं अजून लग्न झालेलं नाही, त्यामुळे मला मुलं असण्याचा प्रश्नच नाही,” भोसले म्हणाले, जाधव ड्रायव्हर खुदकन हसले आणि साहेबांनी आपलं मन कसं काय वाचलं याचं मान्यांना आश्चर्य वाटलं. 

पण मग साहेब या खेळण्यांचं करतात तरी काय असा प्रश्न मान्यांना सतावू लागला. जाधवांना विचारलं, तर “कळेल तुम्हाला योग्य वेळी,” असं त्यांनी काहीतरी गूढ सांगितलं. 

एक या टेडी बेअरचं गूढ आणि आठवड्यातून एक दोनदा तरी बुधवारातल्या वेश्या वस्तीतल्या कोणी ना कोणी बायका साहेबांच्या केबिनमध्ये यायच्या आणि त्यांना पाच मिनिटं तरी भेटून जायच्या – हा काय प्रकार आहे हे दुसरं अशी दोन रहस्यं मान्यांच्या डोक्याला भुंगा लावून होती. 

आज सकाळी सकाळीच माने मोटारसायकलने भोसले सरांना घेऊन निघाले होते, अप्पा बळवंत चौकातून येऊन, फरासखाना चौकीला उजवीकडे वळून गाडी मंडईकडे वळली, आणि तेवढ्यात शाळेत जाणाऱ्या एका मुलाला पाहून भोसल्यांनी मोटासायकल थांबवायला सांगितली. ते गाडीवरून उतरले, खिश्यातून एक चॉकलेट काढून त्या मुलाला दिलं, त्याच्या अभ्यासाची चौकशी केली, आणि निघताना गाडीवर टांग मारून बसताना विचारलं, “आणि आमचा छोटू कसा आहे ? मजेत आहे ना ? शाळेत येतो ना तुझ्याबरोबर ?”

त्या मुलाच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू फुललं, त्याने दप्तरात हात घालून एक टेडी बेअर बाहेर काढला. 

“मी नेहमी त्याला माझ्या बरोबरच ठेवतो. तुम्ही म्हणालात ना की एकटा राहिला की भीती वाटते त्याला म्हणून. तो आता माझा बेस्ट फ्रेंड आहे.” मुलानं मोठ्या अभिमानानं आणि आत्मविश्वासानं सांगितलं. गडगडाटी हसून, त्या मुलाच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन भोसल्यांनी गाडी पुढे घ्यायला सांगितली. 

पोलीस चौकीत आल्यावर सरांच्या पाठोपाठ माने केबिनमध्ये आले. त्यांना बसायची खूण करत भोसले त्यांना सांगू लागले. “माने, मी जेव्हा सब इन्स्पेक्टर म्हणून डिपार्टमेंटला रुजू झालो, तेव्हापासून हा टेडी बेअरचा सिलसिला सुरू झालेला आहे. हे मला माझ्या आईने दिले आहेत. आई स्वतः आपल्या हाताने हे टेडी घरी बनवते. 

मी तिला तेव्हा म्हटलंही की, आई, अग हे काय माझं वय आहे का टेडी बेअरशी खेळायचं ? अग मी आता पोलीस सब इन्स्पेक्टर आहे.

तेव्हा तिच्या अनुभवांचं पोतंडं उघडत तिनं मला सांगितलं. “बाळा, या दोन वाक्यांत तुझ्या तीन चुका झाल्या आहेत. पहिलं म्हणजे आईसाठी मूल नेहमीच लहान असतं. दुसरं म्हणजे टेडी बेअरशी खेळण्याचा वयाशी काही संबंध नसतो. आणि तिसरं म्हणजे, हे टेडी तुझ्यासाठी नाहीतच मुळी. 

तुझ्या कामात तुला जेव्हा कोणी बावरलेला, घाबरलेला, उदास, निराश दिसेल, तेव्हा तू एक टेडी त्या व्यक्तीला दे. त्या टेडीचा सांभाळ करायला सांग, कोणाला तरी आपल्या आधाराची गरज आहे हे भावना त्या माणसाला जगण्याचं उद्दिष्ट देऊन जाईल. 

आणि मग हा प्रघातच झाला. दर दहा पंधरा दिवसांनी महिन्याने आई आणखी टेडी पाठवते. आणि आपल्या कामाचं स्वरूपच असं आहे की असे दुःखी कष्टी आपल्याला भेटतातच. 

लहान मुलंच काय, पण या वस्तीत राहणाऱ्या माता भगिनीसुद्धा आपल्या स्वतःसाठी किंवा त्यांच्याबरोबर राहणाऱ्या अन्य कोणासाठी हे टेडी घेऊन जातात. 

आपल्या टेडीने कोणाला तरी मदत होत आहे ही भावना आईला सुखावून जाते, आणि तिनं केलेले टेडी सांभाळताना या सगळ्यांना आनंद मिळतो. 

आपण केवळ पोस्टमनचं निमित्तमात्र काम करत राहायचं,” भोसले सर पुन्हा गडगडाटी हसले. आणि यावेळी मान्यांनी सरांना जो कडक सॅल्युट मारला, तो फक्त नियमाबरहुकूम नव्हता, त्यात त्यांच्याबद्दल प्रेम – माया आणि आदरही होता.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भूक… ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ भूक ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

गाडी सुटली.चला, उद्या संध्याकाळपर्यंत पोहोचेल सुमा नागपूरला! हूश्श! शुभानं  मोठा सुस्कारा सोडला.एक मोठं काम पार पडल्यासारखं  तिला वाटत होतं. … ती पोहोचल्यानंतर पुढं आई ,आत्यामध्ये तिच्या लग्नाबद्दल थोडीफार बोलणी होतील. किंवा तिच्या भविष्याबद्दलही! आत्या तिला गावी घेऊन जाईल कदाचित्. खरं तर तिला अचानक गावी परत पाठवावं लागलं ही गोष्ट शुभाला खटकत होती. काही झालं तरी सख्खी आते बहीण होती ती… पण नाईलाज होता. त्याच नाईलाजानं सोहमला सांभाळायला ब्युरोमधून एक आया नियुक्त करावी लागली होती. सुमा सोहमची मावशी होती, आया नव्हती. खूप प्रेमानं मायेनं तिनं सोहमला सांभाळलं होतं… पण…

शुभा घरी पोहोचली. आयानं सोहमला थोपटून झोपवलं होतं. ही पण आडवी झाली आणि डोळ्यापुढे आठवणींचा एक व्हिडिओच ऑन झाला. बाळंतपणासाठी शुभा माहेरी नागपूरला गेली होती. मुलगा झाला… दणक्यात बारसं झालं… आणि हळूहळू शुभाची रजा सुद्धा संपत आली. त्यामुळे परत आपल्या घरी जायचे वेध तिला लागले. पण बाळाला.. सोहमला.. सांभाळणार कोण? विश्वासू आया मिळायला तर पाहिजे. शुभाच्या मनातले विचार तिच्या आईनं आधीच ताडले होते… आणि एक तोडगा पण काढला होता. अजून पक्कं काहीच नव्हतं.पण त्यांनी बारशासाठी गावाकडून आलेल्या आपल्या नणंदेला आणि भाचीला थांबवून घेतलं होतं. दोघी मायलेकी संध्याकाळी देवाला अन् एका बाल मैत्रिणीला भेटायला गेल्या होत्या. त्यामुळे शुभाच्या आईला बोलणं सोपं झालं. “अगं एकेकाळी काय वैभवात राहिल्या होत्या शांतावन्सं!…ते लोक गावचे जमीनदार, मालगुजार का काहीतरी म्हणतात तिकडे!सगळे गाव त्यांच्या मालकीचे होते.पण हे हळूहळू उतरणीला लागलेले वैभव होते.पूर्वीच्या कित्येक पिढ्यांनी नुसतं बसून खाल्लं…

वारे माप पैसा उधळला…. व्यसनं केली…. अन् कर्जबाजारी झाले. आता नवऱ्याच्या पश्चात तुझी आत्या आणि सुमा रहाताहेत ना ते अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत. तसं त्यांच्या बोलण्याचा तोरा अजून कायम आहे. तू लहानपणापासून पाहिलेस कधी आपल्या शांताआत्याला माहेरी आलेलं? बघितलीस ना त्या सुमाची स्थिती. जवळजवळ वीस वर्षाची होत आलीय.धड शिक्षण नाही.कुठली कला अंगात नाही. एवढं तेवढं कुठं काम करावं तर जमीनदारीचा मोठेपणा आड येतो. नुसतं घरात बसून असते ती. मी वन्संकडं विषय काढला होता. नाही म्हणाल्या नाहीत.तयार होतील बहुतेक. थोडा पैशाकडून हात मोकळा सोड. काही कुणा परक्याकडं पैसे जाणार नाहीत.निम्मे पैसे त्यांना पाठव. निम्मे सुमाला दे. म्हणजे तिच्या अकाउंटवर वगैरे टाक. त्यामुळे ती पण जरा आनंदानं काम करेल.”

आणि खरंच हे सगळं मान्य झाल्यानं वर्षा-दीड वर्षांसाठी शुभा सुमाला आपल्या घरी घेऊन आली.                    

या अशक्त, हाडन् काडं शरीराच्या,खप्पड गालाच्या, रखरखीत झिपऱ्या झालेल्या केसांच्या, निस्तेज डोळ्यांच्या, गावंढळ, बावळट मुलीला हे काम जमेल का ?…ही शंका देवेन्द्रला वाटत होती. पण त्यानं शुभाच्या निर्णयाला विरोध केला नाही.

एक जोडी कळकट कपड्यानिशी आलेल्या तिला प्रथम शुभानं चांगले चार-पाच ड्रेस, टूथब्रश सहित सगळ्या छोट्या मोठ्या वस्तू घेऊन दिल्या. तिची राहायची खोली ठीक करून दिली. सुमाच्या निस्तेज चेहऱ्यावर थोडे उपकृत झाल्याचे भावही शुभाला दिसले.

अजून महिनाभर रजा होती. तेवढ्या मुदतीत शुभानं सोहमला केव्हा केव्हा खायला काय करून द्यायचं ते शिकवलं….दिवसातून तीनदा कपडे बदलायचे… डायपर गॅप केव्हा, कसा द्यायचा. त्याला भरवताना स्वच्छ  एप्रन आठवणीनं घालायचा, त्याची खेळणी दर दोन दिवसांनी धुवायची. या आणि अशा कितीतरी सूचना देत तिने सुमाला जरा घडवायला सुरुवात केली. इतर कामाला ‘मावशी’ होत्याच. 

नंतर तिला सुमाला चांगलं राहायला शिकवलं. केसांना  तेल पाणी लागलं, अंगावर चांगले कपडे आले. लहानपणा पासूनची खूप मोठी भूक भागल्याचं समाधान सुमाच्या चेहऱ्यावर आलं. 

सोहमला सांभाळणं तिला छान जमू लागलं…  अन् मग थोडं स्वयंपाक घरात वावरणंही तिला आवडू लागलं. फ्रिज, मिक्सर ,ज्यूसर, मायक्रो, वॉशिंग मशीन अशा सगळ्या आधुनिक वस्तूही ती चांगल्या हाताळू लागली. सकाळ संध्याकाळ सोहमला बाबा गाडीतून बागेत फिरायला घेऊन जाऊ लागली.पण तिच्यात थोडासा खेडवळपणाचा अंश होताच. तोंडानं विचित्र आवाज काढून ती सोहमला खेळवायची.”छीऽ हे असले आवाज नको बाई काढूस! इतकी खेळणी आहेत, वाजणारी,रंगीबेरंगी लाईट लागणारी… त्यांनी खेळव.” अशासारख्या शुभाच्या कितीतरी सूचनेनुसार सगळी कामं होऊ लागली आणि शुभा निश्चितपणे कामावर रुजू झाली.

सुमाला घेऊन दिलेल्या मोबाईलवर फोन करून ती मधून मधून तिच्या कामावर नजर पण ठेवू लागली. बघता बघता वर्ष उलटून गेले. सोहम केव्हाचा चालू पण लागला होता. त्याच्या मागे मागे पळणे, हे सुमाचे फार आवडीचे काम होते.फक्त हे कामच नाही तर सुमा आता  युट्युब वरून रेसिपी पाहून नवीन नवीन पदार्थ पण करायला शिकली…. एकूणच काय ती घरातलीच एक होऊन गेली.

एकदा रविवारी शॅम्पू व कंडिशन्ड केलेले केस वाळवत ती उन्हात उभी होती.’ किती सुंदर आहेत हिचे केस!’ शुभाला जाणवलं. तिचं पहिलं रूप आठवलं. जणूआता तिने एकदम कातच टाकली होती. महिन्याला शुभा तिला काही पैसे हातखर्चाला देत असे. त्यामुळं पार्लरला जाणं, नवीन ड्रेस खरेदी करणं, शेजारच्या मैत्री झालेल्या मुलींबरोबर हॉटेलला जाणं, नव्या नव्या गोष्टी आत्मसात करणं,…..खरंच किती बदलली होती ती….हाडं न् काडं असलेल्या शरीराला गोलाई आली होती. खप्पड गाल चांगले गोबरे झाले होते. केस तर सुंदर होतेच, डोळ्यात आत्मविश्वासाची वेगळीच चमक आली होती. आणि तारुण्यात पदार्पण केलेल्या तिच्या चेहऱ्यावर तजेला पण आला होता.

शुभाला तिच्या प्रगतीचा फार अभिमान वाटू लागला होता. आठवी पास ती इतकं सफाईदार इंग्लिश बोलायला लागली होती की एक उच्च परिवारातील सुसंस्कृत मुलगीच वाटायला लागली होती.आत्याला ती सांगणार होती,’ सुमाला राहू दे काही वर्षं इथंच!… ब्युटीशियन,कुकिंग, ड्रेस डिझाईनिंग… किंवा असेच काहीसे कोर्स करेल ती इथं. पुढच्या आयुष्यात हे ज्ञान तिला खूप उपयोगी पडेल.’

…पण दिवसा दिवसा गणिक काहीतरी चुकीचं घडू पाहतंय अशी शंका शुभाच्या मनात येऊ लागली होती. आणि भलतीच शंका घेणे बरोबर नाही हे जाणत असलेल्या तिने बरेचदा ही गोष्ट तपासूनही पाहिली होती. जी मुलगी दाजी दिसल्यावर खाली मान घालून दुसऱ्या खोलीत निघून जायची, ती आता देवेंद्रच्या पुढे पुढे करतेय…. त्याला पाहताच तिची पूर्वीची बुजरी नजर आता जणू मोठ्या आत्मविश्वासनं त्याला आपल्यात गुंतवण्यासाठी आमंत्रित करतेय… हे चाणाक्ष शुभाच्या लक्षात येऊ लागले होते. हॉलमध्ये खेळणी पसरली आहेत..

सोहमला सुमा खेळवते आहे हे वर्षभरापासूनचे नेहमीचे दृश्य… पण काही वेळा ती त्या कामाबरोबरच व्हाटस् ॲप मधले विनोद, टीव्ही पाहत असलेल्या देवेंद्रला सांगत जोरजोरात नि:संकोचपणे,  थोडीशी निर्लज्जपणे हसते आहे. त्याच्याशी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करत आहे. अशा तऱ्हेची दृश्यं पाहिल्यावर नुसती शंकाच नाही तर शुभाची खात्रीच पटली.

विचार करता करता तिच्या हे लक्षात आलं की, दीड वर्षांपूर्वीची गावातली सुमा आणि आत्ताची सुमा यात जमीन अस्मानाचा फरक पडला आहे. सुमाच्या इतर भुका  शमल्या आहेत. सुग्रास अन्न खायची भूक… शहरातल्या मुलींसारखं फॅशनेबल राहायची भूक… गावात लाईट पण नव्हते त्यामुळे टीव्ही बघायची भूक… चांगली गाणी ऐकायची भूक… काहीतरी नवं शिकण्याची, करण्याची  भूक…. उच्च वर्गाचं जीवनमान जगण्याची भूक…. इच्छा!सगळंच तिला मिळालं होतं. अशक्य गोष्टी शक्यप्राय झाल्या होत्या. खेड्यातल्या जमीनदारीचा माज म्हणजे केवढा मोठा देखावा, छल कपट होतं, हेही तिला जाणवलं होतं. एकूणच काय तर पोटाची भूक, मनाची भूक, बुद्धीची भूक अशा तिच्या सगळ्या भूका भागल्या जात आहेत, त्या बाबतीत ती शांत आणि निश्चिंत झाली आहे, पण आता तिच्यात नवी भूक…. शरीराची भूक … जोरात उसळी मारू लागली आहे. जणू एक मादी नराला आकर्षित करण्याचा खूप जोरात प्रयत्न करत आहे. शुभाला हेही जाणवलं की हे देवेंद्रवरचं प्रेम वगैरे नाहीय…. तिच्या तरुण शरीराला निसर्ग हे करायला भाग पाडतोय. जे सजीवांच्यात असतं ते…. नैसर्गिक आकर्षण… मादीचा नराला किंवा नराचा मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न! पण मानव प्राण्याला देवानं बुद्धी दिलीय. सत्सत् विवेक बुद्धी! काय नैतिक आहे काय अनैतिक आहे जाण्याची बुद्धी !…आणि सुमाचं हे आत्ताचं वागणं दुर्दैवाने नीतिमत्तेला धरून नाहीय.आपण आपल्या मनावर ताबा ठेवला पाहिजे ही मानसिकता सुमामध्ये नाहीय. तिची बुद्धी काम करत नाहीय.

त्यामुळे तिच्या या भूकेला इथंच आडवणं भाग होतं. आईबरोबर शुभानं चर्चा केली….. आणि सुमाचं भवितव्य…. शिक्षण घेणं का लग्न करणं हे सर्व तिने आईवर आणि आत्यावर सोडलं.

पती-पत्नीमध्ये एक भूकेलं, तन- मन ‘और वो’ म्हणून प्रवेश करू इच्छित होतं. त्यामुळे तिला कशासाठी गावी पाठवत आहोत हे कळू न देता वेगळ्या तऱ्हेने तिला समजावून गावी परत पाठवणं भाग होतं आणि शुभानं तेच केलं होतं.

सोहमच्या रडण्याच्या आवाजानं आठवणींचा व्हिडिओ ऑफ झाला.  ती भानावर आली. नव्या आयाची ओळख नसल्याने तो रडत होता. त्याला शांत करण्यासाठी आणि या नवीन आयाला  कसं व्यवस्थित मॅनेज करायचं याचा विचार करत करत शुभा सोहमला कडेवर घेवू लागली.

©  सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १० ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १० ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- आयुष्यात कोणतेही प्रसंग कोणत्याही घटना कधीच विनाकारण घडत नसतात. त्याला कांही एक कार्यकारणभाव असतोच.माझी बहिण आणि मेव्हणे दोघांनीही मला एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधे नाव नोंदवायला प्रवृत्त करणंही याला अपवाद नव्हतं याचा थक्क करणारा प्रत्यय मला लवकरच येणार होता!)

खरंतर अशा विशिष्ट कार्यकारणभाव असणाऱ्या पण त्या त्या क्षणी चकवा देत अकल्पितपणे घडत रहाणाऱ्या प्रसंगांनीच आयुष्य आकाराला येत असतं.ते सगळे क्षण आपण नेमके कसे स्विकारतो यावरच आपलं हेलपाटणं किंवा सावरणं अवलंबून असतं.मी त्याक्षणी आयुष्यात अशा वळणावर उभा होतो,की एखादीही नकारात्मक घटना स्विकारण्याची माझी मानसिक तयारीच नव्हती.पण अगदी कोणत्याही क्षणी घडू शकतील असे माझ्या ‘त्या’च्यावरील श्रद्धेची कसोटी पहाणारे अनेक प्रसंग मात्र वाटेत दबा धरुन बसलेले होतेच.मला ते ज्ञात नसल्यामुळेच केवळ मी अज्ञानातल्या सुखात निश्चिंत होतो!

दुसऱ्या दिवशी बहीण आणि मेव्हण्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी दोन दिवस उन्हात हेलपाटे घालून मुंबईतल्या एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधे नाव नोंदवलं. फॉर्म भरताना पत्रव्यवहाराचा पत्ता अर्थातच बहिणीचा दादरचाच दिला होता.

मुंबईतल्या कडक उन्हात मी दोन दिवस घातलेल्या त्या हेलपाट्यांमुळे किंवा मुंबईतल्या बदललेल्या हवापाण्यामुळेही असेल मला अचानक खूप ताप भरला. सलग तीन दिवस डाॅक्टरांचं औषध घेतल्यानंतर तो हळूहळू उतरला तरी अशक्तपणा जाणवत होताच.मन तर मरगळूनच गेलं होतं. अगदी बहिण झाली तरी तिच्यावर असं ओझं बनून पडून रहाणं मला नको वाटतं होतं.एखादा चमत्कार घडावा तसा मनात भरुन राहिलेला तो अंधार अचानक नाहीसा होऊन लख्ख प्रकाश जाणवला तो माझ्या मोठ्या भावाकडून आलेल्या अनपेक्षित टेलिग्राममुळे!

इस्लामपूरला भावाच्या बि-हाडी स्टेटबॅंकेने पाठवलेलं माझं अपाॅईंटमेंट लेटर येऊन पडलं होतं.त्यानुसार जाॅईन व्हायला पंधरा दिवसांची मुदत होती.भावाने तत्परतेने ते काॅललेटर रजिस्टर पोस्टाने दादरच्या पत्त्यावर पाठवून दिल्याची ती तार होती!

माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही.नकारात्मक विचारांनी मलूल झालेलं मन एकदम उल्हसित झालं.पिसासारखं हलकं होऊन हवेत तरंगू लागलं.मनाच्या उभारीमुळे अंगातला अशक्तपणा कुठल्याकुठे पळून गेला.

मी मुंबईला यायला निघाल्यापासूनच्या काळात घडलेली ही पहिलीच सुखद घटना न् तीही अशी अनपेक्षित. त्यामुळे ती मनाला उभारी देत होती आणि मला पूर्णत: निश्चिंतता!

भावाने पाठवलेलं रजिस्टर मिळालं त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यातलं काॅल लेटर घेऊन मी स्टेट-बँकेच्या स्टाफ डिपार्टमेंटमधे जाऊन भेटलो तो ‘गुरुवार’ होता!हा योगायोग मला दिलासा देत मनावरचं अनामिक दडपण थोडं दूर करणाराच होता.बॅंकेच्या मेडिकल आॅफीसरना ऍड्रेस केलेलं माझ्या मेडिकल टेस्टसाठीचं पत्र आणि स्टेट बॅंकेच्या वरळी ब्रॅंचला जॉईन होण्यासाठीचं कॉल लेटर तयार होईपर्यंत मला बसायला सांगण्यात आलं.ती दहाएक मिनिटं मी खूप रिलॅक्स होतो. आई-बाबा,भाऊ सगळ्यांची अतिशय तिव्रतेने आठवण झाली.  आणि त्यांना हे सगळं सांगण्यासाठी मी आतूर होऊन गेलो.मोबाईल खूप दूरची गोष्ट,तेव्हा घरोघरी टेलिफोनही नसायचे.पत्र हे एकच संपर्काचं साधन. त्यामुळे घरच्या आठवणींसोबत उलटसुलट विचार मनात गर्दी करीत होते.भावाचा विचार मनात आला आणि आठवण झाली ती त्याने पूर्वी याच विषयीच्या गप्पांच्या ओघात मला सांगून ठेवलेल्या एका गोष्टीची. ती आठवताच मी क्षणभर साशंक झालो. इथले मेडिकल ऑफिसर कुणी ख्रिश्चन डॉक्टर होते. ते अतिशय स्ट्रीक्टच नव्हे फक्त तर खडूसच होते म्हणे. त्यांना व्यवस्थित फेस करणं महत्त्वाचं होतं. मी याच सगळ्या विचारात दंग असतानाच माझ्या हातात माझ्या मेडिकल टेस्टसाठीचं आणि माझं पोस्टींगचं अशी दोन्ही पत्रे देण्यात आली. मेडिकल टेस्टचं पत्र पाहिलं आणि मला आश्चर्यचा धक्काच बसला. पत्र त्या कुणा ख्रिश्चन मेडिकल आॅफीसरच्या नावे नव्हतं तर चक्क ‘डॉ.आनंद लिमये’ यांना ऍड्रेस केलेलं होतं! नेहमीचे ते खडूस मेडिकल-ऑफिसर रजेवर होते म्हणे.म्हणून त्यांच्या जागी  पॅनलवर नाव असणारे हे  डॉ.आनंद लिमये त्यांचा तात्पुरता कार्यभार सांभाळत होते!मला माझ्या मेडिकल टेस्टसाठी त्यांच्याच क्लिनिकमधे जायचं होतं.माझ्या मोठ्या भावाचं नावही आनंद लिमयेच. मनाला थक्क करणारा हा योगायोग निदान त्याक्षणी तरी मला एक शुभसंकेतच वाटला होता! मेडिकल टेस्टचं दडपण क्षणार्धात विरूनच गेलं.आता यापुढं आयुष्यात हवं ते मिळवण्यापासून मला कुणीही रोखू शकत नाही ही कल्पनाच अतिशय सुखकारक होती.मी लगेचच डॉ.आनंद लिमये यांना भेटलो.तो शुक्रवार होता.मेडिकल टेस्ट फॉरमॅलिटीज् पूर्ण होऊन मी संध्याकाळी उशिरा घरी परत आलो.माझं पोस्टींग वरळी ब्रॅंचला झालेलं असल्याने मेडिकल रिपोर्ट ते दुसऱ्या दिवशी  परस्पर वरळी ब्रँचलाच पाठवणार होते जिथे मला सोमवारी जॉईन व्हायचं होतं !

दुसऱ्या दिवशीचा रविवार हा माझ्या आयुष्यातला आरामाचा अखेरचा दिवस ही कल्पनाच उत्साहाला उधाण आणणारी होती.त्यानंतर माझं अतिशय धावपळीचं, जबाबदारीचं नवं आयुष्य सुरु होणार होतं!मुंबईला येण्यासाठी घर सोडतानाची अस्वस्थता आणि अनिश्चितता यांचा लवलेशही आता मनात नव्हता.सगळा संघर्ष संपला होता आणि मी जणूकाही प्रशस्त

प्रकाशवाटेच्या उंबरठ्यावर उभा!तो उंबरठा ओलांडून त्या वाटेवर पहिलं पाऊल टाकणंच काय ते बाकी होतं!आता घरची जबाबदारी मी उचलू शकणार होतो.मोठ्या भावाच्या डोईवरचं ओझं मला हलकं करता येणार होतं.सर्वार्थानं  सर्वानाच दिलासा देणारं हे अनोखं वळण माझ्यासाठी ‘त्या’नं मला दिलेलं वरदानच होतं जसं कांही. आयुष्य इतकं सरळ सोपं असू शकतं याचा असा आनंददायी  अनुभव मी आयुष्यात प्रथमच घेत होतो. मनात होता फक्त आनंद,उत्साह आणि नवं कार्यक्षेत्र,तिथली माणसं,कार्यपध्दती,नवा अनुभव या सगळ्याबद्दलची आतूर उत्सुकता..! पण…? पण हे सगळं माझ्यासाठी अळवावरचं पाणीच ठरणार आहे अशी पुसटशी शंकाही तेव्हा माझ्या मनात आलेली नव्हती!आयुष्य इतकं सरळ सोपं नसतं याचा धक्कादायक प्रत्यय माझ्यावर आघात करायला टपून बसला होता हे हातून सगळं निसटून गेल्यानंतरच मला समजणार होतं.अगदी होत्याचं नव्हतं झाल्यानंतर!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लंच ब्रेक… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ लंच ब्रेक… ☆ डॉ. शैलजा करोडे

रात्रीचे दहा वाजलेत. शहरातील शासकीय रूग्णालयात दहा/बारा मुले अत्यवस्थ आहेत. शाळेची मुख्याध्यापिका असल्याने ही मुले माझीही जवाबदारी असल्याने मी ही रूग्णालयात थांबून होते. मुलांचे आई वडील तर चिंताक्रांत तर होतेच पण माझीही चिंता काही कमी नव्हती. उलट मला पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. होय दुपारच्या मध्यान्ह भोजनानंतर मुलांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. मी मुलांना ताबडतोब रूग्णालयात दाखल तर केलेच, पालकांनाही सूचित केले होते. “मॅडम, असं घडलंच कसं, काय खाल्लं मुलांनी आज ” ” काय म्हणजे, खिचडी आणि उसळ होती आजच्या मेनूत. ” ” मुलांना खायला देण्यापूर्वी तुम्ही किंवा तुमच्या शिक्षकांनी टेस्ट नाही केलं काय ? ” ” केलं ना, आमच्या शिक्षिका अरूंधती मॅडमने खाऊन पाहिलं थोडं. नंतरच मुलांना वाढलं. त्यांना त्रास नंतर झाला, तोपर्यंत मुलांची जेवणं आटोपली होती. त्याही खाजगी रूग्णालयात आहेत. ” ” ते काही नाही, आमच्या मुलांच्या जीवावर बेतलंय. याची चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर कार्रवाही झालीच पाहिजे. ” पालकांचा सूर निघाला होता. तर काही पालकांनी पोलिस स्टेशनातही तक्रार दिली होती. या सगळ्याला सामोरं जायचं होतं मला. दिवसभर भूक तहान विसरुन मी रूग्णालयात थांबून होते.

विशाखा, रात्रीचे दहा वाजलेत. मी येतोय रूग्णालयात तुला न्यायला. घरी मुले व आई बाबा चिंतेत आहेत. सगळं ठीक होईल. रूग्णालयात डाॅक्टर्स, नर्सेस आणि मुलांचे आई वडील आहेतच. तू तुझे कर्तव्य केलेच आहेस. तुझ्या रूग्णालयात थांबण्याने परिस्थिती बदलणार आहे काय ? आपण डाॅक्टर्स च्या संपर्कात राहणार आहोतच. मी येतोय.”

इतक्यात डाॅक्टर आलेत राऊंडला. ” काय म्हणताय आमचे छोटे उस्ताद ” डाॅक्टरांच्या या आपुलकीच्या वाक्यानेच रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे सावट जाऊन थोडा उत्साह संचारला. ” व्हेरी गुड, काय बरं वाटतंय ना आता. घरी जायचंय काय ? ” ” होय डाॅक्टर अंकल ” प्रथमेश चौधरी बोलला. प्रथमेश इयत्ता पाचवीत शिकणारा दहा वर्षीय विद्यार्थी होता. नंतर निलेश, प्रकाश, प्रज्वल बरीच मुले आता बरं वाटत आहे सांगत होती. बारा पैकी दहा मुलांना डाॅक्टरांनी घरी नेण्यास परवानगी दिली. घरीच मुलांची काळजी घ्या. गरम व पचायला हलकं अन्न द्या दोन तीन दिवस. Now you are o k my little friends. take care.

मुलांना डिस्चार्ज मिळाला. मलाही थोडं बरं वाटलं. आता निकिता आणि वेदांत राहिले होते. त्यांना अजूनही अशक्तपणा वाटत होता त्यामुळे सलाईन चालू होते. डाॅक्टरांनी रूग्ण फाईलमध्ये औषधे लिहून देऊन नर्सला तशा सूचना दिल्या.

अशोक मला नेण्यासाठी रूग्णालयात आले. निकिता व वेदांतलाही भेटले. ” काळजी घ्या ” त्यांच्या पालकांशी बोलले, चल विशाखा, बराच उशीर झालाय. किती मलूल दिसतोय तुझा चेहरा. पाणी सुद्धा प्यायलेली दिसत नाहीस बर्‍याच वेळेपासून ” म्हणत अशोकने पाण्याची बाॅटल उघडून आधी मला पाणी प्यायला लावले. तशी मला थोडं बरं वाटलं. चहा आणू काय तुझ्यासाठी” “नको, अकरा वाजयला आलेत, आता कोठे मिळेल चहा, चला घरी जाऊ” आम्ही निघालो. पण विचारचक्र माझी पाठ सोडत नव्हतं.

सरस्वती विद्या मंदिर माझी शाळा साक्षात सरस्वतीची उपासना करणारीच होती. चांगला हुशार, होतकरू, मेहनती शिक्षक व कर्मचारी वृंद हे माझ्या शाळेचं वैशिष्ट्य. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव, संगीत, पोहणे, मैदानी खेळ, श्रमदानातून वृक्षारोपण व इतर विकासात्मक कार्यक्रम राबविणे, यामुळे शाळेचा नावलौकीक सर्वदूर पसरला होता. माझ्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालकांची धडपड असायची, विशेष म्हणजे पटसंख्येअभावी बंद पडणार्‍या मराठी शाळा पाहाता आमची शाळा मात्र आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यासह नावलौकिक मिळवत होती. शाळेची पटसंख्या 425 होती ही खरंच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. माझ्या शाळेत गरीब परिस्थितील मुलेही भरपूर होती. मध्यान्ह भोजन ही तर त्यांची गरज होती. शाळेच्या निमित्ताने त्यांचं एकवेळचं भोजन होत असल्याने कुपोषणातून ही मुले बाहेर आली होती.

रोज दुपारी एक वाजता लंच ब्रेक व्हायचा. मुलांची शाळेच्या वर्‍हाड्यातचं अंगत पंगत व्हायची. तत्पपूर्वी शाळेतील एक शिक्षिका आधी ते अन्न ग्रहण करायची व मगच ते मुलांना वाढलं जायचं. कालपर्यंत सगळंच व्यवस्थित चाललं असतांना आज मात्र ही घटना घडली होती. मुलांना अन्न विषबाधा झाली होती.

“विशाखा उतर खाली. घर आलंय आपलं ” मी तंद्रीतून बाहेर आले. ” नको इतका विचार करूस. सांभाळ स्वतःला. आजारी पडायच. काय तुला “” पणअशोक शाळेची प्रमुख म्हणून मलाच जवाबदार धरणार ना. चौकशीचा ससेमिरा माझ्याच मागे लागणार ना ” ” लागू दे ना चौकशीचा ससेमिरा. तू कशी काय दोषी असशील ?. अन्नधान्य खरेदी, अन्नधान्य पुरवठा करणारे, नंतर अन्न शिजविणारे केटरर्स, भली मोठी साखळी आहे ही. तुझा तर याच्याशी काहीही संबंध नाही. मग कशाला चिंता करतेस” “अशोक अजूनही दोन मुलं रूग्णालयात आहेत. मुले शाळेत पाच सहा तास असतात म्हणजे आम्हीही त्यांच्या आईच्या भूमिकेत असतो रे. माझं मन नाही लागत “. “बरोबर आहे तुझं. ती दोन्ही मुलंही उद्या डिस्चार्ज होतील. काही काळजी करू नकोस. झोप शांतपणे, दिवसभर खूप दमली आहेस “

नेहमीप्रमाणे शाळेची प्रार्थना आटोपुन विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले. शाळेचं पुढील आठवड्यात इन्स्पेक्शन होणार होतं. मी शाळेचा वर्षभरातील सगळा अहवाल नजरेखालून घालत होते कि शिपाई अर्जुन आला व पोलीस इन्स्पेक्टर भोसले चौकशीसाठी आल्याचे सांगितले. काही पालकांनी तक्रार नोंदवली होती. “पाठव त्यांना आत”

मॅडम काल काही मुलांना मध्यान्ह भोजनानंतर विषबाधा झाली. त्यासंदर्भात चौकशीसाठी आलोय.

“या, बसा इन्स्पेक्टर “

तर मॅडम, शाळेला अन्न कोणत्या कोणत्या केटरर कडून येतं. ?

प्रिया केटरर्स सर्व्हिसकडून “रोज मुलांना अन्न देण्यापूर्वी शिक्षिकांनी आधी ग्रहण केलं जातं काय ? ” होय, कालही अरुंधती मॅडम यांनी ग्रहण केलं होतं. त्यांनाही त्रास झाला. त्याही खाजगी रूग्णालयात आहेत. ” ” ठीक आहे मॅडम, पुढील चौकशी करतो आम्ही. तुम्हांलाही कळवू ” ओ के इन्स्पेक्टर ” 

ही काही माझ्याच शाळेपुरती मर्यादित घटना नव्हती. अनेक ठिकाणी नित्कृष्ठ अन्न, केटरर्सचा हलगर्जीपणा, अन्न शिजवतांना स्वच्छता न राखणे यानुळे असे प्रकार घडतात. कालच्या घटनेतही हाच प्रकार आढळून आला. दोषींवर कार्रवाहीपण होईल. पण मुलांचं काय ? माझ्या ओळखीतील एका गरजवंत काकुंना मी शालेय मध्यान्ह भोजनाची व्यवस्था करणार काय म्हणून विचारलं, ” होय करीन कि मी, पण मला एवढे झेपेल काय ? ” काकू दोन तीन मदतनीस ठेवा ना. त्यांनाही रोजगार मिळेल आणि माझ्या मुलांना सात्विक घरगुती भोजन मिळेल. मी तुमचं नाव कळवते वरती.

आता लंच ब्रेक मध्ये मी ही मुलांसोबत असते.

“वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे

सहज हवन होते नाम घेता फुकाचे

जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म “

मी खर्‍या अर्थाने जगते.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कोण म्हणतं आजची पिढी बेजबाबदार आहे ? ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ कोण म्हणतं आजची पिढी बेजबाबदार आहे ? ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

परीक्षा केंद्रात पाऊल टाकेपर्यंत, अगदी स्कूलबसमध्ये बसल्यावरही त्यांची अभ्यासाची उजळणी चालूच होती. तसे ते चौघेही हुशार,आणि वर्गमित्रांच्या मदतीला धावून जाणारे असल्यामुळे  सगळ्यांचे लाडके होते. ड्रायव्हर काकांची गाडी भरधाव धावत होती .अचानक  स्कूल बसला हादरा बसला आणि सगळेच एकमेकांच्या अंगावर कोसळले. राकेश ओरडला,” काका प्लीज गाडी हळू घ्या ना जरा त्या आजींच्या जवळून गाडी गेली हो ” ड्रायव्हर काका नेहमी चिडलेलेच असायचे. राकेशच्या सूचनेवर ते कावले, ” अरे हळू घेऊन कसं चालेल ? परीक्षा आहे ना तुमची ? उशिर झाला तर  मला मेमो मिळेल. पण मी म्हणतो ही म्हातारी माणसं घरी बसायच सोडून बाहेर भटकतातच कशाला “?

“अहो पण काका..” राकेश  काही बोलणार होता, तोच  भरधाव धावणाऱ्या स्कूलबसच्या वेगाला  घाबरून  धक्का लागल्यामुळे  एक आजोबा चक्कर येऊन खाली पडले. राकेश ओरडला,  “ड्रायव्हर काका गाडी थांबवा आजोबांना भोवळ आलीय अहो ते पडलेत. प्लीज तुम्ही गाडी थांबवा. ” पण काकांनी गाडी थांबवलीच नाही उलट वेग वाढवत ते म्हणाले,    ” चुकी माझी नाही,तो म्हाताराच मधे आलाय .तोल सांवरता येत नाही तर कशाला बाहेर पडाव ह्या म्हाताऱड्यांनी ? त्यांच्याकडे बघतील बाकीची माणसं तुम्ही नका  त्यांच्या मधे पडू . तुम्ही तुमच्या परीक्षेचे बघा. ती महत्त्वाची आहे,आणि तुम्हाला वेळेवर पोहोचवलं नाही तर तुमचे आईबाप आणि शाळेचे मुख्याध्यापक माझी हजेरी घेतील.  तुमचही वर्ष वाया जाऊन नुकसान होईल, ते काय हा म्हातारा भरून देणार आहे का ?” वर्ष वाया जाईल या भीतीने बाकीची मुलही ओरडली, ” राकेश बरोबर आहे ड्रायव्हर काकांच  आपली परीक्षा महत्त्वाची आहे .पण काय रे ? तुझे कोण लागतात तेआजोबा ? तुला का एवढा पुळका आलाय त्यांचा” ? राकेशनी पाहयल वर्ग मित्रांशी वाद घालण्याची ही वेळ नाही .आजोबा रस्त्याच्या कडेला एकटे पडले होते  जवळून वाहने वेगाने पळत होती थांबायला कुणालाच वेळ नव्हता कारण माणसातली माणुसकीच नष्ट झाली होती. राकेश आणि त्याचे तिघं मित्र ओरडले, ” ड्रायव्हर काका प्लीज गाडी थांबवा. आम्हाला उतरु द्या ” असं म्हणून त्यांनी जबरदस्तीने स्कूल बस थांबायला लावली.गाडीला रागारागाने कचकन ब्रेक दाबले गेले. ती चौकडी खाली उतरून आजोबांकडे वेगाने धावली.तितक्याच वेगाने बस मुलांना परीक्षेला वेळेवर पोहोचवण्यासाठी पुढे निघाली. टवाळखोर मित्र म्हणाले, ” स्वतःला फार शहाणे समजतात हे चौघजण. महत्वाची परीक्षा बोंबलली यांची. आता बसा  घरच्यांचा मार खात “. 

पण हे ऐकायला राकेश आणि त्याचे  मित्र तिथे होतेच कुठे ! ते आजोबांजवळ पोहोचले.  एकाने पाणी मारून आजोबांना सावध करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्याने त्यांच्या खिशातून मोबाईल काढला. हे काय ? आजोबांना मानल पाहिजे हं ! त्यांच्या खिशात छोटीशी डायरी त्यात महत्वाचे नंबर आणि घरचा पत्ता पण होता. पटकन मुलांनी फोन लावला तोपर्यंत रिक्षा आली.रिक्षांत आजोबांना बसवून जवळच्या हॉस्पिटलचा पत्ता,राकेशनी  मित्राला आजोबांच्या  घरच्यांना कळवायला सांगितला. पुढच्या घटना वेगाने घडल्या  घरचे आले आजोबांना ऍडमिट केल. डॉक्टर म्हणाले,” वेळेवर आणलंत तुम्ही.  पेशंटला मेंदूला थोडा मुका मार, धक्का लागला आहे.  उशीर झाला असता तर केस कोमात गेली असती, पण काही हरकत नाही आम्ही ताबडतोब उपचार सुरू करू.  काळजी करण्याचं  कारण नाही. आजोबा लवकर बरे होतील. “

हे ऐकल्यावर त्या चौघा मित्रांच्या चेहऱ्यावर सार्थकतेच हंसू ऊमटल. आजोबांच्या मोठ्या मुलाला राकेश म्हणाला, ” दादा आम्ही निघू कां आता ? आमचा महत्त्वाचा पेपर आहे.” दादा आश्चर्याने ओरडले, “अरे बापरे ! म्हणजे महत्त्वाची परीक्षा बुडवून तुम्ही माझ्या बाबांच्या मदतीला धावून आलात ? आमच्यामुळे तुमची वर्षभराची मेहनत वाया गेली. पण बाळांनो हेही तितकच खरं की वयाने लहान असून तुम्ही मोठ्या माणसांसारखे भराभर निर्णय घेऊन धावत पळत बाबांना  ॲडमिट  केलंत म्हणून तर पुढचं संकट टळल.  तुमच्या उपकाराची परतफेड मी कशी करू”? चौघजणं एकदम म्हणाले, ” नाही हो दादा आमचं कर्तव्यच होत ते”. त्यावर मुलांची पाठ थोपटत दादा म्हणाले, “बरं मला एक सांगा तुमची  नांव काय ?  शाळा कुठली? आणि हो मुख्याध्यापकांचे नाव काय ? दहावीचेच विद्यार्थी आहात ना तुम्ही ? कुठल्या तुकडीत आहात ?उत्तरं देताना, त्या चौकडीच्या ध्यानात आलं ..  बाप रे !परीक्षेची वेळ संपत आलीय.कडक  शिस्तीचे, नियमांचे काटेकोर, शिस्तप्रिय असलेले मुख्याध्यापक आपल्याला वर्गात काय परीक्षा केंद्रातही शिरू देणार नाहीत या भीतीने ते पळत सुटले. 

आता त्यांच्यापुढे संकट उभं  राहिलं होत ,परीक्षकांना आणि घरच्यांना काय उत्तर द्यायचं ? परीक्षेतल्या प्रश्नापेक्षाही मोठा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे उभा होता.सगळेजण त्यांना मूर्ख, महत्त्वाच्या परीक्षेच्या बाबतीत बेजबाबदार, आणि नसते उपद् व्याप  करणारे असेच लेबल लावणार होते.कारण परीक्षेची वेळ संपली होती त्यांचा पेपर बुडाला, आणि त्यांना परीक्षकांनी घरी पाठवलं होतं.चौघ जण हताश झाले.आजोबांना मदत करायला धावलो ते बरोबर की चूक हेच मुलांना कळेना.राकेश म्हणाला “आता आपल्याला दोष देणारेच भेटतील. मित्रांनो त्यांच्याकडे लक्ष द्याल तर अजून निराश व्हाल.आपण वाईट  काम तर केलं नाही ना,मग मन शांत ठेवून  पुढच्या उद्याच्या पेपराचा विचार करूया.कालचा पेपर गमावल्याचं दुःख सोडून आपण आता पुढच्या पेपरात यश नक्की मिळवूया कारण कालची गेलेली वेळ आता परत येणार नाही.  आणि मग दुसऱ्या दिवशी कसंबसं एकमेकांना सावरत ते परीक्षा केंद्राजवळ आले. 

आज जरा लवकरच आले होते ते . इतक्यात त्यांना सूचना मिळाली मुख्याध्यापकांनी ऑफिसमध्ये बोलावलय. चौघेही गांगरले.परीक्षेबद्दलच असणार,सरांना वाटलं असेल पोरांनी बाहेर उपदव्याप करून बेमुर्वतपणे पेपर टाळला आहे .पुढे रामायण काय महाभारत घडणार, ह्या भीतीने ती मुल खालच्या मानेनी आत शिरली. मुख्याध्यापकांपुढे त्यांचं काहीही चालणार नव्हतं. कितीही कशीही आपली बाजू मांडली तरीही कुणी ऐकून घेणार नव्हतं . इतक्यात मुलांच्या कानावर आवाज आला, “हो सर हीच ती मुलं   यांच्यामुळेच  आमचे बाबा वाचले.” चमकून चौघांच्या खालच्या माना वर झाल्या.अरेच्चा ! हे तर कालच्या आजोबांचे चिरंजीव. हे कसे काय इथे ? मुख्याध्यापकांकडे मुलांनी घाबरून बघितलं तर–अहो आश्चर्यंम! ते गालांतल्या गालांत हसत होते  नेहमीच्या करड्या नजरेत आता कौतुक होत. मुख्याध्यापक म्हणाले, ” घाबरू नका, तुम्ही उनाड  आहात अशी तुमच्या हितशत्रूंनी माझ्याजवळ तक्रार केली होती. म्हणून मी तुमच्यावर  नेहमी आग पाखडत होतो. पण माझ्या लक्षात आलं आहे ..  कान आणि डोळ्यांच्या मध्ये एक विताच अंतर असतं .तुम्हाला उनाड म्हणून पदवी मिळाली असली तरी तुमचा कालचा उपक्रम कौतुकास्पदच आहे. या आजोबांच्या चिरंजीवांनी सगळी हकीकत मला सांगितली. तुमच्यामुळे त्यांच्या बाबांवरच मोठ्ठ संकट टळलं.अडचणीत असलेल्या आजोबांच्या मदतीला तुम्ही धावलात खूप मोठी कामगिरी केलीत.डॉक्टरांनी पण तुमच खूप कौतुक केलय . उद्याचे आदर्श नागरिक आहात तुम्ही. असे कर्तव्यनिष्ठ  विद्यार्थी माझ्या शाळेत आहेत याचा मला सार्थ अभिमान वाटला.”.

या कौतुकाने मुलं संकोचली पण त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची सावली उमटली, कालचा पेपर बुडाल्याच दुःख होत त्यांच्या मनात.आता ते दादा पुढे झाले आणि म्हणाले,” बाळांनो परीक्षा फक्त शाळेतच द्यायची असते असं नाही,जसे तुम्ही वयाने मोठे व्हाल तशी अनुभवाची परीक्षाही तुम्हाला भावी आयुष्यात द्यावी लागेल. जगाच्या पाठशाळेतील पहिली परीक्षा माझ्या बाबांचा जीव वाचवून तुम्ही पार पाडलीत,पण तितकीच शालेय परीक्षाही महत्त्वाची आहे हे मी जाणतो.  पण आमच्यामुळे तुमचा कालचा महत्त्वाचा पेपर बुडला  मला खंत वाटली तुमच्या महत्त्वाच्या वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून मी आज मुद्दाम तुमच्या मुख्याध्यापकांना कालची परिस्थिती निवेदन केली आहे, तुम्हाला पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी द्यावी अशी विनंती करायला मी आलो होतो, आणि मुख्य म्हणजे  सरांनी ती मान्यही केली आहे. 

मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन सर म्हणाले, ” हो या साहेबांच्या तोंडून मी कालचा प्रकार ऐकला आणि मलाही अभिमान वाटला तुमचा. अभ्यासाची तुमची मेहनत वाया जाणार नाही.  परीक्षा देण्याची संधी तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुम्ही परीक्षेत यशस्वी व्हाल अशी मला खात्री आहे. पण आता आजचा पेपर द्या आणि यशस्वी व्हा. पळा आता ! ती चौकडी पळायच्या आवेशात  होती तर दादांचा आवाज त्यांच्या कानावर पडला  “तुम्हाला  best -luck रे बाळांनो, पास झाल्यावर आजोबांना पेढे द्यायला विसरू नका हं! राकेश पळता पळता ओरडला,” हो नक्की काका, आजोबांचे आशिर्वाद आम्हाला हवे आहेतच.” 

मुलांनी पुढचं पाऊल टाकल.  आता त्यांचं पाऊल पुढे आणि पुढेच पडणार होतं. प्रगतीपथावर, मोठ्यांच्या आशीर्वादावर, आणि यशाच्या मार्गावर ते उत्साहाने धावणार होते.                  

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares